Cyanide - 10 books and stories free download online pdf in Marathi

सा य ना ई ड - (प्रकरण १०)

सा य ना ई ड

प्रकरण १०

बलदेव गेल्या नंतर जवळ जवळ तासभर पाणिनी येरझाऱ्या घालत होता. सौम्या सारखी घड्याळाकडे बघत होती.शेवटी तिने विचारले, “ काम करणाऱ्या स्त्री ला खाण्यासाठी तरी संधी मिळणार का?”
आपल्या चालण्याच्या लयीत कोणताही बदल न करता तो म्हणाला.” आपण खायला मागवू इथे. डॉ.डोंगरे यांना पोलिसांनी संपर्क करण्यापूर्वी त्यांचं व माझं बोलणे होणे आवश्यक आहे. तसचं अनन्या गुळवणी ची भेट होणे ही महत्वाचे आहे.तुला काय वाटत सौम्या, निमिष जयकर ला ती कुठे आहे हे कसे समजले असेल?”
“ तिने , मी जाताच लगेच त्याला फोन केला असेल. ती मुलगी म्हणजे एक कोडेच आहे.मला वाटतंय तिच्या मनात काहीतरी चाललंय.”
ओजस ने दारावर टकटक केली.सौम्या ने त्याला आत घेतले.
“ निराश झाला आहेस?” त्याच्या नेहेमीच्या खुर्चीवर आवडत्या स्थितीत बसता बसता त्याने विचारले.
“ तुला दिलेल्या कामाचे कसे काय चाललंय” पाणिनी ने विचारले.
“ बरीच माणसे कामाला लावली आहेत मी. कोणत्याही क्षणी अनन्या बद्दल कळेल.”
“ एव्हाना तू तिला हजर करायला पाहिजे होतेस.ती जयकर बरोबर बाहेर पडली, तिचा मागमूस काढणे तसे.....”
पाणिनीला मधेच तोडत ओजस म्हणाला. “ तुला काय माहिती की जयकर बरोबरच बाहेर पडली म्हणून? “
“ वेडे पण करू नको. स्वतः हॉटेल च्या मॅनेजर नेच सांगितले मला तसे, जयकर आला आणि तिच्या खोलीची चौकशी केली.त्या दोघांना बाहेर पडताना मॅनेजर ने पाहिले आहे.त्या मुलीने काहीच खाल्ले नव्हते.माझा अंदाज आहे की ते बाहेर पडल्यावर प्रथम कुठेतरी जेवायलाच गेले असतील. जयकर ची नेहेमीचे आवडते जेवायचे ठिकाण कोणते हे शोधून काढ.”
“ ते सर्व ठीक आहे पण तुझी माहिती घोळ घालणारी आहे.! ती जयकर बरोबर बाहेर गेलेली नाही.”
“ त्याच्या बरोबर नाही ? “ पाणिनी उद्गारला.
“ मी तुला अशी बातमी देतोय की तुला हादरच बसेल.मॅनेजर ने सांगितले की ज्या माणसाने तिची चौकशी केली त्याने मर्सिडीज गाडी आणली होती.तिला वाटतंय की कोपऱ्यावरच्या पेट्रोल पंपावर ते गेले ,म्हणून मी तिथे जाऊन त्या सुमारास क्रेडिट कार्डावर कोणी कोणी पेट्रोल भरले ते तपासले तेव्हा असे आढळले की मिलिंद बुद्धीसागर ने कार्ड वर पेट्रोल भरले. मी.....”
तेव्हढ्यात फोन वाजला. सौम्या ने ओजस ला दिला. ओजस ने थोडावेळ पलीकडच्या माणसाचे बोलणे ऐकले.नंतर पाणिनीकडे पाहून म्हणाला, “ पोलीसानी सर्व जागा चाळून काढल्या आहेत.दोन माणसे जयकर राहत असलेल्या घराजवळ, दोन माणसे मिरगलच्या घराजवळ,म्हणजे सध्या जिथे अनन्या गुळवणी राहत्ये,त्या ठिकाणी नजर ठेऊन आहेत.माझ्या माणसांनी निमिष जयकर ज्या ठिकाणी नेहेमी खातो त्याचा शोध घेतला. त्याच हॉटेलात जयकर अत्ता खात बसला आहे. एकटाच ! मुद्दा असा आहे की जर तो घरी गेला तर अलगद पोलिसांच्या तावडीत सापडेल. त्यापूर्वी तुला त्याला भेटायचं आहे का?”
