Ramacha shela..- 8 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 8

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

८. उदय

उदयची हकीगत सांगायची राहिलीच. ती सारी नीट सांगतो, ऐका. स्मृतिहीन उदयला सरलेचा फोटो दिसताच एकदम स्मृती आली. तो एकदम उठून उभा राहिला. त्याच्या दुबळया शरीरात बळ आले. सरलेचे जीवन त्याच्या डोळयांसमोर आले. तिचे दिवस भरत आले होते. ती कोठे असेल, तिने काय केले असेल, सारे विजेप्रमाणे त्याच्या मनासमोर आले. आणि तो एकदम मामांकडून निघून गेला. त्याला चिंता वाटत होती. सरलेची काय स्थिती झाली असेल असे मनात येऊन तो दु:खी होई. कावराबावरा होई. उदयने आपल्याला फसविले असे का तिला वाटले असेल? अरेरे, तिने का जीव दिला असेल? ती घर सोडून गेली असेल का? कोठे असेल ती? तिचा कठोर पिता तिला राहू देणार नाही. तो नाही नाही ते बोलला असेल. सरले, सरले, तू माझ्या नावाने टाहो फोडला असशील ! तू पूर्वी माझ्याकडे यायचीस व मला हळूच स्पर्शून उदय, उदय, अशा गोड हाका मारायचीस. परंतु या वेळेस तू दु:खाने हाका मारल्या असशील. काय करू मी? भेटशील का तू, दिसशील का तू? “उदय, तू परत भेटणार नाहीस असे वाटते. तुला धरून ठेवावे, सोडू नये असे वाटते.” असे तू म्हणायचीस. परंतु खरेच तुला पुढचे दिसत होते की काय? सरले, तू नाही भेटलीस तर मी कशाला जगू? मला तरी कोण आहे जगात? ना आई ना बाप. ना मित्र ना सखा. कोणता आहे मला आनंद? कसले आहे सुख? कोणाचे प्रेम चाखू? कोणाला प्रेमाने देखू? नको हे जीवन ! नको. नि:सार जीवन ! उदास भयाण जीवन !

अशा विचारात उदय होता. त्याला गळून गेल्यासारखे वाटत होते. तो शून्य दृष्टीने पाहात होता. असे करता करता कल्याण आले. आणि पुण्याकडे जाणारी गाडी आली. तीत तो बसला. पुण्यात कोठे जायचे याचा तो विचार करीत होता. माझी खोली असेल का? भैय्याने राखून ठेवली असेल का? का सरला माझ्या खोलीत राहायला आली असेल? तेथे ती दिसेल का? बाळाला खेळवीत असेल. त्याला पाजीत असेल. सरले, कोठे असशील तू? कोठे असेल तुझे बाळ, आपले बाळ?

पुणे आले. तो स्टेशनवर उतरला. टांगा करून तो त्या जुन्या खोलीवर गेला. खोलीला कुलूप होते. परंतु ते नवीन कुलूप होते. भैय्याही तेथे नव्हता. त्याने भैय्याला हाका मारल्या. भैय्या आला.

“काय भैय्या, काय करीत होतास?”

“तिकडे मोरीत होतो, केव्हा आलेत?”

“हा आताच. खोलीत कोण राहते?”

“एक विद्यार्थी. तुमची खूप वाट पाहिली. शेवटी दिली खोली भाडयाने.”

“आता मी कोठे राहू?”

“येथे सामान ठेवा. या खोली बघून. वाटेल तितक्या खोल्या मिळतील.”
“परंतु ही चांगली होती. एका बाजूला. कोणाची फार ये-जा नाही. शांत.”

“तुम्हा दोघांना ही कशी पुरेल?”

“कोण दोघे?”

“त्या बाई येत असत त्या. तुम्ही म्हणत असा एकमेकांना की आपण नवा संसार मांडू. माझ्या कानांवर येत असे.”

“सरला येथे कधी आली होती का?”

“बरेच दिवसांत नाही आल्या. तुम्ही येथे नाही तर त्या कशाला येतील? या खोलीत तुमची नावे आहेत. तो नवीन विद्यार्थी हसतो.”

“खोलीला नवीन रंग नाही का दिलास?”

“रंगेल माणसे आली तर द्यावा रंग. हा नवीन मुलगा भुक्कड दिसतो. तुम्ही असतेस तर गुलाबी रंग दिला असता. जा, बघून या नवीन खोली. सामान ठेवा इथे.”

भैय्या पुन्हा नळावर गेला. उदय खोलीत डोकावून बघत होता. इतक्यात तो विद्यार्थी आला.

