Ramacha shela..- 3 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 3

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

3. प्रेमाची सृष्टी

झिमझिम पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. सायंकाळची वेळ होती. फिरायला जाणारे बाहेर पडले होते. कोणाजवळ छत्री होती. कोणाजवळ नव्हती. विशेषत: तरुण मंडळी छत्री न घेताच जाताना दिसत होती. तोंडावरचे पाणी हातरूमालाने पुशीत होती. उदयही मधूनमधून तोंड पुशीत, केसांवरून रुमाल फिरवी. पर्वतीच्या पायथ्याच्या रस्त्याने तो जात होता. कालव्याकडे तो वळला. त्याच्या काठाने तो जाऊ लागला. तो दोनतीनदा त्या बाजूला येऊन गेला होता. परंतु इष्टदर्शन झाले नव्हते. “आज तरी सरला दिसेल का? या अशा हवेत ती फिरायला पडेल का बाहेर? ती आजारी तर नसेल ना? पुन्हा डोके फोडून नसेल ना तिने घेतले? ती आजारी पडली असेल तर तिची काळजी कोण घेईल? पिता दुराग्रही व आई सावत्र. दोघांचे तिच्याविषयी दुष्ट मत झालेले. गरीब बिचारी !” असा विचार करीत तो जात होता.

तो त्याला कोणीतरी दिसले. छत्री उघडून तिच्या खाली बसलेले कोणीतरी दिसले. सरलाच ती ! त्याचे तरल हृदय नाचू लागले. त्याची बोटे थरथरत होती. जणू ती हृदयतंद्रीला छेडीत होती. तो जवळ आला. सरला आपल्या भावसमाधीत होती.

“सरले !”

तिने वर पाहिले नाही. तिचे लक्ष नव्हते. प्रेमाने हळुवारपणे मारलेली ती हाक तिला ऐकू आली नाही. तिच्या हृदयातही का संगीत सुरू होते? त्यामुळे का ती इतकी तन्मय झाली होती? उदयने खिशातून सरलेचा तो रुमाल काढला. घडी केलेला स्वच्छ रुमाल. त्याला का वास येत होता? त्याला त्याने अत्तर लावले होते. कोठले अत्तर? हृदयातील अत्तरदाणीमधले का? उदयने तो रुमाल हळूच सरलेच्या अंगावर टाकला. ती दचकली. ती भानावर आली. तिने बाजूस पाहिले तो उदय !

“तुमचा रुमाल द्यायला आलो होतो.”

“मी तो विसरूनही गेल्ये होत्ये.”

“खरेच?”

“तो मला परत मिळावा अशी माझी इच्छा नव्हती. तुमचा रुमाल माझ्या जवळ आहे.”

“तो फाटका रुमाल?”

“त्या फाटक्या रुमालाने फाटलेले हृदय तुम्ही शिवले !”

“सरले !”

“माझे नाव तुम्हाला काय माहीत?”

“खोल पाहतो, नीट पाहतो, त्याला दिसते; सारे कळते.”

“खरेच कसे कळले तुम्हाला नाव?”

“या रुमालाने सांगितले.”

“आणि तुमचे नाव उदय ! तुमच्या रुमालाने मला सांगितले. किती सुंदर नाव ! उदय? अंधारात उगवलेला तारा; अंधारात उगवलेला चंद्र. अंधारात उदयास येणारा सूर्यनारायण, उदय ! खरेच किती सुंदर नाव ! मी त्या नावाचा जप करीत असते. “उदय, माझ्या जीवनात कर ना रे तुझा उदय. येशील का माझ्या जीवनात? तू असशील का उदार, दिलदार; प्रेमळ, स्नेहाळ?” असे मी त्याला विचारीत असते.”
"तो काय म्हणे? काय उत्तर देई?”

“करीन उदय, करीन अंधार, देईन प्रकाश, देईन प्रेम, असे तो म्हणे.”

“कपाळावरची जखम बरी झाली का?”

“सार्‍या जखमा बर्‍या झाल्या. आतल्या, बाहेरच्या. माझे कपाळ फुटकेच होते. ते आणखी फोडायचे ते काय राहिले होते. फुटके कपाळ पुन्हा मंगल होईल, सुंदर होईल.”

“कपाळाला काय लागले म्हणून घरात कोणी विचारले नाही?”

“बाबांनी एकदा विचारले. मी म्हटले की पर्वती चढताना पाय घसरला, लागले.”

“मी या बाजूला दोनतीनदा येऊन गेलो.”

“मी जरा आजारी होते. ताप आला होता.”

“मला वाटलेच !”

“परंतु त्या आजारीपणात आनंद वाटत होता. त्या आजारीपणातच तुमच्या नावाचा शोध लागला. तो रक्तसुंदर रुमाल मी हातांत खेळवीत असे. आणि सहज पाहात होते. तो सापडले नाव. ते नाव वाचताच मी आनंदले. एकदम तो रुमाल हृदयाशी धरला. तोंडावरून फिरवला. त्या आजारीपणात त्या रुमालाशी मी बोलत बसे. “सांग रे त्यांच्या गोष्टी” असे मी त्याला म्हणे.”

“तो रूमाल सांगे का?”

“हो. किती किती सांगे. रामायण, महाभारत सांगे. त्यांच्या मुक्या कथा ऐकता ऐकता मी कधी हसे; कधी रडे. कधी भावनांनी थरथरू लागे. एके दिवशी सायंकाळी मी उठले. बाबांच्या बागेतील फुले मी कधी तोडीत नाही; परंतु त्या दिवशी तोडली. रात्री तो रूमाल माझ्या उशीवर ठेवून त्याची मी पूजा केली. अश्रूंचे अर्ध्य दिले. प्रेमाचे निरांजन ओवाळले. आणि ती फुले माझ्या केसांत मी घातली. देवाचा प्रसाद म्हणून आजारीपण ते शरीराचे आजारीपण होते. परंतु मनाचे बरेपण होते. मनाच्या वेदना नाहीशा होत होत्या. हृदयाच्या कळा बंद होत होत्या. निराशेचा अंधार नाहीसा होत होता. मंगल प्रकाश जीवनात येत होता. लहानसा रूमाल ! माझे सारे जीवन झाडून पुसून त्याने लख्ख केले, सुंदर केले.”

कोठे आहे तो रुमाल?”

“दाखवू? हा बघा.”

तिने खिशातून तो रुमाल काढला. त्याच्यावर सुंदर वेल काढलेली होती. वेलीवर दोन पाखरे होती.

“माझ्या रुमालावर वेल नव्हती, पाखरे नव्हती.”

“परंतु आता फुलली वेल, आली पाखरे ! तुमच्या हृदयात नाही का फुलली वेल? माझ्या तर फुलली आहे. तेथे पाखरे नाचत आहेत, गात आहेत. भुंगे गूं गूं करीत आहेत. माझ्या हृदयातील वेल या रुमालावर मी गुंफली. हृदयातील पाखरे येथे गुंफली. परंतु हृदयातील सारे येथे गुंफता येईना.”

“या घाणेरडया रुमालावर कशाला ही वेल, ही पाखरे?”

“हा रूमाल का घाणेरडा? हा रुमाल माझ्या जीवनात अमर होणार आहे. हा रुमाल सौंदर्यसिंधू आहे. हा रमणीय आहे, गोड आहे, हृदयंगम आहे. या रुमालाला नको नटवू तर कशाला? त्याला नको सजवू, त्याला नको फुलवू, त्याला नको पुजू, तर कोणाला?”

“सरले !”

“काय रे उदय? तुला माझी आठवण येत होती? तू दोनतीनदा येऊन गेलास. मी येथे न दिसल्यामुळे का निराश होऊन गेलास? का केवळ माझा रुमाल देण्यासाठी येत असस? आणि हा रुमाल धुतलास वाटते? त्याला वास रे कसला?”

“मला विणता, भरता थोडेच येते? आमचे ओबडधोबड हात !”
“परंतु ते प्रेमळ आहेत. ते जखम बांधतात. हळूच डोके धरतात. खरे ना? तू का याला अत्तर लावले आहेस? तू श्रीमंत आहेस?

“मी गरीब आहे.”

“खरेच? तरीच तुझे हृदय श्रीमंत. देव कोठली तरी संपत्ती देत असतो. कोणाला चांदीसोन्याची, माणिकमोत्यांची संपत्ती देतो. कोणाला कोमल भावनांची दौलत देतो. उदय, तू खरेच का गरीब आहेस? तुझे वडील काय करतात?”

“माझे वडील देवाकडे आहेत.”

“तुझे वडील नाहीत?”

“मी त्यांना पाहिले नाही. आई म्हणते की, तुला जवळ घेऊन त्यांनी प्राण सोडला. मरायच्या आधी त्यांनी माझा पापा घेतला, मुका घेतला. आई म्हणते तुझ्यासारखेच त्यांचे डोळे होते.”

“उदय, खरेच तुझे डोळे कसे आहेत.”

“कसे आहेत?”

“ते मी काय सांगू? परंतु असे डोळे मी पाहिले नाहीत.”

“तू किती जणांचे डोळे पाहिलेस?”

“फार कोणाचे नाहीच पाहिले.”

“तुझ्या पतीचे?”

“तो खेळ किती पटकन संपला. उदय, नको त्या आठवणी.”

“बरे तर.”

“तुझी आई आहे?”

“हो. आईने मला वाढवले, लहानाचे मोठे केले.”

“तुझी आई कोठे असते? काय करते?”

“सरले, माझी आई दुसर्‍याकडे स्वयंपाक करते व मला शिकविते. किती तिचे उपकार, किती प्रेम !”

“उदय, पाऊस थांबला वाटते?”

“जरा झिम झिम आहे.”

“या छत्रीत येतोस?”

“नको, पावसाची झिमझिम मला आवडते, जणू गुलाबदाणी कोणी शिंपडीत आहे ! लाखो घरांची गुलाबदाणी ! सरले, आज सारी सृष्टी बघ. जिकडेतिकडे हिरवेगार आहे. डोळयांना प्रसन्न वाटते.”

“माझी सृष्टी रे कधी हिरवीगार होईल? कधी सारा रखरखीतपणा नाहीसा होईल?”

“तुझ्या सृष्टीत आनंद येत आहे ना? उषा येत आहे ना? गोडी येत आहे ना?”

“हो असा भास होत आहे खर, परंतु हा भासच न ठरो. आजपर्यंतच्या माझ्या सार्‍या आशा शेवटी आभास ठरल्या.”

“आपली सारी स्वप्ने थोडीच खरी होतात? आकाशातील तारेही तुटतात. गळतात. काही फुले कुस्करली जातात व काहींचे हार होतात; काहींचे सुंदर बी तयार होते. सरले ! काही टिकते, काही मरते.”

“परंतु सारेच न मरो. सारेच स्वप्न न ठरो. उदय, तू कोठे राहतोस?”

“तिकडे लांब. भांडारकर-संशोधन-मंदिराकडे.”

“मी येईन तुझी खोली शोधीत.”

“कधी येशील? सकाळी मी खोलीत नसतो. ग्रंथालयात वाचायला जातो.”

“तू खोलीत केव्हा असतोस?”

“तू सांगशील तेव्हा असेन.”

“उद्या येऊ? सकाळी येऊ?”

“ये.”

“आता जायला हवे. बाबा बोलतील नाही तर. माझा रुमाल हवा का तुला?”

“त्याच्यावर वेल काढून दे. पाखरे गुंफून दे.”

“सकाळी मी येईन हं.”

“ये. मी वाट पाहात असेन.”

थोडा वेळ दोघे बरोबर जात होती. आणि आता रस्ते निराळे होणार होते.

“मी तुझे घर पाहायला येऊ?”

“नको, बाबा रागावतील.”

“दुरून पाहीन.”

“आपण बरोबर आहोत असे ते पाहतील.”

“मी दुरून चालेन.”

“पण आज नकोच. पुढे केव्हा तरी दाखवीन माझे घर. परंतु माझे घर तुला माहीत हवे.”

“ते आपोआप कसे माहीत होईल?”

“मी इथून दाखवू माझे घर?”

“इथून कसे दिसेल? इतके का जवळ आहे?”

“हो”

“दाखव.”

तिने त्याच्या हृदयावर हात ठेवला. तेथे आपले बोट तिने रोवले.

“हे माझे घर कोणाला न दिसणारे घर; उदय, होय ना? येऊ ना तेथे राहायला? करशील ना स्वागत? तू स्वागत कर वा नको करू. मी तेथे येऊन बसेन. तेथली राणी होईन, तेथली मोलकरीण होईन. तू एकदाच भेटलास, एकदाच दिसलास, एकदाच बोललास. परंतु जणू माझा झालास. तू माझा आहेस की नाही ते काय सांगू? परंतु मी तुझी आहे. मी माझे जीवन तुझ्या पायी वाहात आहे.”

“जा आता घरी. बाबा रागवतील.”

“तुला माझा कंटाळा आला? माझे बोलणे आवडले नाही, होय ना?”
“सरले, निराश नको होऊ. आपण आशेने राहू. जा आता.” तिने हात क्षणभर हातांत धरला. आणि ती गेली, तो गेला.

रात्री सरला आपल्या खोलीत बसून त्या रुमालावर वेली गुंफीत होती, फुले फुलवीत होती, पाखरे विणीत होती. ती निजली नाही. हृदयातील अनंत प्रेम जागे झाले होते. शेकडो जन्म बुभुक्षित राहिलेले प्रेम ! ते प्रेम आता का निजेल? सरला गुणगुणत होती. तिची बोटे गुंफीत होती. तिचे कोमल हृदय कल्पनातरंगावर फुलाप्रमाणे नाचत होते.

पहाट होत आली. ती बाहेर आली. ती वरती गच्चीत गेली. अद्याप पुणे झोपलेले होते. पाखरांची किलबिल सुरू झाली होती. पारिजातकांच्या फुलांचा मंद मधुर सुगंध येत होता. आकाशात ठळक ठळक तारे अद्याप प्रशांतपणे चमकत होते. जणू ते प्रात:प्रार्थना म्हणत होते. सरलेला प्रसन्न वाटले. ती क्षणभर डोळे मिळून उभी राहिली. तिचे तोंड कोठे होते? उदयची खोली ज्या दिशेला होती त्या दिशेला का तिचे तोंड होते? परंतु प्रार्थना उत्कट असेल तर तोंड कोठेही असो. तुमचा देव, तुमचा प्रभू, तुमचा स्वामी तुमच्या समोरच आहे.

सरला खोलीत आली. तिने सुंदर फुले तोडून घेतली. ती आपल्या खोलीत आली. तिने सुंदर गुच्छ तयार केला. आणि तो रुमाल, तो गुच्छ घेऊन ती फिरायला जाण्यासाठी बाहेर पडली. सुंदर थंडगार हवा. सरला झपझप जात होती. मध्येच ती पळायला जागे. जणू तिला अपार स्फूर्ती आली होती. जणू प्रबळ चैतन्य तिच्या रोमारोमांत संचरले होते. किती लांब उदयची खोली ! अद्याप कशी येत नाही? मला पंख असते तर? मनाला पंख आहेत. शरीराला का बरे नाहीत ! परंतु लांब खोली आहे तीच बरी. तिकडे फार जा-ये नसेल. शिवालय गावाबाहेर रानात असते. उंच डोंगरावर असते. तेथे गर्दी नसते. देव भक्त. आणि जोडीला उदार, सुंदर निसर्ग. असे विचार करीत सरला येत होती.

नेमकी खोली सापडली. तो बंगला नेमका सापडला. खोली उघडी होती. आत उदय नव्हता. तो उठला होता. सरलेने त्याचे अंथरूण साफ केले. ब्लँकेटची घडी केली. तिने टेबल साफ केले. तो फुलांचा गुच्छ तेथील एका भांडयात तिने ठेवला आणि ती वाट पाहात बसली. त्या अंथरूणावर क्षणभर ती पडली. तिकडे नळाच्या पाण्याचा आवाज येत होता. येईल आता उदय. आपण लपावे. कोठे लपावे? या खाटेखाली लपल्ये तर? ती त्या खाटेखाली गेली. अंग संकुचित करून लपली. आणि उदय आला. त्याच्या खडावा वाजल्या. तो खोलीत आला. तो चकित झाला. अंथरुण साफसूफ ! टेबल लावलेले ! फुलांचा मनोहर गुच्छ ! सरला आली का काय? मी खोलीत नाही असे पाहून गेली की काय? जरा थांबली का नाही? तो तसाच सरलेला शोधायला बाहेर पडला. आणि सरला खाटेखालून बाहेर आली. उदय निराश होऊन परत येतो तो खोलीत देवता बसलेली !

“कोठे होतीस तू?”

“येथेच.”

“येथे कशीं असशील?”

“बायकांना जादू करता येते. मी लहान होईन व तुझ्या डोळयांत बसेन, तुझ्या हातांत फुलाप्रमाणे लहान होऊन खेळेन. तुझ्या खिशात मावेन. खरेच हसू नकोस. मी येथेच होत्ये. लहान होऊन बसले होत्ये.”

“खरे सांग ना?”

“या खाटेखाली लपल्ये होत्ये.”

“तरीच ही घाण लागली आहे. ही बघ जळमटे लागली आहेत. तेथे कोठे लपलीस? येथे कोपर्‍यात नाही तर दाराआड लपायचे किंवा हे पांघरूण घेऊन लपायचे? किती घाण लागली बघ.”

“ती घाण नाही. या खोलीतील सारे सुंदर आहे. सारं सुगंधी आहे. अरे, झाडू नको, नको झटकू. उदय, तुझी खोली नीट झाडू का?”

“मी झाडीन मग.”

“तुला वाचायला जायचे आहे ना?”

“थोडया वेळाने जाईन.”

“तू जा मी येथेच बसेन.”

“एकटी बसून कंटाळशील.”

“कंटाळा आला तर निघून जाईन. तुझ्याजवळ दोन किल्या आहेत का?”

“दुसर्‍या किल्लीची आजपर्यंत जरूर पडली नव्हती. परंतु ट्रंकेत आहे ती तुला देतो.”
त्याने ट्रंक उघडली. ती किल्ली सापडली. त्याने ती सरलेला दिली.

“सरले, तुला काय देऊ? मी चहा पीत नाही, दूध घेत नाही. मी गरीब आहे. गरीब आईचा मी मुलगा आहे.”

“मला काही नको.”

“लवंग देऊ? ही घे.”

तिने लवंग खाल्ली. ती शांतपणे बसली होती. तिला एक जांभई आली. पुन्हा दुसरी आली.

“झोप नाही आली वाटते काल? नाही आली?”

“रात्रभर या रुमालावर मी प्रेम गुंफीत होत्ये.”

“इतकी घाई काय होती?”

“जीवनात दिरंगाई नको. घाईच बरी. प्रेमाच्या राज्यात घाईच बरी. प्रेमाची फुले पटकन टिपून घ्यावी, वेचून घ्यावी. पुन्हा मिळतील, न मिळतील. वसंत ऋतू का नेहमी राहतो?”

“तू उजाडता आलीस. वडील विचारतील.”

“सांगेन की आजपासून सकाळी फिरायला जाण्याचे ठरविले आहे.”

“तू का रोज येणार? इतक्या लांब?”

“रोज नको येऊ?”

“लांब आहे म्हणून म्हटले.”

“परंतु तुला नाही ना कंटाळा?”

“मला सकाळी वाचायला जायचे असते.”

“मधूनमधून मी येईन. भूक लागली म्हणजे येईन. राहवले नाही तर येईन. म्हणजे झाले ना?”

“मी आता जातो. तुझ्या डोळयांवर झोप आहे, सरले. नीज येथे हवी तर.”

“तू जा. मी बघेन काय करायचे ते.”

“जाऊ? तो रुमाल दे ना?”

“हा घे.”

उदय निघून गेला. सरला खोलीतच होती. किती तरी वेळ शांतपणे तेथे ती बसली होती. त्या उशीवर तिने डोके ठेवले. आणि खरोखरच पांघरूण घेऊन जरा पडली. परंतु झोप थोडीच येणार? तिची झोप उडून गेली होती. ती उठली. टेबलावरच्या वह्या-पुस्तके ती पाहात होती. एका वहीत तिला एक पत्र सापडले. कोणी कोणाला लिहिले होते? उदयने ते लिहिले होते. सरलेला लिहिले होते. वाचू का हे पत्र? मलाच लिहिले मी वाचले म्हणून काय झाले? का उदय रागावेल? उदय नि मी का दोन आहोत? त्याने माझी जखम बांधली त्याच वेळेस आम्ही दोघे एकत्र नाही का बांधलो गेलो? दुजेपणा ! नको हा दुजेपणा. मला एकरूप होऊन जाऊ दे. उदयचे ते सारे माझे होऊ दे. माझे ते सारे त्याचे होऊ दे. ते पत्र हातांत घेऊन ती विचार करीत बसली. काय होते त्या पत्रात? वाचायला हरकत नाही. ते निर्मळ, उदार पत्र आहे.

“सरले,

तुला काय म्हणावे समजत नाही. तुला प्रिय वगैरे विशेषणे मी लावीत नाही. ही विशेषणे अलीकडे अर्थहीन झाली आहेत. औपचारिक झाली आहेत. तू एकाकी आहेस. मीही एकाकी आहे. मलाही ना कोणी मित्र, ना सखासोबती. आईशिवाय मला कोणी नाही. माझ्या हृदयातही काही भाग रिकामे होते, शून्य होते ते भरून काढायला का तू आलीस? किती अकल्पित भेट, आणि कशा दु:खद प्रसंगी ! आपण खरेच का एकमेकांची झालो आहोत ! त्या बाभळीच्या झाडाखाली खरेच का आपले लग्न लागले? आपणांस संकोच जणू वाटला नाही. आणि पुन्हा भेटलो तेव्हा अत्यंत ओळख असल्याप्रमाणे आपण बोलत बसलो.

तू अत:पर दु:ख करीत नको जाऊस. सुखी राहा. आशेने राहा. आपण एक दिवस खरेच एकमेकांची होऊ. एकमेकांच्या जीवनात आनंद पिकवू.

परंतु उदय गरीब आहे. माझ्या भावनांची श्रीमंती अतूट आहे. अलूट आहे. ती अद्याप कोणी लुटली नाही. ती संपत्ती हृदयात वाढतच होती. तिचा वारसा कोणाला मिळणार मला कळत नव्हते. त्या भावनालक्ष्मीची तू का स्वामिनी होणार? माझ्या हृदयात हळूहळू उमलणार्‍या भावनांच्या सहस्रदळी कमळाची भेट तुला का मिळायची आहे?

हे पत्र मी तुला लिहीत आहे. राग नको हो मानू. मनातले सारे लिहिताही येत नाही. मनातले भाव प्रकट करायला भाषा अपुरी पडते. एका शब्दानेही सारे समजते. खरे ना?

-तुझा उदय.”

ते लहानसे पत्र होते. सरलेने ते हृदयाशी धरले, डोक्यावर धरले, हृदयात खुपसले. ती सद्गदित होऊन तेथे बसली. हे पत्र आपण न्यावे व याचे उत्तर येथे लिहून ठेवावे असे तिच्या मनात आले. तिने कागद घेतला. टाक घेतला. ती लिहू लागली :

“प्रियतमा,

तू नुसते सरले असे लिहिलेस. पुरूष आपल्या भावना संयमाने सूचित करतात. परंतु मी तुला नि:संकोचपणे प्रियतमा अशी हाक मारीत आहे. अज्ञातपणे तुलाच जणू मी इतके दिवस मुक्या हाका मारीत होत्ये. जीवनातील घोर निराशेच्या वेळेस माझ्या जीवनात तुझा उदय झाला. त्या उदयाचा अस्त न होवो.

मी खरेच तुझी झाल्ये आहे. मी माझी वेल तुझ्या जीवनाच्या मांडवावर सोडली आहे. ही वेल वाढव, फुलव, फळव. या वेलीला प्रेमाचे खत घाल. आपुलकीचे पाणी घाल. कोमल वेल. हिच्यावर उपेक्षेची वीज न पडो. हिच्यावर निराशेचे निखारे न सांडोत. आजवर मी खूप रडले. आता मला हसव. बाबा मला विषवल्ली म्हणतात. तुझ्या दारात ती अमृताची ठरो. तुझ्या प्रेमळ कटाक्षांनी, प्रेमळ स्पर्शांनी ती अमृतमय होवो. रसमय होवो.

उदय, तुला काय लिहू? या तुझ्या लहानशा खोलीत मी बसले आहे. जणू सुखाच्या स्वर्गात आहे. येथील प्रत्येक वस्तूचा मी वास घेतला. उशीवर डोके ठेवले. पांघरुण घेऊन निजले. तुझी पुस्तके प्रेमाने हाताळली. येथील प्रत्येक वस्तू मला प्रिय वाटत आहे. खाटेखालचा पातळाला लागलेला कचराही कस्तुरीसमान वाटत आहे.

तू माझा आहेस. होय माझा आहेस आणि मीही तुझी आहे. खरंच आपण एकमेकांची होऊ. तुला मी व मला तू. तुझ्यामुळे माझे दु:ख गेले. जगावे असे वाटू लागले. तुझ्यामुळे मी माझ्या हृदयमंदिरात पुन्हा मांडामांड करू लागले आहे. तेथे बैठक घालीत आहे. चौरंग मांडीत आहे. दिवा लावीत आहे. फुले जमवीत आहे. ये, राजा ये. हृदयरमणा, ये. या आसनावर बस. या मंदिरात ये. या मंदिरात आजपर्यंत मूर्ती नव्हती. तू येथे ये. पडके मंदिर सजू दे. तेथे आरती, पूजाअर्चा सुरू होऊ दे. पुन्हा मला निराशेच्या दरीत नको लोटू. ही स्वप्ने क्षणिक न ठरोत. हे मृगजळाचे आभास न ठरोत, हे बुडबुडे न ठरोत. हे चिरमीलन होऊ दे. अखंड प्रेमाची मंदाकिनी वाहू दे. हा झरा न सुको, न आटो. हे प्रेमाचे फुल न सुको, न गळो, न म्लान होवो. अनसूयेने सीतेच्या केसांत फुले घातली होती, ती कधी कोमेजली नाहीत. तशी तुझ्या माझ्या हृदयांत फुलणारी ही प्रेमाची फुले सदैव घवघवीत राहोत.

मी जाते हं. तुझे पत्र मी वाचले म्हणून रागावू नकोस. हे उत्तर वाचून जर राग आला असला तर दूर होवो. आणि आलाच राग तर माझ्या डोळयांतील करूणा बघून तो जाईल.

--तुझी सरला.”

ते पत्र ठेवून सरला उठली. तेथील पाणी पिण्याचे भांडे व तांब्या घाण होती. तिने ती भांडी स्वच्छ घासून ठेवली. ती निघाली. कुलूप लावून किल्ली घेऊन निघाली.

असे त्यांचे प्रेम वाढत होते. दोघांना अपार आनंद होत होता. दोघांना खूप उत्साह वाटत होता. सरला अकस्मात त्या खोलीवर येई, खोली उघडी. तेथे फुले ठेवी, खोली नीटनेटकी करून जाई. कधी दोघांची भेट पडे. कधी दोघे फिरायला जात ! एकत्र बसत, बोलत. कधी मुकी असत. कधी दोघे सारखी असत.

“तू हसतेस किती सरले?” एकदा उदय म्हणाला.

“इतके दिवस रडले. आता हसू दे. माझ्या हसण्यावर दृष्ट नको पडायला. आणि माझे हसणे तुझ्या आधीन. तू जवळ आहेस, बोलत आहेस म्हणून बुडबुड झर्‍यासारखे हसू येत आहे. चंद्राचा प्रकाश सूर्यावर अवलंबून. समुद्राचे उचंबळणे चंद्रावर अवलंबून. तसे माझे सारे तुझ्यावर अवलंबून. तू त्या दिवशी बोलेनास, नुसते हूं हूं करीत होतास. तर दोन दिवस मी रडत होत्ये. उदय, मी हसावे असे वाटत असेल तर माझ्याजवळ गोड बोलत जा. बोलशील ना? हसत जा. हसशील ना?”

“मला नाही फार हसू येत.”

“का रे?”

“कोणाला माहीत. तुला एकदम हसू येते, एकदम रडू येते, तसे माझे नाही. तुझी क्षणात पौर्णिमा, क्षणात अमावास्या; क्षणात वसंत तर क्षणात शिशिर; खरे ना?”

“म्हणून का मी तुला आवडत नाही?”

“तसे का मी म्हटले? परंतु तुला तोल राहात नाही. एकदम काही तरी मनात आणतेस व वाहून जातेस. मी जरा बोललो नाही की तुला वाटू लागते, याचे प्रेमच नाही. अग, कधी कधी दुसरे विचार मनात असतात. मन का सारखे एकाच गोष्टीत असते? जीवनात शेकडो गुंतागुंती असतात. त्या दिवशी तू मला दगड आहेस, दुष्ट आहेस, अहंकारी आहेस, किती किती विशेषणे लावलीस. आठवते का?”