“ तुझं एकदम बरोबर आहे, मला आधीच भेटायचं आहे त्याला. मी निघालोच लगेच, तुझ्या माणसांना सांग त्याच्यावर नजर ठेवायला.”
ओजस ने तशा आवश्यक सूचना त्याच्या माणसाना दिल्या.” तू त्याला भेटण्यापूर्वी तुला काही सांगायचं आहे मला.”
“ तेव्हढा वेळ नाही आता, मला हालचाल करायलाच हवी तातडीने.”
“ मिरगलचा अनन्यावर एवढा प्रभाव किंवा वचक का होता, हे मला समजलंय पाणिनी ! मला तिचा भूतकाळ ही समजलाय ! “
“ आणि तुला हे पण समजलंय की तिने मिलिंद बुद्धीसागर च्या बरोबर बाहेर पडण्यासाठी तीच विशिष्ठ वेळ का साधली?”
“ नाही ते नाही समजलं” ओजस म्हणाला.
“ मिलिंद बुद्धीसागर च्या पत्नीला,लीना ला वाटतंय की तिला याचं उत्तर माहीत आहे.तिने मला हे सांगितले तेव्हा मी हसलो.मला भेटायला ती आली आणि नंतर गेली त्याच सुमाराला अनन्याने मिलिंद बुद्धीसागर ला फोन केला असणार. ती घरी पोचली तेव्हा आपला नवरा घरी नसल्याचे तिला समजले असणार.तो कुठे आहे हे ती शोधून काढत असणार.तो सापडला तर ती नक्की काहीतरी करेल.त्याच दरम्यान पोलिसांनी अनन्याआणि मिलिंद बुद्धीसागर ला एकत्र पाहिलं तर पेपरात फोटो छापले जातील त्यांचे.”
“ मला कल्पना आहे त्याची.पोलिसांनी तिला गाठण्यापूर्वी तुझी व तिची भेट होईल याची मी व्यवस्था करतो “
“ सौम्या, माझ्या बरोबर यायचय?” पाणिनी ने विचारले. “ चला जाऊ या! “
“ पोलिसांनी अनन्याला गाठण्यापूर्वीच जर मला ती भेटली तर काय करू?”
ओजस ने विचारले.
“ तिला संपर्काच्या बाहेर ने. किंवा माझ्या कडे घेऊन ये. मी कुठे आहे ते मी तुला वेळोवेळी फोन वरून कळवत राहीन. चल सौम्या, “
“ तुला सांगण्यात अर्थ नाही फारसा पण काळजी घे स्वतःची.” ओजस म्हणाला.
“त्यांनी मला यात पुरतं ओढलय,उद्याच्या पेपरात खांडेकर माझ्यावर कशी आग पाखड करतात ते बघ. मीच आत अडकलोय आणि मलाच बाहेर यावे लागणार आहे.”
“ तुम्हाला वाटतंय खांडेकर तुमच्यावर तुटून पडतील?” सौम्या ने विचारले.
“ खांडेकर नाही करणार तसे काही , ते त्या बाबतीत तत्व निष्ठ आहेत.ते प्रत्यक्ष रित्या पोलिसना सुचवतील की असे काही करणे योग्य होणार नाही ,पण खांडेकर च्या मनात काय आहे हे ओळखून पोलीस पेपर वाल्यांना भरपूर खाद्य पुरवतील.या उलट आरोपीच्या वकिलांचे वतीने म्हणणे मांडायला कोणी मिळणार नाही.”
“ म्हणजे तुमचे म्हणणे आहे की पेपरातील तुमच्या वरील आरोपांना तुम्ही नाकारू सुद्धा शकत नाही” सौम्या ने विचारले.
“ नुसते आरोप नाकारून उपयोग नाही होणार.गोड गोळ्यांची बाटली काही आपोआप तळ्यात जाऊन पडली नाही.आपल्याला प्रथम हे सिद्ध करावे लागेल की ती कोणी टाकली, अन्यथा.....”
