Trushna ajunahi atrupt - 2 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २

" अरे जावईबापू कसं काय येणं केलत... ते ही सकाळी.." घाईने सोफ्यावरील पसारा आवरत तिच्या बाबांनी त्यांच्या जावयासाठी बसायला जागा केली. तो... तिचा नवरा... अनय... सहा महिन्यांआधी तीच आणि अनयच लग्न झालं होत. नेहमी येताना अनय आणि ती एकत्रच यायचे. आज मात्र इतक्या सकाळी आणि घाईने आपल्या जावयाचं एकटच येणं त्यांना अपेक्षित नव्हतं.

" बाबा.. बसा जरा बोलायचं होत.." त्याने बाबांचा हात पकडत त्यांना बळजबरी खाली बसवलं. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून बाबाही काळजीत पडले.

" काय झालं.. सगळ ठीक तर आहे ना.." बाबांनी काळजीने विचारलं. मात्र त्यातही त्यांना आपल्या स्वरातील व्याकुळता लपवता आली नाही.

" नाही... " अनय थोड्या शांतपणे उद्गारला.

" काय झालंय.. ती काही चुकीचं वागतेय का...?" बाबा एव्हाना घाबरून गेले होते. आधीच ते जरा घाबरट त्यात नेमकी आई कालच बाहेर गेली होती त्यामुळे बाबांना आधार म्हणून कोणीच नव्हतं आता घरात.

" चुकीचं नाही विचित्र..." अनयलाही कोणत्या शब्दात बोलावं ते कळेना.

" म्हणजे.." बाबांच्या मनात भूतकाळाने मान वर काढायला सुरुवात केली. मनोमन ते तस काही नसू दे म्हणून देवाला विनवणी करत होते.

" माहित नाही मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं योग्य आहे की नाही...आमच्या पर्सनल गोष्टी... म्हणजे.." तो अडखळला.

" जे काही असेल ते तुम्ही सगळ नीट सांगा..." बाबांनी एव्हाना स्वतःच्या मनाची ऐकायची तयारी केली. अनयची अवस्था बघता त्यालाच धीराची जास्त गरज होती.

" बाबा माफ करा.. हे सगळं सांगतोय पण नाईलाज आहे माझा.." त्याचा स्वर हळवा झाला होता. नकळत त्याच्या डोळ्यात आसू दाटले.

" तू बोल.." बाबांनी खांद्यावर थोपटत त्याला आश्र्वस्त केलं.

" लग्न झाल्या दिवसापासून बघतोय.. म्हणजे.. आमच्यात तसे नवरा बायकोसारखे संबंध बनतच नाहीत.. ती खूप चांगली आहे.. एक पत्नी म्हणून सगळी कर्तव्य अचूक बजावते मात्र...." आपण कोणासमोर बोलतोय हे उमजून शरमेने त्याने मान खाली घातली.

" मात्र काय..? " बाबांनीही त्याच्या बोलण्याचा उद्देश समजून दुसरीकडे मान फिरवत प्रश्न विचारला.

" मात्र जेव्हाही मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होतो तेव्हा तीच वागणच बदलून जात होत. अरेंज मॅरेज आहे आणि ती लाजत असेल म्हणून मी ही मनावर घेतल नव्हतं. परंतु नंतर नंतर ती खूपच आक्रमक बनत गेली. कधी वाटायचं ती मला प्रेमाने जवळ बोलावतेय परंतु जवळ गेल्यावर कित्येक वेळा तिने माझ्यावर जबरदस्ती केलीय. आमच्या प्रणयात केवळ प्रचंड शारीरिक सुखाची भूक असते. अगदी आपल्या मानवी शरीराला सोसणार नाही इतकी. त्यात तिच्या अपेक्षाच अश्या काही असतात की... म्हणजे कालचाच प्रसंग आहे तिने इतक्या जोराने चावा घ्यायला लावला... तिच्या अश्या विचित्र वागण्यावरून अस वाटायचं की तिच्या शरीरात कोणी अमानवी शक्ती घुसून हे सगळं करवून घेतेय. खर सांगतोय... दोन तीन वेळेस प्रणयाच्या मधात मी बेशुद्ध पडलोय इतका आवेग असायचा. आजकाल तर घाबरून मी तिला रिस्पॉन्स देणं बंद केलय. पण काल... " भयाने त्याचे डोळे विस्फारले. त्या रात्री जे काही घडल असेल त्याची झलक त्याच्या डोळ्यात दिसून येत होती.

" असं काय घडलं काय...?" बाबांनी घाबरून गळ्यातील रुद्राक्षांची माळ घट्ट पकडली. त्याचे श्वास क्षणासाठी थांबून गेले. कपाळावर आठ्यांची गर्दी झाली.

