Nava Prayog - 6 books and stories free download online pdf in Marathi

नवा प्रयोग... - 6

नवा प्रयोग...

पांडुरंग सदाशिव साने

६. इंदूरकडे प्रस्थान

रात्री घना व त्याचे मित्र बसले होते. गिरणीच्या फाटकाजवळ कोणी आत जाऊ लागलेच तर आडवे पाडायचे. मग अंगावरून लॉरी नेवोत की काही करोत, -- असे ठरले. आपणास पकडलेच तर सर्वांनी कसे वागावे ते सांगणारे एक पत्रक घनाने तयार करून ठेवले.

“याच्या हजारो प्रती करून वाटा.” तो म्हणाला.

“सखाराम येत आहेत ना?”

“हो, त्याची बहीणही येत आहे. ती स्त्रियांत जाईल. खूप काम करील.”

“छान होईल! कधी येणार दोघे?”

“उद्या सकाळी येतील. उद्याच्या सभेत त्यांची भाषणे ठेवू. त्यांची ओळख करून देऊ. सखाराम म्हणजे देवमाणूस! कामाचाही त्याला उरक आहे. मी पकडला गेलो तर काळजी करू नका. शेवटी आपला धीर हाच आपला मार्गदर्शक. आपली हिम्मत हीच मैत्रीण.” घना गंभीरपणे बोलत होता.

“बाबू कालच गेला. शेवटच्या गाडीने गेला.” रामदास म्हणाले.

“अमरनाथ काय म्हणतो बघावे. तो दिलदार माणूस आहे.”

“आठदहा दिवस तरी संप चालेल. पुढचे कोणी सांगावे!”

“बघू या. धडपड हे कर्तव्य.”

कार्यकर्ते गेले. घना काही तरी लिहीत होता. ती का कविता होती का ते पत्र होते? अटक झालीच तर सखाराम व मालती याना ती पत्रे होती. दोन पाकिटांत ती घलून वर पत्ता लिहून ठेवली त्याने. तो अंथरुणावर पडणार इतक्यात रामदास पळत आला.

“काय रे रामदास?”

“पोलिस येत आहेत. तयारी करा. मला सांगा काम.”

“तू या खोलीतच झोप. सखाराम व मालती यांना येथेच उतरायला आणा. ही दोन पत्रे त्यांच्यासाठी आहेत. ही तुझ्या खिशात ठेव. ती पत्रके व ते कागद घेऊन जा. ते सारे ठेवून ये. मी लिहिलेल्या पत्रकांच्या रातोरात प्रती काढा. सर्वांनी शांती राखा. जा हे कागदपत्र घेऊन.”

रामदास महत्त्वाचे सारे घेऊन गेला. घना तेथे तयारीने बसला. त्याने गीताई खिशात घातली. टकळीवर तो तेथे सूत काढीत बसला. थोड्या वेळाने पोलिस व त्यांचे अधिकारी आले.

“या. आपली कालपासून वाट पहात होतो.” घना म्हणाला.

“आम्हांला शेवटपर्यंत वाटत होते की तुम्ही संप टाळाल.”

“संप टाळणे मालकांच्या हाती,--कामगारांच्या हाती नाही. आजपर्यंत बेटे लुबाडीत आले, त्यांना तुम्ही तुरुंग नाही दाखवणार! ख-या अर्थाने ते चोर आहेत.”

“परंतु आम्हांला कायद्याच्या अर्थाने जावे लागते. तुमची तयारी आहे ना? कपडे वगैरे घ्या.”

“ही वळकटी बांधलेली आहे.”

खोलीत महात्माजींची तसबीर होती. त्याने तिला प्रणाम केला व तो निघाला.

“खोलीला कुलूप लावणार का?”

“नको. आता मित्र येतील.”

इतक्यात रामदास आलाच.

“अच्छा, रामदास. शांतीने संप चालवा. चला.” तो म्हणाला.

“तुमच्या शिकवणीप्रमाणे आम्ही जाऊ.”

पोलिसांच्या पहा-यात घनश्याम गेला.

तालुका लॉकपमध्ये एका खोलीत त्याला ठेवण्यात आले.

त्याची झडती घेण्यात आली.

लॉकपच्या दाराला कुलूप लावले.

घना खोलीत फे-या घालीत होता. शरीर बंदिस्त झाले, पण मन विश्वसंचार करीतच होते. मानवी मन कोठेही स्वतंत्र राहू शकते. या जगात ख-या अर्थाने मनाचे, सदसदविवेकबुद्धीचे हेच एक स्वातंत्र्य आहे. या विश्वात एक प्रकारे आपण परवशच आहोत. शस्त्रांची कितीही प्रगती झाली तरी क्षणात मुसळधार पाऊस पडतो, भूकंप होतात, ज्वालामुखी भडकतात, उष्णतेची लाट येते, कडाक्याची थंडी पडते. अशा या जगात एकच स्वतंत्रता आहे. मी माझ्या सदसदविकबुद्धीप्रमाणे चाललो, ही खरी स्वतंत्रता.

