aas maj balachi kadambari bhag 5 books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग ५

'आसं मज बाळाची' भाग ५

मागील भागावरून पुढे..



वैभव सकाळी ऑफीसला जाण्याची तयारी करत असतांनाच त्याच्या आईचा फोन आला. तयारी करता-करता फोन स्पीकरवर ठेवून तो बोलू लागला.


"हं आई बोलं."


"काय बोलणार? बोलायला काही बाकी ठेवलस?


"असं का म्हणतेस आई? मला कळलं नाही." वैभवनी गोंधळून विचारलं.


"कसं कळणार. काल आपल्या बाबांशी बोललास. आई तुझी कोणीच नाही. हो नं?


"अग असं का म्हणतेस? रात्र खूप झाली होती म्हणून बाबांना सांगितलं तुला आज सविस्तर फोन करणार होतो. बाबांनी तुला सांगितलं असेल नं?"


"हो सांगितलं. किती खर्च येणार आहे या उपचारांना ?


अजून माहित नाही. ही शस्त्रक्रिया करायची ठरवली की ते सांगतील. बीजांड देऊ शकेल अशी स्त्री पण शोधायची आहे."


"वेड लागलाय तुला. त्या डॉ.चं काय ऐकतोस. डॉ. काय वाट्टेल ते सांगतात. म्हणून सगळंच त्यांचं ऐकायचं नसतं."


"आई अग डॉ. कशाला वाट्टेल ते सांगतील. मला कळत नाही तू असं का बोलते आहेस?"


"मी काही चुकीचं बोलत नाही. कशाला एवढा खर्च करायचा? तुला झेपणार आहे का? तुझी बायको नोकरी करत नाही तुझ्यावर किती बोझा पडेल याचा विचार केला का?'


"माझी बायको! अग ती तुझी सून आहे. अनघा नाव आहे तिचं."


"असेल. तिच्या माहेरी तिच्या एका मावशील मुलाबाळच नाही तर दुसरीला किती वर्षांनी झालं. हे तुला माहिती आहे तरी एवढा पैसा खर्च करतोय. तिची पत्रिका बघितली असती न तर हे सगळं आधीच कळलं असतं. पण तू कुठे माझं ऐकतोस?"


वैभवला काय बोलावंच सुचत नव्हतं. फोनमधून त्याला त्याच्या बाबांचा चढलेला आवाज ऐकायला आला,


"मालती तू काय बोलतेस ते कळतंय का? ठेव फोन त्यांच्या आयुष्याचे त्यांना निर्णय घेऊ दे. आपलं तोंड जरा गप्प ठेव. तुला तुझ्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देता येत नसतील तर शाप तरी देऊ नको."वैभवाचे बाबा चिडून बोलले.


"तुम्ही आपली बडबड थांबवा. वैभव बाबांचं ऐकू नकोस."


आईचा चिडका स्वर ऐकू आला. तेवढ्यात अनघा तिथे आलेली त्याच्या लक्षात आलं त्यानी फोन कट केला.


त्याला फार वाईट वाटलं कारण अनघाचा चेहरा रडवेला झाला होता. आईचा परत-परत फोन येत होता पण वैभवने घेतला नाही.


तो अनाघाजवळ आला. ती हातानी चेहरा लपवून हुंदके देत होती. वैभव हळूच तिच्याजवळ बसला. तिला म्हणाला,


"अनघा तू आईचं बोलणं मनावर घेऊ नको. तिचे विचार कसे आहेत तुंला माहिती आहे नं? आपण सगळे उपचार करायचे आहेत. आपल्या आयुष्यातील हा महत्वाचा निर्णय आपणच घ्यायचा आहे. आणि तो आपण घेतला आहे त्यामुळे बाकी लोक काय म्हणतात याकडे आपण लक्षं द्यायचं नाही. अगदी माझी आई असली तरी. कळलं."


वैभवला वाटलं आपण उगीच फोन स्पीकरवर ठेवला. फोन स्पीकरवर असल्यामुळेच आईचं बोलणं अनघाला कळलं. पण आपल्याला तरी कुठे माहिती होतं आई असं काही बोलेल. त्याक्षणी वैभवाला आपल्या आईचा प्रचंड राग आला.



किती प्रयत्नांनी अनघा आता सकारात्मक्तेनी या उपचारांकडे बघतेय. आईच्या या कुचकट बोलण्यानी सगळ्यावर बोळा फिरवला. आता अनघानी जर आपलं पाउल मागे घेतलं तर कसं होईल. वैभवचं डोकं काम करेनासं झालं.



तो हळूच उठला आणि ऑफीसाला जाण्याची तयारी करू लागला. वैभव ऑफीसला जायची तयारी करतोय हे कळल्यावर अनघा चटकन उठली आणि खोलीबाहेर पडली. तिला जाताना पाठमोर बघितलं तसं वैभवचा जीव कासावीस झाला. लंचटाईम मध्ये आईशी जरा कडक भाषेतच बोलायला हवं हे वैभवच्या लक्षात आलं. तयार होऊन वैभव खोलीबाहेर पडला.

***



त्याला अनघा टेबलावर नाश्त्याची मांडा-मांड करतांना दिसली. तिची चाल हळू झाली होती. चेहराही उतरलेला होता. टेबलावर त्याचा डबा भरून ठेवलेला दिसला. त्याला उगीचच अपराधी वाटू लागलं. अनघाला मुल होत नाही हा तिचा एवढा मोठा अपराध आहे का?


वैभव नी मनाशी पक्कं ठरवलं की अनघावर आईच्या बोलण्याचा परीणाम होऊ द्यायचा नाही. आईलाही चांगली समज द्यायची.


वैभव डबा घेऊन ऑफीसमध्ये निघाला पण आज त्यांची चाल पण मंदावली होती. अनघाकडे एकदा बघून बाय म्हणत वैभव घराबाहेर पडला.


***

वैभव बाईक वरून ऑफीसमध्ये निघाला पण त्याच्या डोक्यात मघाचेच विचार चालू होते आणि अनघाचा गलीतगात्र चेहरा वैभवाच्या डोळ्यासमोर आला. हे आईचं विचित्र वागणं बोलणं थांबवायलाच हवं. विचारात असतानाच त्याला मघाशी घरी घडलेला प्रसंग आठवला.


तो टेबलाजवळ आला. तिथे एकच प्लेट बघून त्याच्या लक्षात आलं. आता हिला आपल्याबरोबर नाश्ता करायला लावला नाही तर ही दिवसभर काहीच खाणार नाही. म्हणून तो तिला म्हणाला,


"अनघा तू पण ये नां."खुर्चीवर बसता-बसता वैभव अनघाला म्हणाला.


"हं" एवढाच हुंकार देऊन तीपण त्याच्याबरोबर नाश्ता करायला बसली.


तिची सगळी हालचाल मुकाटपणेच चालू होती. डोळ्याच्या कोप-यातून वैभव तिच्याकडे बघत होता आणि नाश्ता करत होता. खरतर आईच्या बोलण्यामुळे त्याच्या तोंडाची चवच गेली होती. नाश्ता कारायची सुद्धा त्याला इच्छा नव्हती. पण जर त्याने खाल्लं नसतं तर तीनेही खाल्लं नसतं म्हणून तो जबरदस्ती उपम्याचा घास तोंडात घेत होता.



दुपारी अनघाला फोन करून जेवलीस का विचारायला हवं नाहीतर अशीच संध्याकाळ पर्यंत बसून राहील.नाश्ता संपवून तो बसला होता. कारण अनघाचं खाणं खूपच हळू चाललं होतं.


"अनघा अगं अजून काहीच खाल्लं नाहीस तू. मला निघायचं आहे ऑफीसाला. "


"तू जा ऑफीसला. मी खाते हळू-हळू."


तिचा आवाज एकदम निर्विकार होता. तो मनाशीच चरकला. अनघा कितीही चिडली तरी अशी निर्विकारपणे उत्तर देत नाही. आज आईच्या बोलण्यानी सगळा घोटाळा केलाय.बाळासाठी आसुसलेल्या एका स्त्रीचा आईनी अपमान केलेला होता. अनघा कसं सहन करू शकेल हे. ऑफीसाला जावं की नाही हाच विचार तो करत होता. पण काल सुट्टी झाली आज जावं लागेल.


जरा अनिछ्चेनीच वैभव खुर्चीवरून उठला. त्याला निघावच लागणार होतं कारण आधीच त्याला अर्धा तास उशीर झाला होता.डबा घेऊन अनघाच्या डोक्यावर हलकच थोपटत तो घरातून बाहेर पडला.



बाईकवरून ऑफीसला जाता-जाता त्याला प्रकर्षानी वाटलं की आपण ताईला फोन करावा. सगळं सांगावं आणि तिला जमलं तर घरी ये अनाघाजवळ असं सांगावं.ताईची अनघा लाडकी होती ती नाही म्हणणार नाही याची त्याला खात्री होती. पण क्षणात ती खात्री नाहीशी झाली. त्याच्या मनात आलं आई अशी वागेल असं तरी कुठे वाटलं होतं आपल्याला !



एका मोठा उसासा त्याच्या तोंडून बाहेर पडला.वैभव गाडी चालवत होता. आपल्याच विचारात.तो यंत्रवत ऑफीसच्या दिशेनी निघाला.ऑफीसमधे पोचताच जयंतनी विचारलं.


"कारे वैभव आज एवढा उशीरा? घरी ठीक आहे न? तुझा चेहारा इतका का उतरला आहें?"जयंताने काळजीने विचारलं.


त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता वैभव आपल्या जागेवर जाऊन बसला. जयंत त्याच्या टेबलापाशी आला. हळूच विचारलं


"उपचारात काही अडचण आली का?"

वैभव चुपच होता.


"अरे बोल काहीतरी. तू काही बोलल्याशिवाय मला कसं कळेल?"जयंत म्हणाला.


"जयंत माझी आई या उपचाराच्या विरोधात आहे. कारण हा उपचार करायला खूप खर्च येणार आहे."


वैभवच्या डोळ्यातून घळ-घळ पाणी वाहू लागलं जे त्यांनी अनघा समोर असताना महत्प्रयासानी रोखून ठेवलं होतं. जयंत त्याच्या पाठीवरून हळूच हात फिरवू लागला.


"अंदाजे किती खर्च येणार आहे?"


"अजून कळलं नाही. हे उपचार करायचे आहेत हे त्यांना नक्की सांगीतल्यावर ते अंदाज देतील. पण मध्येच आईनी सगळा घोळ घालून ठेवला. अरे आत्ता कुठे अनघा जरा धीट झाली होती. आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न."


"हे बघ असा निराश नको होऊ. अनघा कोणाचं ऐकेल?" जयंत नी विचारलं.


"सुजाताईचं ऐकेल ती." वैभव म्हणाला.


"मग झाल तर आत्ता सुजाताईला फोन लाव." जयंत म्हणाला.


"हो मी ठरवलंच होतं सुजाताईला फोन करायचा. लगेच करतो."


वैभवनी चटकन डोळे पुसले. आणि सुजाताईला फोन लावला. त्याच्या या कृतीकडे बघून जयंताच्या चेह-यावर स्मितहास्य आलं. सुजाताईनी फोन उचलताच वैभव बोलला,


"सुजाताई...आज आईचा सकाळी फोन आला होता आणि..."त्यानी सकाळची सगळी हकीकत ताईला सांगितली.


यावर ताई म्हणाली, "वैभव तुला आपल्या आईचा विचित्र स्वभाव माहिती आहे नं? तू तिच्याकडे दुर्लक्ष कर. बाबा आपल्याकडून आहेत नं मग कशाला घाबरतो?


"हो पण ताई आत्ताच अनघा जरा धीट झाली होती."


" तू काळजी करू नको." ताई म्हणाली.


"ताई अग आज सकाळी तिने नाश्तापण व्यवस्थित केला नाही. मी घरी नाही तर जेवेल की नाही कुणास ठाऊक? मी फोन करणार आहे तिला जेवायच्या वेळेस. मला हो जेवते म्हणेल किंवा जेवली असही सांगेल पण प्रत्यक्षात माहित नाही काय करेल."बोलता-बोलता वैभवचा आवाज रडवेला झाला होता.


ताई समोर रडू यायला नको म्हणून चटकन वैभव नी फोन ठेवला. त्याचा रडवेला चेहरा बघून जयंत त्याच्याजवळ आला. जयंतनी हळूच वैभवच्या पाठीवर थोपटलं. न राहवून वैभव जयंतच्या हातावर डोकं ठेऊन रडू लागला.

---------------------------------------------

क्रमशः पुढे काय झालं? वाचा पुढील भागात.

आसं मज बाळाची भाग

लेखिका... मीनाक्षी वैद्य.