Jhale mokle aakash - 1 books and stories free download online pdf in Marathi

झाले मोकळे आकाश - १











आज त्याचं कशातचं मन लागत नव्हतं.सकाळी आॅफीसमध्ये आल्यापासून नूसता एकाच जागी बसून होता.दोन व्हिजिट पेंडीग होत्या एक रिपोर्ट तयार करायचा होता ,पण डोक्यात सूरू असलेले विचार काही थांबायचं नावं घेत नव्हते.

एव्हाना दुपार झाली तरी तो अजूनही "तीच्या "चं वीचारातचं गुंतलेला.

ती???

ती "भैरवी विक्रमांशू राजेशीर्के "

नूकताचं सहा महिन्यांपूर्वी तीचा आणि विक्रमांशूचा अगदी विधीवत पद्धतीने,सर्वांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.

अरेंजमॅरेज पद्धतीने जमलेलं लग्न.टिपीकल कांदेपोह्यांचा कार्यक्रम.

दोन्ही घरची पसंती झाली.मूलगा मुलगी एकमेकांना सुस्वरूप.नावे ठेवायला जागा नाही.दोघेही घरच्यांच्या मताबाहेर नाहीतं.

मगं काय ठरलं लग्न.पंधरा दिवसात साखरपुडा आणि महिन्याभरात लग्न.

दोघांनाही एकमेकांना जाणुन घ्यायला पुरेसा वेळ मिळालाचं नाही.लग्नापर्यंत आपापली काम उरकून घेण्याच्या मागे दोघेही.

फक्त एक -दोनदा फोनवर झालेले नॉर्मल बोलणे. जेवण झाले का? हाच प्रश्न अग्रभागी आणि शेवटीही याउप्पर काही विशेष नाही.

आणि आला एकदाचा तो त्यांच्या आयुष्यातील अद्भूत आणि अविस्मरणीय दिवस! छान पार पडले लग्न अगदी साग्रसंगीत...

दोन्हीकडच्या मंडळींनी होती नव्हती ती सगळी हौसमौज करून घेतली. कारण मूलीकडचे पहिलेच लग्न तर मुलाकडे शेवटचे.

काहीचं कसर सोडली नाही कोणत्याच गोष्टीतं.नववीवाहीत जोडप्याच्या जोड्यापासून ते मंडपाबाहेर असणाऱ्या खाण्याच्या विविध पंचपक्वान्नापर्यंत सगळं कसं अगदी भारीच!!!

आणि मांजर्डेकरांच्या भैरवीने आता विक्रमांशूशी गाठ बांधून राजेशीर्केंच्या घरात पहिलं पाऊल टाकलं.

दोघेही नवदांपत्य आता जन्मभरासाठी अंहं साताजन्मासाठी एकमेकांसोबत बांधले गेले.लग्नानंतरचे ही सगळे विधी सुरळीत, मस्तपैकी पार पडले.आणि नव्याचे नऊ दिवस संपून आता भैरवी त्या घराचाचं एक भाग बनून त्या घरात वावरू लागली.

छान चालू होतं सगळं.सून म्हणून सगळी कर्तव्य ती काहीही आढेवेढे न घेता पार पाडत होती.कधीही नावे ठेवायला संधी मागे नाही सोडली.सकाळी पहाटेच ऊठून देवपूजा आवरून स्वयंपाक घरात घुसायची ती साडेआठच्या ठोक्याला तिथून बाहेर पडायची.पून्हा रुममध्ये जाऊन स्वतःच आवरून नऊ पर्यंत नाष्ट्याला खाली हॉलमध्ये हजर.सगळे एकत्रच डायनिंग टेबलवर बसून नाष्टा करायचे आणि आवरलं की, निघाले सगळे आपापल्या उद्योगांना .

कोणाचं आॅफीस ,तर कोणाचं क्लब तर कोणाचं आणखी काही.संध्याकाळी आठपर्यंत सगळ्यांची जेवण होऊन नऊ वाजता सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला पसार...

