Ramacha shela..- 7 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 7

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

७. कुंटणखाना

सरले, कोठे ग आता जाणार?

ती पुन्हा स्टेशनवर आली. मुंबईकडच्या गाडीत बसली. शून्य मनाने जात होती. मुंबईच्या समुद्रात जीव द्यावा असेही तिच्या मनात येई, नलूकडे जावे व तिला सारे सांगावे असेही तिला वाटे. परंतु उदयने खरोखरच जीव दिला असेल तर? मी का जगू? नको का जगायला? बाळासाठी नको का जगू? बाळाला मी आणीन, वाढवीन. परंतु बाळाला जग वाढवील. उदय माझी वरती वाट बघत असेल, काय करू मी?

या विचारात ती कल्याण स्टेशनवर उतरली, मुंबईस तरी कोण होते? एक समुद्र होता. नक्की निश्चय करण्यासाठी ती तेथे उतरली. एका बाकावर ती बसली होती. ते पाहा, एक पोक्त गृहस्थ तिच्याकडे पाहात आहेत. अंगात कोट आहे, डोक्याला जरीचा रूमाल आहे, अंगावर उपरणे आहे. कपाळाला केशरी गंध आहे. स्वच्छ धोतर नेसलेला असा हा कोण गृहस्थ? पायात पुणेरी जोडा, तोंडात विडा. कोण गृहस्थ?

तो सरलेच्या बाकावर येऊन बसला.

“तुम्ही दु:खी दिसता.” त्याने विचारले. सरलेने त्याच्याकडे पाहिले. ती काही बोलली नाही.

“तुमचे दु:ख सांगण्यासारखे असेल तर सांगा. नाशिकला आमची एक संस्था आहे, नारीसाहाय्यक संघ. स्त्रियांना अनेक दु:खे असतात आणि अनाथ दु:खी स्त्रियांना मुसलमान पळवतात. नाना प्रकार. तुम्ही एकटया दिसता. तुम्ही का अनाथ आहात? पतीने का त्याग केला? आईबापांनी का हाकलले? तुम्हाला नाशिकची आमची संस्था साहाय्य करील. त्या संस्थेशी माझा संबंध आहे. संस्था राहायला आधार देते. तेथे शिकण्याची सोय होते. नर्सिंगचा कोर्स घ्यावा, दुसरे काही शिकावे. आणि पुढे कोठे नोकरीही मिळवून देण्याची संस्था खटपट करते. तुम्ही शिकलेल्या असाल.”

“मॅट्रिकपर्यंत शिकल्ये आहे.”

“वा: ! तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. अहो, मुलीच्या शाळेत लावून देऊ. तुम्ही कोठल्या?”

“मी खरीच एक अभागिनी आहे. तुम्ही माझे धर्मपिते व्हा. मुलीची कीव करा. मला नोकरी लावून दिलीत तर अत्यंत ऋणी होईन. आधी डोके ठेवायला कोठे आधार द्या.”



“चला माझ्याबरोबर. मी नाशिकला जात आहे. गाडी येईलच. नऊ-दहाला नाशिक. उद्या लावतो तुमची व्यवस्था. तुमचे काय नाव?”

“चला माझ्याबरोबर. मी नाशिकला जात आहे. गाडी येईलच. नऊ-दहाला नाशिक. उद्या लावतो तुमची व्यवस्था. तुमचे काय नाव?”

“सरला.”

“सारे नाव?”

सरला बोलेना. तिला वाईट वाटत होते. दु:ख होत होते.

“बरे राहू द्या. घाई नाही. निश्चिंत असा. सारे चांगले होईल.”

भुसावळकडे जाणारी गाडी आली.

“मी बायकांच्या डब्यात बसते.” सरला म्हणाली.

“काही हरकत नाही. नाशिकला मी हाक मारतो. काळजी नका करू. सारे चांगले होईल. संस्था मोठी चांगली. मोठमोठे लोक तीत आहेत. जा. बसा.”

