shraddhanjli in Marathi Women Focused by Trupti Deo books and stories PDF | श्रद्धांजली

Featured Books
Categories
Share

श्रद्धांजली

“त्या चार वर्षांच्या चिमुकलीसाठी…”

आज शब्दही थरथरतात… कारण ही फक्त एक बातमी नाही, ही एका निष्पाप जीवाची निःशब्द किंकाळी आहे. चार वर्षांची ती मुलगी… जिने अजून आयुष्याच्या पानांवर पहिलं अक्षरही लिहिलं नव्हतं, जिने आईच्या कुशीतच जग शोधायचं होतं, जिने बाहुल्यांशी खेळत हसावं, धावत-धावत पडावं आणि पुन्हा उठावं… तिचं ते निरागस जग एका क्षणात उद्ध्वस्त झालं.कोण जवाबदार आहॆ. तिला मनसोक्त खेळायचं होतं हिंडायचं होतं एखादा फुलपाखराप्रमाणे तिला उडायचं होतं. हा लहानशा जिवाचे काय स्वप्न असतील. तिच्यासोबत ही कृत्य होत असताना.

त्या क्षणी तिच्या डोळ्यांत काय आलं असेल? भीती… गोंधळ… असहाय्यता… कदाचित ती रडत असेल, आईला हाक मारत असेल… “आई…” हा शब्द तिच्या ओठांवर थरथरत अडकला असेल. तिचं छोटंसं शरीर वेदनेने तडफडत असेल… पण त्या वेदनेला समजून घेण्याइतकंही ती मोठी नव्हती. तिच्या मनात एकच प्रश्न असेल—“माझी चूक काय होती?”
कि मी फक्त एक... हया पलीकडे माझं अस्तित्व नाही का?

आणि इथेच आपला समाज हरतो… कारण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही.

आपण म्हणतो—संस्कार आहेत, शिक्षण आहे, प्रगती आहे… पण जर एका चार वर्षांच्या मुलीचं बालपण आपण सुरक्षित ठेवू शकत नाही, तर ही प्रगती कशासाठी? हा विकास कोणासाठी? आजही काही विकृत मानसिकता अशा थराला पोहोचते की, माणूसपणच लाजून जाईल. ही फक्त एका व्यक्तीची चूक नाही—ही त्या विचारांची, त्या वातावरणाची, त्या दुर्लक्षाची चूक आहे जी अशा राक्षसी प्रवृत्तीला वाढू देते.

मला राग येतो… खूप राग येतो. फक्त त्या गुन्हेगारावर नाही, तर त्या प्रत्येक क्षणावर जिथे आपण गप्प बसलो. जिथे आपण “हे आपल्याशी संबंधित नाही” म्हणून पुढे गेलो. कारण अशा घटना अचानक घडत नाहीत—त्या हळूहळू तयार होतात, आणि आपण त्यांना थांबवण्यात अपयशी ठरतो.

अशा लोकांसाठी काय शिक्षा असावी? हा प्रश्न मनाला पोखरतो. कारण शिक्षा ही फक्त बदला नसते—ती इशारा असतो. असा इशारा, जो पुढच्या गुन्हेगाराच्या मनात भीती निर्माण करेल. न्याय उशिरा मिळाला तर तो न्याय राहत नाही—तो फक्त औपचारिकता बनतो. म्हणून अशा प्रकरणांमध्ये जलद, कठोर आणि निःसंशय शिक्षा हवी—ज्यामुळे समाजाला विश्वास वाटेल की अन्याय सहन केला जाणार नाही.

पण शिक्षा देऊन सगळं संपत नाही… खरी गरज आहे बदलाची. घराघरात मुलांना, विशेषतः मुलांना, स्त्रीचा आदर शिकवण्याची. “चांगला स्पर्श–वाईट स्पर्श” ही फक्त शाळेची गोष्ट नाही
ती प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं—चुकीचं दिसलं तर आवाज उठवण्याची हिंमत प्रत्येकामध्ये असली पाहिजे.

त्या चिमुकलीला आपण परत आणू शकत नाही… तिचं हसू, तिचं बालपण, तिचं भविष्य—सगळं हरवलं आहे. पण तिच्या वेदनेला आपण वाया जाऊ देऊ नये. तिच्या त्या निःशब्द किंकाळीला आपण आवाज द्यायला हवा—असा आवाज, जो बदल घडवेल.

आज श्रद्धांजली देताना फक्त डोळे ओले करून चालणार नाही…
आज मनात एक निर्धार हवा—
“आता पुरे झालं… आता बदल घडवणार!”


आपण चंद्रावर पोहोचलो, तंत्रज्ञान विकसित केलं, पण आपल्या लेकींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण अजूनही आदिम काळातच अडकलो आहोत का?


.चंद्रावर पोहोचणं, AI, अंतराळ तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती — हे सगळं मानवाने प्रचंड वेगाने साध्य केलं. पण जेव्हा “सुरक्षा” आणि “स्त्रीची सुरक्षितता” या मूलभूत मानवी मूल्यांकडे आपण पाहतो, तेव्हा अजूनही एक वेगळंच चित्र दिसतं.
तंत्रज्ञान पुढे गेलं, पण मानसिकता तितकी वेगाने बदलली नाही, ही खरी अडचण आहे.


 आपल्या मुली आपल्याच अंगणामध्ये सुरक्षित नाही आहे.यातच वाईट वाटतं खूप. मग त्यांनी त्यांचा आयुष्य जगायचं नाही का.?कारण शेवटी, कोणतंही समाज “विकसित” तेव्हाच म्हणता येतं जेव्हा आपल्या मुली भीतीशिवाय, सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगू शकतील.

 जिथे मुलगी “सुरक्षित कशी राहायचं” यापेक्षा, “सुरक्षित वातावरण कसं निर्माण करायचं” यावर समाज विचार करेल. तेव्हाच अशुरक्षतेची भावना मनात राहणार नाही.

 त्या निरागस जीवाला भावपूर्ण श्रद्धांजली…
आणि तिच्या वेदनेसमोर एक निःशब्द वचन—
“तुझ्यासारखी आणखी एकही वेदना या समाजात जन्माला येऊ देणार नाही…”

सौ तृप्ती देव 
भिलाई