Shree Datt Avtar - 8 books and stories free download online pdf in Marathi

श्री दत्त अवतार भाग ८

श्री दत्त अवतार भाग ८

५) कार्तवीर्य सहस्रार्जुन

कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला.

त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते.

कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता त्याला शंभर पुत्र झाले होते.

परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधुन च्यवनऋषींनी त्याला शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले.

महाराणी शीलधारा याज्ञवल्क त्रदृषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली.

मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती.

मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले.

कृतवीर्य आणि महाराणी शीलाधरा यांनी मन:पूर्वक निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल असा आशिर्वाद दिला.

हा मुलगा म्हणजेच सम्राट कार्तवीर्य अर्जुन.

कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले आणि तो अरण्यात निघून गेला.

कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म आणि प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे, याबाबत कार्तवीर्य अर्जुन शंकित झाला.

तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला, तेव्हा गर्गमुनींनी त्याला श्रीदत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले, दत्तप्रभूच्या आशिर्वादाने तुला राज्यधर्माचे तर यथार्थ ज्ञान मिळेतच त्याचबरोबर अनेक सिद्धी, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होतील, कारण श्रीदत्तात्रेय म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत असेही गर्नमुनींनी सुचवले.

हे ऐकून कार्तवीर्य अर्जुन श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमामध्ये गेला.

कार्तवीर्य अर्जुन अतिशय निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता.

संपूर्ण पृथ्वीचा अधिपती व्हायची त्याची इच्छा होती.

त्यासाठी वाटेल तेव्हढे परिश्रम करायची त्याची तयारी होती.

तो श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमी पोहोचला तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी त्याला निरुत्साही केले.

मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणारा आहे.

मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही.

तू त्वरित निघून जा असे श्रीदत्तात्रेयांनी त्याला सुनविले.

पण तरीही दृढ़ निश्चयाने तो तेथेच सेवा करीत राहिला.

काही काळाने दत्तप्रभूंनी त्याचे दोन्ही हात क्रोधाने जाळून नष्ट केले.

तरीही कार्तवीर्य अर्जुन त्यांची सेवा करीत तेथेच राहिता.

त्याची श्रद्धा तसूभरहीं ढळली नाही.

त्याचा हा दृढ सेवाभाव पाहून श्रीदत्तात्रेय प्रसन्न झाले.

त्यांनी त्याला यथार्थ ज्ञान दिले. धर्माचा उपदेश केला.

याचबरोबर सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला बहाल केले.

योगज्ञान आणि ब्रह्मज्ञानही त्याला दिले.

त्याला एक हजार हात प्रदान केले.

म्हणूनच कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन म्हणून पुढे विख्यात झाला.

याचबरोबर त्याला अनेक सिद्धी, शस्त्रे, अस्त्र प्राप्त झाली.

याद्वारे त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि तो महासम्राट होऊन सप्तद्वीप पृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्यसहस्रार्जुन हा श्रीदत्तात्रेयांचा अतिशय लाड़का शिष्य होता.

त्याने श्रीदत्तात्रेयांची कृपा संपादून अदभुत ऐश्वर्य प्राप्त केले आणि शेकडो वर्षे पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगले.

६) अलर्क

राजा अलर्क हाही श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो.

त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते.

राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती.

राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता.

त्याच्या आईचा उपदेश त्याला मिळत होता.

कालांतराने राजा अलर्क ऐषआरामामध्ये गर्क झाला, खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात तो इतका गुंतून झाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला.

प्रजेकडे दुर्लक्ष झाले.

सगळीकडे अराजक माजले.

त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली.

आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले.

यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्काला वठणीवर आणायचे त्याने ठरविले.

त्याने काशिराजाशी संपर्क साधला.

त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायचे असे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलर्क राजावर चालून गेले.

इकडे अलर्क बेसावध होता.

सुबाहू आणि काशिराजाने राज्याला वेढा दिल्याने अरुया राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली.

अलर्काला अतिशय दुख्ख झाले. काय अरावे त्याला सुचेना .
मग त्याला आठवले की पूर्वी अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून त्याच्या आईने, राणी मदालसाने त्याला एक अंगठी दिली होती.

तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की जीवनात कोणताही उपाय उरला नाही असे प्राणांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पाहा.

त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटामधून बाहेर काढेल.

अलर्काला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला.

त्यावरील संदेश त्याने वाचला. त्यावर लीहीले होते

_”सर्व संकटाचे मूळ कारण कामना आहे.

दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी.

सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय यांना शरण जावे.

ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत.”

तो उपदेश वाचून राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांना शरण गेला.

श्रीदत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले.

त्यांनी त्याला अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि विवेकबुद्धी प्रदान केली.

त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले, आपण दोघेही एक आहोत, तेव्हा हे राज्य तूच सांभाळ असे त्याने सुबाहूला विनविले.

सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूची कृपा झालेली आहे.

त्याने अलर्काला सांगितले की तुच तुझे आणि माझेपण सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ आणि राजधर्माचे पालन करुन प्रजेचा प्रतिपाळ कर.

या नंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला.

श्रीदत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवटपर्यंत तो दत्तभक्तीमध्ये निरंतर रममाण होऊन राहिला.

७) प्रल्हाद

हिरण्यकश्यपू या दैत्यराजाचा हा मुलगा विष्णूचा परम भक्त होता.

तो सतत 'नारायण नारायण' असा जप करीत असे.

प्रल्हादाला विष्णूचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा हिरण्यकश्यपूने फार प्रयत्न केला.

परंतु त्याचा काहीच परिणाम होईना, उलट त्याचे नारायण प्रेम वाढतच होते.

हिरण्यकश्यपूने त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकले, कड्यावरून खाली फेकून दिले, तलावामध्ये पाण्यात बुडविले परंतु प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले.

शेवटी कुठे आहे तुझा नारायण, या खांबामध्ये आहे का असे म्हणून हिरण्यकश्यपूने एका खांबावर लाथ मारली तेव्हा त्यातून नृसिंह अवतार प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचा अंत केला.

विष्णूने नृसिंह अवतारामध्ये प्रल्हादाला दर्शन दिले.

त्यानंतर प्रल्हाद दैत्यकुळाचा राजा बनला.

त्याने नीतिने राज्य केले, जरी त्याला विष्णूने दर्शन दिलेहोते, तरी अद्याप त्याला ब्रह्मज्ञान झाले नव्हते. त्यासाठी त्याने श्रीदत्तात्रेयांची उपासना केली.

श्रीदत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन त्याला यथार्थ उपदेश केला आणि त्याला मुक्तिपदावर अग्रेसर केले,

८) सांस्कृती

सांस्कृती हा सुद्धा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता.

तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे.

त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभली.

श्रीदत्तात्रेयांनी त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली.

शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दत्तप्रभूनी दर्शन दिले.

त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देष्याची प्रार्थना केली.

त्यांना विचारले की अवधूतांची स्थिती, लक्षणे आणि संचारण कसे असते?

तसेच त्याने योगमार्गाचे आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले.

श्रीदत्तात्रेयांनी त्याला जी उत्तरे दिली त्याला 'अवधूतोपनिषद' आणि ‘जाबालदर्शनोपनिषद' असे म्हणतात. अवधूतोपनिषदामध्ये अवधूतांची लक्षणे आणि जीवनपद्धती यावर भाष्य केले आहे. जाबालदर्शनोपनिषद म्हणजे अष्टांग शास्त्राचे सार आहे.

जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे.

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत.

परमहंस पदाचेही वर्णन यामध्ये आले आहे.

सांस्कृतीने श्रीदत्तात्रेयांचे वर्णन चतुर्भुज, भगवान, योगसम्राट, सकल ऐश्वर्य पंडित, महाधिराज, महायोगी असे केले आहे.

क्रमशः

Share

NEW REALESED