Mall Premyuddh - 5 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 5

मल्ल - प्रेमयुद्ध





सूर्योदयापूर्वी दादा उठले होते. सगळी पोर शांत झोपली होती. रात्री पोर उशिरा आल्यामुळे बोलणेझाले नव्हते. दादांनी लक्ष नेहमीप्रमाणे गुरांच्या हंबरण्याकडे खाटेवरून उठून दादा गोठ्यात गेले. सोनेरी, लाल, पिवळे ,नारंगी सूर्यकिरण डोंगरामागून दिसायला सुरुवात झाली होती. "आलो आलो बाई विठाबाई कशाला गोंधळ करतीस मला माहितीये सकाळ झाली. तुमास्नी भूक लागली असेल."

दादांनी वैरण हातात घेतली आणि सगळ्या गुरांपुढं पुढे टाकली. शेळीला सुद्धा खायला दिले . तेवढ्यात आशाबाई शेन काढायला गोठ्यात आल्या.
"आव... आज मला उठवलं नाही."
"बघितलं मी सगळ्यांनी पण सगळे गाढ झोपले होते मन उठवला नाय." आशाने सगळा गोठा सरा सरा सरा झाडून काढले तोपर्यंत दादा तळहातावर मिस्त्री घेऊन खसाखसा दात घासत होते.

उठल्यापासून क्रांती आणि रत्नाचा मूड काही चांगला नव्हता. दोघेही शांत शांत होत्या. आशाने दादांच्या कानावर झालेल्या गोष्टी घातल्या होत्या. दादा शांत होते दादांनी क्रांतीला जवळ घेतलं रत्नाला समोर बसवलं आणि सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आयुष्यात जर काही चांगलं होणार असेल तर अशा गोष्टी व्हायचाच. संतोषने सकाळ सकाळ आमदार साहेबांना फोन लावला होता पण आमदार साहेब काहीच करु शकत नव्हते. पोरी वेळेवर पोहचल्या तर त्यांच्या हातातून सगळं निसटणार होत. संतोषला त्यांनी सांगितल.
संतोष गप्प बसणाऱ्या दिला नव्हता आपल्या बहिणीसाठी आणि रत्नासाठी तो काहीही करायला तयार होता. तो आमदारांना भेटायला जाणार होता पण कसं होणारे सगळं देवाला आणि त्यालाच माहीत होत.

दादा देवाजी पूजा करत होते. आशाने नेवैद्याला आणि सगळ्यांसाठी गुळाचा शिरा बनवला होता. सगळ्या घरभर खमंग वास येत होता. "आई गुळाचा शिरा...वा!" चिनू स्वयंपाघरात शिरत म्हणाली.
"अंघोळ केल्याशिवाय काही नाही. सगळ्यांच्या अंघोळा झाल्या बाई चिने किती वेळ तुला सांगायचं अंघोळीला जा... कसला कंटाळा येतो तुलाच माहीत." आईची बडबड चालू होती. आरतीचा घंटानादाने घर भक्तीत न्हावुन निघाले होते. धूप, उतबत्तीचा सुगंध दरवळ होता. दादा चिनूची आणि आईची मजा बघत तोंडात श्लोक म्हणत होते.

तेवढ्यात दारावर धाप पडली. दादा पूजा आवरून खाटेवर बसले होते. कुरुंगुटच्या पाटलांना अस अचानक दरवाजात बघून त्यांची धांदल उडाली.

" या हा पाटील आज इकडं कस म्हणायचं...?" दादानी उठून त्यांचे स्वागत केले. आशा लगबगीने डोक्यावरपदर घेऊन बाहेर आल्या.

" नमस्कार अर्जुनराव..." पाटील खाटेवर बसले सोबत संग्राम होता. चिनूने त्यांना पाणी आणून दिले. अर्जुन आणि आशाला असंख्य प्रश्न पडले होते. त्यांचा मुलाला कुस्तीमध्ये हरवले म्हणून ...? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता पण...
" अमास्नी ठाव हाय तुम्हाला लय प्रश पडलं असत्याल थेट मुद्याला हात घालतो." पाटील म्हणाले.
"काय झालं?" अर्जुन जर घाबरत म्हणाले.
"कुस्तीत आमचा लेक हरल्यापासन तुमच्या लेकीच्या पिरमात पडलाय. त्यांना तुमच्या मुलींबर लग्न करायचंय..." अस म्हंटल्याबरोबर आशा आणि अर्जुनने एकमेकांकडे पाहिले.
"पण पोरगी दिल्लीला निघाली. नॅशनलला उतरायच्या तयारीत हाय.. अस अचानक लग्न." अर्जुन

" व्हय अमास्नी म्हाइत हाय... शेवटी इचार तुमचा हाय. लेक तुमची, निर्णय तुमचा." पाटील म्हणाले चिनूने त्यांना चहा आणून दिला. संग्राम त्यांचं घर निरखून बघत होता.

