Ti Ek Shaapita - 6 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 6

ती एक शापिता!

(६)

"चल रे, अशोक खेळायला जाऊ... कुर्रर्र!... "असे म्हणत निलेशच्या पत्नीने सुबोध-सुहासिनीच्या मुलाचे नाव ठेवले. एक छोटासा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आलेल्या वाड्यातील पाच-सहा बायका फराळ करून गेल्याचे पाहून निलेशची पत्नी म्हणाली,

"वहिनी, आमचे हे म्हणत होते की.."

"काय म्हणत होते?" सुहासिनीने विचारले.

"हेच की.. भाऊजीचे आणि तुमचे..."

"पटत नाही. हेच ना?"

"होय तेच. पण वहिनी, बायांनी असे आकांडतांडव करू नाही हो."

"मग काय करावे?"

"गुपचूप राहावे. घटकाभर मिळणाऱ्या सुखातच सुख मानावे. त्यांना घडी-घडी टोचू नये. अहो, दुखावलेला आणि त्यातल्या त्यात 'त्या' गोष्टीसाठी दुखावणारा माणूस जीवनातून उठतो. एखादा माणूस गळफास घ्यायला मागेपुढे पाहत नाही. काही माणसे तर..."

"काय करतात?"

"काही पण करतात. म्हणजे बायकोला जाच करतात, मारहाण करतात. बाईचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून त्यांना चटकेही देतात."

"पण मी तसे काहीही सहन करणार नाही, यांना तसे करू देणार नाही..." सुहासिनी ठामपणे सांगत असताना बाहेरून आलेल्या निलेश म्हणाला,

"अग, चल. झाले का नाही?" निलेशच्या पाठोपाठ सुबोधही आत आला.

"नाही झाले. तुमचे जेवण झाले म्हणजे झाले का? आत्ता तर बायका गेल्या. आता आम्ही जेवायला बसणार आहोत."

"तुमचे जेवण म्हणजे तासाभराची निश्चिंती."

"असू देत. तुम्ही घंटा-घंटा बाहेर फिरता. आम्ही काही म्हणतो? मग आमच्या जेवणावर तुमचा डोळा का? जा अजून थोडे फिरून या. भाच्याचे बारसं निवांत जेवणार आहे."

"बरे बाबा. सुबोध, येतोस का रे?"

"नको. थकलोय. तू ये..." असे म्हणून सुबोध आतल्या खोलीत गेला आणि निलेश बाहेर गेला...

खोलीतल्या पलंगावर बसलेल्या सुबोधचे लक्ष बाहेरच्या खोलीत बसलेल्या सुहासिनीकडे गेले. बाळंतपणानंतर सुहासिनीचे सौंदर्य अजून जास्त बहरले होते. झाड सर्वांगाने बहरून यावे, त्याचा टवटवीतपणा सर्वांच्या नजरेत भरावा तसे सुहासिनीचे नवे रुप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते, खिळवून ठेवत होते. पलंगावर पडलेल्या सुबोधला निलेशच्या पत्नीचं काही वेळापूर्वीचं बोलणं आठवलं...

'ती भाच्याचे बारसे म्हणत होती पण भाचा नाही तर तिच्या सवतीचे पोरं आहे हे तिला बिचारीला काय माहिती? माझ्या मुलाची ती आत्या नाही तर सावत्र आई आहे हे तिला समजले तर तिच्या आनंदावर पाणी पडेल. कदाचित तिला निलेश-सुहाचे संबंध माहितही असतील पण ती शांत असेल कारण अशा बायका नवऱ्याचे शंभर अपराध पोटात घालतात. पतीच्या नाही तर सवतीच्याही पुढे- पुढे करतात. पतीच्या आणि सवतीच्या पहिल्या रात्री स्वतःच्या हाताने सवतीला सजवून पतीच्या खोलीत पलंगावर नेऊन बसवतील. निलेशची पत्नी खेड्यातील आहे, निरक्षर आहे. ती याच वळणाची असेल.. पतीचे सारे काही सहन करणारी!'...

सुहासिनीचा गर्भ त्याचा नाही, दुसऱ्याच कुणाचा आहे असे मानणारा सुबोध उघडपणे काही करू शकला नाही, तसे बोलू शकला नाही. मनाने त्याने सारे स्वीकारले. सुहासिनीलाही तो काही बोलला नाही. तसा त्याने तिच्याकडे आनंदही व्यक्त केला की, तिचे अभिनंदनही केले नाही. सुहासिनीची आई तिच्या मोठ्या मुलीकडे राहायला गेली होती कारण तिच्या त्या मुलीलाही दिवस गेले होते. डॉक्टरांनी तिला सक्तीचा आराम करायला सांगितले होते. त्यामुळे आईला तिकडेच राहणे आवश्यक होते.

घरात सुबोध-सुहासिनी दोघेच असल्यामुळे तिचे डोहाळे कोण पुरविणार? सुबोधही 'काही आणू का? काही खावेसे वाटते काय?' असे विचारायचा नाही. निलेशची पत्नी मात्र अधूनमधून एखादा पदार्थ पाठवत असे. येऊन चौकशी करीत असे. सुहासिनीचा गर्भ जसजसा वाढत होता, तसतसं तिच्या सौंदर्याचे तेज वाढत होते. दवाखान्यात ये-जा करताना अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असत. निलेशने दम दिल्यापासून गल्लीतले मवाली थंडावले होते. गल्लीतल्या स्त्रियांमध्ये मात्र तिचं गर्भारपण चर्चेत होते. कर्णोपकर्णी ते सुहासिनीच्या कानावर येत होते परंतु शब्दाने शब्द वाढायला नको म्हणून ती शांत होती. त्यामुळे कदाचित त्या चर्चाही थांबल्या...

अशोक दोन महिन्यांचा झाला. सुहासिनी नोकरीवर हजर झाली. अशोकला सांभाळण्याची जबाबदारी निलेशच्या पत्नीने आनंदाने स्वीकारली. सुबोधने मोटारसायकल घेतली होती. त्यामुळे दोघे कार्यालयात एकत्र जाताना अशोकला निलेशकडे सोडून जात आणि परत येताना सोबत घेऊन येत. अशोक चार महिन्यांचा होत नाही तोच सुबोध-सुहासिनीचे अर्धवट शारीरिक संबंध सुरू झाले. कितीही प्रयत्न केले तरी कालावधी वाढत नव्हता उलट अशोकमुळे त्या संबंधातही बाधा येऊ लागली. अशोकच्या हालचालीमुळे, मध्येच रडण्यामुळे सुहासिनीचे लक्ष अशोककडे जायचे आणि मग सुबोधला बाजूला व्हावे लागे. त्यांचे अल्पप्रमाणात होणारे समाधानही होत नसे. दोघेही शेजारी शेजारी तळमळत असत. दोघांची तळमळ वेगळी असली तरीही कारण एकच होते, शारीरिक अतृप्ती.. असमाधान!

त्यासकाळी सुबोधला जाग आली तीच मुळी असह्य अशा थंडीने! हिवाळा संपत आला होता. थंडीही विशेष नव्हती परंतु सुबोधला मात्र बरीच थंडी जाणवू लागली. तो थंडीने कुडकुडत होता. त्याच्या कण्हण्याच्या आवाजामुळे सुहासिनीला जाग आली. तिने त्याच्या कपाळावर, मानेवर, पोटावर हात फिरवला आणि त्याला सडकून ताप भरल्याचे तिच्या लक्षात आले. तिने गडबडीत जाड पांघरूण त्याच्या अंगावर घातले. थंडीची तीव्रता थोडी कमी होताच तिने विचारलं,

"काय झाले? काय दुखतंय?"

सुबोध काही सांगण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. बाहेर उजाडलेले पाहून ती खोलीबाहेर आली आणि शेजारच्या मुलाला तिने डॉक्टरांच्या घरी पाठवले.

काही वेळातच डॉक्टर आले. त्यांनी सुबोधला तपासले आणि म्हणाले,

"घाबरण्याचे कारण नाही. बहुतेक मलेरिया आहे. मी औषधी देतो. तीन -चार दिवसात आराम पडेल. इंजेक्शन देतोय..." असे म्हणत त्यांनी औषधी लिहून दिली. इंजेक्शन देऊन डॉक्टर निघून गेले. सुहासिनीने त्याच मुलाला सांगून औषधी आणून घेतली. तिचे सारे आटोपेपर्यंत ताप बराच उतरल्याचं पाहून ती म्हणाली,

"मी निलेशकडे रजा देऊन येते."

