Final Wish of Ganeshrao books and stories free download online pdf in Marathi

गणेशरावांची इच्छा

बसस्थानकावर जायला निघालो तेवढ्यात गावातील प्रतिष्ठित, उच्चख्याती असे गणेशराव, ह्यांची भेट घडली ते नेहमी अनवाणी दिसायचे आणि आजही ते अनवाणीच कुठेतरी जात होते. त्यांना पाहून मलाही प्रश्न पडायचा, की ह्यांनी आजवर चप्पल का घातली नसावी. म्हणून मग या प्रश्नाचे उत्तर आज विचारूनच घायचे असे मी ठरवले.
सुरुवातीला त्यांच्याशी कसे बोलावे हे ही उमगत नव्हते. माझे विचार चालू असतानाच ते पुढे निघताना दिसत होते. आपण वेळ गमावून बसू म्हणून मी त्यांना हाक मारली..
मी:- "राम राम गणेशभाऊ"
ते:- राम राम, राम राम, कस चाललंय सगळं मजेत ना,
मी:- हो हो सर्व आनंदी आनंद
मी:- माफ कराल पण मला एक प्रश विचारायला होता , तुम्हाला काही त्रास नसेल तर..
ते:-हो हो विचारा विचारा, पण जरा लवकर हा मला घाई आहे थोडी,
मी:- मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा
ते:-बर विचारा
मी:- "किती वर्षे होऊन गेली, मी तुम्हाला पाहत आलोय. तुम्ही नेहमी अनवाणीच फिरताना दिसता. पायाला काही होईल याची भीती वाटत नाही वाटत का कधी?"
ते काही वेळ थांबले आणि दिर्घश्वास घेत उत्तरले.
ते:-"तस काही नाही हो लहानपणापासूनच चप्पल घालून फिरण्याची मला सवय नाही नि आवडही नाही, कारण जेव्हाही मी चप्पल घालून फिरायचा प्रयत्न करायचो तेव्हा मला माझ्या आईला, माझ्या मातीला स्पर्श करता येत नव्हता पण या उलट जेव्हा मी अनवाणी चालत जायचो तेव्हा पायांना मातीचा स्पर्श होताच अंगात वेगळाच रोमांच तयार व्हायचा.. मग कुठलीही गोष्ट, कुठलेही काम करत अंगात नवीन स्फुर्ती आणि आत्मविश्वास बळकट व्हायचा. त्यामुळे मी चपलेचा त्याग केला"
त्यांचे उत्तर ऐकून कुणी वेळ निघावं म्हणून एखादी गोष्ट सांगावी असे वाटले. पण मुळात तसे काहीच नव्हते, कारण त्यांनी आजवर केलेली सर्व समाजपयोगी कामं ही अनवाणी राहूनच केली आणि त्यामुळे त्यांची महती कौतुकाने आसपासच्या गावांमध्ये पसरत होती.
एवढं बोलून ते निघून गेले. त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कार्याचा आढावा मिळावा म्हणून मी प्रकाशरावांना भेटलो. प्रकाशराव हे त्यांच्या बालपणापासूनचे मित्र. प्रत्येक कार्यात त्यांच्या सोबत राहणारे. प्रकाशरावांनी त्यांच्याबद्दल सांगताना तोंडभरून कौतुक केले. त्यांचे कार्य, त्यांचे गरीब जनतेशी असलेला लडिवाळपणा, त्यांच्यासाठी झटण्याची असलेली इच्छा, आणखी इतर कामांची त्यांनी महती माझ्यासमोर ठेवली.
‎प्रकाशरावांनी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली, "गणेशराव प्रसिद्धीच्या नेहमीच दोन हात दूर असत. त्यामुळेच तुम्हाला एवढं सारं ऐकायला माझ्यापाशी यावं लागलं. नाहीतर आपल्याबद्दल सांगायला कोण टाळेल.पण त्याचं कार्य हे प्रसिद्धीस पात्र ठरत असेल तर त्याला कोण रोखू शकणार..
