Bhartiy svatantrayachya nimityane books and stories free download online pdf in Marathi

भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्याने

18. भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्याने

दरवर्षी देशात स्वातंत्र्यदिन साजरा होतो. लोकं तोरणा पताका लावून स्वातंत्र्यदिन साजरा करतात. मग हा दिवस साजरा करीत असतांना कोणी गालावर तिरंगा काढतात. कोणी हातावर तर कोणी चक्क डोक्याचे केस कर्तन करीत स्वातंत्र्यदिनाचा आनंद दाखवतात. सगळा आनंद..... चिकार आनंद......

स्वातंत्र्यदिन साजरा करणे ही काही दाखवायची वस्तू आहे का की त्या स्वातंत्र्याला जे अभिप्रेत आहे. त्यानुसार वागण्याची गरज आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतांना काही तर असा आव आणतात की जणू त्यांनीच देश स्वातंत्र्य करतांना झुंज दिली. बाकीचे लढलेच नाही.

आम्ही स्वाचंत्र्यदिन साजरा करतो. करायला पाहिजे. पण हा स्वातंत्र्यदिन केवळ साजरा करुन चालत नाही तर त्यानुसार वागलोही पाहिजे. तेव्हाच त्या स्वातंत्र्याला अर्थ येवू शकतो. पण निव्वळ स्वातंत्र्यदिन चांगला जोमात साजरा करीत असू आणि त्यानुसार वागत नसू तर त्या स्वातंत्र्याचा अपमान असून आपण त्या स्वातंत्र्याची कत्तलच करीत आहोत असे वाटते.

१५ अॉगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र्य झाला आणि कित्येक वर्षाच्या गुलामगीरीतून भारताची मुक्तता झाली. काहींनी स्वतः स्वातंत्र्यासाठी लढता लढता स्वतः फाशी सहन केली. पण इंग्रजांसमोर झुकले नाहीत. काय त्यांच्यात स्वार्थ नव्हता काय? स्वार्थ जर नसता तर रघुनाथरावासारखी व मिरजाफरसारखी मंडळी इंग्रजांना शरण गेली नसती. इंग्रजांनी 'डाव्या हातानं खा की उजव्या हातानं खा' अर्थात त्यांना शरण जा की नका जावू, कोणालाच सोडलं नाही. म्हणूनच जो आपल्या देशाचा होवू शकला नाही, तो आपला कसा होवू शकतो, असा विचार करुन त्या शरण आलेल्या शरणार्थीचा पाहिजे तेवढा उपयोग करुन घेतला. शेवटी काय त्यांना कैदेत टाकणे तसेच त्यांची कत्तल करणे याही गोष्टी त्यांनी केल्या.

१८५७ चा राष्ट्रीय उठाव सर्वांना माहीतच असेल. काय होतं तात्कालिक कारण?कुणाकुणाला माहितही नसेल कदाचित. तात्कालिक कारण होतं हिंदू मुस्लिमांच्या धर्मभावनांना ठेच देणे. अर्थात इंग्रजांकडे जे सैनिक होते. त्या सैनिकांमध्ये हिंदू आणि मुसलमान ह्या दोन्ही धर्माचे सैनिक होते. मग इंग्रजांनी याचा विचार केला नाही की हे सैनिक म्हणजे भारतीय मंडळी. हे आपल्या राजसत्तेचे सैनिक बनून आपली सेवा करीत आहेत. नव्हे तर आपल्याला मदतच करीत आहेत. त्यांनी असा विचार केला नाही. उलट जे सैनिक म्हणून त्यांना मदत करीत होते. ते विसरुन त्यांना दिलेल्या बंदूकीला जे काडतूस लावलं होतं. ते त्यांचा धर्म विटाळविणारं लावलं होतं. अर्थात मुसलमानांना ज्या बंदूका दिल्या होत्या. त्या बंदूकीच्या काडतूसाला डुकराची चरबी व हिंदूंच्या बंदूकीला गाईची चरबी लावलेली होती. मुसलमानाला डुकर निषिद्ध होतं तर हिंदूंना गाय पवित्र. हे जेव्हा माहित झालं, तेव्हा धर्मभावना भडकणार नाही तर काय?

