Sharira pramane mann dekhil suddh have books and stories free download online pdf in Marathi

शरीरा प्रमाणे मन देखील सुदृढ हवे

शरीरा प्रमाणे मन देखील सुदृढ हवे
आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. माणसाला जर सुखी जीवन जगायचे असेल तर त्याचे शरीर व मन सुदृढ असणे खूप गरजेचे आहे. जीवनातील ताणतणाव हे शारीरिक व मानसिक रोगामुळे उदभवतात. असे म्हणतात की sound mind in sound body. सुदृढ मनासाठी शरीर सुदृढ व सुदृढ शरीरासाठी सुदृढ मन याची गरज असते. आपण वेगवेगळे दिन साजरे करतो तसा आजचा जागतिक मानसिक आरोग्य दिन.
आपल्याला दीर्घकाळ जगायचे असेल तर शरीर व मन याची काळजी घेतलीच पाहिजे.
मन मुळातच चंचल असते. एका सेकंदात मन कितीतरी विचार करीत असते. रात्री आपण झोपी गेलो की मनाचे विचारचक्र सुरू होते. मन अनेक विचारांना स्पर्श करीत असते. त्याला काहीजण स्वप्न म्हणतात. सकाळी उठल्यावर मात्र मनाने रात्री काय काय पाहिले हे आपणास आठवत देखील नाही. मन विचार यांचा जवळचा संबंध आहे. जीवनात आपण सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे विचार करीत असतो. जीवनात मानसिक स्थिती म्हणजेच मनस्थिती चांगली असणे गरजेचे असते. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की आज माझी मनस्थिती ठीक नाही. म्हणजे माझ्या मनात वेगवेगळ्या विचारांचे थैमान सुरू आहे. त्यातून मार्ग सापडत नाही. मन द्विधा स्थितीत असते.
मनाला सुद्धा आरोग्याची पातळी असते. एकच विचार आपण खूप वेळ करत बसलो तर त्याचा मेंदूवर परिणाम होतो. म्हणून तर परमेश्वर आपल्या जीवनात काही सुखाचे तर काही दुःखाचे प्रसंग आणत असतो. हे चक्र सातत्याने सुरू असते. सर्वच सुखाचे किंवा सर्वच दुःखाचे प्रसंग आपल्या आयुष्यात असते तर आपणास वेड लागले असते.
जीवनात माणसाने मानसिक दृष्ट्या सक्षम असण्याची गरज आहे. त्यासाठी सातत्याने मनाची मशागत (brain washing) झाली पाहिजे. आपण चांगल्या विचारांची कास धरली पाहिजे. वाईट विचार मन लगेच स्वीकारते. चांगले विचार स्वीकारण्यास बराच काळ लागतो. चांगले वाचन, चांगले संगीत, चांगले विचार, चांगले लेखन, चांगले खाणे, चांगली संगत आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पाडते. शारीरिक समस्या आपण उपचाराने दूर करू शकतो पण मानसिक समस्येचे काय?
आजकाल मनोरुग्ण वाढताना दिसत आहेत. सिरीयल, चित्रपट, मोबाईल त्याला कारणीभूत आहेत. अगदी लहान मुलांच्यात देखील मानसिक समस्या दिसत आहेत. एका बाजूला शारीरिक इलाज करणारे डॉकटर तर दुसऱ्या बाजूला मानसिक इलाज करणारे डॉकटर आपणास भेटत आहेत.
माझे आज कशातच लक्ष लागेना, मला कसतरी होतंय, जीवनाचा मला कंटाळा आलाय, छातीत सारख धडधडतय, काही विचार मनाला सोडतच नाहीत , जीवनात खूप निराशा आली आहे अशी वक्तव्ये मानसिक आरोग्य बिघडल्याने सूचित करतात. त्यावर आपण वेळीच उपाय योजना करायला हवी. मनावर परिणाम करणारे घटक आपण टाळले पाहिजेत. त्यासाठी आनंदी जीवन हाच पर्याय होऊ शकतो. सुख साठवून ठेवावे दुःख मात्र लगेच दूर करावे हा जीवनाचा मूलमंत्र आपण स्वीकारला पाहिजे.
शारीरीक आजार बरा तरी होतो पण मानसिक आजारातून माणूस लवकर बाहेर पडत नाही. पूर्वीचे लोक खूप काळ जगत होते कारण त्यांना मानसिक विवंचना कमी होत्या. ते सतत कोणत्या ना कोणत्या कामात मग्न असायचे. आज भौतिक सुविधा वाढल्या. त्यांनी लोकांना चिंताक्रांत बनवले .
आपण समाजात जेंव्हा वावरतो त्यावेळी हसरे चेहरे आपणास फारसे दिसत नाहीत. बघेल तिकडे चिंताक्रांत चेहरे. कोण आजाराने ग्रस्त, कोण सांसारिक कटकटकटीने त्रस्त, कोण सिरीयल मधील दुःखाने त्रस्त, कोणाला आर्थिक विवंचना एक ना अनेक प्रकार आपण पाहतो. समाजात एक गट असा आहे की तो सर्वांना कायम तणावाखाली ठेवत असतो. म्हणून आपल्या व्यथा जगाला कधीही सांगू नयेत. माणसे आपल्या दुःखाची चेष्टा करतात, सुखाचा उपहास करतात हे लक्षात ठेवावे. जीवनात कोणत्याही गोष्टीचा फार विचार करू नका. आयुष्यात आनंदी रहा. गायन वादन नृत्य लेखन वाचन यासारखे छंद जोपासा.
प्रदीप जोशी मुक्त पत्रकार मोबाइल 9881157709