Manachya vaatevarti Avyakt to an mi - 5 books and stories free download online pdf in Marathi

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 5

पुढे...

मानवी मन किती अतर्क्य आणि अजब आहे ना??? म्हणजे जर सगळं आपल्या मनाप्रमाणे होत असेल तर ठीक, नाहीतर कुठे जरी थोडी विसंगती आढळली तर मनाला वाटेल ते निष्कर्ष काढून मोकळा होतो...खूप वेळा तर असं होतं की, आपण जे डोळ्याने पाहतो, किंवा कानाने ऐकतो ते तसं नसतंच.. हकीकत वेगळीच असते.. पण तेच आहे ना, आपण ज्या नजरेने त्या गोष्टी कडे पाहणार आपल्याला समोरची गोष्ट तशीच दिसणार... अश्यावेळी कोणत्याही तर्क वितर्कावर न जाता स्पष्ट बोलून मोकळं व्हावं म्हणजे पुढचे गैरसमज टळतात... पण हेच नाही जमलं ना..मलाही आणि अतुललाही...आम्ही दोघेही फक्त लाटा येतील तसं वाहवत होतो पण थोडा विसावा घेऊन त्यावर विचार करून, बोलून, कधीच मार्ग नाही काढले किंवा काय ते स्पष्ट करण्याची तसदी नाही घेतली...

त्यादिवशी रशु चे शब्द ऐकून अतुल एकाएकी निघून गेला पण त्याच्या विचारांनी माझी पाठ काही सोडली नाही...त्यादिवसानंतर जेंव्हा कधी आमचा सामना झाला त्याने एक नजर उचलून मला पाहिलं ही नाही...असं कसं शक्य आहे?? मी एकदा दोनदा त्याला बोलण्यासाठी सरसावली ही, पण त्याने मात्र तेथून काढता पाय घेतला...त्याच्या ह्या नाराजीचं कारण कळत नव्हतं...मला कळत नव्हतं की नेमकं झालं काय आहे?? त्याचं असं मला दुर्लक्षित करणं, माझ्या मनाला आतून जळवत होतं... एकदा तर वाटलंच की त्याला बोलून मोकळं व्हावं...पण बोलणार तरी काय?? काय सांगू त्याला?? की तू माझ्याकडे का बघत नाहीस???बरं हे विचारावं तरी कोणत्या अधिकाराने?? आणि मला का असं वाटतं की त्याला माझी पीडा कळावी??? का एवढा फरक पडतोय मला त्याच्या अश्या वागण्याचा??? बाप रे..!! किती ते प्रश्न पडतात मला...शेवटी निर्णय घेतलाय की त्याला काहीही बोलायचं नाही, त्याच्याकडे बघायचं नाही...हो... ठरलं हे...पून्ह एकदा मी माझ्या मनाला वार्निंग देऊन मोकळी झाली...पण मन ते मन आहे, आजपर्यंत कोणाच्या मनाने ऐकलं आहे, जे माझं ऐकणार होत??? माझ्या मनाची अरेरावी काही केल्या कमी होणार नव्हती...

लग्नाआधी साखरपुडा होणार होता मीनल ताईचा...त्याची तयारी ही सुरूच होती...एका दिवशी सगळे बसलेले असतांना मीनल ताईने सगळ्यांसाठी सरबत बनवलं, माझा आणि किचन चा दूर दूर पर्यंत काहीही संबंध नसल्याने मी फक्त तिला काय हवं काय नको हे देण्याचं निंबु टिंबु कामं करत होती... आम्ही दोघींनी मिळून सगळ्यांना सरबत दिलं, त्यांनंतर तिला आठवलं की तिने अतुलला सरबत दिलंच नाही.. ती त्याला सरबत द्यायला जाणार तर तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला..आता इतका महत्वाचा फोन म्हटल्यावर तिला भाऊ काय, साक्षात ब्रम्हदेव ही दिसले नसते तिला...त्यामुळे तिने तिच्या हातातलं कामं मला सोपवलं आणि गेली निघून गप्पा मारायला...आता आम्हाला..म्हणजे मला आणि अतुलला आमचं कोडं सोडवता येतं नव्हतं, पण विचार केला तिला तरी हे क्षण जगून घेऊ दे...त्यामुळे मी तो ग्लास घेतला आणि गेली अतुलला शोधायला...

तो रूमच्या गॅलरीत फोनवर बोलत होता..आधी तर मला वाटलं की बोलत असेल तो मित्रांसोबत पण त्याच्या तोंडून जेंव्हा एका मुलीचं नाव ऐकलं तेंव्हा अशी तळपायाची मस्तकात गेली काय सांगू?? त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं म्हणून उगाच टेबलवर ठकठक केली.. त्याने एकदा माझ्याकडे वळून पाहिलं आणि पुन्हा त्याचं फोनवर त्या मुलीसोबत हाहा हीही हुहू सुरू झालं...त्याचं आपल्या मैत्रिणीबरोबर असं हसून हसून बोलणं मला त्रास देत होतं..माझा पाराही चढत होता त्यामुळे मी पुन्हा ग्लास ठेवला खाली आणि पुन्हा एकदा जोरात टेबल वाजवला..आता त्याने मात्र फोन कट केला आणि खूप जोरात माझ्यावर ओरडला,

"काय आहे??? कळत नाही का? मी बोलतोय फोनवर ते...किती जोरजोरात आदळआपट सुरू आहे तुझी..."

एक तर आधीच तीन दिवसांपासून त्याचं असं रुक्ष वागणं मला टोचत होतं आणि त्यात आज असं अचानक रागावणं मला खूप त्रास देऊन गेलं..माझे डोळे भरून आले... मी त्याला काहीही न बोलता तशीच मागे वळली जायला...त्याला बहुतेक माझ्या डोळ्यांतून वाहणाऱ्या गंगा जमुना दिसल्या असतील त्यामुळे तो माझ्या मागे आला दरवाज्यापर्यंत, पण रूमच्या बाहेर माझी टक्कर मीनल ताईशी झाली त्यामुळे त्याने जागेवरच पाय रोखले...मीनल ताईने ओळखलं मला काहीतरी झालंय म्हणून, पण तिच्या वारंवार आवाज दिल्यावरही मी मात्र थांबली नाही तिथे आणि घरी निघून आली...

रूममध्ये आल्यावर मी आधी मनभरून रडून घेतलं... अतुलचं असं वागणं मला अचंबीत करत होतं..त्यादिवशी जेंव्हा दोन वर्षानी आम्ही भेटलो तेंव्हा त्याचा डोळ्यांतला आनंद पाहून असं वाटलं होतं की कदाचीत त्यालाही माझ्या बद्दल काही वाटतं असावं..पण विचार केला की हे फक्त माझ्याच मनाचे खेळ असतील, त्याला जर काही वाटतंच नसेल तर मला त्याच्या विषयी काय वाटतं याला काहीही महत्व नाही...त्यामुळे विचार केला की नको त्या भानगडीत पडायचं नाही आणि जसं मीनल ताईचा साखरपुडा होईल तसं आपल्या घरी जायचं, लग्नापर्यंत थांबायचं नाही...

आता मला खरंच अतुलचा राग आला होता, त्यामुळे मी त्याला बघणं टाळत होती आणि बोलणं तर नव्हतंच आमच्यात...माझ्यातला फरक त्यालाही जाणवत होता कदाचित, पण आता मला मात्र त्याचा काहीही विचार करायचा नव्हता...माझा उतरलेला चेहरा माझ्या ताईला दिसत होता, माझं अचानक गप्प गप्प राहणं तिला जाणवत होतं, तिने एकदोनदा मला विचारलंही पण मी मात्र बहाने करून वेळ मारून नेली...तिला वाटलं कदाचित मला आईबाबांची आठवण येत असावी त्यामुळे ती आणि मीनल ताई मला शॉपिंग ला घेऊन गेल्या...तिथे गेल्यावर माझ्या ताईच्या लक्षात आलं की तीने पर्स तर आणली आहे पण पैश्यांची छोटी पर्स घरीच विसरली... तिने अतुलला फोन केला, आणि तोपर्यंत आम्ही ड्रेसेस बघत होतो माझ्यासाठी... मला काहीही पसंत पडत नव्हतं, कारण माझा मुडच नव्हता पण तरीही ताईला वाईट नको वाटायला म्हणून मी गेली...ताईने एक दोन ड्रेसेस बाजूला काढून ठेवले, आणि मला त्याच दुकानावर बसवून दोघी ताई बाजूच्या दुकानावर साड्या बघत होत्या...तेवढ्यात अतुल आला तिथे...मी एकटीच दिसली त्याला..मला वाटलं काही बोलेल तो... पण पुन्हा पदरी निराशाच पडली... मी रागारागत अतुलवर एक कटाक्ष टाकला... दुकानदार ताईच्या ओळखीचा होता त्यामुळे दुकानदाराला सांगितलं ते ड्रेसेस पॅक करायला आणि बाजूच्या दुकानात गेली...सगळं झाल्यावर घरी येऊन मग जेंव्हा सगळं सामान उघडून पाहिलं तेंव्हा ताईने ज्या रंगाचे ड्रेस माझ्यासाठी काढले होते ते नव्हतेच...वेगळेच कलर होते...
ते बघून ताई मला बोलली,

