Aaghat - Ek Pramkatha - 9 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 9

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(9)

पण ही गोष्ट मला कधी ना कधी तरी सांगायचीच होती. म्हणून म्हटलं सांगून टाकूया एकदाची. प्रशांत, तू एक माझा जीवाभावाचा मित्र आहेस या नात्याने मला थोडंसं तुला सूचना करावीशी वाटत आहे. हे बघ प्रशांत, तू एक गरीब कुटुंबातला,बाहेरगावी शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी आहेस. तुझी आणि माझी परिस्थिती काही वेगळी नाही. पण तुला आईवडील नाहीत, मला आहेत एवढाच फरक. मला वारंवार संशय येतोय तो हाच की सुमैया तुला प्रेमपाशात ओढून फसविण्याचा अथवा तुझा जो वर्गामध्ये प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक येतो तो येऊ नये, तुझे अभ्यासापासून लक्ष विचलित व्हावं, तू तुझ्या ध्येय उद्दिष्टांपासून दूर व्हावंस यासाठी ती तुला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करते आहे. तिच्या मायाजालात तू अडकू नकासे. तिचं ते वाढदिवसाला तुला एकट्यालाच थांबवून घेणं, तिचं गाणं म्हणण्यासाठी तुलाच का आग्रह करणं, सुट्टीला येतेवेळी मैत्रिणींची फिकीर असू दे, काळजी असू दे, आठवण काढ, मला विसरू नको... हे मनाला विचार करायला लावणारे पण तुझ्या भोळया मनाला न समजणारे हे शब्द कुठच्या ढाच्यातले वा साच्यातले हे तूच मला सांगावस. तू या विषयावर थोडंसं चिंतन करावं. मला माहीत आहे माझं हे तुला सांगणं तुला पटणार नाही. कारण तू त्या पातळीला जाऊन विचार करणार नाहीस. माझा तुला सांगण्याचा उद्देश हाच की तुला जागं करणं, तू भरकटत जावू नयेस. तू तुझ्या ध्येयउद्दिष्टांपासून विचलित होऊ नयेस. परिस्थितीची जाणिव विसरून कोणत्याही गोष्टीला तू बळी पडू नयेस. हाच एका मित्राचं चांगल्या मित्राला वाईट घटनेपासून वाचविणे हे मी माझे कर्तव्य मानतो. तुला पटो अगर न पटो. बघ थोडा विचार करून...

तुझ्या जिवलग मित्र

सुरेश.

पत्र वाचून झालं आणि मला धक्काच बसला. सुरेशचा मला खूप राग आला होता. मित्रत्वाचं नातं शिकविणारा, मित्रांमध्ये स्वाभिमान जागविणारा, एकनिष्ठता शिकवणारा, आपल्या ग्रुपमधल्याच आणि वर्गातल्या मैत्रिणीवरच असा संशय आणि आरोप करू लागलाय याची मला खंत वाटली.

सुमैया तशी मुलगी नाही. तिचं बिनधास्त बोलणं, चारचौघात बिनधास्त वावरणं म्हणजे तिच्या मनात एखाद्याबद्दल आकर्षण असणं अथवा मनात पाप असणं चुकीचं आहे. तिच्या घरचं वातावरण खुले आहे. लहानपणापासून खुल्या वातावरणात राहिलेली बिनधास्त मुलगी आहे. हे तिच्या घरी गेल्यानंतरच मला समजलं होतं. तिच्याबाबतीत असा गैरसमज करणं चुकीचं आहे. सुरेशनं हा गैरसमज करणं चुकीचं होतं. त्याच्या मनात पाप असावे म्हणूनच मला जाणीवपूर्वक माझ्या मनात तिच्याबद्दल गैरसमज करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. असे नाना तऱ्हेचे संशयास्पद विचार माझ्या मनात घोळत होते. या विषयावर मी पत्र वाचून झाल्यानंतर विचार करत परसात बसलो होतो.

‘‘अरं, परसू, परसू आरं जेव ये लवकर.’’