“कोण आपण?”

“माझे नाव उदय”

“अस्से. या खोलीत तुम्ही राहात असा?”

“होय.”

“ते पाहा तुमचे नाव आणि ते दुसरे.”

“ही नावे अद्याप आहेत ! तुम्ही पुसून नाही टाकली?”

“प्रेमाची नावे मी कशाला पुसू?”

“ही वेल, ही पाखरे, सारे तसेच आहे.”

“तुमची स्मृतिचिन्हे. होय ना?”

“हो. सरला येथे आली होती का? माझी चौकशी करीत आली होती का?”

“येथे कोणी आले नाही. जरा बसा हां. मी हाततोंड धुऊन येतो.”

तो मित्र गेला. उदय त्या खोलीत उभा होता. सारे पाहात होता. ती वेल, ती पाखरे, ती नावे ! सारी त्याच्याजवळ बोलत होती. त्याला किती आठवणी आल्या. गोड गोड आठवणी. तो खिडकीजवळ गेला व समोर पाहात होता. इतक्यात तो विद्यार्थी आला.

“मी जातो. जरा जाऊन येतो. सामान असू द्या येथे.”

“चहा घेऊन जा. मी आता करतो.”

“चहा नको.”

“वा: ! तुमच्यासारख्यांना चहा देण्याचे भाग्य कधी मिळणार? ही खोली म्हणजे तुमचे प्रेममंदिर होते. बसा.”

उदय बसला. त्या मित्राने चहा केला. उदयने चहा घेतला व तो निघाला. तो कोठे जाणार होता? सरलेची कोठे करणार तो चौकशी? सरलेच्या वडिलांकडे तो जायला निघाला. त्याला ते घर माहीत होते. त्या घरात त्याने प्रेमाची दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या प्रेमाची परिपूर्ती तेथे झाली होती. त्या घरात त्याने सरलेच्या कपाळावर कुंकू लावले होते. त्या घरातच सरला व तो एकरुप झाली. अशा त्या घराकडे जायला तो निघाला.

दुपारचे तीन वाजायची वेळ होती. चहाची वेळ होती. रमाबाई आपल्या नव्या बाळाला घेऊन बसल्या होत्या. आरामखुर्चीवर विश्वासराव होते. दोघे बोलत होती.

“सरलेचा पत्ता नाही. ही गेली तरी कोठे?”

“परंतु तिचा विचार कशाला करता? काहीतरी बरेवाईट तिने केले असेल. गेली असेल निघून. बाळाला हात तरी नको लागायला. तुमची सरला खरेच का अशी आहे? जाईल तेथे सत्यानाश करणारी?”

“इतर सर्व गोष्टींचा नाश तिने केला तरी मला पर्वा नव्हती. परंतु माझ्या अब्रूचा नाश न करो. माझ्या तोंडाला काळे न फासो.”

“ही तुमची मुलगी असे कोणाला कळणार आहे?”

“अग, तूच उद्या माहेरी बोलशील.”

“परंतु तुमची अब्रू ती का माझी नाही?”

विश्वासराव सचिंत बसले होते. तो दारात उदय उभा राहिला.

“कोण पाहिजे?”

“आपणच का सरलेचे वडील?”

“हो.”

“तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.”

“तुम्हांला सरलेची हकीगत आहे का ठाऊक?”

“तिची हकीगत विचारायलाच मी आलो आहे.”

“तुम्ही कोण?”

“माझे नाव उदय.”

“उदय?”

“हो.”

“सरलेचा व तुमचा काय संबंध? कसली माहिती पाहिजे तुम्हाला? आत या. आपण का सी.आय.डी. मधले आहात? कोणी गुप्त पोलिस खात्यातले आहात? कोठे आहे सरला? या, आत या. तू जरा खाली जा ग.”

रमाबाई बाळाला घेऊन खाली गेल्या. विश्वासराव व उदय तेथे बसले होते.

“तुम्ही कोठले?”

“मी खानदेश-वर्‍हाडकडचा आहे. येथे पुण्याला शिकत असे. यंदा बी.ए. झालो.”

“सरलेची कोणती हकीकत तुम्हांला पाहिजे?”

“ती कोठे आहे?”

