Ardhantar - 6 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - ६

अधांतर-६

किसीके वजूद से निकलकर,
मैने अस्तित्व अपना बनाया है ।
अतीत के आँधी से क्या डरना,
जब तुफान ही मेरा हमसाया है।


हेलन किलर म्हणतात, "सहज आणि शांतपणे चारित्र्य विकसित केले जाऊ शकत नाही. केवळ परीक्षेच्या आणि दु: खाच्या अनुभवातूनच आत्म्याला बळकटी मिळवता येते, महत्वाकांक्षा प्रेरित केली जाते आणि यश मिळते." अगदी खरंय ते...खूप वेळा आपण फक्त सूख कस मिळवता येईल याचाच विचार करतो...आपले प्रयत्न यासाठीच असतात की काहीही करून आपलं आयुष्य सुखकर झालं पाहिजे...आणि त्यात यशस्वी ही होतो, मग जोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू असतं तोपर्यंत आपण तो आनंद उपभोगत असतो...मग जेंव्हा नकळत संकटं आपल्यावर आक्रमण करतात तेंव्हा मात्र त्या संकटांशी सामना करायला आपला काही 'प्लॅन' च तयार नसतो, कारण सुख भोगण्याच्या नादात दुःखावर मात करण्याची तयारी आपण केलेलीच नसते. आणि त्याचवेळी आपल्या कडे संधी असते स्वतःला विकसित करण्याची, आपलं चरित्र घडवण्यासाठी...जर त्यावेळी आपण आपला विवेक आणि संयम बाळगला तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही....

माझ्या संकट काळात मी हेच केलं... नाही, मी अस म्हणेल की मला हे शिकवलं गेलं...कोणी शिकवलं?? निश्चितच अभय सरांनी....मला हे वाटतं जो संकट काळात प्रामाणिक राहतो, श्रीमंतीत ही साधेपण जपतो, रागातही शांत राहतो आणि अधिकार मिळल्यावरही नम्र राहतो त्याला आयुष्याच व्यवस्थापण जमलं म्हणायचं....आयुष्यात आपल्याला काय आणि कसे अनुभव आले हे महत्त्वाचं नाही, पण त्यातून आपल्यात कसे बदल झाले हे महत्त्वाचं आहे....मी सध्या ह्या गोष्टी शिकत आहे त्यामुळे किती कठीन आहे हे सांगू शकते....

अभय सर बरोबर बोलले, मी दुसऱ्यांना उत्तर देणे टाळू शकते पण स्वतःच्या मनाची प्रश्नमंजुषा कधितरी सोडवावीच लागेल ना...नागपूर ला येताना पुन्हा भुतकाळाशी सामना होईल का याची भीती वाटत होती, आज विक्रमला भेटायला जाताना पण बैचेन होत...प्रत्येक वेळी एवढी खंबीर असणारी मी आज का घाबरत होती माहीत नव्हतं...माझी अवस्था बघून अभय सरांना सगळं लक्षात येत असावं कदाचित, त्यामुळे ते बोलले,

"कस आहे ना नैना,ज्याने मोठं मोठ्या संकटात हिम्मत हारली नाही त्याने अश्या छोट्या मोठ्या वादळांना घाबरू नये..."

"घाबरत नाही आहे, पण दुःख झालं की मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं..."

"तुला खरच वाटतं ते प्रेम होतं नैना? विसरलीस का सगळं ? तुझ्या त्या 'सो कॉल्ड' प्रेमाने तुला कस मिळवल होतं?"
अभय सरांचं हे खोचक बोलणं लागल मला आणि माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं...अभय सरांना जाणीव झाली त्याची,

"सॉरी, तुला दुःख होईल असं काही बोलायचं नव्हतं मला, पण तुला ही माहीत आहे तो कसा आहे....आणि त्याच्यासमोर जर इतकी इमोशनल झाली तर तो तुला दुखवण्याचा अजून प्रयत्न करेल तो, जे मला सहन होणार नाही..."

"मला माहित आहे तो कसा आहे....काळजी नका करू, थोड्या वेळेसाठी माझा स्वतःवरचा विश्वास थोडा कमजोर पडला होता पण
आता मला माझ्या गेल्या आयुष्यातली कोणतीच गोष्ट दुःख देऊ शकणार नाही...निघुयात का आता?."

