Geet Ramayana Varil Vivechan - 41 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 41 - पेटवी लंका हनुमंत

सीता देवींचा निरोप घेऊन हनुमान अशोक वाटिकेच्या दुसऱ्या भागात आले. तिथे विविध प्रकारची चविष्ट फळे बघून त्यांना भुकेची जाणीव झाली. त्यांनी तिथे पोटभर गोड रसाळ फळे खाल्ले. त्यांच्या मनात विचार आला की ज्या कामासाठी आपण आलो होतो ते तर निर्विघ्नपणे झालं आहे मग आता जाता जाता रावणाला एक धोक्याचा इशारा द्यायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी संपूर्ण वाटिकेची नासधूस केली. ते बघून तिथले पहारेकरी हनुमानाच्या अंगावर धावून आले पण त्यांचा हनुमानाने लीलया(सहज) बिमोड केला.


ते पाहून पहारेकरी दरबारात तक्रार करायला गेले.


"दैत्यराज! वाचवा दैत्यराज वाचवा! त्राहिमाम! वाटीकेत एक महाकाय वानर उत्पात माजवत आहे. त्याने सगळ्या फळफुलांची नासधुस आरंभली आहे.",पहारेकरी


"एक क्षुद्र वानर त्यांना तुम्ही घाबरून आले! दैत्यराज रावणाच्या वाटिकेतील पहारेकरी असून एवढे भ्याडपणे कसे काय वागले तूम्ही मूढमते!",रावणाने असे म्हणताच रावणाचा मुलगा अक्षय कुमार लगेच उठतो व म्हणतो,


"पिताश्री मला आज्ञा द्या आत्ता त्या वानराला जाऊन धडा शिकवतो. असे म्हणून काही सैन्यासह अक्षयकुमार व जांबुवाली नामक राक्षस हनुमानाशी लढायला गेले. राक्षसांकडे गदा, खडग असे अनेक शस्त्र लढायला होते. हनुमानाला मात्र झाडे फांद्या आणि गदा असे शस्त्र होते तरीही हनुमानाशी लढण्यात जांबुवाली व अक्षयकुमार मारले गेले. उरलेल्या सैन्यातील काही जण पुन्हा रावणाला झालेला वृत्तांत सांगत आले. तेव्हा रावण सुद्धा क्षणभर अचंबित झाला. हा वानर काही साधा नसून नक्कीच मायावी आहे हे त्याने ओळखले. त्यानंतर रावणाने त्याच्या दुसऱ्या मुलाला मेघनाद उर्फ इंद्रजीत ला पाठवलं. इंद्रजित ने हनुमानाशी तुंबळ लढाई केली पण काही केल्या हनुमान बधेना तेव्हा इंद्रजित ने ब्रह्मस्त्र चा वापर केला. आणि ब्रह्म देवाचा मान ठेवायचा म्हणून हनुमान त्या अस्त्राने बंदिस्त झाले.


बंदिस्त हनुमानाला इंद्रजित मोठ्या अभिमानाने रावणासमोर घेऊन गेला.

"पिताश्री मी ह्या वानराला तुमच्या समोर घेऊन आलो. आता सांगा ह्याचं काय करायचं?"


"अहम ब्रम्हास्मी!", असं आनंदाने रावण चित्कारला व पुढे म्हणाला,"मर्कटा! कोण आहेस कोण तू? आणि तुझी हिम्मत कशी झाली इथे येऊन आमची वाटिका उध्वस्त करण्याची."


"मी माझ्या स्वामींचा भक्त आणि दूत आहे. त्यांनी मला इथे पाठवलं आहे.",हनुमान


"कोण आहे तुझा स्वामी? जरा आम्हालाही कळू दे",रावण तुच्छतेने म्हणाला.


"माझे स्वामी दशरथनंदन श्रीराम आहेत. ज्यांची भार्या तुम्ही बलपूर्वक आणली त्या श्रीरामांनी मला इथे पाठवलं आहे. त्यांचा संदेश आहे की सीता देवींना सन्मानपूर्वक त्यांच्या कडे आणून पोचवावे अन्यथा युद्धाला तयार व्हावे.",हनुमान


"तुझा तो राम कोणाच्या भरवश्यावर उड्या मारतोय रे? ह्या लंकेश शी जिंकण्याची स्वप्ने तो कोणाच्या जीवावर पाहतोय?",रावण उन्मत्तपणे म्हणाला.


त्यावर तिथे हनुमानाने रामाचे पराक्रम वर्णन करणारी स्तुती गाऊन दाखविली ती ऐकून रावणाचा रागाने तिळपापड झाला. त्याने हनुमानाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली तेवढ्यात रावणाचा कनिष्ठ बंधू विभीषण म्हणाला,

"लंकेश हनुमान हा दूत असल्याने दूतास जीवानिशी मारणे हे राजनीतीला धरून नाही."


त्यावर रावण हनुमानाला प्राण दंड देण्याची आज्ञा मागे घेतो परंतु त्याच्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा देतो. रावणाचे सेवक जेव्हा हनुमानाच्या शेपटीला चिंध्या बांधायला जातात तेव्हा हनुमान आपली शेपूट लांब आणखी लांब करत राहतात. शेवटी असंख्य सेवक,सैनिक त्याच उद्योगाला लागतात आणि अखेर हनुमानाच्या शेपटीला चिंध्या बांधून होतात व त्यांची शेपटीला आग लावण्यात येते.


ती आग घेऊन हनुमान संपूर्ण लंकेत हाहाकार माजवून टाकतात. हवेत उडून ते संपूर्ण राजप्रसादाला आग लावून टाकतात. सगळे दार,खिडक्या गवाक्ष अग्नीच्या भक्ष स्थानी पडतात. सगळीकडे विधन्वंसच विध्वंस होतो. लंकेत राहणाऱ्या सामान्य जनतेचे घर जाळून जातात सगळे लोकं सैरावैरा पळू लागतात. जिवाच्या भीतीने आई मुलाला टाकून पळते जिवाच्या भीतीने सगळेजण आपापला जीव वाचवतो नाते नातेवाईक बायका पोरे सगळे सगळे विसरून सगळे आपला जीव वाचवत असतात. हनुमान मंदिरांना आग लावतो, घरांना आग लावतो, सगळीकडे धगधगत्या ज्वाळा आणि धूरच धूर!

रडण्याचे,ओरडण्याचे आवाज!आकांत !आक्रोश !ह्याने लंका व्यापून जाते. राजवाड्यातील सैन्य पहारेकरी वाट मिळेल तिथे पळत सुटतात.


सगळी लंका नेस्तनाबूत होते. हनुमान काही केल्या नियंत्रित होत नाही आणि अखेर संपूर्ण लंका जळल्यावर हनुमान लंकेबाहेर येऊन समुद्रात आपली शेपटी विझवतात. आणि जयश्रीराम म्हणून पुन्हा परतीचा प्रवास सूरू करतात.


{ह्या गीतातून रावणाच्या परस्त्री लालसेमुळे कसं सगळ्यांना भोगावे लागले, सामान्य जनतेचा, सेवकांचा सैन्याचा त्यात दोष नसून त्यांचा बळी गेला. सामान्य जनता बायका पुरुष लहान मुले वृद्ध सगळे सगळे हकनाक होरपळून मेले. जे पळाले ते वाचले पण जे पळू शकले नाही त्यांचा नाहक जळून जीव गेला. ह्यावरून असे स्पष्ट होते की राजा हा विवेकबुद्धी असलेलाच हवा. सगळ्यात आधी त्याला प्रजेची काळजी असायला हवी. स्वतःची इच्छा लालसा प्रजेच्या हितापुढे गौण वाटायला पाहिजे. चांगला राजा चांगला नेता मिळण्यास सुद्धा भाग्य लागते हेच खरे!}


(रामकथेत पुढे काय होईल जाणून घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम 🙏🚩)


ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे एक्केचाळीसावे गीत:-



लीलया उडुनी गगनांत

पेटवी लंका हनुमंत


नगाकार घन दिसे मारुती

विजेपरी तें पुच्छ मागुतीं

आग वर्षवी नगरीवरती

गर्जना करी महावात


या शिखराहुन त्या गेहावर

कंदुकसा तो उडे कपीवर

शिरे गवाक्षीं पुच्छ भयंकर

चालला नगर चेतवीत


भडके मंदिर, पेटे गोपुर

द्वार कडाडुन वाजे भेसुर

रडे, ओरडे, तों अंतःपुर

प्रकाशीं बुडे वस्तुजात


जळे धडधडा ओळ घरांची

राख कोसळे आकारांची

चिता भडकली जणूं पुराची

राक्षसी करिती आकांत


कुणी जळाले निजल्या ठायीं

जळत पळत कुणि मार्गी येई

कुणि भीतीनें अवाक होई

ओळखी नुरल्या प्रलयांत


माय लेकरां टाकुन धावे

लोक विसरले नातीं नावें

उभें तेवढें पडें आडवें

अचानक आला कल्पांत


खड्गे ढाली पार वितळल्या

वीरवृत्ति तर सदेह जळल्या

ज्वाळेमाजीं ज्वाळा मिळाल्या

सघनता होय भस्मसात


वारा अग्‍नी, अग्‍नी वारा,

नुरे निवारा, नाहीं थारा

जळल्या वेशी, जळे पहारा

नाचतो अनल मूर्तिमंत

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★