आजही स्वातंत्र्य भारतात असेच लोकं आहेत. जे लोकं मदत करीत असतात. पण ते सर्वांना समान न लेखता आजही अशाच प्रकारचं वर्तन करीत असतात. फरक एवढाच पडला आहे की या ठिकाणी थोडासा धर्म बाजूला आहे. या दोन धर्माच्या जागी आपला आणि पराया असा भाव निर्माण झाला आहे. मग जे असे मिरजाफर, रघुनाथ सारखे लोकं आहेत. ते आज स्वतंत्र्य भारतातील राज्य करणा-या इंग्रजांना निंदेच्या स्वरुपात माहिती सांगत असल्यानं ते या स्वतंत्र्य भारतातील इंग्रजांना प्रिय आहेत. म्हणूनच आज नोकरी व्यवसाय असो की कारखानदारी...... या सर्वच श्रेत्रामध्ये बेवारस गुलामगीरी दिसते. आपलीच माणसं आपल्याच माणसांवर अत्याचार करतात. कोणी शारिरीक व लैंगीक शोषणही. भारत जरी स्वतंत्र्य असला तरी ती मंडळी आपल्याच माणसांना आपला समजत नाहीत. प्रसंगी अत्याचारच करीत असतात. मग विचार येतो की खरंच आपल्या हुतात्म्यांनी यासाठीच मिळवलं का स्वातंत्र्य...... यासाठीच मरण पत्करलं का?यासाठीच प्राणाचं बलिदान दिलं?त्यापेक्षा नसते लढले ते तर बरं झालं असतं असंही वाटतं.

भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करणारी अशीच ती मंडळी स्वातंत्र्यदिन साजरा करतांना असे काही भाषणं ठोकतात की त्यांना भाषणं देतांना पाहून असं वाटतं की यांच्यासारखे आदर्श कोणी नसावे. पण जेव्हा त्यांच्या अंतरंगात जावून त्यांचा भुतकाळ पाहिल्यास त्यांनी जन्मापासून काय काय केले?किती योग्य आणि किती गोष्टी बरोबर केल्या याची खात्री पटते. खरं तर त्यांच्या हातूनच तिरंगा फजकविला जावू नये असा त्यांचा भुतकाळ असतो. कारण तो त्या तिरंग्याचा आणि भारतमातेचा अपमान असतो. ती मंडळी आपल्याच लेकराला लेकरु न समजणारी तिरंगा फडकवितांना मी सर्व जगताचा पालनहार आहे हे दाखवतात. हेच वास्तविक सत्य आहे.

एक प्रसंग सांगतो. ज्यावेळी रावण मृत्यूसय्येवर चढला. क्षणात तो मरणार हे गृहीत धरुन रामानं लक्ष्मणाला म्हटलं, 'रावण महाज्ञानी आहे. त्यांच्याकडून मरतासमयी उपदेश घे. जो उपदेश तुला कोणी देवू शकणार नाही. लक्ष्मणाने सुरुवातीला नकार दिला. परंतू नंतर भावाची राजाज्ञा पाहून तो जेव्हा गेला, तेव्हा डोक्याकडे उभे राहून त्याने रावणाला म्हटले, 'रावणा, मी माझ्या भावाच्या उपदेशाने आलो आहे. मला लवकर ज्ञान दे. मग मर. ' रावणानं उपदेश देणं टाळलं. ते पाहताच लक्ष्मण परत भावाकडे आला. भावाला घडलेली परीस्थीती कथन केली. तेव्हा स्वतः राम सोबत गेला. तो पायाजवळ बसला व त्याला नतमस्तक होवून त्यानं उपदेशाबाबत विनंती केली.

रामाचं नतमस्तक होणं रावणाला आवडलं. तो म्हणाला, 'राम, तू खरंच आदर्श आहेस. कारण विद्या घेतांना अतिशय नम्रतेने घ्यावी. कुणावर अत्याचार करुन किंवा चोरी करुन विद्या ग्रहण करु नये. तुझ्यात नी माझ्यात एकच अंतर होतं ते म्हणजे भाऊबंदूकीचं. तुझा भाऊ तुझ्या सोबत होता. अन् माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता. हाच माझा उपदेश आहे. हेच ज्ञान तू जगाला दे. माझा उपदेश समजून. भावाला अंतर देवू नकोस. '

रामानं जे काही समजायचं ते समजला व आपल्या तीनही भावाला अंतिम घटकापर्यंत रामानं अंतर दिलं नाही. पण ज्यावेळी रामानं लक्ष्मणाला अंतर दिलं. त्यावेळी रामालाही संपावं लागलं.

