Prem ase hi - 7 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम असे ही (भाग 7)

मागील भागावरून पुढे....

ती येणार पण त्याबद्दल करणच्या मनात बिलकुल हुरहूर वैगरे लागली नाही.. पुन्हा पुन्हा प्रेमात तोंडावर पडल्यामुळे असेल कदाचित पण आता त्याला स्वतःला सावरायला यायला लागले होते .... जे घडणार आहे त्याचे हसू नाही , जे घडून गेले त्याचे रडू नाही... एकदम निर्विकार...

ती कधी येणार ह्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती... त्यामुळे तो आपल्या नेहमीच्या कामात दंग होता... गावातल्या लोकांबरोबर मासे पकडायला जायचे...समुद्रात माश्यांची भरलेली जाळी बोटीवर खेचायची... संध्याकाळी माश्यांची भरलेल्या टोपल्यात बंदरात आणायच्या... जाळी नीट करायची.. बर्फ होडीत भरायचा.... अशी अत्यंत मेहनतीची कामे करून त्याच्या शरीरात खूप बदल झाला होता... त्याचे आधीचे स्नायू आता तरारून फुगले होते... शरीराला एक मर्दानी रूप आले होते..

आरतीला रीमा कडून त्याचा पत्ता मिळाला होता... आपण जावे की नाही ती ह्याच संभ्रमात होती... पण घडलेल्या घटना इतक्या वेगात घडल्या की तिला तिची बाजू सांगण्याची कोणतीही संधी मिळाली नव्हती.. आणी आयुष्यभर तो आपल्या बद्दल गैरसमज करून घेईल म्हणून त्याला सत्य परिस्थिती सांगणे गरजेचे होते.
असे पण ती आता खुप लांब निघून जाणार होती. पण त्याआधी त्याचा गैरसमज दूर होणे गरजेचे होते... विचार करण्यात तिचे आणी दोन दिवस गेले ... आता संध्याकाळी आभाळ काळाकुट्ट होऊ लागले... जोरदार वारा वाहू लागला... ही सगळी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची लक्षणे होती...
आणी कोकणात तर असा अंधाधुंद पाऊस पडतो की , विचारता सोय नाही म्हणून त्याला भेटून येणे गरजेचे होते.. एकदा का पाऊस सुरु झाला तर पुढे कधी काय होईल माहित नव्हते...
शेवटी आणखीन दोन दिवसांनी तिने कोकणात जायचे ठरवले... कसे जायचे वैगरेची जुजबी माहिती गोळा करून ती बस मध्ये बसली....

करण आता पण आपल्या कामात गुंतला होता.. पावसाळा तोंडावर आला होता.. म्हणून सगळ्या बोटी किनाऱ्यावर घेऊन त्यांना शाकारण्याचे काम जोरात चालू होते.. त्या वजनदार बोटी.. फक्त लाकडी खोडावर आणी सर्वांच्या ताकतीवर किनाऱ्यावर आणून लावायचे म्हणजे प्रचंड अंग मेहनतीचे काम.... पण सगळे न थकता , न कंटाळा करता ती कामे करत होती. सगळी कोळी माणसे आपल्या कमरेला गुंडाळलेल्या टीचभर कपड्यात उघड्या अंगानी कामे करत होती.. आणी करण आपल्या छोट्या शॉर्ट पॅन्ट मध्ये त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता...

दुपारच्या जेवणाच्या वेळी सगळ्या बायका आपआपल्या नवऱ्या , पोऱ्या साठी भाकरी , जवळा , कांदा मिरची घेऊन आल्या होत्या... एक दोघी करण साठी पण भाकऱ्या घेऊन आल्या होत्या.. आणी त्यांच्या बरोबरच आरती पण आली होती... तो काही संध्याकाळ पर्यंत घरी येणार नव्हता म्हणून त्या सगळ्या तिला इथेच घेऊन आल्या...
त्या दोघांना पुरेसा एकांत देत त्याच्या आजूबाजूचे काहीसे लांब जाऊन बसले....

" कसा आहेस ? " तिने हळू आवाजात विचारले.

" तुला कसा वाटतोय....?" त्याचे तिरसट उत्तर... तिला खूप वाईट वाटले...

" घे...." त्याने आपल्यातील एक भाकरी तिला देऊ केली...

" नको मला.... मला भूक नाही... "

" हो.. तरीही थोडीशी खा... आपल्या ताटातील भाकरी आलेल्या पाहुण्याला देण्याची ह्या गरीब लोकांची रीतच आहे... त्यामुळं थोडी तरी खा... "

त्याने भाकरी दिली.. हातावर भाकरी घेऊन भाकरीत मस्त खमंग भाजून फोडणी दिलेला जवळा , एक दोन दुसऱ्या लहान लहान माश्याचे तुकडे.. कोणते होते माहित नाही पण छान होते चवीला.. एक घास खाताच तिच्यातील भूक जागी झाली...

" का... भेटायचे होते तुला ? "

" थोडे बोलायचे होते... "

" आता बोलायला काही शिल्लक राहिले आहे..? "

" ह्म्म्म... पण आयुष्यभर तु माझ्या बद्दल गैरसमज करून घेणार म्हणून तुला स्पष्टीकरण द्यायला नको...? "

" ह्म्म्म... तासभर आहे तुझ्या कडे.. बोल नंतर मला पण कामाला लागायचे आहे... "

" करण मला माफ कर.. प्लिज मी जे पण केले हे फक्त तुझ्या साठी केले.. "

" माझ्या साठी..." तो हसला...
" मला काहीही न सांगता मला सोडून गेलीस.. गेलीस नाही गायबच झालीस.. फक्त माझ्या साठी..? "

" तुला खरी गोष्ट माहित नाही... " ती सांगू लागली..
" तु नागपूरला गेलास मी चार पाच महिने तुझी वाट बघत होती.. तुझा फोन येणे पण बंद झाला.. त्यात आराध्या नागपूरला तुमच्या प्लांट मध्ये कामाला आहे हे ऐकून मला आणखीन धक्का बसला.. "

" बस एव्हढ्याश्या गोष्टी साठी तु.... "

" माझे पाहिले पूर्ण ऐकून घे..... मला तुझ्यावर विश्वास होता.. आणी जरी तुला पुन्हा तिच्यात इंटरेस्ट असता तरी मला काही वाटले नसते.. तु येऊन मला सांगावेसे एव्हडीच माझी इच्छा होती... "

" मग...? "

" पण एके दिवशी ज्या दोन मुलांनी माझ्यावर बलात्कार केला होता ते अचानक आमच्या घरी आले... कसे काय माहित पण त्यांना आमचा पत्ता लागला.. त्यांनी घरी येऊन बाबानां खूप धमक्या दिल्या.. माझ्या मुळे त्यांना जेल मध्ये जावे लागले होते. त्याचा त्यांना राग होता.त्यांच्या दुर्दशेला मी कारण आहे असे त्यांचे म्हणणे होते आणी जेल मध्ये ते आता सराईत गुंड झाले होते.. झालेला प्रकार इतका भयानक होता की आम्ही सगळे झालेल्या प्रकाराने हादरून गेलो... झालेल्या झटापटीत बाबांना पण मार लागला आणी ते पळून गेले... पण जाताना ते कोणालाही सोडणार नाहीत अशी धमकी देऊन गेलेत.. "

" एक मिनिट.... एक मिनिट ....ते दोघे तर जेल मध्ये होते नां ...? त्यांची शिक्षा संपली ? "

" हो...त्यांची शिक्षा अजून बाकी होती. कसे ते माहित नाही. पण ते बाहेर आलेत.. " ती पण सांगण्यात असमर्थ होती.

" बहुतेक पॅरोल वर बाहेर आले असतील... " त्यांनी अंदाज लावला...
" पुढे.... काय झाले ? " करण ने विचारले...

" काही दिवसांनी बाबानां लागलेला मार त्यांच्या जीवावर बेतला... आणी ते आम्हाला सोडून गेले.. पोलिसात आम्ही तक्रार केली आहे. आणी पोलिसांनी त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल केला आहे आणी पोलीस त्यांच्या मागावर आहेत...पण अजूनतरी ते सापडले नाहीत... म्हणून आम्ही जुने घर सोडावे लागले.. त्यांना परत काहीही माहिती होऊ नये म्हणून कोणाला काहीही सांगितले नाही... मोबाईल नंबर बदली केले..
मला भीती वाटत होती की , त्यांनी कधी आपल्या दोघांना एकत्र पाहिले तर ते तुला पण सोडणार नाहीत.. म्हणून मी घाबरून कामाला येणे बंद केले. बाबाच्या जाण्यानंतर आम्ही मुंबई सोडून दिली आणी दुसरीकडे लपून राहिला लागलो... "

" ह्म्म्म...." आता करण ला सगळे प्रकरण डोक्यात येऊ लागले ....त्याच्या बद्दल काळजी वाटणे स्वाभाविक होते.. तितके प्रेम तर ती करतच होती...

" एकदा माझ्याशी बोलली असतीस तर हां पण प्रॉब्लम सोडवला असता.." त्याने निराश आवाजात म्हंटले...

" तुला मी अगोदर किती फोन केले. तु कोणत्या कॉल चे उत्तर दिलेस ?" तिने विचारले.. आणी तिचे म्हणणे खरे होते.. कामात तो असा काही अडकला होता की त्याला अजिबात फुरसत नव्हती... काहीही करून तो प्लांट यशस्वी करून दाखवायचा असा त्यांनी चंगच बांधला होता आणी त्या नादात त्याचे तिच्या कडे दुर्लक्ष झाले होते हे पण खरे होते...
दोघे पुन्हा शांत झाले...

" मग आता पुढे काय करणार आहेस ?" त्याने विचारले.. त्याचा तिच्यावरील राग आता पूर्णपणे मावळला होता...

" मी आणी आई , दोघे कुठेतरी लांब निघून जातोय.. परत त्या दोघांना कळता कामा नये.. पण जाण्याआधी तुला एकदा भेटून सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या... आता सांगितल्या मन हलके झाले... नाहीतर तु शेवट पर्यंत माझ्या बद्दल गैरसमज करून घेतला असतास... "

" तुम्हाला कुठे ही जाण्याची गरज नाही... त्या दोघांचे काय करायचे ते मी बघतो... "

" नको... नको.... ते खुप खतरनाक आहेत... त्यांना आता कशाची भीती वाटत नाही... तु ह्यात पडू नकोस नाहीतर तुला पण ते सोडणार नाहीत.... माझे नशीबच तसें आहे त्याला तु तरी काय करणार ? "

" प्रत्येक वेळा नशीब खराब आहे बोलून भागत नाही.. कधी कधी स्वतः उठून नशीब बदलायला प्रयत्न करावे लागतात.. आणी माझी काळजी करणे सोडून दे.. असे लुंगेसुंगे माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत.. साध्यासुध्या , कमजोर लोकांवर ते दहशत दाखवत असतात.... मी बघतो काय करायचे आहे ते... आता पर्यंत त्यांनी खूप त्रास दिला , पण आता नाही.... "
तो अतिशय कठोर आवाजात म्हणाला... तिला त्याचा हां आवाज माहित होता . नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होते....
तासभर झाला होता.. सगळे आळस झटकून उठले . पुन्हा कामाला लागायची वेळ झाली होती.

" तु कधी परत जाणार आहेस ? " त्याने पण उठत विचारले..

" आता संध्याकाळच्या एसटी ने जाईन... "

" आज नको जाऊस... "

" नाही... जावे लागेल.. आई एकटी आहे... त्यात त्या दोघांचा धोका आहेच .... "

" त्यांची काळजी करू नकोस... मी बघतो... " त्याने मोबाईल काढला...
" काका मी आलो जरा वेळात...." आपल्या बाजूच्या एका कोळी काकाला त्याने सांगितले आणी बाजूला जातं एकाला फोन लावला...

" अस्लाम वालेकुम.... उस्मान भाई.... "

" वालेकुम अस्लाम..... कौन ? "

" क्या उस्मान भाई , अब दोस्तो को भी भूल गये...." करणने हसत विचारले... त्याचे ते हसणे आणी आवाज ऐकून उस्मान काही वेळ विचारत पडला... काही वेळ डोक्यावर जोर टाकल्यावर...

" करण.... ss..." त्याच्या ओठावर अचानक नाव आले.

" अब बराबर आये नां... भाई... "

" कहा है आजकल ? तेरी तो कोई खबर ही नही है... "

" हां भाई.. मै मुंबई मे नही हू... और एक काम करना था.. "

" बोल नां... "

" मै एक ऍड्रेस भेज राहा हू... वहा पर एक अकेली औरत रहती है.उसकी हिफाजत करनी है... मुझे मुंबई आने मै शायद दोन दिन लग सकते है... चार आदमी को पुरी तयारी के साथ ऊस पतेपर भेज देना..... "

" ठीक है.. मुझे पता भेज देना... मै आदमी भेज देता हू..."

" शुक्रिया उस्मान भाई... "

" बस क्या... अब तु भी शुक्रिया बोलेगा ? आने के बाद एक जबरदस्त पार्टी देना.. तब हिसाब पुरा होगा... "

" मंजूर है... रखू? "

" हां.... अल्ला हाफिज... "

" अल्ला हाफिज..... भाई..." करण ने फोन ठेऊन दिला..

" मला आईचा ऍड्रेस दे... उस्मान भाई आपली चार माणसे तिथे पाठवेल... जो पर्यंत त्याची माणसे आहेत ते दोघे काहीही करू शकत नाही... ठीक आहे... "
आता तिला जरा बरे वाटले... त्याच्या ओळखी खूप ठिकाणी आहेत हे तिला माहित होते.. पण भाईलोकां बरोबर पण त्याच्या ओळखी आहेत हे बघून ती चकित झाली...
काही वेळातच आईचा ऍड्रेस त्याने उस्मान ला पाठवला.. त्याने तिकडून डन म्हणून मेसेज पाठवला... काम झाले होते....

" मावशी.... " त्याने एका बाईला हाक मारली..
" तु आता घरी जा... माझे घर ह्या मावशी तुला दाखवतील... जा जाऊन बस... मी संध्याकाळी येतो...
थंडगार हवा सुटली आहे... वाऱ्याला पण जोर आहे.
आज संध्याकाळ पासून पाऊस चालू होईल... आणी पहिल्या पावसात तु मुंबईला जाऊ शकत नाहीस... कधीही काहीही होऊ शकते... ठीक आहे... आता आलीस तर राहा दोन दिवस.. इथले काम आटोपले की आपण दोघेपण मुंबईला जाऊ.... "
" मावशी हिला माझ्या घरी सोडा..." करण ने त्या मावशीला सांगितले... आणी तो पुन्हा कामाला लागला.... आणी ती त्या मावशी बरोबर परत निघाली...

संध्याकाळी त्यांचे काम आटोपले.. सगळे काही वेळ दम खात बसून होते... काळोख पडायला अजून तासभर वेळ होता... आणी आरती परत आली...

" काय ग काय झाले ? " तिला पुन्हा बघून करण ने विचारले...

" काही नाही घरात बसून कंटाळा आला होता.. म्हणून मग म्हंटले जरा फिरून यावे...."

" ह्म्म्म... चल माझे काम पण आता संपले आहे... आपण समुद्रावरुन एक फेरी मारू... " तो आपली पॅन्ट झटकत उठला... तो वरून उघडा होता. त्यामुळे त्याची भरदार छाती... कसलेले आर्म्स ठळकपणे नजरेस पडत होते....

दोघे निशब्द चालत चालत सगळ्या पासून लांब जाऊ लागले...

" छान आहे हे गाव...." ती म्हणाली...

" म्हणूनच मी इथे आलो.... गाव पण छान आहे आणी माणसे पण.. मला तर आपल्यातलाच एक मानतात...
मंगळू काका आणी शकू मावशी तर मला मुला सारखा मानतात... त्यांना दोघांना मुलबाळ नाही नां म्हणून माझ्यावर सगळी माया लावतात.... "

" नाही खरोखर माणसे खुप छान आहेत... आवडले गाव मला... मी ह्या आधी कधी कोकणात आले नाही.. "

" काय ? तु कोकणात कधीच आली नव्हतीस ?" त्याने आश्चर्याने विचारले...

" अहं... "

" अरे.. ! कोकण म्हणजे स्वर्ग... निसर्गाने नटलेलं , विस्तर्ण समुद्रकिनारे , खाड्या , रुचकर जेवण , नारळा फोपळीच्या बागा.... " तो तिला कोकण बद्दल सांगत गेला.. अजून काय काय आहे तो सांगत होता आणी ती ऐकत होती.

बराच वेळ दोघेच फिरत होते... आणी आता काळोख पडायला सुरवात झाली... आणी एकदम जोरदार वारा वाहू लागला....

" चल लवकर जोरदार पाऊस चालू होणार आहे... " तो पटापट पाय उचलत तिला म्हणाला... पण त्या वाऱ्यात तिला भरभर चालता येई नां.. आणी पाऊस जोरात चालू झाला... घर खूप लांब होते म्हणून दोघे एका ठिकाणी आडोश्याला उभे राहिले... पण आडोसा शोधे पर्यंत दोघे पूर्णपणे भिजले होते ... आडोश्याला पण दोघे एकदम जवळच उभे होते.. तेव्हडी जागाच नव्हती.. नाईलाज होता. पहिल्या पावसात मातीचा सुगंध सगळी कडे दरवळला होता.. त्यात भिजलेली ती त्याच्या सोबत... केसातून थेंब थेंब ठिबकणारे पाणी... चेहऱ्यावर असलेले पाण्याचे थेंब... भिजलेल्या पापण्या.... ओलसर आणी आव्हान देणारे ओठ... करण तिलाच बघत राहिला... आणी ती लाजून मान खाली घालून उभी होती...

त्याने सावकाश तिचा हात आपल्या हातात घेतला... "अजून पण माझे प्रेम कमी झालेले नाही... " तो हळुवार आवाजात म्हणाला...

" आणी माझे पण..." तिने त्याच्या नजरेत नजर मिसळली...

त्याने सावकाश तिला आपल्या जवळ ओढली... आता दोघे एकमेकांना चिटकून उभे होते...ती खूप लाजली.. त्याचा हात तिच्या कमरेला गुंफून होता... त्याने सावकाश तिची मान वर केली... आणी हळुवार तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले.... आता पूर्णपणे काळोख पडला होता.. आता दोन फुटावरचे ही धड दिसत नव्हते... वातावरण एकदम रोमँटिक बनले आणी त्यात आता काळोख पण त्यांच्या मदतीला धावून आला... किती महिने दोघे एकमेकांपासून लांब होते... आज पुन्हा दोघे एकमेकांच्या सानिध्यात होते... हळूहळू ती त्याच्या मिठीत शिरली... आज आपण काही विचार करायचा नाही.. वाहवत जायचे... त्याला एव्हड्या महिन्यात जो काही मनस्थाप झालाय , तिचा राग आलाय. आज सगळे काढून टाकायचे... ती सावकाश त्याला प्रतिसाद देत होती...

आजची रात्र दोघांना आयुष्यभर लक्षात राहील अशीच राहणार होती...

(मित्रांनो हां भाग शेवटचा म्हणून लिहणार होतो पण कथा काहीशी मोठी होतेय.. शॉर्ट मध्ये लिहून त्याची मज्जा जायला नको म्हणून अजून एक भाग लिहीन... धन्यवाद.. )

पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे...