Kaalay tasme nam - 3 books and stories free download online pdf in Marathi

कालाय तस्मै नमः - 3


कालाय तस्मै नमः| भाग ३


अरुंधती आणि श्रीपादची गोष्ट


स्वराचं बारसं फक्त थाटामाटातच नाही तर कुठलंही विघ्न न येता पार पडलं म्हणून माई काका दोघेही समाधानी होते. त्यात श्रीपाद आणि कैवल्यच्या येण्यानेही भरच पडली होती. बारसं तसं सुट्टीच्या काळातच असल्याने सगळेजण अजून काही दिवस वाड्यातच असणार होते. त्या काळात फोन इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हते.


मोबाईल तर अस्तित्वातच नसल्याने सगळे जण मस्त गप्पा मारत एकत्र बसले होते. बच्चेकंपनी धुडगूस घालण्यात गुंग होती.


काका आणि श्रीपाद एका बाजूला बोलत होते. काका त्याला विचारत होते की तो आता इथेच राहणार आहे ना? त्यावर श्रीपाद म्हणाला, “काका, मी महत्त्वाच्या वेळी आपल्या लोकांसाठी नक्की येईन असा शब्द दिला होता माईला म्हणून आलो होतो. पण सध्या तरी मी इथे राहू शकत नाही.


कैवल्य पुढच्या शिक्षणासाठी जाणार आहे पुढच्या वर्षी. त्यानंतर कदाचित २-३ वर्षांनी मी इथे कायमचा येईन. पण नक्की काहीच सांगू शकत नाही. हो पण काही गोष्टींची जबाबदारी फक्त माझ्यावर आहे. त्यामुळे वेळोवेळी मी हजर होईनच. खरं तर अरुंधती गेल्यानंतर इथे येण्याची माझी इच्छाच होत नाही पण काय करू तिनेच मला शब्दांत बांधलं आहे.”


काकांनी त्याच्या हातावर थोपटले आणि हळूच स्वतःचेही डोळे टिपले.


रात्री उशीरापर्यंत काका विचार करत होते श्रीपादच्या बोलण्याचा. बऱ्याच गोष्टी त्यांच्या नजरेसमोरून आत्ता घडत असल्यासारख्या सरकत होत्या.

‘अरुंधती’ - काकांचे जिवलग मित्र श्यामकांत जोशी ह्यांची एकुलती एक मुलगी. तीही श्रीपाद सारखीच किंबहुना जास्तच विलक्षण. भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल तिला लागते असं लोक म्हणायचे. पण ती श्रीपाद सारखी अलिप्त राहत नसे तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत करत असे. तिच्या मनमिळाऊ स्वभावाला बघूनच काकांनी जोशींना गळ घातली होती तिला सून करून घेण्यासाठी. जोशींनी मात्र त्या काळातही अरुंधतीचाच निर्णय शेवटचा असेल असं सांगितलं होतं. मग तिलाच विचारलं गेलं, त्यावर तिने काकांना हो सांगितलं.


पण त्यासोबतच अत्यंत नम्रपणे हेही सांगितलं की भविष्यात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तशाच कराव्या लागतील, काय ते मी आत्ता सांगू शकत नाही; वेळ आली की सांगेन. पण तेव्हा तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. काकांना श्रीपादच्या अशा बोलण्याची सवय होतीच त्यामुळे त्यांनी अरुंधती जे म्हणत होती त्यावर होकारार्थी मान डोलावली.


थोड्याच दिवसांत चांगल्या मुहूर्तावर श्रीपाद आणि अरुंधतीचं लग्न झालं. अरुंधतीच्या गृहप्रवेशाने घरात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या. गायत्री, काकांची मोठी मुलगी, तिला दिवस गेल्याच कळलं. तिचं लग्न होऊन तशी दोन वर्षे उलटली होती त्यामुळे सगळ्यांना हा अरुंधतीचा पायगुण वाटला.


श्रीधरसाठीही एक चांगलं स्थळ आलं. त्याचंही लग्न जमलं. दोन महिन्यांत लग्न झालंसुद्धा. श्रीधरनंतरच्या भास्करला गावातल्या शाळेतच नोकरी मिळाली होती. त्याच्यासाठी अरुंधतीच्याच मावसबहिणीचं स्थळ आलं, संगीताचं. ते लग्नही पक्कं झालं. अरुंधती तिच्या वागण्याने आधीच घरातल्या लहानमोठ्या सगळ्यांची आवडती झाली होती. त्यात घडत गेलेल्या घटनांनी नकळतच भर घातली. पण म्हणतात न सगळे दिवस सारखे नसतात.

भविष्याच्या गर्भात ज्या गोष्टी होत्या त्यांची कल्पना इतरांना नसली तरी श्रीपाद अरुंधतीला मात्र होती. पण त्यांचं मात्र एकच धोरण होतं, कालाय तस्मै नमः|

ही एकच गोष्ट लक्षात ठेवून ते दोघेही संसार करत होते.

हळूहळू माई काकांची सगळी मुलं मार्गी लागत होती. पहिल्या चौघांचे संसार सुरू होत होते. त्यानंतरचे चौघेही शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात होते.


गायत्री तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. यथावकाश तिला मुलगा झाला.


काही दिवसातच अरुंधतीला दिवस गेल्याची बातमी घरात कळली तसे सगळेच खुश झाले. श्रीपादचा संसार मार्गी लागला म्हणून माई काका देवाचे आभार मानताना थकत नव्हते. अरुंधतीनंतर घरात आलेल्या मंदाकडे, श्रीधरच्या बायकोकडे नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्ष झालं अस मंदाचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच तिचीही बातमी कळली. तसं माईंना काय करू नि काय नको अस झालं.


मंदाला पटलं माई दोघींनाही सारखंच वागवतात. बाळंतपणासाठी अरुंधती आणि मंदा दोघीही माहेरी निघून गेल्या. आता माई आणि काकांचा वेळ नात होईल की नातू असे तर्क लावण्यात सरू लागला.


काही दिवसांनी अरुंधतीच्या घरून बातमी आली मुलगा झाला अशी. माई काकांनी उत्साहात सगळीकडे पेढे वाटले. मंदानेही लवकरच अजून एक नातू त्यांना दिला. तेवढ्याच उत्साहाने पुन्हा पेढे वाटले गेले. काही महिन्यात दोन्ही नातवांसह सुना घरी आल्या. घराचे गोकुळ झाले होते.

हळूहळू दोन्ही मुलं मोठी होत होती.


काकांना अजून एक जावईही आला होता. मैथिलीचं लग्न झालं होतं. त्याचबरोबर इतर दोन मुलं विजय आणि अशोकही नोकरीत स्थिरस्थावर झाले होते. त्यांची लग्नं ठरत होती. आता फक्त रोहिणी राहिली होती कारण ती शिकत होती.


लवकरच रोहिणीचेही लग्न ठरले. घरातले त्या पिढीतले शेवटचे लग्न त्यामुळे भरपूर उत्साहाने सगळे आले होते. मधल्या काळात भास्कर-संगीताही आईबाबा झाले होते.


लग्नाच्या काळात अरुंधतीचा चेहरा सुकल्यासारखाच दिसत होता माईंनी विचारलंही तिला पण तिने दगदगीचे कारण पुढे केले. तीच मोठी असल्याने तसंही तिच्यावर जबाबदारी जास्त होती.


लग्न निर्विघ्नपणे पार पडले. ४-५ दिवसांत सगळे पाहुणेही पांगले. गायत्री आणि मैथिलीही सासरी निघून गेल्या. आता माई-काका, हे ५ भाऊ आणि त्यांची कुटुंबं होते. श्रीपाद आणि भास्कर गावातच राहत होते. श्रीधर नोकरीमुळे लवकरच दुसऱ्या राज्यात जाणार होता. विजय आणि अशोक दोघांनीही आपापल्या शिक्षणाचा उपयोग करून एकत्रित बिझनेस सुरू केला होता. त्यांचं दोघांचंही एकमेकांशी बऱ्यापैकी पटत होतं. त्यात त्यांच्या बायका ललिता आणि अश्विनी दूरच्या नातेवाईक असल्याने तर अजूनच भर पडली. एकाच शहरात पण जवळपासच ते दोघेही राहत होते. मुलंही नीट रहात आहेत म्हटल्यावर माई काकांना तशी काहीच हरकत नव्हती. वाडा सोडला तर त्यांची तशी काही संपत्ती नव्हती की जिच्यासाठी मुलांमध्ये वाद व्हावेत. एकूणच सगळं आलबेल होतं.



पण म्हणतात ना की माणसाला सुखही टोचू लागतं. तसंच काहीसं झालं. छोट्या छोट्या कुरबुरींना सुरुवात झाली आणि त्यांचं रूपांतर कधी मोठ्या भांडणात झालं कुणालाच कळलं नाही. श्रीपाद आणि अरुंधतीने सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. श्रीधर त्याच्या मार्गाने तर विजय आणि अशोक त्यांच्या मार्गाने निघून गेले. ते तिघे तर निघून गेले पण त्यांच्या जाण्याने माई काकांना खूप त्रास झाला.


सगळेजण सावरत असतानाच अरुंधती घरात चक्कर येऊन पडली. जेव्हा सगळ्या तपासण्या झाल्या तरीही काही कळेना तेव्हा तिच्या माहेरहून तिचे वडील एका वृद्ध वैद्यांना घेऊन आले. त्यांनी अगदी कसून तिची नाडीपरीक्षा केली आणि जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं. तिचा गर्भपात होऊन गर्भाशय निकामी व्हावं म्हणून एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचं औषध तिला नकळतच दिलं जात होतं. जवळजवळ वर्षभरापासून हे सुरू होतं आणि आता त्याचे परिणाम शरीरावर ठळकपणे दिसू लागले होते. हे का कुणी केलं ह्यावर काहीच उत्तर कुणालाच सापडेना. हे सगळं ऐकल्यावर काका मात्र हवालदिल झाले होते.


त्यांनी आपल्या मित्राकडे बघून नकळतच हात जोडले. पुढे ते काही बोलणार इतक्यात जोशी म्हणाले,“राम तू माफी मागू नकोस. जे घडलं आहे ते भयंकर आहे, पण असं काहीतरी होणार ह्याची कल्पना अरुने आम्हाला आधीच दिली होती.”


“धक्का तर आम्हालाही बसला आहे. पण ह्या घरात सगळे आपलेच आहेत कुणावर संशय घेणार? मुळात आता आपण त्यावर उपाय काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू.” तेवढ्यात वैद्य बाहेर आले दोघांचेही प्रश्नार्थक चेहरे त्यांनी वाचले अन् हलकेच नकारार्थी मान हलवली. इतका वेळ शांत असणाऱ्या श्रीपादने विचारले, “नाही म्हणजे काय वैद्यबुवा?”

वैद्यांनी बोलायला सुरुवात केली, “अरुंधतीवर फक्त औषधांचाच परिणाम झाला नाहीये श्रीपादराव. मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला तरी स्पष्ट सांगण्याची गरज नाही. औषध कसलं विषच होतं जे दिलं होतं. पण त्या बरोबर आणखीही काही अघोरी तंत्राचा उपयोग केला गेला आहे. हे का केलं, कुणी केलं ते शोधण्याचा काही उपयोग होणार नाही. अरुंधती आता काही दिवसांची पाहुणी आहे पण तिचा प्रवास इथेच संपणार नाहीये हे तिला जितकं माहीत आहे तितकंच तुम्हाला ही माहिती आहे. बाकी काही गोष्टी फक्त अरुंधतीच तुम्हाला सांगू शकेल. तिचे उरलेले दिवस सुसह्य व्हावेत म्हणून काही गोष्टी मी सांगितल्या आहेत तेवढया मात्र नक्की करा. निघतो मी आता.”


श्रीपाद तिरीमिरीतच आतमध्ये गेला. माई आणि संगीता अरुंधतीच्या उशाशी बसलेल्या होत्या. त्याचा आवेश बघून काही न बोलता त्या दोघीही निघून गेल्या. इतक्या वेळ थांबवलेले अश्रू आवरणे आता श्रीपादला शक्य नव्हते. नकळतच एक अश्रू अरुंधतीच्या हातावर पडला. तिने डोळे उघडून त्याच्याकडे बघितले. अन् ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तिला थांबवत त्याने पुन्हा आडवे व्हायला लावले.

आणि तो काही बोलणार इतक्यात ती बोलू लागली,


“थांबा आधी माझं ऐकून घ्या. तुमचा राग मान्य आहे मला, पण आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना होती. आपण फक्त संसार करण्यासाठी एकत्र आलो नव्हतो ना? हे घर, ही माणसं आपलीच आहेत, पण काहीजण चुकीच्या मार्गावर जात आहेत. त्याचा परिणाम हा होणारच होता. असो. मला तुमच्याकडे काही मागायचे आहे द्याल?” असे म्हणत ती थांबली. श्रीपादने होकारार्थी मान हलवताच ती पुढे बोलू लागली, “तुम्ही कैवल्यला हया वातावरणापासून दूर ठेवून भविष्यासाठी तयार करायचे. तसेच माझ्या अनैसर्गिक मृत्यूमुळे ह्या घरात सहजासहजी मुलगी जन्माला येणार नाही. ज्यांनी माझ्यासोबत हे कृत्य केले त्याच व्यक्तींना कुलदैवताला साकडे घालून स्वतःचे अपराध मान्य करावे लागतील मगच काहीतरी होईल.


पण तसं झालं तरीही ते लोक सुधारतील असं नाही. त्यामुळे घरात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीला तुम्ही माई आणि काकांच्या नावावरून नाव द्यायचं. कारण ते दोघेही पुण्यवान आहेत. त्यांची पुण्याई त्या नावामुळे त्यांच्यानंतरही तिच्यासोबत असेल. आणि तिला भविष्यात येणाऱ्या संकटांशी सामना करण्यासाठी बळ देत राहील. मी माझी साधना वापरून काही उपाय केले आहेत त्यातलाच हा एक आहे. तेव्हा मला वचन द्या योग्य वेळी येऊन तुम्ही हे काम नक्की कराल. काही गोष्टी मी काकांना स्वतंत्रपणे सांगणार आहे पण त्या तुम्हाला योग्य वेळीच त्यांच्याकडून समजतील. तोपर्यंत माझ्या कैवल्यला जपा. भविष्यात त्याला त्याच्या बहिणीला खूप मदत करावी लागणार आहे.”


बराच वेळ बोलल्यामुळे अरुंधतीला धाप लागली. तसं तिला आराम मिळावा म्हणून श्रीपाद खोलीबाहेर निघाला आणि कुणाशीही न बोलता शांतपणे त्या खोलीत येऊन बसला. जिथे समोर एक मोठी तसबीर होती तिच्याकडे बघतच त्याने पद्मासन घातले आणि डोळे मिटले.

अरुंधतीला दिलेले वचन तर श्रीपादने पूर्ण केले, पण त्या व्यक्तींबद्दल अजूनही ते दोघे कुणाला सांगत नव्हते. अरुंधतीला असं काय सांगायचं असेल काकांना त्या व्यक्तींबद्दल की अजून काही रहस्य?


कळेल पुढच्या काही भागात तोपर्यंत वाचत रहा, तर्क लावत रहा.


क्रमशः

#स्वतःला_शोधताना

#गौरीहर्षल


ह्या कथेचे सर्व कॉपीराईट अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. परवानगी न घेता वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.