Joking is not a crime books and stories free download online pdf in Marathi

विनोद करणे हा गुन्हा नाही

विनोद करणे हा गुन्हा आहे काय?

*विनोद हा कोणाला केव्हा दुखवेल ते काही सांगता येत नाही. विनोद जो करतो, त्याचा कोणाला दुखविण्याचा हेतू नसतोच आणि तो कुणाला दुखवत नाहीच. त्याचा एकमात्र उद्देश असतो, ते केवळ इतरांचं मनोरंजन करणं. परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशाच दोन बाजू विनोदाच्याही असल्यानं ज्याच्याशी विनोद केला जातो. त्याच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो व संबंध तुटू शकतात. म्हणूनच कोणताही विनोद न केलेला बरा.*
विनोदाचे अनेक प्रकार आहेत. शाब्दिक विनोद (कोट्या), शारीरिक विनोद (अंगविक्षेपातून होणारे), प्रासंगिक विनोद वगैरे वगैरे. विनोदबुद्धी कमी असण्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे वाचनाचा अभाव आणि दुसरे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे झालेले पूर्ण दुर्लक्ष. यातूनच विनोदातून समस्या निर्माण होत असतात.
विनोद.......विनोद करणं काही वाईट नाही. विनोदात एवढी ताकद आहे की विनोदानं बऱ्याचशा आजारावर नियंत्रण करता येवू शकतं. तसंच आजाराचं पानीपत करता येवू शकतं. त्यातच दुःखावर मात करुन विजयही मिळवता येवू शकतं. याबाबतीत एक प्रसंग सांगतो.
गुरु.........गुरु आजपर्यंत तरी गंमत करीत करीत जीवन जगत आला होता. त्याला कळलं नव्हतं की जीवनात विनोदाला किंचीतही स्थान नाही. जो विनोद करतो. त्याचाच विनोद होवून जातो.
त्याला एक प्रसंग आठवत होता. तो प्रसंग होता. त्यानं एका मुलीशी विनोदी शैलीत बोलणं. त्याला वाटत होतं की आपण जर विनोदी शैलीने बोललो तर दुसऱ्यांना मजा येते व तेवढाच आनंद मिळतो. त्यालाही आणि आपल्यालाही. परंतु तो त्याचा भ्रम होता. त्याच्या विनोदीपणाचा दुसऱ्यांना रागच येत होता. काय कारण होतं त्यात. ते त्याला कळत नव्हतं.
गुरुचीही एक मैत्रीण होती की जी पार्लर चालवत होती. तिला त्यानं विनोदी शैलीने म्हटलं होतं की किती नवरदेवांना आज सजवून दिलं. त्यावर तिला राग आला होता व एवढा राग आला होता की ती म्हणाली होती,
"आता आपले विद्यार्थी जीवन राहिलेले नाही. आता आपण पालक आहोत आणि आपली मुलं ही आता विद्यार्थी आहेत. म्हणून मेसेज करतांना मर्यादेच भान ठेवावे. जसे मेसेज मला करतो ना, तसे तू वहीनीशी बोल किंवा मैसेज कर तुला गृहस्थ जीवन चांगल कळेल.
मी काही नवरदेवच सजवत असते का? या तुझ्या बोलण्यावरुन तुझी काय मानसिकता आहे हे समजायला येते."
विनोद.........विनोद हा कधी कधी अंगाशी येत असतो याचं ते उदाहरण आहे. महाभारतात असाच विनोद झाला. त्या घटनेला विनोदच म्हणता येईल.
महाभारताचं युद्ध सुरु होतं. सर्वच रथी महारथी एकमेकांवर बाणांचा वर्षाव करीत होते. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने एकमेकांशी युद्ध लढत होते. कोणीही कमजोर वाटत नव्हता व कोण युद्ध जिंकेल हेही काही सांगता येत नव्हतं. गुरु द्रोण तर एवढे शक्तीशाली वाटत होते की ते जर जीवंत राहिले तर उद्या आपला निश्चितच पराभव होईल. असं पांडवांना वाटत होतं. अशातीलच तो महाभारतातील एक प्रसंग. महाभारतात एक प्रसंग असा की त्या प्रसंगात पांडवांनी एक योजना बनवली व योजनेनुसार ठरवलं. आपण विनोद करायचा. विनोद हा की आपण अश्वत्थामा मारला गेला हे ओरडून सांगायचं. मग गुरु द्रोण शस्त्र टाकेल. त्यानंतर तो जेव्हा शस्त्र टाकेल. तेव्हा त्यांची हत्या करायची.