“तू का ते अद्याप विसरला नाहीस?”

“मला नाही एकदम विसरता येत.”

“तू का ते सारखे मनात ठेवणार? उदय, ते शब्द तू लक्षात ठेवणार? आणि तुझी केवळ स्मृती येताच माझे डोळे भरून येतात, ते अश्रू नाही का लक्षात ठेवणार? उदय, सारे विसर हो. माझे चांगले ते मनात आण. आपण दोघे एकमेकांची ना? मी तुझी ना? तुझ्या हृदयात मी आहे ना? उदय, तुझ्या हृदयात तुझ्या आईखालोखाल प्रेमाचे कोण आहे?”

“तू आहेस.”

“खरेच?”

“हो, हो. कितीदा सांगू? तुझा विश्वासच नाही !”

“उदय दुधाने तोंड भाजले की ताक आपण फुंकून पितो. माझा आहे हो विश्वास. रागावू नको. हस, माझ्याकडे बघ व हस.”

“मला नाही हुकमी हसू येत.”

“ते बघ येत आहे. परंतु तू मुद्दाम लपवीत आहेस.”

अशी त्या दिवशीची ती त्यांची बोलणी. कधी रुसणी, कधी रागावणी; कधी अबोले, कधी आनंद; अशा अनेक रीतीने ते प्रेम दृढावत होते. वाढत होते. दोघांच्या जीवनाला रंग देत होते, पूर्णता देत होते.

परंतु एकदा चमत्कारिक प्रसंग आला. उदय त्या दिवशी विषण्ण होता. त्या दिवशी तो जेवला नाही, एकटाच फिरायला गेला होता, टेकडीवर एकटाच बसला होता. अंधार पडला. त्याला पर्वा नव्हती. किती वाजले, किती वेळ गेला, त्याला भान नव्हते. आता चंद्रही उगवला. तो पहा चंद्र. चंद्र वर वर येत आहे. परंतु ते पहा ढग त्याला घेरीत आहेत. उदय चंद्राकडे पाहात आहे. तो पाहा चंद्र मेघांमधून पुन्हा वर आला. पुन्हा बाहेर आला. परंतु ढग त्याचा पिच्छा सोडीत नव्हते. ढगांवर ढग आले. काळेकभिन्न ढग. चंद्र पुन्हा लोपला. त्याचा पत्ता नाही. परंतु काही वेळाने चंद्र थोडा दिसू लागला. क्षणात पुन्हा घेरला गेला. उदय निरखीत होता, जीवन का असेच आहे? काय आहे या जीवनात अर्थ? आशा-निराशा, सुख-दु:ख, यशापयश यांचे चिरंजीव झगडे ! अंधार व प्रकाश यांचे अखंड युध्द ! कसले प्रेम नि कसले काय? दिव्याखाली अंधार आहे, फुलात कीड आहे. चंद्राला डाग आहेत, जीवनाच्या पोटी सरण आहे, प्रेमात मत्सर आहे. काय आहे हे सारे? सृष्टीचे रहस्य काय? विरोध की विकास? विकासाकडे दृष्टी द्यायची की विरोधाकडे? विकास पाहावा तर विरोध आ पसरून उभा असतो. विरोधाकडे पाहावे तर तिकडे विकासाचा प्रकाश दिसतो. काटे पाहावे की वरचा गुलाब पाहावा? उदय गंभीर झाला, खिन्न झाला, नको कोणाशी संबंध असे त्याला वाटले. उद्या पुन्हा ताटातुटी झाल्या तर रडारड पदरी यायची. त्यापेक्षा एकटे असणेच बरे. नको सरला । नको कोणी !

तो टेकडीवरुन निघाला. अंधार होता. चंद्र मेघांत बुडून गेला होता. एके ठिकाणी उदयचा पाय घसरला. तो पडला. पुन्हा उठला. त्याचे लक्ष नव्हते. पायाला लागले की काय ते त्याने पाहिले नाही. एकदाचा तो आपल्या खोलीत आला त्याने सरलेला एक पत्र लिहिले :

“सरले,”

आपण प्रेमाचा खेळ संपवू ये. प्रेम अद्याप जिवंत आहे. तोच ते विसरू ये. भविष्यात काय आहे कुणास ठाऊक? उगीच तुझी माझी ओळख झाली. मी एकाकी होतो तोच बरा होतो. तू माझे प्रेम विसरून जा. जीवन हे नि:सार आहे. कशात अर्थ नाही. आपण एकमेकांपासून दूर राहणेच बरे. अद्याप मुळे फार खोल गेली नाहीत तोच हे रोपटे उपटून टाकू ये. आपण कठोर व्हायला शिकले पाहिजे. प्रेमबीम, कशाला अर्थ नाही. सारे पोकळ, फसविणारे, अंती रडविणारे आहे. वरची हिरवळ आपण पाहतो. परंतु खाली खळगे आहेत त्यांत पडू व रडू त्यापेक्षा सावध होणे बरे. तू मला विसरून जा. एक स्वप्न समज.

-- उदय.”

महिला महाविद्यालयाच्या पत्त्यावर त्याने ते पत्र पाठविले. सरलेने ते पत्र घेतले. ते तिने फोडले नाही. तास संपले. ती निघाली. घरी आली. ते पत्र हातात घेऊन बसली. तिने अक्षर ओळखले. परंतु उदयने आतापर्यंत पोस्टाने पत्र पाठवले नव्हते. आज का बरे पोस्टाने पाठवले? शेवटी ते पत्र तिने फोडले. तिने वाचले. तिच्या हृदयाला धक्का बसला. तिचे डोळे घळघळू लागले. तिला काय करावे समजेना. ती अंथरूणात पडून राहिली. रडणार तरी किती? तिचे डोळे का रडण्यासाठीच होते? ती एकच शब्द उच्चारी. अरेरे ! अरेरे, हा एकच शब्द ती उच्चारी. त्या एका शब्दात तिच्या अनंत वेदना होत्या.

“सरले, जेवायचे नाही का?” रमाबाईंनी येऊन विचारले.

“नको जेवायला. कपाळ दुखत आहे.” ती म्हणाली.

तिची अधिक चौकशी कोणी केली नाही. विश्वासरावांनी रमाबाईस “ताप वगैरे नाही ना तिला आला?” एवढेच विचारले. पुष्कळ वेळाने सरला उठली. तिने कागद घेतला. ती पत्र लिहू लागली :

“प्रियतमा,

तू अद्याप माझा प्रियतमच आहेस. आणि पुढेही प्रियतमच राहशील. मी माझे प्रेम कोणाला दिले नव्हते. माझा पती-त्याची माझी नीट ओळखही झाली नव्हती. तुला मी मनाने वरले. माझी प्रेमपुष्पे तुला वाहिली. तुझ्या पायांवर जीवन वाहिले. तू मला दूर लोटीस आहेस. तुझी इच्छा ! तुला मी कशी विसरू? तू माझा प्राण आहेस, माझे हृदय आहेस. रात्रंदिवस मी तुला स्मरते, तुला आळविते. तू मला विसर. तुला ते सहज शक्य वाटत असेल. तुझ्या हृदयात प्रेमाच्या रोपटयाचा प्रचंड वृक्ष नसेल झाला, त्याची मुळे फार खोल नसतील गेली, तर तू टाक उपटून. परंतु माझ्या हृदयात आता रोपटे नाही. प्रचंड वटवृक्ष झाला आहे. त्याची मुळे खोल हृदयपाताळाला जाऊन पोहोचली आहेत. हे झाड उपटणे म्हणजे जीवन उपटणे होय, हृदय उपटणे होय.

उदय. काय हे लिहिलेस? स्त्रीहृदयाची अशी प्रतारणा, अशी वंचना, अशी निराशा, अशी उपेक्षा का रे करतोस? जगात खरेच का कशाला अर्थ नाही? सारा का पोरखेळ? सारा का गारूडयांचा मायावी खेळ? सारे विश्व वाळूवर का उभारलेले आहे? सत्य म्हणून काही नाहीच का? श्रध्दा, निष्ठा म्हणून काही नाहीच का? कशातच का राम नाही? सतींचे अश्रू, हुतात्म्यांचे रक्त यांत का अर्थ नाही? हे वारे का उगीच वाहतात? हे तारे का उगीच चमकतात? हे पर्वत अभंगपणे का उभे आहेत? हे समुद्र का उचंबळतात? नद्या का वाहतात? ही फुले का फुलतात? हे वृक्ष का बोलतात? हे सारे का नि:सार आहे? आपले डोळे एकमेकांकडे बघत व हसत. त्यात का काही अर्थ नाही? तुझे स्मरण होताच अक्षरश: माझे हृदय जणू नाचू लागते. एकदम काही तरी अपूर्व वाटते. ते का खोटे?

उदय, तू आज प्रखर प्रहार केला आहेस. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यानेच दूर लोटावे यासारखे दु:ख नाही. मी आता कोठे माणसांत येत होते. परंतु पुन्हा तू मला अंधारात लोटीत आहेस. लोट. परंतु मी कोठेही गेल्ये, कोठेही असल्ये तरी तुझी स्मृती, तुझी मूर्ती माझ्याजवळ राहील. मी तुला विसरू शकणार नाही. तू म्हणतोस, “मला विसर.” तुला विसरण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे मरणे. मरणानंतर जर काहीच नसेल, सारी चिमूटभर राख हीच जर सत्यता असेल, तर मरणाने मी तुला विसरू शकेन. परंतु मरणानंतरही जर जीवन असेल, तर तेथेही तुझी स्मृती माझ्याजवळच राहील. त्या मातीतही तुला मी स्मरेन.

माझ्या जीवनात रंग येत होता. सुगंध भरत होता. संगीत येत होते. आशा येत होती. आनंद येत होता. परंतु सारे अकस्मात तू नाहीसे करीत आहेस. अरेरे !