“मलाही माहीत नाही. एके दिवशी घरातून ती नाहीशी झाली. दोन महिने झाले असतील. अधिकच. पत्र नाही, निरोप नाही. त्या दिवशी मध्यरात्री ती एकटीच गच्चीत होती. मला झोप येत नव्हती, म्हणून मी गच्चीत गेलो. तो तेथे सरला होती. मी तिला म्हटले जाऊन नीज. ती निजायला म्हणून गेली. परंतु सकाळी पाहतो तो ती खोलीत नाही. ती कधी कधी फिरायला जात असे. उशिरा येत असे. मैत्रिणीकडे गेल्ये होत्ये असे सांगे. तशीच गेली असेल असे वाटले. परंतु दुपार झाली तरी ती आली नाही. मी शोधणार तरी कोठे? येईल एक दिवस अशी आशा आहे.”

“तुम्ही तिचा शोध नाही केला?”

“कोठे करू शोध? परंतु तुम्हांला का उत्सुकता? सरलेची नि तुमची का ओळख आहे?”

“हो.”

“किती दिवसांपासूनची ओळख?”

“मागल्या वर्षाची ओळख. परंतु तसे म्हणाल तर आमची जणू जन्मोजन्मीची ओळख आहे. आम्ही एकमेकांस पाहिले व एकदम ओळख पटली. तो दिवस मी विसरणार नाही. सरला एका दगडावर डोके फोडीत होती. मी धावलो. तिच्या कपाळावर पट्टी बांधली.”

“पर्वतीच्या पायरीवर पाय सरकून पडल्ये असे ती म्हणाली होती.”

“तिला जीवन असह्य झाले होते. ती निराश होती. मी दुर्दैवी आहे, विषवल्ली मला म्हणतात, असे ती सांगे. मला तिची करूणा आली. ती मधून मधून भेटत असे. आमचे परस्परांवर प्रेम जडले.”

“अस्से. कितपत प्रेम जडले?”

“ते शब्दांनी कसे सांगू? ते वर्णिता येणार नाही. आम्ही एकमेकांची झालो होतो.”

“काही प्रत्यक्ष संबंध?”

“तुम्ही सरलेचे वडील आहात. मी कशाला लपवू ! आम्ही जणू पतिपत्नी झालो होतो. आम्ही लौकरच रजिस्टर पध्दतीने विवाहबध्द होणार होतो. परंतु माझी आई आजारी असल्याची तार आली. मी गेलो. आईचे प्राण गेले होते. आईचा मी एकुलता मुलगा. मला धक्का बसला. मी बेशुध्द होऊन पडलो. जवळ जवळ दोन महिने माझी स्मृती गेली होती. परंतु एके दिवशी मामांनी माझी ट्रंक फोडली. त्यात सरलेचा व माझा फोटो होता. त्यांनी तो माझ्यासमोर आणला. मला एकदम स्मृती आली. मी एकदम येथे धावून आलो. सरलेसाठी आलो. तिचा होण्यासाठी आलो. नवा संसार मांडण्यासाठी आलो. परंतु ती कोठे आहे?”

“तुम्हांला हे सारे सांगायला लाज नाही वाटत?”

“मी पाप केले आहे असे मला वाटत नाही. मी तिला फसवले नाही. मी तिला माझे प्रेम दिले आहे. फसवायचे असते तर मी धावून आलो नसतो. स्वच्छपणे तुम्हांस सांगितले नसते. पाप भित्रे असते.”

“बेशरम, पाजी !”

“जरा जपून बोला. राग नका करू.”

“म्हणे राग नका करू. प्रत्यक्ष माझ्या मुलीवर हात टाकतोस ! व्यभिचार करतोस ! नीच ! जारकर्म करणार्‍या, पाप्या, दुष्टा !”

“अभद्र बोलू नका. मी व्यभिचार केला नाही. अत्याचार केला नाही. जेथे अन्योन्य प्रेम असते तेथे व्यभिचार होत नाही. व्यभिचार तेथे, जेथे प्रेम नसते. तुमची सारी मंगल लग्ने व्यभिचार असू शकतील, जर तेथे अन्योन्य प्रेम नसेल. मी जार नाही. तुमच्या मुलीचा मी प्रेमळ पती आहे. ती माझी पत्नी आहे. सरलेचे काय केलेत सांगा?”

“तिची काय स्थिती होती माहीत आहे?”

“माहीत आहे म्हणूनच मी विचारीत आहे. तिची स्थिती माहीत होती म्हणूनच स्मृती येताच मी धावून आलो; अशक्त होतो तरी आलो. स्त्रीहृदयाची वंचना करणारा मी नाही. सांगा कोठे आहे सरला? काय केलेत तिचे?”

“सरला मेली.”

“बाळंतपणात?”

“बाळंतपणात म्हणून विचारतोस. हरामखोरा, लफंग्या, किडया ! बाळंतपण म्हणून विचारतोस? किती दिवस मिठया मारीत होता? तुला ठार करावे वाटते नीचा !”