“ अन्यथा काय? “ सौम्या ने विचारले
“ नाहीतर मी अडकलो त्यात.”
सावकाश गाडी चालवता चालवता पाणिनी सौम्या ला म्हणाला. “ आपण जरा घटनांचा आढावा घेऊ या .आपल्या अनन्या गुळवणी ने काकाला विष प्रयोग केल्याची कबुली दिली आहे.या क्षणी तिला जाणीव आहे की ती सर्व अडचणी मधून बाहेर आली आहे.ती अत्ता मिलिंद बुद्धीसागर सोबत बाहेर कुठेतरी आहे.ती त्याला सर्व अद्ययावत घटना सांगेल, दोघांना ही ही कल्पना नाही की पोलीस त्यांना शोधत आहेत. डॉ.डोंगरे हे सर्व घटनांपासून दूर आहेत. संपर्कात नाहीत.मिलिंद बुद्धीसागर ची बायको अनन्यावर जळूनच आहे, तिला संशय आहे की तिने तिच्या नवऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलं आहे.पोलीस एकीकडे अनन्याच्या शोधात आहेत तर दुसरीकडे जयकर सकृत दर्शनी या सर्व प्रकाराची जाणीव नसलेला असं आहे.”
“ सकृत दर्शनी असे का म्हणता ? “ सौम्या म्हणाली.
“कारण कुठल्या तरी हुशार व्यक्तीने, अनन्याला मदत करण्याच्या हेतूने,त्या तळ्यात गोड गोळ्यांची बाटली टाकली आणि जो पर्यंत मी जयकर चा अंदाज घेत नाही,तो पर्यंत मी संशयितांच्या यादीतून त्याला बाहेर काढणार नाही.”
“ समजा त्याने हे केले असेल तर?” सौम्या ने विचारले.
“ मग त्याला ते कबूल करायला लावायचे,आणि पेपरात नाट्यमय रित्या ती गोष्ट प्रसिद्ध केली जाईल असे पहायचे याच कारणास्तव आपण त्याला भेटायची घाई करतोय..”
थोडा वेळ त्यांनी शांततेत गाडी चालवली.गाडी लावण्यासाठी जागा शोधून सौम्या चा हात हातात घेऊन पाणिनी फूट पाथ वर आला, कॅफे वरून पुढे गेला आणि गोल चक्कर मारून मागे आला.दारात उभ्या एका माणसाने काडेपेटीची काडी पेटवून सिगारेट शिलगावली.ज्योती मधे त्याचा चेहेरा दिसला.
”पाणिनी पटवर्धन “ तो दबक्या आवाजात म्हणाला. पाणिनी थांबला.” चालत रहा, मी ही तुझ्या बरोबर चालतो.” तो म्हणाला. तिघेही एकत्र चालले.
“ तो आहे तिथे?” पाणिनीने विचारले.
“ अजून आहे.”
“पोलीस जवळपास असण्याची काही चिन्हे?”
“ अजून नाही.”
“ तो काय करतोय तिथे?”
“ डेझर्ट संपवतोय. कुठल्याही क्षणी तो बाहेर येईल. म्हणून तर त्याच्या आधी मी बाहेर आलोय.”
“ ठीक आहे, तू पुन्हा मागे जा मी बाहेर थांबतो.तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा पुन्हा सिगारेट पेटव.”
तो गेला तेव्हा सौम्या पाणिनी ला म्हणाली,” तिथे पदार्थांचा फारच छान घमघमाट सुटलाय. चांगल रुचकर अन्न असणार, आपण आत जाऊन काही खायचं का? त्यालाही आपल्या बरोबर बोलावू.”
पाणिनीने मानेनेच नकार दिला.” ओजस च्या माणसाने जसं शोधलं की जयकर चे हे आवडते हॉटेल आहे तसे पोलीस ही शोधून काढू शकतील आणि इथे येतील., हा पहा आलाच तो ! “
दार उघडलं एक तरुण बाहेर आला.रस्त्याकडे दृष्टी टाकली, सौम्या आणि पाणिनी पाणिनी पटवर्धन च्या दिशेने वळला. ओजस च्या हेराने खुणे साठी सिगारेट पेटवली. त्या तरुणाने,रस्त्यावरून झपाझप चालायला सुरुवात केली.तो शिडशिडीत,आणि चपळ वाटत होता.
