Ardhantar - 3 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - ३

अपनो से लड़कर भला ,
कौन योध्दा जिता है।
सब कुछ खोकर ही तो,
सबने सम्मान पाया हैं।


"होम इस व्हेअर वन स्टार्टस फ्रॉम. " प्रख्यात कवी टी. एस. एलिअट, यांचं हे वाक्य... प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही घरातूनच होते...माझ्या आयुष्याच्या दोन्ही पर्वाची सुरुवात घरातूनच झाली होती. एक घर जिथे माझा जन्म झाला, माझं बालपण गेलं, जे माझं असुनही मला परक झालेलं....आणि एक घर जे फक्त नावाला माझं होतं पण तिथे माझं अस्तित्व गमावून बसली होती...आज एवढया दिवसांनी घरी जाताना खूप हुरहूर लागली होती, पण अपेक्षा मात्र होती की मी आज जे काही मिळवलं आहे ते पाहून सगळे माझा भूतकाळ विसरतील...स्वतःला सिद्ध करण्यासाठी, मी पण काहीतरी आहे हे दाखवून देण्यासाठी किंवा मी ही मानाची हक्कदार आहे यासाठी जे संघर्ष केले, त्याच परिणामस्वरूप आज मला मिळणार होत....हां, आता ह्या संघर्षात मी खूप काही गमवल ही होतं पण एक आशा मनात अजूनही श्वास घेत होती की माझे लोकं मला पुन्हा दूर करणार नाहीत...

याच विचारांत आम्ही घरी कधी पोहोचलो हे कळलंच नाही, अभय सरांनी गाडी उभी केली तेंव्हा लक्षात आलं की माझं आयुष्य पुन्हा यु टर्न घेऊन आलेलं आहे,
"उतरा मॅडम, घर आलं तुमचं..." अभय सर बोलले,

"अं..हो, उतरते...तुम्ही नाही येणार आतमध्ये..."
मी डोळे चोरत बोलली,

"नैना, माझ्याकडे बघ...आज पर्यंत प्रत्येक लढाई तू एकटी लढत आली आहेस, मग आज का तुझा आत्मविश्वास कमी पडत आहे?"

"आत्मविश्वास कमी नाही, पण आपल्या लोकांना दुखवल्याच शल्य आहे, तुम्ही सोबत असले की धीर असतो थोडा, पण तुम्ही नकाच येऊ, कारण तुम्हाला कोणी काही बोलेल हे मला सहन नाही होणार आणि तस पण माझ्यासाठी अजून किती अपमानित होणार तुम्ही.."

"कोण माझ्याबद्दल काय विचार करतो मला फरक पडत नाही, पण तू जर अशी कमजोर पडत असशील तर नक्कीच मला खूप फरक पडतो...त्यामुळे, हसत हसत जा, आणि मला विश्वास आहे सगळे खुश होतील तुला पाहून, आणि होणारच ना, मुलगी कलेक्टर होणार त्यांची, माझ्यासारखी दंडे घेऊन फिरणारी थोडीच..😅"

अस बोलून अभय सर निघून गेले, आणि काय बोलले ते की माझ्यासारख्या मुलीचा अभिमान असेल माझ्या घरच्यांना...आजही ते वाक्य आठवत मला, "लाज वाटते आम्हाला की तू आमची मुलगी आहेस, समाजात काहीच इज्जत नाही ठेवली आमची तू.."
आणि हे आठवलं की कोणीतरी असंख्य बाण मला मारले असतील अश्या वेदना माझ्या मनाला होतात....तरीही हे सगळे विचार दूर सारून मी गेट मध्ये शिरली, तस फार काही बदललं असेल असं वाटत नव्हतं, किंवा अस सांगायचं की कोणाला बदलायची गरजच वाटत नसावी...घराच्या दरवाज्यापर्यंत पोचली खूप हिंमतीने, दरवाजा उघडाच होता, मात्र घरात पाय ठेवल्या जात नव्हता...हाच तो दरवाजा, हेच ते अंगण जिथून माझी पाठवणी झाली होती, परत कधीही न येण्यासाठी... आज मात्र मी तिथेच येऊन थांबली...आणि तेवढ्यात आई बाहेर आली, आणि तिच्या पाठोपाठ बाबाही, मला बघून खूप चकित झाले असतील ते, हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होतं...त्यांचे डोळे पाणावले होते हे दिसत होतं मला, पण आपले अश्रू लपवत बाबा मला बोलले,

"एवढ्या दिवसांनी कस येन केलं?? अजून आमची काही नामुष्की करणं बाकी आहे का?"

"बाबा प्लिज, अस नका बोलू, तुम्हाला ही चांगलं माहीत आहे जे घडलं त्यात माझी काही चूक नव्हती ते, आणि मला तर वाटलं होतं की आज माझ्या आयुष्याने जो आकार घेतला आहे ते पाहून तुम्ही आनंदी असणार. "

"एक बाप म्हणून मी नक्कीच आनंदी आहे, पण तू तर भटकत राहशील भारत भर, मला मात्र याच समाजात, याच शहरात, याच
नातेवाईकांमध्ये राहायचं आहे, त्यांचे टोमणे ऐकून मी कसा जगू बोल ना, तू आज जे मिळवलं त्यासाठी खुश आहे मी पण माझा विचार करून तू थोडी अडजस्टमेंट अजून दाखवली असती तर समाधानाने मरता आलं असत मला.. "

"थोडी अडजस्टमेंट?? माझा जीव जाता जाता राहिलाय बाबा आणि तुम्ही हे काय...."

"अहो, मी काय म्हणते, ती आताच आली आहे, नाही राहणार जास्त दिवस आपल्या सोबत, किमान आता तरी तिला हक्काचं 'माहेरपण' जगू द्या.."
माझी आणि बाबांची वादावादी वाढू नये या हेतूने आई बोलली,

"सगळं तिच्या हक्काचंच होतं, स्वतःच्या हाताने ती सगळे अधिकार सोडून गेली.."

असं बोलून बाबा नाराजीने निघून गेले आणि मी काही बोलणार तर आईने मला डोळ्यांनीच गप्प बसवलं..नेहमीप्रमाणे.... लहानपणापासून असच होत राहील आहे, जेंव्हा कधी स्वतःच मत मांडण्याच्या प्रयत्न केला, मुलींनी जास्त बोलू नये असं सांगून माझा आवाज दाबल्या गेला...कुतूहल म्हणून जेंव्हा या समाज व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले तेंव्हा चांगल्या घरातल्या मुली उलटं उत्तर करत नाहीत असं सांगून माझ्यातच किती चुका आहेत हे दाखवण्यात आलं... आणि काय म्हणतात बाबा, मी माझे अधिकार सोडून गेली... हं, त्यांना जे माझे अधिकार वाटतात, ते बंधन होते...नव्हे, त्या बेड्या होत्या माझ्या पायातल्या...आणि जर मी त्या बेड्या तोडून स्वतःला स्वतंत्र केलं तर काय चूक केली? अधिकार स्वरूपात मला कोणाचीही भीक किंवा दया नको होती, मला वीट आला होता अश्या अधिकारांचा...आणि कोणत्या समजाबद्दल बोलतात बाबा?? तो समाज जो मुलींच्या कपड्यांवरून तीच चरित्र ओळखतो, तो समाज जे हे मानतो की एक स्त्रीच कर्तृत्व फक्त चूल आणि मूल संभाळण्यातच आहे किंवा तो समाज जो स्त्रीला अग्निपरीक्षा द्यायला लावेल पण पुरुषांनी कितिही मोठा गुन्हा केला तरी त्यांना अभय देणारा...फक्त पुरुषांनीच हा समाज बनत नाही ना? त्यात स्त्रिया पण असतात हे का विसरून जातात सगळे?...आणि माझी चूक काय होती तर हे सगळं झुगारून, स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी धडपडण....बाबा ज्याला अडजस्टमेंट म्हणत होते त्याला मी स्वाभिमान गहान ठेवणं म्हणेल, आणि ते मी केलंही होतं, पण प्रत्येक गोष्टींची एक मर्यादा असते...ह्या समाजाने ज्या मर्यादा आखून दिल्या आहेत ना स्त्रियांसाठी त्या मर्यादांनाही मर्यादा आहेत... आणि मी अडजस्टमेंट ची पातळी पार केली होती, आता प्रश्न माझ्या स्वस्तित्वाचा होता त्यामुळे मला ह्या मर्यादा ओलांडणं जिकरीच झालं होतं...आणि आता तो दुर्दैवी भुतकाळ पेलण्याचं सामर्थ्य मी आकस्मात केलं होतं..

माझ्यासोबत जे काही झालं ते मी विसरू शकत तर नव्हती पण
एवढा प्रयत्न होता की त्या आठवणीमुळे माझा या जगातल्या चांगल्या लोकांवरचा विश्वास कमी न व्हावा...
---------------------------------------------------------------
दोन दिवस झाले होते मला नागपुरात येऊन पण बाबा मला व्यवस्थित बोलले नव्हते, पण मला याची जाणीव होती की बाबांना माझ्याबद्दल नाराजी जरूर आहे पण ते माझा द्वेष करत नाहीत त्यामुळे एक आशा होती की मी परत जायच्या आधी आमच्यातले मतभेद दूर करूनच जाईल... आणि या दोन दिवसांत हे कळाल होत की फक्त माझ्यामुळेच माझे सो कॉल्ड कितीतरी नातेवाईकांनी माझ्या आई बाबांची भेट घेतली नव्हती...एका शब्दांत सांगायचं झाल्यास त्यांना वाळीत टाकलं होतं, पण मला याच काहीच आश्चर्य वाटलं नाही कारण हे तेच लोकं होते ज्यांनी कारण नसताना माझ्या चरित्रावर शंका उपस्थित केल्या होत्या... अर्थातच या सगळ्यामुळे बाबांची मनःस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती, एकविसाव्या शतकात ही एका मुलीच्या आईवडीलांना किती विचार करून राहावं लागते...खूप चिडचिड होत होती हा विचार करून की मी इतकी शिकली असूनही, एवढ काही मिळवून ही अश्या लोकांची मानसिकता बदलू शकत नाही आहे...पण म्हणतात ना झोपलेल्या ला जागी करू शकतो, मात्र झोपेचं सोंग घेणाऱ्याला कधीच जागवू शकत नाही...

ते म्हणतात ना शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरी तशीच काहीशी गत मुलींच्या बाबतीत आपल्या समाजाची झाली आहे...'खूब लढी मर्दानी' म्हणत झाशीच्या राणीचा जयजयकार करणार पण आपल्या घरातील मुलीने जर या समाजातील अनिष्ठ रूढींना आव्हान दिलं तर लगेच तिला 'कॅरेक्टर सर्टिफिकेट' देऊन मोकळे होणार...

या सगळ्यांचा विचार करून की काय माहीत आज मला खूप अस्वस्थ वाटत होतं..अभय सर घरी सोडून गेले तेंव्हापासून त्यांच्याशी काही बोलणं ही झालं नव्हतं...माझं मलाच वाईट वाटत होत की ते एवढ्या काळजीने मला घ्यायला आले आणि मी त्यांना साधं थँक्स पण बोलली नाही...असच होत आलेलं आहे नेहमी, ते त्यांचे सगळे काम दूर सारून मला मदत करायला येतात अन मी मात्र माझा स्वार्थ साधून त्यांना विसरून जाते...त्यांना फोन करायची इच्छा झाली पण नाही केला...

राहून राहून वाटत होतं आज माझा सामना पुन्हा एकदा माझ्या भूतकाळाशी होणार आहे, आणि माझ्या मनाची बेचैनी कमी करण्यासाठी मी अंबाझरी च्या तलावाजवळ जाऊन बसली. शांत आणि स्थिर पाण्यात दगड मारल्यावर जसे तरंग उठतात तशी चलबिचल माझ्या मनात उठली होती, तेवड्यात मला आवाज आला,
"कोणाला न सांगता घरातून निघून येणं, फोन न उचलणं, हा गैरजबाबदारपणा तुमच्या सारख्या, हुशार आणि समजदार होणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभत का मॅडम?"

अभय सरांचा आवाज होता हा, मी फोन बघितला तर त्यांचे कितीतरी मिस्ड कॉल होते, काही फोन आईचेही होते अन फोन सायलेंट मोड वर होता, मी कपाळावर हात मारून घेतला..आता पुन्हा मला यांची बोलणी खावी लागतील हा विचार नकोसा झाला मला, तेवढ्यात पुन्हा एकदा ते बोलले,

"मी मूर्ख आहे का ग एकटा बडबडणारा, उत्तर दे, फोन का नाही उचलला, न सांगता का आलीस, मी माझे सगळे काम सोडून आलोय तुला शोधायला...."
अभय सरांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, माझी आधीच खूप चिडचिड झाली होती आणि त्यात हे इतके प्रश्न मला अजून संतप्त करत होते, मी थोड्या रागातच उत्तर दिलं,

"का सगळे काम सोडून आले माझ्यासाठी? मी बोलवलं होत तुम्हाला? आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी बायको नाही तुमची..."
आणि हे बोलून झाल्यावर कळलं की मी कोणाला अन काय बोलली..,अभय सरांचा चेहरा उतरून गेला होता, ते माझीच काळजी करत आले इथपर्यंत अन मी त्यानाच ऐकवल होत..आणि जेंव्हा त्यांच्यामागे दोन कॉन्स्टेबल उभे आहेत हे पाहिलं तर माझी मान शरमेने खाली झुकली, मला काय बोलावं काही कळत नव्हतं..,अभय सरांनी दोन्ही कॉन्स्टेबल कडे एक कटाक्ष टाकला आणि ते दोघे गाडीत जाऊन बसले, मग मला बोलले,

"हम्म, आता बोल काय म्हणत होतीस, माहीत आहे बायको नाही आहे, पण चान्स तर दिला होता न बायको बनण्याचा...बर असो, तुला आता जास्त प्रश्न नाही विचारणार, आणि मी काम सोडून यासाठी आलो की तुझ्या आईचा कॉल आला होता मला, काळजीत आहेत त्या खूप... माझ्यासोबत यायला जमेल तुला की तुझी तू जाशील घरी..."

त्यांचं अस रुक्ष बोलण्यातून कळत होत की त्यांना माझा राग आलाय, पण तरीही मी त्यांचा हात पकडला आणि बोलली,

"सॉरी, मला बोलायचं आहे.."
त्यांनी एक तिरकस नजर गाडीत बसलेल्या त्यांच्या सेक्युरिटी वर टाकली,
"हे झेड सेक्युरिटी सोबत घेऊन फिरन गरजेचं आहे का नेहमी..?"
मी मिश्कीलपणे त्यांना बोलली, पण त्यांनी मला फक्त रागाणे पाहिलं, मला वाटलं ते खुपच चिडले असावेत,

"काही गरम डोक्याच्या लोकांपासून मला जीवितहानी होऊ शकते अस माझं भविष्य छापून आलय आज, त्यामुळे आणलं त्यांना.."

ते अस बोलल्यानंतर मला खूप हसायला आलं,

"हसून झालं असेल तर निघायचं का घरी? आणि एक केस साठी जात होतो त्यामुळे हे सोबत आहेत, नाहीतर मला सेक्युरिटी ची गरज नाही, पण आता तुझा अवतार पाहुन वाटत की तुला भेटायला येताना यांना सोबत घेऊन यायला पाहिजे..."

आणि हसत हसत आम्ही घराकडे निघालो..मी विचार करायला लागली, आयपीएस होऊन ही किती विनम्र, शांत आणि जराही अभिमान न बाळगणारे आहेत अभय सर...कदाचित हेच गुण असायला पाहिजे मनुष्यात तेंव्हाच यशाची खरी परिभाषा त्याला कळते आणि असेच लोकं सगळ्यांना समान वागणूक देण्याची गुणवत्ता ठेवतात..नाहीतर असतात काही लोकं स्वतःच्या पदाचा माज ठेवणारे, स्वतःच्याच गुर्मीत मग्रूर असणारे ज्यांना लोकांना त्यांचा कमीपणा दाखवायला खूप आवडतो, त्यांची अवहेलना करणं हेच त्यांचे परम कर्तव्ये असते...आणि अश्यापैकीच एक तो होता, ज्याने माझं आयुष्य नरक बनवण्यात काही कमी ठेवली नव्हती...असाच होता तो...."विक्रम"
--------------------------------------------------------------
क्रमशः