Kaalay tasme nam - 6 books and stories free download online pdf in Marathi

कालाय तस्मै नमः - 6

कालाय_तस्मै_नमः| भाग ६


अरुंधतीला निरोप


पारायण सात दिवसांचं होतं. सगळा त्रास सहन करत अरुंधती रोज हट्टाने बसण्याचा प्रयत्न करत होती. आज सातवा दिवस होता. उद्यापन ही असणार होतं.


घरातील सगळ्या स्त्रिया उद्यापनासाठी लागणाऱ्या तयारीत गुंतल्या होत्या. माई अरुंधतीच्या जवळ राहूनच छोटी छोटी मदत करत होत्या. सात दिवसात तिची तब्येत जरा नाजूकच झाली होती. पण चेहऱ्यावर असणारं तेज मात्र काहीतरी वेगळीच जाणीव करून देत होते.

त्या दोन्ही व्यक्तींनी आपलं काम आता काही काळासाठी थांबवलं होतं. कारण घरात सुरू झालेल्या परायणामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास काय फटका बसेल ह्याची कल्पना त्यांना त्यांच्या मार्गात मदत करणाऱ्या ‘त्या’ साधकाने दिली होती.



सध्या तरी शांत राहून जे होत आहे त्याचं निरीक्षण करत रहा आणि मला कळवा असे त्याने सांगितलं होतं. ही व्यक्ती वयाने बरीच वृद्ध होती. आणि अघोरी तंत्र मंत्र साधनेसहच विशिष्ट औषधांचं ज्ञानही तिला होतं. तिनेच ते विष पुरवलं होतं पण ते कुणावर वापरलं जाणार आहे हे तेव्हा त्या व्यक्तीलाही माहित नव्हते. जेव्हा तिला ते कळलं तेव्हा आपण नकळतच एका दैवी शक्तीला त्रास दिला आहे हे तिला जाणवलं. म्हणूनच आता ती त्या सगळ्यांमधून अंग काढून घेत होती. ह्या दोघांना शांत राहण्यास सांगणं हे त्याचं पहिलं पाऊल होतं.



पण जसं आधीही मी नमूद केलं आहे की खेळ सुरू जरी ह्यांच्या हातून झाला असला तरी तो किती आणि कशी वळणं घेत जाईल हे कुणाच्याही हातात उरणार नाही.

त्या साधकाने आपल्या परीने प्रायश्चित्त करण्यासाठी सुरुवात केली होती. वाट अर्थातच खडतर असणार होती. त्याचे परिणामही त्याला दिसू लागले होते. वाड्यातले पारायण संपताच तेथील त्या दोघांना ह्या गोष्टीची कल्पना द्यायची आणि हा नाद सोडून द्या असं सांगायचं त्याने ठरविलं.


इकडे पारायणाची सांगता झाली होती. आरती पूर्ण होऊन नैवेद्य दाखवला जात असतानाच दारावर कुणीतरी आल्याची जाणीव काकांना झाली.


एक अत्यंत दयनीय अवस्थेतील माणूस दारात उभा होता. एका बाजूला जिथे ब्राम्हणांची पंगत बसणार होती त्या शेजारीच पण वेगळं असं आसन तात्काळ श्रीपादने मांडलं.


माईंनी लगबगीने तिथे रांगोळीची चार बोटे ओढत ताट मांडलं. काका त्या माणसाला घेऊन आत आले. त्याला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि त्या आसनावर बसण्यास सांगितलं. तो बसताच इतरांनाही बसण्यासाठी विनंती केली. पहिला घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं. जेवण झाल्यानंतर श्रीपाद सर्वांना दक्षिणा देत नमस्कार करत होता. तो त्याच्या जवळ आला तसे त्याने श्रीपादला अर्ध्यातूनच उठवून मिठी मारली. त्या व्यक्तीच्या शरीराला येत असणारा सुगंध क्षणार्धात श्रीपादला जाणवला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्या अश्रूंचा अर्थ फक्त काकांना कळला.