पण यामध्ये विक्रमांशूला काहितरी खटकत होतं.पण ते नक्की काय हे त्याला लक्षातचं येत नव्हतं, याचा त्रास त्याला जास्त होतं होता.

लग्नाला चार महीने पूर्ण होत आले.आजकाल जरा आई आणि बायकोमध्ये काही बरं चालल्याचं जाणवतं नव्हतं.

पुर्वीच्या मनमोकळ्या आणि साफ नजरा आता साशंकीतेच्या पारड्याकडे झेपावत असल्याचे निदर्शनास येऊ लागले.

बाबांच सगळं नेहमीप्रमाणेचं उत्तम सूरू होतं.
ना त्यांनी पुर्वी कधी घरच्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घातलं होतं, ना ही आता.

"घर आलं म्हणजे भांड्याला भांड लागणारचं!" असं बोलून बाबा आपल्या कामात व्यस्त असायचे.

पण,विक्रमांशू मात्र दिवसेंदिवस विचारात गढलेला असायचा...काहीतरी असायचं जे त्याच्या डोळ्यांना, त्याच्या मनाला खटकायचं.

आणि काल तर घरात भयंकरचं परिस्थीतीचं उद्भवली.

ताईचं अचानक माहेरी येणं ,आईसोबत मिळून भैरवीला एकट पाडणं,दोघींच काहीतरी कूजबूणं आणि भैरवी तीथे आली की अगदी तोंडाला कुलुप लागल्यासारखं गप्प बसून राहणं...

तरिही भैरवीचं तोंडातून ब्र शब्दही न काढता फक्त शांतपणे मान खाली घालून ऐकत राहणं...आणि रात्री अचानक चक्कर येऊन भैरवीचं खाली कोसळणं...सगळं आकलन क्षमतेच्या पलीकडचं होतं...

एवढे दिवस जे विक्रमांशूच्या मनाला खटकत होतं पण कारण काही केल्या पूढे येत नव्हतं...त्याचा उत्तर शेवटी मिळालचं!

हो! पहिल्यापासून सगळ्या गोष्टी अगदी लख्ख प्रकाश पडल्यासारख्या त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागल्या.ज्या गोष्टी काही केल्या समजतं नव्हत्या, नक्की आपल्याला कशाचा त्रास होतोय हेच समोर स्पष्टपणे दिसत नव्हते हे प्रश्न आता अगदी साफ ,स्वच्छपणे स्पष्ट झाले.

विक्रमांशू ने हळूवारपणे आपला तळहात, नूकत्याचं विचाराअंती निष्कर्षावर येऊन पोहोचल्याचे दर्शवणाऱ्या चेहर्‍यावर फिरवला.

खिशातली गाडीची चावी चाचपडत तो तत्काळ आॅफीसमधून बाहेर पडत पार्किंग लॉटमध्ये पोहोचला.सकाळी पार्क केलेल्या गाडीजवळ जात पटकन लॉक ओपन करून कारमध्ये बसत, कारचा कब्जा घेतला आणि गाडी भरधाव वेगात घराच्या दिशेने धावू लागली.

घर ते विक्रमांशूचं आॅफीस तसा अर्ध्या तासाचा रस्ता...पण तो आज वीस मिनिटांतच घराच्या गेटसमोर ऊभा होता.

पटकन गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरत तो भरभर पायर्‍या चढत आपल्या रुमसमोर येऊन थांबला.

दरवाजा तसा उघडाचं होता; पण थोडासा पूढे ढकलेला.

त्याने तो संपूर्णपणे आतमध्ये ढकलला तसा त्याच्या कर्रररर अशा आवाजाने, बेडवर डोके मागे टेकवून डोळे मिटून बसलेल्या भैरवीने खाडकन डोळे उघडले.

"तूम्ही??? "एवढेचं काय ते शब्द तीच्या तोंडातून कसेबसे बाहेर पडले.

तो आतमध्ये पावले टाकत, तिच्यासमोर येऊन ऊभा राहीला.आणि ,

"आवर, आपण पाच मिनीटांत बाहेर जातोय! " एवढेचं बोलून रुमबाहेर निघून गेला.