"ही जे नैना आहे ना..आजची, आताची नैना. तीच परत आली पाहिजे तिच्या पूर्व आयुष्याला भेटून आल्यावर.."
आणि आज माझा प्रवास सुरू झाला होता पुन्हा माझ्या गेल्या दिवसांकडे...

आणि हो, मला आता कोणतीच गोष्ट दुखवू शकणार नाही याचा मी निश्चय केला होता..चांगल्या वाईट आठवणी पुसून तर टाकता येत नाहीत पण त्यांना आपल्यावर किती हावी होऊ द्यायचं हे आपल्याच हातात आहे....काय झालं, काय नाही हे आठवुन दुःख जरूर होत पण त्या दुःखाच शोक मनवण्यात काही अर्थ नाही, आणि माझे तर सगळे शोक मनवुन झाले होते, आता मला कोणत्या वाईट गोष्टीच दुःख ही नव्हतं आणि चांगल्या गोष्टींचा आनंद ही नव्हता...आता मी प्रत्येक गोष्टीचा तटस्थ होऊन विचार करत होती...खूप अडचणींवर मात करुन मी स्वतःला एवढं कणखर बनवलं होतं...याचा अर्थ असा नाही की माझ्यातली संवेदनशीलता कमी झाली होती, पण त्याचा उपयोग कुठे आणि किती करायचा हे नक्कीच मला कळलं होतं...खर तर संवेदनशीलतेसाठी 'उपयोग' हा शब्द वापरण चुकीच आहे, पण या युगात नुसतच संवेदनशील राहून जमत नाही, व्यवहारिक राहणं ही तितकच महत्त्वाचे आहे हे मी शिकली होती...आज विक्रमला जी नैना भेटायला जात होती तीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होती, आपल्या संवेदना नुसतच रडण्यातून दाखवण्यापेक्षा व्यावहारिक राहून अडचणींवर मात करणारी होती....आणि एक ती नैना होती जिला कोणी मोठ्या आवाजात बोललं तरी रडणारी,
छोट्या छोट्या गोष्टीत डोळ्यांत पाणी आणणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळी हुशारी जवळ असूनही आपल्या आवडत्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून स्वतःला कमी लेखणारी....

मला एकदा अभय सरांनी विचारलं होत, "नैना, तू इतकी हुशार, कोणत्याही गोष्टीची जाच पडताळणी केल्या शिवाय कधी काहीही न करणारी, इतके चुकीचे निर्णय का घेतले आयुष्यात?"
त्यावेळेला माझ्याकडे उत्तर नव्हतं...तसं तर आजही नाही सांगता येत काही त्याबद्दल पण एक वाटतं निर्णय चुकीचा असो किंवा बरोबर एकदा तो घेतल्यावर त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवली पाहिजे आपण...आणि अनुभवातूनच तर निर्णय घेण्याची क्षमता वाढते ना आपली, पण हेही खर आहे की अनुभव पण चुकीच्या घेतलेल्या निर्णयातूनच येतात...

कधी कधी आपल्या समोर एखादं चित्र इतक्या उत्कृष्ट पणे सादर केल्या जातात की यापेक्षा परिपूर्ण काहीच नसू शकते अस वाटायला लागतं आपल्याला... विक्रमच्या बाबतीत माझ्यासोबत तेच झालं, त्याने सगळं काही इतक्या उत्तम रित्या माझ्या समोर स्वतःला दाखवलं होत की मला वाटायचं मी शुन्य आहे याच्या समोर..
आज इतक्या वर्षांनी त्याला भेटणार होती, त्याला भेटून त्याला सांगायचं होतं की ज्या नैनाला तू शून्य समजायचा ना, आज तो शून्य तुझ्या उजव्या बाजूला असता तर तु कदाचित आज अनमोल असता.... कदाचित आज आपण सोबत असतो... याच विचारात अभय सरांसोबत माझा प्रवास सुरु झाला होता पुन्हा एकदा विक्रमला भेटायचा....
------------------------------------------------------------
अजूनही तो दिवस आठवतो जेंव्हा त्याने मला भेटायला बोलावलं होतं.....