“नीच तुम्ही आहात. घरात बालविधवा मुलगी होती. तिचा पहिला पती आठ-दहा दिवसांत मेला. प्रथमपतीची ना ओळखदेखही. आणि अशा भग्नहृदय मुलीला तुम्ही घरात रडत ठेवलेत ! का नाही तिचा पुनर्विवाह केलात? एका अक्षराने तरी तिला कधी विचारलेत? तुम्ही स्वत:चा पुन्हा विवाह केलात? तुम्हाला लाज नाही वाटली? तुम्ही थेरडे असून भोग भोगू इच्छिता आणि त्या बालविधवेला संन्यास देऊ पाहता? तिला तुम्ही छळलेत. तिला विषवल्ली म्हणत असा. झाडांसही पाणी घालू देत नसा. बाळाला हात लावू देत नसा. तिच्या हृदयाला घरे पाडलीत. तिच्या हृदयाची चाळण केलीत. ती रोज रडे. निराशेने डोके फोडू बघे. तुम्ही तिचे जन्मदाते. एका शब्दाने कधीतरी तिची विचारपूस केलीत का? दिवाळीत ती येथे एकटी. तुम्ही खुशाल सासुरवाडीत जाता, चैन करता. कोण तुम्ही? सैतान की राक्षस? पाषाणहृदयी पिता !”

“अशा तुमच्या मुलीला मी आशा दिली. तिला प्रेम दिले. तिला माझा आधार वाटला. तिच्या जीवनात आनंद आला. पोळून गेलेले तिचे हृदय, त्याला जरा शांती मिळाली. होय, आम्ही एकत्र रमलो. आम्ही एकमेकांची आहोत. विश्वव्यापी सत्याला स्मरून आम्ही एकमेकांची झालो, आणि जगातील कायद्याच्या दृष्टीनेही एकमेकांची होणार होतो. मी तिला फसवणार नव्हतो. क्षणभर फुलातील मध चाखून उडून जाणारा भुंगा मी नाही. आमचे प्रेम निष्ठावंत आहे. अभंग आहे. सांगा, सरला कोठे आहे. सांगा, कसाबाची करणी केलीत की काय ते सांगा. कोठे आहे सरला? कोठे आहे तिचे बाळ? बोला !”

“सरला जगातून गेली.”

“खरेच?”

“हो. ती तुमच्याइतकी बेशरम नव्हती. तिने चिठ्ठी लिहून ठेवली की मी जगातून जाते. जीव देते. पापी माणसाने कशाला जगावे? विषवल्लीने कशाला जगावे? असे तिच्या चिठ्ठीत होते. परंतु तिचे असले पाप होते हे नव्हते मला माहीत. तिला मी विषवल्ली म्हणत असे. तिच्या पाठची मुले वाचली नाहीत. शेवटी तिची आई मेली. तिचे लग्न केले तर लगेच पती मेला. मी पुन्हा लग्न केले. नवीन बाळ झाला तो मेला. माझी खात्री झाली की सरला विषवल्ली आहे. जाईल तेथे मरण नेईल.”
“परंतु तुम्ही जिवंत आहात. तुमच्या नवीन पत्नी जिवंत आहेत. ही सृष्टी जिवंत आहे. सरलेचे पाप सर्वांना मारीत असेल, तर तुमची पुण्याई का नाही आड घातलीत? तुम्हीही पापशिरोमणी दिसता ! अरेरे ! एकूण माझी सरला गेली तर? खरेच का तिने चिठ्ठी लिहून ठेवली?”

“खोटे कशाला सांगू ! आणि आता तुम्हीही मराल. सरला विषवल्ली होती हे तुमच्याही अनुभवास येईल. तुम्हाला आता जगवणार नाही. मरा. जा अशी काळी तोंडे लौकर मातीत मिसळतील तेवढे चांगले. तुम्हाला धर्म नाही, मर्यादा नाही, संयम नाही, विवेक नाही. हिंदुस्थानात पाप वाढत आहे, म्हणून ही गुलामगिरी जात नाही.”