पाणिनी हळू आवाजात सौम्या ला म्हणाला,” चल, जाऊ या.” ते मुद्दामच हळू चालले जेणे करून तो तरुण त्यांना ओलांडून पुढे गेला.
“ निमिष जयकर,?” पाणिनी ने विचारले.एखादे टोकदार हत्त्यार खुपसले जावे तसा जयकर हादरला.सावध झाल्या सारखा त्याचा चेहेरा झाला.त्या चेहेऱ्यावर अजिबातच सलोख्याचे भाव नव्हते., ते बघून मधाळ स्वरात सौम्या त्याला म्हणाली.” अनन्या गुळवणी विषयी आपण जरा बोललो तर चालेल का?”
“ कोण आहात तुम्ही? “ त्याने सौम्या कडे बघत विचारले.तिच्या हास्या चा परिणाम म्हणून त्याचे भाव जरा सौम्य झाले.
“ मित्र.” पाणिनी म्हणाला.
“ कुणाचे मित्र?”
“तुझे आणि अनन्याचे.”
“ कशावरून?”
“ चालत राहू आपण.” सौम्या म्हणाली. तिने आवाजात असा काही आपलेपणा दाखवला की निर्णय जयकर नेच घ्यायचा होता. “ चालेल ? “
त्याला मधे ठेऊन सौम्या आणि पाणिनी चालत राहिले.” काय आहे हे सगळे ? “ त्याने विचारले.
“ मी पाणिनी . पाणिनी पटवर्धन आहे वकील. मी अनन्याला मदत करतोय.”
“ तिने सल्ला मागितला आहे का तुझा? “
“ प्रत्यक्ष पणे नाही पण डॉ.डोंगरेने माझा सल्ला घेतलाय.”
“डॉ.डोंगरे! “ जयकर चिडून उद्गारला ! “ त्याने या सर्वात नाक खुपसलं नसतं तर सगळ्यांचच अलबेल झालं असतं.”
“ आत्ताच्या घडीला तो एक अभ्यासाचा मुद्दा आहे. आपण सर्व यात कसे ओढले गेलो हे न उगाळता आपल्या सर्वाना अनन्याला मदत करावी लागणार आहे.”
“ तिला कोणाच्याही मदतीची गरज नाही. गरज कशाची असेल तर शांतता मिळण्याची.तुम्ही तिला जेवढा खुलासा करत बसाल तेवढा तिला त्रास होईल.”
“ मला काळजी वाटते की तुम्हाला अद्ययावत स्थितीची माहिती नाहीये.”
“ उदाहरणार्थ?”
“ पोलिसांनी डॉक्टरांच्या दवाखान्यावर छापा टाकला त्यांचेकडे वॉरंट होते.त्यांनी टेप रेकॉर्डिंग चा ताबा देण्याची मागणी केली.तो देण्यावाचून पर्यायच नव्हता. नेमके त्यावेळी ते तिथे नव्हते, त्यांची नर्स होती ते असते तर त्यांनी विरोध केला असता. मग टेप रेकॉर्डिंग हे रुग्ण व डॉक्टर यातील गोपनीय संवाद म्हणायचा का या बाबत कोर्टात प्रकरण गेले असते., तू काहीच ऐकले नाहीस यातले?”
“ नाही”
“ बर, अशा बऱ्याच घडामोडी घडल्यात पण ते बोलायची ही वेळ नाही आणि जागाही नाही. आपण माझ्या गाडीत बसून बोललो तर? तुला हवे तिथे मी सोडीन.”
“ मी माझ्या घरी निघालोय.”
“ आत्ताच्या परिस्थितीत तुझ्या घरी जाण्यात शहाणपणा नाही, तुला सगळ्या गोष्टींची माहिती होत नाही तो वर , कारण पोलिसांना तुझी चौकशी करायची आहे.”
“ माझी का चौकशी करायची आहे?
“काही गोष्टी तुला सांगितल्या तर ती अनन्याला मदत ठरेल.”
