Khara Mitra - 3 books and stories free download online pdf in Marathi

खरा मित्र - 3

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने

न्याय देणारा गुराखी

एका गावात एक ब्राह्मण होता. त्याची बायको होती. त्याला पाचसहा मुले होती. प्रपंच मोठा परंतु घरात एक पै असेल तर शपथ. घरात नको काय? संसार मांडला की सारे त्रिभुवन हवे. कपडालत्ता हवा, खायला प्यायला हवे, दवापाणी हवे; परंतू त्रिंबकभटजीच्या घरात सर्वच गोष्टींची टंचाई. त्याची बायको रमाबाई दिवसभर खपे. कोणाची धुणी धुवी, कोणाकडे दळायला जाई; परंतु तेवढयाने एवढे मोठे घर कसे चालणार?

एके दिवशी रमाबाई फारच रागावली होती. त्रिंबकभट ओटीवर बसला होता. ती तणतणात बाहेर आली व म्हणाली, 'नुसते गुळाचे गणपती बसा तेथे, काही लाज कशी ती मुळी नाही. त्या चिंत्याची मुंज करायला हवी, नमीला स्थळ पाहायला हवं; परंतु तुम्हाला त्याचे काही तरी आहे का? एवढे पुरूषासारखे पुरूष परंतु खुशाल ऐदीनारायण तेथे बसून राहाता. जणू शेणाचा पो. शेणाच्या पोचाही उपयोग होतो; परंतु तुमचा काडीचाही उपयोग नाही. खायला काळ व भुईला भार!'

रमाबाईचे तोंड सारखे चालले होते. त्रिंबकभटाला फारच लागले ते बोलणे त्याने कोठे तरी दूरदूर निघुन जावयाचे ठरविले. तो बायकोला म्हणाला, 'आजपर्यंत मी पुष्कळ सहन केले, लोकसुध्दा बोलणार नाहीत इतके तू रोज बोलतेस; परंतु आज कमाल केलीस. आज घरातून मी जातो. चारपाच हजार रूपये जमवीन तेव्हाच तुला तोंड दाखवीन. समजलीस ना?'

वैतागाने ब्राह्मण खरोखरच निघून गेला. शेजारच्या बायका रमाबाईस म्हणाल्या, 'आता आणतील हो थैल्या भरून. आता तुम्हाला तोटा पडणार नाही. सोन्याने तुम्हाला मढवून काढतील. 'रमाबाई म्हणाली, 'अहो, कसले आणातात पैसे! उद्या स्वारी घरी परत येईल. अगदी कसे ते साहस नाही. चार ठिकाणी जावे, काही उद्योग पाहावा. ते काही नाही. गेल्या आल्याशिवाय का काही होते? परंतु यांना घर सोडायला नको. उद्या हात हलवीत परत येतील.'

त्रिंबभटजीच्या परसावात एक फार जुने झाड होते. त्याचा विस्तार मोठा होता. त्या झाडावर एक भूत राहात असे. उंच विशाल अशी जुनी झाडे भुतांना राहावयास आवडतात. त्याभुताने ठरविले की आपण त्रिंबकभटजी व्हायचे. त्याने त्रिंबकभटजीचे रूप हुबेहूब धारण केले. तसेच रूप, तसेच बोलणेचालणे, तसाच पंचा, तशीच ती बंडी व तसेच ते मोठे पागोटे. त्रिंबकभटजी उजाडत अंगणात उभे. रमाबाई सडा सारवण्यासाठी बाहेर आली तो नवरा दृष्टीस पडला. तिचे तोंड सुरू झाले. 'आलेत ना परत? जाल कोठे मसणात? तेथे ओटीवर फतकल मारून बसायची झाली आहे सवय. हं. या घरात. तेथे खांबासारखे उभे नको राहायला. 'परंतु ते भूत म्हणाले, 'अग, घरी आलो परंतु हात हलवीत नाही आलो. मंत्र शिकून आलो. ऋध्दिसिध्दीचा मंत्र. तुला हवे असेल ते मी आता देईन. बोल काय हवे?'

रमाबाई म्हणाली, 'द्या पाचशे रूपये.'

भुताने सांगितले, 'डोळे मीट.'

