Guntata Hruday He - 14 - last part books and stories free download online pdf in Marathi

गुंतता हृदय हे!! (अंतिम भाग)

समीर आणि गौरी मुबंईला पोहोचले..

शास्त्री काकांनी त्यांना आणायला आधीच गाडी पाठविली होती..त्या गाडीचा ड्राइवर गौरीच्या नावाची पाटी घेऊन उभा होता..दोघेही गाडीत बसले..

समीरने मनात विचारही केला नव्हता की, इतक्या लवकर तो परत मुबंईला येईल..

कारण काहीही असुदेत, पण तो पुन्हा मुबंईत आला होता..हे मात्र खरे.. जिथे त्याच्यासाठी सगळीकडे फक्त आर्याच्या आठवणी भरल्या होत्या..

गौरी अजूनही शांतच होती..तिने गाडीमध्ये हलकेच स्वतःचे डोके समीरच्या खांद्यावर ठेवले..समीरने ही तिला आधार दिला..

काही वेळातच गाडी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली..ते दोघे गाडीतून खाली उतरले..त्यांचे सामान गाडीतच होते..

ड्रायव्हरला शास्त्री काकांनी आधीच सूचना दिल्याप्रमाणे तो त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये सोडून त्यांचे सामान घेऊन आर्याच्या घरी ते सामान ठेवायला निघून गेला..

गौरी आणि समीर हॉस्पिटलमध्ये शिरले..

हॉस्पिटलमध्ये आता आर्या एकटीच होती कारण अतिरक्तस्रावामुळे अनिशला रक्ताची गरज कधीही भासू शकत होती..म्हणून रक्त कमी पडू नये याकरता शास्त्री काका आणि जोशी काका रक्ताची सोय करायला ब्लड बँकमध्ये गेले होते..

तसेच स्निग्धा ही नेमकी पाणी आणण्यासाठी खाली गेली होती..गौरी आणि समीर ऑपेशन थिएटर असलेल्या मजल्यावर आले..

इतक्यात गौरीचा फोन कोणाचातरी धक्का लागून खाली पडला म्हणून ती तो फोन उचलायला खाली वाकली..

तितक्यात आर्याची नजर समीरवर गेली..गौरी खाली वाकल्यामुळे आर्याला ती पटकन दिसली नाही..

आर्या समीरला बघून इतकी खुश झाली की, काय करावे काय करू नये असे तिला झाले..

समीर पण आर्याला पाहून शॉकच झाला..काही क्षण जणू त्या दोघांसाठी वेळ थांबलाच होता..दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळले..

इतक्या दिवसांचं मनात साठवून ठेवलेले सगळे काही अश्रूंच्या रुपात बाहेर पडले..

आर्याला स्वतःवर ताबा ठेवणे जणू मुश्किल झाले होते..तिने धावत जाऊन समीरला मिठी मारली व ती खूप रडू लागली..समीरने ही तिला जवळ घेऊन तिचे सांत्वन केले..

आर्याला विश्वासच होत नव्हता की, ती समीरच्या मिठीत होती..

इतक्यात, गौरीने आर्याला हाक मारली..तशी आर्या भानावर आली...

अरेच्चा!!! हे तर स्वप्न होते..

गौरीने आर्याला मिठी मारली आणि ती रडू लागली..समीर गौरीच्या मागेच उभा होता..आर्याने समीरकडे पाहिले..

समीरला काय बोलावे हेच कळत नव्हते..समीरने स्वतःच्या भावनांवर कसाबसा ताबा ठेवला..

इतक्यात तिथे शास्त्री काका आणि जोशी काका ही आले..

आर्याला समिरशी खूप काही बोलायचे होते..पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते..

इतक्यात स्निग्धाही तिथे आली आणि तिने समीरला पाहताच ती शॉक झाली..

ती म्हणाली, "समीर तू इथे कसा काय?? कुठे गेला होतास यार..किती मिस् केलं आम्ही सगळ्यांनी तुला..तुला अनिशबद्दल कोणी सांगितलं??" असे विचारून प्रश्नार्थक नजरेने ती समीरकडे पाहायला लागली..

समीर काही बोलणार, तेवढ्यात गौरी म्हणाली, "समीर माझ्याबरोबर आलाय..अनिश जिजूंबद्दल कळल्यावर मी तातडीने इथे यायला निघाली..म्हणून मला सोबत म्हणून तो इथे आलाय.."

स्निग्धाला काय चाललय हे कळतच नव्हते..ती मनातल्या मनात पुटपुटली, "आता ही बया कोण? आणि ती अनिशला जीजू का म्हणतेय? समीर तिच्याबरोबर काय करतोय? बापरे, माझ्या डोक्याचा आता भुगाच होईल..जाऊदेत बाई..बघूया काय होतंय ते"

इतक्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले..

त्यांनी आर्याकडे बघून हलकीशी स्माईल केली आणि ते बोलू लागले, "घाबरायचे काही कारण नाही..अनिश आता धोक्यातून बाहेर आहे..तो मुक्का मार लागल्यामुळे बेशुद्ध झाला होता..तसेच त्याचे इंटर्नल रक्तही खूप गेले त्यामुळे त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली पण आता तो एकदम ठीक आहे..थोडे हातापायाला बँडेज आहे आणि त्याला काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहावे लागेल..१५ दिवसात तो चालयलाही लागेल..त्याला हॉस्पिटल रूम मध्ये शिफ्ट केल्यावर तुम्ही त्याला भेटू शकता"

हे सगळं ऐकल्यावर आर्या खूप खूप खुश झाली..

तिने अनिशच्या आई-बाबांना फोन करून आनंदाची बातमी सांगितली..आणि घाई न करता सावकाश हॉस्पिटलमध्ये या असे सांगितले..तिने जोशी काकांना ही मिठी मारली..