‎गणेशरावांची एक गोष्ट होती जी त्यांना लोकांमध्ये राहण्यास मदत करायची, ती म्हणजे गणेशरावांना कुठल्याही विषयावर बोलायला म्हंटल ते सहजतेने भाषण देऊ शकत होते.. त्यांना भाषण देताना जास्त विचार करण्याची गरज भासत नसे.. त्यांच्या भाषणांकरिता तर त्यांना कितीतरी पुरस्कार मिळत असत आणि त्यांच्या भाषणा करीत लोक दूर दूरच्या गावांतून हजेरी लावायचे. ही त्या गावकरिता असलेली अभिमानास्पद बाब.
‎त्यांना मिळत असलेली प्रसिद्धी ते कधीच कुणासमोर उघडी करत नसत. त्यांच्या ह्या स्वभावाचे सर्वांनाच आश्चर्य वाटायचे. एवढे सारे असून सुद्धा ते सरळ साधे रहायचे एखाद्या सामान्य माणसासारखे सामान्य आयुष्य जगत.
गावातील मंदिराजवळील उंबराच्या सावलीत दुपारच्या वेळी जणू एक सभाच भरायची. दुपारी वेळ निघावी म्हणून गावातील त्यांच्या वयाचे इतर जेष्ठ नागरिकही त्यांना आवर्जून आग्रह करायचे आणि त्यांच्या आग्रहास्तव गणेशरावही तयार व्हायचे. दररोज नवनवीन विषयांवर भाषण व्हायचे, त्यावर लोकांना पडलेले प्रश्न, आणि गणेशराव त्यांना सोडवता दुपारची वेळ निघून जायची.
‎त्यांनी मिळवलेल्या ख्यातीचा त्यांना कधीच गर्व म्हणून वाटला नाही. ते गावातील प्रत्येकाच्या कार्यात मदतीला येत असत.त्यामुळे त्यांचे कुठले काम असले तर कुणीही मदतीला धावून येत असत. त्यामुळे त्यांचे कुठलेही काम असले तर कुणीही मदतीला धावून येत असे.
‎वाढत्या वयानुसार त्यांच्या शरीरानेही हळू हळू साथ सोडायला सुरवात केली होती. त्यामुळे त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी अधून मधुन भेटीला येत असत. पण त्यांनी त्यांचा नित्यक्रमाला कुठेही त्रास होऊ दिला नाही
‎तसेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर होते. त्यांच्या सवयी त्यांच्या स्वभाव आयुष्यात स्वतःवर लादलेली नियमं ह्या सर्व गोष्टी पाहून समोर उभा असलेल्या व्यक्तीच्या मनात आपोआपच त्यांच्याबद्दल आदर वाढत जातो
‎बाहेरच्या जगात जरी त्यांचे आयुष्य सुंदर असले तरी त्यांचे संसारिक आयुष्य हे त्यांच्यासाठी नेहमीच दुःखदायी होते. आयुष्यात माणसाने कितीही सुखोत्सव साजरे केले तरी एखादी गोष्ट नेहमीच दुःख देण्याचे काम करते. त्यानुसार गणेशरावांना त्यांचे कौटुंबिक कलह त्रासावून सोडायचे.शैतानाची पिल्लं जणू पाठीशी लागून असतात. आनंदी क्षण पहायला मिळाला कि त्यालाही ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कलहामुळे त्यांची मुद्रा पाहताना कठोरच दिसायची. चेहऱ्यावर हास्यरेषा क्वचितच दिसुन यायच्या. कुटुंबात मुलगा, मुलगी आणि बायको असा लहानसा परिवार. काही काळ सुरळीत होता. बापानी कमावलेली प्रतिष्ठा पाहून मुलाला मोह आवरला नाही. मुलगी लग्न होऊन तिच्या संसारात व्यस्त झाली. मुलाला बापाने तो म्हणेल ते सर्व द्यावे म्हणून नाराज बायकोनेही नवऱ्याशी काडीमोड घेतली. तीही घरात असूनही घरात नसल्या सारखी रहायला लागली. जगाच्या व्यासपीठावर सर्वकाही मिळवणारा माणूस खाजगी आयुष्यात स्वतःच्याच मुला बाळांपासून प्रेम मिळवू शकला नाही. ह्या गोष्टीपासून होणारा त्रास हा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पणे दिसुन येत असे...
