Lakshmi - 9 books and stories free download online pdf in Marathi

लक्ष्मी - 9


लक्ष्मीची जिद्द

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार ही बातमी ऐकल्यापासून लक्ष्मी खूपच बेचैन होती. किती मार्क मिळतील ? नव्वद टक्केच्या वर मिळाले तर मेडिकलला जावेच लागेल, नव्वद टक्केच्या खाली मिळाले तर दुसरा पर्याय विचार करता येईल. लक्ष्मीने पक्का निर्धार केला होता की, काही झाले तरी मेडिकलला जायचे नाही. ती रात्रभर त्याच विचारात झोपी गेली. त्याच विचारात गुंग असल्याने रात्री तिला रक स्वप्न पडले. स्वप्नात तिने पाहिलं की, बारावीच्या परीक्षेत तिला 95 टक्के गुण मिळाले त्यामुळे तिच्या बाबांनी तिला मेडिकलला पाठविण्याचा विचार केला. मेडिकलसाठी पहिल्याच वर्षी पाच ते सहा लाख रुपये लागणार होते. त्यासाठी मोहनने आपली एक एकर शेत विक्रीस काढली. परत दुसऱ्या वर्षी एक एकर असे करत करत मोहनने लक्ष्मीच्या मेडिकल शिक्षणासाठी सर्व जमीन विकून टाकली. आता त्याच्याकडे एक गुंठा जमीन ही शिल्लक नव्हती. आई-बाबा आणि राजू मोलमजुरी करून जीवन जगू लागल्याचे चित्र तिला दिसू लागले. हे पाहून लक्ष्मी खडबडून जागी झाली. तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पहाटेची स्वप्न खरी होतात असे कुणी तरी तिला म्हटल्याचे लक्षात आले होते. निकाल ऐकण्यासाठी ती खूपच बेचैन झाली होती. शेवटी एकदाचे दुपारचे एक वाजले आणि लक्ष्मीचा निकाल समजला. तिला 87 टक्के मार्क पडले होते. तिला खूप आनंद झाला पण मोहन उदास झाला. लक्ष्मीला डॉक्टर करावं असे त्याचे स्वप्न होते पण या मार्कावर तिला कोणत्याच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नव्हता. लक्ष्मी मात्र मिळालेल्या मार्कावर खूपच खुश होती. रात्री जेवताना पुढे कोणतं शिक्षण घ्यायचं यावर चर्चा झाली. तेव्हा लक्ष्मीने तिचा पर्याय समोर ठेवला, ती म्हणाली " मी पदवी शिकणार आणि इंग्रजी विषयातून " यावर मोहन काहीच उत्तर दिला नाही. मेडिकल नाही तर इंजिनिअरिंग तरी कर याविषयावर यापूर्वी देखील खूप चर्चा झाली पण लक्ष्मीने इंजिनिअरिंग करण्यास स्पष्ट नकार दिला. माझ्या शिक्षणाचा यापुढे आई-बाबांना कसलेच भार नको म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोहन निरुत्तर झाला. पदवीच्या शिक्षणासाठी जास्त खर्च येणारच नव्हता म्हणून यावर्षी मोहनने शेती कुणाला गहाण दिली नाही. लक्ष्मीने भोसले सरांच्या मदतीने शहरातल्या चांगल्या महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश मिळविला. तिला रोज कॉलेजला येणे शक्य नाही, त्याची रीतसर परवानगी कॉलेजच्या प्राचार्याकडून घेतली आणि घरी बसून अभ्यास करण्याचा निश्चय केला. लक्ष्मीला अभ्यास करण्यासाठी खूप वेळ मिळू लागला. अभ्यासासोबत आपण अजून काही तरी काम करावं म्हणून तिने राजू आणि त्यांच्या मित्राला इंग्रजी विषयाचे शिकवणी घेण्याचे ठरविले. त्याच्या सोबतचे अनेक मित्र ज्यांना इंग्रजी विषयाची भीती वाटत होती असे 15-20 मुले-मुली शिकवणीला येऊ लागली. बघता बघता तिची शिकवणी गावात खूपच प्रसिद्ध झाली. लक्ष्मी मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली नाही, ती जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तिचं प्राथमिक शिक्षण झालं तरी तिचा इंग्रजी विषयावर प्रभुत्व खूप छान होते. नवोदय विद्यालयात माध्यमिक वर्गात शिकतांना पाटील सर नावाचे इंग्रजी शिक्षक लाभले ज्यांनी लक्ष्मीची इंग्रजी विषय परिपक्व केले. पाटील सरामुळे तिची इंग्रजी सुधारली असे म्हटले तरी चुकीचे ठरत नाही. माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग, घटना किंवा व्यक्ती येतात ज्याच्यामुळे आपले जीवन वेगळे वळण घेते. गावातील बरेच पालक लक्ष्मीला इंग्रजी विषयाची शिकवणी घेण्यास विनंती करू लागले. आई-बाबा कामासाठी शेताला जात असत, राजू शाळेला आणि लक्ष्मी आपल्या मायसोबत घरी राहायची. तिने ही विचार केला की, आपला वेळ व्यतित होण्यासाठी शिकवणी घेणे हा चांगला पर्याय आहे, शिवाय चार पैसे देखील मिळतील. लगेच तिने सर्वांसाठी शिकवणी वर्ग सुरुवात केली. तिच्या शिकवणीला आता 15-20 च्या जागी जवळपास 50-60 मुले-मुली येऊ लागल्या. शिकवणी वर्ग घेताना मूळ अभ्यासाकडे तिने दुर्लक्ष केले नाही. राजू दहावीच्या परीक्षेत चांगले 