उदय, त्या दिवशी माझे डोके तू कशाला धरलेस? अत्यंत निराशेच्या दगडावर जर तू पुन्हा ते आपटणार होतास, तर त्याच वेळेस का नाही आपटलेस? आणखी थोडी आशा दाखवून, आणि त्या आशेचा भंग करून, हे अधिक दु:सह दु:ख देऊन ते डोके तू फोडू पाहात होतास वाटते?

प्रियतमा, तुझ्या हातून मला प्रेम नसेल मिळायचे तर मरण तरी दे. तुझ्याकडून मला आनंद नसेल मिळायचा तर दु:ख तरी दे. अशीच कठोर पत्रे लिही. माझा अपमान कर. परंतु विसरू नकोस. विस्मृतीशिवाय मला वाटेल ते दे. मी ते गोड मानीन. मी तुझ्याकडे येईन. विषाचा पेला भरून दे. मरण दे. तुझ्याशिवाय जगणे म्हणजे मरण आहे. तुला का हे कळत नाही?

आज माझा देव मेला, धर्म मेला. श्रध्दा मेली, निष्ठा मेली ! सारा ध्येयवाद संपला. जीवन म्हणजे महान वंचना ! जीवन म्हणजे केवळ फार्स ! हे महान सत्य आज तू मला शिकवीत आहेस. नि:सारतेचे तत्त्वज्ञान तू मला आज शिकवीत आहेस.

उदय, तुझे प्रेम मजवर नसेल तर तू सोड मला. परंतु माझे प्रेम मी तुलाच देत जाईन. मनात तू आहेस. तेथे तुला पूजीन. तू स्वत:च्या प्रेरणेशिवाय मजवर प्रेम करू नकोस. माझी तू कीव करीत होतास. तुझे प्रेम नव्हते. करूणा म्हणजे प्रेम नव्हे. केवळ करूणेने माझ्यावर प्रेम नको करू. माझ्याशिवाय तुझ्या जीवनाला अपूर्णता वाटत असेल, मी म्हणजे तुझ्या जीवनाचा एक भाग असे तुला वाटत असेल, तरच तू मजवर प्रेम कर. तुझ्या प्रेमावर मी अतिक्रमण करू इच्छीत नाही. तुझ्या स्वातंत्र्यावर आक्रमण करू इच्छीत नाही.

उदय, तुझ्याशिवाय जगणे मला अशक्य वाटते, तसे तुला वाटते का? वाटले होते का कधी? तू मला माझ्या जीवनाचा एकमात्र आधार वाटतोस. परंतु मीही तुझी आधारदेवता आहे असे वाटले होते का कधी तुला? माझी जर तुला प्राणमय जरूर भासत नसेल, तर तू मला सोडून जा. तुझ्या जीवनात मी अडगळ होऊ इच्छीत नाही. तुझ्यावर माझा बोजा घालण्याची माझी इच्छा नाही. शेवटी तुझे सुख ते माझे सुख.

तुला आठवते का ती गोष्ट? मी तुझ्या खोलीत कधी आल्ये, तुला कधी भेटले, तर तुला सारख्या उदय उदय म्हणून हळूच हाका मारीत असे. एकदा खोलीत आपण बसलो होतो. तू वाचीत होतास. मी तुझ्या खाटेवर बसल्ये होते. तुझ्या खुर्चीजवळ येऊन “उदय” असे मी म्हणे. तू म्हणस “काय?” परंतु काही न बोलता मी खिडकीशी जाऊन उभी राही. किंवा खाटेवर पुन्हा बसे, जरा पडे. पुन्हा उठून तुझ्याजवळ येऊन “उदय, उदय” असे कावर्‍याबावर्‍या आवाजात मी म्हणत असे. तू शेवटी रागावलास व म्हणालास, “काय ते सांग. नुसत्या हाका काय मारतेस? मी म्हटले, “या हाका का अर्थहीन आहेत?” तू म्हणालास, “होय, तू खेळ करतेस. गंमत म्हणून हाका मारतेस.” मी म्हटले, “आपल्या क्रिया का अर्थहीन असतात, हेतुहीन असतात?” तू म्हणालास, “तुझे हे हाका मारणे तरी अर्थहीन आहे. काय आहे त्यात अर्थ?” मी म्हटले, “उदय, अरे कितीतरी तुझ्याजवळ बोलावेसे वाटते. परंतु नाही रे सारे बोलता येत. ते बोलण्याची भीतीही वाटते. म्हणून नुसती हाक मारते. ती हाक का अर्थहीन? ज्या हाकेत हृदयातील सारा अर्थ भरलेला असतो ती हाक का हेतुहीन? देवाचे वर्णन शेवटी “ओम” ने करतात, तो “ओम” का अर्थहीन? उदय, असा कसा तू उथळ? असा कसा वरवर पाहाणारा? मी उदय म्हणून हाक मारताना माझा आवाज कसा भावनाभरित व सकंप असतो, माझे डोळे कसे असतात, हे का नाही तू बघत? तुला उदय म्हणून हाक मारताना माझे सारे अंग थरारत असते, बोटे थरथरत असतात. परंतु जाऊ दे. तुला मी नको असेन हाका मारायला तर नाही हो मारणार. जरूर पडली तरच हाक मारीन. जशी तुझी इच्छा.” आणि त्या दिवसापासून त्या भावपूर्ण हाका तुला मी कधी मारल्या नाहीत. तुझ्यादेखत तरी मारल्या नाहीत. परंतु माझ्या खोलीत “उदय रे, उदय, उदय, उदय रे” अशा हाका मी मारीतच असते. माझ्या हृदयातील सारे काही त्यात असते परंतु तुझ्यादेखत नाही ना मारली हाक? का नाही मारली? कारण तुझा आनंद तो माझा. तुला जे नको ते तुझ्या देखत तरी मी करणार नाही.

तू मला विसर. तुझी इच्छा तशी असेल तर मला विसरून जा. मी तुला पहिल्या भेटीतच म्हटले होते की मी अभागिनी आहे. बाबा मला विषवल्ली म्हणतात तेच खरे. उदय, या विषवल्लीला विसर. हिच्यामुळे आपलाही कदाचित सत्यानाश व्हायचा असे तुलाही वाटू लागले असेल. मी तुझ्याजवळ आल्ये हीच चूक. दुरून तुझी प्रेमपूजा मी करीन. अत:पर माझी विषरूप छाया तुझ्यावर पडणार नाही. मी तुझ्याकडे येणार नाही. माझ्या मनात तू आहेस तेवढा पुरे.

उदय, काय रे हे पत्र लिहिलंस? तुला लिहवले तरी कसे? तू का माझी गंमत करीत आहेस? तू का माझी सत्त्वपरीक्षा घेत आहेस? उदय, तुझा होत आहे खेळ; परंतु माझा जातो जीव. नको रे मला निराश करू. तुझ्याजवळ मला घे. मला सदैव हृदयाशी धर. मला तुझी कर. मी आहेच तुझी. तू माझा हो. किती सांगू, किती लिहू? माझे जीवन कृतार्थ कर, हृदय सांगत आहे की, हे पटल जाईल आणि तू उद्या पुन्हा त्या पहिल्या जागी धावत येशील व माझे अश्रू पुसशील. मी वाट पाहीन.

-- तुझीच सरला”

त्या दिवशी उदयने ते पत्र पोस्टात टाकले. परंतु मग वाचनात त्याचे लक्ष लागेना. तो कॉलेजमध्येही गेला नाही. घरीच पडून राहिला. उशीखाली तो रूमाल होता. त्यावर तो वेल होता. त्यावर ती दोन पाखरे होती. त्याच्या डोळयांसमोर सरला दिसत होती. तिची किती निराशा होईल ! ती जीव तर नाही देणार? असे सारखे त्याच्या मनात येत होते. मी अभागिनी आहे हे तिचे शब्द त्याला आठवले. त्याला चुटपुट लागली. आपण काहीतरीच केले असे त्याला वाटले. माझे वैराग्य का कायमचे आहे? असे क्षण येतात. विषण्णतेचे, शून्यतेचे. सरला या अर्थानेच सारे घेईल का? हा काही बरेवाईट करून घेईल? तो अधिकच अस्वस्थ झाला.

सायंकाळी त्या कालव्याच्या काठी तो गेला. आज तेथे कोणी नव्हते. त्या जागी तो बसला. त्याच्या डोळयातून पाणी आले. ज्या दगडावर सरलेने डोके आपटले होते तो दगड तेथे होता. दुर्दैवी, दु:खी मुलगी ! मी पुन्हा तिची प्रखर निराशा केली. कोणाची निराशा करणे केवढे पाप ! कोणाच्या जीवनात आशा, आनंद, उत्साह न ओतता आला तर निदान दु:ख, निराशा तरी तेथे ओतू नये. जगाचे दु:ख कमी करता येत नसले तर निदान त्यात भर तरी घालू नये.

तेथे तो बसला होता. आणि आता एकदम गार वारा सुटला. ढग भराभर येऊ लागले. गडगडाट होऊ लागला. पाखरांची धावपळ सुरू झाली. उदय तेथेच होता. आणि टपटप पाऊस येऊ लागला. मोठमोठे थेंब. वारा आणखी सुटला. पावसाला जोर चढला. उदय तेथेच होता. पाऊस पडत होता. उदयचे डोके शांत करीत होता. आणि हृदय आत बोलत होते. काय बोलत होते?

“त्या पहिल्या भेटीच्या वेळेस असाच झिमझिम पाऊस पडत होता आणि सरला म्हणाली, “ये माझ्या छत्रीत.” मी दूर होतो. आज तिच्या किती जवळ गेलो आहे ! दोन महिन्यांत शेते वाढली. पीक वाढले. उगीच काही तरी मी लिहिले ! मी सरलेला विसरणे अशक्य आहे. ते प्रेम मी कसे विसरू? आमच्या भेटींनी, बोलण्यांनी, शतप्रकारांनी ते प्रेम रुजले, वाढले, बहरले, ते का मरेल? ते का नाहीसे होईल?”

