Asaahi ek Trikon - 3 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

असाही एक त्रिकोण - भाग 3 - अंतिम भाग

असाही एक त्रिकोण  भाग  ३

भाग २ वरून पुढे वाचा .........

 

आणि मग एक दिवस हरेश्वराच्या सभामंडपात हरीहर आणि यशोदेच लग्न झालं. यशोदेला जशा पूर्वीच्या आठवणी नको होत्या तसंच नाव पण नको होतं. हरीहर ने तिचं वसुधा नाव ठेवलं. साधारण वर्षभरात त्यांनी आपलं बस्तान पुण्याला हलवलं. वाडया मधल्या दोन खोल्या ठेऊन बाकी भाड्याने दिल्या. हरीहर एक हुशार वकील होता त्यामुळे पुण्याला जम बसवणं काही जड गेलं नाही. रेवतीला विकास आणि वसुधाला विनय अशी मुलं झाली. सगळं कसं छान चाललेलं होतं आणि आता जवळ जवळ १२ वर्षांनंतर अचानक विश्वास घरी आला होता घरातलं वातावरण गढूळ करायला. सुखी संसारात मिठाचा खडा टाकायला.

***

“तिचा नाद सोड. तू तिला केंव्हाच टाकून निघून गेला होतास. आता १२ वर्षांनंतर तिची आठवण येऊन काय उपयोग आहे. आता ती माझी पत्नी आहे. तू आता दुसरी कोणी बघ आणि सुखात रहा.” हरीहर बोलला.  

“तू हे बरोबर केलं नाहीस अरे नवरा बायकोचं नातं अस तुटत नसतं.” विश्वास बोलत होता. “तू तिला बोलाव. मला तिच्याशी बोलू दे. तिला तुझ्यापासून मुलगा झाला आहे हे मला कळलं आहे. मी त्यांच्यासह तिला घेऊन जायला तयार आहे. तू तिला बोलव तर खरं.”

वसुधा आणि रेवती दोघी दारा आडून सगळं संभाषण ऐकत होत्या. वसुधा आता सावरली होती. ती समोर आली. म्हणाली.  

“माझ्याशी तुम्हाला काय बोलायचं आहे ? बोला.”

“हरी, जरा आम्हाला दोघांना जरा एकटं सोडतोस ?” – विश्वास.

“नाही, कोणीही कुठेही जाणार नाहीत. तुम्हाला जे काही बोलायचं ते सर्वांसमोर बोला, नाही तर आल्या पावली चालते व्हा.” वसुधानेच निर्णय दिला.  

“यशोदे” – विश्वास.  

“माझं नाव वसुधा आहे. त्याच नावाने माझ्याशी बोला. मला यशोदा या नावाचा तिटकारा आहे.” – वसुधा.  

“हं, हे मला अगोदरच कळायला हवं होतं. हरी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे तू माझा सख्खा भाऊ न ? मग असा कसा केसाने गळा कापला तू?” – विश्वास.

“मी? मी काय केलं? अरे मी तुझ्या बायकोला नवं जीवन दिलं, तिला निराशेच्या गर्तेतुन बाहेर काढलं आणि तू म्हणतो आहेस की गळा केसाने कापला? काय? म्हणायचं काय आहे तुला ?” – हरीहर जरा चिडूनच बोलला.

“तिला जेंव्हा मी लग्न करून घरी आणली तेव्हापासूनच तुझा तिच्यावर डोळा असणार. गोरी, गोमटी, शेलाट्या अंगाची मुलगी कोणाच्याही नजरेत भरेल, तर तुझी नजर फिरली त्यात वेगळं काय, मीच मूर्ख, तुझ्यावर विश्वास ठेवला.” – विश्वास  

“विश्वास बस. आता एक अक्षरही नाही. तू जर सांगून गेला असतास, तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. तिला सन्मानाने राहता आलं असतं. रोजच्या रोज लोकांचे टोमणे आणि नजरांचा सामना करावा लागला नसतं. पण तू पळून गेलास आणि वर पत्र पाठवलस की आपला संबंध संपला म्हणून. आता पश्चात्ताप करून उपयोग नाही. भाऊ म्हणून इतका वेळ शांत पणे बोललो पण आता माझा संयम सुटेल, तेंव्हा तू माघारी जा आणि सुखात रहा आणि आम्हाला पण जगू दे.” – हरीहर  

“अस कस ? माझी बायको बळकवलीस आणि वर मला जा म्हणतोस ? मी पोलीसांत जाईन आणि तुझी तक्रार करीन. दोन दोन लग्न करता येत नाहीत हा कायदा आहे हे वकील असून विसरलास वाटत. आता तुझ्याशी पोलीसच बोलतील.” आता विश्वास पातळी सोडून बोलायला लागला होता.  