त्यांच्या बद्दल माहिती व्हावे म्हणून त्यांच्या मित्रांना नानासाहेबांना भेटलो, नानासाहेब त्यांचे अत्यंत जवळचे मित्र सोबत शिकलेले, सोबत राहिलेलं त्यामुळेच नानासाहेब त्यांची परिस्थिती चांगली ओळखून होते. नानासाहेब त्यांचे लंगोटी यारच. त्यांच्याकडून बरेच काही माहिती झाले,
गणेशराव नुकतेच घरातून बाहेर पडले होते, कदाचित आज परत त्यांच्याशी बोलण्याची वेळ जुळून येत असावी.. पण मन चाचपडत होते , सुरुवात कशी करावी हाच मोठा प्रश्न पडला होता, आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला त्यांनी नकार दिला तर ? पण त्यांची एकंदरीत परिस्थिती मला त्रासवून सोडायची. त्यामुळे आपण त्यांच्या जवळचेच आहोत असे भासवन विचारपूर करावी असे ठरवले, त्यांच्या खाजगी आयुष्यात मी डोकावल्यामुळे कदाचित. ते नाराज होतीलही पण विचारणे भाग होते.
गणेशरावांना मी थांबवल नि म्हंटल "राम राम गणेश भाऊ, सर्व मजेत ना"
"हो हो सर्व मजेत, बोला कसा काय वेळ काढलात"
मी:-"काही नाही जरा गप्पा माराव्याशा वाटत होत्या तुमच्या सोबत म्हणून हाक मारली, तसा काही त्रास वगैरे तर नाही ना"
ते:- नाही नाही बोला आज पाराजवळ जाईपर्यंत वेळ आहेच माझ्याकडे, तसा एकटाच जाणार होतो, बरं झालं तुम्ही भेटलात.
मी:-मी तुमच्या कुटुंबातील काही गोष्टींबद्दल जाणून आहे, ऐकून दुःख झाले आणि हो मला माफ कराल मी तुमच्या परवानगी शिवायच विचारपूस केली, तुमच्या मुलाची वागणूक आणि त्याचा आई ह्या दोघांची मला वाईट वाटल्या, तुम्ही ह्यावर काही करणार नाहीत का?
त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव बदलले, ते थोडे उदास झालेलं वाटत होते आणि ते पुढे बोलले
ते:-काय करणार अश्या गोष्टींवर आयुष्यातली काही उरली सुरली वर्ष माझ्या हाती राहिलेत माझे आणि तरी या उतार वयात कुठे कुठे लक्ष देणार.
मी:- हो हे ही बरोबर म्हणावं, पण शेवटी ते तुमचेच कुटुंबीय आहेत, तुमच्या बाबतीत त्यांचे असे वागणे बरोबर नाही.