घरातून आजीचा आवाज आला तसा मी पटकन्‌ उठलो आणि जेवायला गेलो. कारण रानाकडं जायचं होतं. वारंवार पत्राचा विषय आणि सुरेशचं ते संशयास्पद वागणं यामुळे सुट्टीचा उत्साहच विरून गेला होता. आजी-आजोबांबरोबर दररोज खुलेपणाने हसत आनंदाने बोलणारा, गप्पा मारणारा मी कॉलेजमधल्या, हॉस्टेलमधल्या मजेशीर गोष्टी सांगून आजी-आजोबांना सुखावणारा आज मात्र त्यांच्याबरोबर बोलायला

माझ्याकडे शब्दच नव्हता. मी खोलीच्या एका कोपऱ्यात गप्प बसून होतो. यावरून आजी-आजोबांच्यात कुजबुज सुरू झाली होती. इतक्यात आतून आजीचा आवाज आला.

‘‘पोरा आसा गप्प का बसलायसं रे, बरं बीरं वाटत नाही का रं.’’ आजी जवळ येऊन छातीला तपासत हात लावून ताप बघू लागली. तापाऐवजी अंग थंड पडलं होतं या घटनेनं.

‘‘चल दवाखान्यात जाऊन येऊया.’’ आजोबा समोर येऊन म्हणाले.

‘‘नको बरं बीरं काही नाही. मला काहीच झालेलं नाही.’’

‘‘आरं पोरा आजार आसा अंगावर काढून चालणार नाही.’’

‘‘खरंच आजी मला काहीच झालेलं नाही.’’

सुट्टी संपत आली होती. निकालही चार दिवसांवर येऊन ठेपला होता. निकालाची थोडी काळजी वाटत होती. इकडे आजीची मला काहीतरी खायला करून द्यायची गडबड सुरू होती.

एकदाचा निकाला लागला. प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने पास झालो. सुमैया दुसरा क्रमांक तर आनंदाचा तिसरा क्रमांक आला होता. प्रथम क्रमांक आल्याचा मनाला चांगलाच आनंद होणं साहजिकचं होतं. पण निकालावेळी मी हजर नव्हतो. मला संदिपने शेजारच्या घरात असलेल्या फोनवरुन कळविलं होतं. मी न जाण्याचं कारण गाडीला पैसे घालण्यापेक्षा एका आठवड्याने मी कॉलेजवर जाणारच होतो. कॉलेज सुरू होणारचं होतं. एखादा मुलगा प्रथम क्रमांक आल्यावर आपला आनंद साजरा करायला मुंबईहून कोल्हापूरला आला असता,पण मी ११० किलो मीटर असलेल्या कोल्हापूरला प्रथम क्रमांकाचा आनंद साजरा करायला जाणार नव्हतो. प्रत्येक वर्षी जात नव्हतो, कारण प्रश्न होता तो पैशाचा.

कॉलेज एकदाचं सुरू झालं. आवराआवरी जाण्याची तयारी करू लागलो. आणखी थोडी दिवस सुट्टी असावी असं सुट्टी संपल्यानंतर वाटायला लागलं. आजी आजोबांना सोडून जाऊ वाटायचं नाही, पण शेवटी जावं लागणारच होतं.

जड अंत:करणानं जातेवेळी आजी आजोबांचे चार शब्द ठरलेले असायचेच. तब्येतीची काळजी घे, पोटाला खाईत जा, अभ्यास चांगला कर, कुणाला दुखवू नगोस, शहराच्या ठिकाणी जपून रहा.

खूप वाईट वाटायचं. मग जातेवेळी रडायचो. ते दोघेही डोळयात अश्रू आणायचे.

‘‘शिक्षणाशिवाय पर्याय नाही, पोरा. शिकून शहाणा हो. कुठंवर सावलीला बसून पोट भरून खाशील. आयुष्यभर उन्हातान्हात राबण्यापेक्षा चांगलं शिक, अभ्यास भरपूर कर. आमची काय बी काळजी करू नकोस.’’ आजोबा तळमळीनं सांगत होते. शेवटी त्यांचा निरोप घेतला आणि जड पावलांनी स्टॅण्डचा रस्ता चालू लागलो.