उदय उठला. त्याचे केस निथळत होते. तो ओलाचिंब झाला होता. वाटेत त्याने एक टांगा केला. तो खोलीवर आला. त्याने कपडे बदलले. त्याला एक प्रसंग आठवला. एकदा सरला उजाडत फिरायला गेली होती. ती पावसात सापडली. आणि मग भिजत माझ्या खोलीवर आली. ती गारठली होती.

“सरले, भिजलीस ना?”

मग काय करू? दुसरे काही बदलायला दे.”

“येथे का पातळ आहे, लुगडे आहे?”

“तुझे धोतर दे.”

“धोतर कसे पुरेल?”

“मी गोल नेसेन. गुजराती पध्दतीचे. दे धोतर आणि तू जा. मी लुगडे जरा खोलीत वाळत टाकीन. तुझे थोडा वेळ धोतर गुंडाळीन. आणि तुझे पांघरूण घेऊन पडेन. मी खरेच गारठून गेल्ये आहे. दे धोतर नि तू जा.”

आणि मी धोतर देऊन गेलो. वाचायला गेलो. सरला येथे झोपली. मी परत आलो तो झोपलेलीच. मी तिला उठवले.

“किती वेळ झाला? वाळले का रे पातळ?”

“हो वाळले. ऊठ. नेस नि जा. घरी वाट पाहतील.”

“हेच माझे घर. आज खरोखर घर झाले, नाही का उदय?”

ती उठली. वाळलेले पातळ ती नेसली. तिने केस नीट विंचरले. मी तिला फुले आणून दिली. ती म्हणाली, “तूच घाल माझ्या केसांत.”

“तुला नाहीत का हात?”

“माझ्या हातांपेक्षा तुझे हात मला आवडतात. तुझ्या हातांतून खावे, तुझे हात स्वत:ला लावून घ्यावेत असे मला वाटते. घाल लौकर केसांत फुले. उशीर होईल.” असे म्हणून तिने हळूच माझ्या गालावर चापट मारली आणि “लागले हो माझ्या राजाला” म्हणाली. “तू मार मला चापट, जोराने मार.” असा ती हट्ट धरून बसली. ते सारे त्याला आठवले. आज तो गारठून आला होता. त्या आठवणीने त्याला प्रेमळ ऊब मिळाली. त्याने कपडे बदलले. त्याला भूक लागली होती. त्याने आज चांगलाच स्वयंपाक केला. तो पोटभर जेवला. जेवून पांघरूण घेऊन झोपला. आज किती सुंदर झोप त्याला लागली होती !

तो सकाळी उठला. त्याला आज हलके वाटत होते. सरला माझ्या पत्राचा आत्यंतिक अर्थ घेणार नाही असे त्याला वाटले. ती येईल, रडेल. परंतु पटकन हसेल, असा त्याला विश्वास वाटला. कॉलेजातून तो खोलीत आला, तो ते पत्र ! सरलेचे पत्र. त्याने उघडले. वाचले. त्याला जोराने हुंदका आला. “अरेरे !” हा एकच शब्द मी उच्चारीत आहे. “अरेरे” असे त्या पत्रात होते. त्या लिहिण्यात किती वेदना होत्या ! आणि सायंकाळी तेथे ये म्हणून त्यात लिहिले. परंतु केव्हा होईल सायंकाळ ! पाखरू होता आले असते तर पटकन सरलेकडे मी गेलो असतो. परंतु तिचे घरही अद्याप मला माहीत नाही. त्या कालव्याच्या काठी तिने बोलावले आहे. तो घडयाळात सारखा पाहात होता. शेवटी तो निघाला. मध्येच झपझप चाले. मध्येच त्याची पावले मंद होत. मनाच्या गतीप्रमाणे पावले पडत होती. वळला त्या कालव्याकडे. त्याला कोणी तरी तेथे बसलेले दिसले. अपराध्याप्रमाणे तो हळूहळू चालू लागला. आला. जवळ आला. सरला एकदम उठली.

“उदय, उदय, काय रे असे लिहिलेस?” ती एकदम उठून जवळ येऊन म्हणाली.

“पण आली ना? ते सारे खोटे असे सांगण्यासाठी आलो ना? चल तेथे बसू.”
“किती रे मला दु:ख दिलेस? रात्र जाता जाईना. उदय नको हो पुन्हा असे लिहू. किती रे निराशा मी भोगायची? आजपासून सरलेला रडवायचे नाही, दुखवायचे नाही, असे ठरव. मी आधीच मेलेली. मला आणखी मारू नको. मला सजीव केलेस ते का पुन्हा मारण्यासाठी?”

“सरले, असे कधी येतात क्षण. नेहमी का एकाच वृत्तीत असतो आपण? परंतु वर अशा लाटा कितीही आल्या तरी आपण परस्परांनी खालचा अथांग, गंभीर प्रेमसागर लक्षात ठेवला पाहिजे. आणि क्षणिक दु:ख विसरून पुन्हा श्रध्देने व विश्वासाने राहिले पाहिजे. मी असे चार शब्द लिहिताच तुला का असे वाटते की संपले याचे प्रेम? तुझा विश्वास का इतका लेचापेचा आहे? मी तुला विसरणे शक्य तरी आहे का? असे कधी मी लिहिले तरी त्यावर विश्वास नको ठेवीत जाऊस. उदयचे हे क्षणिक वादळ आहे असे समज हो. कालसुध्दा येथे येऊन गेलो. सरले, आपण दोघे एकमेकांची झालो आहोत. असल्या गोष्टींनी आपण दूर नाही होणार. कोण आपली ताटातूट करील? मृत्यूनंतर एकत्र असू. हस बरे एकदा.”

“मला नाही हसू येत.”

“तुलाच तर नेहमी येते. बघ आले हसू. असे पटकन हसणे मला कधी येईल? सरले, तुझ्या मनासारखे साधे सरळ मन मला कधी मिळेल? इतकी दु:खाने आज दग्ध झाली होतीस तरी पटकन हसलीस. काही वेली अशा असतात, की त्या किती वाळल्या तरी जरा ओलावा मिळताच त्या हिरव्यागार होतात. आणि काहींना किती पाणी घाला, लौकर पाने येणार नाहीत, फुले फुलणार नाहीत. तुझ्या तोंडावर किती पटकन फुले फुलतात ! अश्रूंची वा हास्याची. खरे ना?”

“परंतु आता अश्रूंची फुले नकोत रे.”

“नकोत, खरेच नकोत. काल रात्री मी तुझ्या आठवणीत रंगलो होतो. बारीक सारीक शेकडो गोष्टी आठवत होत्या. माझे मला आश्चर्य वाटले की, इतके सारे मला आठवते तरी कसे?”

“उदय, तुझा हात कढतसा रे लागतो?”

“तरुण रक्त आहे.”

“मी नाही का तरूण?”

“परंतु दु:खाने, निराशेने, उपेक्षेने तुझ्यातील शक्ती क्षीण झाली आहे.”

“उदय, खरेच तुझे अंग कढत आहे. तू काल पावसात भिजलास. परवा रात्री त्या टेकडीवर वार्‍यात बसलास. तुला ताप आला आहे; तू घरी जा. पांघरूण घेऊन पड. येथे नको वार्‍यावर. ऊठ.”

“सरले, उगीच घाबरतेस. मला काही होणार नाही.”

“उदय, तू आईचा एकुलता एक मुलगा. तू जपले पाहिजे.”

“आणि तुझ्यासाठीही नको का जपायला?”

“आधी त्या मातेसाठी; नंतर माझ्यासाठी.”

“खरेच का ताप आला आहे? बघू तुझा हात, माझा श्वास कढत लागतो का तुझ्या हाताला? बघ, वाटतो कढत?”

“खरेच. कढत कढत श्वास. आणि तुझे तोंडही लालसर झाले आहे. डोळेही. चल, ऊठ. टांगा करून आपण जाऊ.” टांगा करून उदयच्या खोलीवर दोघे गेली. उदय अंथरुणावर पडला. सरलेने त्याला पांघरूण घातले. त्याचे कपाळ चेपीत ती बसली.

“पाय चेपू का?” तिने विचारले.

“तू आत जा. बाबा रागे भरतील.”

ती काही बोलली नाही. तिने त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले. ती ते चेपीत होती.

“सरले, जा, मला घाम येईल. मी बरा होईन.”

“बाबांना विचारून मी येत्ये. माझी मैत्रीण आजारी आहे. जाऊ का, असे विचारून येते.”

“नको सरले. येथे निजशील कोठे?”

“मी जागायला येत आहे. तुझ्याजवळ बसायला. काही लागले सवरले तर द्यायला. मी का उदय परकी आहे? मी तुझी नाही का?

जाऊन परत येते हां.”

ती गेली. घरी आली.

“सरले किती उशीर?” रमाबाई म्हणाल्या.

“आई, एक मैत्रीण आजारी आहे. खूप ताप तिला आला आहे. येथे ती एकटीच शिकायला असते. कोण आहे तिला? बसल्ये होते तिच्याजवळ. मी जेवून आईबाबांना विचारून येत्ये, असे तिला सांगून आल्ये. जाऊ का मी? बाबा कोठे आहेत?”

“ते आज उशिरा येणार आहेत. तू जा जेवून.”

“बाबांना तू सांग.”


“सांगेन.”

सरला पटकन जेवली. घरातले कोयनेल तिने बरोबर घेतले. अमृतांजन घेतले. थर्मामीटर घेतले.

“आई, थोडे दूध देतेस?”


“ने. भांडे आण परत.”

सरला सामान घेऊन निघाली. उदयला ताप आला म्हणून तिला वाईट वाटत होते. परंतु त्याची शुश्रूषा करता येईल, त्याच्याजवळ बसता येईल, म्हणून तिला आनंदही होत होता. वेडे मन !

