Ardhantar - 9 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - ९

अधांतर-९

ममता का वरदान पाकर,
क्यूँ सदा अभिशापित हूं मै।
विस्तृत बनाके जीवन सबका,
फिर भी क्यूँ सिमीत हूं मै।


स्त्री ही पुरुषांइतकीच कणखर आणि सामर्थ्यवान असू शकते ही कल्पनाही आपल्या समाजात मान्य नाही...आणि जेंव्हा एखादी स्त्री ही कल्पना सत्यात उतरवण्यात यशस्वी होते तेंव्हा समाजव्यवस्थेला तो धोका वाटायला लागतो, पुरुषप्रधान संस्कृती लोप पावेल ह्या भीतीने लोकं मग त्या स्त्रीचं कर्तृत्व हे तिचं पराक्रम नसून तीच चरित्रहनन आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जातात...वारंवार स्त्री आणि पुरुषांची तुलना केली जाते, या तुलनेत पुरुषांची बाजू किती वजनदार आहे याचा युक्तिवाद सुरू होतो....पण स्त्री आणि पुरुष यांची तुलनाच होऊ शकत नाही ही साधी गोष्ट का कळत नाही लोकांना?? खर तर स्त्री आणि पुरुष एकमेकांविना अपूर्ण असतात, पुरुष काही गोष्टींमध्ये सरस असतात तर स्त्रिया काही गोष्टींमध्ये...पण पुरुषप्रधान समाजात 'इगो' नावाची गोष्ट हे मान्य करत नाही, पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक असतात हे कधीही मान्य केल्या जात नाही...विक्रमला कमी लेखण्यासाठी मला कधीच काही करायचं नव्हतं, त्याचे मतं, त्याची हुशारी, त्याचे यश, आणि ते मिळवण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत..या सगळ्यांचा मी नेहमीच आदर केला, पण मी जेवढा त्याचा आदर केला त्याने तेवढंच मला कैद करण्याचा प्रयत्न केला...विक्रम इतकी हुशारी मला आजही नाही के मी कबूल करते, पण त्याच ज्ञान अहंकारात बदलत गेलं आणि तोच अहंकार त्याच्यासाठी विष बनला...

लग्न करताना किती स्वप्न असतात एका मुलीचे, नवीन आयुष्य किती निरनिराळ्या रंगानी रंगवाव अस वाटतं, मलाही वाटायचं...विक्रमच माझा जीवनसाथी आहे हे मी काळानुसार मी स्वीकारलंच होतं... आणि खर संगायच तर लहानपणीच्या आकर्षनाला मी प्रेमात बदलण्याचा खुप प्रयत्न करत होती...पण अस जबरदस्तीने प्रेम थोडीच करू शकतो आपण? तरीही तो आनंदी रहावा यासाठी प्रयत्न असायचे माझे नेहमी...त्या प्रसंगानंतर मी विक्रमसमोर माझ्या शिक्षणाचा काही विषय काढला नाही किंवा तो ही काही बोलला नाही...मलाही वाटलं तो थोडा तापट आहे आणि त्याच्या ट्रेनिंग मध्ये व्यस्त आहे तर उगाच बोलून वाद वाढवू नये, शांतच राहावं म्हणजे कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही...पण नेहमीच शांत राहून आपण येणारे प्रोब्लेम दूर करू शकत नाही, कधी कधी अडचणी सोडवण्यासाठी बोलणं खूप जिकरीचे असते....

विक्रमच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या, फेज-२ साठी त्याला निघायचं होतं जायच्या आधी तो मला भेटायला आला, त्याचे आईवडील ही आले होते आणि यावेळेस ते लग्नाची तारीखच काढायला आले होते...मला वाटलं होतं विक्रम लग्नाची काही घाई करणार नाही, पण फेज२ झाल्यावर लगेच लग्न करायचं अस त्याच्या घरच्यांना वाटत होतं, आणि माझ्या घरचे तर तयारच होते...सगळं झालं लग्नाची तारीखही निश्चित झाली, आणि पुन्हा एकदा मला कोणीही काहीही विचारलं नाही, पण यावेळेस मी विक्रमला बोलायचं ठरवलं...विक्रमला थोडा वेळ माझ्यासोबत घालवता यावा म्हणून तो मला बाहेर घेऊन गेला, मी पण वेळ पाहून त्याला सांगितलंच,

"मला बोलायचं आहे तुमच्यासोबत.." मी बोलली,

"बोल ना, आपल्याला बोलता यावं म्हणूनच आलो आहोत ना आपण..."

"आपलं लग्न थोडं पुढे नाही ढकलू शकत का आपण? "

"का? काय झालं? मला तर वाटतं आहे आताच या क्षणाला लग्न करून तुला माझी बनवावं आणि तुला हा दुरावा अजून वाढवायचा आहे..मी आवडेनासा झालोय का तुला?"

"नाही... तस काहीही नाही, पण माझ्या फायनल सेमिस्टर च्या परीक्षा आहेत लग्नानंतर लगेच, मला शेवटची परीक्षा द्यायची आहे....माहीत आहे तुम्हाला आवडणार नाही हा विषय काढलेला पण माझी एक छोटीशी ईच्छा म्हणून तर त्याचा विचार करा..." अस बोलताना मला खूप लाचार झाल्यासारख वाटत होतं, मला माझ्याच आयुष्याचे निर्णय घेता येत नव्हते किंवा तस काही करण्याचे अधिकार नव्हते....विक्रमने दोन मिनिटे काही उत्तर दिलं नाही, मी मात्र खूप आशाभूत नजरेने त्याला पाहत होती...शेवटी बोलला तो,

"ठीक आहे, लग्न झाल्यावर परीक्षा दे तू...लग्नानंतरचे सगळे रितभात नंतर करू आपण, मी सांगेन घरच्यांना...तसही हे शेवटची परीक्षा, यानंतर तुझं सगळं बंद होईल...काही हरकत नाही... आता खुश ना?"

काय खूश होऊ त्याच्या अश्या बोलण्यावर ! पण तरीही मी होकारार्थी मान हलवली...तशी अपेक्षा नव्हती की विक्रम मान्य करेल अशी पण ऐकलं त्याने माझं आणि मी पुन्हा खोटं खोटं स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला की विक्रमपेक्षा चांगला जीवनसाथी मला मिळूच शकत नाही...

"नैना... बोल काहीतरी, तू कधीच मला सांगितलं नाही मी तुला कसा वाटतो? म्हणजे आवडतो की नाही आवडत? तुला माहीत आहे मला वाटतच नाही आपलं लग्न होणार आहे... कधीच तू स्वतःहून मला फोन करण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करत नाही... का अस? माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी खूप वाट पाहतो तुझ्या फ़ोन ची, पण नाही करत तू.. "
विक्रमला काय उत्तर देऊ हे मला काही कळत नव्हतं, तो बोलतो त्याचं प्रेम आहे माझ्यावर, मग माझं आहे का?? काहीच कळत नव्हतं,

"ते, तुम्ही ट्रेनिंग मध्ये असता ना, तुम्हाला उगाच डिस्टर्ब नको त्यामुळे नाही करत मी फोन...ते जास्त महत्त्वाचे आहे ना.." या उत्तराने मी ती वेळ मारून नेली...

"माझा एवढा विचार करतेस तू? पण मला नाही होणार तुझ्यामुळे काही डिस्टर्ब, कधी काही चिडून बोललो असेन तुला मी पण प्रेमही तेवढच आहे तुझ्यावर आणि आता तर अस वाटत आहे कधी एकदा लग्न होतं आपलं...नाही राहू शकत तुझ्याशिवाय..."

विक्रमच वागणं मला खूप कोड्यात टाकल्यासारखं असायचं, कधी कधी इतका प्रेमाने वागायचा की अस वाटायचं मीच चुकीची वागते कदाचित, आणि कधी कधी अस वाटायचं की हा मला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे...पण आज विक्रमने माझा विचार केला होता, त्यामुळे माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या.. खूप वेळा असं होतं की आपण विचार करतो, एकदा लग्न झालं की सगळं बदलेल, आता उगाच वाद नको करायला, नातं बनत असताना त्याला तडा जाईल अस काहीही वागायला नको...पण हे करत असताना कधी आपण समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टी ही सहन करायला लागतो ते कळत नाही....नातं टिकवाव किंवा ते अबाधित राहावं यासाठी मी पण अश्या चुका केल्या....

--------------------------------------–-----------

विक्रम ट्रेनिंग साठी निघून गेला...आता त्याचे रोज संध्याकाळी फोन यायला लागले मला, दिवसभरातील सगळ्या गोष्टी तो मला सांगायचा, मला छान वाटायचं त्याचे एक एक अनुभव ऐकून, हळूहळू मला आमचं बॉंडिंग वाढत होतं, मला आवडायचं तो मला बोलायचा, माझी चौकशी करायचा, मला छान वाटायचं ते सगळ... आता हळूहळू मी पण माझ्या सगळ्या गोष्टी त्याला सांगायला लागली, त्याला दिवसभरात जसा वेळ मिळेल तसा तो मला आता बोलत होता, मी कुठे जात आहे, माझ्यासोबत कोण आहे, मी घरी कधी जाणार याची सगळी चौकशी करायचा तो...

तस मला मित्र कोणी नव्हतेच, मुलांसोबत जास्त बोलणं किंवा मैत्री करणं याची परवानगीच नव्हती मला..माझं लास्ट सेमिस्टर होत त्यामुळे कॉलेज मध्ये फेअरवेल होतं... विक्रमला याबद्दल मी सांगितलं होतं, मला घरी जायला उशीर होणार होता पण मैत्रिणी सोबत होत्या त्यामुळे बाबांनी परवानगी दिली...परंतु परत येता येता थोडा उशीर झाला त्यामुळे माझा एक वर्गमित्र आम्हाला घरापर्यंत सोडायला आला...नेमका त्याचवेळी विक्रमचा फोन आला, त्याने मला विचारलं की भाऊ आला होता का मला घ्यायला तर मीसुद्धा प्रामाणिकपणे सांगून दिल की माझ्या मैत्रिणी आहेत सोबत आणि माझ्या एका मित्राने मला सोडलं घरी. विक्रमला ते अजिबात आवडलं नाही,

"नैना, मी तुझ्याबरोबर असलो तर तुला अवघडल्यासारखे होते आणि कोण तो मित्र तुझा, त्याच्या बरोबर फिरायला लाज नाही वाटली तुला? हा मित्र च तर कारण नाही ना की तू मला कधी फोन करत नाही, बोलत नाही स्वतःहून...?"

"काही काय बोलता तुम्ही, आपण रोजच बोलतोय आणि मी माझी प्रत्येक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला, मला जर काही लपवायच असत तर कधीच लपवल असत, असं प्रामाणिकपणे सांगितलं नसतं तुम्हाला विक्रम?"

"आपण रोज बोलतो कारण मी स्वतःहुन फोन करतो तुला, तू कधी नाही करत, कारण तुझी इच्छा नसते, हो ना? आणि त्याचे सगळे कारण हा मित्र आहे असं वाटायला लागलं आहे मला....माझा विश्वास तोडलास तू..."
विक्रमने छोटीशी गोष्ट खूप मोठी केली होती, आणि विनाकारण माझ्यावर आरोप केले होते जे मला अजिबात रुचले नाही, राग आला होता मला, मी एवढं प्रामाणिक वागूनही विक्रम एका छोट्या गोष्टी साठी मला रागवत होता, मी रागारागात त्याला बोलली,

"हे बघा विक्रम, हो विक्रमच...आज तुमचं नाव घेऊन बोलते तुम्हाला मी, कारण मला राग आला आहे तुमचा, मी तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य करते, तुम्ही जस सांगता तस वागते तरी तुमचं असं अगदी क्षुल्लक कारणावरुन भांडणं मला आवडत नाही, तुम्हीच बोलले होते की आपण दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे पण तुम्ही मात्र नेहमीच चिडता माझ्यावर, आणि आज तर हद्दच झाली...मित्र आहे तो माझा बस एवढंच आणि तुम्ही माहीत नाही काय काय विचार करता..."

"तुला मी महत्त्वाचा आहे की मित्र? त्याच्यासाठी तू माझ्यावर चिडत आहेस नैना? "

"मला कोणताच मित्र जवळचा किंवा महत्त्वाचा नाही, तुम्ही आहे महत्त्वाचे त्यामुळे सगळं काही खर खर सांगितलं तुम्हाला पण दुर्दैवाने तुम्हाला माझा प्रामाणिकपणा कळत नाही.." मी तावातावात बोलली,

"हं... मला कळत नाही? तुला कळतंय का तू कोणासोबत बोलत आहे,? तुझा होणारा नवरा आहे मी, DySP आहे, आणि तू मला हुशारी शिकवत आहे? मला तुझे कोणतेच मित्र पटणार नाही सांगून ठेवतो...कवडीची अक्कल नाही तुला, बायकांनी बायकांसारखं राहावं, आणि हो एक लक्षात ठेव, यानंतर जर अस उलट उत्तरून बोलली मला तर जराही खपवून घेणार नाही मी...."

"मला नाही बोलायचं तुमच्याशी....ठेवा फोन..."
आणि मी रागारागात फोन बंद केला, खूप वाईट वाटत होतं मला विक्रम ज्या पद्धतीने मला बोलत होता, मला खूप कमाल वाटत होती की विक्रम असा बोलू शकतो... जर खूप अभ्यास करून, मेहनत करून तुम्ही अधिकारी होता तेंव्हा तुमचे विचार प्रगल्भ पाहिजे, स्त्री पुरुष हा भेद नसायला पाहिजे.... पण विक्रम मात्र सगळ्यांच्या खूप विपरीत होता, त्याची हुशारी, त्याने मिळवलेले पद त्याच्या डोक्यावर इतके नाचत होते की त्यापुढे तो सगळ्यांना छोटा समजायचा...

त्या दिवसांनंतर एक आठवडा झाला होता, विक्रमच आणि माझं काही बोलन झालं नव्हतं, मी विचार केला विक्रम रागात सगळं बोलला असेल, आणि तो रागात आहे तर मी शांत राहायला पाहीजे....मला वाटलं कदाचित मी जर पुन्हा माझ्या बाजूने एक प्रयत्न केला तर हे नातं मजबूत होऊ शकते त्यामुळे मी विक्रमला फोन केला तर त्याने उचलला नाही, मला वाटलं तो कामात असेल, माझा फोन गेला म्हणून तो नक्किच फोन करेल मला, पण त्यादिवशी त्याने ना माझा फोन उचलला नाही माझ्या मेसेजेस ला उत्तर दिले, मला मात्र काळजी वाटत होती की काय झालं असेल...मी ठरवलं की आमच्यात काय झालं ते आईला सांगते....हाच विचार करून त्यादिवशी मी कॉलेज मधून घरी आली तर घरी विक्रमचे आईवडील येऊन बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की ते काहितरी गंभीर विषय बोलायला आले असतील...मी जाऊन त्यांना नमस्कार केला, पण मला ते नेहमीसारखे खुश वाटले नाही, माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती...मला मोजकेच बोलून आणि माझ्या कॉलेज ची चौकशी करून ते निघाले...ते गेल्यावर मी बाबांना विचारलं,

"काय झालं बाबा? तुम्ही टेन्शन मध्ये दिसत आहेत, काही बोलले का विक्रमचे आई बाबा? काही झालंय का?"

बाबांनी एक कटाक्ष माझ्यावर टाकला आणि बोलले,
"काय झालंय हे आम्ही तुला नाही, तू आम्हाला सांगायला पाहिजे नैना? तू काय बोललीस विक्रमला? काय झालं तुमच्यात हे मला तूझ्या तोंडाने ऐकायचं आता"

"का,काय झालं? विक्रम काही बोलला का तुम्हाला माझ्याबद्दल की त्याचे घरचे काही बोलून गेले?" मी थोडं चाचरतच विचारलं बाबांना...

"माझ्या प्रश्नाला प्रश्न नको करू नैना, मी जे विचारलं त्याच उत्तर दे आधी, तू काय बोललीस विक्रमला?" बाबा थोडे चिडतच मला बोलले...

मला कळलं की आमचा छोटासा वाद आता विक्रमने घरच्यांपर्यत नेला आहे त्यामुळे काय घडलं हे मला सांगणं गरजेचं होतं... मी बाबांना सगळं सांगितल, त्याच वागणं, नेहमी नेहमी मला कमी लेखनं, आणि कसा त्याने माझ्यावर क्षुल्लक कारणावरून संशय घेतला, ते सगळं सांगितलं...बाबांना ते कुठेतरी पटलं, आणि बाबांनी लगेच फोन केला विक्रमच्या घरच्यांना, त्यांना काय घडलं हे सगळं सांगितलं, त्यावर त्याच्या घरच्यांचं अस बोलणं होतं की, माझं अस एखाद्या मुला बरोबर फिरणं त्यांच्या 'सो कॉल्ड स्टेटस' च्या विरुद्ध आहे, चांगल्या घरातल्या मुली अस अनोळखी मुलांसोबत फिरत नाहीत आणि विक्रमला हे सगळं आवडलं नाही....ते अस बोलल्यावर बाबा मलाच रागावले, की मला कस वागायचं हे कळत नाही....आणि मी सगळ्यांसाठी मी विक्रमची माफी मागावी...

किती सहज असते ना मुलींना दोषी ठरवणं....म्हणजे सासरची लोकं कितीही शिक्षित असली (सुशिक्षित नाही) तरी आपल्या समाजात तो रुढीवाद काही संपत नाही, मुलीला शिक्षण तर द्यायचं, पण त्या शिक्षणाचा उपयोग तिने कसा करावा हे त्यांनी ठरवायचं...तिला बाहेर तर जाऊ द्यायचं पण तिने मैत्री कोणाशी करावी हे मात्र त्यांनी ठरवायचं...तिला कपडे कसे घालावे याच स्वतंत्र देऊन, त्याची 'लिबर्टी' मात्र आपल्या हातात ठेवावी...मुलांना हे प्रश्न कधीच विचारल्या जात नाही...'संस्कारांची शिकवणी' फक्त मुलींसाठी का असते याच हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो....आणि त्यात विक्रमसारखे मुलं खूप शिकतात, अधिकारी बनतात, मोठ्या पदावर कामही करतात पण, पण मोठया पदावर काम करताना त्यांची मुलींबाबत विचारसरणी मात्र छोटीच राहते....

नातं टिकवायच असेल तर नमतं घ्यावं लागतं हे कितीही खरं असलं तरी, जी चूक मी केलीच नाही त्यासाठी विक्रमची माफी मला मागायची नव्हती... आणि हा छोटासा प्रसंग मला माझ्या भावी आयुष्याबद्दल खुप विचार करायला लावत होता...आज विक्रम छोट्या छोट्या गोष्टी वरून असा वागतो, लग्न झाल्यानंतर जेंव्हा सोबत राहणार तेंव्हा काय होईल हा विचार करून माझं काळीज फाटत होत....पण विक्रमनेही अट ठेवली होती की जर मी त्याची माफी नाही मागितली तर तो हे लग्न करणार नाही...त्याची ही पोकळ धमकी माझ्या घरच्यांना मात्र खूप चिंतेत टाकणारी होती...साखरपुडा झाल्यावर लग्न मोडणं म्हणजे अभिशाप असतो मुलींसाठी, लग्न मोडल्यावर मुलीला समाजात काय मान मिळेल, कोणी दुसरा मुलगा तिच्याशी लग्न करेल की नाही, फक्त या विचारांमुळे आहे ती परिस्थिती स्वीकारण्यास भाग पाडले जाते मुलींना....

माझ्याही मनात हेच द्वंद सुरु होते, एक मन बोलत होत की सगळ्यांच्या विरोधात जाऊन या लग्नास मना करते पण दुसरं मन बोलत होत की फक्त माझ्या सुखासाठी मी चार लोकांत बाबांची नाचक्की नाही होऊ देऊ शकत, मी त्यांना त्रास नाही देऊ शकत...इथेच मी हरली...ज्या 'चार लोकांचा' विचार करून मी स्वतःला आणि माझ्या घरच्यांना दुःखाच्या दरीत ढकलायची तयारी केली होती, ते मात्र माझ्या वाईट काळातही माझ्या सोबत नव्हते आणि माझं चांगलं झाल्यावरही माझ्या कौतुकासाठी नव्हते....

खूप विचार करून दुसऱ्या दिवशी मी विक्रमला फोन केला... आज मात्र त्याने माझा फोन उचलला, कदाचित त्याला खात्री असावी की त्याची धमकी खूप मोठा परिणाम करून गेली माझ्यावर...
"बोला मॅडम...आलं का डोकं ठिकाणावर? की अजून धीटपणा आहेच अंगात?"
त्याच बोलणं माझ्या जिव्हारी येत होतं, तरी मी बोलली,

"ते मला माफी मागायची होती...सॉरी..."

"मी काय म्हणतो नैना, ही माफी मागायची वेळच का येऊ देते तू? हे बघ आताही तुला मी प्रेमाने सांगतो, तुला कळत नाही ग, भोळी आहेस तू... हे मित्र वैगरे चांगले नसतात, फसवतात ते मुलींना, तुझी काळजी वाटते मला त्यामुळे मी बोललो तुला आणि तू त्यादिवशी माझ्यावरच रागावली... त्यादिवशी माझं ऐकलं असत तर आज ही माफीची वेळच आली नसती ना..."

"हम्म..."

"काय हम्म...थोडं तरी प्रेमाने बोल आता, मी जस बोलतो तू तशी वाग फक्त, बघ कसा स्वर्ग आणून ठेवतो तुझ्या पायात मी...कस आहे ना नैना, तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेंव्हापासून मी तुला फक्त माझीच आहे हे गृहीत धरलं होतं, तुझ्यासाठी एवढं मेहनत करून अधिकारी झालो आणि त्यात तू अस वागलीस तर मला राग नाही येणार का??"

"हम्म..."

"हे काय आता? बोल ना काहितरी...राग आहे ना माझा तुला? काय करू मी तो घालवण्यासाठी, येऊ का तुला भेटायला...गिफ्ट पाठवू तुझ्यासाठी?? बोल काहितरी"

"काही नको, मी ठीक आहे...तुम्हाला काही करायचंच असेल ना विक्रम तर एक करा, आपले वाद आपल्यात राहुद्या, घरच्यांना मधात आणू नका...विनंति आहे माझी"

"ठीक आहे जस तुझी ईच्छा, पण तुही मात्र मला जे आवडत नाही तस वागायचं नाही...मी बोलेल तस राहायचं, ठीक आहे...."

त्यादिवसांनंतर मी मात्र स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवला माझ्या घरच्यांसाठी... विक्रम जसा बोलेल तर मी वागायची, तो आनंदी होता, माझ्या घरचे खुश होते आणि त्यांना पाहून मी समाधानी होती.. मी सगळं मान्य केलं होतं सगळं, स्वीकारलं होत विक्रमला, त्याच्या स्वभावाला...लग्नाची तारीख जवळ येत होती, आणि जस विक्रम बोलला माझ्या पायात स्वर्ग आणून ठेवेल, त्याची तयारी त्याने सुरू केली होती...माझ्यासाठी भौतिक सुखांची कमी राहणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता...समज नसल्यामुळे किंवा आयुष्याचा अनुभव नसल्यामुळे मला त्या गोष्टी पून्हा चांगल्या वाटायला लागल्या त्याच्या, आमच्यात काय झालं होतं, काय नाही हे सगळं विसरली होती मी...पण त्याचा तो स्वर्ग माझ्या साठी सोन्याचा पिंजरा बनेल याची भविष्यवाणी माझ्यासाठी कोणीही केली नव्हती......
---------------------------------------------------–----
क्रमशः