Choupadi - Ek Bhook - 4 books and stories free download online pdf in Marathi

चौपाडी - एक भूक! - ०४

आतापर्यंत आपण बघीतले,

चौपाडीवर सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक यातना, बत्सलच्या खूनाचा बदला आणि दित्याविषयी असलेली काळजी म्हणून भावरूपाने उद्गमला संपवून क्रूर मानसिकतेला संपवले होते.

आता पुढे!

उद्गमला दोन्ही बाजूंनी पकडत त्याचे भारी शरीर कसेबसे दोघींनी उचलून धरले. काहीच पावलांच्या अंतरावर भावरूपाच्या डोळ्यांवर एक प्रकाश पडला आणि तिचे डोळे बंद झाले. डोळ्यांवर हात ठेवत समोर बघायचा प्रयत्न करणार तोच परत एक प्रकाश डोळ्यांवर पडला.

दित्याचे लक्ष त्या दिशेने गेले आणि ती जोरात किंचाळली!

"आमा पुलीस!"

शब्द कानावर पडताच दोघींच्या हातून उद्गमचे शव सुटले आणि दोघी स्तब्ध राहिल्या.

पोलिसांची तुकडी दित्याच्या योजनेनुसार घटना स्थळी आधीच पोहचली होती. पण, त्यांची योजना पूर्णपणे फसली! कारण, दित्याच्या योजनेनुसार उद्गम रंगे हाथ पकडला जाणार होता. तसे न होता विपरीत घडले होते!

दित्या पळतंच भावरुपा जवळ गेली आणि तिला घट्ट कवटाळले.

"आमा, हे काय झाले ग?" ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली.

"ना बाळ, आपण आज एक गुन्हेगारंच नव्हे; तर त्यामागे असलेली क्रूर मानसिकता संपवली आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझी आमा वाईट नाही. तुझ्या आमाने या तांड्यातील मुली आणि बायांना उद्गमच्या जाळ्यातून नेहमीसाठी मोकळे केले आहे."

हे ऐकताच दित्याने रडतंच भावरुपाला घट्ट कवटाळले. भावरुपाने तिला मिठीत घेत शांत केले.

"आमा, गुन्हा संपवायला कधीपर्यंत गुन्हा घडवून आणावा लागेल ग?" दित्याने निरागसपणे विचारले!

"जोपर्यंत लोकं एकजूट होऊन एखाद्या क्रूर मानसिकते विरोधी आवाज उठवत नाहीत!" भावरूपा पदराने आसवे पुसत एका आत्मविश्वासाने बोलत होती.

तोपर्यंत पोलीस त्यांच्यापर्यंत येऊन पोहचले.

तांड्यात पोलीस आल्याचे माहीत होताच संपूर्ण तांडा घटनास्थळी पोहचला आणि समूहात कुजबुज सुरु झाली.

समोर पडलेले उद्गमचे मृत शरीर पाहून लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली होती! जरी तो खून भावरूपाने केला असला; तरी त्याचे परिणाम पूर्ण तांड्याला भोगावे लागणार की काय! या गैरसमजुती मुळे तांड्यातील प्रत्येकच जण भावरूपाकडे आता तिरस्काराच्या नजरेने पाहू लागला होता.

भावरूपा आणि हजुरआमा दोघींना महिला पोलिसांच्या सहाय्याने ताब्यात घेण्यात येणार होते. तत्पूर्वी त्या कामासाठी दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे होते. कारण, हा गुन्हा मध्यरात्री एका महिलेकडून घडला होता.

वरिष्ठांनी तत्काळ लिखीत परवानगीचे आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांकडून जारी करवून घेतले आणि दोघींना अटक करण्यात आली.

एका अमानुष प्रथेतून संपूर्ण तांड्याची सुटका करणाऱ्यांच्या नशिबी आज पोलिसांच्या बेड्या पडल्या होत्या!

स्वतः पोलिसंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे संबंधीत प्रकरणावरून समजत होते! कारण दित्याच्या योजनेनुसार त्यांनी पोलिसांना पूर्व कल्पना दिली असल्याने पोलीस आधीच घटनास्थळी पोहचून संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होते.

योजनेनुसार उद्गम पकडला गेला असता. पण त्याला न्याय व्यवस्था शिक्षा सुनावण्यात कितपत खरी उतरेल या मनातील विचारानेच भावरूपाकडून तो गुन्हा घडला होता.

पुढे पोलिसांनी किरकोळ प्रक्रिया पार पाडून कारवाईच्या हालचाली सुरू केल्या.

भावरूपा आणि हजुरआमा दोघींना ताब्यात घेण्यात आले. दित्या डोळ्यात अश्रू घेऊन तशीच स्तब्ध राहिली. तिची आमा चुकीची नाही हे तिचे मन तिला सतत सांगत होते.

दित्यासमोर घडलेला गुन्हा तिच्या आमाकडून घडला असल्यामुळे या गुन्ह्याचा तिच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला.

काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाकडून दोघींना शिक्षा सुनावण्यात आली.

भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३०२ अंतर्गत खून केल्याच्या गुन्ह्यासाठी भावरूपावर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आणि सन्माननीय न्यायालयाकडून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

पुरावे ठिकाणी लावण्यात मदत करण्याच्या गुन्ह्यात हजुरआमा यांच्यावर देखील भारतीय दंड संहितेच्या कलम २०१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. ज्यात त्यांना ७ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.

या घटनेनंतर दित्याचे जीवनच बदलून गेले. ती एकटी पडली. तिची आमा आता कधीच परतणार नाही! हे सत्य तिने स्वीकारले खरे पण, तिच्या मनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला होता.
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.