Asam Meghalay Bhramanti - 2 books and stories free download online pdf in Marathi

आसाम मेघालय भ्रमंती - 2

#आसाम_मेघालय भ्रमंती २

पुणे ते हैद्राबाद तसा तर केवळ एक तासाच्या आतच संपणारा प्रवास;पण आम्हा दोघांचाही हा पहिला विमान प्रवास होता त्यामुळे असेल;पण विमानात बसल्यापासून आत आणि बाहेर खिडकीतून आमच्या दृष्टिक्षेपात येणाऱ्या प्रत्येक घटना आणि दृष्याकडे अगदी लहान मुलाच्या कुतूहलाने आम्ही दोघेही बघत होतो.आयुष्यातल्या पहिल्या एस टी प्रवासाचा किंवा पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद जेव्हढा लहानपणी झाला होता किंबहुना त्यापेक्षा जास्तच आनंद या प्रवासात मिळाला असावा.वयाच्या साठीनंतर दुसरे बालपण सुरू होते असे म्हणतात ते काही खोटे नाही... असो...
हैद्राबादच्या राजीव गांधी विमानतळावर उतरून आम्हाला कनेक्टेड विमान सुटणार होते त्या गेटला पोहोचायचे होते.मित्रांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सिक्युरिटी चेक, बॅग स्कॅनिंग आदी सोपस्कार पूर्ण करून आम्ही तिकिटावर लिहिलेल्या १०६ नंबरच्या गेटवर एकदाचे पोहोचलो.आता पुढे जवळजवळ दोन तास रिकामा वेळ होता आणि सडकून भूकही लागली होती.तिथेच बाकांवर बसून घरून आणलेल्या सुक्या नाष्ट्यावर तुटून पडलो.सोबत गप्पा टप्पा चालूच होत्या.
आमचे विमान साडेनऊ वाजता निर्धारित होते आणि पावणे नऊ वाजता ते १०६ नंबरचे गेट उघडणे अपेक्षित होते; पण नऊ वाजून दहा मिनिटे झाली तरी त्या गेटवर काहीच हालचाल नव्हती!
मला काहीतरी गडबड असल्याची शंका आली आणि मी तेथेच दुसऱ्या गेटवर असलेल्या स्टाफला माझी शंका विचारली.त्याने थंडपणे सांगितले ...
"हो सकता है,आपका गेट चेंज हो गया रहेगा,जा कर डिस्प्ले देखो..."
मी पळतच त्याने बोट दाखवलेला डिस्प्ले शोधून वाचायला लागलो ...
बापरे...आमचे विमान सुटणार होते ते गेट ऐन वेळी बदलले होते...१०६ ऐवजी २८ नंबरच्या गेटवर जायचे होते.मी पटकन या बदलाची माहिती आमच्या गृपला दिली.सर्वांनी आपापले सामान घेऊन पहिल्या मजल्यावरचे ते गेट शोधून काढले. नशीब आमच्या हातात पाच सात मिनिटे होती! एकदाचे आम्ही आमच्या हैद्राबाद ते गुवहाटी प्रवासाच्या इंडिगो विमानात स्थानापन्न झालो.आता दोन तासांची निश्चिती होती.बरेच जण झोपून गेले आम्ही मात्र आधीच्या उत्साहातच ढगांच्या वर तरंगण्याचा तो अनुभव घेत राहिलो.आसामच्या पहाडी प्रदेशातून शेवटचा अर्ध्या तासाचा प्रवास केवळ अवर्णनीय असा होता. .गुवहाटी Lokpriya Gopinath Bordoloi International Airport वर आमचे विमान उतरले आणि आम्ही लगबगीने आमच्या बॅगा ताब्यात घेण्यासाठी लगेज बेल्टकडे धाव घेतली.एअरपोर्टच्या बाहेर केसरी टूर्स चा लाल झेंडा दाखवत आमचा टूर गाईड केशव केरकर आणि तेजस जाधव आमची वाटच पहात होते. तेथील जवळच्या हॉटेलमध्ये लंच घेऊन आम्हाला लगेच शिलाँगकडे प्रयाण करायचे होते.जेवणाची वेळ झाल्याने आम्ही ताबडतोब पोटोबा उरकून घेतला.तोपर्यंत आमच्या बॅगा पाच पाचच्या गृप साठी एक कारची व्यवस्था केलेल्या एर्टिगा गाड्यात ठेवल्या गेल्या होत्या.