सरला गेली. बायकांच्या डब्यात ती बसली. गाडी निघाली. मागे नली व ती दोघी होत्या. आज ती एकटीच होती. तिला स्वत:च्या नशिबाचे आश्चर्य वाटत होते. ती मनात विचार करीत होती. “फुटके नशीब ! खरेच मी विषवल्ली आहे. अभागिनी आहे ! उदय, कोठे रे तू आहेस? तू माझ्यासाठी धावून आलास. सरलेचे काय झाले असेल असे मनात आणून अशक्त होतास तरी धावून आलास. बाबांनी तुला वाग्बाण मारले असतील. तू घायाळ झाला असशील. तू का खरेच गेलास जग सोडून? मग माझे रे प्राण का जात नाहीत? ते अद्याप या जगात का घुटमळत आहेत? तू कोठे तरी खात्रीने जिवंत आहेस, या जगात आहेस. तसे नसते तर मला जगावे असे वाटते ना. तुझ्या प्रेमाने केव्हाच माझे प्राण वर खेचून घेतले असते. तू पृथ्वीवर आहेस. परंतु कोठे आहेस? का मी जीव दिला असे समजून निराशेने वेडा होऊन तू कोठे भ्रमत असशील? सरले, सरले म्हणून टाहो फोडीस असशील?”

नलीबरोबर जात असता आगगाडीतून उडी टाकावी असे तिला वाटे. आजही वाटत होते. परंतु दाराजवळ जाऊन ती परत येई. मरण्याचे धैर्य तिला होईना. ती दीनवाणी तेथे बसली होती. केव्हा एकदा नाशिक येते असे तिला झाले होते. मध्येच तो फोटो काढी व प्रेमस्नेहाने त्याच्याकडे बघे. तिने आपली वळकटी सोडली. त्या अमर उशीवर डोके ठेवून चादर अंगावर घेऊन ती पडली. हृदयाशी तो फोटो होता. तिला झोप नव्हती लागली. कशी लागेल झोप? जीवन-मरणाच्या विचारात ती होती.

एकदाचे नाशिक आले. येथेच उदयचे बाळपण गेले. येथीलच गंगेत बुडताना तो वाचला. येथेच लहानाचा तो मोठा झाला. या नाशिक शहरातच तर तो नसेल ना आला? गंगेच्या डोहात जीव द्यायला नसेल ना आला? या शहरात त्याची-माझी भेट नसेल ना व्हायची? सरला निराशेतही आशेला जन्म देत होती.

“उतरा सरलाताई”, तो गृहस्थ येऊन म्हणाला. सरला उतरली. त्या सज्जनाच्या पाठोपाठ ती निघाली. दोघे बाहेर आली. तेथे टॅक्सी तयार होती.

“बसा आत. आपलीच आहे गाडी.” तो म्हणाला. दोघे आत बसली. मोटार निघाली. रात्रीचे दहा वाजले असतील. मोटारीत कोणी बोलत नव्हते.

मी त्या संस्थेत तुम्हांला सोडीन. मग सकाळी भेटायला येईन. रात्रभर विश्रांती घ्या. तुमचे दु:ख विसरा. ही संस्था तुमची चिंता दूर करील. तुम्हाला उद्योग देईल. आपल्या पायांवर तुम्ही उभ्या राहाल. स्वावलंबनाने तुम्हांला राहता येईल. येथे निरनिराळे शिक्षणही मोफत मिळते. तुम्ही सारे पाहालच आता.”

सरला ऐकत होती. थोडया वेळाने तिने विचारले,

“ही संस्था का नवीन आहे?”

“तशी नवीन नाही. जुनीच आहे. परंतु तिची जाहिरात फारशी नाही. संस्थेचे वाढदिवस, अहवाल असला प्रकार नाही. संस्थाचालकांना उदोउदो आवडत नाही. सेवा करावी, मुकेपणाने काम करावे, अनाथ स्त्रियांना आधार द्यावा, दु:खी भगिनींना सुखी करावे. वर्तमानपत्रातून या संस्थेची स्तोत्रे आली नसली तरी देवाघरी संस्था रूजू आहे. प्रभू रामचंद्राची ही नगरी. येथे पंचवटीत ते राहिले. अशा या नाशिक क्षेत्रातील ही संस्था आहे. पुण्यवान संस्था.”

मोटार शहरात शिरली. वळणे घेत घेत एका मोठया वाडयाजवळ ती थांबली. एक नोकर बाहेर आला.

“काही सामान?” त्याने विचारले.

“हे यांचे सामान. यांना नीट आत ने. चांगली व्यवस्था करा. मी सकाळी येईनच. उतरा सरलाताई. तुम्ही निश्चिंत राहा. जा.” तो सज्जन म्हणाला.

सरला उतरली. ती वाडयात शिरली. वाडयाचे दार लागले. मोटार पों पों करीत निघून गेली.

“चला जिना चढून.” तो नोकर म्हणाला. एक जिना चढून झाला. आणखीही एक जिना होता. तोही चढून झाला. आणि गॅलरीतून आत जाता जाता एक खोली आली. खोलीत एक पलंग होता. त्यावर गादी-उशी सारे होते. तांब्या-भांडे होते.

“बसा येथे.” नोकर म्हणाला.

सरला त्या खोलीत गेली. ते सामान तेथेच होते. नोकर निघून गेला. खोलीत विजेचा दिवा होता. खोलीला गुलाबी रंग होता. सरला खाली वळकटीवरच बसली.

थोडा वेळ गेला आणि एक गलेलठ्ठ बाई आली.

“वा: ! आजचे पाखरू नाजुक आहे. छान झाले काम. किती दिवस एखादे खुबसूरत सुंदर सावज मिळावे म्हणून धडपड होती. आता आश्रमाचे नशीब फुलणार. पैशाला आता तोटा नाही. काय नाव तुमचे?”

“सरला.”

“चांगले नाही नाव. दुसरे ठेवले पाहिजे. तुमचे नाव हिरी ठेवले तर? का चंपा? का रत्नी? कोणते आवडेल बोला. रात्रभर विचार करा.”

“हा आश्रम ना?”

“होय.”

“काय नाव याचे?”

“सेवा आश्रम. जो येईल त्याची मनापासून सेवा करायची. ताबडतोब फळ. सेवेने तात्काळ स्वर्ग. समजलीस? तू या आश्रमाचे भूषण होशील. मग बघशील मौज. खायला गोड मेवा. रात्री गोड सेवा. संत्री, मोसंबी, पेरू, डाळिंबे, अंजीर, द्राक्षे वाटेल ती फळे. फळे अधिक खाल्ली म्हणजे अंगकांती सुंदर राहते. पोपट फळे खातो. म्हणून कसे त्याचे सुंदर, तजेलदार पंख असतात ! कशी लाल चोच ! येथे तुला फळे देऊ. केशरी दूध. समजलीस ना ! नेसायला शालू. गळयात मोत्यांचे हार. उद्या बघ आता. राजाची राणी होशील. मोठमोठे लक्षाधीश आता येतील. हां हां म्हणता बातमी मुंबईकडे जाईल. भुंगे येतील. गूं गूं करतील. पायाशी धनदौलत ओततील. आश्रमाचे तू भाग्य आहेस. आश्रमाला उतरती कळा लागत होती. मोठमोठे लोक येतनासे झाले होते. त्यांना नाजूकसाजूक हवे काम. त्यांना ओबडधोबड नाही आवडत. आता ते येतील. मिटक्या मारीत येतील.”

“मी कोठे आहे?”

“आश्रमात.”

“अरे देवा, मी कोठे आहे?”

“देवाने सुखाच्या स्वर्गात तुम्हांला आणले आहे. स्वर्गात काय असते? अप्सरा; अमृत; नाच-गान; खरे ना? येथेही अप्सरा व गंधर्व असतात. येथेही अमृत पितात. सुखाला तोटा नाही.

“अरेरे ! मी कोठे आल्ये? फसवले रे मला दुष्टाने !”

“तू दु:खात फसली होतीस. येथे आता सुखात रमून जा. दोन दिवस वाईट वाटते, परंतु मग केवळ आनंद असतो. रोज नवीन आनंद. नवीन भेटी. एकाच्याच भेटीचा वीट येतो. येथे रोज नवीन मौज. तू बघशील आता. तुझे तोंड फुलेल. कानांत हिर्‍याची कुडी घाल. नाकात चमकी घाल. गळयात मोत्यांचे हार घाल. चटकचांदणी हो. समजलीस?”

“हाय रे देवा ! देवा, माझे प्राण ने रे !”