जगातील सत्ता फाशी देतील, गोळी घालतील. ते माझे शरीर नष्ट करतील, परंतु माझ्या मनावर सत्ता कोण गाजवणार? जुलमी कायद्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही मला चिरडाल, परंतु तुमच्या अन्याय्य कायद्यांसमोर मी मान वाकवणार नाही. घना ते स्वातंत्र्य अनुभवीत होता. सखाराम व मालती यांच्या स्वागताला आपण जाऊ शकत नाही म्हणून त्याला वाईट वाटले. त्याने दोघांच्या गळ्यांत घालण्यासाठी स्वत:च्या हातच्या सुताचे हार ठेवले होते, घाईघाईतही त्याने तसे लिहून ठेवले होते.

त्याच्या खोलीत रामदास बसला होता.

‘हे हार येणा-या मित्रांना—’ असे तेथे चिठ्ठीवर होते.

दुसरे मित्र आले. ते पत्रक सायक्लोस्टाइल प्रती काढण्यासाठी ते घेऊन गेले.

रामदासने खोलीची नीट व्यवस्था लावली.

तो आता जरा झोपला. तिकडे घनाही झोपला.

परंतु मालती उठली आहे. सखाराम व ती निघणार. घनासाठी तिने खाऊ करून घेतला आहे. थोडी फळफळाव तिने घेतली आहे.

“दादा येते—” त्याच्या पाया पडून ता म्हणाली.

“वैनी आल्यावर मग जातीस?” तो म्हणाला.

“परंतु दोन दिवस थांबले. आणखी किती थांबायचे? त्यांना कदाचित तिकडे अटकही झाली असेल. वैनीला माझा नमस्कार सांग. जयंता, पारवी यांना माझा पापा. तू प्रकृतीस जप. दादा माझी चिंता नको करू. सारे सुंदर होईल. नवी दृष्टी, नवीन सृष्टी,-- आईचा आशीर्वाद आहेच.”

“सखाराम पत्र पाठवीत जा. मुलेबाळे सोडून मी काही येऊ शकणार नाही.”

तुमचे प्रेम असले म्हणजे सारे काही आहे.”

सखाराम व मालती आगगाडीत बसली. मालतीच्या जीवनात एक निराळा प्रयोग सुरू झाला. नवीन प्रयोग. सखाराम सर्व देशात भटकून आलेला, मालती कधी बाहेर न पडलेली. परंतु तिला अपार उत्साह वाटत होता.

एका स्टेशनवर रामफळे आली होती.

“भाऊ, घेतोस का? त्यांना रामाच्या फळांची भेट नेऊ.” मालती म्हणाली.

सखारामने ती रामफळे घेतली. मालतीने ती करंडीत हलकेच ठेवली.

ती बाहेर बघत होती. काय बघत होती? गाडी भरधाव जात होती. तिचे विचारही धावत होते. तिचे मन घनाकडे कधीच गेले होते. परंतु हे मातीचे शरीर,-- याला जायला वेळ लागतो.

सायंकाळ होत आली. सुंदरपूर जवळ आले. गिरणी दिसू लागली. नदीचा पूल आला. तिकडे घाट दिसत होता. एका बाजूला टेकडी होती. घाटावरील देवळे पाहून मालतीने प्रणाम केला. गाडीचा वेग कमी होत होता. मालतीच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढत होता. घनाजवळ काय बोलू. कसे त्याच्याकडे बघू, हसू की गंभीर असू,-- ती मनात ठरवीत होती. परंतु काही ठरेना. कृत्रिमता कशाला? हृदयातील भाव तोंडावर उमटू देत. सूर्य दिसल्यावर कसे फुलायचे ते फुले का ठरवीत असतात? सूर्यफूल का योजना आखते? वसंत ऋतु आला म्हणजे कसे कुऊ करायचे ते का कोकिळा ठरवते? हे सारे सहज होत असते.

हे बघा स्टेशन. अपार गर्दी आहे! गाडी थांबली.

‘कामगारांचा विजय असो. घनश्याम जिन्दाबाद, सखाराम जिन्दाबाद.’ असे जयघोष झाले. परंतु घना कोठे आहे? मालतीचे डोळे भिरीभिरी सर्वत्र बघत होते, तिला तिचे निधान आढळले नाही!