ते:- माणसाच्या मनगटात ताकद असेल तो वर तो समोरच्याला झेलतो, समजवतो. पण बाकी त्यांच्यावर आहे ते किती समजून घेतील तर
मी:- हो शेवटी त्यांच्यावरच अवलंबून आहे,

चालता चालता पारापर्यंत पोहचलो आणि चर्चा थांबली आजही वडाच्या पारंब्या चौफेर पसरलेल्या होत्या रणरणत्या उन्हापासून थोडासा दिलासा देत उभ्या होत्या. नेमकं जे बोलायचं होतं ते राहूनच गेलं. नाना साहेबांनी त्यांची परिस्थिती जेव्हा सांगितली तेव्हा त्यांचा मुलगा म्हणून मला जगण्याची इच्छा झाली. गणेशरावांची ही परिस्थिती मला पहावत नव्हती, त्यांच्याबाबतीत दिवसेंदिवस आदर वाढत होता, अधून मधून त्यांच्या तब्बेतीबद्दल माहिती होत रहावं म्हणून त्यांच्या जवळच्या लोकांशी मी हितगुज वाढवले, त्यांच्या घरासमोरून जाणेही मी हळूहळू वाढवले. घरा समोरून जाताना कधी मोठ्याने आवाज ऐकू यायचे तर कधी स्मशानातली शांतता भासायची. त्यांना त्यांच्या वाढत्या वयाची त्यांच्या तब्बेतीची त्यांच्या आप्तांना काहीच काळजी नसल्याचं दिसून यायचं, अश्या परिस्थितीत ते जगत असताना त्यांच्या साठी खूप काही करण्याची इच्छा असायची व त्यांच्या खाजगी आयुष्यात कुण्या परक्याला का ते सामावून घेतील, माझ्यासाठी हाच एक मोठा प्रश्न होता.वेळ कासवगतीने सश्यासारखा पळत होता, पण त्यांचं आजारपण त्यांच्या शरीराला सोडायला तयार होत नव्हतं, आजारपणात घेण्यात यायला हवी तशी त्यांची काळजी घेतली जात नसावी म्हणून त्यांची आज अशी परिस्थिती दिसत असावी.
काही दिवस उलटले, पारावर बसलेलो असताना वकील आणि त्याचा कारकून गणेशरावांच्या घराकडे जाताना दिसले, कदाचित ते त्यांचे मित्र वगैरे असतील म्हणून त्याला भेटायला आले असावे अस वाटलं, मग आजूबाजूला बसलेल्या वयस्कर गृहस्थांकडून कळलं की गणेशरावांनी त्यांना आपलं मृत्युपत्र तयार करण्यासाठी बोलवून घेतलं आहे त्यांनंतर तीन ते चार दिवसांपर्यंत वकील त्यांच्याकडे येत गेले हे पाहता पारावरची मंडळीच अचंबून रहायची. मग त्यावर आपले विचार मांडत कुठलीतरी तर्क लावून शांत व्हायचे, आपला वेळ खर्ची जावा म्हणून त्यांना कुठलाना कुठला विषय हवाच असे, गावातला पार जणू असे ठिकाण की जिथे सर्व प्रश्नांना उत्तर मिळे, सर्व प्रकरणांना मार्गी लावण्याचे ठिकाण म्हणजे पार असे, त्यानंतर दोन दिवसांनी गणेशरावांची तब्बेत आणखी खालावल्याने कानावर आले, त्यामुळे त्यांना जवळच्या शहरातील दवाखान्यात हलवण्यात आले होते, हळू हळू तिथेही नातेवाईकांची, गावातील लोकांची त्यांना भेटण्यासाठी गर्दी वाढत होती, पुढल्या काही दिवस त्यांच्यावर चालू होती, तब्बेत अधून मधून कमी जास्त होताना पाहून सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकत होता, जवळपास त्यांनी आठवडाभर आजाराशी झुंज दिली
एवढ्या दिवसांत मी ही त्यांना तीन एक वेळा जाऊन भेट दिली.
पण अखेर दहाव्या दिवशी गणेशरावांची हृदयाची धडधड अचानक बंद पडली, त्यावेळी फक्त त्यांची बायकोच त्यांच्या जवळ होती, सुवर्णकाळाचा शेवट झाला होता, देवळातली अखंड ज्योत मालवली होती.
दहन देऊन झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच वकील त्यांच्या मृत्युपत्राबद्दल सांगायला घरी आले. तेव्हा गावातील काही लोक आणि त्यांचे आप्त तिथे हजर होते. गणेशरावांनी आपल्या मृत्यपत्रामध्ये आपले घर सोडून सर्व मिळकत आपली मालमत्ता गावातील शाळेच्या नावावर आणि काही संस्थानांच्या नावे केल्याची नमूद केले होते.
आयुष्यभर मिळवूनही माणूस एका गोष्टी पासून आपोआप दूर झाला. इथे परत एकदा पैसा नात्यांच्या आड आला.