perjagadh - 31 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - ३१

३१. पवनला स्वतःच्या अस्तित्वाची ओढ....


मी फार प्रयत्न केले पण त्या दिवशी आकाशने मला शहराकडे जाऊच दिले नाही.त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी शहराकडे गेलो.शिवाय रितुचे सारखे फोन मला येतच होते.आणि काहीतरी नवीन प्रयत्न करण्यासाठी मला परतीला जाणे आवश्यकच होतं.त्यामुळे सकाळी फार वेळ न दवडता मी शहराकडे परतलो.मी आल्याची वार्ता रितुला न सांगताच कळते हे मला माहीत होतं.त्यामुळे बॅग बाजूला ठेवून मी तिचीच वाट बघत होतो.

खरंतर ज्या दिवशीपासून हे मृत्यू प्रकरण माझ्या मागे लागले होते, त्या दिवशीपासून तिच्यातल्या प्रेमाची जागा फक्त एका काळजीने घेतली होती.तिच्या डोळ्यांत असणारं आकर्षण ज्यात आता नुसते चिंतेचे भाव दिसत होते.पूर्वी जेव्हा कधी यायची तिचा लाजाळूपणा कधी संपायचा नाही.पण आज येताना हृदयाचा तुकडा कुठेतरी अलिप्त झालेला आहे या संदर्भात असायची.तिच्यातली ती गळून पडली होती आणि ती उरली होती ती फक्त माझ्यातली ती होती.आणि तिचं असणं तोच माझ्या असण्याचा आधार होता.कुठपर्यंत होता,माहिती नाही.पण कळत नकळत तिचं असणं मला पूर्ण करत होता.न राहवून माझ्या एकांतात मला तिची कमी क्षणोक्षणी जागवली होती.कदाचित हेच ते पवित्र बंधन असेल जे साता जन्माच्या गाठींनी बांधायचे आम्ही ठरवत होतो.

थोडं इकडे तिकडे येरझारा मारतच आहे तितक्यात काळजीने ग्रासलेली रितू दारात उभीच होती.पण मला बघताच तिच्या चेहऱ्यावर उसने हसू आणण्याचे प्रयत्न केले.मी व्यक्त जरी केले नसले तरी रितूचा चेहरा न बघता मला रहावेनासे पण वाटत नव्हते.तिला बघताच प्रवासाचा शीण, तुटलेला आत्मविश्वास सगळं कसं नव्याने भरती आल्यासारखं वाटून जायचं.ती दारात उभी होती पण समाधान मला खुर्चीवर बसल्या मिळत होते.

"ये ना आत...दरवाज्यात काय झालं राहायला? मी हलकेच तिला म्हणालो.मग आकाश सोबत सगळ्या प्रवासाची माहिती मी तिला दिली."

"पण एक कळत नाही रितू, इतकी उंच डोंगररांग आहे.त्याच्या चारही बाजूला शेकडो गुंफा आहे.काहींचा अंत आहे तर काहींचा अंत पण नाही.पण बऱ्याचदा मला असं वाटते की या प्रत्येक डोंगररांगेतून एक भुयारी रस्ता आहे."

"कसं काय म्हणू शकतेस?"

"बघ ना..जेव्हा एखाद्या डोंगराची निर्मिती होते.तेव्हा बऱ्याचशा भागात ती पोकळी राहून जाते.मग एकदा दगडांचं संतुलन बनलं की पावसामुळे माती उतारावर घरंगळते आणि श्र्वापदांमुळे त्या गुंफा."

"हो हे खरं आहे पण तू असं कसं म्हणू शकतोस की यात भुयारी रस्ते असू शकतील म्हणून? कारण एका पोकळीत आणि भुयारी रस्त्यात फार साम्य असतो पवन..."

"बघ मी जेव्हा जेव्हा पेरजागडाच्या जवळपास जातो तेव्हा बऱ्याचदा मी आजूबाजूने त्याचे निरीक्षण करतो.आपल्या नजरेला अंतर पुरणार नाही इतका काळोख काही काही ठिकाणी असतो.काही छोट्या तर काही मोठ्या अशा शेकडो गुंफात मी जाऊन बघितले.जसं एखादी स्टाईल भिंतीला पूर्ण बसलेली नसेल तर आवाज येतो.त्याप्रमाणे त्या दगडांचा आवाज येतो.आता प्रश्न हा आहे की हे तथ्य कितपत योग्य आहे.

आपण पुरातन इतिहास वाचतो.एव्हाना शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा भुयारी रस्त्यांचा समावेश होता.त्यांना "चोर रस्ते" म्हणून संबोधल्या जायचे.कदाचित या रस्त्यांचा पण इथे समावेश असावा.आता त्यावर बंदी आहे.मी बऱ्याच ठिकाणी बघतो.आता त्या चोर रस्त्यांचा वापर होत नाही.बऱ्याच ठिकाणी त्यावर प्रतिबंध जरूर लावल्या गेले आहे.

मग आता काय करायचं ठरवतो आहेस पवन?

ठरवायचं काय आहे? मी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे.त्यामुळे, दरवेळेस मी नवीन काहीतरी अनुभवत असतो.मी गडाचा चाळीस प्रतिशत भाग नक्कीच हुंडळून काढले आहे.आणि त्या चाळीस प्रतीशत भागात जी माहिती मिळाली आहे किंवा जे डोळ्यांना दिसलं आहे, त्यावरचं तथ्य अजूनतरी कोऱ्या कागदासारखं आहे.मुळात आपण काय करतोय? त्या भागात वास्तव्यास असलेल्या लोकांचे मनोगत अनुभव ऐकून आपण विचार करतोय.स्वतःबद्दल वाटणारे कुतूहल अजूनही तेव्हढ्याच अंतरावर आहे.जितके अंतर आधी होते.पण अजूनही मला हेच कळत नाही.हे सगळं माझ्याशीच का घडतंय? या सगळ्याला असं अपवाद का?

कित्येकदा हा प्रश्न मलाही सतावतो पवन..अगदी बालपणापासून मी तुला ओळखतो आहे. पेरजागडावर कधी जाण्याचा किंवा पेरजागडाच्या नावाचा सुद्धा कधी एक शब्द मी कानांनी ऐकला नाही.सतत मला असं वाटते आहे की जवळच अशी एखादी गोष्ट घडलेली किंवा घडत आहे,जी आत्तापर्यंत ओघावर आलेली नाही.कदाचित हे सगळं तुझ्याच घरातून असावं.तेव्हाच तुला स्वतःचा असा शोध समजेल.

ह.. म....कदाचित असं होऊ शकते.पण ज्याअर्थी मीच इतके दिवस पेरजागडाशी अपरिचित होतो,मला नाही वाटत की घरच्यांना त्याबद्दल फारसं काही माहिती असेल.एके दिवशी मस्करीनिमित्त मी विचारले असता.आईच मला तू फार नवसाचा आहेस म्हणत होती.मी विचारलं होतं की कशाचा नवस केला होता? म्हणून; पण त्यांनतर दोघांनी पण काही सांगितलेच नाही.त्यांचं नेहमी एकच म्हणणं असतं, जे होतं चांगल्यासाठीच होतं.वारंवार त्याचं प्रचार करणे हे स्वतः प्रती एक अभद्र व्यवहार असतं. बरं ते जाऊ देत.बरेच दिवस झाले.वडिलांची प्रकृती पण बरी नाही त्यामुळे सध्या घरीच आहेत.शिवाय आता वय झाल्यामुळे त्यांची आता कामकाजावरून सुट्टी पण होईल.त्यामुळे त्यांना त्रासवणे हे सुद्धा मला अयोग्य वाटते आहे.

"पवन पोटच्या मुलासाठी आई वडील जीव द्यायला तयार होतात.ही शंका नको ठेवुस मनात की ती अयोग्य आहे.वेळ आल्यावर तिच तुझ्यासाठी सामोरी उभी राहतील."

"मी शांततेत विलीन झालो होतो."

"बरं चल पवन...घरी कामे पडली आहेत.पण तू घाबरु नकोस.हवं असल्यास मी येऊ का?"

"नाही नको रितू...ऑलरेडी तू खूप काही करते आहेस."

रितू पाठमोरी जाताच परत माझी एकांताची वणवण सुरू झाली. पेरजागडची रहस्ये जाणून घेण्यासाठी पुन्हा कुठून सुरुवात करावी लागेल.हे बघू लागलो.मनात विचारांची गुंतागुंत झाली होती.बघावं तेव्हा मित्रांसमवेत घालवलेले क्षण असे सामोरी येऊन जात होते.हृदयात धकधक वाढत जात होती.हे सगळं केव्हापर्यंत होतं माहित नाही.पण चेहऱ्यावर ओसंडून घाम वाहायला लागला होता.त्यामुळे मी बेडवर आडवा होण्याचा प्रयत्न करू लागलो.आणि केव्हा मला झोप आली ते कळलंच नाही.

जाग आली ती कसल्याशा आवाजाने.मी पूर्ण दिवसभर कसा झोपून राहिलो मला काही कळलेच नाही.त्यामुळे उठून जरा आळोखे पिळोखे देत मी बेडवरून उतरलो.वडील खेकसत होते व मध्येमध्येच कन्हणत होते.मी आईला हाक मारली तर आई नेहमीसारखीच कशाचातरी सोंग(निमित्त) घेऊन शेजारच्या घरी गेली होती.

मी आतमध्ये गेलो तर वडील अजून जरा खेकसताना दिसले.कदाचित अंथरुणातून त्यांना उठायला जमत नव्हते, त्यामुळे ते कन्हणत होते.आणि त्यांना असं बघितल्यावर वाटते की आई बराच वेळ झाला घरात नाहीये.त्यामुळे मी जलद गतीने जावून, वडिलांना आधार देऊन, अंथरुणावरून उठवायचा प्रयत्न केला.त्यांच्या छातीवरून हात फिरवू लागलो.बाजूच्या टेबलवर ठेवलेला पाणी हळुवार त्यांना प्यायला दिलं.त्यांना जरा हायसं वाटलं.नंतर काही क्षणांचा विसावा घेत ते म्हणाले...

"तू आलास हे माहीत आहे बेटा,कारण रितूचा आणि तुझा आवाज सारखा दाराशी घुटमळत होता.आणि तुला बोलवावं म्हटलं तर अंगात त्राण कमी पडलं. बरं केव्हा आलास पवन?"

"मघाशीच आलो बाबा,प्रवासामुळे झोपी गेलो होतो.तुमचा आवाज आला त्यामुळे मी इकडे आलो."

"बरं झालं आलास,नाहीतर अंतिमच व्हायचं!"

"बाबा...."

"थट्टा केली रे,अन्यथा तुझी आई म्हणावे आणि उगा राहावे अशी पाळी आली आहे आता."

"हो...बाबा...पण आता तब्ब्येत कशी वाटते तुमची?"

"छान आहे,फक्त हा घसा तेव्हढा खरखरतो..."

"बरं बाबा एक विचारू काय?जर सांगावंसं वाटेल तरच सांगा...काहीच बळजबरी नाही."

"अरे विचार ना!!इतकी कशाला अदबी दाखवतोस."

"बाबा पेरजागडाचा आणि माझा काही संबंध आहे का?"

"क्षणभर वडील स्तब्ध होते."

"सांगा ना बाबा..."

"तुला आईने काही सांगितलं का?"

"नाही हो बाबा..."

" मग आज असं अचानक का विचारतो आहेस?"

खूप दिवस झालेत बाबा,माझ्याशी असं बरंच अघटीत घडत आहे.कदाचित तुम्हाला ते पटणार नाही.त्यामुळे मी आजपर्यंत टाळत राहिलो.त्यानंतर आजपर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी मी वडीलांजवळ कथन केल्या.सगळं वडिलांनी ऐकून घेतलं आणि त्यानंतर ते म्हणाले..

"गंगाधर तुलाही न्यायला आला होता."

"मलाही न्यायला म्हणजे..मी काही समजलो नाही बाबा."

"हे बघ पवन,वाटल्यास तू मला शिव्या दे,मला मार पण तुझ्यासोबत जे काही अघटीत घडत आहे.कदाचित त्याचं कारण मीच आहे.मला वाटलं सगळं काही संपलं असेल.पण..(असे म्हणत त्यांनी दोन्ही हातांनी चेहरा झाकला.)

"हे काय सांगता बाबा...हे असं काय अभद्र बोलत आहात."

"खरं तेच बोलत आहे पवन.याला कारणीभूत मीच आहे,कारण तू माझा मुलगा नाहीस."
"बाबा हि थट्टा करायची वेळ नाही.आधीच खूप काही सोसले आहे.आता पुन्हा काही सोसण्याची तयारी नाही माझी.( तितक्यात काय झालं असं म्हणत आई पण आली होती.)"

"मी खरं बोलतो आहे पवन,हव्यास आपल्या आईला पण विचार,आणि निदान यावेळी तरी मी थट्टा करणार नाही."

" डोळ्यांच्या कडांचे अश्रू सावरत मी आईला म्हटलं,आई तू तरी खरं सांग...इतक्यात काय चालू आहे हे तिला सुद्धा कळून चुकलं होतं."

"हे खरं आहे पवन.तुला नाव जरूर आम्ही दिलं पण तू आमचा मुलगा नाहीस.आणि तू कोण आहेस?हेसुद्धा आम्हाला माहिती नाही.तुला पेरजागडाने आम्हाला दिलेय असंही म्हणायला काही हरकत नाही."

खरंतर माझ्यासाठी हे फार मोठं अप्राप्य होतं.आधीच मृत्यूचे दिवाळे अंगावर उठले होते.त्यातून जरा का सावरत आहे तर आत्ता हे प्रकरण अंगाशी आलंय. काय? तर मी यांचा मुलगा नाही.आजपर्यंत ज्यांना आईवडील मानले.ज्यांच्या अंगाखांद्यावर आजवर खेळत राहिलो.ज्यांच्या कुशीत आजपर्यंत रडत राहिलो.त्यांच्या त्या एका वाक्याने क्षणात मला पोरका करून टाकलं होतं.आज मला माझ्याकडून सगळं हिरवल्यासारखं वाटत होतं. माया,ममता,जिव्हाळा या सगळ्यांची किळस यायला लागली होती. आतळी तीळ तीळ तुटायला लागली होती.मला वाटते माझ्या आयुष्यातला मृत्युपेक्षा फार भयानक प्रसंग होता तो.असे कितीतरी क्षण आसवांच्या पाटांनी वाहून जात होते.आज आईवडील असतानासुद्धा एक पोरगा पोरका झाला होता.

शेवटी नाते म्हणजे असते तरी काय?सख्खा भाऊ जीवाचा वैरी होतो.आणि परक्याला दादा म्हणावं तर तो जीव गहाण करतो.जीव लागला, माया सुटली की प्रेमळ असा नाता तयार होतो.ज्यात परकेपणाची कधी जाणीवही होत नाही.आणि आज माझ्याही घरी हेच नाते निभले होते.त्यांनी कधी मला जाणीव होऊ दिली नाही, आणि हेच कारण आहे की ते मला जवळचे वाटले.

"न जाणे कितीवेळ तो एकांत मल चिरत राहिला पण प्रश्न अजूनही तेव्हढ्यावरच अडकून राहिला होता.कोण आहे मी? जर मी पवन नाही!जर माझं इथलं अस्तित्व नाही!तर कोण आहे मी?"

"आई...बाबा...जर मी तुमचा मुलगा नाही तर कोण आहे मी? कुठून आलोय? काय आहे माझं अस्तित्व?"

"सगळे निःशब्द होते.त्यांच्या चेहऱ्यावर कसलेसे भीतीदायक भाव दिसत होते.कदाचित त्यांना काही सांगावं असं वाटत नव्हतं.त्यांच्या नजरा सारख्या एकमेकांना झुरत होत्या.भूतकाळातील पाने पालटताना अगदी स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. रडकं असलेलं वातावरण क्षणात चिडीचूप शांत झालं होतं.सारखं एकमेकांकडे बघत त्या प्रसंगची आठवण करत होते.मी मध्यंतरीच म्हणालो..."

"सांगा आईबाबा..कोण आहे मी? आज तुम्हाला सांगायलाच हवं.हा माझ्या जीवनाचा प्रसंग आहे.आज तुम्ही जरी नाही सांगितले तरी हया जीवनाचा अंत आता निश्चित आहे.आणि त्याला कदाचित तुम्हीच वाचवू शकता.आणि हे सगळं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही मला सगळं सांगू शकाल."

"एव्हाना सगळी गोष्ट वडीलांच्या लक्षात आलीच होती.भलेही आज तीन जीव एकमेकांसाठी तडफडत होते, पण ह्यात विजय फक्त पेरजागडाचाच होईल, यात मात्र तिळमात्र शंका नव्हती.आणि तरीही प्रयत्न करत राहणे हे आद्य माणसाचे कर्तव्य होतेच.त्यामुळे आता आशा होती ती वडीलांच्या बोलण्याचीच.कारण आईच्या हुंदक्याकडे बघून ती काही बोलेल असं मला वाटत पण नव्हतं."

"शेवटी अश्रू पित वडिलांनी एक दीर्घ उसासा घेतला आणि बोलायला सुरुवात केली."