Bibatya books and stories free download online pdf in Marathi

बिबटया

बिबटया

गेल्या महिनाभरापासून बालाघाटाच्या डोंगररांगेत व परिसरात बिबटया आल्याची जोरदार चर्चा सुरु होती. बहरात आलेल्या ‍पिकांना ‍दिवसा लाईट नसल्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ‍ भितीचे वातावरण होते. एकाला दुसरा सोबत असल्या ‍ शिवाय कोणी शेतामध्ये जात नव्हते. शेतात राहणारी माणसं बिबटयाच्या दहशतीने जीव मुठीत धरुन राहत होती. शेजारच्या तालुक्यातील गावांमध्ये बिबटयाने शेतात काम करणाऱ्या बायांवर, माणसांवर हल्ला केल्याच्या घटना वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होत होत्या. हिवाळयाचे दिवस असल्याने सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणारे पोरं बिबटयाच्या दहशतीने व्यायामाला जात नव्हते. तरुण मुले बिबटयाचा फोटो व त्या खाली भाऊंची गावात जोरदार एन्ट्री अशी टॅग लाईन लावून व्हॉटसअपला स्टेटस ठेवत होती. बिबटयाला शोधण्यासाठी वन विभागांची पथके पाळतीवर होती. तरीही बिबटया वन विभागाच्या जाळयात सापडत नव्हता.अद्यापही बिबटयाची दहशत कायम होती.

बिबटयाने काही अल्पवयीन मुलांवर देखील हल्ले केले होते. अंगणामध्ये रांगती मुले उचलून नेली होती. तसेच काही शेळया, मेंढया, कोंबडया, म्हशी, गाई यांसारख्या जनांवरावरही हल्ले केले होते. बिबटयाच्या हल्ल्यांमध्ये बरेच माणसं, जनावरं मृत्युमुखी पडली होती. काही जखमी झाली होती. त्यामुळे जनतेमध्ये मोठया प्रमाणामध्ये रोष निर्माण झाला होता.बिबटयाला तात्काळ जेरबंद करा किंवा ठार मारा याबाबत शासनाला अर्ज, निवदेने प्राप्त होत होते. काही राजकारणी मंडळी बिबटयाच्या प्रकरणाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करत होते. नरभक्षक बिबटयाला शोधण्यासाठी बाजूच्या जिल्हयातील वन विभागाची पथकेही दाखल झाली होती. बिबटया दिसल्याबाबत अफवाही परसरत होत्या. कोणी शेतात उमटलेल्या कुत्रे, ससे यांच्या पाऊलावरूनही बिबटया आल्याचे सांगत होते. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारीही परेशान होत होते.मात्र बालाघाटाच्या विस्तीर्ण डोंगर रांगांमध्ये मोकाट संचार करत होता.

अशातच काल रात्री वाघमारेच्या बाबुला रात्री रानात शेताला पाणी देत असताना बिबटया दिसला होता. तो रात्रभर रानातल्याच खोलीत लपला होता. सकाळी तो गावात आला. आणि ..........‍बिबटया गावात आल्याची जोरदार बातमी सगळया गावभर पसरली. दुसऱ्या दिवशी पेपरला बाबु वाघमारे या शेतकऱ्याला बिबटया दिसल्याची बातमी प्रसिद्ध झाली. जो तो बाबुला बिबटयाच्या बाबतीत विचारात होता. बाबुही आहे त्यापेक्षा जास्त मसाला लावून फुशारकी मारून लोकांना आणखी फुगवून सांगत होता. खरं तर बाबुलाही तो बिबटयाच होता हे ‍नक्की माहित नव्हतं. कारण अंधारात त्याला ते स्पष्ट दिसलं नव्हतं.

आता गावात वन विभागाचे लोक आले. त्यांनी पावलांच्या ठशावरून तो बिबटयाच असल्याचे सांगीतले.गावातील लोक आणखी भयभीत झाले.

सुर्य आल्या पावली परत चालला होता. त्यामुळे आता अंधार दाटून येऊ लागला होता. आणि थोडयाच वेळात सगळीकडे दाट काळोख दाटून आला. देसायाच्या गण्याला दिवस मावळता पांदीला जायची सवय होती. पण आता बिबटयाच्या ‍ भितीमुळे तो तिकडे जायचे टाळणार होता. पण...... आता कंट्रोल होणारच नाही हे त्याच्या लक्षात आले. तो डबा घेवून पांदीला निघाला. जाता-जाता तो त्याचा जीवलग मित्र संत्याला बोलवायला त्याच्या घराकडे गेला. संत्याला माहीत होतं. हे गण्या आपल्याला सोबत चल म्हणून रात्री नक्कीच बोलवायला येणार आहे. त्यामुळे संत्याने आधीच त्याच्या बायकोला गण्या आला तर त्याला मी घरी नाही म्हणून सांग म्हणून सांगून ठेवले होते.

गण्यानं बाहेरून हाक मारली.

"संत्या!"

संत्याची बायको बाहेर आली.

तसं गण्या म्हणाला, "वैनी!संत्या हाई का?"

ठरल्याप्रमाणे संत्याच्या बायकोनं संत्या घरात नसल्याचे सांगीतले.

गण्या एकटाच डबा घेवून पांदीकडे निघाला. गाव मागं पडून पांद सुरु झाली. तशी त्याच्या मनात भिती भरली. तो पांदीत उतरला. खाली बसला. तेवढयात त्याच्या बाजूला त्याला काही तरी हालचाल जाणवली. त्याने पटकन उरकलं. तो उठून उभा राहिला. सगळीकडे दाट काळोख होता. समोरचे काहीच दिसत नव्हते. झाडाखालचा पाचोळा कशाच्या तरी चालल्याने वाजत होता. गण्यानं हिंमत करून बॅटरी त्या दिशेला चमकावली. तर तेथे भलामोठा साप सरपटत चाललेला त्याला दिसला. तो साप त्याच्या पासून दूर निघून गेला. गण्यानं सुटकेचा निश्वास सोडला. पण त्याचं पोट पूर्णपणे साफ झालं नव्हतं. त्यामुळे तो परत पांदीजवळच्या बाबराच्या शेतातील हौदाजवळ आला. त्याने डबा पाण्यानं भरून घेतला. आणि तो परत पांदीकडे आला. यावेळी मात्र त्याचं पोट चांगलं रिकामं झालं. तो पांदीमधून वर चढला. तेवढयात चिंचाच्या झाडामागे दबा धरून बसलेल्या बिबटयानं त्याच्यावर हल्ला चढवला. गण्या मोठमोठयानं ओरडु लागला. बिबटयानं त्याला चांगलं तीस फुट फरपटत नेलं. गण्या मोठमोठयानं ओरडत होता. तितक्यात काही लोक हातात काठया घेवून पळत आले. लोकांना पाहून बिबटया पळून गेला. गण्या खुप भेदरला होता. तो बेशुद्ध पडला होता. गण्याच्या गळयात मफरल होती. त्यामुळे तो वाचला होता. दुसऱ्याच दिवशी गण्यानं संडास बात्रुमचे बांधकाम धरलं. गावात संडास बात्रुम बांधण्यासाठी आलेला शासनाचा निधी राजकीय मंडळींनी हडप केला होता. गण्यावर झालेल्या हल्ल्याने लोक पुढाऱ्यांना शिव्या देवू लागले.कारण आता सगळयांचीच पांदीला जाण्याची पंचाईत झाला होती. भितीपोटी लोक अर्धेच जेवण करत होते.आता गावातील, शेतातील वातावरण तणावाचे झाले होते. वन विभागाचे पथक गावात डेरा देवून बसले होते. पण प्रत्येक वेळी बिबटया त्यांना हुलकावणी देत होता.

गावाच्या बाहेर शेतातील झोपडीत राहणारे बिऱ्याचे कुटुंबही भयभीत झाले होते. झोपडीला पक्का दरवाजा नव्हता. त्यामुळे बिऱ्या आज सकाळीच दरवाजा बणवण्यासाठी गावातील सुताराकडे गेला होता. बिऱ्याच्या बायकोने राधाने एक वर्षाच्या आपल्या लेकराला पाजलं आणि खाटाला बांधलेल्या झोळीत झोपी घातलं. ती पटांगणात झोपडीच्या बाजूला धुणं धु लागली. थोडयाच वेळात तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिनं पटकन बाळाकडे धाव घेतली. तेवढयात तिला रक्ताच्या थारोळयात पडलेली मांजर दिसली. समोर पाहताच झोळीजवळ तोंडाला रक्त लागलेला बिबटया दिसला. तो बिबटया ती धुणं धुत असलेल्या विरुद्ध बाजूने आला होता.बिबटयाला पाहताच तिच्या हातापायतलं आवसान गळालं, घशाला कोरड पडली. बिबटयानं एकवार तिच्याकडे पाहिलं, व नंतर झोळीतल्या त्या तान्हया बाळाकडं पाहिलं.हे उमदं जनावर आता कोणत्याही क्षणी आपल्या बाळावर झडप घालीन या विचाराने तिच्यातलं आईपण जागं झालं. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी ती मरण्या- मारण्याला तयार झाली. तिनं बाजूलाच असलेला विळा हातात घेतला. आता एका रक्ताला चटावलेल्या बिबटयापुढं आपल्या बाळाला वाचवण्यासाठी वाघीणीच्या काळजाची राधा उभा होती. क्षणार्धात बिबटयानं तिच्यावर झेप घेतली. त्यासरशी ‍तिने आपल्या हातातील विळा आडवा फिरवला. बिबटयाच्या पंज्याला जखम झाली. बिबटयाच्या धारदार नखाने राधापण जखमी झाली. बिबटया आक्रमक होत होता. राधापण त्याला झुंज देत होती. तितक्यात बिबटयाला काही तरी लागले.तो खाली पडला. राधाने बाजूला पाहिले. वन विभागाचे कर्मचारी होते. त्यांनीच बिबटयाला बेशुद्ध्‍ करण्याचं इंजेक्शन मारलं होतं. राधाने बिबटयाला मारण्याचा प्रयत्न केला. तेवढयात वन विभागच्या लोकांनी तिच्या हातातील विळा घेतला. राधा बिबटयाला मारण्याचा हट्ट करू लागली. पण वन विभागाच्या लोकांनी तिला त्याला मारु दिले नाही. आपणच प्राण्यांचं जंगलं उद्घ्वस्त्‍ करून त्यांच्याच घरामध्ये आपण राहत आहोत. दोन दिवसांपुर्वीच बिबटयाच्या मादीने पिलांना जन्म दिला होता. पण काही अज्ञात लोकांनी त्या पिलांना मारल्याचे फोटो अधीकाऱ्यांनी तिला दाखवले.बिबटयाची मादीही ताब्यात घेतल्याचे त्यांनी तिला सांगीतले. तेव्हा ती पण शांत झाली. शेवटी आपल्यातही आपल्या बाळामुळेच एवढी हिंमत आली. हे ही तिच्या लक्षात आलं. तिने पटकन आपल्या बाळाला उचलून घेतलं.

राधाच्या शौर्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक झाले. नरभक्षक बिबटया पकडल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले.