Kans Maj Balachi - 6 books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग ६

आसं मज बाळाची भाग ६

मागील भागावरून पुढे...


वैभवचा फोनवर रडवेला आवाज ऐकल्यावर ताईलापण भडभडून आलं.किती वर्षांनंतर हा उपाय सापडला होता वैभव आणि अनघाला आई-बाबा होण्याचा.त्याच्यात आईचा कुचकटपणा आड येतोय.

ताई म्हणाली,


"हे बघ मी आज तुझ्या घरी जाते. जेवायच्या वेळेसच जाईन कारण आज अनायसे अनघाच्या आवडीची फणसाची भाजी केली आहे. ती घेऊन जाते. बघते ती काय बोलते. वाटलच ती खूप अस्वस्थ आहे तर आजची रात्र मी थांबीन तुझाकडे."




वैभव चटकन म्हणाला "ताई तू थांबच मला सुद्धा धीर येईल ग. मी एकटा तिला कसं समजावू शकेन कळत नाही. तू घरी सांगून दे आज तू माझ्याच कडे राहणार आहे म्हणून."


"बरं. मी सांगते घरी आणि आज तुझ्याकडेच राहते. ठीक आहे. आता काळजी करू नको.ऑफीसच्या कामाकडे लक्षं दे."ताई हसतच म्हणाली आणि तिनी फोन ठेवला.


वैभव नी जयंतकडे बघितलं. तसा जयंत म्हणाला,


" ताई येते आहे न तुझ्याकडे? आता काळजी करू नको. चांगल्या कामात अडथळे येतातच. आपण धीर सोडायचा नाही. चल, आता शांत डोक्यानी काम कर."


जयंतचा हात दाबत वैभव म्हणाला, "मित्रा तू आहेस म्हणून मला खूप आधार आहे."

";आभारप्रदर्शन पुरे."असं म्हणत जयंत हसायला लागला.


वैभवला ताई येतेय म्हटल्यावर खूप बरं वाटलं. आता ऑफीस मध्ये आपण शांतपणे काम करू शकू याची त्याला खात्री वाटली.

***

अनघा पलंगावर आडवी होऊन छताकडे बघत बसली होती. तिला आज सकाळचं तिच्या सासुचं बोलणं आठवत होतं. त्या का इतक्या विरोधात आहेत तिला कळत नव्हतं.



आपल्याला जशी बाळाची ओढ आहे तशी त्यांना त्यांच्या नातवंडाची ओढ नाही का? त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं बाळ त्यांना आपल्या मांडीवर खेळवावंस नाही वाटत का? अनघाचं डोकं विचार करून-करून थकून गेलं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहून सुकून गेलं तरी तिला उत्तर सापडत नव्हतं.


अनघा विचारात पडली होती. जेवायची इछ्चाच नव्हती तिला. कुठेतरी वेड्यासारखं बघत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. कितीवेळ वाजत होता कुणास ठाऊक. जरावेळानं तिचं लक्षं गेलं. तिच्या आईचा फोन होता.

"आई बोल."अनघा निर्जीपणे म्हणाली.

"काय ग आवाज का तुझा इतका खोल येतोय?" आईनी तिला विचारलं.

" काही नाही ग असंच."अनघा ऊत्तरली.


"तू रडत होतीस असं वाटतंय मला. खरं सांग. काय झालं? आईनी विचारलं.

"अग काही झालेलं नाही. जरा विचार करत होते."अनघा रडक्या आवाजात बोलली.


"तेच विचारते आहे कसला विचार करत होतीस? मला तुझा स्वभाव माहिती आहे. तू विचार फार करतेस मग रडतेसुद्धा म्हणून विचारते आहे."

अनघा बळेच हसून म्हणाली. "अरे हो मी विसरलेच तू माझी आई आहेस. तुला चटकन ओळखायला येईल."

"होनं. मग सांग काय झालं?"आईनी लगेच आपलं बोलणं पुढे रेटलं.

";पुढचे उपचार काय करायचे आहेत ते सांगितलं मी तुला. त्यासाठी पैशाची सोय कशी करता येईल याचा विचार करत होते. कारण बराच खर्च येणार आहे. बाकी काही नाही."


";पैशांची गरज असेल तर सांग मी पाठवतो." बाबांचा आवाज ऐकून ती चमकली. "बाबा तुम्ही! स्पीकरवर आहे का फोन?"