“हे घनाच्या वतीने हार. त्यांच्या हातच्या सुताचे त्यांनी मुद्दाम काढून ठेवले होते.” रामदास म्हणाला.

“ते कोठे आहेत?” मालतीने विचारले.

“सरकारचा पाहुणचार घेत आहेत.”

“त्यांना का अटक झाली?”

“हो.”

“संपाचे काय?” सखारामने विचारले.

“आजचा पहिला दिवस. काही थोडे आत गेले, परंतु तेही मागून बाहेर पडले. रात्री सभा आहे, तुमची भाषणे आहेत.” ब्रिजलाल म्हणाला.

इतक्यात गर्दीतून एक मुलगा पुढे येत होता. ‘अरे कोठे जातोस, कोण पाहिजे?’—त्याला विचारत होते, परंतु तो बोलत नव्हता.

तो आला नि सखारामच्या पाया पडला.

“कोण, रुपल्या? ऊठ, वेडा कुठला. असे पाया पडू नये. राष्ट्राने आता वाकू नये. खडे राहायला हवे. तू उंच झालास. गणा कसा आहे?” त्याने त्याला जवळ घेऊन विचारले.

“बरा आहे.”

सखाराम-मालती यांची मिरवणूक काढण्यात आली. तो निराळा अनुभव होता. जणू जबाबदारी शिरावर येऊन पडली होती. ठायी ठायी आरत्या ओवाळण्यात आल्या. कशाला हा सत्कार, आम्ही काय केले, असे उभयतांच्या मनात येई. परंतु ती घनाची तपश्चर्या होती. ती दोघे त्याची असल्यामुळे त्या तपश्चर्येचे फळ त्यांनाही मिळत होते.

घनाची खोली आली.

जयघोष झाले.

“जेऊन आता सभेला या. जा—”रामदास म्हणाला.

मंडळी पांगली. सखाराम व मालती यांनी स्नाने केली. जेवणे झाली.

थोडा वेळ मालती विसावा म्हणून पडली.

सखाराम सारी माहिती विचारीत होता.

मालतीने तो सुताचा हार हृदयाशी धरला होता. मनात म्हणाली, “त्यांनी मला हार घातला. मी त्यांना कधी घालू? उद्या भेटायला जाऊ तेव्हा घालीन. हाच हार त्यांना घालीन. दोघांसाठी एकच हार. दोघांची हृदये जोडणारा,--जीवने जोडणारा!”

तिकडे सभेची वेळ होत आली. गाणी, पोवाडे यांचा कार्यक्रम सुरू होता. सखाराम व मालती निघाली. बरोबर कामगार कार्यकर्ते होते. त्यांना बघून प्रचंड कडकडाट झाला.

तो म्हणाला :-- “हे सखाराम, सुंदरदासांच्या संस्कृतिमंदिरात होते. परंतु कामगारांच्या पगारातून तेथे पैसे घेतात असे कळताच ते तेथून निघून गेले. ते फकिरी वृत्तीचे आहेत. जनसेवेशी त्यांनी लग्न लावले आहे. देशभर हिंडून मोलाचे, अनुभवाचे ज्ञान त्यांनी मिळवले आहे. घनाभाऊंचे हे परम मित्र. आणि या मालतीताई. खूप शिकलेल्या आहेत. येथे कामगारभगिनींना धीर द्यायला त्या आल्या आहेत. सखाराम त्यांचा भाऊ. दोघांची भाषणे होतील ती ऐका.”

सखाराम उभा राहिला. तो म्हणाला, “बोलणे मला जमत नाही. काही सेवा सांगा, ती मी करीन. घनाची आज्ञा म्हणून मी आलो आहे. तुम्ही न्यायासाठी कष्ट, उपासमार भोगायला तयार आहात हे पाहून आनंद होतो. मी येथील संस्थेत होतो, तेव्हा तुमच्यात अशी जागृती नव्हती. घनाचे हे काम. त्याने संडास झाडले, रस्ते झाडले, साक्षरतेचे वर्ग चालवले. तुमची संघटना त्याने बाधली. आज तो अटकेत आहे. अन्यायी राजवटीत न्यायी माणसासाठी तुरुंग हीच जागा! घना तुरुंगात असला तरी तो तुमच्या हृदयात आहे. त्याच्या शिकवणीप्रमाणे आपण लढा चालवू. मी अधिक काय सांगणार?”

