Mall Premyuddh - 6 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 6

मल्ल - प्रेमयुद्ध




रत्ना आवराआवर करत होती. तिला तिच्या गावी निघायचं होत.
"रत्ना आवर तुला सोडून आल्यावर मला रानात नागरायला जायचंय." संतोष गडबडीत म्हणाला.
" मग नाही जात आज ..." रत्ना हसली.
" खरच नको जाऊ आज उद्या जा... मी फोन करून सांगते बाबांना." क्रांती म्हणाली.
" आधीच मी गेले नाही म्हणून टेन्शनमध्ये आहेत सगळे आणि आज नाही येणार म्हंटल्यावर बाबा चिडतील." रत्ना काळजीने म्हणाली. रत्नाच्या लक्षात आले होते की क्रांतीला तिच्यासोबत बोलायचे आहे.
"बाबा मला नाही म्हणणार नाहीत. मी एकदा फ़ोन करून बघते.
क्रांतीने बाबांना फोन केला. बाबांसोबत बराच वेळ बोलली. रत्नाला त्यांनी राहायची परवानगी दिली.
" बघ म्हंटले होते ना की बाबा मला नाही म्हणणार नाहीत. तू उगीच टेन्शन घेतेस. शेवटी काय त्यांनाही माहीत आहे तुला याच घरात यायचंय." क्रांतीने संतोषकडे पाहिले आणि हसली.
" हो तुझ उरक मग आम्हाला मार्ग मोकळा." संतोष अस म्हंटल्यावर क्रांतीचे डोळे पाण्याने भरले.
" ये अस काय म्हणतो रे... तिने थोडी अडकवलय आपल्याला... मला पुढे खेळायचं म्हणून आपण थांबलो ना. आई बाबा तर केंव्हाचे मागे लागलेत. क्रांती तू लक्ष नको देऊ ग ह्यांच्याकडे ." संतोष तिच्या जवळ गेला.
" ये बहिणाबाई अग मी प्रयत्न करतोय तुला दिल्लीला पाठवण्यासाठी आणि मी का तुझ्या लग्नाच्या मागे लागेन...? मजा केली." संतोषने क्रांतीला जवळ घेतले.
" दादा मला नाही लग्न करायचे वीर सोबत... मला माहित आहे तो बदला घेण्यासाठी करतोय पण आई... आई काय करेल मला तीची सुद्धा काळजी वाटतिया... दादा स्थळ चांगलंच हाय पण माणसं..???" क्रांतीला भीती वाटत होती.
" हे बघ देव जे करतो ना ते चांगल्या साठी करतो दादांचा किती विश्वास हाय त्या पंढरीच्या राजावर तो नक्की काहीतरी मार्ग दाखवल?." संतोषने बहिणीच्या डोक्यावर हात ठेवला. तेवढ्यात बाहेरून दादा आलेले दिसले.
" विठ्ठल विठ्ठल..." रत्ना ने दादाना पाणी आणून ददले.
" दादा सकाळी बाहेर?" सतिश म्हणाला तेवढ्यात आई स्वयंपाकघरातुन बाहेर आली.
" सरपंचांनी निरोप पाठवला व्हता भेटायला बोलावलं व्हत... म्हणुन गेलो व्हतो." दादांनी सगळं पाण्याचा तांब्या घशात रिकामा केला.
"का हो दादा?" क्रांतीने विचारले.
" त्यांना पाटील भेटले तवा पाटलांनी आपल्या क्रांतीविषयी सांगितल.मंजी मागणी घातली म्हणून..." दादा
" मग काय म्हणणं हाय सारपंचाच..?" आशा
" नशीब हायम् हणून अशी जागा आली हाय क्रांतीला ते ही एवढी मोठी माणसं अन फक्त नारळ आणि पोरगी मागत्यात... मला म्हणाले लय इतर नको करू... लग्न झाल्यावर सुद्धा खेळलं तुझी लेक... पाटील म्हणलं तस त्यांना." दादा
" पण दादा पुढं क्रांतीला बाहेर पाठवत्याल न्हाय वाटत अमास्नी." संतोष
" हो दादा... आम्हाला नक्की वाटत की क्रांतीने त्याला हरवल म्हणून तो लग्न करतोय." रत्ना
" बघ सरपंचाच एकल न्हाय तर त्यासनी काय वाटलं? मला वाटत एकदा मी, आशा अन संतोष जाऊन येतो पाटलांकडे
पुढं जर न्हाय बर वाटलं तर इशय बंद करू." दादा
"पण दादा???" संतोष
" दादा मला लग्नच नाही करायचंय तर तिथं जायला कशाला पाहिजे." क्रांती.
" क्रांते दादा एकदा म्हणलं तर पुढं बोलायचं न्हाय." आशा
" आशा आव बरोबर हाय तीच पण मी हे कशासाठी म्हणतोय हे तिला कळायला पाहिजे नव्ह." दादानी मोर्चा क्रांतिकडे वळवला.
" बघ बाळा... ठाव हाय तुला आता लग्न न्हाय करायचं पण मोठी माणसं म्हणतात ते इचार करूनच... सरपंचांनी मला बोलावलं त्यांचा शब्द मोडून न्हाय चालणार ना.. गावात राहतोय लोक मान देतात आपल्याला... आपण पण त्यांचा मान ठेवला पाहिजे नव्ह. काळजी नको करू तो विठुराया हाय ना तो करील समद नीट." दादानी क्रांतीला समजावले.
" मग निरोप पाठवा न्हायतर फोन करा उद्या जाऊन येवू आपण." आशाने डोक्यावरचा पदर नीट केला.