“प्राण जाणार नाहीत, येथे निमुटपणे सारे ऐकावे लागते. येथली शिस्त कडक आहे. हट्ट नाही करता कामा. हसले पाहिजे. थोडे गाणे शिकले पाहिजे. थोडे नाचणे शिकले पाहिजे. हावभाव शिकले पाहिजेत. समजले ना? उद्यापासून तुमची शाळा सुरू होईल. मी सांगून ठेवते की, मुकाटयान ऐकत जा. म्हणजे मग सुखाला तोटा नाही. परंतु हट्ट कराल तर मात्र बरे नाही. येथे दोन दिवस लाड होतात. परंतु मागून वेत बसतात. शेवटी रेशमाप्रमाणे मऊ व्हावे लागते. रात्रभर विचार करा. अंगावर फुलांचे हार हवे आहेत. की वेताच्या छडीचा मार हवा आहे? अंगाला सुगंधी चंदन, अत्तरे हवीत, की अंगातून रक्ताची धार सुटायला हवी? विचार करा. पलंगावर सुखाने लोळायला हवे, की उलटे टांगून घ्यायला हवे? एक मुलगी मागे होती; ऐकेना. तिच्या शरीराची कमान करून तिला आडवे टांगले. उलटी करून एका बाजूला केस बांधले व एका बाजूला तंगडया. पाठीवर मोठा दगड ठेवला. शेवटी ती शरण आली. आणि मग सुखात रमली. तुम्ही उगीच आगीतून जाऊ नका. असे सुंदर शरीर देवाने तुम्हांला दिले आहे. सुरेख फूल सर्वांनी हाती धरावे. त्यातच त्या फुलाचे सार्थक. खरे ना? तुमचे सौंदर्य वाढवा. तुमची आजपर्यंत उपेक्षा झालेली दिसते. येथे उपेक्षा होणार नाही. मात्र हट्ट नका करू. कोणी शेटजी आले; हसावे, त्यांना विडा द्यावा. की लगेच हिर्‍याची अंगठी तो बोटात घालील. थोडया वेळाने सोन्याचा हार गळयात घालील. तुम्ही पाहाल. आता झोपा जरा. थकल्या आहात. हा पलंग आहे. गादी आहे. लेप पांघरायला आहे. विचार करा. हे येथे पाणी आहे. रमण, यांना नळ वगैरे सारे दाखवून ठेव. मी जाते.”

असे म्हणून ती बदफैली बाई गेली.

सरला तेथे बसून होती. तिला तेथला प्रकाश सहन होईना. तिने दिवा बंद केला. ती रडत बसली. काय करावे तिला समजेना. तिने मागे दगडावर डोके आपटले होते. परंतु आज डोके फोडायला तेथे चांगलासा दगडही नव्हता ! का ती इतकी दुर्बल व हताश झाली होती, की डोके आपटावयाचीही तिला शक्ती नव्हती? ती असाहाय्य होती ! सारे जीवन तिच्या डोळयांसमोर येत होते. खरेच का मी दुर्दैवी आहे, असे तिच्या मनात येईल.

येथे आपली काय स्थिती होणार? तिच्या अंगावर शहारे आले. येथे का खरेच मारहाण करतील? जुलूम करतील? येथे का मी वारांगना होणार? एक भोग्य वस्तू होणार? या शरीराचा का हे लोक विक्रा मांडणार? उदय, काय रे तू म्हणशील? तू का खरेच जीव दिलास? तू परलोकात का माझी वाट पाहात असशील? मी तुझ्या पाठोपाठ आल्ये नाही त्याचे का हे बक्षीस? म्हणून का पृथ्वीवरचा हा नरकवास? कसे ती बाई बोले? यांना असे बोलवते तरी कसे? काहीच का यांना वाटत नाही? यांची सारी माणुसकी, सदभिरूची का मेलेली असते? खावे, प्यावे, मजा करावी, एवढेच का यांचे जीवन? परंतु हा का आनंद आहे? जेथे आपले मन असते, आपला जीव असतो, तेथेच आपण खरा आनंद अनुभवू शकतो.

काय हे जीवन ! आणि येथे खरेच मोठमोठे लोक येत असतील. लक्षाधीश येत असतील. प्रतिष्ठित येत असतील. माझ्यासारख्या अभागिनी येथे फसवून आणल्या गेल्या असतील. आणि शेवटी येथील जीवनात पडल्या असतील ! हे किडयाचे जीवन त्यांच्या अंगवळणी पडले असेल ! आणि अशा अनाथ स्त्रियांना फसवून त्यांच्या शरीराचा, अब्रूचा, नीतीचा विक्रा करून काहींनी इस्टेटी कराव्या, बंगले बांधावे ! हर हर ! मानवाचा केवढा हा अध:पात !