पाणिनी अचानक थांबला “ मी माझ्या गाडीत जातोय सौम्या, तू त्याला अद्ययावत स्थिती सांग.काहीही दडवून ठेऊ नको. मी गाडी घेऊन येतो आणि तुम्हाला घेतो.”
जयकर ने सौम्या कडे पाहिले आणि पाणिनी ला विचारले.” ही कोण आहे तुमची?”
“ माझी खाजगी सेक्रेटरी आहे, अनेक वर्षं.माझ्या व्यवसायाची तिला इत्यंभूत माहिती असते, या प्रकरणाची पण आहे.’
“ ठीक आहे आपण परत जाऊ, जाता जाता च बोलू.”
“ तू बलदेव ला का सांगितलस अनन्याच्या कबुली जबाबा विषयी?’’ पाणिनी ने अचानक विचारले.
‘ तुम्हाला काय माहीत मी सांगितलं?”
“ कारण बलदेव ने मिलिंद बुद्धीसागर च्या बायकोला ला सांगितलं आणि पोलिसांना कुठून तरी ते कळलं”
“ जर बलदेव ने सांगितलं असेल तर मी त्याला....”
“ थोड सबुरीने घे.बलदेव हा बडबड्या आहे, स्वतंत्र आहे,जसा आहे तसा त्याला स्वीकारायला हवा.तो या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार ठरू शकतो.त्याच्याशी शत्रुत्व नको.”
“ काय झालं सांगा मला.”
“ पोलिसांना ते रेकॉर्डिंग मिळाल्यावर त्यात कितपत तथ्य आहे की ती फक्त औषधाच्या अंमलाखाली केलेली बडबड आहे हे पाहणे गरजेचे होते.म्हणून मी काही मुलांच्या मदतीने त्या तळ्यातून ती बाटली शोधून काढली.कोरगावकर नावाच्या तज्ज्ञाकडे ती घेऊन गेलो,त्याच्या अहवालानुसार त्या साध्या गोड गोळ्या निघाल्या.”
“ मग झालंच तर. जयकर म्हणाला. “ तिने काकाला विष दिल्याचं तिला माहीत नव्हत, ज्या गोळ्या द्यायला हव्यात त्याच दिल्या आहेत हे तिला माहीत होत. पण त्या बाबत नंतर तिला शंका यायला लागली की योग्य बाटली मधल्याच गोळ्या दिल्या ना.पण आता ती बाटली जर तळ्यातून काढली गेली आणि ती साध्याच गोळ्यांची....”
“मला ही तसेच वाटले, मी डॉ.डोंगरे,अनन्याआणि पोलीस तिघांनाही तसेच सांगितले. खून वगैरे काहीच नाहीये,या प्रकरणात काही तत्थ्यच नाही असे सांगितले . पोलीस हसले माझ्याकडे पाहून.कारण त्यांनी पुन्हा पाणबुड्याना तळ्यातून दुसरी बाटली मिळते का ते शोधायला सांगितले ती मिळाली आणि त्यात सायनाईड होते “
जयकर काही न बोलता पाणिनी च्या शेजारी गाडीत बसला.” अनन्याकुठे आहे?” त्याने चौकशी केली
“ मी तेच शोधून काढायचा प्रयत्न करतोय.पोलीसंपूर्वी तिला, मला गाठायला हवं”
“मला समजलं की ती....” जयकर बोलायचा थांबला. “ बोल. बोल “ पाणिनी ने उद्युक्त केले.
“ मला नाही माहीत कुठे आहे ती.“ जयकर म्हणाला.” मला लपवा कुठेतरी , मी पोलिसांशी नाही बोलू शकत.”
“ का?”
“ मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे.”
पाणिनी ने तिरक्या नजरेने सौम्या कडे बघितले.नंतर न बोलता शांतपणे गाडी चालवत राहिला. जयकर बोलेल याच्या प्रतीक्षेत.
