Amol goshti - 2 books and stories free download online pdf in Marathi

अमोल गोष्टी - 2

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

२. राजा शुद्धमती

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाटयास दु:ख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दु:खाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत? मानसिक चिंता कोणास व्यग्र व व्यथित करीत नाहीत? मरण तर सर्वांनाच ग्रासावयास टपले आहे.जर सर्वच जण या मर्त्य भूमीत दु:खात व विपत्तीत आहेत, तर अशा परिस्थितीत दुस-याने दिलेल्या साहाय्याची किंमत फार थोर आहे. आपल्या विपत्तीत दुस-याने दाखविलेल्या सहानुभूतीची व साहाय्याची जशी आपणास किंमत वाटते, त्याप्रमाणेच दुसरा विपत्तीत पडला असता त्यास आपण जर सहानुभूती दाखविली, त्यास मदत केली तर त्याला किती आनंद होईल? आपण सुखात असू त्या वेळेस दु:खी दरिद्री लोकांची सेवा आनंदाने आपण केली पाहिजे; परंतु ज्या वेळेत आपण स्वत: दु:खात असू त्या वेळेसही आपले दु:ख दूर सारून दुस-याच्या दु:खाच्या दूरीकरणार्थ आपण धावून जावे.आपल्या या परमपूज्य भरतखंडात दुस-याच्या दु:खाने दु:खी होणारे व ते दु:ख दूर करण्याकरिता झटणारे, प्रसंगी प्राणदान करणारे असे थोर महात्मे कितीतरी होऊन गेले आहेत. अशाच एका थोर राजाची गोष्ट आज मी सांगणार आहे.फार प्राचीन काळी आपल्या देशात शुध्दमती म्हणून एक राजा होऊन गेला. हा राजा दयाळू व उदार होता. लहानपणापासून त्याचे मन कोमल होते. हृदय हळुवार होते. लहानपणी मृगया करण्यास त्याने जाऊ नये, कारण कोमल हरणांचे बाणविध्द देह पाहून त्याचे स्वत:चे प्रंचप्राण कासावीस होत. झाडांचे पल्लव त्याने खुडू नयेत, पुष्पे त्याने तोडू नयेत, का? तर त्यास दु:ख होईल म्हणून! लहानपणापासून अशी ही त्याची वृत्ती. हाताखालच्या नोकरमंडळींचे मन कठोर शब्दांनी तो कधी दुखवीत नसे. कठोर शब्द बोलणे म्हणजे देवाघरी पातक केले असे होईल असे तो म्हणे.

राजपदप्राप्ती झाल्यावर राजाच्या उदारपणाची सर्वत्र ख्याती झाली. त्याच्या औदर्याची सर्व मुक्तकंठाने स्तुती करू लागले. त्याचा यशपरिमल दशदिशांत भरून राहिला. जो दुस-याच्या दु:खाने खिन्न होतो, जो गरिबांचा कैवार घेतो, अनाथांचा जो आधार, अशांच्या गुणांचे संकीर्तन विश्वजन का करणार नाहीत? अशा थोर पुरुषास दुनिया दुवा का देणार नाही?राजा गोरगरिबांस सर्व प्रकारची भिक्षा वाटीत असे. हे काम तो आपल्या हाताखालच्या लोकांस सांगत असे. देणग्या वगैरे देण्याचे काम तो जातीने करी. कोणीही अतिथी त्याच्या दारातून विन्मुख होऊन परत गेला नाही. तो स्वत: भिक्षागृहात जाई व तेथे कोणी अनाथ निराश्रित नाही अशी खात्री करून घेई.

एके दिवशी सकाळी राजा उठला व आपल्या प्रजेसाठी आपणास जास्तीत जास्त काय करता यईल या गोष्टीचा विचार करीत होता. दुस-यास सुख देण्याचा विचारही किती सुखप्रद व उन्नतिकर असतो! विचार करता करता राजा मनात म्हणाला, ''मी गोरगरिबांस काही धनधान्य देतो यात विशेषसे काय करितो? सोने, चांदी, वस्त्रप्रावरण या बाह्य वस्तूच मी आजपर्यंत देता आलो. माझे स्वत:चे असे मी काय दिले आहे? हा देह माझा आहे. हा देह जर मला देता येईल, तर खरोखर मी माझे काही दिले असे म्हणता येईल. माझ्या प्रजेवर माझे जे अलोट प्रेम आहे ते दर्शित करण्यासाठी मी माझे प्राण देण्यास तयार असले पाहिजे. आज ज्या वेळेस मी भिक्षागृहात जाईन त्या वेळेस एखादा दीनदुबळा माणूस जर मला म्हणेल, 'महाराज, आपले काळीज मला कापून द्या.' तर मी आपले काळीज भाल्याच्या टोकाने कापून काढीन व एखाद्या शांत सरोवरातून कमळ खुडून आणून देवावर वाहावे त्याप्रमाणे माझे हृदयकमल त्या याचकाच्या पदरी मी अर्पण करीन! आज जर कोणी माझे रक्त व मांस मागेल तर मी आनंदाने देईन. 'माझे काम करण्यास कोणी नाही' अशी रड जर माझ्याजवळ कोणी गाईन तर मी त्यास साहाय्य करण्यास माझे सिंहासन सोडून जाईन. देवाने दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे जे हे दोन डोळे तेही जर एखाद्याने मागितले तर वृक्षावरची दोन फुले तोडून द्यावी, त्याप्रमाणे ही माझी नेत्रपुष्पे मी त्या याचकास देईन. माझ्या देहाचा अशा प्रकारे उपयोग करण्यास जर मला संधी मिळेल तर मला किती आनंद होईल!''राजाचे मन प्रजेवरील प्रेमाने आज भरून आले होते. तो शुचिर्भूत झाला. त्याने स्नान केले. शृंगारलेल्या हत्तीवर बसून तो भिक्षागृहाकडे गेला. राजाच्या प्रशांत भालप्रदेशावर आज अलौकिक तेज दिसत होते. त्याचे नेत्रद्वयात प्रेमाची मंदाकिनी अवतरली होती. त्याच्या ओठावर फारच मृदू व रमणीय हास्य विलसत होते.भगवान कैलासपती शंकर यांच्या मनात राजचे आज सत्त्व पाहावे असे आले. त्या राजाचा आज प्रात:काळचा निश्चय कसोटीस लावून पाहण्याचे शंकरांनी ठरविले. राजाचा हा खरा निश्चय आहे, की मनात हजारो सुंदर निश्चय येतात व मावळतात, तसेच हे लहरी विचार आहेत, हे भगवंतास पाहावयाचे होते. शंकरांनी पार्वतीस आपला मनोदय कळविला तेव्हा भक्तवत्सल पार्वती म्हणाली, ''प्राणप्रिया, असे कठोर वर्तन करू नये. आजपर्यंत अनेक भक्तांचा आपण अमानुष छळ केला. माझे मन त्या त्या वेळी कसे तिळतिळ तुटले. श्रियाळ, चांगुणा यास तुम्ही किती बरे छळले होते? भक्तमणींचा असा छळ करणे आपणांस उचित नव्हे.''

भगवान शंकर म्हणाले, ''वेडीच आहेस तू! अग सोने कसोटीस लावल्यावर मगच ते जवळ ठेवता येते. भट्टीत घालून सोने झगझगीत निघाले तरच त्यास मोल चढते. परीक्षा पाहिल्याशिवाय वस्तू घेतली व मागून फसलो तर आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही! भक्तांचा मी छळ करतो, परंतु मागून मी त्यांचा बंदा गुलाम होतो, अक्षय त्यांचा मी ऋणी राहतो. वा कसल्याही आघातांचा वारा मी त्यास लागू देत नाही.''