ती रडून दमली. या संकटातून कसे मोकळे होता येईल याचा ती विचार करीत होती. परंतु तिला काहीही उपाय दिसेना. तिने देवाचा धावा मांडला. रामा, ये रे, मला वाचवायला. नाशिकचे तू दैवत. माझा उदय तुझ्या या नाशिकमध्ये वाढला. गोदावरीत डुंबला. त्या उदयची मी. माझी अब्रू वाचव. देवा, येऊ दे रे करूणा. माझे अपराध क्षमा कर. उदयला त्याच्या आईकडे मी जाऊ दिले नाही. तिकडे त्याची प्रेमळ माता मरणशय्येवर होती, तरी मी उदयला जाऊ दिले नाही. माता त्याचा जप करीत होती, त्याला हाका मारीत होती. परंतु मी उदयला माझ्या मोहपाशात अडकवून ठेवले. त्याचे का प्रायश्चित? त्या अक्षम्य अपराधाची का ही शिक्षा? ती माता उदय उदय करीत मेली असेल. कोणा चांडाळणीने उदयला मोह पाडला, तिचा सत्यानाश होवो असे तिने शाप दिले असतील ! ते शाप का हे मला भोवत आहेत? परंतु उदय असा मोहग्रस्त असेल असे त्या मातेला वाटलेही नसेल. तिने शापवाणी न उच्चारता, उदय सुखी असो, असेच म्हटले असेल. कोणाच्या संगतीत रमला असला तर तेथेही सुखी असो, असेच तिने म्हटले असेल.

उदय, काय रे हे मी केले? आपण वेळेवर आलो नाही, सरलेशी रमलो, म्हणून आईला शेवटी भेटलो नाही असा धक्का बसून तू धाडकन पडलास. तुझी स्मृती गेली आणि हे असे सारे पसारे झाले ! तू वेळेवर जातास तर हे झाले नसते. आई देवाकडे गेली असती. परंतु तू दु:ख गिळून माझ्याकडे येतास. आपण विवाहबध्द होऊन नीट राहिलो असतो. परंतु आता काय? तुझी आई गेली आणि तूही का गेलास? तू या जगात नसतास तर मला का राहवले असते? तू या जगात कोठेतरी आहेस. सरलेला शोधीत असशील. तू प्राणत्याग करतास तर माझेही प्राण गळून पडते. मला जगावेसे वाटते. डोके आपटून वा फास लावून मरावे असे वाटत नाही. यावरून तू आहेस असे वाटते. उदय, तुझी सरला या नरकात येऊन पडली आहे असे ऐकून तुला काय रे वाटेल? आपण कदाचित परत भेटलो तर तू घेशील का मला जवळ? मातीत पडलेले फूल आपण हळू हाताने उचलून घेतो. चिखलातले कमळ घेतो. परंतु चिखलातले कमळ स्वत:ला घाण लागू देत नाही ! ते अलिप्त असते. मीही का अलिप्त नाही? येथे का कशात माझे मन रमत आहे?

देवा, काय रे करू? तू भक्तांसाठी धावतोस. अनाथांचा तू नाथ. परंतु माझी कोठे आहे एवढी भक्ती? माझ्याजवळ काही नाही. परंतु अगतिक होऊन तुला मारलेली एक हाक, ती तुला पुरी होते असे म्हणतोस. मला सोडव रे. ये कोणाचे रूप घेऊन.

सरलेच्या मनातील दु:ख कसे सांगावे, कसे वर्णावे? ती रात्र संपूच नये असे तिला वाटत होते. सभोवतीचा तो अंधार अनंत असावा असे तिला वाटत होते. परंतु पलीकडे गाणे-बजावणे चालले होते. थट्टाविनोद कानी येत होते. नरक जवळ होता. ती थरथरत होती. कोणी येईल या भीतीने ती घाबरत होती.

ती तेथेच भिंतीजवळ पडली. फरशीवरच निजली. त्या दु:खातही जरा तिचा डोळा लागला. खरोखरच निद्रा म्हणजे अति थोर वस्तू आहे. निद्रा म्हणजे प्रेमाची माता आहे. त्रस्त जिवाला ती हळूच जवळ घेते. नकळत येऊन त्याचे डोळे मिटते. त्याच्या मनाला विसावा देते. निद्रा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आहे. जगात निद्रा आहे म्हणून शांती आहे, समाधान आहे, थोडी विश्रांती आहे. थोडे हायसे वाटते. निद्रा नसती तर हे जग भेसूर वाटले असते. जीवन असह्य झाले असते. दु:ख, क्लेश मानसिक यातना, अपमान- सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे निद्रा. निद्रा म्हणजे सुधासिंचन, निद्रा म्हणजे आरोग्यदायिनी देवता. निद्रा म्हणजे प्रभूचे परम कारूणिक स्वरूप. निद्रा म्हणजे सर्व धडपडींचे, ओढाताणीचे, यातनांचे तात्पुरते तरी मरण.