केशव आणि तेजस आता आमचे पुढच्या सहा दिवसासाठी गाईड कम केअर टेकर होते.अगदी प्रथम भेटीतच त्यांनी दिलेल्या सेवेची झलक बघून आपली ही सहल सुरळीत पार पडणार याची खात्री पटली होती. आम्ही जेवण उरकून आम्हाला नेमून दिलेल्या गाड्यात बसलो आणि आमचा .गुवहाटी ते शिलाँग प्रवास सुरू झाला.गुवहाटी ते शिलाँग हा प्रवास तसा तर फक्त ९९ किलोमीटरचा होता; पण या प्रवासासाठी साधारणपणे तीन साडेतीन तास लागणार होते.वेळेचा अंदाज घेऊन त्या दिवशी विशेष काही न बघता आम्ही शिलाँगकडे कूच केले.पहाटे दोन ला उठून आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती.हैद्राबादला दोन तास वेटींग झाले होते; पण या सर्व प्रवासाचा शिण कुणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता. रस्त्यात एका साधारण हॉटेलमधे चहा ब्रेक झाला आणि पुढचा प्रवास सुरू झाला संध्याकाळी सात वाजता आम्ही डोंगरात बसलेल्या शिलाँग शहरात अर्थात भारतातल्या स्कॉटलंडमध्ये प्रवेश केला.अत्यंत अरुंद गल्ली बोळाचे रस्ते असल्याने इथे ड्राईव्ह करणाऱ्यांचे कौतुक वाटत होते. सात वाजले तरी शिलाँग मध्ये अंधाराचा मागमूस नव्हता.रस्त्यावर उघडीवाघडी दुकाने अगदी गर्दीत मांडलेली होती.आमचे हॉटेल पोलीस बझार भागात होते.हा शिलाँग मधील मार्केट एरिया म्हणून ओळखला जातो.रस्त्यावर तुफान गर्दी होती.पार्किंगला जेमतेम जागा असलेले आमचे एम क्राऊन नावाचे हे हॉटेल आतून मात्र एकदम चकाचक होते.आता पुढचे तीन दिवस आमचा मुक्काम याच हॉटेलवर असणार होता.डिनर पूर्वी या ट्रीपसाठी विविध भागातून आलेले सर्वजण हॉलमध्ये भेटलो.प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. आपले नाव गाव व्यवसाय आणि काय काय छंद आहेत ते सांगितले.मी आणि माझी पत्नी, बाळसराफ आणि सौ बाळसराफ,शितोळे आणि सौ शितोळे तसेच सक्सेना मॅडम या आमच्या गृप बरोबरच नांदेडहून देशमुख डॉक्टर पतीपत्नी तर नागपूरहून अत्यंत उत्साही असे डॉक्टर दांपत्य लाडूकर आले होते.धुळ्याचे देशपांडे कुटुंबीय,त्यांचे व्याही पुण्याचे डॉक्टर कुलकर्णी, बेलदरे मॅडम आणि त्यांचा उत्साही चिरंजीव स्वप्नील यांची ओळख झाली.विशेष म्हणजे आमच्या या सहलीत अनेक वर्षे पुण्यात नोकरीनिमित्त राहिलेले आणि सध्या कोलकता येथील रहिवाशी भट्टाचार्यजी आपल्या पत्नीसह सामील झाले होते.एकंदरीत पुणेकरांची संख्या जास्त होती.शिवाय वय वर्षे वीस ते सत्तर असलेल्या व्यक्तींचा आमचा हा गृप होता...
शिलाँग हे मेघालय राज्याचे राजधानीचे शहर आहे.बहुसंख्य खासी आदिवासी रहात असलेल्या या शहरात खासी हीच भाषा मुख्यत्वे बोलली जाते.इंग्रज राजवटीत इथले वातावरण इंग्रजांना स्कॉटलंडसारखे वाटले त्यामुळे त्यांनी या परिसरात हे शहर वसवले.संपूर्ण शहर डोंगरात वसले आहे त्यामुळे सगळे रस्ते गल्ली बोळाचे आहेत ...
दिवसभराच्या प्रवासाने सगळे थकले होते त्यामुळे जेवण झाल्याबरोबर सगळेजण आपापल्या रूममध्ये परतलो...
अशा प्रकारे आमच्या भ्रमंतीचा पहिल्या दिवसाची सांगता झाली ...
(क्रमशः)
©प्रल्हाद दुधाळ.