Shree Datt Avtar - 6 books and stories free download online pdf in Marathi

श्री दत्त अवतार भाग ६

श्री दत्त अवतार भाग ६

१४ ) गरुडेश्वर (नर्मदा, गुजरात)

हे क्षेत्र गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात येते.

सुरत-अहमदाबाद या बस मार्गावर अंकलेश्वर हे गाव लागते.

तेथुन बस मार्गाने राजपिपला मार्गे गरुडेश्वर ६८ कि.मी. अंतरावर आहे.

या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे.

हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे.

सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे.

नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे.

एक अपत्य झाल्यावर त्यांच्या पत्नीसह बालकाचे निधन झाले.

समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्त अवतार असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात व्यक्त केला गवला असे मानतात .
असे महान योगी सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत विलीन झाले.

१५) कर्दळीवन

नृसिंह सरस्वती यांनी तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले.

नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपर्‍यात एक गुहा होती.

त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते.

त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले.

असे म्हणतात की ३५० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते.

त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते.

ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते.

वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता.

एके दिवशी एक आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता.

भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला.

तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले.

श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी समर्थरूपाने बाहेर पडले.

लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथे गेले.

तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना ‘पुष्पाचे आसन’ करायला सांगितले.

शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली.

त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले.

त्यावर शेवंती, कुमुद, मालती इ. फुले पसरून पुष्पासन तयार केले.

त्या दिवशी गुरू कन्या राशीत होता, बहुधान्य नाम संवत्सर होते शके १४४० , उत्तरायण सुरू होते.

त्या दिवशी प्रातःसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले, पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे गेले आणि दिसेनासे झाले.

कर्दळीवनात सर्वत्र ते चैतन्यरूपाने राहत आहेत अशी समजूत आहे.

दत्तसंप्रदायातील सर्व परंपरांचा कर्दळीवनाशी अतूट असा संबंध आहे.

पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे गुरू बालमुकुंद बालावधूत महाराज हेही अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यजवळील कर्दळीवनामध्ये गेले, असा उल्लेख आहे.

रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तावतार श्रीधरस्वामी यांनीही कर्दळीवनाची परिक्रमा केली होती.

कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळ आहे.

तेथे कृष्णा नदी पाताळगंगा या नावाने ओळखली जाते.

हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे.

कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात.

कर्दळीवन परिक्रमेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत.

कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे.

तसेच ती सिद्धांची भूमी आहे.

नागार्जुन, रत्‍नाकर इत्यादी सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन.

कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते, अशी समजूत आहे. कर्दळीवनात विलक्षण दैवी अनुभव येतात.

वीरशैव समाजामध्येही कर्दळीवनाचे अपरंपार माहात्म्य असून कर्नाटकातील थोर संत अक्कमहादेवी यांनी कर्दळीवनामध्ये तपश्चर्या केली आणि त्या तेथेच मल्लिकार्जुनामध्ये विलीन झाल्या अशी श्रद्धा आहे.

अशाप्रकारे श्रीदत्त संप्रदाय आणि इतरही आध्यात्मिक संप्रदायांमध्ये कर्दळीवनाचे विशेष माहात्म्य आहे.

आपल्या अवतार समाप्ती नंतर श्री नृसिंह सरस्वती याच कर्दळीवनात गुप्त झाले व येथेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले….

श्री दत्तात्रयांचे १९ अवतार खालीलप्रमाणे आहेत ...

१) यदुराजा

ययाती राजाच्या संबंधात अशी कथा आहे .

दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा अशा दोन पत्नी होत्या.

ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता.

त्यांनी संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत त्याने अनेक वर्षे राज्य केले.

कालांतराने तो वृद्ध झाला,मात्र तरीही त्याची भोगलालसा काहीं कमी होईना.

त्याला शुक्राचार्यांनी आशिर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील.

त्याला देवयानीपासून यद् व तुर्वस्तु असे दोन आणि शमिष्ठेपासून अनू, द्रह्यु आणि पुरु असे तीन एकुण पाच पुत्र झाले होते.

त्याने पाचही पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली.

तेव्हा पुरूने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले.

त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगलेत तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल असे सांगितले.

तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले आणि त्याला राज्याचा एकही भाग दिला नाही.

भविष्यात राजा बनल्यावर पुरू राजाने आपल्या ज्येष्ठ भावाला, यदूला राज्याचा वाटा दिला.

हा यदूराजा अत्यंत नीतिमान आणि श्रीदत्तात्रेयांची असीम भक्त होता.

वडलांनी हाकलून दिल्यानंतर तो श्रीदत्तात्रेयांच्या शोधात भटकत होता.

एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले.

तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला, त्याच्या डोळ्यांमधून अश्रुपात सुरू झाला.

त्याने श्रीदत्तात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली.

त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली.

यदुराजाने श्रीदत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली.

त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य केले.

त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला.

याच यशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.

यदू हा श्रीदत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान केले.

'दत्तोsहम्' प्रबोधका | श्रीकृष्णा जगदीश्वरा ||

योगेश्वरावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

"दत्तोsहम्" या मंत्राचा उपदेश करणाऱ्या (मी स्वतःला देतो म्हणजे माझे सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतो - ही समर्पणाची भावनाच भक्तिमध्ये सर्वात महत्वाची आहे. तरच भक्त सद्गुरूकृपेस प्राप्त होतो.) श्रीकृष्णस्वरूप संपूर्ण जगाचे ईश्वर असणाऱ्या, योगीराज अवतार धारण करणाऱ्या, श्रीदत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

क्रमशः