सरले, क्षणभर तरी तुझी ओढाताण थांबू दे. तुझ्या जिवाला थोडा विसावा मिळू दे. सकाळी उठलीस म्हणजे तुला धीर येईल. संकट आले आहे खरे; त्यातूनही पार पड. तुझी श्रध्दा तुला पार नेईल. अदृश्य शक्ती तुला वाचवतील. या जगात आश्चर्ये होत असतात. आश्चर्यांचे युग संपले असे नाही. आश्चर्ये रोज घडत आहेत. जो पाहील त्याला दिसत आहेत.

सकाळ झाली. सरला तेथे उठून बसली होती. तिचे मुखकमल अति म्लान झाले होते. गळून गेलेल्या वेलीप्रमाणे दिसत होती. शेवटी ती उठली. तोंड वगैरे धुऊन ती आली. ती देवाचे नाव घेत बसली. थोडया वेळाने ती उठली. ती स्नान करून आली. आणि डोळे मिटून खरेच तिने जप आरंभला. तिने त्या नरकाचे तपोवन केले.

आठ वाजून गेले होते. ती दुष्ट बाई तिच्याकडे आली. सरला डोळे मिटून बसली होती. तिच्या डोळयांतून अश्रू घळघळत होते. ती दुष्ट बाई बघत होती.

“दिवसा देवाचा जप कर. रात्री मौज-गंमत कर. म्हणजे पाप लागणार नाही. स्वर्गातील अप्सरांना कधी पाप लागत नसते. उघडा की डोळे ! का दिवसा मिटून रात्री उघडणार? परत दिवसाही रस्त्यावरच्या खिडकीतून बिजलीचे दर्शन घ्यावे लागते. अहो सरलाताई ! काय म्हणू तुम्हांला? रत्नी म्हणू की माणकी म्हणू? का गुलाबकळी म्हणू?”

सरलेने डोळे उघडले.

“तुम्ही नका मला छळू. माझी कीव करा. मला जाऊ दे. का आगीत घालता? मला विष द्या. तेही मला गोड आहे.”

“देवाने दिलेले शरीर त्याची इच्छा असेल तेव्हा तो नेईल. त्याच्या इच्छेशिवाय आपण जगू शकत नाही. काही करू शकत नाही. देवाची इच्छा म्हणून तर तुम्ही येथे येऊन पडल्यात. आता येथे सुखाने राहा, उगीच का रडत बसावे? सुखाचा जीव दु:खात का घालावा? दोन दिवस कसे तरी वाटते. पुढे होते सवय. रात्र केव्हा येते असे मग वाटू लागते. येथे कशाला तोटा नाही. फुले, अत्तरे, गजरे, शालू-शेले, दागदागिने, फळे, मेवे, काय कमी आहे? वेडेपणा सोडा. शहाण्या व्हा. आली परिस्थिती गोड करा, समजले ना?”

इतक्यात कोण तेथे आला तो? त्याचे तोंड पाहा ! विडा चघळीत आहे. मुखरस जरा गळत आहे. डोळे बघा कसे मिचकावीत आहे. कोण हा? हा नाही दिसत व्यापारी, नाही दिसत सावकार. कोण आहे हा? याला का उद्योग नाही? का याचा उद्योग संपला आहे? कपाळी भस्म आहे. भस्मावर गंध आहे? कोणी भटजी आहे की काय? तो मुखाने का नामस्मरण करीत आहे. काय म्हणत आहे? वेदमंत्र की अभंग? छे: ! प्रेमाचे पागल गाणे तो म्हणत आहे. खरेच का तो पागल आहे?

“या रामभटजी.”

“नवीन आल्या या वाटते?”

“हो. यांचे नाव सरलाबाई !”

“अगदीच साधे नाव. यांचे नाव सुंदराबाई ठेवा.”

“चांगले सुचविलेत. खरेच किती सुंदर आहे यांचा बांधा.”