रमाबाईने डोळे मिटले. भुताने सांगितले, 'उघड डोळे. ' तिने डोळे उघडले. खरोखरच तिथे पाचशे रूपयांची थैली. तिने ती थैली एकदम उचलली व घरात कुलपात ठेवली. तिला खूप आनंद झाला. ती आता नवर्‍याजवळ गोड बोलू लागली, गोड हसू लागली. पैशाने सारे प्रसन्न होतात.

आता रमाबाईला कसलीही वाण पडत नसे. वस्तूची इच्छा होण्याचा अवकाश की वस्तू आपली हजर. त्या दागदागिने घालून देवळात जात. मुलेबाळे सजवीत नटवीत. घरात कामाला आता गडीमाणसे ठेवण्यात आली. रमाबाई सुखी झाली. लोक म्हणत, 'त्रिंबकभटला कोणता देव पावला काही कळत नाही. परीस सापडला असावा, चिंतामणी मिळाला असावा का कल्पवृक्षाची कृपा झाली?'

त्रिंबकभटजीकडे आता अडडा जमे. तेथे पानसुपारीचे तबक भरलेले असे. सुंदर तपकीर असे. गाणेबजावणेही चाले. रमाबाईचे घर नेहमी गजबजलेले असे.

एके दिवशी शेजारचे लखूभटजी म्हणाले, 'त्रिंबकभटजी, तुम्हाला आता त्रिंबकराव म्हटले पाहिजे. तुम्ही आता भिक्षुकी करीत नाही. करण्याची जरूरीही नाही. तुम्ही आता गृहस्थ बनलेत. 'परंतु ते भूत म्हणाले, 'आपले पूर्वीपासून नाव चालत आले तेच खरे. पैसा दोन दिवसाचा. आज आहे उद्या नाही. मला भटजी नावाचा अपमान नाही वाटत, त्रिंबकभट असे म्हणवून घेण्यातच मला अभिमान वाटतो.'

असे दिवस चालले. कित्येक वर्षे गेली. ते भूत त्रिंबकभटजी म्हणून वावरत होते. नमीचे लग्न झाले. चिंतूची मुंज झाली. घरात आणखीही दोन मुलांची भर पडली. त्रिंबकभटाचा वाढता संसार आणखी वाढत होता. भरल्या गोकुळासारखे घर शोभत होते.

आणि तो खरा त्रिंबकभट? कोठे गेला तो, काय झाले त्याचे? तो पुष्कळ दूरदूर गेला. त्याने अनेक उद्योग केले. दहाबारा वर्षे त्याने अपार कष्ट काढले. हळूहळू त्याने जवळ चांगली पुंजी जमविली. आता घरी जावे, मुलेबाळे मोठी झाली असतील त्यांना भेटावे असे त्याच्या मनात आले. त्याने बायकोसाठी सुंदर लुगडी खरेदी केली. मुलांसाठी नाना प्रकारच्या जिनसा त्याने विकत घेतल्या आणि तो निघाला. मनात मनोराज्ये करीत जात होता. आता आयुष्याची शेवटची वर्षे तरी सुखाने जातील, बायको बोलणार नाही, अपमान करणार नाही. सेवाशुश्रूषा करील वगैरे विचार त्याच्या मनात चालले होते.

किती तरी वर्षांनी त्रिंबकभट आपल्या घरी आला. अंगणातून तो ओसरीवर आला; परंतु ओसरीवर ते भूत होते. ते भूत विचारू लागले, 'कोण पाहिजे तुम्हाला? आत कोठे चाललेत?'

त्रिंबकभटजी म्हणाला, 'तुम्ही कोण? मी माझ्या घरी आलो आहे.'

भूत म्हणाले, 'अहो मी त्रिंबकभट. या माझ्या घरात आज पन्नास वर्षे मी नांदतो आहे. मुलेबाळे झाली. संसार झाला. तुम्हाला भ्रम तर नाही झाला?'

दमूनभागून आलेला, आशेने आलेला त्रिंबकभट संतापला. तो शिव्या देऊ लागला. रमाबाई बाहेर आली. मुलेबाळे बाहेर आली. गडीमाणसे धावून आली. शेजारीपाजारी आले.