त्यांच असं अचानकपणे समोर येऊन ऊभ ठाकणं आणि त्याची तिच्यावर रोखलेली तीक्ष्ण, वेधक नजर...

याने ती पूर्णचं गांगरून गेली.आजपर्यंत तो तिच्याशी असा कधीचं बोलला नव्हता .

बोलण्यात राग तर नव्हता पण एकप्रकारचा थंडपणा जरूर होता.

पण,विचार करून वेळ वाया घालवण्याची ही वेळ नक्कीच नव्हती.फक्त पाच मिनिटं देऊन गेलेला तो तीला आवरण्यासाठी. ती ही कशीबशी लडखडत उठली आणि कपडे ठिकठाक करून आरशासमोर जाऊन केस विंचारून एका क्लीपमध्ये अडकवले.

काल रात्री अचानक चक्कर येऊन पडलेली.त्यामूळे अंगात काही म्हणावे एवढे त्राण नव्हतेचं.अशक्तपणा जाणवत होता थोडा थोडा.पण "नाही" हा शब्द तीच्या तोंडून बाहेर पडल्याचं कधीचं पाहावयास मिळाले नाही.

दहा मिनीटांत दोघे त्याच्या कारजवळ उभे होते.त्याने ड्रायव्हिंग सीटच्या विरूद्ध बाजूचा दरवाजा उघडून तीला आतमध्ये बसायला सांगितलं, आणि तो ही पलीकडून येत आत बसला आणि कार सुरू करून गेटच्या बाहेर घेतली.

गाडीची चाके जस जशी रस्त्यावरुन वेगाने धावत होती.तसेचं दोघांच्याही मनात विचारांचे घोडे वेगाने दौडत होते.

ती त्याच्या आजच्या अनपेक्षीत वागण्याचा; तर तो तिच्याशी कशाप्रकारे संवाद साधायचा या विचारांत !

रस्त्याच्या सोबतचं विचारांची दरमजल करत त्यांची कार एका थोड्या सपाट उंचीच्या पण जमिनीच्या मानाने तशा बर्‍याच उंचीवर असणाऱ्या टेकडीवर येऊन थांबली.

तो कारचा डोअर उघडून बंद करत बाहेर येऊन गाडीला टेकून ऊभा राहीला. ती ही त्याचे अनुकरण करत त्याच्यामागोमागं तीच्या बाजूचा डोअर उघडून खाली उतरली आणि थोडसं अंतर ठेऊन त्याच्याशेजारीचं जाऊन थांबली.

डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्याच्याकडे चोरटी नजर टाकत त्याला पाहून त्याच्या मनाचा अंदाज घेण अधेमध्ये चालूंच होतं .

पण, तो होता की, आज सगळ्या चेहर्‍यावरील मुद्रांना आतचं गुडूप करून आलेला.

शांत ,स्थिर पण धीरगंभीर चेहरा.

मनामध्ये चाललेले विचारं ओळखता येणं महाकठीणं !

शेवटी तब्बल दहा मिनीटांची जीवघेणी शांतता भंग करत ,शब्दांची जुळवाजुळव करून त्याने विषयाला हात घातला...

"भैरवी... "त्याचा समोर पाहतचं धीरोदात्त आवाज तीच्या कानी घुमला.

"अं...हं " तीचा अस्फुट हुंकार.

" मला वाटतं आपणं बोलायला हवं! "

"अं??? "

रोज तर बोलतोचं की आम्ही.हे आज असे का वेगळे वागतायतं? कालच्या प्रकारावरून तर नाही ना?
तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

" आपल्या दोघांत सर्व ठीक चालू आहे असं वाटतं का तूला? "त्याच्या या प्रश्नाने तर भलतीचं गोंधळली.

"ह...हो! "

"नाही भैरवी! काहीचं ठीक नाही आहे.उलट गोष्टी वेळीच सावरल्या नाहीतं तर..."त्याने अस्वस्थपणे आपल्या वार्‍यावर उडणाऱ्या केसांमधून हात फिरवला.