“पाहात राहावेसे वाटते. मी रामाची रोज पूजा करतो. परंतु रामापेक्षा या अशा कोमलांगीच सुंदर दिसतात. मी रामाच्या मूर्तीवर फुलांचे हार घालतो; परंतु ते हार अशा लावण्यमयींच्या गळयात किती खुलून दिसतील ! रामाची मूर्ती निर्जीव. पाषाणमयी मूर्ती. परंतु या सजीव सुंदर मूर्ती ! सलज्ज सुकुमार मूर्ती !”

“रामभटजी, आता मोठमोठी गि-हाईके आणा. मोठमोठे लक्षाधीश आणा. आता खूष होऊन जातील. तुमचे कमिशनही भरपूर मिळेल.”

“करतो आता सर्वत्र जाहिरात. परंतु मला केवळ पैशांचे कमिशन नको. नुसते पैसे का चाटायचे?”

“अहो, तुम्ही शेटसावकार आणल्यावर तुमचीही बूज होईल. कृतज्ञता जगात आहेच. सुंदराबाई काही तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. तुमच्यावरही त्या कृपा करतील. आणि तुम्ही रामाचे पुजारी ! असा पुण्यवान पुरूष त्यांना कधी मिळणार? तुमचे हात किती पवित्र ! तुमच्या हातांचा स्पर्श होणे म्हणजे महाभाग्य ! तुमच्या हातांचा स्पर्श ज्याला होईल तो का पापी राहील? सुंदराबाई, येथे पाप ही वस्तू नाही. हे रामाचे पुजारी आहेत. यांचे पवित्र पाय येथे लागत असतात. या आश्रमाला त्यांचे सदैव आशीर्वाद असतात. नाशिकची यात्रा करणार्‍या मोठमोठया श्रीमंतांना ते येथल्याही यात्रेसाठी घेऊन येत असतात. ते तुझी आता जाहिरात करतील. तुला काही कमी पडणार नाही.”

“जिला असे मस्त सौंदर्य आहे, तारूण्य आहे तिला काय कमी? खरे ना सुंदराबाई?”

“तुम्ही काय बोलत आहात? तुम्हांला लाज कशी नाही? व्हा चालते येथून. रामाचे तुम्ही पुजारी ना? आणि येथे अशा नरकात तुम्ही येता? गरीब स्त्रियांची विटंबना मांडता? व्हा चालते ! तोंड दाखवू नका !”

ती दोघे हसली.

“हळूहळू नरम व्हा ! तुमचे रागावलेले तोंड किती छान दिसते ! वाहवा, वा: !”

“पाप्या, चांडाळा !” सरला ताडकन उठून म्हणाली.

“दे प्रसाद. मार या गालावर. तुझा कोमल हात लागून हे गाल कृतार्थ होऊ देत. मारायचे का?”
सरलेने तोंड फिरविले. तिला संतापाने रडू आले. ती दोघे निघून गेली. दुपारी तिला पंचपक्वान्नांचे जेवण आले. फळफळावळ आली. मेवा-मिठाई आली. ती नुसते पाणीच पिऊन राहिली. ते सारे मेवे तिला विषासमान होते. तिसरे प्रहरी ती राक्षशीण पुन्हा आली.

“तू काही खाल्लेस की नाही?”

“मला विष आणून द्या.”

“आज सायंकाळी तू खिडकीत उभे राहिले पाहिजे.”

“मला येथे टांगा, फाशी द्या !”

“ते सारे योग्य वेळी करण्यात येईल.”

“तुम्ही माझ्यावर अत्याचार करणार असाल, जुलूम करणार असाल तर मी जीव देईन.”

“जीव द्यायचा असता तर तो पूर्वीच देतीस.”

“माझा अंत पाहू नका. डोके फोडून जीव देईन. केसांनी गळा आवळीन.”

“ते पाहू. किती दिवस खात नाहीस ते दिसेल. येथे लोळागोळा होऊन पडशील. मग समजेल.”
काय असेल ते असो. त्या दिवशी तिच्या वाटेस कोणी गेले नाही. ती देवाला आळवीत बसली.

दुसर्‍या दिवशी तिने थोडे खाल्ले. पळून जायचे झाले तर थोडी शक्ती नको का, असा तिने विचार केला. धैर्याने राहायचे तिने ठरविले. आणि तो पुजारी आला, लाळघोटया !

“काय सुंदरा ! आज खूष दिसतेस?”

“हळू हळू आले नशिबी भोगायला तयार असलेच पाहिजे.”

“तू निराश नको होऊस. फक्त लक्षाधिशाचे गिर्‍हाईकच तुझ्याकडे येईल अशी मी व्यवस्था करीन. प्रतिष्ठित, अब्रूदार माणसेच तुझे दर्शन घेतील. माकडे तुला मिठी मारायला येणार नाहीत. तुझ्यासारखे रत्न कोंबडयापुढे आम्ही टाकणार नाही. परंतु तू माझे ऐकत जा. मी तुझे हाल वाचवीन. तू माझे हाल वाचव. काल रात्रभर मी तळमळत होतो. माझी तळमळ व मळमळ तू दूर कर.”

“तुम्ही रामाचे पुजारी ना? तुम्ही असे कसे? मी व्रतस्थ स्त्री आहे. माझा पती हरवला आहे, का मला टाकून गेला आहे कोणास ठाऊक ! परंतु एक वर्ष तरी पुरे होऊ दे. एक वर्षभर तरी मला रडू दे. एक रामनवमी तरी जाऊ दे. भटजी, पती हरवून चार महिने झाले. आणखी आठ महिने जाऊ दे. आणखी आठ महिने मला अकलंकित ठेवा. मग माझे काय वाटेल ते करा. आता श्रावण महिना संपेल. भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र असे आठ महिने जाऊ देत. ऐका. मी काही पळून जात नाही. या आठ महिन्यांत प्राण गेले तर संपलेच सारे. सुटेन. प्राण नाहीच गेले तर या देहाचे काहीही करा. तुम्ही हे आठ महिने मला मुदत द्या. मग मी तुम्ही सांगाल ते करीन. तुमचे उपकार मी विसरणार नाही. हे आठ महिने माझ्यापासून सर्वांना दूर ठेवा. नंतर या देहावर तुमची सत्ता. तुमच्या पाया पडते.”

“सुंदरा, कोणी पाहिलेत आठ महिने? फुल आहे ते हुंगावे, जवळ घ्यावे, फूल केव्हा कोमेजेल त्याचा काय नेम? मरण केव्हा येईल त्याचा काय नेम?”

“माझे हे अश्रू पाहा. आठ महिने थांबा. मग मी कायमची तुमची आहे. परंतु आठ महिन्यांच्या आत जर कोणी मला भ्रष्टवील तर हा देह मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांजवळ हजार मार्ग असतात. मी नागीण होईन, वाघीण होईन. मला स्पर्श करणार्‍याच्या मानेचा घोट घेईन. त्याला ठार करीन. आणि स्वत:सही या दुनियेतून मी नष्ट करीन. नाही तर आठ महिने वाट पाहा.”

“हे नेमके आठ महिनेच कशाला?”

“पती हरवल्यावर वर्षभर तरी स्त्रीने वाट पाहावी. पती सोडून गेला असेल तरीही वर्षभर वाट पाहावी अशी श्रुतीची, धर्माची आज्ञा आहे. म्हणून सांगते की थोडे दिवस थांबा. ही हरिणी तुमच्या ताब्यात आहे. ती थोडीच पळून जाणार आहे?”

“हे मृगाक्षी, हे हरिणाक्षी, आठ महिन्यानंतर तू खरेच माझी होशील का? मला मग कधी नाही म्हणणार नाहीस ना? माझे हसतमुखाने स्वागत करशील ना?”

“होय.”

“पाहा. रामाची शपथ घे.”

“रामाची शपथ.”

“तुझा रामावर भरवसा आहे?”

“तुमचा नसला तरी माझा आहे.”

“माझा नसता तर मी रामाची पूजा केली नसती. हे माझे हात पवित्र आहेत. रामाच्या अंगाला उटी लावणारे हे हात तुच्या अंगाला केशरी उटी लावतील. किती दिवस वाट पाहू? आठ महिने हे कसे शक्य आहे?”

“तुम्ही करू शकाल. तुम्ही येथल्या मंडळींस सांगा. रामाच्या पुजार्‍याचे कोण ऐकणार नाही.”

“बरे, एकदा हस. गोडशी हस.”

सरलेने स्मित केले.

“किती गोड हास्य ! आठ महिने, आणि हे हसणारे ओठ माझे होतील. खरे ना?”

“रामाची इच्छा.”

तो पुजारी गेला. सरला रडत बसली.

“प्रभो, या कुंटणखान्यातून मला सोडव रे. तुझ्याशिवाय कोण आहे या मुलीला?” असे हात जोडून ती म्हणत होती.

***