मालती उभी राहिली. प्रथम ती बावरली, घाबरली. चोहो बाजूंना माणसेच माणसे, परंतु एकाएकी तिला स्फूर्ती आली. ती म्हणाली, “बंधुभगिनींनो, मी एक सामान्य स्त्री. मी तुमची होईल ती सेवा करीन. तुमच्या चाळींतून हिंडेन. फाटके कपडे शिवून देईन. आजा-याला औषध देईन. तुमच्याबरोबर मी जगेन,-- तुमच्याबरोबर मरेन. तुम्ही संपावर आहात. तुम्हांला मदत लागेल. तुम्ही पाच हजारांचा फंड जमवाल. पार्वतीने हातातील अंगठी दिल्याचे ऐकले. मी गरीब आहे. परंतु हातांत या सोन्याच्या बांगड्या आहेत. त्या मी तुमच्या फंडाला देते. तन-मन-धन देऊन सेवा करावी असे म्हणतात. तुम्हांला यश मिळो!”

तिच्या त्या बांगड्यांचा लिलाव करण्यात आला. गावातील एका श्रीमंत तरुणाने त्या विकत घेतल्या. पाचशे रुपये त्याने दिले.

सभेत इतरांनी आणखी मदत दिली.

मोठ्या उत्साहात सभा संपली.

मालकाचे हस्तक कामगारांत फूट पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. खेड्यापाड्यांतून बेकार लोकांना आमिषे दाखवून त्यांची भरती करण्याची पराकाष्ठा करण्यात येत होती. परंतु तादृश फळ दिसेना. मालती नि सखाराम चाळीचाळींतून हिंडत. कोणाला काय पाहिजे याची चैकशी करीत.

ती पाहा एक मुलगी. तिचे पोलके फाटले आहे. मालती थांबली.

“थांब, तुझे पोलके शिवून देते.” ती म्हणाली आणि खिशातून तिने सुईदोरा काढला. ते पोलके शिवून तिने दिले. तिच्याभोवती बायका गोळा झाल्या. तिच्याजवळ सुखदु:खे सांगू लागल्या. मालतीला त्या बारा क्षारांची माहिती होती. होमिओपाथीचा घरी बसल्याबसल्या तिने अभ्यात केला होता. ती म्हणाली, “मी माझी पेटी उद्या घेऊन येईन. या मुलांना औषध देईन. गोड औषध.”

तिकडे सखाराम केरसुणी घेऊन झाडू लागला. चाळीतील मुलेही मदतीला आली.

“तुम्ही घनाभाऊंचे मित्र शोभता!” म्हातारा मल्हारी म्हणाला.

“घनाभाऊने येथले संडास साफ केले होते. आम्ही नुसते पाहात होतो.” मार्तमड म्हणाला.

“त्यांच्या खटल्याचे काय होणार?” हरीने विचारले.

“मी आज त्यांना भेटायला जाणार आहे.” सखाराम म्हणाला.

मालती नि सखाराम आतल्या खोलीत आली. तेथे घनाचा चरखा होता. ती सूत कातत बसली. परंतु स्वयंपाक करायला हवा होता. घना हातानेच करून जेवत असे. तिकडे लॉकपमध्ये खाणावळीतील डबा त्याला पाठवण्यात येत असे.

“मी करून त्यांना पाठवीन.” मालती म्हणाली.

“तुम्हांला कशाला त्रास?” रामदास म्हणाला.

“तो त्रास नसून आनंद आहे.” मालती म्हणाली.


“आम्ही तर तुम्हा दोघांची खाणावळीत व्यवस्था केली होती.” तो म्हणाला.

“खाणावळीत नको. वेळ आहे. येथे सारे सामानही आहे. भाऊ भाजी वगैरे घेऊन येईल. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. कंटाळाच आला तर खाणावळीत जेवून येऊ.” ती म्हणाली.

रामदास गेला. मालतीने शेगडी पेटवली. सखाराम काहीतरी लिहीत होता. थोड्या वेळाने रामदासने भाजी आणून दिली. मालतीने भाकरी-भाजी केली. सुटसुटीत स्वयंपाक. पसारा त्या दोघांना आवडत नसे. तिने घनासाठी डबा भरला. घरून आणलेले पदार्थही दिले. करंडीही दिली. रामदास ते सारे घेऊन गेला.

“चिठ्ठी त्यांना द्या.”सखाराम म्हणाला.

रामदास लॉकपमध्ये असलेल्या घनाभाऊंना डबा देण्यासाठी गेला. घना टकळीवर कातीत बसला होता. रामदासला पाहून तो आनंदला. शिपायाने कोठडीचे दार उघडले. तो डबा देण्यात, आला. फळांची करंडीही.

“ही फळे कशाला?” त्याने विचारले.

“मालतीताईंनी ती बरोबर आणली होती. तुम्हांला देण्यासाठी म्हणून.” रामदासने सांगितले.

घनाने जेवण केले, आणि त्याने ते रामफळ फोडले. शिपायाला व रामदासलाही त्याने दिले.