त्या दिवशी घरी त्याने ज्याप्रकारे आपल्या भावना माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता, मला खुप दडपण आलं होतं, आणि त्यात दुसऱ्या दिवशी त्याने मला भेटायला बोलवलं होतं... तस घरी त्याच्याबद्दल सगळं काही माहीत होतं, पण का जाणो त्यादिवशी नंतर त्याच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती माझी.... पण मला एक नक्की कळून चुकलं होत की ज्या नात्याला मी फक्त ओळख.. फार फार तर मैत्री म्हणून पाहत होती, विक्रमसाठी ते खूप पुढे गेलेलं असेल, एवढं पुढे की त्यात मी आनंदी आहे की नाही, माझ्या ईच्छा काय आहेत हे त्याने पाहूच नये..

दुसऱ्या दिवशी मी कॉलेज ला पोहोचली तर माझ्याआधीच तो गेट वर उभा होता, मी त्याला पाहून न पाहिल्या सारखं केलं आणि पुढे जायला लागली तर त्याने आवाज दिला,

"नैना, मी दिसलो नाही का तुला?"

"हं... हो...अम्म्म ते.." मी जरा गोंधळलीच आणि त्यात अतिशय लाजरी बुजरी अशी मी... त्यामुळे कालच्या त्याच्या घटनेमुळे बोलायला ही संकोचत होती...

"नैना, पुढच्या आठवड्यात मला ट्रेनिंग साठी जायचं आहे त्यामुळे प्लिज आज काहीही करून भेट मला कॉलेज नंतर..आणि तुला यावचं लागेल...."

त्याच्या ह्या 'यावचं लागेल' बोलल्या मुळे माझ्याकडे हो म्हणण्या शिवाय काही पर्याय नव्हता...एकप्रकारे त्याने ओर्डर सोडली आणि मी सुद्धा निमूटपणे ते मान्य केलं, त्याच बोलणंच इतकं कडक होतं की मी नाही बोलूच शकली नाही... असतात काही लोकं अशी आपल्या भवती अतिशय 'डोमिनेटिंग' ज्यांच्या समोर आपलं काही चालत नाही... खरच असे असतात का ते लोक इतके प्रभावी की त्यांच्या समोर आपण आपलं मतच प्रकट करू शकत नाही...?? नाही, अस काहीही नसतं.. खर तर हे आहे की, शांती प्रिय नरम दिलाच्या लोकांना फक्त कोणाचं मन दुखवायचं नसतं किंवा वाद टाळायचा असतो त्यामुळे ते काही बोलत नाही आणि याच गोष्टींचा नेहमी फायदा घेण्यात येतो...पण हेच नरम दिलाचे लोकं निश्चय केल्यावर किती बलदंड बनतात हे कोणाला माहीत नसतं....

कॉलेज मध्ये काही माझं लक्ष लागल्या लागत नव्हतं...खरं तर आपण कोणाला आवडतो ही खरीच खूप सुखदायक भावना असते, मला ते चांगलं ही वाटत होतं पण या सगळ्यांत मला आताच पडायचं नव्हतं....खूप मोठं काही बनावं अशी काही स्वप्न नव्हती माझी पण तरीही स्वतःच्या पायावर उभं राहावं ही किमान इच्छा होती....कॉलेज संमपल्यावर मी बाहेर आली तर विक्रम माझी वाट पाहत उभा होता...

"काय सांगायच लवकर सांगा, मला उशीर होतोय, घरी जायचं आहे.." मी बोलली विक्रमला

"थोडं शांततेत बोलूया का? कॅफे मधे जाऊ एखाद्या.."
अस मुला बरोबर कुठे बाहेर जायची माझी पहीलीच वेळ होती, विक्रम ओळखीचा जरी असला तरी मला भीती वाटत होती, माझं लक्ष सतत याकडे होत की जर घरी जाऊन कोणी सांगितलं माझ्याबद्दल तर काय होईल.. एव्हढ्यात विक्रम बोलला,

"नको टेन्शन घेऊ, घरी माहीत आहे तू माझ्यासोबत आहेस ते.."
मला आश्चर्य वाटलं, मला एवढ्या शीस्तीत ठेवणाऱ्या माझ्या घरच्यांनी कस हे मान्य केलं, तेवढ्यात विक्रमने बोलायला सुरुवात केली...