"काय ग?? आम्ही गेल्यावर तू कलर बदलून मगितलेस का?? मी तर वेगळेच कलर निवडले होते??"

मी काही बोलणार इतक्यात मीनल ताई बोलली,

"हो ना...पण हे रंग ही छान आहेत हां.. तुला खूप खुलून दिसतील..आम्हाला का नाही दिसले हे काय माहित...पण हे सुद्धा खूप छान आहेत... तुला माहीत आहे, निळा आणि नारंगी अतुलला ही खूप आवडतो..."
आणि ती बोलता बोलता बोलून गेली..आता मात्र मला कळलं हे सगळं कसं बदललं...हा अतुल पण ना, आतल्या गाठीचा आहे, त्याच्या मनात काय सुरू आहे कोणाला पत्ता लागू देत नाही.. मी स्वतःशीच विचार केला...मला किती गोची केली त्याने, धड मी कोणाला सांगू ही शकत नाही की हे कपडे मी बदलले नाही.. आणि त्याला का एवढी हौस आहे की मी त्याच्याच आवडीचे रंग घातले पाहिजे??? पण मलाही खूप राग आलाय त्याचा... आता त्याने काहीही केलं तरी माझं मन पिरघळणारं नाही...मी तर जसं काही हा विचार करून खुनगाठच बांधली होती...पण मी घेतलेली ही प्रतिज्ञा जास्त दिवस टिकणारी नव्हती...
***********************

रागातलं प्रेम आणि प्रेमातील राग कधीच कोणाला कळत नसतं... आणि हे ज्याला कळलं ते नशीबवान असतात असं मला वाटतं...पण मग आम्हाला ही कळत होतंच ना?? मग का अश्या वाटा वेगळ्या झाल्या असतील आमच्या??? पण नुसतं कळून काय होतं, त्याला वळवावं ही लागतं ना...आम्ही ते केलंच नाही...किंबहुना आम्हाला ते जमलंच नाही... अतुल माझ्यावर इतका कोणत्या गोष्टीसाठी इतका नाराज होता हे मला कळत नव्हतं आणि तो इतर मैत्रिणीसोबत बोलताना मला इतका का त्रास होतो हे त्याला कळत नव्हतं...आम्हाला स्वतःला मात्र काय होतंय हे जाणवलं होतं पण पुढाकार घेऊन सांगणार कोण?? हा अबोला दोघांनाही सहन होतं नव्हता...त्यामुळे चोरून चोरून एकमेकांना बघण्याशिवाय दुसरं काहीच आम्ही करू शकत नव्हतो....

मी बाहेरून कितीही दाखवत होती की मला काही फरक पडत नाही, पण तरीही माझी ओढ काही कमी होतं नव्हती...मी त्याच्यासमोर जरी येण्याचं टाळत होती तरी त्याच लक्ष नसतांना माझं सगळं लक्ष त्याच्या कडेच असायचं...त्याचं ते दिलखुलास हसणं, हसताना त्याच्या उजव्या गालावर पडलेली खळी, त्याचं बोलता बोलता हळूच केसांतून हात फिरवणं, बाईकची चावी बोटात फिरवून गुणगुणणं, त्याचं वागणं...हाय...अजून काय काय सांगू??? त्याचं नुसतं सभोवताली असणंच मला वेड लावून सोडत होतं...भीती वाटायची जर त्यात आकंठ बुडाली तर मला कोणीच तारू शकणार नव्हतं.. त्यामुळे मला आता त्याच्यापासून जितक्या लांब राहता येईल तितके प्रयत्न माझे होते...

मी शक्य तेवढं त्याला टाळत होती...त्याच्या घरी एकदा मीनल ताईला भेटायला गेली आणि आम्ही समोरासमोर आलो..तो काहीतरी बोलण्याच्या तयारीत होता, तसा तो पूढे सरसावलाही होता पण त्याचे ते हावभाव बघून मी तिथे थांबली नाही...खरं तर भीती वाटायची... असं वाटायचं जे मला त्याच्या तोंडून ऐकायचं आहे जर त्याने ते कबूल केलं तर मी माझ्या हृदयाची धडधड कशी थांबवायची?? त्याच्या डोळ्यांत डोळे घालून कसं बघायचं?? आणि मला जे ऐकायचं ते तो बोललाच नाही तर या काचेसारख्या असलेल्या हृदयाला कुठे नेवून जोडायचं?? दोन्ही कडूनही मलाच विचार होता...त्यामुळे काही न बोललेच बरं असं वाटत होतं...

एकदा तर त्याने माझा रस्ताच अडवला, आणि बोलला की त्याला काहीतरी बोलायचं आहे पण मी काही तिथे थांबली नाही किंवा त्याचा एकही शब्द ऐकून घेतला नाही...मला नकोच होता मनस्ताप...!! त्यामुळे तो ज्या रस्त्याने जायचा , मी ते मार्गच चालायचे टाळायची...गेले आठवडाभर हेच सत्र सुरू होतं...एकदा संध्याकाळी रशु खूप वेळ घरी आली नाही म्हणून ताईने मला तीला शोधायला पाठवलं..म्हणजे ती तशी अतुलकडेच खेळत होती पण खूप उशीर झाला आली नाही म्हणून मी गेली तिला बोलवायला...मला वाटलं ती गच्चीवर असेल, त्यामुळे मी तिथे गेली तर तिथे अतुल होता.. त्याला बघताच मी परत वळणार तर त्याने आवाज दिला...

"थांब ना...लगेच का निघालीस??"
माझे चालणारे पाय जागेवरच थबकले, मी बोलली,

"मला उशीर होतोय..." आणि मी जायला निघाली...मी पाऊल उचलेपर्यंत अतुल आला आणि त्याने अचानक माझ्या दोन्ही खांद्याना पकडून मला भिंतीशी टेकवलं..मला आता खूप राग आला होता, तरी काहीही न बोलता मी स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती..पण त्याची पकड खूपच घट्ट होती...शेवटी माझ्या डोळ्यांतून जेंव्हा पाणी सुरू झालं...त्याने त्याचे हात मागे घेतले...आणि बोलला,
"मी गेले दोन तीन दिवस तुला बोलण्याचा प्रयत्न करतोय... पण तू..." त्याचं बोलणं पूर्ण न ऐकता मी बोलली,

"माझ्यामुळे आजही डिस्टर्ब झालं तुला..सॉरी...जाऊदे मला..." आणि मी माझे अश्रू पुसत जाण्याचा प्रयत्न केला तर त्याने पुन्हा माझा हात पकडला आणि बोलला...

"खबर ना थी ऐसा होगा, यार मेरा जब रुठेगा,
तेरे गुस्से के हर लम्हे मे, सौ बार मेरा दिल तुटेगा..।"

त्याचे ते शब्द ऐकल्यावर तर मी पूर्णपणे वितळून गेली... त्याला बघायचं नाही, त्याला बोलायचं नाही, कोणती खूणगाठ मनाशी बांधली होती अन काय?? सगळं माझ्या डोळ्यातल्या पाण्यासोबत वाहून गेलं...मी बोलली होती ना, माझी प्रतिज्ञा जास्त दिवस तग धरू शकणार नव्हती म्हणून....आणि तेच झालं...

"त्यादिवशी साठी सॉरी....." तो पुन्हा बोलला...आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला...मी एकदा मान वरून त्याच्याकडे पाहिलं, माझ्या डोळ्यातलं पाणी अजूनही वाहतच होतं.. त्याने हळूच त्याच्या दोन बोटांनी माझ्या गालांवरून ओरघळणार पाणी पुसलं आणि त्याच्या त्या स्पर्शाने पुन्हा माझ्यात असंख्य लहरी उमटल्या...आता मला काही सुचेना झालं आणि मी तिथून लगेच पळ काढला..आता माझ्या डोळ्यातून जे पाणी निघत होतं ते आनंदाश्रू होते..माझ्या मागे मागे अतुलही आला...मी त्याला मागे वळून बघत असताना अचानक पुढे कोणाला तरी धडकली...आणि जेंव्हा बघितलं तेंव्हा समोर चेतन होता....
**********************
क्रमशः