'अग, मला नाही का तू ओळखीत? मी तुझा नवरा नाही का? काय रे पोरांना, बापाला ओळखता की नाही? हसता काय? हे माझे घर, ही माझी बायको, ही माझी मुले! लखंभट, तुम्हीही नाही का ओळखीत मला? त्रिंबकभट विचारू लागला. '

'अहो, हे आमचे त्रिंबकभट या घरातून बाहेर गेलेले आम्हाला आठवत नाहीत. तुम्हाला वेड लागले असावे. भुताने झपाटले असावे. निघा येथून. चावटपणाने बोलतो. म्हणे, तू माझी बायको, मी तुझा नवरा. नीघ येथून. घालवा रे याला,' लखंभट म्हणाले.

त्या खर्‍या त्रिंबकभटाला सर्वांनी हात धरून बाहेर ओढले. तो रडत रडत निघाला. ज्यांच्या सुखासाठी तो बारा वर्षे देशान्तरी गेला, त्यांनीच त्याला घालविले. मुले त्याला बाप म्हणत ना, बायको पती म्हणून ओळखीना. त्याने बायकोसाठी लुगडी आणली होती, मुलांसाठी किती वस्तू आणल्या होत्या; परंतु काय करायचे आता त्यांचे? त्रिंबकभटजीच्या डोळयातून पाणी गळत होते.

शेवटी त्याने राजाकडे फिर्याद केली. राजासमोर खटला चालायचा असे ठरले. न्यायमंदिरात अलोट गर्दी झाली. दोन्ही त्रिंबकभट राजासमोर उभे राहिले.

एक म्हणे, 'मी त्रिंबकभट, हा लफंग्या आहे.'

दुसरा म्हणे, 'मी खरा त्रिंबकभट, हा चोर आहे.'

शेजारी म्हणत. 'त्रिंबकभट घरातून कधी गेला नाही. आज पन्नास वर्षे त्याला आम्ही पाहात आहोत.'

काय निकाल द्यावा ते राजास कळेना. त्याची बुध्दी चालेना. शेवटी तो खर्‍या त्रिंबकभटजीस म्हणाला, 'तुमचा निकाल मला लावता येत नाही. हा त्रिंबकभट इतकी वर्षे येथे आहे. शेजारीपाजारी सांगत आहेत. तुम्ही तर काल आलेत. तुम्ही खरे कशावरून? सारे लोक का खोटे? लबाड दिसता; परंतु मी शिक्षा करीत नाही. कदाचित तुम्ही भ्रमिष्ट झाला असाल, कोणी भुताबिताने झपाटले असेल. निघा येथून.'

तो खरा त्रिंबकभट रडत रडत रानात गेला. कपाळाला हात लावून बसला. म्हातारपणी मला कोणी नाही असे मनासत येऊन त्याला पुन:पुन्हा हुंदके येत. त्या रानात गुराखी गाई चारीत होते. एकीकडे गाई चरत होत्या, दुसरीकडे गुराखी खेळ खेळत होते. आज ते 'राजा व प्रजा' हा खेळ खेळत होते. एक गुराखी राजा झाला होता. काही राजाचे शिपाई झाले. काही प्रजा बनले. राजा झालेला गुराखी शिपायांस म्हणाला, 'या रानाचा मी राजा. या रानात कोणी दु:खी कष्टी नाही ना, कोणावर अन्याय झाला नाही ना? जा, सर्वत्र बघा. अन्याय झाला असेल तर तो मी दूर करीन. कोणाला दु:ख असेल तर ते दूर करीन जा. सर्वत्र पाहून या.'

ते शिपाई झालेले गुराखी निघाले. इतक्यात झाडाखाली रडत बसलेला तो म्हातारा त्यांना दिसला. ते सारे धावत तेथे आले. त्यांचा नायक त्रिंबकभटास म्हणाला, 'म्हातारे बाबा, का रडता? कोणता अन्याय आहे? कोणते दु:ख आहे? आमच्या राजेसाहेबांकडे चला. ते अन्याय दूर करतील. दु:ख नाहीसे करतील. उठा. 'म्हातारा उठेना. तो आणखीच रडू लागला. ती मुले म्हणाली, 'उठतोस की नाही? राजाचा हुकूम आहे. तो पाहा आमचा राजा. ऊठ. चल त्याच्याकडे. या काठया पाहिल्यास ना हातातल्या? ऊठ. बर्‍या बोलाने चल.'

म्हातारा म्हणाला, 'का छळता गरिबाला? मी दुर्दैवी आहे. या जगात मला कोणी नाही. या जगात सारा अन्याय आहे. रडू दे मला.'