" काल रात्री तिला पाहिल्यावर माझी खात्री पटली... तिचे ते लालभडक डोळे, चेहऱ्यावरचं विचकटलेल हास्य, निर्वस्त्र चमकणार अंग आणि तिच्या नजरेतील माझ्यासाठीचे अनोळखी भाव. " त्याच्या डोळ्यांसमोर कालच्या रात्रीच तीच रूप उभ राहील. भीतीने त्याच्या माथ्यावर घामाचे थेंब जमले. " आणि इतक्या दिवसात जे समाधान मी तिला देऊ शकलो नव्हतो ते समाधान तिच्या अंगभर पसरलं होत.. अगदी तृप्त होऊन तिच्याच विश्वात मग्न होती. आणि आजकाल माझ्यावर झडप घालणारी ती चक्क माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हती.."

" म्हणजे...?" बाबांनी किंचित जोराने विचारलं.

" नेहमीपेक्षा वेगळी होती ती... तीच बोलणं वागणं सगळच बदललं होत... तीच्यालेखी मी तिथे नव्हतोच... कसल्याशा आठवणीत हरवून ती हसत होती, गिरक्या घेत होती, कित्येकदा आरशात न्याहाळत होती... जणू नुकतीच प्रेमात पडली होती..." बोलता बोलता तो थरथरत होता.

" तिच्या हातात दोरा होता का...?" बाबांनी साशंकतेने विचारलं.

" दोरा.." प्रश्नाचा रोख त्याच्या लक्षात आला नव्हता.

" तिच्या डाव्या मनगटात लाल दोरा आहे.." बाबांनी खूण सांगितली.

" डाव्या मनगटात..." आपल्या मेंदूवर जोर देत, काहीतरी विचार करत त्याने स्वतःचे दोन्ही हात न्याहाळले आणि तो जोराने ओरडला.. " नाही... दोरा नव्हता..."

" घात झाला... परमेश्वरा..." बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. " आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती आणि नेमकी...... वाटलं होत संकट टळलय पण..." पश्चात्तापाने त्यांनी आपला चेहरा तळव्यांमध्ये लपवला.

" बाबा.... तिने सांगितले सर्व मला.. म्हणूनच तर तिच्या काळजीपोटी इथे आलोय मी. मला तिच्या प्रेमावर संशय नाहीये.. परंतु जे तिच्यावर गारूड घालून आहे त्याच्यापासून मला तिचा वाचवायचय. मला नाही माहित त्या शक्तीशी कसं लढायच... मागच्या वेळेस ज्यांनी ह्या सगळ्यातून वाचवलेल त्या गुरुजींना भेटूया आपण. ते वाचवतील आपल्याला.. " अनयच्या डोळ्यात तिच्याबद्दलच प्रेम स्पष्ट दिसून येत होत. तिला वाचवण्याची कळकळ त्याच्या चेहऱ्यावर वाचता येत होती.

" हे काय वाढून ठेवलंय समोर...." बाबांनी गडबडीने कोणाला तरी फोन केला. पलीकडून ' डायल केलेला क्रमांक अस्तित्वात नाही ' ची टोन वाजत होती. हताश होऊन त्यांनी फोन सोफ्यावर फेकला.

" काय झालं बाबा... कोणाला कॉल करताय...?" अनयने उत्सुकतेने विचारलं.

" गुरुजींना.... पण काही उपयोग नाही त्याचा.." बाबांच्या थकल्या स्वरांवरून अनय समजून गेला.

" का..." त्याच्या मनात अजूनही आशा होती.

" त्या शक्तीसोबतच्या लढ्यात बाबांनी आपली इतक्या वर्षांची तपश्चर्या पणाला लावली होती. सर्वांचा जीव वाचवण्याच्या धडपडीत त्यांनी आपली सारी शक्ती खर्च केली. शेवटचे काही बीज मंत्र उच्चारून त्यांनी आपले शक्तिकवच तिच्याभोवती बांधून ते पुन्हा साधनेसाठी कायमचे निघून गेले. पण...." बाबांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसा च्या तसा उभा राहिला.

" पण...." अनयच्या मनातील आशा मावळत चालली होती.

" जाताना ते मला एकट्यात बोलावून बोलले होते की माझं शक्तीकवच त्या शक्तीपुढे किती काळ तग धरून राहू शकेल माहित नाही. तिने स्वतःहून आवाहन करून आपल्या सर्वस्वाला त्याच्यापुढे वाहून घेतलं होत. त्यामुळे ती शक्ती आणि तिच्यामध्ये एक प्रकारचे न तुटणारे बंध तयार झाले आहेत. ज्याला कोणीच नष्ट नाही करू शकत. माझ्या बीजमंत्राची शक्ती तिला शारीरिक हानी होण्यापासून वाचवेल. परंतु त्या जर तिच्या मनात अजूनही त्या शक्तिविषयी काही सकारात्मक भावना निर्माण झाल्या तर ती शक्ती पुन्हा कार्यान्वित होऊ शकते. अशा वेळी माझे मंत्र काहीच करू नाही शकत. ती पुन्हा त्या आठवणींत जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला सांगितलं. चुकूनही त्या आठवणी उगाळू नये म्हणून त्या आठवणींना मनाच्या तळाशी गाडून टाकल. "

