Aaghat - Ek Pramkatha - 3 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 3

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(3)

दुसऱ्या दिवशी कॉलेजात गेल्यानंतर पहिला प्रश्न?

प्रशांत, सुमैयाने तुला घरी का थांबविलं होतं?

रोहनने सगळया मित्रमैत्रिणींच्याकडे एक हसरा कटाक्ष टाकत मला प्रश्न केला होता.

माझ्या उत्तरासाठी सगळे आतुरलेले होते. हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून समजत होतं.

सुमैयाला तिच्या आई-वडिलांशी माझी ओळख करून द्यायची होती म्हणून थांबवून घेतलं होतं. पण वाढदिवसाचा कार्यक्रम उशिरा संपल्यामुळे

मलाही तिथे वेळ झाला. तिच्या घरच्यांच्या आग्रहाखातर मला थांबावं लागलं.

या उत्तरावर थोडेचे कोणी समाधानी होणार होते? कोणाच्याच चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसत नव्हती. सारेजण संशयी नजरेने पाहिल्यासारखे पाहतहोते. त्यांना माझ्याकडून त्या दिवशी काय झालं हे काढून घ्यायचं होतं. एवढ्यात सुमैया आली. ती येताच तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु झाला. तीनेही सगळयांना

एकदमच सांगून टाकलं की मी हा नवीन असल्यामुळे आणि आई-बाबांच ओळख नसल्यामुळे त्याची ओळख करून देण्यासाठी त्याला थांबवून घेतलंहोतं. पण बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक आल्यामुळे मी त्यांच्यात गुंतून राहिले. त्यामुळे त्याला लवकर भेटू शकले नाही. हा पण माझी वाटत पाहत राहिला. मला वाटले होते की हा गेला असेल पण हा तर तिथेच थांबला होता.

मी काही वेळाने गेले. मी गेल्यानंतर हा जाण्यास गडबड करू लागला. पण आईबाबांच्या आग्रहाखातर थांबला.

झाले तुमचे समाधान!

हो झाले आमचे समाधान.

पण वाढदिवसाचे आम्हाला काहीतरी विशेष असे तू द्यायला हवे.

हो, छानपैकी शाकाहारी जेवण देईन.

सगळयांना हवं होतं मांसाहारी जेवण, पण

सुमैयाने शाकाहारी जेवण देईन म्हटल्यानंतर सगळयांचेच चेहरे बघण्यासारखे झाले होते.

वसतीगृहामध्ये लहान लहान खोल्या होत्या. प्रत्येक खोल्यातून चार विद्यार्थी राहत असत. आमच्या खोलीमध्ये मी माझा गाववाला मित्र आणि एक सांगलीचा व एक कराडचा वर्गमित्र असे चौघेजण होतो. हॉस्टेलचे सर आमची वरचेवर चौकशी करायचे. अभ्यासाबाबत सतत मार्गदर्शन करायचे.

एक दिवस सर अचानक आमच्या खोलीत आले. मी आणि माझा गाववाला मित्र गप्पा मारत बसलो होतो. एकजण कपडे धुवत होता तर एकजण वाचत बसला होता.

काय रे! काय कर त बसलायं? पुस्तक विकलीत काय? खायचं आणि गप्पा मारत निवांत बसायचं, काय रे प्रशांत तू म्हणे हुशार विद्यार्थी?

अरे बेट्या तुला तर आम्हाला सांगायला लागायला नको तू पण आता बिघडायला लागलायस. अरे तुझ्यासाठी राबणाऱ्या म्हाताऱ्याची जरा जाणीव ठेव. सर आज अचानक खोलीत आले आणि कधी न मला बोलणारे आज खूप काही बोलून गेले. मला वाईट वाटलं, पण दुसऱ्या दिवशी मला प्रेमाने जवळ घेत सर म्हणाले, तुम्ही आता मोठे झाला आहात. आम्हालाही बोलायला नको वाटतं. पण काय करणार आम्हाला राहवत नाही. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा बोलत राहतोय बघ.

तुम्ही बोललंच पाहिजे सर, तुम्ही नाही बोलला तर आम्ही जागे कसे होणार? सरांचा माझ्यावर खुप जीव होता. मुलाची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. तरीही जिद्दीनं शिक्षण घेतोय. मुलाला परिस्थितीची जाणीव आहे. वागणं

चांगलं आहे. सर सगळयांच्यासमोर माझ्याबद्दल असे मत मांडत असतं. थोडेसे रागीट पण तितकेच मायाळू होते. गरीब आणि कष्टातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांना आपुलकी, प्रेम होतं. जिथं चुकलं तिथं सर बोलायला मागे-पुढे बघत नसतं. मग तो कोणीही असो याची प्रचिती मला ज्या ज्या वेळी संस्थेची मिटिंग

असे त्या त्या वेळी आलेली होती.

तोंडावर अचानक पाणी मारल्याने मी खडबडून जागा झालो.

काय हे प्रशांत किती वेळ उठायला?

आम्ही आंघोळ करून आलो तरी तुझा उठण्याचा पत्ताच नाही.

सुरेश रागारागाने बडबडू लागला.

तुला आमच्याबरोबर यायचे असेल तर लवकर तयार हो. नाहीतर आम्ही चाललो. अनिलही त्याच्या पाठोपाठ बोललाच.