“ तिने सायनाईड मिळवलं होत हे मला माहीत आहे. करण त्यावेळी माझा एक सहकारी सायनाईड वर एक प्रयोग करत होता.त्यासाठी जास्त परिमाणात ते लागत असते. प्रत्येक जार मध्ये विशिष्ट परिमाण भरलेले असते, अगदी तंतोतंत.प्रयोगासाठी विशिष्ट संख्येत गोळ्या वापरल्या नंतर, जार मध्ये नेमक्या किती गोळ्या शिल्लक राहिल्या आहेत हे वजन करून अगदी अचूक पणे सांगता येते. तरी सुद्धा खात्री करण्यासाठी त्याने त्या जार चे वजन केले तेव्हा दोन डझन गोळ्या कमी असल्याचे लक्षात आले.मी त्याला म्हणालो की काहीतरी चूक होत असेल किंवा वजना च्या काट्यात काहीतरी दोष असेल.पण त्याला ते पटलेले दिसले नाही.पण तेव्हा खुलासा देण्याची जबाबदारी माझी नव्हती. पण नंतर जेव्हा मी विचार करत राहिलो तेव्हा एकदम मला आठवले की अनन्या माझ्या बरोबर लॅब मध्ये आली होती तेव्हा मी तिला सायनाईड च्या जार बद्दल सावध केले होते.”
“ मग तू तिच्या शी संपर्क केलास?”
“ प्रयत्न केलं मी , पण अशा गोष्टी फोनवर नाही ना बोलता येत.अर्थात मला पहिल्यांदा जाणवले की काहीतरी घडलंय, माझ्या मनात काय आले असेल तुम्हाला माहिती आहे.”
“ आत्महत्या?”
" हो"
“मग काय केलेस तू?”
“ मी तिला मिरगल च्या घरी,भेटायला गेलो.अशा गोष्टींसाठी फोन वर विसंबून राहायला नको म्हणून.”
“ तू पूर्वी त्या घरी गेला होतास?”
“ बिलकुल गेलो होते.हर्षल मिरगल शी माझे चांगले संबंध होते.खरं म्हणजे अनन्याला मी त्याच्या माध्यमातूनच भेटलो प्रथम.माझं आणि मिरगल चं कुटुंब यांची कित्येक वर्षे ओळख आहे.मी गेलो तेव्हा अनन्या घरी नव्हती बाजारात गेली होती.मला तिच्या खोलीत जायचं होत पण मी तस करू शकीन अस चिन्ह दिसत नव्हत. आजूबाजूला नर्स होत्या आणि आणि तो महा चतुर बलदेव ! मी एक चूक केली की आल्या आल्याचं अनन्याला भेटण्याची घाई केली, अधीर पण दाखवला,त्यामुळे त्या नंतर बलदेव ने कायमच माझ्यावर नजर ठेवली.शेवटी मी त्याला विश्वासात घेतले.काय घडलं ते त्याला सांगितलं.त्याला विचारलं की अनन्यामध्ये काही वेगळे किंवा विचित्र जाणवले का तुला”
“ त्याला जाणवलं होत का ?”
“ आम्हा दोघांना पण ! ती प्रचंड तणावाखाली जाणवत होती.ती नेहेमी सारखी असल्याच भासवीत होती पण तिला तो अभिनय जमत नव्हता., मग मी बलदेव ला सांगितले की माझ्या लॅब मधून तिने सायनाईड आणलय आणि त्यागोळ्या तिने तिच्या खोलीत ठेवल्या असल्या पाहिजेत आणि मला त्या हव्या आहेत.”
“ मग काय झालं?”
“ आजूबाजूला नर्स चा वावर असल्याने आणि अनन्या कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याने, मी तिथे जाऊ शकत नव्हतो पण बलदेव तसा समजून घेणारा आहे. म्हणजे तो जेव्हा तिरक्यात घुसत नाही तेव्हा त्याच्या सारखा माणूस नाही.त्याने मला थांबायला सांगितले,तिच्या खोलीतून बाटली शोधून आणली.त्यात थोड्या गोळ्या होत्या.आणि मला विचारलं की याच त्या आहेत ना?”
“ तू काय केलास?”
“ मी वास घेऊन पाहिलं, एक विशिष्ट कडवट बदामासारखा वास आला त्याचा.”
“ बाटलीत किती गोळ्या होत्या ?” पाणिनी ने विचारले.