“गुलामगिरी तुमच्या या दुष्ट धर्मामुळे आली. रूढींचा मुर्दाड धर्म. तुमचा सारा धर्मच गुलामगिरी पोसणारा झाला आहे. धर्माचा आत्मा कधीच मेला. पुरूषांची स्त्रियांवर गुलामगिरी, स्पृश्यांची अस्पृश्यांवर गुलामगिरी, श्रीमंतांची गरिबावर गुलामगिरी ! अशी ही विराट गुलामगिरी मला सर्वत्र दिसत आहे. या तुमच्या गुलामगिरीमुळे गरीब हिंदू मुसलमान होतात. या तुमच्या गुलामगिरीमुळे परकियांची सत्ता येथे राहते. या गुलामगिरीमुळे आपसांत मतभेद माजतात व पारतंत्र्य कायम राहते. धर्म ! कोठे आहे धर्म? माणुसकीला ओळखणारा, भावनांना ओळखणारा, दुसर्‍याच्या हृदयाची जाणीव ठेवणारा, अश्रूंची कदर करणारा, दु:खितांस सुखवू पाहणारा असा धर्म कोठे आहे? तुमच्या रूढ धर्मासच आज विवेक नाही. तुमच्याजवळ धर्म असता, तर अशा निष्पाप बालविधवांना तुम्ही रडत ठेवले नसतेत. त्यांची हृदये ओळखली असतीत. असला हृदयहीन धर्म नष्ट होईल, तेव्हा समाज स्वतंत्र होईल. सुखी होईल. यासाठी शतमुखी क्रांती हवी. तिच्याशिवाय तरणोपाय नाही.”

“येथून चालते व्हा. दुसर्‍यांच्या मुली अशाच भ्रष्ट करा. पापाचा धर्म करा.”

“तुमचे डोळे एक दिवस उघडतील. तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीला रडवलेत. तिला विषवल्ली म्हटलेत. तिला दूर लोटलेत. परंतु तुम्हांला पश्चात्ताप होईल. “सरले, सरले, मी चुकलो” असे म्हणत मराल. समजले? जातो मी. सरला नसेल तर माझाही संसार सरला ! मला इतिकर्तव्य राहिले नाही. ठीक, प्रणाम.” असे म्हणून उदय बाहेर पडला. त्याला घेरी येईल असे वाटले. तो जिन्यात जरा बसला. परंतु पुन्हा तो उठला. हळूहळू तो निघाला तो त्या कालव्यांकडे वळला. ती प्रेमधामे तो पाहायला निघाला. ते बाभळीचे झाड तेथे होते. आजूबाजूस हिरवी सृष्टी होती. गवतावर मुंगळे होते. त्याला सरलेच्या पदरावरचा मुंगळा आठवला. तो दगड तेथे होता. त्याच्या मनात एकदम काय आले कोणास कळे ! त्याने त्या दगडावर एकदम डोके आपटले. परंतु त्याच्याने पुन्हा आपटवेना. सरलेने डोके आपटले तेव्हा मी धावलो. आज सरला येते का धावून म्हणून त्याने सभोवती पाहिले. सरले, सरले अशा त्याने हाका मारल्या. खरेच का तिने जीव दिला असेल? हो, दिला असेल. कोठे जाणार, कोठे राहणार? कोण तिला आसरा देणार? अरेरे ! सरले, शेवटी असे व्हायचे होते तर तुझी-माझी गाठ तरी कशाला पडली? या सृष्टीत काही माणसांचे जन्म खरोखरच का केवळ दु:ख भोगण्यासाठी असतात? सरला किती सरळ मनाची, प्रेमळ हृदयाची ! कसे बोले, कशी हसे ! तुझ्या खाटेखालचा कचराही मला कस्तुरी आहे असे म्हणे. त्याला शत आठवणी आल्या. त्याने खिशातून तो रूमाल काढला. रात्रभर जागून त्यावरची ती वेल तिने गुंफली होती. त्याने त्या रूमालाने स्वत:चे अश्रू पुसले. जणू सरलेचे सुकुमार हातच अश्रू पुशीत आहेत असे त्याला वाटले. तो किती तरी वेळ तेथे बसला ! अंधार पडू लागला. शेवटी तो उठला. आणि विचार करीत करीत त्या खोलीवर आला.

“आलेत? झाले का काम?” त्या मुलाने विचारले.

“काम झाले. मी जातो सामान घेऊन.”

“कोठे मिळाली खोली?”

“मी परत जात आहे. पुणे सोडून जात आहे.”

“आलेत का? चाललेत का?”

“कामासाठी आलो; काम झाले; चाललो.”

“तुम्ही दु:खीकष्टी दिसता.”

“सुखासाठी दु:खाची किंमत द्यावी लागते.”

“तुम्ही निराश दिसता.”

“या जगात आशेने जगणारा क्वचितच कोणी असेल !”