"नैना, तुला विचित्र वाटत असेल ना आपण एकमेकांना लहानपनापासून ओळखतो तरी तुला अस याप्रकारे का घेऊन आलो मी...,तर सरळ मुद्द्यावरच येतो..तू खूप आवडतेस मला नैना, लग्न करायचंय मला तुझ्यासोबत...आणि हेच सांगण्यासाठी मी तुला इथे घेऊन आलो...पुढच्या आठवड्यात मला ट्रेनिंग साठी जायचं आहे, माझा विचार आहे मी जायच्या आधी आपण साखरपुडा उरकून घेऊ...लग्न करता येईल आरामात..आणि तसही.."

हे सगळं ऐकून मला आश्चर्य कमी राग जास्त येत होता विक्रमचा, हे काय साखरपुडा, लग्न सगळं ठरवूनच आला... माझं काही मत जाणून न घेता मला कस गृहीत धरू शकतो तो..मला विक्रम कडुन ही अपेक्षा नव्हती कधी. मी तर नेहमीच त्याच्या मतांचा, त्याच्या विचारांचा आदर केला आहे , आणि त्याने मला मात्र काहीच विचारू नये..माझ्या आयुष्याचा निर्णय कसा घेऊ शकतो तो..

"हे बघा विक्रम, मी खरच खूप आदर करते तुमचा आणि मला अभिमान ही वाटतो तुमचा की इतक्या लवकर तूम्ही अस यश मिळवलं त्याबद्दल.... पण हे अस अचानक लग्न वैगरे काय आहे, मी आता फक्त सेकंड इयर ला आहे, अजून डिग्री पण पूर्ण झाली नाही माझी....आणि महत्त्वाचे म्हणजे मी कधी तुमच्या बद्दल तसा विचार केला नाही.."
मी विक्रमच बोलणं मधात तोडतच बोलली,

"नैना, शिकण्यासाठी आयुष्य पडलं आहे, आणि मी कुठे म्हणतोय की आताच लग्न करायचं, मी फक्त साखरपुडा करायचं बोलत आहे , लग्न आपण माझी ट्रेनिंग झाल्यावर करू, तोपर्यंत तुझी डिग्री पूर्ण होऊन जाईल...."
मला आता खरच चीड येत होती, विक्रम माझं काहीच न ऐकता, स्वतःचेच प्लॅनिंग मला ऐकवत होता, आणि ती प्लॅनिंग ज्यावर माझं आयुष्य अवलंबून होत..

"विक्रम , मी तुम्हाला सांगत काय आहे आणि तुम्ही बोलत काय आहात... मी तुम्हाला कधी त्या दृष्टीने पाहिलच नाही, मला हे मंजूर नाही आणि तस पण या गोष्टी घरच्यांच्या मर्जीने व्हायला हव्यात.."

"नैना, मी तुला विचारत नाही आहे, सांगत आहे की आपण लग्न करणार आहोत...आणि हे घरच्यांच्या मर्जीनेच होत आहे...आणि तू मला कोणत्या दृष्टीने पाहिलं आणि कोणत्या नाही याचा मला फरक पडत नाही, पण एवढं नक्की आहे की तुला माझ्या सारखा मुलगा शोधून सापडणार नाही हे तुझ्या घरच्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे..."

विक्रमच्या बोलण्यात त्याचा गर्व, त्याची मग्रुरी झळकत होती, पण त्याकडे दुर्लक्ष करत मी माझ्या घरच्यांचा विचार करत होती... आता पुन्हा एक धक्का मला मिळाला होता..का माझ्या घरच्यांनी मला न विचारता माझ्याच आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेतला होता.. आता विक्रमला बोलून काही फायदा नव्हता, मला आधी माझ्या घरच्यांना बोलणं जास्त महत्त्वाचे होते...त्यामुळे मी तिथे काही जास्त न बोलता घरी निघून आली...माझ्या शांत राहील्यामुळे विक्रमला वाटलं की मला काही प्रॉब्लेम नाही या लग्नाला....आणि मला पण कुठे माहीत होत माझे घरचे माझाच विचार करणार नाही...

---------------------------------------------------------
.क्रमशः