सरला आली. उदय गुंगीत होता. तिने त्याच्या कपाळाला हळूच हात लावला. तो जागा झाला.

“काय रे उदय, कसे वाटते?”

“तू कशाला आलीस?”

“तुझी म्हणून आल्ये. मी ताप बघत्ये हो किती आहे तो. हे थर्मामीटर लाव. झटकले आहे. लाव.”
त्याने ते लावले. थोडया वेळाने त्याने काढून दिले. तिने ताप पाहिला.

“बराच आहे रे ताप. तीनहून अधिक आहे.”

“कपाळ दुखते का रे?”

“नाही. बरे वाटते. तू आता जा.”

“तू दूध घेतोस? हे बघ मी आणले आहे. घे थोडे. मी कढत करून देत्ये.”

तिने स्टोव्ह पेटविला. तिने त्याला कढत करून दूध दिले. तिने पाणी गरम करून ठेवले. आणि ती त्याच्याजवळ बसली. त्याचे पाय चेपीत बसली. मध्येच ती त्याचा हात आपल्या हातात घेई व आपल्या तोंडावरून फिरवी. कधी आपला हात त्याच्या कपाळावर ठेवी.

“कसा थंडगार आहे तुझा हात !” उदय म्हणाला.

“उदय, लौकर बरा हो.” ती म्हणाली.

बराच वेळ झाला. कोणी बोलत नव्हते. उदय पडून होता.


“सरले, तू आता नीज, तू काय बरे आंथरशील? माझ्या गादीखालची सतरंजी काढून घेतेस? तिच्यावर ही पासोडी घाल. उशाला पुस्तके घे. पांघरायला ही चादर घे. तू नीज. मला काही लागले तर उठवीन.”

“उदय, मला नाही झोप येत. अशी तुझ्याजवळ बसूनच राहीन. तुझ्याजवळ सारखे बसून राहावे असे वाटते. तुझ्यापासून जराही दूर असू नये असे वाटते. उदय, तुझ्या अंगावर असा हात ठेवावा व तुझ्यात मिळून जावे, नाहीसे व्हावे असे वाटते. तुझ्यापासून नाही रे मला दूर राहवत. तुझ्या अंगावर हात ठेवून अशीच बसेन. आलीच झोप तर अशीच जरा पडेन. ठेवीन असे डोके हो. तू नीज. स्वस्थपणे झोप. नि मी थोपटते हो.” आणि उदय पडून राहिला. ती गाणे म्हणत होती. त्याला झोप लागली. तिने खाली वाकून पाहिले. शांत झोप. तिने दिवा मालवला. आणि तिने तेथेच त्याच्या अंगावर डोके ठेवले. तशीच पडून राहिली. तिला झोप लागली.

उदय जागा झाला. त्याला खूप घाम आला होता.

“सरले, घाम पुसायला हवा.” तो म्हणाला.

सरला जागी झाली.

“मला झोप लागली होती. थांब पुसत्ये हो.”

ती उठली. तिने त्याचा घाम पुसला. तिने त्याला दुसरा सदरा घालायला दिला. त्याला नीट पांघरूण पुन्हा घातले.

“सरले, तू नीट नीज ना.”

“आली झोप तर अशीच जरा पडेन.”

दोघांना पुन्हा झोप लागली.

सकाळ झाली. दोघे जागी झाली होती. त्यांच्या तोंडावर मंदमधुर हास्य होते. किती कोवळी प्रसन्नता, प्रेमळता, कृतार्थता त्यांच्या मुखमंडलावर फुलली होती !

“सरले, आपण दोघे एकमेकांची आहोत.”

“जन्मोजन्मीची एकमेकांची आहोत.”

“आता उठायचे ना?”

“अशीच पडून राहू. वाटते की अशा वेळेस मरण यावे म्हणजे ताटातुटीचे भय नाही.”

“माझा ताप निघाला आहे. तू ऊठ. तोंड धू. घरी जा.”

ती उठली. तिने तोंड वगैरे धुतले. तिने उदयचा घामाचा सदरा धुऊन ठेवला. तिने आपले केस विंचरले. उदयला कढत पाणी तोंड धुवायला दिले. तिने त्याला कोयनेल दिले. तिने त्याचे केस नीट विंचरून त्याचा भांग पाडला. त्याच्याकडे प्रेमाने तिने पाहिले. त्याचे अंथरूण तिने साफ केले. आणि तेथे ती बसली. किती आनंदी दिसत होती ती !

“जा आता, दमलीस.”

“उदय, सार्‍या जन्मातील शीण आज गेला. आज बाहेर हिंडू फिरू नकोस हो. ताप निघाला आहे. पुन्हा येईल नाही तर.”

सरला गेली. उदयला पुन्हा ताप आला नाही.

दसरा गेला. दिवाळी जवळ येत होती. रमाबाईचे दिवस भरत आले होते. बाळंतपणाला त्या माहेरी जाणार होत्या. या वेळेस सरलेचा हात बाळाला लावू द्यावयाचा नाही असे तिने ठरविले होते. एके दिवशी पतिपत्नी बोलत होती:

“दिवाळीलाच जाऊ.” रमाबाई म्हणाल्या.

“चालेल. परंतु सरला एकटी.” विश्वासराव म्हणाले.

“राहील चार दिवस एकटी, भीती थोडीच आहे?”

“तुला पोचवून मी परत येईन.”

“परंतु दिवाळीला तेथेच रहा. दिवाळीचे सरलेला इकडे घेऊन या.”

असे बेत होत होते. आणि विश्वासराव व रमाबाई गेली. सरला एकटी राहिली. तिला आता स्वातंत्र्य होते. उदयला आपल्या घरी आणू असे तिने ठरविले. उदयने तिचे घर अद्याप पाहिले नव्हते. संधी आली.

उदयच्या आईने त्याला दिवाळीत बोलावले होते. परंतु अभ्यास फार आहे. म्हणून येत नाही असे त्याने कळविले. सरलेनेच त्याला जाऊ दिले नाही.

“नको रे जाऊ. मी येथे एकटी. बाबा, आई सारी मला टाकून गेली. तूही का जाणार? माझ्या जीवनात नको का दिवाळी, नको का दिवा?” तिच्या या दु:खपूर्ण शब्दांनी तो राहिला.

आणि सरला दिवाळीचे करू लागली. तिला अपार उत्साह आला होता. आज तिने सडा घातला. सुंदर रांगोळी घातली. तिने पणत्या लावल्या. आजच रात्री उदय जेवायला येणार होता. तो आला. तिने दोन ताटे वाढली. रांगोळी काढली. आणि दोघे जेवायला बसली. प्रेमाने जेवत होती. आणि दोघांनी विडे खाल्ले.

“कसा रंगला आहे तुझा विडा.” ती म्हणाली.

“पूर्वी रंगत नसे.”

“पूर्वी तुझ्यावर कोणी प्रेम करायला नसे. आता मी आहे. खरे ना?”

आणि तिने फोनो लावला. मनोहर प्रेममय गाणी. आणि रात्री शेवटच्या सिनेमाला दोघे गेली. जवळजवळ बसली हातात हात घेऊन. आज प्रेमाची पौर्णिमा होती. प्रेमाची पूर्तता होती.

“पुरे आता. आपण घरी जाऊ.” ती म्हणाली.

“चल.” तो म्हणाला.
आणि सरलेच्या घरी दोघे आली. प्रेमाची पूर्णता झाली. सकाळी सरला लौकर उठली. बराच उशीर झाला तरी उदय उठला नाही.

“उदय, ऊठ राजा. दूध घेशील का चहा?” ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली.

“तू देशील ते.”

आज माझ्याबरोबर चहाच पी.”

“उदय उठला. त्याने आज चहा घेतला. तिने सुपारी दिली. दोघे माडीत बसली.

“सरले, जाऊ ना आता?”

“चार दिवस दिवाळसण होऊ दे. माझ्या आयुष्यातील पहिली दिवाळी. राहा येथेच. बाबांचे पत्र येईल. मग जा, मी एकटी आहे. मला सोबत नको का?”

“बाबा अकस्मात येतील.”

“येऊ दे. भीती सोडायलाच हवी.”

“नको सरले.”

“तू भित्रा आहेस उदय. मला सोडून जाऊ नकोस. आपण दोघांचा एकत्र फोटो काढू. आज दुपारी जाऊ. दिवाळी येथे कर.”

आणि तो चार दिवस तेथेच राहिला. त्यांनी दोघांचा एकत्र फोटो काढला. फोटोच्या दिवशी तिने कुंकू लावले होते. ती उदयला म्हणाली,

“उदय, कुंकू लाव मला. आपले कधीच लग्न लागले आहे. खरेखुरे लग्न. लाव कुंकू. माझ्यावर तुझ्या सत्तेचे चिन्ह कर. तुझा शिक्का मार.”

आणि त्याने कुंकू लावले. पतिपत्नी म्हणून त्यांनी फोटो काढला. दिवाळी संपली.

“सरले, आता उद्या मी जातो. अभ्यास करायला हवा.”

“जा हो राजा. बाबाही येतील. आपण लौकरच एकमेकांची होऊ.”

“होऊ. रजिस्टर पध्दतीने लग्न लावू.”

“तू म्हणशील तसे.”

आणि उदय आपल्या खोलीवर गेला. दिवाळी गेली. रमाबाई माहेरीच होत्या. अद्याप त्या बाळंत झाल्या नव्हत्या. नाताळ आला. उदय अभ्यास करीत होता.

एके दिवशी सरला त्याच्याकडे आली होती.
“उदय !”

“काय सरले?”

“आपण एकमेकांचे कधी व्हायचे?”

“अजून का झालो नाही?”

“तसे नव्हे रे. कायद्याने. जगाच्या दृष्टीने.”