“आशा नसती तर कोटयवधी माणसे कशी जगती? सारे जग आशेवर जगत आहे. आशा जगाचा प्राण आहे. उद्याची आशा ठेवून मनुष्य आजचे दु:ख सहन करतो. उद्याची आशा ठेवून आम्ही अभ्यास करतो. उद्याच्या आशेने व्यापारी व्यापार करतात. शेतकरी पेरतात. क्रांती करू पाहणारे क्रांती करतात. तुमच्या मनातही आशा असेल. प्राण्याच्या प्रत्येक श्वासोश्वासात आशेचे थोडे तरी मिश्रण असते.”

“मी तुम्हांला निराश नाही दिसत?”

“तुमच्या निराशेतही मला आशा दिसत आहे. तुम्ही का आहात निराश? सरला नाही का भेटली? पाखरू का दुसर्‍या कोठल्या वेलीवर बसले? दुसर्‍या कोठल्या श्रीमंती पिंजर्‍यात अडकले?”

“सरला एकाच वेलीवर खेळू पाहात होती. तिचे प्रेम मी किती वर्ण? मित्रा, सरला गेली ! हे जग सोडून गेली !”

“कोणी सांगितले?”

“तिच्या प्रत्यक्ष बापाने. तो का खोटे सांगेल?”

“मग आता तुम्ही काय करणार?”

“या जगाचा रामराम घेणार !”

“तुम्ही का मरणार?”

“हो.”

“हा वेडेपणा आहे. जगात एकच सत्यता नाही. अनेक सत्यता आहेत. तुमच्या सरलेचे तुमच्यावरील प्रेम ही त्यांतील एक सत्यता.”

“ती एक सत्यता नाही. तीच एकमात्र सत्यता. ती नष्ट झाल्यावर जगात काय राहिले? त्या प्रेमामुळे सार्‍या सृष्टीत राम वाटत होता. त्या प्रेमामुळे सारी सृष्टी अर्थमय वाटत होती. परंतु आज सारे नि:सार वाटत आहे ! शून्य वाटत आहे !”
“उदय, आजूबाजूचा समाज आहे. या समाजात तुम्ही जगलेत. समाजाचे ऋण नाही का? शेतकर्‍यांनी धान्य पिकविले. विणकरांनी वस्त्र विणले. अनेकांच्या उद्योगांमुळे आपण जगतो. आपले जीवन म्हणजे कोटयवधी लोकांच्या श्रमांचे फळ. आपले जीवन केवळ आपले नाही. ते समाजाचे आहे. एखादा दु:खी मनुष्य रस्त्यात भेटला तर तुम्ही त्याचे अश्रू पुसायला नाही जाणार? एखाद्याच्या पायात काटा बोचला तर तो काढायला नाही जाणार? माझी प्रिया मेली. आता जगाचे काय? असे का म्हणणार? प्रियेचे अश्रू पुसणे हे जसे कर्तव्य, तितकेच किंबहुना अधिक जगाचे अश्रू पुसणे हे आहे. आपल्या प्रेमाने शेवटी आपण मोठया दृष्टीचे झाले पाहिजे. लहान मूर्तीची भक्ती करून भक्त विश्वाचा उपासक बनतो. त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिविषयक प्रेमानेही आपणांस व्यक्तीच्या अतीत शेवटी नेले पाहिजे. व्यक्तिगत प्रेमाला विश्वप्रेमाची फुले लागली पाहिजेत. एका व्यक्तीवर प्रेम करून पुढे समाज, राष्ट्र, सारे जग यांवर प्रेम करायला आपण शिकले पाहिजे.”

“निराश होऊन मरू नका. तुमच्या सरलेच्या प्रेमाचा सुगंध हृदयात सदैव ठेवा आणि जगाची सेवा करा. सरला तुमच्या हृदयात नाही का? तिच्या प्रेमस्मृती नाहीत का? तो सुगंध अमर आहे. ती तुमची भावनांगी सरला, प्रेमस्वरूप सरला मरणातीत आहे. ती कोठे जाईल? ती सदैव तुमच्या हृदयात आहे. आणि हृदयात नसेल, तर बाहेर असून तरी काय उपयोग?”