बी.ए.चं प्रथम वर्ष संपलं होतं. एका नव्या रंगात नव्या ढंगात आणि नव्या जोशात द्वितीय वर्ष बी.ए.ला सुरुवात झाली होती. एक वेगळं आणि अगोदरच्या पेक्षा उत्साही वातावरण वाटत होतं. पुन्हा सगळयांकडून अभिनंदन, कौतुकाचा वर्षाव खूप बरं वाटतं होतं. पुन्हा नवी उमेद येत होती. कॉलेज व हॉस्टेलवर शिक्षक,विद्यार्थ्यांकडून खूप खूप कौतुक व्हायचं.पण एक गोष्ट मनात सलत होती. ती सुरेशनं सुट्टीमध्ये लिहिलेलं पत्र.

नियमितपण कॉलेज सुरु झालं होतं. कॉलेज सुरू होऊन आठ दिवस झाले होते.तरी सुरेशचं आणि माझं बोलणं नव्हतं. त्यानेही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नकेला नाही. अनिलला आणि संदिपला ते पत्र वाचायला दिले आणि त्याच्याबद्दलचा माझा राग मी त्यांच्याजवळ व्यक्त केला. पण त्यांनीही सुरेशचीच बाजू उचलून धरली.

‘‘आम्ही सुरेशच्या मताशी सहमत आहोत. त्याचं बरोबर आहे.’’ संदिपने, अनिलने पत्र वाचून झाल्यावर आपलं मत व्यक्त केलं. त्यावर मला आश्चर्य वाटलं.

‘‘अरे, काय हे काय बोलताय तुम्ही. जणू तुम्ही तिघांनी मला एकटं पाडण्याचा विडाच उचललेला दिसतोय. तिघेही माझ्याविरुद्धच बोलताय.’’

‘‘तसं काही नाही, प्रशांत तुझा गैरसमज होतोय. सुरेशनं आम्हाला याच्या अगोदरच ही गोष्ट सांगितली होती. आणि आम्हालाही तुझ्याबाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्यावरून ही गोष्ट खरी वाटली होती. आम्ही त्यावेळी तुला बोलणार होतो. पण मीच या गोष्टीला विरोध केला होता. कारण आम्हाला तुला दुखवायचं नव्हतं. आणि ऐन परीक्षेच्या काळात तुझ्या अभ्यासावर परिणाम होईल अशी कोणतीही गोष्ट बोलायची नाही असं आम्ही ठरविलं होतं, कारण याचा परिणाम वाईट होऊ नये म्हणून, भले तुला आमच्याबद्दल काहीही वाटो पण चांगल्या मार्गावर घेऊन जाणे हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. म्हणूनच सुरेशनं तुला पत्राद्वारे आमचं जे मत होतं ते मांडलं.’’

संदिपनं या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिलं.

‘‘पण मला न राहून वाटतंय की तिघेही माझ्याविरुद्धच जाणूनबुजून वागत आहात. माझ्या मनात तिच्याबद्दल वाईट भावना नाही. एक मैत्रीण म्हणून मित्राची जी भावना असते तिच भावना होती. कारण तु च्यापेक्षा सुमैयाला मी जवळून अनुभवलं होतं. भले ती हुशार, श्रीमंत घराण्यातली आहे. पण तिच्या मनात मला ध्येय, उद्दिष्टांपासून दूर करुन, आपल्या प्रेमपाशात ओढणं, पाठीमागे खेचणं असं काही नाही. ती खुल्या मनाची मोकळया भावनेची मुलगी आहे. मित्र म्हणून माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.”

तिच्याबद्दल माझं जे मत आहे ते त्यांच्या समोर मी स्पष्ट केलं.

*****

Share

NEW REALESED