Ahamsmi yodh - 9 books and stories free download online pdf in Marathi

अहमस्मि योधः भाग - ९

स्नेहा त्या कागदावरच मजकूर वाचून जागीच गोठल्यागत झाली होती.

" अरे यार..स्नेहा आपल्याला थोडा वेळ इथेच थांबावं लागेल इंजिन खूप गरम झालाय..त्यामुळे गाडी स्टार्ट होत नाही.." - समीर म्हणाला.

स्नेहाचं काहीच प्रतिउत्तर आलं नाही..

" स्नेहा.... स्नेहा.." - समीर ने पुन्हा आवाज दिला..

त्याने बोनेट लावून घेतला..स्नेहा त्या कागदाकडे निरखून पाहत होती..हे बघून समीर घाबरला..

" स्नेहा काय बघतेस तू..? ठेवून दे ते..काही नाहीये त्यात.." - समीर अडखळत्या स्वरात म्हणाला.

"थांब समीर..गेली काही दिवस तुझ्या वागणयातला बदल मला जाणवत आहे..तू असा कधीच नव्हतास..काही प्रॉब्लेम होता तर मला आधीच सांगायचं ना.." - स्नेहा.

"तू काय बोलतेस..मला काहीच कळत नाही.." - समीर मुद्दाम माहीत नसल्यासारखा बोलत होता.

"तू..नको बोलू पण ह्या कागदाने सगळं सांगितलंय मला.." - स्नेहा.

"तुला ब्राह्मी लिपी वाचता येते..? " - समीरने आश्चर्याने विचारले.

" हो.." - स्नेहा.

तेवढ्यात स्नेहाला फोन येतो..
" हॅलो..हा बाबा बोला ना..आम्ही पोहचू अर्ध्या तासात..तुम्ही काळजी करू नका.." - स्नेहा.

" काय.." बाबांचं उत्तर ऐकून स्नेहा एकदम जोरात म्हणाली.." बरं.. ठीक आहे.. मी जाते.."

"समीर..पुढे नदीला पूर आलंय आणि बऱ्याच ठिकाणी रस्ता ही खचला आहे.आपल्याला पुढे जाता येणार नाही.." - स्नेहा.

" मग आता.." - समीर.

" मी तुझ्यासोबत येत आहे..पुर ओसरला की बाबा येतील मला घ्यायला.." - स्नेहा.

" ओक्के.." - समीर.

"समीर..हा कागद तुझ्याकडे कुठून आला..? काय झालंय सगळं सांग मला.." - स्नेहा.

" बरं.. आता तूला सगळं कळलाच आहे तर सांगतो.." - समीर.

समीरने गेल्या काही दिवसात घडत असलेल्या सगळ्या गोष्टी स्नेहाला सांगितल्या आणि कोकणात येण्याचा खरा मनसुबा ही स्पष्ट केला..स्नेहा सगळं ऐकून थक्क झाली..

काही क्षण शांततेत गेले..

" एवढं सगळं झालं..आणि तू एका शब्दाने ही माझ्याशी बोलला नाहीस.." - स्नेहा.

" तुला उगाच त्रास नको..म्हणून नाही सांगितलं..पण आता काय लिहलंय ह्यात ते सांग ना मला.." - समीरची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

" ह्या कागदा वरचा मजकूर अर्धवटच आहे..आणि घाईघाईत लिहलंय असं वाटतयं..ह्याची अजून काही पानं असावीत..

" खूप मोठा अनर्थ झाला आहे. महाराजांच्या एका चुकीच्या पावलांनी सगळ्यांचे जीव धोक्यात आले आहे.वेळ खूप कमी आहे."

" एवढंच लिहलय..अजून काही आहे का..? " - स्नेहा.

" हो..एकूण अशी दोन - तीन कागदं आहेत.." - समीरने घाई घाईने बॅग उघडली आणि शोधू लागला पण काही सापडलं नाही..

" आपण घरी जाऊन शोधू.. आता आपल्याला इथून निघायला हवं.." - समीर.

समीरने गाडी चालू केली..एक दोन स्टार्टर देताच गाडी चालू झाली.. एक दीड तास लागणार होता घरी पोहचायला.. दोघं ही शांतच बसले होते..दिवसभर प्रवास करून थकवा जाणवत होता..स्नेहाचा बसल्या बसल्या डोळा लागला..तिला जाग आली तेव्हा अकरा वाजून गेले होते..अजून वाड्यावर पोचायला पाच सहा मिनिटं लागणार होती..

लांबून गाडी येताना दिसताच मंगेश गेट जवळ येऊन उभा राहिला..त्याने गेट उघडला , समीरने गाडी आत लावली..आणि दोघं गाडीतून उतरले..टॉमी ही पटकन उडी मारून बाहेर उतरला.

" अरे..दादा ताई ला घरी नाही सोडलं..?" - स्नेहाला गाडीतून उतरताना पाहून मंगेशने विचारले.

" अरे..काय सांगू..!! ठिकठिकाणी रस्ता खचला आहे..आणि दिवस भराच्या पावसामुळे नदीला पूर ही आलंय..म्हणून तिचे बाबा म्हणाले की काही दिवस इथे थांब..नंतर ते स्वतः येणार आहेत तिला घेऊन जायला.." - समीर मंगेश ला म्हणाला.

"" बरं..दादा तुम्ही फ्रेश व्हा..मी जेवायला वाढतो.." - मंगेश गाडीतून सामान काढत म्हणाला.

" थॅन्क्स.. यार मंग्या खूप मदत केली तू..आणि दिग्या कुठे आहे..?" - समीर.

" तो जेवून झोपला कधीच..खूपच दमलेला तो.." - मंगेश.

तिघे ही घरात निघून जातात..थोड्यावेळाने फ्रेश होऊन जेवण वगैरे करून घेतलं..

" खूप रात्र झाली आहे..आपण उद्या सकाळी बोलू.. गूड नाईट..काही लागलं तर आवाज दे.." समीर स्नेहाला म्हणाला.

एका खोलीत स्नेहा..आणि बाजूच्या खोलीत समीर , दिग्या आणि मंगेश. मंगेश काही दिवस त्यांच्या सोबत तिथेच राहणार होता..
.

.

.

ती रात्र भूतकाळात जमा झाली..सकाळी जाग आली तेव्हा बाहेर स्मशान शांतता पसरली होती..एरवी निरनिराळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण व्हायचे..पण ही सकाळ जरा वेगळी होती.. तणावपूर्ण..अचेतन..कदाचित हे सगळं त्या विचित्र नक्षत्राचे परिणाम तर नाही ना..!

सगळे नाश्त्याच्या टेबल वर भेटले..दिग्याने स्नेहा बद्दल विचारले तेव्हा कालचा प्रसंग समीरने त्याला सांगितला.चाहा नाष्टा झाला. आता कामाला सुरुवात करायची होती..समीरने ती कागदं स्नेहा समोर आणून ठेवली. स्नेहा काळजी पूर्वक ती कागदं पहात होती आणि त्यातला अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होती..

त्या कागदांवर काय लिहलं आहे हे जाणून घेण्यासाठी समीर आणि दिग्या ची उत्सुकता पराकोटी ला पोहोचली होती..त्याच वेळीस आपण एका भयंकर रहस्याचे अर्धवट माहिती असणारे का होईना, भागीदार झालो आहोत, ही जाणीव मांगेशला अस्वस्थ करीत होती.

स्नेहा बोलू लागली..
" ही प्रत किमान दोन हजार वर्ष जुनी आहे हे मी खात्रीने सांगू शकते..मला प्रचीन लिप्या व भाषांचे थोडेफार ज्ञान आहे.. या भाषा मला थोड्याफार प्रमाणात समजतात.. माझ्या आज्जीने मला हे शिकवलं होतं..तेव्हा वाटलं नव्हतं की कधी कामी येईल.."

तिने कागदावरच मजकूर वाचायला सुरुवात केली..

२३२ ई.सा.