“सखारामभाऊंनी ही चिठ्ठी दिली आहे.” रामदास म्हणाला.

“पोलिसदादांना विचारून दे.” घना म्हणाला.

“द्या. त्यात दुसरे काय असणार? तुम्ही साधी सरळ माणसे. बाँब फेकणारी थोडीच आहात?” शिपाईदादा म्हणाला.

सखारामची चिठ्ठी देण्यात आली. विशेष काही तिच्यात नव्हते. परिस्थितीची कल्पना देण्यात आली होती. रामदासने सभेचा सारा वृत्तान्त निवेदला. त्या बांगड्यांची हकीगत त्याने सांगितली!

“ ‘तुमच्यात मला सेवा करायची आहे. हातांत सोन्याच्या बांगड्या घालून ती कशी करता येईल?’ असे मालतीबाई म्हणाल्या. काही कामगार बायका तेव्हा रडल्या. एकंदर परिणाम फार छान झाला. परंतु मालक फूट पाडू पाहात आहेत. कामगारांना पैशाने विकत घेऊ पाहात आहेत. बघावे काय होते ते. आता तर नुसता आरंभ आहे. सरकार लक्ष घालील असे वाटत नाही. युनियनचे तीन-तेरा वाजावे असेच सरकारचे व मालकाचे ठरलेले दिसत आहे!” रामदास म्हणाला.

“इंदूरहून बाबू आला का?”

“नाही आला.”

“तुमच्या खटल्याचे काय?”

“हा मॅजिस्ट्रेट म्हणे बदलत आहे, आता दुसरा येईल तेव्हाच खटला सुरू होईल.”

रामदास निघून गेला. घना खोलीत शतपावली करीत होता. करंडीतील बोरे त्याने खाल्ली. मनात अनेक विचार चालले होते. संपाचे विचार होतेच; परंतु मधून मालतीचीही मूर्ती त्याच्या डोळ्यांसमोर येई. इतक्यात त्याच्या मनात एक कल्पना आली. करंडीत चिठ्ठी वगैरे तर नसेल ना? त्याने करंडीतील सारी फळे काढली. परंतु चिठ्ठी नव्हती! त्याला लाज वाटली. अशी चोरून चिठ्ठी सखारामची बहीण देणार तरी कशी? आपणच चुकलो. मनुष्य स्वार्थी होताच निराळ्या दृष्टीने विचार करू लागतो. त्याचा ध्येयवाद थोडा तरी खाली येतो.

तो चटईवर पडला. त्याचा डोळा लागला.

तिसरे प्रहरी सखाराम व मालती भेटायला आली होती.

“हा हार तुमच्या गळ्यात घालते. मान करा पुढे.” ती म्हणाली.

“हे का तुमच्या हातचे सूत?” त्याने विचारले. “हे माझ्या सुतासारखे आहे.” घना म्हणाला.

“तुमचे हात नि माझे हात का निराळे आहेत? तुम्ही आमच्यासाठी पाठवलेला हा हार मी तुमच्यासाठी आणलेला आहे. दोघांना एकच हार!”

“तुम्ही म्हणे काल बांगड्या दिल्यात?”

“तुम्ही तर सारे जीवन दिले आहे.”

“सखाराम, तू आलास म्हणून माझी चिंता दूर झाली.”

“तुम्ही भाऊला ‘तू’ म्हणता व मला ‘तुम्ही’ म्हणता!”

“स्त्रियांचा मान मोठा.”

“आपल्या देशात मोठी नावे देऊन तुच्छ लेखण्याची वृत्ती आहे. आचा-याला महाराज म्हणतात! भंग्याला मेहतर म्हणतात! मेहतर म्हणजे महत्तर-फार मोठा. होय ना रे भाऊ?”

“होय. मेहतर महाराजच.” सखाराम हसून म्हणाला.

“संपाविषयी काय वाटते?” घनाने विचारले.

“अजून तर आरंभ आहे. दहावास दवस गेल्यावर खरी कसोटी. हा पगार हातात आहे म्हणून धीर आहे. महिनाभर समजा संप चालला तर पुढे काय? जवळ पैसा नसेल. दुकानदार उधार देणार नाहीत.”

“दुकानदार देतील उधार. दुकाने फुटली जातील – अशी त्यांना भीती वाटेल.”

“परंतु एकंदरीत सत्त्वपरीक्षा पुढेच आहे. बायका किती टिकाव धरतील ते खरे. मुलेबाळे असतात. त्यांच्यावर घरची जबाबदारी. ओलासुका तुकडा दुपारच्या वेळेला देता आला पाहिजे? बघू या. तुझ्या खटस्याचे काय?”

“दुसरा मॅजिस्ट्रेट येत आहे तोवर नाही, असे कळते.”

“मला तर कळले की हाच मॅजिस्ट्रेट तडकाफडकी निकाल देणार आहे. मालकाने त्याचा खिसा चांगलाच गरम केला आहे असे कळते!”

“अपील करता येईल.” मालती म्हणाली.

“परंतु दिवस मोडतात. इकडे संप चालला आहे.” सखाराम गंभीरपणे म्हणाला.

“देवाची इच्छा, तसे होईल.” ती म्हणाली.

“मानवाची इच्छा म्हणू.” घना म्हणाला.

“परंतु तो देव का तुझ्या-माझ्यात, या सर्वांत नाही? त्या परब्रह्माच्या विकासातील एक टप्पा म्हणजे मानव! कधी काळी ब्रह्म पूर्ण होते असे नव्हे. ती एक कल्पना आहे. तुमच्याआमच्या द्वारा ती मूर्त होत आहे. विश्वाचे लक्ष कोटी पाकळ्यांचे कमळ एकेक पाकळी उघडीत आहे.”

“तुम्ही सुरेख बोलता.” ती म्हणाली.

“तुम्ही सुरेख काम करता.” तो म्हणाला.

“आणि तुम्ही नाही वाटते करीत? भाऊ येथून घरी आला, परंतु तुम्ही येथे सेवा आरंभलीत.”

“मला कर्म म्हणजे संकुचितपणा वाटतो. कर्म म्हणजे अनंत विचारांतून खाली येणे. कर्म म्हणजे बंधन, मर्यादा. मला विचाराच्या स्वच्छ आकाशात रमणे आवडते. मी या पसा-यात गुदमरतो.” सखाराम म्हणाला.

“परंतु विचारावर जगता येत नाही.” घना हसून म्हणाला.

“मी झाडाचा पाला खाईन. झ-याचे पाणी पिईन. संस्कृती म्हणजे जीवनात पाचपन्नास पदार्थ असणे असे तुम्हांला वाटते; मला तसे वाटत नाही. सिनेमा, रेडिओ, चॉकलेट, म्हणजे का संस्कृती? शतबंधनातून तुम्ही मुक्त किती झालात, यावर तुमची संस्कृती अवलंबून. रेडिओची सवय झालेली मनुष्य रेडिओ बिघडला तर बेचैन होतो. त्याचा आनंद त्या वस्तूवर अवलंबून. शेकडो वस्तूंचे तुम्ही गुलाम! तुम्हांला स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही. सद-याला गुंडी नसेल तर बाहेर जायची लाज वाटते. ती गुंडी म्हणजे का माझ्या जीवनाची उंची? विवेकानंद कधी बंडी घालीत, कधी साहेबी पोशाख करीत. म्हणत कपड्यांची गुलामगिरी नको. मी वाटेल तो पोशाख करीन, अमुकच करा हे बंधन कशाला? सुख म्हणजे वस्तूंची यादी नव्हे. सुख विवेकाने प्राप्त होत असते.”

सखारामच्या बोलण्याकडे दोघे लक्षपूर्वक ध्यान देत होती. तो जणू संस्फूर्त होऊन बोलत होता.

“तुम्ही वस्तूंचे पसारे वाढवीत आहात. परंतु त्यामुले मने का मोठी झाली आहेत? उलट अधिकच संकुचित झालेली दिसतात.” तो पुन्हा म्हणाला.

“जाऊ देत भाऊ या गोष्टी.” मालती म्हणाली.

“सखाराम, जीवनाला आवश्यक वस्तू तरी हव्यात ना? अन्न, वस्त्र, घर – या तरी हव्यात ना? मनाचा विकास उपाशीपोटी तर नाही ना होत? विश्वसंगीत ऐकायलाही माझे पोट भरलेले असायला हवे. महात्माजी म्हणाले होते, पक्षी सकाळी उंच भरारी घेतो,-- परंतु आदलेया दुवशी पोटभर जेवलेला असतो. खरे ना?”

“माझे एवढेच म्हणणे की, खरे समाधान विवेकानेच मिळते. अमेरिकेत इतकी सुखे आहेत, परंतु आत्महत्याही तेथे अधिक! तेथे का आंतरिक समाधान आहे? हे पाहिजे—ते पाहिजे. धवाधाव. मनूने फार प्राचीन काळी सुखदु:खाची मार्मिक व्याख्या करून ठेवली आहे : ‘तत् यत् परवशं दु:खं यत् यत् आत्मवशं सुखम्!’ – जे जे दुस-यावर अवलंबून ते दु:ख, जे स्वत:वर अवलंबून ते सुख. गांधीजी हीच गोष्ट सांगत होते. चरखा खेड्यात दुरुस्त होईल. तो अमेरिकेतून कधी येतो याची वाट पाहायला नको. अन्न आणि वस्त्र या ज्या जीवनाच्या मुख्य गरजा, त्या तेथल्या तेथे भागवायला आपण शिकले पाहिजे. म्हणजे पुष्कळसे स्वातंत्र्य अनुभवता येईल.” सखाराम म्हणाला.