“तुम्ही जगा, आज किती तरी सेवकांची जरूर आहे. तुमची सरला समजू या की मेली ! का मेली? समाजाला भिऊन मेली ! समाजातील अनुदारपणामुळे तिला मरावे लागले ! तुमच्या सरलेसारख्या शेकडो दु:खीकष्टी सरला असतील. त्यांचे जीवन उद्या सुखाचे व्हावे, त्यांनाही प्राण द्यावे लागू नयेत, म्हणून नको का खटपट करायला? या समाजात उदार धर्म आणायला हवा आहे. तो कोणी आणायचा? समाजात माणुसकी आणायला हवी आहे. ती कोणी आणायची? तुमच्यासारख्यांनी अदम्य धैर्याने दुष्ट रूढींची खांडोळी करायला उभे राहिले पाहिजे. तुम्ही दु:ख भोगलेत, अन्याय सहन केलेत. यामुळे तर हे दु:ख, हे अन्याय नष्ट करायला अधिकच चीड तुम्हांला आली पाहिजे. ज्याला अन्यायाची आच लागली नसेल तो कशाला उठेल? क्रांती ते करतात, जे स्वत: अन्यायाला बळी पडलेले असतात. उदय, निराश नका होऊ. तुमच्या हृदयवेलीवर सरला आहे. ती तुम्हांला ऊब देईल. प्रेरणा देईल. प्रेम अमर आहे. त्याचा ओलावा सदैव मिळत असतो. तुम्ही राग नका मानू. माझी तुमची ओळख नाही. परंतु ही वेल, ही पाखरे, ही नावे यांमुळे तुमची-माझी आधीच ओळख झाली होती. तुमचे नाव मला आवडते. उदय ! तुम्ही नव-धर्माचा उदय करा. नव-समाजरचनेचा उदय करा. हिंदुस्थानात प्रचंड क्रांती पेटणार आहे. सारी विषमता, सारे दास्य, त्यात खाक होणार आहे. सारी क्षुद्रता त्यात होमिली जाणार आहे. तुमच्या डोळयांना नाही दिसत ती क्रांती? केवळ परकी सत्तेचीच तिच्यात आहुती पडणार आहे असे नाही. सर्व प्रकारचा जुलूम भस्म होणार आहे. या क्रांतीचे पाईक बना, अवदूत बना. आम्ही तुम्हांला येऊन मिळू. नवजीवन सारे उठू. सर्वांगीण स्वातंत्र्याला निर्मू. उदय, किती कामे आहेत ! बहुजनसमाजात जायला हवे आहे. सेवेने त्यांच्यात शिरून त्यांचा आत्मा जागृत करायला हवा आहे. सूर्याचे प्रकाशमय किरण येतात व मुक्या कळया फुलतात. त्याप्रमाणे सेवेचे, प्रेमाचे, सहानुभूतीचे, नवज्ञानाचे किरण घेऊन आपण परित्यक्त बंधूंत जाऊ या. भिल्ल, कातकरी, गोंड, अनेक जातिजमाती रानावनांत पडलेल्या आहेत. कोण त्यांच्यात जातो, त्यांना उठवतो? ना वस्त्र, ना अन्न; ना ज्ञान ना मान. त्यांना माणसे करायला कोणी जायचं? त्यांच्यात आश्रम कोणी काढायचे? मिशनरी त्यांच्यात जातात; परंतु आपणांमधून हजारो मिशनरी का नाही निघत? हिंदी राष्ट्रात का सहानुभूती, बंधुभाव नाही? जो तो का स्वत:पुरते पाहणारा? माझी पत्नी, माझी प्रिया, माझे सुखदु:ख, यांपलीकडे का कशाचे अस्तित्व नाही? सत्य काय ते मी व माझी प्रिय वस्तू. बाकी का सारे मिथ्या? उदय, समाजातील अन्याय, अज्ञान, जुलूम, दु:ख, उपासमार, अनुदारता हे सारे पाहून रक्त सळसळले पाहिजे. नवी सृष्टी निर्माण करण्याच्या हिमतीने, प्रखर तीव्रतेने कंबर बांधून “दे घाव घे घाव” करीत लढले पाहिजे.”

“निराशा दूर फेका. आशेने उभे राहा. सरलेचे मनात दर्शन घेत जा. क्षणभर एकांतात बसा. सरलेचे प्रेमस्मरण करा आणि पुन्हा लढायला बाहेर पडा. मरू नका. कर्मवीर बना. फुकट मरायचा हक्क नाही. तुमच्या जीवनावर सर्व विश्वाचा हक्क आहे. ते फेकू नका. मी काय सांगू, किती सांगू? मला राहवत नाही.”

“तुम्ही प्रेम केले नाही म्हणून असे सांगता. प्रेमाच्या स्वर्गात कधी गेले होतेत? त्या प्रेमसमुद्रात कधी डुंबले होतेत?”