“ जेवढ्या गोळ्या लॅब मधल्या जार मधून गायब झाल्या होत्या बरोबर तेव्हढ्याच.”
“ नाही नाही थांब जरा ,प्रयोग करण्यापूर्वी आणि प्रयोगानंतर तुझ्या सहकाऱ्याने त्या जार चे वजन केले होते?”
‘’ हो “
“ त्यामुळे त्याला माहीत होते की नेमक्या किती गोळ्या प्रयोगासाठी वापरल्या आहेत?
जयकर ने मानेने होकार दिला.
“ म्हणजे जेव्हा तो म्हणाला की दोन डझन गोळ्या कमी आहेत तेव्हा तो अंदाजाने सांगत नव्हता. तो.....”
“ प्रत्यक्षात त्याच्या आकडेवारी नुसार पंचवीस गोळ्या कमी होत्या.”
“ बलदेव ने तुला बाटली आणून दिली तेव्हा त्यात नेमक्या किती गोळ्या होत्या?”
“ खर म्हणजे मी मोजल्या नाहीत , मी अंदाज केला,कारण तेव्हढा वेळ नव्हता., अनन्या येण्या पूर्वीच मला तिथून सटकायचं होत. आणि मी तसच केलं, ती बाजारातून परत येत असतानाच मी तिथून पुढे गेलो पण तिने पहिले नाही मला.मी वेगात होतो.”
“ घरापासून किती अंतरावर आहे बाजारपेठ?”
“ दोन-तीन चौक अंतरावर.”
“ हे सगळ कधी घडलं?”
‘‘शनिवारी मिरगल गेला त्याच दिवशी. साडे आकाराच्या सुमाराला.”
“तुला बुद्धिसगर ची गाडी दिसली का ?”
“ त्याची नाही, तो नव्हता तिकडे पण त्याची बायको वरच्या मजल्यावर मिरगल च्या बरोबर होती.”
“ बलदेव काय करत होता तू आलास तेव्हा?”
“ जेवायच्या खोलीतल्या खिडक्या स्वच्छ करत होता.”
“ अनन्या च्या खोलीत जाताना जेवायच्या खोलीतूनच जावं लागतं का?”
“ हो.”
तू तिच्या खोलीपर्यंत गेला नाहीस?”
‘’ तिची खोली तळघरात आहे,त्याच्या जिन्याच्या टोका पर्यंत गेलो,होतो,ती आली तर लगेच बलदेव ला सावध करायला. “
‘’स्टोव्ह वर चॉकलेट गरम करत ठेवल्याचे तुझ्या लक्षात आले का?”
“ हो चॉकलेट ठेवले होते पण ज्योत चालू नव्हती.”
“ नंतर तू तिला विषा बद्दल विचारलेस का?”
“ त्या दुपारी मी तिला विचारणार होतो... पण तुम्हाला काय घडलं ते माहित्ये.मिरगल गेला आणि ती पूर्ण पणे कोलमडलीच.डॉक्टरांनी तिला गोळ्या देऊन चौवीस तास झोपवून ठेवलं. ती जेव्हा उठली तेव्हा ती वेगळीच स्त्री झाली होती. हर्षल ने तिला कुत्र्या सारखी वागणूक दिली होती.मला अस वाटलं की सध्या या विषयावर काही बोलायची गरज नाही.”
पाणिनी ने थोडावेळ आपली गाडी शांतपणे विचार करत चालवली.
“ तिने लॅब मधून त्या गोळ्या घेतल्याचे त्यावेळी तुला सांगितले का?”
“ हो सांगितले,ती असेही म्हणाली की तिच्या घरातून त्या गायब झाल्यात. मी त्याविषयी काहीच बोललो नाही कारण त्या गोळ्यांचा मिरगल च्या मृत्यूशी संबंध असू शकत नाही हे मला माहीत होते. आणि काही काळ गेल्या नंतर त्याला नैसर्गिक मृत्यू आल्याचे तिला समजावता येईल.असा मला विश्वास होता.”