शिपायाने ‘आता पुरे’ म्हणून सुतवले. सखाराम व मालती जायला निघाली.

“भाजीभाकरी आवडली का?” तिने विचारले.

“माझ्या हातची खाल तेव्हा कोण अधिक चांगला स्वयंपाक करतो ते कळेल.” तो हसून म्हणाला.

“आज परतंत्र आहात. खा माझ्या हातचे.”

“या पारतंत्र्यातही एक प्रकारची स्वतंत्रता, म्हणजे मनोमय आनंद उपभोगीत आहे.”

“येतो घना.” सखाराम म्हणाला.

“येते घना.” मालती म्हणाली.

आज घनाची खटला होता. कोर्टात चिक्कार गर्दी होती. मॅजिस्ट्रेट ताबडतोब निकाल देणार, अशी अफवा होती. मालती नि सखाराम तेथे होती. रामदास, ब्रिजलाल, पंढरी, मार्तंड, गंभीर – सारे होते. अत्याचारास उत्तेजन देणे, धर्मिक भावना दुखवणे, इत्यादी आरोप त्याच्यावर होते. घनाच्या भाषणांतील काही उतारे वाचून दाखवण्यात आले.

सरकारी वकिलांचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले, “अहो, अशी भाषणे म्हणजे अत्याचारास उत्तेजन होय. तुम्ही मालकालाच चोर म्हणता. मग दुसरा कोणी म्हणेल, जर हे चोर असतील तर बदला त्यांना. आपल्या शब्दांचे दूरवरचे परिणाम होत असतात. मालक म्हणजे समाजाला जडलेला महारोग, मालक म्हणजे विषारी साप, -- अशा उपमा तुमच्या भाषणात आहेत. तुम्ही साप म्हटलेत तर दुसरा सापाला ठेचायला धावेल. बिचारा तो फाशी जाईल, परंतु त्याच्या मनात हे भरवणार कोण? तुम्ही सारे शांती बिघडवणारे.”

वकिलाचे केवढे थोरले भाषण झाले. ठरीव पद्धतीप्रमाणे साक्षीपुरावे झाले.

घनाने वकिल वगैरे दिला नव्हता. त्याने स्वत:च बाजू मांडली. तो म्हणाला, “मी विषारी साप म्हटले, परंतु पुढच्याच वाक्यात सापाचे विषारी दात काढले म्हणजे तो निरुपद्रवी खेळणे होईल, असे म्हटले. मालकाच्या हातातील संपत्तीची सत्ता काढून घेणे हा त्याला उपाय. त्यात मी कोणती वाईट गोष्ट सांगितली? हे भांडवलदार, कारखानदार, त्यांना माणुसकी नाही. केवळ नफा म्हणजे त्यांचे दैवत. समाजद्रोहाचे पाप ते अहोरात्र करीत आहेत. त्याना तुरुंगात का बसवीत नाही? समाजाच्या अशांतीला खरोखर ते कारण आहेत. आज साखर नाही, आज रॉकेल नाही, आज आगपेटी नाही, -- हा चावटपणा कोण करतो? या दगलबाजांचे पारिपत्य सरकार करीत आहे का? ईश्वरासमोर कोण दोषी ठरेल, कोण अपलाधी ठरेल? म्हणे मी धार्मिक भावना दुखावतो. धर्माचा आत्मा म्हणजे सर्वांना सुखी करणे. तो खरा धर्म समाजात यावा म्हणून आमची धडपड. तर आम्हीच धर्मघातकी म्हणून संबोधण्यात येते! उलटा न्याय!”

घनाचे भाषण दोन तास झाले. जणू नवधर्माचे ते निरूपण होते. मानवतेवरचे ते प्रबोधक प्रवचन होते. जणू कोर्टात सभाच भरली होती.