रात्र झाली होती. बाहेर किरर अंधार पडला होता.जेवण करून क्रांती आणि रत्ना बाहेर ठेवलेल्या खाटेवर बसल्या होत्या. टिपूर चांदण्यामध्ये क्रांतीचा पांढराशुभ्र चेहरा उठून दिसत होता.
" क्रांती तुला माहीत आहे का तू किती गोड दिस्तीस. ह्या कुस्तीच्या वेडापायी लहानपणापासून तू एकदातरी निरखून आरश्यात पाहिलस का? नेहमी तालीम, व्यायाम आणि खुराक कितिबदिवस झाल एकच दिनक्रम... दिवस नाय वर्ष... नीट अभ्यासात सुद्धा लक्ष न्हाई की वाढत्या वयाकड... तुझा दादा तुझ्यामुळं भेटला म्हण प्रेम तरी समजले. पण... तुझं काय...?" रत्न टिपूर चांदण बघत बोलत होती.

" मला नाही जाणवलं कधी कोणाविषयी प्रेम आणि करायचं सुद्धा नाय... माझी स्वप्न वेगळी आणि माझं जग वेगळं... लग्न करून पाटलाच्या घरात आयुष्यभर डोक्यावर पदर घेऊन जगू मी... आणि संपूर्ण आयुष्य त्या मग्रूर पोराबर घालवू...? ज्याचा चेहरा बघायची इच्छा न्हाय माझी त्याच्याबर लग्न...? शक्य न्हाय..." क्रांती झटकन उठून उभी राहिली.
" क्रांती आपण एक भाजून इचार करतो असे न्हाय वाटत तुला." रत्ना
" म्हणजे???" क्रांती.
" मला वाटतंय की तो तुझ्या प्रेमात पडला असलं." रत्ना
" छे पैलवान अन प्रेमात..." क्रांती
" सोड मला त्याच्याशी घेणं देणं न्हाय पण आता करायचं काय...?" क्रांतीची काळजी रत्नाला समजत होती.
"उद्या आल्यावर ठरवू." रत्ना.
" रत्ना आईकडे बघून मला वाटतं...." क्रांती थोडी घाबरून बोलली.
" काय...?" रत्ना
" ती बहुदा माझं लग्न ठरवून येईल." क्रांती.
" तू कशाला काळजी करती... संतोष जातोय अन दादा आहेतच की..." रत्ना
" रत्ना तुला माहीत नाही पण आई एक वेळ अशी आणेल की दादा आणि संतुदादा सुद्धा काही करू शकणार नाहीत." क्रांती

" एक काम करू आईंना पाठवायलाच नको मग..." रत्ना
" ते शक्य नाही ... जिथं दादा जातील तिथं आई जाणारच... रत्ना मला लायच भीती वाटती ग...रात्रंदिवस मेहनत घेतली. दिल्लीला जायचं स्वप्न स्वप्नच न्हाय राहायचं ना... मला त्या मग्रूर पोराबर न्हाय लग्न करायचं... पण दादांची परिस्थिती बघता त्यांचा इचार करावा वाटतो पण मग मी काय करू... पैशांचा इचार करुन माझ्या स्वप्नांना सोडून देऊ... एकंदरीत मला न्हाय वाटत तो मला पुढ खेळून दिल. पुरुषाला त्याचा पुढं त्याच्या बायकोनं गेलेलं कधीच रुचल न्हाय अन हा तर अहंकारी ... हा मला लग्न झाल्यावर पाऊल सुद्धा घराबाहर टाकून देणार न्हाय..." क्रांती