" हो." बाबा म्हणाले."मला तू काय म्हणतेय ते ऐकायचं होतं म्हणून फोन स्पीकर वर ठेवला."


अनघा मनाशीच हसली. 'आई अग मी नंतर करते फोन. मला सुजाताईचा फोन येतोय."


"बरं ठेव पण काळजी करू नको."

" हो." अनघा बोलली.

"अनघा अग मी आज तुमच्याकडे येणार होते. तुझं जेवण झालं का?"अनघानी फोन उचलताच ताई नी विचारलं.

"नाही."अनघा म्हणाली.

"अग आज फणसाची भाजी केली आहे. तुला आवडते नं? म्हणून मी ठरवलं आज यावं तुझ्याकडे. येऊ नं?"ताईनी हसतच विचारलं.


"ताई काय हे आमच्याकडे येतांना तुम्हाला परवानगी कशाला हवी. हे माहेर आहे तुमचं. या मी वाट बघते."


अनघानी फोन ठेवला आणि चेहरा पाण्यानी स्वच्छ धुवायला बाथरूम मध्ये गेली.

तिला ताईंसमोर रडका चेहरा घेऊन जायची इच्छा नव्हती. उगीच त्या खोदून-खोदून विचारतील मग मलाच राहवणार नाही आणि मी रडले तर त्यांना सकाळची घटना सांगावी लागेल. कशाला उगाच.

हा विचार अनघानी केला.पण तिला माहिती नव्हतं वैभवनी आधीच सगळं ताईला सांगितलं आहे म्हणूनच त्या आज इकडे येतात आहे.

फोन ठेवल्यावर ताई स्वत:शीच पुटपुटली.

" अनघासारखी इतकी छान सून मिळाली तरी आईला बघवत नाही. हिचा स्वभावाच कुचकट म्हणूनच कोणी नातेवाईक हिच्या वा-यालासुद्धा फिरकत नाही. आपले बाबा म्हणजे संत माणूस. त्यांच्याकडे बघून सगळे नातेवाईक तिच्याशी बोलतात. सगळे काय आम्हीसुद्धा. जाऊ दे लवकर आवरून वैभवकडे जाऊ."


ताईनी आज वैभवकडेच राहणार आहे हे घरी सांगितलं आणि तयारीला लागली. अनघाला कसं बोलतं करावं आणि तिला कसं समजवावं याचाच ती विचार करत होती. ताई छोटीशी पिशवी घेऊन ऑटो स्थानका पर्यंत आली. तिनं ऑटो केला आणि वैभवाचा पत्ता त्याला सांगितला.


****



" वैभव शांत हो. तुझा ल़ंचटाईम झाला असेल नं? जेऊन घे शांतपणे. संध्याकाळी तू घरी आल्यावर बोलू." ताई


"हो ठीक आहे. तू आहेस म्हणजे अनघा जेवेलच. मी घरी आल्यावर बोलू. ठेवतो." वैभवनी फोन ठेवला तस जयंतनी विचारलं. "आली नं ताई?" वैभवनी मान होकारार्थी मान डोलावली.



वैभव टेबलावरचं आवरून डबा घेऊन उठला. जयंतही उठला. दोघं डबा घेऊन नेहमीच्या जागी जेवायला गेले.जेवता-जेवता जयंत म्हणाला,

"वैभव या सगळ्या उपचारांच्या दरम्यान तुझी ताई तुझ्याबरोबर आहे हे तुझं नशीब आहे. कारण अश्याप्रसंगीच आपल्या पाठीशी कोणीतरी आपलं माणूस हवं असतं."



"हो खरय तुझं बोलणं. आता आईचच बघ ती असं काही बोलेल आणि वागेल असं वाटलंच नव्हतं. अनघा नेहमी म्हणायची त्यांच्या वागण्यातून माझ्यावरचा राग दिसतो. मला मूल होत नाही हा माझा दोष आहे का? पण तेव्हा मला तिच्याच मनातील विचार आहेत असं वाटायचं. कारण माझ्यासमोर आई नेहमीच चांगली वागायची अनघाशी. आता मला अनघाचं बोलणं पटतय. आज आईनी तिच्या मनातील चीड व्यक्त केलीच. पण ती अनघानी ऐकली याचं मला दु:ख वाटतय."



" असू दे आता फार विचार करू नकोस. काही लोकांचा स्वभाव असतो असा. सोडून द्यायचं. त्यातल्या त्यात एक जमेची बाजू म्हणजे तुझे बाबा तुझ्या बाजूनी आहेत आणि ताई सुद्धा."


"हो तू म्हणतोस ते खरं आहे. जर माझ्या पाठीशी कोणीच नसतं तर माहित नाही कदाचित आम्ही दोघांनी कधीच हे उपचार घेतले नसते. आता ताई घरी समजावेल अनघाला."


" तू शांत रहा. घरी गेल्यावर सामोरा-समोर बसून तिला सांग आणि पुढे काय करायचं हे ठरावा.चल आता. जेवण झालय. जेवणाची वेळ सुद्धा संपली आहे."


दोघंही आपापला डबा बॅगमध्ये ठेवून उठले.


अनघा ताईंची वाट बघत समोरच्या खोलीत बसली होती. थोड्याच वेळात बेल वाजली. अनघानी दार उघडलं. "या" ताईहसून म्हणाली. ताई पण तिच्याकडे बघून हसली. अनघाचं हसणं ओढून-ताणून आणलेलं आहे हे ताईच्या लक्षात आलं. पण तिनी तसं दाखवलं नाही. ताई सोफ्यावर बसली.


"अनघा हे घे डबा. तुझ्या आवडीची फणसाची भाजी आणली आहे. काल मी फणस घेतला तेव्हाच मनात आलं की फणस न देता भाजीच घेऊन यावी. तुला माझ्या हाताची आवडते नं. "


अनाघानी तिच्या हातून डबा घेऊन टेबलावर ठेवला आणि सोफ्यावर येऊन बसली. अनघाची चाल नेहमीपेक्षा मरगळलेली आहे हे ताईच्या लक्षात आलं. एरवी याच फणसाच्या भाजीबद्दल किती आनंदानी बोलली असती. आज फक्त डबा टेबलावर ठेवला आणि शांत होती. ताईला हे बरं वाटलं नाही. अनघाला यातून बाहेर काढायला हवं असं तिला वाटत होतं पण कस? ते कळत नव्हतं एरवी सतत बोलणारी अनघा आज तोंडाला चिकटपट्टी लावून बसलेली होती.


शेवटी ताईच बोलली."अग आज मी तुमच्याकडे यायचं ठरवलं न तेव्हा आनंद म्हणाला आई तू आज एक दिवस रहा की मामाकडे. मामालाही बरं वाटेल.मी काय पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून लगेच दोन कपडे घेतले आणि आले."


ताई एवढं बोलतांना अनघाचा चेहरा न्याहाळत होती. आपण आलेलं आवडलं आहे की नाही हेच ती निरखत होती. एरवी ताईच्या या म्हणण्यावर उत्साहानी दहा वाक्य तरी बोलली असती. आज मात्र ती काहीच बोलली नाही. कुठल्यातरी विचारात गढलेली दिसत होती. बघत ताईकडेच होती पण तरीही तिचं लक्षं ताईकडे नव्हतंचं. तिचं हे वागणं बघून ताईला मनातून भडभडून आलं अनघाला दिसू नये म्हणून ताई पाणी पिण्याच्या निमित्तानी स्वयंपाकघरात गेली.


एरवी तिनी ताईला उठूच दिलं नसतं. तीनच पटकन पाणी आणलं असतं. पण सगळंच विपरीत घडतंय. सहाजिक आहे आईचं बोलणं तिच्या वर्मी लागलं असेल म्हणून तिच्या वागण्यात हा नको असा बदला झालाय.ताईला आपल्या आईचा रागच आला. तिनी अनघावर हा घाव घालतांना मला डोळ्यासमोर का नाही ठेवलं? माझ्यावर अशी वेळ आली असती तर... काय केलं असतं ती अनघाला बोलली तशीच मला बोलली असती! ताईनी स्वयंपाक घरातून बाहेरच्या खोलीत बघितलं तर अनघा अजूनही कुठेतरी बघत बसली होती.


अनघाची मन: स्थिती बघून ताईला चिंता वाटली.ही पुन्हा पहिल्यासारखी कशी होईल? मध्येच हिने उपचार नाही करत म्हटलं तर? ताई याच विचारात गुंतली.

----------------------------------------------------------------------

क्रमशः आसं मज बाळाची भाग ६



पुढे काय झालं? वाचा पुढील भागात.

लेखिका... मीनाक्षी वैद्य.