मॅजिस्ट्रेट म्हणाले, “ताबडतोब निकाल द्यायचे मी ठरवले आहे. मी आरोपीला निर्दोषी म्हणून सोडून देत आहे! (जयघोष होतात. लोकांना आश्चर्य वाटते!) गावात पुष्कळ कंड्या उठल्या आहेत. मी पैसे खाल्ले आहेत वगैरे. काही माणसे पैरे देऊन मला विकत घ्यायला आली होती. परंतु मी माझा आत्मा मुक्त ठेवला. येथून बदली होता होता होतून काही वाईट घडू नये म्हणून मला इच्छा होती. पोलिसांनी केवळ भ्रष्ट होऊन हा खटला भरला आसावा, असे वाटते. त्यांनाही पैसे चोरले गेले होते की काय, कळत नाही. परंतु त्यांनी यापुढे तरी सत्याला धरून चालावे. आपणच असत्याने जाऊ लागलो तर कारभारच आटोपला. घनश्याम, तुमची व्याख्याने मी ऐकली आहेत. पुन:पुन्हा शांतीचा संदेश तुम्ही दिला आहे. खरा धर्म, खरी संस्कृती यांवरचे तुमचे विचार ऐकले आहेत. समाजाला त्यामुळे धोका येईल असे वाटत नाही. खोट्या धर्मावर कोरडे सर्वच संतांनी ओढले आहेत; धर्माची भांडणे भांडणारांना त्यांनी कुत्रे म्हटले आहे. असो. मी तुम्हांला निर्दोषी म्हणून सोडून देत आहे!”

“मी आपला आभारी आहे.” घना म्हणाला.

आणि घनाची मिरवणूक काढण्यात आली. अशी मिरवणूक सुंदरपुरात कधी निघली नव्हती. घनाला ठायी ठायी ओवाळण्यात येत होते. मिरवणुकीचे रूपान्तर शेवटी विराट सभेत झाले. मालतीने अभिनंदनपर सुंदर भाषण केले.

ती म्हणाली : “तुमचे भाग्य की तुमचा भाग्यविधाता तुमच्यात आला. कावळे राजहंसाला वेढू पाहात होते, -- परंतु कावळ्यांचा डाव उधड झाला. न्यायाधीशांनी न्यायाची प्रतिष्ठा सांभाळली. आता तुम्ही तुमच्या संकल्पाची प्रतिष्ठा सांभाळा. संप अखेरपावेतो चालवा. तुमच्या वतीने घनश्यामांना मी हार अर्पण करते.”

तिने त्याच्या गळ्यात फुलांचा घवघवीत हार घातला.

कामगारांचीही भाषणे झाली.

घनाने थोडक्यात उत्तर दिले. मोठ्या उत्साहात सभा संपली. संपाला जरा जोर चढला.

इंदूरहून अमरनाथची चिठ्ठी घेऊन बापू आला. घनाने ते पत्र वाचले. त्याचं तोंड फुलले. डोळे आशेने चमकले. मालती त्याच्या मुखचंद्राकडे पाहात होती.

“एकदम कसला आनंद झाला?” तिने विचारले.

“ध्येयाचा आनंद.” तो म्हणाला.

त्याने नवीन वसाहतीची योजना सखाराम व मालती यांना समजावून दिली. ते पत्र वाचून दाखवले.

“घना, खरोखरच आपण असे काही केले तर छान होईल. सर्व धर्मांचे लोक एकत्र सहकारी जीवन जगत आहेत. नवसंस्कृती फुलवत आहेत.” सखाराम म्हणाला.

“सखाराम, तू, मालती व काही कामगार तिकडे पुढे जाल? तेथे आरंभ कराल? संप अरेशी झाला तर येथील यूनियनचे काम दुस-यावर सोपवून मी मोकळा होईन व त्या नव-प्रयोगाला येऊन मिळेन. तुम्ही पुढे जा. पाया खणा. जमिनीचे निरीक्षण-परीक्षण करा. तेथे नदी आहे. तिचे पाणी कसे उपयोगिता येईल त्याचा विचार करा. खरेच, जा तुम्ही.”

“तुम्हांला सोडून?” मालतीने विचारले.

“माझा प्रयोग तुमच्या हातात म्हणजे माझा आत्मा तुमच्या हातात, असे नाही का? मी मनाने तुमच्याजवळ असेन. तेथे जाऊन भूमातेची सेवा सुरू करा.”

“म्हणजे काय होईल?”

“ती प्रसन्न होईल व आशीर्वाद देईल.”

“कोणता आशीर्वाद?”

“सुखी व्हा, -- असा आशीर्वाद.”

आणि खरोखरच एके दिवशी सखाराम, मालती, बाबू, बंड्या, बन्या, श्रीपती वगैरे लोक पुढे निघून गेले. पाहाणी करण्यासाठी म्हणून गेले. सखाराम, मालती, बाबू, ही तिघे तर तेथे पाय रोवण्यासाठी म्हणूनच गेली.

इकडे संप चालला होता, तिकडे नवा प्रयोग सुरू होत होता.

भारताच्या धडपडणा-या जीवांनो, चालू द्यात तुमचे सत्य-प्रयोग!

***

Share

NEW REALESED