“तुझी मजल इथवर जाईल अस वाटलं नव्हतं. जरूर पोलिसांत जा. माझ्याकडे दोन्ही लग्नाचे पुरावे आहेत आणि ते १९५५  च्या अगोदरचे आहे म्हणून ते valid आहेत. जरूर प्रयत्न कर. कोर्टाच्या तारखांवर तारखा पडतील आणि तुला आफ्रिकेतून यावे लागेल तेंव्हा कळेल. बाकी तुझी मर्जी  असो आता तू निघ नाही तर मलाच पोलिस बोलवावे लागतील.” – हरीहर.

विश्वास तर गेला. या प्रकरणावर शेवटचा पडदा पडला. पुन्हा हळू हळू आयुष्य पूर्वपदावर यायला लागलं. अशीच सात आठ वर्षं सरली. मुलं मोठी झाली. त्यांना  कॉलेज शिक्षणाचे वेध लागले आणि अशातच एक पत्र आलं. पत्रावर कांजी, युगांडा असा पोस्टाचा शिक्का होता. तारीख होती ०२/०९ १९७६. इमर्जनसी चे दिवस होते. परदेशातून पत्र आलंय म्हंटल्यांवर जरा दचकायला झालं. धीर करून पत्र फोडलं. पत्र कुणा इसाबेला नावाच्या बाईने लिहिलेलं होतं. पत्र इंग्रजीत होतं. ते वाचून हरीहर ने सगळ्यांना आशय सांगितला. इसाबेला चा नवरा विश्वास रायरीकर शेवटच्या घटका मोजत होता आणि त्याला हरीहरला आणि यशोदेला भेटायची फार इच्छा आहे. इसाबेलाने, विश्वासच्या बायकोने त्यांची शेवटची इच्छा पुरी करा म्हणून विनवणी केली होती. तिने असंही लिहिलं होतं की त्याला तुमची मनापासून माफी मागायची आहे. त्याला त्याच्या कृत्याचा फार पश्चात्ताप होतो आहे.

हरीहर ला कळेना की आता काय करायचं ते. रेवती, वसुधा, आणि दोन्ही मुलं अवाक झाली होती. कोणीच काही बोलेना. दोन्ही मुलं आता मोठी झाली होती आणि त्यांना सर्व इतिहास माहीत झाला होता.

“बाबा तुम्ही जा. कसही असलं तरी तुमचा तो सख्खा भाऊ आहे. काकांची शेवटची इच्छा पूर्ण करा. नाही तर कायम तुमचं मन तुम्हाला खात राहील.” विनय बोलला.

“अरे आफ्रिकेला जायचं म्हणजे खायचं काम आहे का ? माझ्या जवळ पासपोर्ट असला तरी विसा लागतो. पुन्हा आफ्रिका म्हणजे यलो फिवर ची लस टोचून घ्यावी लागणार आहे. ती कुठे मिळते हे माहीत नाहीये. ते पण बघाव लागेल. या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागेल ते माहीत नाही. तो पर्यन्त विश्वास असला पाहिजे. पत्रात तर लिहिलं आहे की शेवटची घटका मोजतोय म्हणून.” – हरीहर

विकास म्हणाला “बाबा, काकूने तिचा फोन नंबर पत्रात दिला आहे. तुम्ही एक इंटरनॅशनल कॉल लावा आणि इथली परिस्थिती तिला समजावून सांगा आणि तिथे काय परिस्थिती आहे ते ही विचारा. मग आपल्याला काही निर्णय घेता येईल.”

सर्वानुमते ही सूचना योग्य होती. आता इंटरनॅशनल कॉल फार महाग पडणार होता पण हरीहर म्हणाला की “ठीक आहे. खर्चाचं काही एवढं विशेष नाही. उद्याच करतो.”

केंव्हा तरी रात्री कॉल लागला. बोलणं धड ऐकू येत नव्हतं. पण एक कळलं की हातात केवळ एक दोन दिवसच आहेत. त्यामुळे जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

दोन महिन्या नंतर एक दिवस रविवारी संध्याकाळच्या सुमारास सगळे जण तयार होऊन, बाहेर जेवायला जायच्या तयारीत असतांना दारात काळी  सावळी, स्मार्ट पण चाळिशीची आफ्रिकन बाई उभी होती.

“येऊ का आत ?” – पाहुणी.

“या. पण कोण आपण ?” दारात विकास उभा होता त्यांनी विचारलं.

“मी इसाबेला, आफ्रिकेतून आलेय, खास तुम्हाला भेटायला.”

विकास मागे सरकला आणि रेवती समोर आली आणि तिला हॉल मध्ये घेऊन आली. पाणी वगैरे दिल्यावर इसाबेलाच बोलायला लागली.