राम व रावण एकमेकांचे कट्टर शत्रू. पण तरीही शत्रूंवर प्रेम करायला शिका हे रामानं दाखवून दिलं. तर रावणानं आपल्या सर्व मित्रमंडळींवर भावासारखं प्रेम करा. अंतर देवू नका. हे दाखवून दिलं.

आम्ही काय करतो आमच्या स्वतंत्र्य भारतात? आम्ही शत्रूला तर सोडा. मित्रालाही संपविण्याचा विचार करतो. अगदी केसानं गळा कापतो. काल अगदी जीव लावून प्रेम करणारी सखी आज तिच्यावर पाशवी सामुहीक बलत्कार करतो. लहानपणी घासातला घास देणारा भाऊ, मोठेपणी एक फुट जागेसाठी त्याचा गळा कापतो. नव्हे तर उन्हातून सावलीत नेणारे मायबाप. लॉटरी खेळू दिली नाही म्हणून त्यांचा गळा आवरतो. एवढंच नाही तर माझ्या कारखान्याचा विकास तर माझ्या देशाचा विकास हे समजून काम करणा-या कामगारांचं शोषण करतो. त्याला गुलामासारखं वागवतो. ज्या शाळेतून विद्यार्थ्यापासून आदर्श नागरीक घडतात. त्याच शाळेतील शिक्षकांना छळण्यासाठी वेगवेगळी धोरणं बनवतो. जेणेकरुन त्यांच्या माणसीकतेवर परीणाम होवून त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवू नये. मग त्या विद्यार्थ्यांपासून कसे बनतील आदर्श नागरिक?हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हेच शिक्षकांना छळणारे शिक्षणसम्राट १५ अॉगस्टच्या दिवशी शाळेच्या विचारपीठावरुन भाषणं ठोकतात. आव आणून म्हणतात भारत माता की जय. अन् प्रत्यक्षात कार्य मात्र शुन्य. शिक्षकांना छळून त्यांना मिळणा-या वेतनातून पैसा खाणं.

हे असे का घडते?तर ज्यावेळी भारत स्वतंत्र्य झाला. पण तो स्वतंत्र्य होत असतांना येथील तमाम भारतीयांना नव्हे तर आपल्या पुर्वजांना काय काय वेदना झाल्या. ते आपण विसरलो आहोत. आपल्याला फक्त इंग्रजांनीच दिलेल्या वेदना समजतात. पण त्यापुर्वी इथे असलेल्या राजेशाहीनं आपल्या सर्व पिढीला कसं छळलं ते आपल्याला दिसत नाही. ते आठवणे गरजेचे आहे.

इथल्या तमाम राजांना जेव्हा कोणाचीही सुंदर मुलगी आवडलीच, तर तिची इच्छा नसतांना तिला आपली राणी बनवून घेण्याचा हक्क नसला तरी ते जबरदस्तीनं आपली राणी बनवीत. नव्हे तर त्यांची इच्छा नसतांना त्यांच्यावर बलत्कार करीत. काही राजे अशा स्रियांना राणी बनविण्याऐवजी तिला जनानखान्यात नेत व वेश्या म्हणून त्यांची इच्छा नसतांना त्यांचा वापर करीत. जे राजे राणी बनवत, तेही आपल्या जुन्या राण्यांचा हक्क डावलत. नव्हे तर त्यांच्यासमोर सवतीचा प्रश्न निर्माण करीत.

राजेशाहीनंतर मोगल आले. मोगलांनीही तेच केलं. मग इंग्रजांचं राज्य आलं. त्यांनीही तेच केलं. मात्र या इंग्रजांनी अशा मुलींना राणी बनवलं नाही. तर वेश्या म्हणून त्यांचा वापर केला. तिची बाजारात विक्री केली.

हे झालं स्रियांच्या बाबतीत. इथे तर या राजेरजवाड्यामच्या काळात माणसांना गुलामांची वागणूक दिली. नव्हे तर या गुलामांची खरेदी विक्रीही त्यांच्या काळात चालत असे. मग या गुलामाचा वापर कोलू चालवणे, अनैतिक कामे करुन घेणे. यासाठी केला जाई. शिवाय आपल्या राज्यात संकट येवू नये म्हणून हे तमाम राज्यकर्ते देवांना भाव म्हणून या गुलामांची आहूती चढवत अर्थात नरबळी देत. हे अघोरी प्रकार भारतीय स्वातंत्र्याच्या रुपाने बंद झाले. त्यामध्ये संपूर्ण स्वांतत्र्यविरांनी आपला जीव धोक्यात घातला.