“ पण तू बलदेव कडे गेलास ! “
“ गेलो आणि त्याला टेप रेकॉर्डिंग बद्दल सांगितलं आणि तिला काय झालं असावं अस वाटतंय तेही सांगितलं. त्यावर तो म्हणाला की तिच्या त्या कबुली जबाबाबद्दल मिलिंद बुद्धीसागर च्या बायकोला सांगणे योग्य ठरेल.”
” का? “ पाणिनी ने विचारले
“ त्याच अस म्हणणे होत की मिसेस लीना बुद्धीसागर त्याची पूर्ण तपासणी करायला लावेल आणि ती सुरु झाली की बलदेव सांगू शकेल की त्याने तिच्या खोलीतून त्या विषारी गोळ्या हलवल्या आणि मग सगळंच स्पष्ट होईल अन्यथा अनन्याच्या मनात सतत तणाव राहील की डॉ.डोंगरे कडे तिचा कबुली जबाब आहे.” निमिष म्हणाला
“ सायनाईड चा तो एक विशिष्ठ वास त्या गोळ्यांना येत होता?” - पाणिनी
‘’हो.”
“ पण बाटलीत किती गोळ्या होत्या तुला माहीत नाही?”
“ नाही.” निमिष म्हणाला
“ काय आहे ते सरळ सांग, तुझा गोळ्याच्या संख्ये बद्दल अंदाज काय आहे?”
“ मोकळे पणाने सांगायचं तर मी मोजल्या नाहीत.”
“ जयकर तू खोटे बोलतो आहेस ! “ पाणिनी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.
अचानक जयकर चे ओठ थरथरले. “ किती गोळ्या होत्या?’’ पाणिनीने पुन्हा विचारले.
“ एकवीस ! “ जयकर म्हणाला.
“ आता मला कळलं की तुला पोलिसांशी का बोलायच नाहीये “
“ पाणिनी पटवर्धन मी पोलिसांना खरे कधीही सांगणार नाही.”
‘तुला कल्पनाच नाहीये की कोणा विरुध्द तुला लढायचं आहे. पोलिसांना पटवण्याच्या दृष्टीने सुद्धा तू चांगला थापाड्या नाहीस.तुझा सहकारीच सांगेल पोलिसांना की नेमक्या किती गोळ्या कमी होत्या त्या जार मधे.तू बलदेव कडून बाटली ताब्यात घेताना किती गोळ्या त्यात होत्या ते मोजून न घेता बाटली घेतलीस यावर पोलीस विश्वास ठेवणार नाहीत.बलदेव ने तरी त्या मोजल्या होत्या का?”
“ मला माहीत नाही.”
“ तू विचारलस तरी का त्याला या बद्दल?”
“ नाही”
“ का नाही ?”
“ मी...,मला...भीती वाटत होती.”
आता कसं ! याच गोष्टीवरून पोलीस तुला उभा फाडतील.ते तुझ्या कडून खर वदवून घेतील.आणि ते झालं की अनन्याविरुध्द थंड डोक्याने खून केल्याचा खटला दाखल होईल.त्यांना वाटेल की तिने त्या बाटलीतल्या चार गोळ्या मिरगल ला दिलेल्या चॉकलेट मधे घातल्या त्यामुळेच तो मेला., तू त्या गोळ्यांचे काय केलंस?”
“ मी पेट्रोल पंपावर गेलो,तिथल्या टॉयलेट मधे गोळ्या टाकून पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहू दिल्या , बाटली वारंवार धुवून स्वच्छ केली आणि केराच्या डब्यात टाकून दिली. मी हे तुम्हाला म्हणून बोललोय, त्यांना मी कधीच सांगणार नाही.”
“ तू तुझ्या विचारांना समर्थन देण्यासाठी बोलतो आहे.तुला माहित्ये की पोलिसांच्या कडक पणापुढे तुझा निभाव लागणार नाही.तुला नीट खोटे सुद्धा बोलता येत नाही.तू अति सावध पणा दाखवतोस पण बच्चा आहेस तू. तुला त्यांच्या युक्त्या नाही माहीत, ते तुझ्या कडून सर्व काढून घेतील.”
“ ठीक तर,”हताश होऊन तो म्हणाला.” मी आता काय करावं?”
“ ते मला माहीत असतं तर बर झालं असतं “ पाणिनी म्हणाला.
प्रकरण १० समाप्त