“विश्वास जाऊन जवळ जवळ दोन महीने झालेत. त्यांनी तुमच्या फॅमिली बद्दल इतकं काही सांगितलं आहे की तुम्हाला भेटलच पाहिजे अस वाटलं म्हणून आले.” – इसाबेला  

अजूनही सर्वजण तिच्याकडे संशयानेच पहाट होते. विश्वासचीच बायको, काय संकट घेऊन आली आहे बरोबर, असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता. इसाबेलाच्या लक्षात, त्यांची देह बोली आली. ती म्हणाली

“तुमचा माझ्याबद्दलचा संशय मी समजू शकते. पण रीलॅक्स, चिंता करू नका. I have not come here all the way to trouble you. I just want to give you some information which I am supposed to impart and share with you. That’s all.”

“आमचे प्रेसिडेंट,” इसाबेला पुढे म्हणाली. “इदी अमिन ने सर्व एशियन लोकांना देश सोडून जायला सांगितलं आणि सगळी धाव पळ सुरू झाली. विश्वास चा धंदा उत्तम चालू होता. कोरोडो ची संपत्ति त्यांनी जमवली होती. पण आता ती सगळी पाण्यात जाणार होती. त्याला नेसत्या कपड्यानीशी युगांडा सोडावा लागणार होता. अशात त्याचा वकील, म्हणजे माझा भाऊ, जोसेफ यांनी त्याला एक सल्ला दिला की कुणी  युगांडाचीच मुलगी बघ आणि तिच्याशी लग्न कर म्हणजे तुला इथे राहता येईल. पण सध्या युगांडात प्रचंड अस्थिर वातावरण आहे. अशात कुणा एशियनशी लग्न करायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी माझा भाऊ मला म्हणाला की तूच कर यांच्याशी लग्न. विश्वासला मी बरेच वर्षं ओळखत होते, अतिशय सज्जन माणूस म्हणून तो मला माहीत होता. मी पण तयार झाले. नंतर परिस्थिती बदलली आणि सर्व कारभार माझ्या नावे करून त्याला कार्यकारी प्रमुख म्हणून माझ्याकडेच नोकरी करावी लागली. मी अर्थातच केवळ नावा पूरतीच होते, तोच सगळं पाहायचा. पण ही गोष्ट त्याला फार लागली होती. तो नेहमी म्हणायचा की मी माझ्या भावावर अनेक निराधार आरोप केलेत, आणि यशोदेला खूप मानसिक त्रास दिला त्याचंच हे फळ मला देव देतो आहे. तो अशातच खूप दारू प्यायला लागला होता. एक दिवस दारू पिऊन आमच्या प्रेसिडेंट ला शिव्या देत हॉटेल च्या पार्किंग मध्ये गाडी काढायला जात असतांना पोलिसांनी त्याला अटक केली आणि आत्ता पर्यन्त तो जेल मध्ये होता. खूप टॉर्चर झालं त्याच्यावर. शेवटी तो मरायला टेकल्यावर त्याला सोडून दिलं. पण आता सारंच संपलं आहे. त्यांच्या प्रॉपर्टी पैकी अर्धा हिस्सा त्यांनी वसुधाच्या नावावर ठेवला आहे. सध्याच्या परिस्थितीत एकही पैसा देशाबाहेर जाऊ शकत नाही. म्हणून मी तुमचा हिस्सा वेगळा ठेवला आहे आणि राजकीय परिस्थिति निवळल्या वर तो तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था करणार आहे. हेच तुम्हाला मी सांगायला आली आहे. हा माणूस चुकला असेल, तसा प्रत्येकच केंव्हा तरी चूक करतच असतो. पण तो मनाने निर्मळ होता. त्याच्या वतीने मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. तुम्ही मोठ्या मनाने क्षमा कराल अशी आशा आहे.”

सर्व वातावरणच बदलून गेलं. थोडा वेळ कोणीच बोललं नाही. हरी, रेवती, आणि वसुधाच्या डोळ्यातून अश्रु धारा वहात होत्या. सगळेच भावुक झाले होते.

वसुधाच प्रथम सावरली आणि म्हणाली. “त्यांच्या नावाने एक ट्रस्ट करा आणि आमच्या साठी जो पैसा ठेवला आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या देशातल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. अस मी म्हणते आहे ते त्यांचा एकही पैसा आम्हाला नको या अर्थाने नव्हे. आता सगळे गैरसमज दूर झाले  आहेत. पण मुलांच्या शिक्षणासाठी जर हा पैसा खर्च झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. म्हणून.”

इसा बेला आणि तिचा मुलगा चार दिवस राहून नवीन ऋणानुबंध जोडून गेले.  एका नवीन पण सुखाच्या जीवनाला सुरवात झाली होती.

*** समाप्त. ***

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com