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. तिच्या शिकवणीचा फायदा राजुला, त्याच्या मित्राला तर झालाच शिवाय गावातील शाळेचा निकाल ही उंचावला. म्हणून गावकऱ्यांनी तिचा सत्कार करण्याचे ठरविले. पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी गावातल्या शाळेत लक्ष्मीचा सत्कार ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला भोसले सरांना आवर्जून बोलाविण्यात आले होते. व्यासपीठावर अनेक मंडळी बसली होती, त्यात आपल्या बाबाला पाहून लक्ष्मीचा उर भरून आला. गावातील सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, शाळेचे मुख्याध्यापक, गुरुजन सर्वांनी तिचा टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि सन्मान केला. संपूर्ण गावाला लक्ष्मीचा अभिमान वाटत होता. ती भाषणात म्हणाली, " खरं तर मी काहीच असे मोठे काम केलं नाही, माझ्याजवळ असलेलं ज्ञान मी इतरांना दिले. खरा सन्मान माझ्या भोसले गुरुजींचा करावं, ज्यांच्यामुळे मी घडले, त्यांनी मला लहानपणी अनेक गोष्टी शिकविल्या ज्यामुळे मी असे घडले. हा सन्मान माझा नसून माझ्या बाबांचा आहे. त्यांनी माझ्या शिक्षणात कुठेच अडचण येऊ दिली नाही. स्वतःच्या शेतात मोलमजुरी केली पण मला शिकवलं. नाही तर आजकाल मुलींचे शिक्षण म्हणजे गावात जेवढ्या वर्गापर्यंत शाळा तेवढंच त्यांचं शिक्षण. पण माझ्या बाबांनी मला खूप शिकवलं, त्यांची ईच्छा होती की मी डॉक्टर व्हावे पण माझी ईच्छा आहे की मी शिक्षिका व्हावं. भोसले सरांना मी लहान असतांना माझं स्वप्न सांगितले होते की मी शिक्षिका होणार आणि गोरगरीब मुलांना शिकवणार " तिच्या भाषणावर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. मोहनच्या चेहऱ्यावर आनंद झळकलेला दिसून येत होता. भोसले सर देखील लक्ष्मीच्या भाषणाने खूप आनंदी झाले. लक्ष्मीने खूप अभ्यास करून पदवीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. शिकवणी वर्ग घेत असल्याने लक्ष्मीजवळ बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते. तिने बी. एड.ला प्रवेश मिळविला. एक वर्षाचा अभ्यासक्रम बघता बघता संपला. इकडे राजू बारावी सायन्समधून 95 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. राजूला मेडिकलला पाठवावे ही लक्ष्मीची मनोमन ईच्छा होती. पण आर्थिक प्रश्न त्यांना सतावत होता. मोहनने आपली एक एकर शेती विकण्याचा निश्चय केला. त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. लक्ष्मीजवळ देखील तेवढी मोठी रक्कम नव्हती. खरंच गरिबी माणसाला चहूबाजूनी विळख्यात घेते. अशा वेळी काय करावं हेच सुचत नाही. अखेर राजूचे मेडिकलमध्ये प्रवेश निश्चित झाले. लक्ष्मी आपली शिकवणी चालूच ठेवली होती. वर्तमानपत्र वाचतांना तिला एका शाळेची जाहिरात दृष्टीस पडली. इंग्रजी शिक्षक पाहिजे म्हणून ती जाहिरात होती. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे म्हणून ती मुलाखतीला गेली. मुलाखत घेणाऱ्यांनी लक्ष्मीचे कागदपत्रे व गुणपत्रक पाहून हैराण झाले. सर्वच विषयात टॉपर असलेली ही मुलगी एक शिक्षिका म्हणून काम करू इच्छिते आहे. त्या शाळेच्या टीमने तिची विनाअट निवड केली आणि दुसऱ्याच दिवशी शाळेवर हजर होण्याचे सुचविले. लक्ष्मीला काय आनंद झाला ! तिने तात्काळ आपले घर गाठले आणि आई-बाबा, माईच्या चरणी साष्टांग दंडवत टाकून गोड बातमी दिली. माईने मोहनच्या बाबाच्या फोटोसमोर साखर ठेवली आणि लक्ष्मीचे तोंड गोड केली. तिने आपल्या जिद्दीच्या बळावर शिक्षिकेची नोकरी मिळवली. महिन्याकाठी तिला चांगला पगार मिळू लागला त्यामुळे मोहनची आर्थिक चिंता मिटली. राजुचे मेडिकल शिक्षण पूर्ण होईल याचा विश्वास लक्ष्मीच्या मनात निर्माण झाला. एके दिवशी माय लक्ष्मीला जवळ बोलावून म्हणाली, " लक्ष्मी, शिक्षण झालं, नोकरी मिळाली, आता लग्नाचं तेवढं बघ " यावर लक्ष्मी म्हणाली, " माई, लग्नाची काय घाई करतेस, राजू डॉक्टर होऊ दे मग लगीन करेन " यावर माय म्हणाली, " हाय रे देवा, तोवर किती वय होईल तुझं, त्या वयाचा पोरगं तरी भेटायला हवं" लक्ष्मीने हसत हसत उत्तर दिलं, " भेटेल मग माय, तू कशाला काळजी करतेस ? " असे म्हणून लक्ष्मी निघून गेली. लक्ष्मीला नवरा कसा मिळेल ? या विचारात माय गढून गेली.
क्रमश:

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769