" .... आणि नेमक मला सत्य सांगण्याच्या नादात ती पुन्हा त्याच आठवणींच्या गर्तेत गेली.... शिट..." अचानक झालेल्या खुलाश्याने अनयने कपाळावर हात मारून घेतला. " अप्रत्यक्षपणे का होईना मीच कारणीभूत आहे तिला पुन्हा त्याच आठवणीत न्यायला.... आपण गुरुजींना भेटूया ना...प्लीज.. ते वाचावतील ना तिला.." त्याला रडू कोसळलं. त्याच्या डोळ्यात हजारो सश्यांची व्याकुळता भरून आली होती. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्या त्रासाला आपणच कारणीभूत आहोत हा गिल्ट त्याच्या मनाला टोचत होता.

" जावईबापू... पण आता तिला वाचवायला गुरुजी नाहीत.." बाबांनी त्याला सत्याची जाणीव करून दिली.

" आता काय करायचं.. ?" अनयने आशेने बाबांकडे पाहिलं.

" मी तरी काय करू पोरा.... हताश बाप आहे मी... आपल्या पोटच्या गोळ्यावरच संकट जाणवूनही त्याच निवारण नाही करू शकत... माझ्यापेक्षा दुर्दैवी दुसरा कोणी बाप नसावा...." इतका वेळ कणखर असल्याचा मुखवटा बाबांनी आपल्या चेहऱ्यावर चढवला होता तो गळून पडला. दोन्ही दुर्दैवी जीव आपल्या हताशपणावर आसू ढाळण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते.

------------------------------------------------------------------------

आताही नेहमीप्रमाणे कोणाला काही न सांगता आपली प्रवासी बॅग पाठीवर मारून रात्रीच्या अंधारात ओम बाहेर पडला. अंगात नेहमीची त्याच्या आवडीची ब्लॅक हुडी, ब्लॅक जीन्स आणि त्याने खूप जपलेली ट्रावेलींग ब्लॅक बॅग अशा अवतारात त्याच्या गळ्यातील लॉकेट तेवढं प्रकाशमान होऊन चमकत होत. त्याच्या चालण्याचा वेग इतका होता की बरच अंतर त्याने बघता बघता पार केलं. आतापासून प्रवास चालू केला तर साधारण दोन दिवसांत पोचण्याची शक्यता होती. शहरातून बाहेर पडायला भरपूर गाड्या मिळतील पण त्या गावी पोचण्यासाठी...... खूप प्रवास बाकी होता.....
------------------------------------------------------------------------

" ओ पाव्हण... हा शेवटचा स्टॉप आहे.. याच्यापुढे तर काही गाडी जात नाही..." कंडक्टर ओमला जागं करत होता.

" धन्यवाद साहेब उठवल्याबद्दल " कंडक्टरशी हात मिळवत तो खाली उतरला. आपली बॅग सावरत त्याने मनगटावरील घड्याळ तपासल. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. इश्चीत स्थळी पोचायला बराच वेळ लागणार होता... झपाझप चालायला हवं... मनाशी विचार करत त्याने कुच केली.

" हे येड नक्की कुठं चाललंय...त्या बाजूला रस्ता संपतो..." कंडक्टरने जरा ओरडतच ड्रायव्हरला विचारलं. शेवटच्या स्टॉपवरून यू टर्न मारून गाडी आल्या दिशेने गेलीच होती तेवढ्यात कंडक्टरने मागे वळून बघितलं. ओम आपल्याच तंद्रीत आणि बऱ्याच वेगात पुढे जात होता.

" नवीन तर नसेल ना हा... पण.... जाऊदे आपण आधी पळूया.." ड्रायव्हरला तिथून निघायची घाई होती.

" पण त्याला सांगायला तर पाहिजे ना... तो भुताटकीचा भाग आहे..." कंडक्टरने काळजीने विचारलं.

" तिथे गेल्यावर जिवंत राहिलो तर सांगू ना... " पुढे काही न बोलता त्याने वेगाने गाडी दामटवली.

तिथल्या गावकऱ्यांच म्हणणं होत की तो भाग अमानवी शक्तींच्या नियंत्रणाखाली आहे. बरेचसे विचित्र प्रकारही तिथे घडून गेले असल्याने त्या भागात कोणी फिरकायच नाही. एवढंच नाही तर गावात येणाऱ्या बसेसही शेवटच्या स्टॉपवर यायच्या नाहीत. आज ओममुळे त्यांना पुढे यावं लागलं. परंतु अंधार पडायच्या आत घाईने तिथून निघून जाणं भाग होत.

-----------------------------------------------------------------------










Share

NEW REALESED