“उदय, मी त्या आगीतून गेलो आहे. एका मुलीवर माझे प्रेम होते. तिचेही माझ्यावर होते. परंतु आईबापांनी तिचे दुसरीकडे लग्न केले. ती गाय तिकडे गेली. ती तिकडे दु:खी असेल. हळूहळू नवसंसारात ती दु:ख विसरेल. तिला मुलेबाळे होतील. तेथे तिचे आतडे गुंतेल. परंतु एखादे वेळेस तिला माझी आठवण येईल. हृदयाच्या एका भागात कधीच न सुकणारे ते प्रेमपुष्प तिला दिसेल. तिला तो दूरचा सुगंध येईल. पुन्हा ती कामात गुंतेल. उदय, माझ्याही जीवनात ते प्रेम आहे. कदाचित मी दुसर्‍या एखाद्या मुलीशी लग्न करीन. परंतु ती प्रेमस्मृती का जाईल? त्या प्रेमस्मृतीचा सुगंध माझ्या जीवनात राहील. ते प्रेम फुकट नाही गेले.”

“खरे प्रेम काय जगात नाही? प्रेम म्हणजे मरण ! प्रेमाला प्रिय व्यक्तीशिवाय कसे जगवेल? सारे का बुडबुडे, केवळ शब्द?”

“उदय, ध्येय हे दूर असते. परंतु जीवनात विवेक हवा. कोणते प्रेम सत्य? एका व्यक्तीवरचे प्रेम ही का विश्वव्यापी सत्यता? त्या प्रेमाला अर्थ आहे. परंतु त्या प्रेमाने पागल होऊन वा निराश होऊन सार्‍या दुनियेला लाथ मारायला नये उठू. ते प्रेम तुम्हाला हळुवार करू दे. अधिक प्रेमळ करू दे. ते प्रेम तुम्हाला सहानुभूती शिकवू दे आणि शेवटी जगासाठी मरायला शिकवू दे.”

“मित्रा, मी जातो.”

“कोठे जातोस? मरणाकडे की जीवनाकडे? एका व्यक्तीच्या विचारात गुंग होणार की विराट जनतेचे दु:ख दूर करण्यासाठी स्वत:चे जीवन देणार? कोठे जातोस?

“ते मी काय सांगू?”

“मग कोण सांगणार?”

“अदृश्य सरला माझी पावले वळवील. ती नेईल तिकडे मी जाईन. जातो. प्रणाम.”

“क्षमा करा. मला प्रवचन देण्याचा काय अधिकार?”

“तुमची तळमळ पाहून मी चकित झालो.”

“परंतु जगा. या विश्वाच्या वेलीवर हसा. विश्वाचा अनंत वेल पाहा.” उदय निघाला. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले.
“तुमचे नाव काय?”
“माझे नाव मधू.”

“गोड नाव.”

“तुमच्या जीवनात ते आशेची गोडी आणणार असेल, तर ते गोड आहे.”

“आपण पुन्हा कधी भेटू?”

“तुम्ही जगलेत तर भेटू. प्राणत्याग केलात तर कसे भेटू? तुम्ही कोठे जाणार? तुमचा पत्ता काय?”

“मला घर ना दार. आज कोठला देऊ पत्ता?”

“माझा पत्ता हवा का?”

“आता मला काही नको. मनाने मरणाचा जप करीत असताना नवीन गुंते कशाला?”

“संतांच्या डोळयांसमोर सदैव मरणाची स्मृती असते. परंतु म्हणूनच ते अधिक संग्राहक असतात. नित्य नवे संबंध जोडीत असतात. प्रेम देत असतात. मरणाच्या स्मरणाने अधिक जगता आले पाहिजे.”

“परंतु माझे मरणाचे स्मरण मरण्यासाठी आहे.”

“तुम्ही मरणार नाही. मरणाचा जप करणारा मरत नसतो. आत्महत्या म्हणजे एक स्फूर्ती आहे. एक जोराची लहर आहे. विचार करून कोणी आत्महत्या करीत नसतो.”

“बरे. जातो.”

“उदयचा कर्मक्षेत्रात उदय होवो.”

उदय गेला. सामान घेऊन गेला. कोठे गेला? त्याने का जीव दिला? का त्यालाही वाटत होते की, सरला भेटेल? सरलेच्या हृदयात कोणी बोले, “रडू नको. धीर धर. तुझा उदय भेटेल.” उदयच्यही हृदयात कोणी बोलत होते का? त्याला कोणी धीर देत होते का? आशेची पाखरे त्याच्याही कोमल हृदयवेलीवर गात होती का? खेळत होती का?

उदय गेला. मधूही बाहेर फिरायला गेला. हा तरुण का खरेच जीव देईल? का स्वत:ची भावनाशक्ती तो समाजसेवेत ओतील, क्रांतीत ओतील? अशा विचारात मधू किती तरी दूर गेला. उदय जीव देणार नाही या आशेने तो खोलीत परत आला. उदय, नाही ना देणार जीव?

***