“माझी परीक्षा पास होऊ दे.”

“उदय !”

“काय सरले? सचिंत का आवाज?”

“उदय, तू मला अंतर नाही ना देणार? मला सोडून नाही ना जाणार?”

“असे कसे तुझ्या मनात येते? मी का कसाई आहे, खाटिक आहे?”

“रागावलास तू?”

“मग काही तरी बोलतेस.”

“उदय माझ्यावर रागावू नकोस. उदय, मला दिवस गेले आहेत. मला समजले आहे.”

“मी तुला अंतर देणार नाही.”

“मी तुला अंतर देणार नाही.”

“परीक्षा एप्रिलमध्ये ना?”

“हो.”

“म्हणजे सहा-सात महिने होऊन जातील. परीक्षा होताच मला घेऊन जा. तोपर्यंत देव अब्रू राखो. परीक्षा होताच आपण कायदेशीर रीत्या पतिपत्नी होऊ. देवाच्या घरी आलोच आहोत. समाजातही होऊ. उदय आजच आपण विवाहबध्द झालो तर?

मी तुझ्या खोलीत येऊन राहीन. आपण लहानसा संसार सुरू करू.”

“सरले, तुला का माझा विश्वास वाटत नाही? मी गरीब आहे. दोघांचा खर्च कसा करायचा? थोडे दिवस कळ सोस. तुझी अब्रू ती माझीही नाही का?”

“उदय, स्त्रियांचे कठीण असते.”

“परंतु माझ्यावर विश्वास आहे ना?”

“आहे. तुझ्याशिवाय कोण आहे मला? कोणी नाही, कोणी नाही.”

तिकडे रमाबाई बाळंत झाल्या. मुलगा झाला. मुलगा चार महिन्यांचा झाल्याशिवाय त्या इकडे येणार नव्हत्या. त्यांनी विश्वासरावांनाच तिकडे बोलाविले आणि ते गेले. पुन्हा सरला एकटी राहिली. एका अर्थी बरे होते. तिला आता उलटया होत. कधी अशक्तपणा वाटे. परंतु हळूहळू कमी झाले सारे.

उदयची परीक्षा संपत आली. आज शेवटचा दिवस होता. शेवटची प्रश्नोत्तरे लिहून खोलीत आला. तो आईकडचे पत्र आले होते. ते मामांच्या सहीचे पत्र होते.

“तुझी आई आजारी आहे. तुझी परीक्षा म्हणून तुला बोलावले नाही. मी येथे आलो आहे. उद्या तुझी परीक्षा संपेल. लगेच ये.” असा त्यात मजकूर होता. दिवाळीतही तो घरी गेला नव्हता. आई किती वाट पाहात असेल. गेले पाहिजे ताबडतोब असे त्याला वाटले. तो विचार करीत आहे तो सरला आली.

“का रे उदय, सचिंतसा? पेपर कसे गेले?”

“चांगले गेले आहेत.”

“तू पास होशीलच. आता मोकळा झालास, किती तरी दिवसांत आपण पोटभर बोललो नाही. तुझी परीक्षा म्हणून मी येत नसे. आता माझ्याकडे चल. चार दिवस राहा. बाबा येथे नाहीतच.”

“सरले, आई आजारी आहे. मामांचे पत्र आले आहे.”

“तू लौकर यावेस, इकडे कोठे राहू नयेस म्हणून असे लिहिले असेल. आई जास्त आजारी असती तर तार नसती का आली ! राहा रे दोन दिवस. नाही म्हणू नकोस. तुझ्या आईला तुझ्याशिवाय कोणी नाही. मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे? एखादे वेळेस वाटते की गेलास तर पुन्हा येशील की नाही. तू लग्न लावून परत जा. उदय, काय करायचे? राहतोस ना दोन दिवस? चल माझ्याकडे, ऊठ.”

तो उठला. दोघे सरलेकडे आली. सरलेने फराळाचे केले. दोघांनी खाल्ले. सायंकाळी दोघे फिरायला गेली. कितीतरी वेळ ती बोलत होती. उशिरा घरी परत आली. प्रेमाच्या गोष्टी बोलत झोपली. दोन दिवस झाले.

“सरले, जाऊ दे मला. आई आजारी असेल.”

“फार आजारी असली तर तार येईल. आणखी दोनच दिवस राहा. किती राहिलास तरी का पुरे होणार आहे? आणि गेलास म्हणजे लौकर परत ये हो.”

आणखी दोन दिवस तो राहिला.

आज तो आपल्या खोलीवर आला. तो सामानाची बांधाबांध करीत होता तो तार आली. “आई अत्यवस्थ, सारखी आठवण करीत आहे. ताबडतोब नीघ.” असा मजकूर होता. त्याला वाईट वाटले. अपराध्यासारखे वाटले. जाण्याची तयारी झाली. सरला परभारे स्टेशनवर निरोप द्यायला येणार होती.

“भय्या, खोली कोणाला देऊ नका. मी लौकरच परत येणार आहे. खोली मला लागेल.”

“अच्छा.”

“खाट खोलीतच असू दे. काढू नका.”

“ठीक.”

उदय सामान घेऊन स्टेशनवर आला. सरलेने तिकीट काढून ठेवले होते. दोघे प्लॅटफॉर्मवर आली. गाडी अजून रूळावर आली नव्हती.

“सरले, ही बघ तार.”

तिने तार वाचली. तिने उदयच्या तोंडाकडे पाहिले. त्याच्या डोळयांतून का पाणी येत होते?

“उदय ताबडतोब पत्र पाठव. आणि आईची प्रकृती बरी झाली की लगेच ये. आईलाच घेऊन ये. आपण नवीन संसार मांडू. आईला सुख देऊ. तिची सेवा करू. उदय, वाईट वाटून घेऊ नको. भेटेल हो आई. मी तुला चार दिवस राहवून घेतले. दिवाळीच्या सुटीतही मीच जाऊ दिले नाही. उदय, भेटेल हो आई.”

“भेटेल. मलाही वाटते की, भेटेल. आता परीक्षा पास होईन. तिघे एकत्र राहू.”

गाडी आली. सामान ठेवण्यात आले. उदय व सरला दोघे आत बसली. त्यांचे हात हातांत होते. त्यांना बोलवत नव्हते. पहिली घंटा झाली.

“सरले, उतर खाली. दु:ख नको करूस. काळजी नको करूस. विश्वास ठेव. सारे चांगले होईल.”

ती खाली उतरली. खिडकीजवळ ती उभी होती. तिच्या डोळयांत पाणी आले.

“उदय !”

“वाईट नको वाटून घेऊ. आईला बरे वाटताच मी येतो. मी पत्र पाठवीन.”

“तू का सारे सामान बरोबर घेतलेस?”

“हो.”

“थोडे ठेवलेस का नाही? मी त्या खोलीत राहिल्ये असत्ये.”

“खोली कोणाला देऊ नकोस म्हणून भैय्याला सांगितले आहे. अजून खाट तेथेच आहे. भय्याने काढली नसेल.”

“मी तेथे आत जाईन. किल्ली माझ्याजवळ आहे. तुझेच कुलूप आहे ना?”

“हो. माझी किल्ली भैय्याजवळ आहे.”

शेवटची घंटा झाली. सरलेने उदयकडे अश्रुपूर्ण डोळयांनी पाहिले. दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते. दोघांनी ते दाबले.

“उदय, ये हो लौकर.”

“विश्वास ठेव.”

शिट्टी झाली, गाडी गेली. सरला थोडा वेळ तेथेच प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसली. तिला हलके वाटत होते. जरा निराधार, अगतिक वाटत होते. उदयच्या आईविषयीही तिला काळजी वाटत होती. शेवटी ती उठली. ती टांगा करून उदयच्या खोलीवर आली. तिने खोली उघडली. दार लावून आतील खाटेवर ती बसली. तिच्या डोळयांतून सारखे पाणी येत होते. उदयने सारे सामान का बरे नेले? तो पुन्हा नाही का येणार? येईल. आणि न आला तर? तो माझ्या जीवनात आहे. माझ्या पोटात वाढत आहे. माझ्या अणुरेणूंत तो अंतर्बाह्य भरलेला आहे. खरेच, उदय न आला तर? तर मी जगात कोठेही जाईन. बाळाला वाढवीन. बाळाला त्याच्या प्रेमळ पित्याच्या गोष्टी सांगेन. परंतु उदय येईलच. आणि माझे कायमचे दुर्दैव आड आले तर? मी जन्मजात अभागिनी आहे. मी विषवल्ली आहे. बाळाला का त्याचा जन्मदाता दिसणार नाही? माझ्या पोटी येणारे बाळ, तेही का दुर्दैवी असेल? या अभागिनीचे बाळही अभागी होणार का?

तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. परंतु शेवटी श्रध्देचा; आशेचा, विश्वासाचा विजय झाला. ती आनंदाने घरी आली. तिने ट्रंकेतून तो दोघांचा फोटो काढला. तिने तो हृदयाशी धरला. तो फोटो जवळ घेऊन ती अंथरूणावर पडली. तिला एकदम हसू आले. कशाचे बरे? तिच्या मनात आले की, हा दोघांचाच फोटो आहे. परंतु पुढे तिघांचा काढावा लागेल. आणि बाळ कोणाच्या हातात असेल? उदयच्या की माझ्या? अशा सुखमय व धन्यतम विचारांत, मातृत्वाच्या वत्सल कल्पनासृष्टीत ती रमली, रंगली. आणि केव्हा झोप लागली ते तिला कळलेही नाही.

नीज, सरले नीज. तुझा प्रेमाचा वृक्ष बहरला, फुलला. आता तो लौकरच सुंदर फळही देणार आहे. झोप. सुखाने झोप. विश्वासाने झोप. शेवटी विश्वासाचा विजय होईल. शांतपणे झोप.

***