Reshim gathi books and stories free download online pdf in Marathi

रेशीम गाठी

रमेश सिन्नरच्या बस स्टँड वर मालतीची वाट पहात गेल्या एक तासापासून उभे राहून कंटाळला होता. रमेश व मालतीला शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जायचे होते. मालती नासिकला रहात होती, तर रमेश सिन्नर चा रहिवाशी होता. दोघांची ओळख नाशिकच्या
बी.वाय.के. कॉमर्स कॉलेज च्या पहिल्या वर्षी असताना झाली होती. कॉलेजला पहिल्या वर्षीच्या एडमिशन च्या दिवशी संयोगाने दोघांनी एकमेकांना बघितले आणि काही कळायच्या आत डोघे एकमेकांचे कधी झाले कळलेच नाही. आता दोघेही बी. कॉम. शेवटच्या वर्षाला होते. चंद्रकले प्रमाणे दोघांचे प्रेमप्रकरण वाढतच होते.
एव्हढ्यात नाशिकहून आलेल्या बसमधून मालती आपली पर्स सावरत खाली उतरली. तिची तारांबळ बंधून रमेशला हसु येत होते. रमेश मालतीला घेऊन बसस्टँड बाहेर आला. मालतीचा नाष्टा झाला नसणार याची खात्री रमेशला होती. रोड क्रॉस करून आल्यावर समोरच एका हॉटेल मधे छान गरम गरम बटाटे वडे तयार होत होते. रमेश, मालतीने नाष्टा केला, चहा घेतला, पाण्याची बाटली घेतली. रमेशने त्याची मोटारसायकल बाजूला झाडाखाली उभी केली होती. रमेश, मालती मोटारसायकल वर बसले व शिर्डीच्या दिशेने निघाले.
साधारण दोन तासात दोघे शिर्डीच्या श्री.साईबाबा मंदिरात पोहचले. मंदिरा बाहेर पर्यंत लोकांची रांग होती. कोणतीही घाई न करता दोघांनी निवांतपणे साईबाबांचे दर्शन घ्यायचे ठरवले व रांगेत उभे राहिले. दर्शन रांग हळूहळू पुढे सरकत होती. तशी दोघांनी आता पुढे काय कसे करायचे या विषयावर हळू आवाजात चर्चा चालू होती, कारण आता एकाच महिन्यात बी.कॉम. फायनल वर्षाचा निकाल लागून डिग्री हातात पडणार होती. दोघांच्याही घरून त्यांच्या लग्नाला परवानगी होती. रमेशची मात्र एक अट होती ती म्हणजे मालतीने पण जॉब करावा. कारण एकट्याच्या पगारात संसार नीट होत नाही. महागाई मुळे ओढाताण होते. मुलांना चांगल शिक्षण देऊन त्यांचं भविष्य घडउ शकत नाही. यावर दोघांचे एक मत झाले. दोघेही साईबाबांचे भक्त होते. रांगेत अत्यंत कमी दरात चहा मिळत होता. रमेश, मालती ने चहा व बिस्कीट घेतले. नंतर मेन एन्ट्री आली व स्त्री व पुरुष रांगा वेगवेगळ्या झाल्या. दोघांनी मनःपूर्वक बाबांच्या पायावर डोके ठेवले. सिन्नरला आल्यावर मालतीला नाशिकच्या बस मधे बसउन रमेश घरी गेला.
बी.कॉम. परीक्षेत दोघानाही चांगले मार्क मिळाले. त्यानंतर दोघं रोज एम्प्लॉयमेंट न्यूज बारकाईने चाळत व जेथे शक्य होते तेथे ॲप्लिकेशन पाठवण्याचा सपाटा चालुकेला. लेखी परीक्षा ला बसायला सुरवात केली. प्रयत्नांना यश मिळाले. रमेश लेखी परीक्षा पास झाल्याने एक्साइज डिपार्टमेंट चा इंटरव्ह्यू साठी कॉल आला. त्याचे सिलेक्षन झाले व मुंबईच्या ऑफिस मधे रुजू पण झाला.
रमेशच्या व मालतीच्या घरच्यांनी ठेवले की आता रमेशने कल्याण ला फ्लॅट भाड्याने घेतलाच आहे तेव्हा दोघांचे रजिस्टर लग्न करून देऊ. मालतीचे नोकरी साठी प्रयत्न चालू आहेतच , ती कधीही नंतर मिळू शकते.
ठरल्याप्रमाणे अगदी जवळच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत रमेश, मालती चे रजिस्टर पद्धतीने लग्न पार पडले. दोघेही कल्याणच्या फ्लॅट मधे राहू लागले. दोघांचा राजाराणी चा संसार आनंदाने चालू होता. वर्ष संपून वर 10 दिवस झाले होते अचानक मालतीला मुंबई एक्साइज डिपार्टमेंटचा इंटरव्ह्यू साठी कॉल आला. तिने लेखी परीक्षा रमेश बरोबरच दिली होती पण तिला एक वर्षा नंतर कॉल आला होता. रमेश घरी आल्यावर दोघांनी आईस्क्रिम खाउन आनंद साजरा केला.
कॉल लग्ना पूर्वीच्या नावाने, म्हणजे ज्या नावाने लेखी परीक्षा दिली होती त्या नावाने नाशिकच्या पत्यावर आला होता. रमेश, मालती कल्याणला फ्लॅट मधे ज्या बिल्डिंग मधे रहात होते त्याचे ग्राउंड फ्लोअर ला उदय राजे, मुंबई हाई कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील रहात होते. सकाळी उठून दोघे राजे साहेबाना भेटण्यास गेले.
राजे साहेब खूप हुषार होते. त्यांनी शांतपणे दोघांचे म्हणणे ऐकले. घरातून चहा बोलावला. उपाय सापडला, राजे म्हणाले. तुम्ही दोघांनी एकमेकांना संमतीने घटस्फोट साठी कोर्टात अर्ज करायचा. कोर्टाने ठरऊन दिलेल्या अटी शर्ती पाळून घटस्फोट घ्यायचा. इंटरव्ह्यू लग्नाच्या आधीच्या नावाने द्यायचा. सेलेक्शन झाल्यावर, नोकरी जॉईन केल्यावर लगेच दोघांनी परत रजिस्टर लग्न करून घ्यायचे. त्याप्रमाणे ठरले.
ठरल्यालेल्या प्लॅनिंग प्रमाणे सगळे पार पडले. रमेश - मालती चा कोर्टाकडून घटस्फोट मंजूर झाला. मालती ला अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाली. कामावर रुजू झाल्यावर साधारण एक महिन्या नंतरचा शुभमुहूर्त पाहून परत एकदा जवळच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत रमेश - मालती ची रेशीम - गाठ, बांधली गेली. लग्न पार पडले,
( ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे.)