Victims - 20 books and stories free download online pdf in Marathi

बळी - २०

बळी - २०
या केसमधील ब-याचशा गोष्टींचा उलगडा केदारची आई करू शकते, याची इन्सपेक्टर दिवाकरना खात्री होती. दुस-याच दिवशी ते मीराताईंना भेटायला गेले. पोलिसांना दारात पाहून त्या घाबरून गेल्या.
"आमच्याकडे निनावी कंप्लेंट आली आहे; की तुमचा मोठा मुलगा ब-याच दिवसांपासून बेपत्ता आहे; खरं आहे का हे?" त्यांनी तिला विचारलं.
मीराताईंना उत्तर काय द्यावं, हे सुचत नव्हतं. आता पोलिसांचा ससेमिरा माझ्या केदारच्या मागे लागणार; त्याला पोलीसांपासून वाचवलं पाहिजे; या भीतीने त्यांनी घाईघाईने उत्तर दिलं,
"तो बेपत्ता नाही--- कामानिमित्त बाहेरगावी गेलाय!"
" हे पहा! मला खरी खरी उत्तरं हवी आहेत! मी पूर्ण खात्री झाल्यावरच तुम्हाला भेटायला अालो आहे. जर तुम्ही सहकार्य केलं नाही, तर तुमच्यासह घरातील सगळ्या माणसांची चौकशी पोलीस स्टेशनला नेऊन करावी लागेल! मग मात्र सगळ्यांना खुप त्रास होईलच शिवाय आजू -बाजूच्या लोकांमध्ये नाचक्की होईल! --- हे सगळं नको असेल, तर माझ्या प्रश्नांची उत्तरं नीट द्या! तुमचा मुलगा गेले सहा महिने बेपत्ता अाहे, हे खरं आहे की नाही?" दिवाकरांचा आवाज आता कठोर झला होता.
"माझ्या मुलांची बदनामी होऊ नये म्हणून तर मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार गेले सहा महिने सहन करतेय! मी तुम्हाला खरं सांगते; पण आम्हाला विनाकारण अपराध्यासारखी वागणूक देऊ नका! आम्ही कोणताही गुन्हा केला नाही! --- हो! माझा मुलगा सहा महिन्यांपूर्वी अचानक् घरातून निघून गेला आहे; हे खरं आहे!" मीराताई रडत म्हणाल्या.
" तुम्ही इतकी गंभीर गोष्ट लपवून का ठेवली? मुलगा इतके दिवस घरी आला आहे; पण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घरची --जवळची माणसं करत नाहीत; ही गंभीर गोष्ट आहे! त्याच्या जीवाला धोका असू शकतो; हा विचार तुमच्या मनात कसा आला नाही? त्याच्या बेपत्ता होण्यात तुमच्या घरातील - जवळच्या माणसांबरोबरच तुमचा -- म्हणजे त्याच्या सख्या आईचा हात आहे, असा संशय आमच्या मनात आला, तर ते गैर ठरणार नाही!"ओल
इन्स्पेक्टर दिवाकरांच्या बोलण्यात जरब होती. घाबरून मीराताईंच्या हाता-पायांना आता कंप सुटला होता.
आता मात्र मीराताईंचे डोळे भरून आले;आणि त्या म्हणाल्या,
" नाही! विश्वास ठेवा, साहेब! या प्रकरणात माझा आणि माझ्या मुलांचा काहीही सहभाग नाही! थांबा! तुम्हाला सगळं खरं सांगते; पण तुम्ही मला एक मदत करा; हे आजूबाजूच्या लोकांना कळू देऊ नका! माझी दुसरी दोन मुलं अजून काॅलेजमध्ये शिक्षण घेतायत; जर हे सगळं जगजाहीर झालं; तर लोकनिंदा सहन करणं त्यांना कठीण होईल; अाणि त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल!"
हे बोलताना त्यांचे अनेक दिवसांपासून प्रयत्नपूर्वक थांबवलेले अश्रू डोळ्यांतून पाझरू लागले होते.
"त्यांनाच काय; तुम्हालाही त्रास होणार नाही; याची खात्री मी देतो; मात्र सगळं खरं- खरं सांगा! केदार अचानक् बेपत्ता झाला; ही गोष्ट तुम्ही लपवून का ठेवली? आई म्हणून तुम्हाला त्याची काळजी वाटत नव्हती का? तुम्हाला दुस-या दोन मुलांची जितकी काळजी आहे; तितकी मोठ्या मुलाविषयी दिसत नाही; असं का?"
ते आता मृदु आवाजात विचारत होते. मीराताईंचा या प्रकरणात काहीही सहभाग नाही; हे त्यांचा घरंदाज चेहरा बघूनच दिवाकरना कळलं होतं. हे सगळं सहन करताना एका आईच्या जीवाला किती यातना झाल्या असतील; याची जाणीव त्यांना होती, पण त्यांना मीराताईंच्या भावनांना हात घालून त्यांच्या तोंडून सत्य समजावून घ्यायचं होतं! त्यांचं बोलणं मीराताईंच्या जिव्हारी लागत होतं. त्या सांगू लागल्या,
"माझा मोठा मुलगा केदार--- अतिशय हुशार आणि तितकाच गुणी मुलगा -- आमच्या घराचा आधार -- त्याचं नुकतंच लग्न झालं होतं -- फार फार तर आठवडा झाला होता! त्या दिवशी त्याच्या पत्नीच्या - रंजनाच्या बहिणीने -- नेहा दीदीने त्यांना रात्री जेवायला बोलावलं होतं! संध्याकाळी अंधेरीला सिनेमा बघून रात्री नेहाकडे डिनरसाठी जायचं असं केदारने ठरवलं! त्या दिवशी लग्नानंतर प्रथमच तो रंजनाला - त्याच्या बायकोला सिनेमाला घेऊन गेला होता. वाटेत त्यांनी ठरवलं की; तिच्या नेहा दीदीकडे जाऊन तिची पुस्तकं देऊन मग पुढे जायचं! नेहाच्या घराजवळ टॅक्सीतून उतरताना त्याने रंजनाला तिच्या बहिणीकडे जायला सांगितलं, आणि मुलांसाठी मिठाई घेऊन येतो, असं तिला सांगून तो त्याच टॅक्सीतून पुढे गेला; असं रंजना म्हणाली --- गेला तो गेलाच! परत आलाच नाही! त्या दिवसानंतर तो कुठे आहे-- काय करतो --- काहीही पत्ता लागला नाही!! -
याच वेळी कीर्ती काॅलेजमधून घरी आली. तिला बघून मीराताईंना थोडा धीर आला -- आधार वाटला.
"काय झालं आई?" पोलीसांना बघून तिने घाबरलेल्या आवाजात मीराताईंना विचारलं.
"ते केदारची चौकशी करायला आले आहेत!" मीराताई म्हणाल्या.
दिवाकर पुढे विचारू लागले,
" पुस्तकांसाठी मधेच उतरली? एवढी महत्वाची कसली पुस्तकं होती?" दिवाकरच्या या प्रश्नावर मीराताईंकडे उत्तर नव्हतं, पण कीर्तीने उत्तर दिलं,
"वहिनीची मोठी बहीण-- नेहा दीदी हायकोर्टात वकील आहे! लग्नासाठी गावी गेली; तेव्हा तिची पुस्तकं तिथेच विसरून आली होती! तिच्या आईने ती पुस्तकं नेहा दीदीला देण्यासाठी वहिनीकडे दिली होती! त्या आठवड्यात एका महत्वाच्या केससाठी तिला ती अर्जंट हवी होती; म्हणून वहिनीने ती पुस्तकं त्या दिवशी एका मोठ्या शोल्डरबॅगमध्ये भरून घेतली होती! आईला फार काही माहीत नाही; कारण तिच्या खोलीच्या दरवाजातून तिने त्यांना निरोप दिला; पण मी त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर गेले होते; मी तिच्या हातात एवढी मोठी बॅग बघून वहिनीकडे चौकशी केली होती! नंतर दीदीचं घर थिएटरच्या रस्त्यावर आहे; हातात ओझं नको; म्हणून दीदीकडे पुस्तकं देऊन पुढे जायचं ठरलं; असं वहिनी म्हणाली!" हे इन्सपेक्टरना सांगताना कीर्तीच्या डोळ्यासमोर त्या दिवशीचा प्रसंग सरकला होता. त्या दिवशी तिने बॅगविषयी विचारलं, तेव्हा वहिनीला किती राग आला होता; हे तिला आठवलं होतं.
"केदारचा शोध घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले -- त्याचा शोध घेतला की नाही; हे मला माहीत नाही; पण तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली नाही, हे विचित्र नाही वाटत? कर्ता- सवरता मुलगा अशा रीतीने निघून गेला--- त्याचं काही बरं वाईट झालं असेल; अशी भीती तुम्हाला नाही वाटली? तो तुमचा सख्खा मुलगाच आहे नं? "
यावर मीराताई रडू लागल्या. त्यांनी स्वतःच्या भावनांवर घातलेला बांध आता फुटला होता.
" होय! मी त्याची सख्खी आई आहे! आणि तो माझा लाडका मोठा मुलगा--- पण तो जाताना पैसे आणि दागिने घेऊन गेला होता -- म्हणजेच त्याचं परागंदा होणं हे आधीपासून ठरवून झालेली गोष्ट होती! समोर जे सत्य दिसत होतं; ते पाहिल्यावर गप्प राहून त्याची वाट पहाणं योग्य आहे, असं मला वाटलं! दुसरा काही विचारच मनात आला नाही!" मीराताई म्हणाल्या. यावर इन्स्पेक्टर गडबडून म्हणाले,
"जरा सविस्तर सांगाल का?" मीराताई काय बोलत आहेत, हे त्यांना समजत नव्हतं.
मीराताई सांगू लागल्या,
"त्या दिवशी रात्रीपर्यंत तो आला नाही, तेव्हा रंजना बहिणीला अाणि मेहुण्यांना घेऊन घरी आली! आम्ही खूप वेळ वाट पहिली; आणि नंतर पोलीसांकडे तक्रार करण्याचं ठरलं! जेव्हा रंजनाचे मेहुणे तक्रार करायला पोलीस स्टेशनला निघाले ; तेव्हा केदारचा एक फोटो त्यांनी मागितला! फोटो आणायला रंजनाने त्यांच्या खोलीतलं कपाट उघडलं; आणि तिच्या लक्षात आलं; की तिच्या वडिलानी लग्नात तिला दिलेली रोकड रक्कम आणि दागिने गायब झाले होते! --- त्यात मी तिच्यासाठी लग्नात केलेले दागीनेही होते! केदारचं अचानक् बेपत्ता होणं आणि रोकड आणि दागिने गायब होणं; याचा अर्थ सगळ्यांनी असा लावला, की केदारचे कोणातरी मुलीशी संबंध होते आणि तो जे मिळालं ते घेऊन परागंदा झाला होता! "
मीराताईंच्या मनातल्या पोलीसांविषयीच्या भीतीची जागा आता विश्वासाने घेतली होती. अनेक दिवस मनात कोंडून ठेवलेल्या भावना त्या इन्सपेक्टर दिवाकरांसमोर मोकळ्या करत होत्या; कारण दिवाकरांच्या बोलण्यात त्यांना केदारविषयी काळजी जाणवत होती.
******* contd.-- part 21.