" तू नकारात्मक इचार नको करू क्रांती...असा इचार कर की तुझं नशीब काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतंय..... तुझं आयुष्य बदललं." रत्ना
" त्या वीर कड बघून तुला वाटतंय की त्याच्याबर लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य सुखाचं व्हइल...? काय इचार करून त्यानं मला मागणी घातली असलं? मला लय मोठा प्रश्न पडलाय ग रत्ना..." क्रांती.
काही इचार नको करू जे होईल ते चांगल्यासाठी... दादा म्हणले न विठुराया काहीतरी चांगलंच करील. चल लै उशीर झालाय झोपू..." दोघी आत गेल्या.

पाटलांच्या घरी लगबग सुरू होती. घरात दोन तीन गडी आवराआवर करत होते.
वाड्याचा भला मोठा दरवाजा. उघडला की चौफुल्यात रेखीव तुळशीवृंदावन होते. समोर पायऱ्या चढल्या की चकचकीत हॉल होता. उंची सोफा सेट, मधोमध टीपॉय, त्यावर तांब्याचा तांब्या आणि ग्लास, थोडं पुढ गेलं की झोपाळा... त्यावर पांढरीशुभ्र गादी, लोड, त्याच्या पलीकडे आठ खुर्च्यांचा डायनिंग टेबल. वाडा जुना असला तरी... घराची सजावट मात्र आधुनिक होती.

दादा, सरपंच, संतोष, आशा सगळे पाहुणे मंडळींचे स्वागत पाटलांनी स्वतः केले. सोफ्यावर बसल्यानंतर आशाबाई वाडा बघून चकित झाल्या त्याचबरोबर नोकरचाकरबघून आणखी अचंबित झाल्या. सुलोचनाबाई, तेजश्रीने सुद्धा हसून सर्वांचा पाहुणचार केला. सगळं बघून दादा काही बोलतच नव्हते.
" हा आमचा छोटा वाडा..." पाटील
" काय पाटील लाजवता का अमास्नी." सरपंच म्हणाले.
" आव खरच मोठेपणा मिळवायची हौस आमची नव्ह." पाटील मिशिला पीळ देत म्हणले.
" या आत या आशाताई वाडा आतून दाखवते. " सुलोचनाबाईच्या मागेमागे अशाबाई चालत होत्या एक एक खोली बघून त्यांचा उत्साह आणखी वाढत होता. वाडा संपायचा नाव घेत नव्हता. बाहेर इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. संग्राम नुसताच हो ला हो करत होता. तेवढ्यात वीर बाहेरून आला. सर्वांना हात जोडून नमस्कार केला. दांडग्या वीरला पाहून दादा आणि आशा आणखी भारावून गेले. त्याच अदबीने बोलणं वागणं बघून दादांच्या मनात वीरच क्रांतीसाठी योग्य पोरगा आहे असं त्यांना मनोमन वाटले. सगळंच लेकीसाठी चांगलं विठुरायाच्या कृपेने घडून येतंय अस वाटले. संतोष सोबतही वीर अगदी मोकळेपणाने बोलत होता. त्याला खर वाटत नव्हतं की कुस्तीच्या फडवरचा वीर खरा की हा आता समक्ष आपल्याशी बोलतोय तो वीर खरा..."

" आबासाहेब सगळं ठीक हाय पण पोरीला अजून कुस्ती खेळायची इच्छा हाय एवढ्या मोठ्या घरात अली तर तिची सगळी स्वप्न संपतील हो...." सगळीच मंडळी शांत झाली. आबांनी वीरकडे पाहिलं. वीरने नजर खाली केली.

क्रमशः

भाग्यशाली अनुप राऊत.

( आशाबाईची इच्छा आहेच मुळीच लग्न याच घरत व्हावं पण दादाच्याही मनात आता वीरने वेगळे स्थान निर्माण केले होते.
इकडे क्रांती लग्न ठरायला नको म्हणून देवाला शंभर नवस बोलीली होती. पण देव कधी कसे काय घडवून आणेल त्यालाच ठाऊक... काय होईल पुढे वाचा पुढच्या भागात..."धन्यवाद🙏🙏🙏)