"तर ??"तीचा घाबराघुबरा आवाज त्याच्या कानी पडला.

" सगळचं अवघडं होऊन बसेल.निस्तरायचं म्हंटल तर ते शक्य होणार नाही."

"म.. मला काहीचं समजत नाही तू...तूम्ही काय बोलताय ते...जरा स्पष्ट... "तीने हळूहळू चाचरतचं एक एक शब्द उच्चारला. मनामध्ये एक अनामिक भिती दाटून आलेली.

विक्रमांशूचं आजचं वागणं काही रास येत नव्हतं.

"ओके! स्पष्टचं बोलतो."त्याने एक दिर्घ श्वास घेत, बोलायला सुरूवात केली.

" आपल्या नात्याच नावं काय गं? "

"अम्म् ...म..म्हणजे? "ती त्याच्या अशा अनपेक्षीत प्रश्नावर खूपचं गोंधळली.

" तूला जे काही वाटतं ते सांग . "

" प...पती -पत्नी! "

"म्हणजे साध्या सोप्या भाषेत नवरा -बायको हो ना! (?)"ते विधान होतं की प्रश्न हे ओळखणं तीला काही जमलं नाही.

"हं " उत्तरास्तव किंवा काय बोलावे हे न सुचल्यामूळे तीने हुंकार दर्शवला.

" मगं एका नवरा बायकोचं असतं तसं नातं आपल्यामध्ये आहे?काय वाटतं तूला? "तो अजूनही दूरवर नजर लावून तीच्याशी संवाद साधत होता.

"असं का वीचारता तूम्ही ?म...माझं चूकलं का काही...? "तीने घाबरतचं एक एक शब्द उच्चरला.

आणि तो हलकचं विषण्ण हसला.

" स्पष्टचं विचारतो तूझ्या आयुष्यात कोणी आहे का?कोणी मुलगा? तूझा बॉयफ्रेंड?" हे विचारताना त्याच्या मनाला किती वेदना होत होत्या हे फक्त तो आणि तोचं जाणत होता.

पण,आज तो मूळीच शांत बसणार नव्हता.

"अहो!!! "तीने जोरात नकारार्थी मान हलवली.

त्याने ते पाहिलं आणि मनावरचा भार किंचीत हलका झाल्याचा भास त्याला जाणवला.असो मनाचे खेळ!!!

"मगं, मी आवडतं नाही का तूला? " पहील्या धक्क्यातून सावरते न सावरते तोच विक्रमांशूने असा किचकट प्रश्न वीचारून तिच्या डोक्यात अजून एकाची भर टाकली.

"अ...आवडता!"तीचं जेवढ्यास तेवढं उत्तर.

"खरचं की माझ्याशी लग्नाच्या गाठीत बांधली गेलीस म्हणून बोलतेस? "

"ख.. खरचं! पण तूम्ही आज असं... " तीला तर काहीचं कळतं नव्हतं .

असे प्रश्न का विचारत आहेत विक्रमांशू? आजपर्यंत कधीच त्यांनी मला असं काही विचारलं नाही.

आई आणि ताईंसारखा यांना पण माझ्यावर संशय... तीच्या मनातले विचार आता जलदगतीने लहरू लागले.

" हे नाही तर मगं ,आपलं लग्न तूझ्या मर्जीविरुद्ध तर..." तो बोलता बोलताचं थांबला.

असं काही नको असू दे देवा! प्लीज...प्लीज...! मनामध्ये देवाचा धावा करत तो तीच्या नकारदर्शक उत्तराची अपेक्षा करून होता मनोमन.

"अहो ,असं काहीचं नाही! "त्याचं वाक्य पूर्ण होतं न होत तोचं ती उत्तर देऊन मोकळीही झाली.

" भैरवी...मगं काय कारण आहे?अजूनही आपल्यात काहीचं आलबेलं का नाही?सांगशील मला? "तो आता तीच्याकडे वळून तीच्या डोळ्यांत आरपार पाहत म्हणाला.