मी पटकन आवरले. सहज घड्याळावर नजर गेली. पाहतो तर चक्क ८.३० वाजले होते. रुमपार्टनर नक्कीच गेले असणार. मला लवकर कॉलेज गाठायला हवं. मी धावत खोलीवर गेलो. पाहतो तर अनिल, सुरेश, संदिप तिघेही माझी वाट पाहत बसले होते. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो.

आता आणखी काय बघतोस आमच्याकडे?

मला वाटलं तुम्ही गेला असाल?

असं एकट्याला ते आमच्या मनालाही

पटत नाही.

तू कित्येकवेळा आम्हाला दुखविलंस प्रशांत, पण आम्ही नाही असे वागणार. आज जर आम्ही तुला एकट्याला सोडून गेलो असता सोडून जाणं आमच्या तत्वात नाही. तर तुझ्या मनाला काय

वाटलं असतं? याचा विचार आम्ही करतो. पण तू कधी आमच्या मनाचा विचार केला आहेस काय?

याला मैत्री म्हणत नाहीत. एकनिष्ठा म्हणत

नाहीत. जीवाला जीव देणारे मित्र असावेत. प्रशांत अजून तुला आम्ही कळलेलो नाही. तु नुसता पुस्तकी कीडा आहेस. थोडंसं मित्रत्व, माणुसकी जाणून घ्यायला शिक. माफ कर आम्ही तुला आज खूप काही बोललो. आमच्याबरोबर तू या पद्धतीने वागतोस ते चुकीचं आहे. हे तुला दाखवून द्यायचं होतं. आज मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. आज आम्हांला हवं तर तू काहीही बोल.

खरंतर त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं. माझंच वागायला चुकलं होतं.

सुरेश, अनिल, संदिप मला माफ करा, मी खुप चुकीचं वागलो.

इंग्रजीचा तास चालू होता. आम्ही गडबडीने वर्गात जावून बसलो. मनात शंका होतीच, सर अचानक वर्गात मला काहीतरी बोलतील. कारण आज मला

उशीर झाला होता, पण तसं काही झालं नाही. सर काहीच बोलले नाही. तास संपला, मी सुटकेचा नि:श्वास सोडला.

तुमच्या वर्गातल्या वर्गप्रतिनिधीला शहापुरे सरांनी बोलविले आहे.

पाटील शिपाई यांनी वर्गात निरोप दिला.

मी ताबडतोब सरांकडे गेलो. सर स्टाफरुममध्ये होते. मी गेल्यानंतर सर अचानक खुर्चीवरून उठले. या कदम म्हणून माझ्या हाताला धरले आणि शेजारच्या खोलीत घेवून गेले.

हे बघ कदम तू वर्गाचा वर्गप्रतिनिधी आहेस. वर्गप्रतिनिधी म्हणून तुझी एक विशिष्ट जबाबदारी असतेच. तू जर वेळ न पाळणे, कधीही येणे - कधीही जाणे अशा पद्धतीने बेशिस्तीचं प्रदर्शन करायला लागलास तर ते चुकीचं आहे आणि याचा परिणाम वाईट होईल.

तुझ्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तू तडा जावू देवू नको.

सर आज पहिल्यादांच उशिर झाला.

रात्री थोडं उशिरापर्यंत अभ्यास करत बसल्यामुळे सकाळी उठायला वेळ झाला.

तू रात्री कितीही उशिरापर्यंत अभ्यास कर पण आम्हाला सकाळी वेळेवर इथे हजर पाहिजे. बाकीची काहीही कारण मला सांगून चालणार नाही.

सर, मला माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही.

ठीक आहे तु जावू शकतोस.

खरंच, मी चुकलो होतो. माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी चांगली पार पाडू शकलो नव्हतो. याचा खेद मनाला वाटत होता.

आजी-आजोबा माझ्याबद्दल खूप आशावादी होते. आपला नातू काहीतरी करून दाखवेल असा त्यांना विश्वास होता. आपल्या म्हातारपणात तोच काठीचा आधार बनेल. स्वत:चा मुलगा आमच्यापासून कायमचा वेगळा आहे. आमचा

सांभाळ करत नाही. पण मुलगीचा मुलगा नक्कीच आपला सांभाळ करेल. आम्हाला नक्कीच तो सुख लावेल. तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण त्याला जपलंय तो आमचे उपकार कधीही विसरणार नाही. अशी भोळी आशा, अपेक्षा त्यांची होती. मीही त्यांना कधी दुखवलं नाही. सणवार असला की मला गोडधोड पाठवून दिल्याशिवाय त्यांचा सण पूर्ण व्हायचा नाही. आजोबा प्रत्येक सणाला घरामध्ये असलेले गोडधोड जेवण घेऊन

यायचे. मीही कधीतरी सणवाराचे गावी जायचो.

मला नागपंचमी दिवशी आजोबा पुरणपोळीचे जेवण घेऊन आले होते. खूप धो धो पाऊस पडत होता. मी नेमका त्याच दिवशी कॉलेजमध्ये नव्हतो. कॉलेजांतर्गत निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या निबंध स्पर्धेत सहभागी झालो होतो. आमच्या कॉलेजांतर्गत आमच्या चौघा जणांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आजोबांना मी भेटू शकलो नाही. त्यांना खूप वाईट वाटलं. हॉस्टेलजवळ उतरून हॉस्टेलच्या सरांना भेटून ते त्या भर पावसात चार मैल अंतरावर असलेल्या कॉलेजवर ते जेवण घेऊन आले.

******