" आबा आव वीरसाठी चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी माग पडल्यात. इथं काय बघतोय काय म्हाइत." संग्राम पाटलांच्या कानात कुजबुजला.

" आम्हाला इचार करायला थोडा वेळ द्या." अर्जुन म्हणाले.
" हो हवा तेवढा घ्या आणि हो पोरंगीचा इचार घ्या शेवटी आयुष्य त्यांचं हाय आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही कुरुंगुट गावचे पाटील... अस समजू नका की एवढे मोठे लोक आपल्या दारात आलेत म्हणल्यावर अपेक्षा असणार. आम्हाला तुमची लेक आणि नारळ द्या बस." पाटील उठले आणि हात जोडून म्हणाले. त्याचबरोबर संग्रामसुद्धा उठले. अर्जुन शांत होते त्यांना काय बोलावे हे कळतच नव्हते.

"न्याहारी करून जावा जी..." अर्जुन म्हणाले.
" नाही आता लगीन ठरल्यावर जेवणच ..." पाटील बाहेर पडले आणि संतोष आत आला. त्याने पाटलांना बघून नमस्कार केला.
"हे पाटील का आले होते.?" आत आला आणि त्याने दोघांना विचारले.


"वीर चुकतोयस तू?" भूषण रागामध्ये त्याला म्हणाला. वीर शांत होता.
" वीर अरे त्या पोरीचं भविष्य उध्वस्त करायचा तुला काहीच अधिकार न्हाय लेका. का अस वागतोयस?" भूषण पुन्हा त्याला म्हणाला.
" तीच तीन ठरवायचं लग्न झाल्यावर काय करायचं मी न्हाय सांगणार. तिला पुढं जाऊन स्टेट, नॅशनल लेवलला जायचं असलं तर जाईल. निर्णय तिचा." वीर शांतपणे म्हणाला.

" हित उंबरा ओलांडायची परवानगी घ्यावी लागते तुमच्या बायकांना आणि म्हणे तिचा निर्णय..." भूषण हसला.
"अरे मला लाज वाटती तुझ्या विचारांची..." भूषण
"काहीही वाटु दे तुला किंवा बाकीच्यांना मला काही फरक पडत न्हाय मी मला वाटतंय तेच करणार." वीर
" वीर तूझ ज्या मुलीवर प्रेम नाही अश्या मुलीबर तू फक्त बदला घेण्यासाठी लग्न करणार. नको वीर रे अस नको करूस."
भूषणला आज वीरची कीव करावीशी वाटत होती.
" ज्या मुलीनं अपमान केला त्या मुलीवर प्रेम... शक्यच नाही. मला फक्त तीला दाखवून द्यायचं आहे की ती चुकीची आहे."
"अरे मग पुनः कुस्तीत हरवून अपमानाचा बदला घे... तू तर तीच आयुष्य पणाला लावतोयस." भूषण
" हीच तिची शिक्षा..." वीर
" वेडा झालंयस सुडी भावनेनं... वेडा... देव करो आणि तिला तिच्या घरच्यांना तुझ्या स्थळाला नाही म्हणायची बुद्धी मिळो." भूषण रागाने निघून गेला.



सगळे शांत बसले होते. एकीकडे आमदार साहेबांनी खूप फोन करून सुद्धा दिल्लीमधून कोणतीच मदत मिळत नव्हती आणि दुसरीकडे राजवीरसाठी लग्नाची मागणी.
"दादा आमदार ससाणे म्हणालेत की दिल्लीवरून कोच म्हणालेत की पुढच्या महिन्यात एक बॅच सुरु व्हईल त्यात प्रयत्न करू. वाट बघण्याशिवाय पर्याय नाय." संतोष म्हणाला.
" दादा दुसरा पर्याय न्हाय का ?" क्रांतीने अजून एक विचार मांडला.
" आग अपल्या इथंन मुंबईला जायला एक दिस लागतो. अन तिथून ट्रॅव्हल्सन जायला एक दिस..." इथून तिथून तुम्ही न्हाई पोचणार." संतोष

"महिनाभर वाट बघण्याशिवाय पर्याय न्हाय न्हवं मग इशय बंद आता पाटलांचा इचार करा. स्थळ हातच जायला नको आव त्यांचा पोरगा पैलवान म्हणल्यावर दोघासनिबी दिल्लीला एकत्र पाठवत्याल" आशा म्हणाली.