आम्ही प्रल्हादपंत , हे पत्र लिहायचे कारण असे की आम्ही सगळेच एका विचित्र संकटात अडकलो आहोत. प्रसंग बाका आहे. आम्ही जिवंत माघारी येऊ याची ही शाश्वती नाही. हे संकट इतक्यात संपणार नाही हे निश्चित. भविष्यात ते पुन्हा उद्भवणार म्हणून हा पत्र लिहण्याचा खटाटोप. मार्गदर्शन म्हणून आमच्या लक्षात आलेल्या काही गोष्टी आम्ही मुद्देसूद नमूद करीत आहोत. हे पत्र युवराज विरेंद्रराजे यांच्या कडे पोहचेल अशी व्यवस्था आम्ही करू.
विक्रमगड ह्या अफाट आणि समृद्ध साम्राज्याचे आम्ही प्रधानपंत. या साम्राज्याचे महापराक्रमी सम्राट म्हणजे महाराज नंदक यांच्या आम्ही खास मर्जीचे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी ते आमचा सल्ला नक्की घेत असत. प्रजेवरही त्यांचे फार जीव. त्यांच्या राज्यात प्रजाजन सुखाने नांदत होते. एके दिवशी महाराजांनी नवीन मोहीम हाती घेतली. शेजारच्या राज्याचा क्रूर आणि भ्रष्ट राजा होता भद्रसेन. त्या राज्यात चालत असलेल्या अन्याय आणि क्रूर्तेचे किस्से महाराज नंदक यांनी ऐकले होते. म्हणून ते राज्य आपण आपल्या साम्राज्यात सामील करून तिथल्या प्रजेला सुखी समाधानी करायचे असा महाराजांचा मनसुबा होता. झालं ही तसचं..दोन्ही राज्यात घमासान युद्ध झाले. भद्रसेन राजाचे पराभव झाले. त्याचे सैन्य कापून निघाले. तिथली प्रजा सुखावली. युद्धात खुद्द महाराजांनी जातीने सहभाग घेतला होता. पण दुर्दैवाने ते खूप जखमी झाले. शरीराच्या प्रत्येक भागात जखम झाली होती. महाराजांची प्रकृती पाहता त्यांनी प्रवास करणे योग्य नव्हते. आमची छावणी त्या राज्याच्या वेशीवरच पडली. बरेच दिवस उपचार सुरू होते पण महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. वैद्य बुवांनी हात वर केले. तेव्हा अचानक एका दिवशी तिथे दुर्जयनाथांचे आगमन झाले. काळा पोशाख , लाल भडक डोळे , वाढलेल्या जटा, हाती एक सोटा ज्यावर मानवी खोपडी लावलेली होती. त्यांनी महाराजांवर उपचार करण्याची अनुमती मागितली. ती त्यांना मिळाली. काही दिवसात महाराज पूर्णपणे बरे झाले. दुर्जयनाथांवर महाराज खूप खुश होते. आभर म्हणून त्यांना खूप मोठी रक्कम देऊ केली पण ती दुर्जयनाथांनी नाकारली. वेळ आल्यावर आम्ही स्वतः आपणास पत्र पाठवू असे ते म्हणाले. एक वर्ष उलटुन गेला अचानक दुर्जयनाथांचे पत्र आले त्यांनी महाराजांना तातडीने बोलवून घेतले होते. पण आमच्या मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इषारा मिळात होता.आमच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तोक्ष्णतेने परिस्थितीचा संकेत देत होत्या. आम्ही महाराजांच्या समोर आमचे मन मोकळे केले परंतु त्याचा उपयोग झाला नाही. महाराज गेलेच. दोन - तीन दिवसांनी ते माघारी आले. पण ते आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. आपले राज्य आणि प्रजा अजून समृध्द होणार आहे असे ते सारखे म्हणत. त्यांच्या आणि दुर्जयनाथांच्या भेटी वाढल्या. दुर्जयनाथ अनेक वेळा राजवाड्यात येत असत. बंद दाराआड तासंतास महाराज आणि दुर्जयनाथ यांच्या मध्ये खलबतं होत. आम्हास हे सगळे पटत नव्हते. सेनापती रुद्रस्वामींना आम्ही अनेकदा सांगितले परंतु त्यांनी आमचे मत फार मनावर घेतले नाही. महाराज योग्यच निर्णय घेतील आणि प्रजा सुखी होणार असेल तर यात वावगं काय असे प्रश्न ते आम्हालाच करीत. एकदा दुर्जयनाथांनी महाराजांना समुद्राच्या किनारी एक राजवाडा बांधण्यास सांगितले. ती जागा राज्यापासून खूप लांब होती. महाराजांनी राज्याचे सगळे सूत्र आमचे हाती दिले आणि युवराज वीरेंद्रराजे यांचे