मुले म्हणाली, 'आमच्या राज्यात कोणी रडता कामा नये. उठा, चला. आमचा राजा न्याय देईल. खोटेनाटे दूर करील. उठा म्हातारे बाबा. नाही तर ओढीत न्यावे लागेल बघा.'

तो म्हातारा उठला. त्या गुराखी शिपायांनी त्याला आपल्या राजासमोर उभे केले.

'काय म्हातारबाबा, काय आहे हकीगत? कोणते आहे दु:ख, कोणता झाला अन्याय?' त्या राजा झालेल्या गुराख्याने विचारले. म्हातारा काही बोलेना, काही सांगेना. ते शिपाई झालेली गुराखी काठया उगारून म्हणाले, 'सांग सारी हकीगत. सांगतोस की नाही? राजाचा अपमान करतोस?'

म्हातार्‍याने सारी हकीगत सांगितली. गुराखी हसू लागले. परंतु त्यांचा राजा म्हणाला, 'हसू नका. मी राजा येथे न्याय देण्यासाठी बसलो असता हसता कसे? पुन्हा हसाल तर शिक्षा होईल. हं, मग काय म्हातारेबाबा, राजानेही तुम्हाला न्याय दिला नाही. अरेरे: मी असतो तर तुम्हाला न्याय दिला असता. तुमचे घरदार, तुमची मुलेबाळे, तुमची बायको तुम्हाला परत दिली असती. जा, त्या खर्‍या राजाला जाऊन सांगा की रामा गोवारी - गुराख्यांच्या खेळातील राजा- योग्य न्याय देण्यास तयार आहे. जा, सांगाल की नाही?'

'कसे सांगू? मला तेथून हाकलून देतील. मारतील. तुरूंगात घालतील. म्हणतील, वेडा आहे. म्हणतील म्हातारचळ लागला याला. येथेच रडू दे. 'त्रिंबकभट रडत म्हणाला.

'तुला जाऊन सांगितले पाहिजे. आमच्या राजाचा हुकूम पाळला पाहिजे. सांगतोस की नाही जाऊन? बोल, नाही तर या काठया आहेत बघ. 'ते शिपाई झालेले गुराखी म्हणाले.

'सांगतो जाऊन. 'त्रिंबकभट म्हणला.

त्रिंबकभट खर्‍या राजाकडे जावयास निघाला, त्याच्या मनात एक विचार आला की एखादे वेळेस मोठयामोठयांना जे प्रश्र सुटत नाहीत ते प्रश्र एखादा लहान मुलगाही सहज सोडवतो. मोठयामोठयांची बुध्दीही जेथे गुंग होते, तेथे लहान अडाणी बालकही बुध्दी चालवतो. राजाला निकाल देता आला नाही. कदाचित या गुराख्याचा पोर देईल.

त्रिंबकभट राजाकडे आला. त्याची तेथे दाद लागेना; परंतु शेवटी एका भल्या माणसाने त्याला राजाकडे नेले. राजा म्हणाला, 'पुन्हा कशाला आलास म्हातार्‍या? तुमचा, खटला आम्हाला चालवता येत नाही. दोघे सारखे दिसता. काय द्यावा न्याय?' त्रिंबकभट म्हणाला, 'राजा, रानात मी रडत होतो. तेथे गुराखी लोक खेळत होते राजाराजाचा खेळ. रामा गोवारी राजा झाला. इतर शिपाई झाले. त्या शिपायांनी मला त्यांच्या खेळातल्या राजाकडे नेले. तो रामा गोवारी मला म्हणाला, 'सांग तुझे दु:ख. 'मी सारी हकीगत सांगितली. तेव्हा रामा गोवारी म्हणाला, 'हा तर साधा खटला आहे. मी योग्य तो निकाल देईन. जा, राजाला सांग. तुमच्या खर्‍या राजाला सांग की तुला नसेल न्याय देता येत तर रामा गोवारी देईल. 'महाराज, आपला अपमान करण्याचा माझा हेतू नाही; परंतु कधी कधी पोरांची बुध्दी थोरांना लाजविते. आपण प्रयोग करून पाहावा. त्या गोवार्‍याला बोलावून विचारावे. जर त्याने हा प्रश्र सोडविला तर मी सुखी होईन. माझ्या मुलाबाळांत परत जाईन. ऐका एवढे महाराज.'