गौरी आणि समीरही खुश झाले..

थोड्यावेळाने आर्या आणि जोशी काका अनिशला भेटायला आत गेले..अनिश एव्हाना शुद्धीवर आला होता..

त्याने आर्याला जवळ बोलविले आणि तो मंद हसला व म्हणाला, "आर्या मी ठीक आहे आता..प्लीज रडू नकोस"

आर्याने हो म्हटले आणि त्याच्या हाताचा हलका किस घेतला..

इतक्यात गौरी आणि समीर व शास्त्री काका ही आत आले..

अनिशने समीरला पाहताच तो भलताच खुश झाला आणि म्हणाला, "अरे, समीर तू इथे कसा?" त्याच्याबरोबर गौरीला आलेले पाहून तो थोडा चकित झाला.

तो पुढे म्हणाला,"ही गौरी ना!! पण तू समिरबरोबर?"

आर्या बोलू लागली, "मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन..पण आधी तू आराम कर,बाकी गोष्टी आपण नंतर बोलू"

गौरी आणि समीरने ही अनिशचा निरोप घेतला आणि ते दोघे शास्त्री काकांबरोबर आर्याच्या घरी निघून गेले..

मग स्निग्धा आत आली आणि अनिशला भेटून नंतर परत येते असे सांगून ती घरी निघून गेली..

दोन दिवसानंतर....

अनिशला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन २ दिवस झाले होते..आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती..त्याला पूर्ण बरे व्हायला अजून १०-१२ दिवस लागणार होते..

समीर आणि गौरी अनिश ठीक आहे कळल्यावर दोन दिवसातच बँगलोरला परतली..शास्त्री काका आणि काकू अजून काही दिवस मुबंईतच राहणार होते..वेदांत ही त्यांच्याबरोबर मुबंईतच थांबणार होता..

समीरच्या खूप मनात आले की, जायच्या आधी एकदा आर्याला भेटावे..

पण आता पुन्हा त्याला ह्या सगळ्यात अडकायचे नव्हते..कारण गौरीच्या रुपात त्याला त्याचे खरे प्रेम मिळाले होते आणि आता गौरीला तो गमावू शकत नव्हता..

बँगलोरला पोहोचल्यावर समीरने गौरीला सांगितले की, तो आर्याच्या कंपनीत कामाला होता..म्हणूनच स्निग्धाने त्याला ओळखले आणि RJ अमेय म्हणून अनिश काम करत असलेल्या रेडिओ स्टेशनवर सुद्धा तो पार्ट टाईम नोकरी करत होता म्हणून अनिशही त्याला ओळखत होता..

पण एकाएकी कोणाला ही न सांगता त्याने ह्या दोन्ही नोकऱ्या सोडल्या आणि तो बँगलोरला शिफ्ट झाला..म्हणून कदाचित त्याला अचानक पाहून सगळे चकित झाले होते..असे समीर गौरीला म्हणाला..पण..............

त्याच्या खूप मनात येऊन देखील त्याने गौरीला आर्या हीच ती मुलगी आहे..ज्यामुळे तो मुबंई सोडून बँगलोरला आला होता..हे नाही सांगितले..

कारण काहीही झाले तरी आर्या ही गौरीची मामेबहिण होती..म्हणजे अगदी जवळची..म्हणून त्याने ही गोष्ट गौरीपासून लपवून ठेवली..

तसे पण कधी कधी काही गोष्टी ह्या गुप्त राहिलेल्याच चांगल्या असतात..म्हणून कदाचित आर्याही गप्प होती..तिचे खरे प्रेम तर अनिशवरच होते ना!!

अमेय हे तिचे फक्त आकर्षण होतं..ते पण जेव्हा तिला कळले की, अमेय हाच समीर आहे.. तेव्हा ती थोड्यावेळासाठी कन्फ्युज जरूर झाली होती..पण जेव्हा तिला रिअलाइझ झाले की, समीर तर तिचा फक्त जवळचा मित्र होता..प्रेम नाही..तेव्हा ती पुन्हा अनिशमध्ये हरवून गेली..

प्रेमाचं कसे असते ना!! ते एकाला दुसऱ्याशी आणि दुसऱ्याला तिसऱ्याशी होऊन जातं..मग ते इतके गुंतते की "गुंतता हृदय हे!! अशी कथा बनते..

(१ महिन्यानंतर मुबंईत)

अनिश आता पूर्णपणे बरा झाला होता..

काही दिवसांनी अनिश आणि आर्याने अगदी साध्या वैदिक पद्धतीने मंदिरात लग्न केले..

अर्थात, घरातील सर्व मंडळींच्या उपस्थितीत..लग्नाला मोजकीच लोकं होती..शास्त्री कुटूंब ही आवर्जून आलं होत लग्नाला..

समीरला अचानक दिल्लीला एक कॉन्फरन्स साठी जावे लागले..म्हणून तो काही उपस्थित नव्हता लग्नाला..

पण त्याने आर्या आणि अनिशसाठी गौरी समवेत शुभेच्छा नक्कीच पाठविल्या होत्या..

एकदाचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले..

आता आर्या जोशीची ऑफिशिअली... आर्या अनिश गोडबोले झाली होती..

~समाप्त~

{नमस्कार वाचकहो,

"गुंतता हृदय हे!! ही कथा मी लिहिताना खरं म्हणजे विचारही केलाच नव्हता की, ती इतकी लोकप्रिय होईल. ह्यासाठी तुम्हा सर्व वाचकांचे खूप खूप धन्यवाद🙏

ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा..तसेच ही कथा तुमच्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा..

नवीन कथा घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईन..तो पर्यंत वाचत राहा..}

©preetisawantdalvi