आज स्वातंत्र्य मिळालं. पण गुलामी संपली का?तर याचं उत्तर नाही असंच आहे. आजच्या स्वतंत्र्य भारतातही स्रियांच्या इज्जती स्वस्त झाल्या आहेत. त्यांचं अपहरण होवून विकल्या जात आहे. लहान मुलांचंही अपहरण होत आहे. त्यांनाही विकलं जावून गुप्त धनासाठी तसेच बळी देण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. तसेच आजही कारखान्यात बालकामगार म्हणून अशा लाचार मुलांचेच शोषण सुरु आहे. पण हे सगळं कृत्य पदड्याआड घडत आहे. आजही फटाके बनवितांना लहान मुलांनाच कामाला लावलं जातं. मायबापही कामाला लावतात. कारण पोटाची आग त्यांना सतावते आणि आजही स्वतः मायबाप याच पोटासाठी स्वतःच्या पोरीलाही विकतात. आजही माणसांना माणसांसारखं वागवलं जात नसल्यानं माणुसकीची धज्जी उडते. विचारपीठावरुन भाषणं देणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात मात्र जीवन जगतांना तसं वागणं कठीण आहे. आजही न्यायालयात कोर्टाचे एवढे खटले पाहावयास मिळतात की असं वाटतं हा भारत स्वतंत्र्य आहे की नाही. कारण प्रत्येकांवर अन्याय. एक अन्याय नाही तर अन्यायांची साखळीच. हे जर पाहिलं तर वाटतं की खरंच आपण स्वतंत्र्य आहोत का? स्वतंत्र्यता मानणं हा फक्त एक दिखावाच आहे.

महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही स्वतंत्र्य झालो आहोत. आज त्या राजेशाहीचा आमच्यावर अत्याचार नाही. त्या इंग्रजांचाही नाही. आम्ही शेकडो वर्षाच्या प्रदीर्घ कालीवधीनंतर स्वतंत्र्य झालो आहोत. त्यासाठी कित्येक आपलेच पुर्वज बळी गेले आहेत. त्यांचे बलिदान आपण विसरु नये. तेव्हा या स्वातंत्र्याचा उपभोग सर्वांना घेवू द्यावा. माणसांना माणूस म्हणून वागवावे. त्यांना चांगलं जगता यावं म्हणून आपण प्रयत्न करायला हवा. महिलांची इज्जत करावी. लहान मुलांचाही आदर करावा. दलितांचाही सन्मान करावा नव्हे तर लोकांनी एकच अपत्य ठेवावं. जेणेकरुन पोटाच्या प्रश्नासाठी स्वलेकरांना कामगार बनवावे लागू नये. तसेच स्वमुलींना पोटासाठी विकावे लागू नये.

राज्यकर्त्यांनीही आपल्या राजधर्माचं पालन करावं. जे अत्याचार करतात, त्यांचे अत्याचार उघडकीस आल्यास त्यांना कडक शिक्षा द्याव्यात. श्तक-यांच्या मालांना योग्य भाव द्यावा. त्यांना आत्महत्या कराव्या लागू नये. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करावा. कारण शेती जर पिकली नाही तर काय खाणार. तसेच कारखानदारीचा विकास करावा. जेणेकरुन बेरोजगारी दूर करता येईल. एवढंच नाही तर मंदीर मज्जीदीचा विकास करण्याऐवजी आणि बांधण्याऐवजी विश्वविद्यालये उभारावीत. जेणेकरून देशात संशोधक, तंत्रज्ञ तयार होतील. आपण स्वावलंबी बनू. त्याचबरोबर आपला देशही स्वावलंबी बनेल. मग या आमच्या देशावर चीन, पाकिस्तानसारख्या कोणत्याच देशाची वाकडी नजर जाणार नाही. पण त्यापुर्वी देशातील तमाम नागरीकांना आपला भाऊ म्हणून समजण्याची गरज आहे. मोठा भाऊ नाही तर लहानपणचा भाऊ. त्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. देश स्वावलंबी बनणार नाही. हे लक्षात घ्यावे.