राजाने प्रयोग करून पाहावा असे ठरविले. दूसर्‍या दिवशी न्यायमंदिरात कोण गर्दी? ती बातमी सर्वत्र पसरली. गुराखी न्याय देणार. रामा गुराखी न्यायासनावर बसणार. सर्वांना आश्चर्य वाटत होते. त्या रामा गोवार्‍याला बोलावण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे इतर गुराखी सवंगडीही आले होते. रामा गोवारी येताच राजा उभा राहिला, सारे अधिकारी उभे राहिले. सारे लोक उभे राहिले. जणू कोणी राजाधिराजच आला!

राजा म्हणाला, 'आज रामा गोवारी न्यायासनावर बसणार आहे. या रे त्याच्या मित्रांनो, असे त्याच्याभोवती शिपायांप्रमाणे उभे राहा.'

रामा गोवारी न्यायासनावर बसला. भोवती इतर गुराखी खांद्यावर घोंगडी, हातात काठी असे उभे राहिले. राजा, त्याचे प्रधान, त्याचे अधिकारी बाजूला बसले होते. खटल्यास सुरूवात झाली.

'कोठे आहेत ते दोन्ही त्रिंबकभट? त्यांना समोर उभे करा. रामा गोवारी म्हणाला.'

खरा त्रिंबकभट व खोटा त्रिंबकभट दोघे समोर उभे करण्यात आले. खोटा त्रिंबकभट हसत होता. खरा रडत होता. लोकांना आता काय होते हे पाहाण्याची उत्सुकता होती.

'दोन बाटल्या आणा बघू येथे. शिपाई, कोण आहे तेथे? बाटल्या आणा. रामा गोवारी म्हणाला.'

तेथे दोन बाटल्या आणण्यात आल्या.

रामा गोवारी त्या दोन्ही त्रिंबकभटांस उद्देशून म्हणाला, 'तू म्हणतोस मी त्रिंबकभट, तू म्हणतोस मी त्रिंबकभट. तू म्हणतोस की हे घरदार, ही मुलेबाळे, ही बायको - सारे माझे आणि तूही तसेच म्हणतोस. ठीक. हे पाहा. या येथे दोन बाटल्या आहेत. जो खरा त्रिंबकभट असेल तो या बाटलीत शिरून दाखवील. पाहू या कोण शिरून दाखवतो. हं आटपा, जलदी करा.'

लोकांची उत्कंठा वाढत होती. काय होते इकडे सर्वांचे डोळे होते. खरा त्रिंबकभट म्हणाला, 'बाटलीत कसे येईल शिरता?' परंतु खोटा म्हणाला,

'मी शिरून दाखवतो. 'आणि खरोखरच एकदम लहान होऊन तो त्या बाटलीत शिरला. तो बाटलीत शिरताच रामा गोवार्‍याने वरती एकदम बूच बसविले, लोक आश्चर्यचकित झाले.

रामा गोवारी उभा राहिला व म्हणाला, 'मिळाला ना न्याय? बाटलीत शिरलेला त्रिंबकभट म्हणजे भूत होते. भुतांना लहान मोठे होता येते. हे भूत त्रिंबकभट म्हणून इतकी वर्षे वावरत होते आणि हा खरा त्रिंबकभट येथे उभा आहे.'

हजारो लोकांनी टाळया वाजविल्या. राजा, त्याचे प्रधान व इतर अधिकारी चकित झाले. राजा उभा रामा गोवार्‍यास म्हणाला, 'शाबास तुझी. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय वाटेल ते माग, मी देतो. 'रामा गोवारी म्हणाला, 'मला जहागीर नको, इनाम गाव नको. गाईगुरांना गायराने मोफत असू देत. गाईंच्या कासा भरदार असू देत. दुधाचा सुकाळ होऊ दे. लोक धष्टपुष्ट होऊ देत. राजा, गुराख्याची दुसरी इच्छा काय असणार?'

राजा गोवारी व त्याचे मित्र रानात खेळायला निघून गेले. लोक घरोघर गेले. त्रिंबकभटजी आपल्या घरी आला. मुलेंबाळे त्याला भेटली. बायकोचे डोळे भरून आले. सारी सुखी झाली. ती सुखी झाली तशी तुम्ही सारी व्हा.'

'गोष्ट झाली अशी

संगा आहे कशी

सारी राजीखुशी. '

***