my speech books and stories free download online pdf in Marathi

मायबोली

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी , एवढ्या जगात माय मानतो मराठी । ” . २७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो . मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते “विष्णू वामन शिरवाडकर” ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो . जीवनलहरी, किनारा ,मराठी माती ,वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहे. तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला ,नटसम्राट ,राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत. वैष्णव ,जान्हवी ,कल्पनेच्या तीरावर या कादंबर्‍या अशा अनेक साहित्यिक कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेचे महत्त्व लोकांसमोर मांडले आहे.

 

    हा दिवस मराठी भाषा दिन ,मराठी राज्यभाषा दिन, गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो . कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे. त्यांनी त्यांच्या साहित्याची सुरुवात कवितेपासून केली . पुढे कथा ,कादंबरी , ललित वाड्मयातील नावाजलेली साहित्य रचना त्यांच्या लिखाणातून अवतरली. भविष्यातील पिढीने हा मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली . 27 फेब्रुवारी या दिवशी केवळ महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आज हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना मराठी गायन ,वादन, वक्तृत्व स्पर्धा ,मराठी निबंध स्पर्धा ,शास्त्रीय संगीत यांचे आयोजन केले जाते. नाटकांचे आयोजन करून मराठी भाषेला एक दिशा दिली जाते .

आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा खूप मोठा आहे . आपल्या या मराठी साहित्यात मराठी चित्रपट , नाटक, काव्य , कविता इत्यादींचा फार मोठा वाटा आहे . अशा अनेक गोष्टींमुळे आजपर्यंत आपण हा मराठीचा वारसा जपत आलेलो आहोत. आपल्या या मराठी मातीत अनेक संत होऊन गेले संत रामदास ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून स्तोत्र, श्लोक लिहिले. आणि लोकांना चांगला संदेश दिला . अशा संतांनीसुद्धा मराठी भाषेत त्याचा लोकांवर ठसा उमटवला . बऱ्याच वर्षापासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण प्रणाली आल्यापासून मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्त्व देणे कमी झालेले दिसते . मराठी भाषेतील साहित्य ,कविता ,नाटके प्रवास वर्णन ,निबंध ,लघुनिबंध यांचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो .

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी संस्कृतीचे आणि मराठी भाषेचे रक्षण केले . एवढेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीतच काढले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर , सचिन तेंडूलकर, नाना पाटेकर , माधुरी दीक्षित तसेच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील … समाजसेवक अण्णा हजारे , समाज सुधारक बाबा आमटे तसेच उत्तम मराठी लेखक नाटककार पु .ल देशपांडे , यांसारखी अनेक रत्ने मराठी मातीतच घडली . पण या मराठी भाषेला लोक विसरत चालले आहेत .

मायबोलीचा त्याग करून लोक इंग्रजी भाषेचा अवलंब करत आहे इंग्रजी ही काळाची गरज आहे . नक्कीच याबद्दल दुमत नाही . पण त्यासाठी मराठी भाषेला विसरणे योग्य नाही . मराठी बोलणारा माणूस नोकरी-व्यवसाय ,उच्च शिक्षण या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे. तिथे जाऊन हिंदी , इंग्रजी सारख्या इतर भाषा अवगत करून आपल्या मराठी भाषेला विसरत आहे .

ज्या मायबोलीत आपण जन्मलो आणि ज्या मायबोली आपल्याला घडवले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे . मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे. आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास , मराठीचा इतिहास आपले साहित्य वाचायला प्रवृत्त केले पाहिजे आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. ही सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी अशा गोष्टींमुळे मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल.