dark night-4 books and stories free download online pdf in Marathi

मंतरलेली काळरात्र (भाग-४)

मला आता झुडपात काहीतरी हालचाल झालेली दिसून आली, तसा मी सावध झालो आणि माझ्या लक्षात आले हे तर बकरीचे पिल्लू आहे .

जे की, मी जाताना इथे ह्या ठिकाणी ठेवून गेलो होतो, त्याच्या जवळ गेलो खांद्याला पिशवी अडकवली एका हातात भाला आणि दुसऱ्या हाताने मी त्याच्या कानाला पकडले त्याचा स्पर्श मला वेगळाच जाणवला जाताना त्याला स्पर्श केलता तसाच आताचा स्पर्श ही सारखाच जाणवला जसे की एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला आहे.
खरं तर कळत नव्हते आता नियतीच्या मनात काय चालू आहे माझ्याविषयी पण इथे एक नक्की होते की, माझे सर्व संकटे सम्पली नव्हती.

खरं तर त्याला ह्या विराण स्थळी एकट्याला सोडून जाणे मनाला पटत नव्हते. त्याच्या कानाला ओढले असता ते पिल्लू पुढे येत नव्हते, बहुतेक भीत असावे म्हणून येत नसेल म्हणून त्याला आता खांद्यांवर उचलून घेतले.

सगळीकडे पावसाचे पाणी वहात होते,मला स्पष्ट खळखळ आवाज कानावर येऊ लागला रातकिड्यांचा आणि बेडकांचा आवाज त्यात पाण्याचा खळखळ हे एक प्रकारे संगीतमय सूर लावल्यासारखे ऐकू येत होते.
हे ऐकू येणारे आवाज हळू हळू कमी होत गेला काही क्षणातच सगळा आवाज बंद झाला .आता पूर्ण पणे माझ्या लक्षात आले की ,मायावी शक्ती माझा पाठलाग अजूनही करत आहे.

मी डाव्या खांद्यावर बकरीचे पिल्लू आणि उजव्या हातात भाला व उजव्या खांद्याला अडकवलेली पिशवी असा मी चालत होतो. मंद हवे मुळे झाडाची पाने सळसळ करत होती परंतु ती मला काहीतरी सांगू इच्छित होती .असे मला वाटत होते त्यांचा आवाज आज वेगळाच येत होता.

खांद्यावरील बकरीचे पिल्लू मला थोडे जड वाटायला लागले, म्हणून मी त्याला खांद्यावर पुन्हा व्यवतीथ घेवून पुढे चालू लागलो. तसे ते मला अजूनच जड वाटायला लागले, कानावर काही तरी खरकत असलेला
खरं-खरं रर... आवाज कानावर एकसारखा येत होता.

आता खांद्यावरचे बकरीच्या पिल्लाचे वजन मला असहाय्य होत चालले होते हा प्रकार काय आहे मला लक्षात येत नव्हता मी आता जागी थांम्बलो मागे नजर टाकली असता माझ्या पायाखालची वाळूच सरकली ,
मी मात्र आता जरा जास्तच घाबरून गेलो होतो. अशी कल्पना सुध्दा मी कधीच मनात केली नव्हती, स्वप्नात ही असे दृश्य कधी पाहू नये असे ते दृश्य होते.

त्या बकरीच्या पिल्लाचे मागील पाय खूप लांम्ब झाले होते. काही क्षणासाठी माझ्या डोक्यावरील केस आता उभे राहिले होते.

माझ्या खांद्यावर असणारी गोष्ट म्हणजे एक मायावी शक्ती आहे आणि मी पुन्हा आता पुरता फसलो होतो.
यातून सुटका होणे कठीण वाटत होते, माझ्याकडे आता फक्त रघुच्या आईने दिलेला भाला होता तेवढाच फक्त एक आशेचा किरण मला दिसत होता.

एकवार माझ्या कुटुंबाचा चेहरा समोर आणला आणि सर्व शक्ती एकवटून पूर्ण ताकतिने मी त्याला खाली टाकले आणि समोर त्याच्या जाऊन उभा राहिलो.
मला काही कळायच्या आत त्याने माझ्यावर झडप घेण्याचा प्रयत्न केला तसा मी पूर्णपणे घाबरून डोळे मिटून दोन पायावर्ती खाली बसलो फक्त भाला वर केला आणि डोळे मिटवले. काही क्षण तसाच बसून होतो.

वातावरण शांत झाले कुठे कसलाच आवाज येत नव्हता मी डोळे हळूहळू उघडून पाहू लागलो .
मायावी शक्ती गायब झाली होती. माझ्यासाठी हे एक मोठे आश्चर्य होते, लागोलाग आता सुसाट घराच्या दिशेने निघालो, मनात विचार येत होता हे सगळं घडलं कस..?, भाल्याकडे पहात मीच स्वतः ला प्रश्न करत होतो. काय असेल ह्या भाल्यामध्ये..?,
मी चंद्राच्या उजेडात थोडं निरखून पाहिले तर भाल्याच्या टोकाला एक लिंबू टोचलेला आणि त्याला सफेद कपड्याने गुंडाळून त्यावर्ती हळदी कुंकू लावलेले होते. हळूहळू आता माझ्या लक्षात यायला सुरवात झाली.

का..?मायावी शक्ती दूर गेली माझ्यापासून तर फक्त ह्या भाल्यामुळे,
मी मनोमन रघुच्या आईचे आभार मानले,
मी आता घराजवळ पोहोचलो होतो.
बाहेरून दाराला लावलेली कडी उघडत मी आतमध्ये डोकावून पाहिले मला दोघेही कुठेच दिसेनासे झाले, मी खूप घाबरून गेलो, कारण छप्रात सर्वत्र पाणी साचले होते, मी आतमध्ये जाऊन घरात निरखून पाहू लागलो ,
समोरील चित्र पाहून मी आहे त्या जागी सुखावलो.
समोर घरातीलच रांजण उलटे करून ठेवले होते आणि ती मुलाला मांडीवर घेऊन बसली होती.

ती निपचित बसलेली होती, बाळ अजूनही हळू रडत होते, त्याची अवस्था मला आता पहावत नव्हती ,पण अश्या अंधारामुळे आम्ही त्याला दिसेनसे झालो होतो.

त्यामुळे तो आताही रडत होता मला कल्पना होती की, जो पर्यंत तो घरात प्रकाश पडणार नाही आणि आमचा दोघांचाही चेहरा स्पष्ट पहात नाही तोपर्यंत तो असाच रडत राहील,
मी तिच्याकडे निरखून पाहिले तर तिचे डोळे पूर्ण पणे कोरडे होते रडून रडून त्या डोळ्यातील काय पण जसे की पूर्ण शरीरातील पाणी त्या अश्रूं द्वारे संपले असावे छप्राला ठिकठिकाणी पावसामुळं बोळ पडली होती घरात चंद्राचा अंधुक प्रकाश पडला होता.

मी तिला अलगद खांद्याला हात लावत आवाज दिला माझा आवाज ऐकताच ती पूर्ण पणे आता भानावर आली. अंधुक प्रकाशात तिचा चेहरा दिसून आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसत होते की जो आनंद मी सध्या शब्दात व्यक्त करू शकत नाही पण तिच्या डोळ्यांच्या पापण्या अजूनही मिटवत नव्हती मी तिला विचारले असे का तेव्हा ती म्हटली मी तुम्हाला जो पर्यंत पूर्ण माझ्या समोर सुखरूप पहात नाही तो पर्यंत माझ्या डोळ्यांची पापणी खाली होणार नाही.

मी आता लगबगीने घरात कंदील शोधू लागलो कंदील सापडले पण त्यात पूर्ण पणे पाणी भरलेलं होत आणि आता ते पेटवता पण येणार नव्हते मला काय करावे काय सुचेना देव माझी इतकी का परीक्षा बघत असेल मला काही कळत नव्हते .

मी पार भेदरून गेलो होतो आता समोर बायको होती आणि तिची झालेली अवस्था मला पाहवत नव्हती त्या परिस्तिथी मध्ये पुन्हा बाहेर जाणे शक्यच नव्हते ,
चंद्राच्या नाजूक प्रकाशात पिशवीत काही तरी चमकल्यासारखे एका क्षणसाठी दिसून आले.
पण चमकलेली वस्तू काय..? आहे, नेमकी म्हणून मी पाहिले तर तेव्हा माझ्या मनात देवा बद्दल आणि रघु बद्दल खूप आदर निर्माण झाला.

स्वतःला च म्हणत राहिलो सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपण शोध न घेता देवालाच उगाच कोसत असतो,
चमकलेली वस्तू नवी कोरी एक पत्र्याची चिमणी आणि एका कागदात गुंडाळून ठेवलेली एक काडेपेटी व काचेच्या बाटलीत रॉकेल होते.

मी थोडाही वेळ न दवडता बाटली मधील रॉकेल त्या चिमणीत (दिव्यामध्ये) ओतले आणि पेटवली ,
"क्षणार्धात घर पूर्ण प्रकाशमय झाले."
त्याच क्षणी माझा मुलगा आमच्याकडे निरखून पाहू लागला, जसे की त्याला कदाचित वाटले असावे एका अंधारमय जगातून तो प्रकाशमय जगात आला आहे, चिमणीच्या प्रकाशात आम्ही दोघेही त्याला स्पष्ट दिसत होतो.

त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे हास्य उमटले होते, ते माझ्या साठी हास्य नसून एक मोठा विजय उत्सव होता.
त्याचे हास्य पाहून माझा आनंद गगनात मावेना,
मी तिच्याकडे पाहिले तर ती मला डोळे भरून पहात होती जसे की ती मला प्रथमच पहात आहे, मी तिला म्हटले आता तरी डोळ्याची हालचाल कर जर पापण्या खाली कर कारण मला तुझे डोळे बघवणात मी आहेना तुझ्या पुढे सुखरूप..!! मग आता तरी शांत हो, आणि तीच्या चेहऱ्यावर आता एका वेगळ्या प्रकारचे हास्य मी पहात होतो. एखाद्याने खूप मोठी तपशर्या करावी आणि मग देवाण वरदान द्यावं अस घडल्या प्रमाणे तिला आनंद झाला होता. तिचा हा खुलेला चेहरा पाहून मलाही खूप आनंद झाला होता. तिच्या डोळ्यांची हालचाल आता ती करू लागली होती. तिला प्रश्न केला जर मी मागे आलोच नसतो..? तेव्हा तिने पटकन माझ्या तोंडाला हात लावला आणि पुढे म्हणाली हे माझे डोळे सर्वांना असेच उघडे दिसले असते पण तुमची वाट पाहून पाहून माझा प्राण कधी गेला हे ही मला पण कधी कळले नसते कारण मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही.

तिचे हे वाक्य ऐकूण मी सुन्न झालो.माझ्यावर तिचे असणारे निर्मळ प्रेम समोर दिसून येत होते .
तेव्हा ती पुन्हा रडायला लागली, असताना मी तिला समजावून सांगताना माझ्या छातीला तिच्या डोक्याचा भाग लागला. मी नकळत कळत आई ग....!!
बोलून गेलो तिने लगेच काय झाले..? विचारले आता ही गोष्ट लपवण्यासारखी नव्हती. मी आजपर्यंत तिच्यापासून काहीच लपवले नव्हते , त्यामुळे मी ह्या मंतरलेली काळरात्र जशीच्या तशी तिला सांगितली ,
पूर्ण एकूण झाल्यावर ती पूर्ण पणे सुन्न झाली होती. ती पुन्हा भानावर येत काही न बोलताच पुन्हा सर्व जखमांवर हळद लावून साडीच्या कापडाने मला पाठीला आणि छातीला गुंडाळले.

आता घराबाहेरील वातावरणही शांत झाले होते आणि मुलाचा हसलेला आवाज स्पष्ट कानावर येत होता,
तिने हातात तो लोखंडी भाला घेतला.
त्यावरचा लिंम्बू कापडात गुंडाळलेला पहिला आणि मला म्हटली त्या आईचे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण इतक्या रात्री त्यांनी लक्षपूर्वक ही गोष्ट तुमच्या सोबत दिली ह्या
"मंतरलेल्या रात्री हा मंतरलेला भाला"
सोबत होता म्हणून सगळं ठीक झाले. उद्या त्यांची भेट आपण दोघेही घरी जाऊन घेऊयात तसा मी तिला होकार दिला......!!!!.

..............आजीने आम्हाला ही कहाणी सांगताच आम्हाला आमच्या पंजी आजी आजोबांन बद्दल खूप अभिमान वाटायला लागला ते किती शूर होते ते आज आम्हाला स्पष्ट जाणवत होते. ही कहाणी ऐकताना बाहेरचा पाऊस खूप कमी झाला होता आम्ही इतके मग्न झालतो, ही कहाणी ऐकताना की , आम्हाला बाहेर पाऊस कमी झालेलाही कळला नाही. बहुदा आता पहाट झाली असावी असे वाटत होते. आणि आता खूप गरम होत होते म्हणून आईने खिडकी उघडी केली आणि त्यातून आता थंड हवा घरात येण्यास सुरुवात झाली आता कुठे गरमायचे कमी झाले तसे पाहता घरात येणारी हवा तशी वेगानं येत होती पण आश्चर्य म्हणजे चिमणीची पेटलेली वाट किंचितही हालत नव्हती तिच्यावर त्या हवेचा काहीच परिणाम होत नव्हता ती खंभीर पणे रात्री पासून आता पर्यंत प्रकाश देत आली होती,
भूतकाळात घडलेली कहाणी पुन्हा घडू नये म्हणूनच पंजी आजी आणि आजोबा ह्या चिमणीच्या प्रकाशमार्फत आपल्याला ह्या काळरात्री ची साथ देत आहेत ते दोघे हे जग सोडून आज कित्येक वर्षे झालती पण आजही ते आमच्या मागे खंभीर पणे उभे आहेत असे वाटत होते , त्यांचे अस्तित्व आजही घरात टिकून होते ह्या चिमणी मार्फत.
आजही आम्ही दिवाळीच्या सणाला घराच्या बाहेर लावणाऱ्या आकाशकंदिलमध्ये विजेचा दिवा न लावता त्यात आम्ही आजही चिमणी लावत आहोत,
ही चिमणी फक्त अंधारात प्रकाश देणारी नसून आपल्या अंधारमय जीवनही प्रकाशमय करण्याची तिच्यात ताकत आहे.
ताजमहाल जसे एका पतीचे पत्नीबद्दल असणाऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे; त्याहीपेक्षा ही चिमणी पूर्ण कुटुंबाचे प्रेमाचे प्रतीक आहे, त्या चिमणीची किंमत आज आमच्यासाठी ताजमहलपेक्षा मोठी आहे.
ह्या गोष्टीला आता खूप काळ लोटला आहे आमची आजी ह्या जगात नाही आजोबा तर आम्ही लहान असतानाच देवा घरी गेलते, आमचे वडील मिलिटरी रिटायर्ड होऊन आज बरीच वर्षे झालीत आता आई वडील दोघेही थकले आहेत, ते दोघेही आमच्या सोबत असतात आम्ही दोघे भाऊ आजही एकत्र आहोत खरं तर तो गावातील जुने रघु चे दुकान व घर आता मोडकळीस आले असून खूप पडझडं झाली आहे .
ते चिंचेच झाड मात्र आजही तसेचे विस्तीर्ण स्वरूपात आहे .
तो कच्चा रस्ता आज पूर्ण पणे बदलाय तेथे पूर्ण डांबरी रस्ता आज निर्माण झाला आहे आणि अहोरात्र तेथे त्या रस्त्यावर आम्ही पणजोबांच्या आठवणीत पथदिवे चालू ठेवतो आजही,
तसेच आमच्याकडे आजी आजोबांचे आठवणीसाठी फोटो आहेत पण पंजी आजी आजोबांची आठवण म्हणून त्यांची ती नवी कोरी चिमणी आजही आम्ही गावी गेल्यानंतर पेटवत असतो सर्व कुटुंम्ब एकत्र असल्यावर आम्ही सर्व लाईट बंद करून ह्या चिमणीच्या प्रकाशात जेवण करतो तसेच रात्रीच्या गप्पा गोष्टीही ह्या चिमणीच्या प्रकाशात .
आजही ती चिमणी गावाकडे तशीच आहे पूर्वीसारखी.....!!

.........अविनाश लष्करे.