तो विनोदच होता. परंतु त्या विनोदात युद्धाच्या योजनेची झालर होती. अश्वत्थामा मारला गेला हे कळताच गुरु द्रोणाचार्यनं आपले शस्त्र त्यागले व ते प्रत्यक्ष सत्य बोलणाऱ्या युधिष्ठिराकडे आले व त्यांना विचारलं की प्रत्यक्ष कोण मरण पावलं. माझा मुलगा अश्वत्थामा की प्रत्यक्ष हत्ती अश्वत्थामा? तद्नंतर युधिष्ठिर बोलले, 'नरो वा कुंजरवा' अर्थात नर आहे की कुंजर आहे हे मला माहीत नाही. परंतु अश्वत्थामा मरण पावला ही बाब सत्य आहे. मग काय, गुरु द्रोणांना वाटलं की प्रत्यक्ष माझाच मुलगा मरण पावलेला आहे. आता शस्त्र हातात ठेवून काय उपयोग? ते शस्र हातात न घेता विलाप करीत राहिले. त्याच संधीचा फायदा घेवून पांडवाच्या पक्षातील धृष्टधुम्ननं गुरु द्रोणाचार्यची हत्या केली. यात महत्वाची गोष्ट ही की विनोदानं नेमकं काय होवू शकतं याची कल्पनाच येते.
विनोद हा आनंददायी जीवन जगण्याची शैली आहे. विनोद जर जीवनात नसेल तर आनंद मिळवता येत नाही. आनंदानं जगता येत नाही. परंतु कधी कधी त्याचा एवढा अनर्थ होतो की अर्थाचे बेअर्थ होतात. विनोद करणाऱ्याला काय बोललो ते कळत नाही. मग चांगले नातेही संपुष्टात येतात. चांगले मित्र तुटतात. कोणाची विनाकारण हत्याही होते. एकंदरीत सांगायचं झाल्यास माणसाची अवस्था नरो वा कुंजरवा अशीच होवून जाते. कारण एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतात. जसे नभ या शब्दाला अनेक अर्थ आहेत. नभाला कोणी ढगही म्हणू शकतात. कोणी त्याला आभाळही म्हणू शकतात. धरणीला कोणी धरा, कोणी जमीन, कोणी पृथ्वी देखील म्हणतात. तसंच विनोदाचं आहे. विनोदाचेही असेच अनेक अर्थ निघू शकतात. समोरचा जसा अर्थ काढेल तसा. मग त्यावर पुढच्यानं जरी तशा अर्थानं विनोद केला नसेल, तरी ज्याचेवर तो विनोद केल्या गेला, तो त्याला असलेला अपेक्षीत अर्थ काढून संतापतो. तो विनोद न समजल्यानं त्याचा परिणाम मग जो विनोद करतो, त्याची गाथापेढी काढण्यात होतो.
विशेष सांगायचं म्हणजे विनोद हे आपल्या जगण्याची जीवनशैली आहे. ते आपल्या जीवनात मनोरंजन निर्माण करीत असतं. मनोरंजन करण्यासाठी आपण टिव्ही पाहतो. मोठमोठ्या हास्याच्या कार्यक्रमाला जातो. कितीतरी पैसा खर्च करतो असा विनोद ऐकण्यासाठी व आपलं मनोरंजन करुन घेण्यासाठी. परंतु कधीकधी निःशुल्क मिळत असलेले विनोद आपल्याला पचत नाही व त्याचा बाऊ होतो. ज्यातून नातं संपतं. कारण जो विनोद निर्माण होतो. त्यात काही असेही शब्द असतात की जे शब्द........त्याचे दोन अर्थ निघत असल्यानं ते बोचतात किंवा बोचू शकतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की विनोद हा समजून घेण्याची गरज आहे. तो समजून घ्यावा व त्यानुसार आपण वागावं. त्याचा बाऊ करु नये. तरच सुखशांतीनं जगता येवू शकतं. नाहीतर विनोद न समजल्यानं आपल्याच मनात संभ्रम निर्माण होवून आपलंच सुख हरवतं. तसं होवू नये म्हणून विनोदाशी संगत केलेली बरी. विनोदात्मक जगलेलं बरं. तसंच विनोदातूनच स्वतःच मनोरंजन केलेलं बरं. कारण तसं केल्यानं जे सुख प्राप्त होतं. ते सुख मोजता येत नाही. तेच सुख आपल्याला अनेक असाध्य अशाच रोगांपासून वाचवत असते. हे तेवढंच खरं आहे. म्हणूनच विनोदावर विश्वास केलेला बरा. त्याला गुन्हा ठरवू नये व तो करणाऱ्यालाही गुन्हेगार ठरवू नये. याचाही विचार करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे विनोद हे एकप्रकारे जगण्याचं साधनच आहे नव्हे तर तत्वज्ञानच. याबद्दल न बोललेलं बरं. ते तत्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे व अंगीकारण्याची गरज आहे यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०