मार्गदर्शन करण्यास सांगितले. रुद्रस्वामी ही महाराजांच्या सोबत गेले. राजवाडा तयार झाला. अमाप खजिना घेऊनच महाराज माघारी येतील असे निरोप घेऊन रुद्रस्वमी परतले होते. बरेच दिवस निघून गेले महाराज परतले नाही. आमची काळजी वाढत होती. जी शंका आम्ही मनात बाळगून आहोत ती खरी तर ठरणार नाही ना असे अनेकदा वाटे. म्हणून दृढ निश्चय करून आम्ही महाराजांचा शोध घ्याला निघालो. राजवाड्याच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. पण तिथे महाराज दिसले नाहीत. त्या वाड्यात एक तळघर होते. खाली उतरून पाहिले तर त्यात सात दरवाजे होते.या व्यतिरिक्त आणखी एक दरवाजा होता कोणाच्याही तो सहजासहजी दृष्टीस पडू नये अशीच त्याची निर्मिती केली होती. पलीकडून हालचाल जाणवत होती कर्कश किळसवाणे आवाज येत होते. कोणीतरी जोरात त्या दरवाज्यावर थाप मारत होते. बाहेर येऊ पाहत होते. आमच्या शरीराला कंप सुटले.या गोष्टीचा तळाशी धूर्त दुर्जयनाथच आहेत हे आम्हास कळून चुकले. आम्ही तसेच माघारी आलो. येताना आम्हाला अवगत असलेल्या काही सिद्धींचा वापर करून एक दिव्याशक्तीचे चिन्ह बनुवून घेतले आणि त्या दरवाजाला लावले जेणेकरून तो दरवाजा काहीकाळ अजून बंद ठेवता येईल. पुन्हा आमच्या राज्यात येऊन आम्ही रुद्रस्वमींना सगळी हकीकत सांगितली. त्यांना त्यांच्या वागण्याचे पश्र्चाताप झाले. पण आता खूप उशीर झाले होते.खजिन्याच्या लोभापाई महाराजांनी संपूर्ण मानव जातीचे अस्तित्व धोक्यात टाकले होते.वेळ खूप कमी होते माघारी येऊन आम्ही जमेल त्या पद्धतीने माहिती मिळवण्याचे प्रयत्न केले.काही साधू पंडितांची भेट घेतली. त्या संदर्भातले पुरातन लेख वाचले. त्या वरून असे समजले की ते सात दरवाजे म्हणजे पृथ्वीच्या खाली असलेले अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल या सात विवरांकडे जाणारी मार्ग होती आणि ते छोटे द्वार होते अग्निघर कडे जाणारे. अग्निघर म्हणजे दुष्ट शक्तीचे, अंधाराचे, असुरी आत्म्यांचे साम्राज्य.महादेवाने असुरांच्या विरुद्ध युद्ध पुकारून त्यांना पराजित केले तेव्हा बऱ्याच असुरांना इथे बंद केले. असुर पराजित झाले पण मारले गेले न्हवते. अग्निघराच्या मध्यात एक अखंड जळणारी प्राणज्योत आहे हीच त्या असुरांना शक्ती देते. हे समजल्यावर आम्ही पुरते हादरून गेलो होतो.पण संकटाला तोंड देणे हा शेवट चा पर्याय.दुर्जयनाथ हे या असुरांना पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. हे काम एक सूर्यवंशी कुळात जन्म घेतलेले व्यक्ती करू शकत होता म्हणून महाराजांकरवी त्यांनी हे करून घेतले. असं म्हणतात की वितल लोक मधे महादेव स्वतः हाटकेश्र्वर अवतारात विराजमान आहेत . तिथेच हाट नावाची एक सुंदर नदी वाहते. त्या नदीचा पाण्याला सुवर्णजल असे म्हणतात. हे सुवर्णजल अग्निघरतील प्राणज्योती वर टाकले की पुन्हा त्यांची शक्ती निकामी होईल.असे झाल्यास पुन्हा काही हजार वर्षांसाठी मनुष्य जातीला धोका नाही. आम्ही आता निघत आहोत. ह्या संकटाला तोंड देत आमचे प्राण गेले तरी चालतील पण आम्ही मागे हटणार नाही..

प्रल्हादपंतांचा लेख संपला होता.त्याच बरोबर ग्रहांची स्थिती, पंचांगातील काही तिथी व इतर काही गोष्टी नमूद केलेल्या होत्या.प्रल्हादपंत यशस्वी झाले असतील पण कदाचित यात त्यांचा मृत्यू झाला असावा म्हणून या पुढे काय झाले हे लिहलेले नव्हते.

सगळेच भयचकित नजरेने एकमेकांकडे पहात होते.

.....................................................................................................................................

क्रमशः