पार्वतीची समजूत घालून मृत्युंजयाची स्वारी मर्त्यलोकी येण्यास निघाली. शंकरांनी एका कुश्चळ अंध अतिथीचा वेष धारण केला आणि काठी टेकीत टेकीत व रस्ता विचारीत राजाच्या भिक्षागृहाजवळ ते पोचले.अंध ब्राह्मणास राजाने हात धरून सिंहासनावर बसविले, मग हात जोडून राजा म्हणाला, ''भगवान, किमर्थ येणे झाले? आपली काय वांछा आहे कृपा करून सांगावी. आपले मनोरथ पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभेल का?''अंध ब्राह्मण राजास म्हणाला, ''हे थोर कीर्तिमान राजा, या विस्तीर्ण पृथ्वीतलावर असे एकही स्थळ नाही, की जेथे तुझ्या थोर सदय अंत:करणाची कीर्ती पसरलेली नाही. राजा, सांगू नये पण सांगतो; मागू नये पण मागतो. मी तरी काय करू? गरजवंतास अक्कल नसते. राजा, मी आंधळा आहे, या पृथ्वीवरचे व वरील गगनातील ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्य मी कधी पाहिले नाही. नद्या, झरे, उत्तुंग पर्वत, रमणीय वनराजी, चंद्रसूर्य, नील नभाचा चांदवा, त्यातील लक्षावधी लुकलुकणारे तारे-या सर्वांचे वर्णन मी कानांनी ऐकतो, पण दृष्टीने पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबी नाही. राजा मी आंधळा आहे. तू आज या विश्वाची सौंदर्यशोभा पाहण्याची संधी मला देशील काय? राजा, तू आपला एक डोळा मला दे, म्हणजे आपले दोघांचेही काम होईल.''आपल्या मनात सकाळी जे विचार आले, त्याची परिपूर्णता इतक्या लवकर होईल असे राजाला वाटले नव्हते. राजास फार आनंद झाला. अंत:करणात झालेला आनंद बाहेर व्यक्त न करता राजा म्हणाला, ''हे विप्रवरा, तुम्हाला या भिक्षागृहात मजकडे येण्यास कोणी सांगितले? मनुष्याजवळ जी अत्यंत मौल्यवान वस्तू आहे तीच तर तुम्ही मजजवळ मागत आहात; परंतु हे पाहा, ती वस्तू देणे कठीण आहे असे नाही तुम्हांस वाटत?''त्या अंध ब्राह्मणाने उत्तर दिले, ''स्वप्नात परमेश्वराने येऊन तुजकडे येण्यास मला सांगितले, म्हणून मी आलो; तू देत नसशील व तुला कष्ट वाटत असतील तर मी आल्या वाटेने परत जातो.''राजा म्हणाला, ''आपली विनंत मी आनंदाने मान्य करतो. आपण एकच डोळा मागता, परंतु मी दोन्हीही देण्यास तयार आहे.''राजा अंध ब्राह्मणास आपले सुंदर डोळे काढून देणार ही वार्ता सर्व नगरात लौकरच पसरली. राजाला या वेडया निश्चयापासून परावृत्त करावे या हेतूने सेनापती व दुसरे अधिकारी राजाकडे आले. हजारो नगरवासी तेथे जमा झाले. ते राजास म्हणाले, ''महाराज, कोणत्याही गोष्टीस मर्यादा असते. औदर्यासही काही सीमा आहे. द्रव्य, रत्ने, माणिकमोत्यांच्या राशी, भरजरी वस्त्रांनी व मौल्यवान अलंकारांनी शृंगारलेले हत्ती, वायुवेगाचे वारू, हे सर्व काही ब्राह्मणास द्या पाहिजे तर; परंतु आपण आपले हे सुंदर कमलसम डोळे देता हे काय? महाराज, हा थोडा अविचार नाही का होत?''