"नको. तू जा. माझीच रजा दे. मी आराम करतो." क्षीण आवाजात तो म्हणाला. त्याच्या दुपारच्या गोळ्या, खाण्याचे पदार्थ आणि पाणी त्याच्याजवळ ठेवून ती अशोकला घेऊन निघाली. ती गेल्यानंतर काही वेळाने ताप बराच कमी झाला. त्याला बरे वाटत होते. एकट्याला करमेनासे झाले. रिकामे मन, एकांत पाहून त्याला विचारांनी गाठले,

'खरेच उपाशी, अतृप्त सुहासिनीने कुणाला जवळ केले तर? सुहासिनी तरुण आहे, सुंदर आहे, कमावती आहे. तिच्या सौंदर्यावर भाळून कुणीही तिचं आमंत्रण स्वीकारेल किंवा कुणीही तिला त्या संबंधासाठी निमंत्रित करेल तेव्हा सुहासिनी ते स्वीकारणार नाही कशावरून? इतर कुणी कशाला? आपल्या कार्यालयात का तशा भ्रमरांची कमी आहे? काही महिन्यांपासून सुहासिनीच्या साहेबांच्या दालनातील फेऱ्या वाढलेल्याच आहेत. त्यांचं हसणं-खिदळणं बाहेर ऐकू येते. ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. साऱ्यांच्याच नजरा माझ्यावर रोखल्या जातात त्यावेळी माझी नजर खाली वळते. मी त्यांच्या नजरेला नजर नाही मिळवू शकत. आज तर मी सुट्टीवर आहे. त्यांना रान मोकळेच आहे. माझ्या अनुपस्थित त्यांच्या प्रणयचेष्टांना ऊत येईल. कदाचित काही तरी निमित्ताने ते बाहेरही जातील. साहेब इथे एकटेच राहतात. ते तिला घरीही नेतील. नाही... नाही.. इतरांचे सोडा पण शिपाई असूनही किसनही काही कमी नाही. तोही सुहासिनीवर मरतोय हे लक्षात आलंय माझ्या. त्यानेच सांगितलेल्या एका घटनेनुसार त्याचा कुणीतरी एक परिचित इसम असा माझ्या सारखाच अधू आहे. तो पत्नीला समाधान देऊ शकत नाही. त्याने म्हणे एक अफलातून मार्ग शोधलाय. स्वतःकडून जे सुख बायकोला मिळत नाही तेच सुख तो बायकोला इतरांकडून मिळवून देतो म्हणे. हे जर खरे असेल तर केवढा क्रांतिकारी विचार आहे त्या माणसाचा! स्वतःच्या बायकोच्या खोलीत त्रयस्थाला सोडून आपण बाहेर बसून राहणे म्हणजे किती हिंमत लागते, केवढा अपमान गिळून शांत बसावे लागते. काय वाटत असेल त्या माणसाला! सुरुवातीला एक-दोन वेळा त्याला खूप वाईट वाटले असेल. कुठेतरी पळून जावे, जीव द्यावा अशीही भावना जागृत झाली असेल परंतु कालांतराने त्याला तशा प्रसंगाची सवय झाली असेल. निर्लज्जपणे, निर्ढावल्यापणे, सराईतपणे तो सारे सहन करीत असेल. पण हे खरे कशावरून? असे काही सांगून किसन काय सुचवू पाहतोय? काय म्हणायचे त्याला? तो कदाचित हे तर सुचवत नसेल की, त्याने सांगितलेली मनघडंत कहाणी ऐकून मी .. मी.. पुढाकार घेऊन सुहासिनीच्या खोलीत कुणाला... कुणाला कशाला किसनलाच पाठवावे म्हणून. मायगॉड! कशी माणसं अवतीभवती आहेत ना? कशी स्वतःला वाचवू शकेल सुहासिनी? किसनचे खरे असेल तर? कुठे तरी वाचलंय की, अनेक अतृप्त इसमांना कोणती तरी विकृती जडलेली असते. कुणी पत्नीला अर्वाच्य शिव्या देतो, कुणी पत्नीला तशा शिव्या द्यायला लावतो, कुणी पत्नीला चटके देतो आणि मग म्हणे त्याचं पौरूष जागे होते. कदाचित त्या इसमाचे पौरूष बायकोला दुसऱ्याच्या कवेत पाहिल्यानंतर जागे होत असेल. सुहासिनीला तिचे हक्काचे सुख मिळावे, तिच्यासह माझेही समाधान व्हावे, माझं पंगुत्व क्षणापुरते का होईना लोप पावावे म्हणून आम्ही दोघांनी का कमी प्रयत्न केले? स्वतःचे समाधान व्हावे या आशेपोटी का होईना सुहासिनीनेही भरपूर साथ दिली परंतु आम्हाला यश असे आलेच नाही. आता.. आता शेवटचा उपाय करावा? कारण माझ्या लैंगिकतेला पूर्णत्व लाभणे शक्यच नाही. मग सुहासिनीने तरी आजन्म का तडफडत राहावे? तिने तिचा मार्ग नक्कीच शोधलाय. तो तिचा साथीदार कुणीही असला तरीही तिच्या मनाची काय अवस्था असेल? चोरून मिळणारे सुख का तो मोद, तो आनंद देणार आहे? ते संबंध जर जगजाहीर झाले तर माझी काय अवस्था होईल?

उद्या सुहासिनी अशाच एखाद्या चक्रव्यूहात फसली तर? ती त्या चक्रव्यूहात तडफडत असताना मी चक्रव्यूहाच्या बाहेर तडफडणार. परंतु मी तसे होऊ देणार नाही. माझ्या समाधानाचा प्रश्नच नाही आणि विचारही नाही. परंतु सुहासिनीला मी तडफडत ठेवणार नाही. तिला कुलटा, वेश्या ही बिरुदावली मी चिकटू देणार नाही. तिला हवं असलेलं सुख, तिचा हक्क मी तिला मिळवून देईनच. तिचे सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरु देणार नाही.

माझ्यासोबत विश्वासघात करुन ती नको त्या मार्गाने जाण्यापेक्षा मीच तिला तो मार्ग दाखविला तर? लग्नापूर्वीच माझे पंगुत्व मी तिला सांगितले नाही म्हणून सुहासिनीने माझ्यावर मी विश्वासघातकी असल्याचा जो कलंक लावलाय तो काही अंशी तर निवळेल? मुख्य म्हणजे तिच्या नशिबात क्षणिक, चोरटे प्रेम तर राहणार नाही. तिच्या सुखाचा मी रखवालदार बनेन. स्त्रीमुक्ती फार दूर राहिली परंतु एका स्त्रीला... माझ्या बायकोला लैंगिकमुक्ती मी मिळवून देईन. व्यावहारिक दृष्टीने तो पापमार्ग ठरेल, परंतु माझ्यासाठी तो एक महान विचार ठरेल. तिच्या हरवलेल्या सुखासोबत माझ्याही जीवनात एक हास्यवेल तर उगवेल. नाही तरी माझ्या जीवनात आता हसणे उरलेच नाही. तिच्या भुकेचे शमन झाल्यामुळे मला माझी पत्नी मिळणार नाही परंतु लग्नापूर्वीची माझी प्रेयसी तर मिळेल. प्रेयसी सुहासिनी कशी खळखळत्या नदीप्रमाणे होती. शब्दाशब्दांवर रुसणं काय, हसणं काय, क्षणात फुरगुंटून बसणे काय? सारे कसे तिचे मनमोहक, आकर्षक होते. माझा हा विचार जसा तिच्यासाठी अमृतमय ठरणार आहे तसाच तो माझ्यासारख्या अर्धवट बांधवांसाठीही प्रेरणादायी ठरेल. आज मी.. उद्या दुसरा..परवा....असे करता करता समाजात माझ्या विचाराचे असंख्य तरुण निर्माण झाले तर आज मी एकटा असलो तरीही उद्या अनेक सोबत्यांमुळे ती क्रांती ठरेल. क्रांती घडत असताना कुणा ना कुणाचा बळी जातोच असतो. अशी ही नवीन क्रांती घडत असताना माझ्या भावनांचा बळी गेला तर गेला. सामाजिक क्रांती जेव्हा केव्हा घडते तेव्हा नवीन काही तरी निर्माण होते. उद्या अशा अनेक स्त्रियांना मार्ग सापडला, त्यांचं लैंगिक शोषण थांबलं तर किती जणींचा उद्धार होईल. ते जाऊ देत. मला तेवढे दूर जायचे नाही. मला फक्त सुहासिनीच्या सुखाचा विचार करायचा आहे, ते तिला मिळवून द्यायचं आहे. मी त्यासाठी दुय्यम भूमिका घेईन. मला कुणी दलाल म्हणाले तरी चालेल, मी ते समाधानाने ऐकून घेईन...

*****