" अहो...मला काही कळत नाही.तूम्ही आज असे का प्रश्न विचारत आहात? म्हणजे... "

"खूप अगोदर वीचारायला हवं होतं खरतरं पण तेव्हा गोष्टी एवढ्या लख्खपणे समजल्या नव्हत्या जेवढं आज मला लक्षात येत आहे. "

"मला समजेल असं बोलता का... "

"भैरवी ,What's wrong with you ? तूझं वागणं कोड्यातं टाकण्यासारखं आहे गं.कधीकधी वीचारशून्य व्हायला होतं.तुला असं नाही का वाटतं आपलं वागणं काहितरी खटकण्यासारखं आहे... आणि त्यामुळेच काल आई आणि दिदीचं असं रियॅक्ट होणं आणि तूझं त्यावर काहीही आक्षेप न घेता नेहमीप्रमाणेचं मौन...याचा अर्थ काय समजायचा मी भैरवी? "

"...."

ती यावर काहीचं बोलली नाही.

एकदम स्तब्ध झाली ती.म्हणजे यांना वाटतं होतं का मी तेव्हा बोलायला हवं होतं? पण...

"भैरवी ,हिचं तूझी शांतता जीवघेणी वाटते मला.का बोलली नाहीस काल एक शब्दही तूझ्या बचावासाठी? का नाही दिलेस स्वतःच्या पावित्र्याचे परिमाण तोंड उघडून? का गप्प राहिलीस तू? की तुलाही तेच वाटते स्वतःबद्दल जे आई आणि दिदीला... "त्याचा आवाज थरथरत होता हे शब्द बोलताना.

आताही फक्त रडत तीने नकारार्थी मान हलवली.

"मगं का अशी गप्प राहतेस नेहमी ? तूझं असं शांत राहणं घरच्या लोकांच्या आणि स्वतः माझ्यासूद्धा साशंकतेतं भर टाकतं भैरवी. नको नको ते विचार मनात घर करतात.आपलं लग्न ठरल्यापासून ते आत्तापर्यंतचा सगळा प्रवास आठव भैरवी...ही तूझी बंदिस्त ओठांमागची शांतता कायम आपल्या नात्याच्या मध्ये आली आहे."

तो आज सगळं मनमोकळा बोलत होता आणि ती दाटून येणारे हुंदके रोखून धरत त्याचा प्रत्येक शब्द न शब्द अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकत होती.

" तूला आठवतं आपलं लग्न ठरलं आणि आपण नुकतेच फोनवर एकमेकांशी बोलायला लागलो होतो. "

तीने डोळ्यांतले अश्रू पूसतचं होकारार्थी मान डोलावली .

" जास्त काही बोलायचोचं नाही. फारफारतरं दोन मिनीट.तो ही एकतर्फी संवाद. मी काहितरी विचारणार आणि तुझे अस्पष्ट हुंकार नाहीतर मोजकीचं उत्तर! साधं गूडनाईट गुडमॉर्निंग वीश करायला ही ,तूझे ओठ उघडले नाहीत भैरवी.मला वाटलं तू लाजाळू आहेस आणि त्यातं आपलं अरेंज मॅरेज त्यामूळे तूला अवघडल्यासारखं वाटतं असेल नवीन व्यक्तीशी असं अचानक बोलायला.लग्नानंतर एकदा ओळख झाली की, हळूहळू बोलशील नॉर्मल असं वाटलं.पण थोड्याचं दिवसांत माझा हा समज अक्षरशः धुळीस मिळाला. महिन्याभरात आपलं लग्न झालं.माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातं बांधून तू आपल्या घरात प्रवेश केलासं.सूरुवातीचे चार -पाच दिवस लग्नानंतरच्या प्रथा आणि परंपरांतचं गेले.आणि त्यानंतर सुरू झाला संसाराचा गाडा..."

क्रमश :

-©️ मनमंजिरी ❤(Happylife 😇)

Hello...

वाचून कसे वाटले नक्की सांगा.😇