राजा म्हणाला, ''प्रिय प्रजाजनहो व माझ्या मंत्र्यांनो, आपण हे सर्व सांगता हे माझ्यावरील अंधप्रेमामुळे सांगता. परंतु थोडा विचार करून पाहा बरे! शरीर हे नाशवंत आहे. निश्चयासाठी, स्वत:च्या वचनासाठी जो शरीरावर पाणी सोडतो, तो इंद्रालाही पूज्य होतो. तो निश्चय पवित्र असला म्हणजे झाले. दानासारखे महापुण्य दुसरे काणते आहे? या ब्राह्मणास जे सुख आजपावेतो मिळाले नाही व जे मी आजपर्यंत उपभोगिले, मनमुराद उपभोगिले, ते सुख या ब्राह्मणास आता देण्याची सुसंधी प्राप्त झाली यात वाईट वाटण्यासारखे काही नसून उलट ही आनंदाची पर्वणी आहे. नश्वर शरीर देऊन चिरंतन टिकणारी सत्कीर्ती व पुण्य यांची जोड होत असेल तर त्यात अयथार्थ व अविचारचे असे काय आहे? दधीची ऋषीने आपली स्वत:ची हाडे विश्वाचा त्रास जावा म्हणून नाही का इंद्राच्या हवाली केली? श्रियाळाने पोटचा गोळा दिला, शिबी राजाने मांडीचे मांस हसत कापून दिले. मयूरध्वज राजाने आपले अर्धांग करवतीने करवतून दिले, जीमूतवाहन राजाने नागांचा प्रतिपाल करण्यासाठी गरुडास आपला देह दिला. थोरामोठयांची ही उदाहरणे माझ्यासमोर आहेत. शरीर हे मृण्मय आहे; मातीचे शरीर मातीत आज ना उद्या जाणार; हे कमलपुष्पांप्रमाणे असलेले डोळे आणखी थोडया दिवसांनी लोळयागोळयाप्रमाणे होतील. शरीराचे सौंदर्य व या इंद्रियांची शक्ती ही क्षणिक आहेत. यांचा मोह कशाला धरावा? धर्म हा सत्य व शाश्वत आहे. शाश्वत धर्माचा संग्रह करण्यासाठी मी अशाश्वत देऊन टाकीत आहे, यात वेडेपणा का आहे? सांगा.'' राजाचे हे उदात्त भाषण ऐकून सर्व विस्मित झाले. नारीनर रडू लागले; त्यांच्या डोळयांत अश्रू आले.राजास पुन्हा एकदा त्याचे मंत्री म्हणाले, ''राजा, तू हे सर्व कशासाठी करतोस? आपल्या जीविताकरिता, सौंदर्याकरिता, शक्तीकरता, कीर्तीकरिता? तुझा हेतू तरी काय?''राजा म्हणाला, ''ह्यांपैकी कशासाठीही नाही. हे सर्व दान करून जो एक सात्त्वि आनंद मिळतो, त्यासाठी मी हे करण्यास उद्युक्त आहे.''राजाच्या शस्त्रवैद्यास बोलविण्यात आले. या शस्त्रवैद्यांचे हात ते कर्म करण्यास धजेनात. परंतु करणार काय? मोठया कष्टाने त्याने राजाचा एक कमलनेत्र काढला. राजाने तो डोळा ब्राह्मणाच्या खाचेत बसविण्यास सांगितले. एखाद्या नीलोत्पलाप्रमाणे तो डोळा ब्राह्मणास लागला. दुस-या डोळयाने त्या याचकाकडे पाहून राजा म्हणाला, ''आपणांस माझा डोळा फारच सुंदर दिसतो; दुसरा डोळा पण तुम्ही घ्याच.'' राजाने दुसरा डोळा पण ब्राह्मणास दिला. राजाच्या खाचा रक्ताने भरून गेल्या व ब्राह्मणाच्या मुखमंडलावर ते सुंदर विशाल डोळे दोन ता-यांप्रमाणे शोभू लागले.राजाचे चर्मचक्षू गले, पण ज्ञानचक्षू त्यास मिळाले. त्या राजाच्या अंत:करणात डोकावून पाहा. परमेश्वरकृपेने त्यास दिव्यज्ञान झाले. त्याच्या अंतरी ज्ञानदिवा प्रशांतपणे प्रकाशू लागला. ज्या दृष्टीने केवळ सत्य दिसते, अशी दैवी दृष्टी देवाने त्यास दिली. त्या राजाने पुढे काही वर्षे न्यायाने व नीतीने राज्य केले आणि लोक त्याच्यापासून जगात कसे राहावे, परमेश्वर कसा मिळवावा, हे शिकते झाले.थोर लोक दुस-याचे दु:ख स्वप्राणत्यागानेही दूर करण्यास मागेपुढे पाहात नाहीत, असा हा भारतवर्ष होता. हाच मनाचा थोरपणा आज भारतवर्षात कितपत दृष्टीस पडतो? आपण पैशाने गरीब झालो आहोतच; आता मनाची श्रीमंती, हृदयाचीही श्रीमंती, ती पण आपण गमावून बसत आहो का? प्रत्येकाने विचार करून पाहावे झाले.