" हम्मम डोक्यावरचा पदर पडला तर महापाप होत न म्हण दिल्लीला पाठवत्याल." चिनू म्हणाली.
" चिने मोठ्या माणसात बोलायचं न्हाय." आशा ओरडली.
" मला कायतरी चुकीचं वाटतंय..?" दादा
" दादा मला सुद्धा तसच वाटतंय... न्हायतर बरोबरच्या लोकांना सोडून ते आपल्या दारात एक पैशाची अपेक्षा न करता कसं येतील." संतोष म्हणाला.
" बाकी राहुद्या आपल्या पोरीच सोन्यासारख व्हईल. ऐका माझं तुमच्या कुस्तीच्या पायी नका पोरीचं आयुष्य पणाला लावू." आशा
" आई मला कोणी ईचारात मला काय वाटतंय?" क्रांती म्हणाली.
" पण काहीही म्हण तुझं नशीबच बदललं." रत्ना म्हणाली तसे संतोषने रत्नाकडे रागाने पाहिले.
" मला दिल्लीला जायचंय आत्ताच नाही लग्न करायचं आणि त्या पोराबर तर मुळीच न्हाय." क्रांती
" काय कळतंय ग तुला तुझ्यापेक्षा आमाला कळतं आम्ही बघतो." आशा म्हणाली तसे सगळे शांत बसले.

" आव मला वाटत तुम्ही होकार सांगा." आशा म्हणाली.
" आव लग्न क्रांतीला दिल्लीला जायचंय अन अजून एवढं वय न्हाय लगीच लग्न करावं इतकं जाऊद्या पोरीला नाव कमवू द्या आपलं नाव मोठं करील मग करू लग्न."दादा.
" गावात लोकांना समजल ना की पाटलांचे स्थळ नाकारल तर हसत्याल लोक... ते काय न्हाय करताच लगीन त्याच घरात व्हईल. आव आपली लेक फुकट जाती." अस म्हंटल्यावर क्रांतीच्या डोळ्यात पाणी आले. ती पटकन बाहेर उठून गेली तिच्यापाठी रत्ना गेली.
" काय बोलताय आव आशा तुम्ही? फुकट जाती मंजि आव लग्न करून द्यायची हाय ऐपत आपली." दादा
" पण दिल्लीला जाऊन काहीच झालं न्हाय तर तोपर्यंत पाटलांच स्थळ थांबणार हाय का? तुम्ही पोराचं ऐकू नका . माझी शपथ हाय हे लग्न झालं पाहिजे.अपल्यापुढं अजून एक लेक हाय लग्नाची आणि संतोष च काय त्याच नकोरच बघायला पाहिजे ना पाटलासोबत सोयरीक जमली तर ते त्यांच्या साखर कारखान्यात लावतीळ कामाला.... आव सगळ्या गोष्टींचा इचार करून बोलतीया ... चांगला विचार। करू त्यांना सांगू पोरीला पुढं खेळायचंय... नक्की हो म्हणतील बोलल्याशिवाय आपल्याला त्याबच म्हणणं कळणार हाय का?" आशाने दादांना शपथ घातली आता काय बोलावे हे दादांना समजत नव्हते.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
पुणे




दादा कोणाचा विचार करतील? मुलीचा...? बायकोचा...? की पैशाचा...?
क्रांती लग्नाला तयार होईल?
बहिणीवर अतोनात प्रेम असणारा भाऊ आपल्या बहिणीचे लग्न लावून आपला फायदा बघेल?
भूषण वीरचे मन वळवण्याचा पुन्हा प्रयत्न करेल का आणि केलं तरी वीर ऐकेल????
नक्की वाचा पुढचा भाग....


ही वेगळी कथा कशी वाटते ते नक्की कळवा.
धन्यवाद