पारायण सफल झालं होतं. “कुठे आहे ती?,” त्या व्यक्तीने विचारले. श्रीपाद त्यांना घेऊन अरुंधतीच्या खोलीत गेला. आत जाताच त्याने दरवाजा बंद केला. काही वेळाने ते बाहेर पडले. काका त्यांना सामोरे गेले, तसे त्यांनी काकांकडे अत्यंत प्रेमपूर्वक बघितले. ते म्हणाले, “मला माहित आहे की हे सगळं सावरणं जमेल की नाही अशी शंका तुमच्या मनात आहे. पण काळजी करू नका. कितीही अवघड परिस्थिती निर्माण झाली तरी मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. माझ्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी तुम्हाला होत राहील. अरुंधती आणि श्रीपाद ह्या कुटुंबात आहेत ही सुध्दा माझ्या अस्तित्वाची एक खूणच आहे." काकांच्या मनातले भाव ओळखत ते पुढे म्हणाले,



“ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या आहेत त्या घडणारच. कालचक्रात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हेच तर कालचक्राचे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यातून जर देवाची सुटका झाली नाही तर मग माणसाची कशी होणार?”

काकांना जणू काही ते काय बोलत आहेत ते समजले. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. तेवढ्यात लहानसा कैवल्य तिथे आला.


त्यांनी त्याला उचलून घेतले तसे त्याने विचारले, “तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात?” त्यांनी हसून उत्तर दिले, “हो आणि तुझाही मित्र आहे. पुन्हा भेटशील न मला?” त्याला खाली ठेवत त्यांनी विचारले. त्यानेही निरागसपणे “हो” असे उत्तर दिले. तसे त्याच्या डोक्यावर हात ठेवत ते काहीतरी पुटपुटले, ते कुणालाही ऐकू आले नाही.


फक्त शेवटचे कल्याणमस्तु तेवढे श्रीपादला ऐकू आले.


निरोप घेऊन ते घराच्या बाहेर पडले. आत येताना जी पिशवी हातात होती ती विसरलेली श्रीधरच्या लक्षात आली तसा तो ती देण्यासाठी बाहेरच्या दिशेने गेला. पण वाड्याच्या समोरची वाट पूर्ण रिकामी होती तिथे कुणीही नव्हते. वाड्यापासून मूळ रस्त्यापर्यंत जाण्यासाठी कमीतकमी पाच मिनिटांचा सरळ रस्ता होता त्याला कुठेही फाटे फुटत नव्हते. त्यामुळे तो माणूस कुठे गायब झाला ह्या विचारातच श्रीधर पिशवी घेऊन परत आला.



प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याने काका आणि श्रीपादला बघितले. त्यांनी त्यालाच ती पिशवी उघडण्यास सांगितले. त्या पिशवीतून दोन छोट्या पादुका त्याच्या हातात आल्या. पण जशा त्या त्याच्या हातात पडल्या तसे त्याला चटका बसल्याची जाणीव झाली. त्याने पटकन त्या श्रीपादच्या हातात दिल्या. आणि तो लगबगीने आत निघून गेला. आत गेल्यानंतर त्याने थंड पाण्यात आपले हात बुडवले. मग त्या हाताकडे बघितले त्यावर एका पादुकेचा आकार हुबेहूब उमटला होता. जणू काही ते त्याला जाणीव करून देत होते की तू जे काही करायचे ठरवत आहेस ते विचारपूर्वक ठरव. त्याचे परिणाम ह्यापेक्षा भयंकर असतील.



श्रीधरच ती व्यक्ती होता ज्याने त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. पण मग त्याला चटका का बसला? कारण ते बोलणे ऐकल्यानंतर हळूहळू श्रीधरच्या मनातही तसेच विचार येऊ लागले होते. आणि तो त्या व्यक्तींना सामील होण्याच्या मार्गावर होता. म्हणूनच त्याला ही सूचना मिळाली होती. आता त्यातून तो काय धडा घेणार की तो त्या मार्गाने जाणार हे तर येणारा काळच ठरवणार होता.



दुसरीकडे त्या दोन व्यक्ती तशा अस्वस्थच होत्या. पण त्याचं कारण वेगळं होतं. त्या साधकाने त्यांना रात्री उशीरा भेटण्यासाठी बोलावलं होतं. घरातून निसटायचं कसं ह्यावर त्यांच्या डोक्यात विचार सुरू होते.


रात्री निजानीज झाल्यानंतर त्या दोन्ही व्यक्ती घराबाहेर पडल्या आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या.


तो साधक आधीच तिथे येऊन बसला होता. त्याला बघताच नकळत त्यांच्या दोघांच्या मनात चर्र झालं. त्याची अवस्थाच अशी झाली होती.



तो बोलू लागला, “तुम्ही मला फसवून माझी मदत घेतलीत. मला दैवी शक्ती विरुद्ध वापरले म्हणून आज माझी ही अवस्था झाली आहे. नीट बघून घ्या, मी आता काही दिवसांचाच सोबती आहे. तुम्हीही हा मार्ग सोडून द्या अन्यथा तुमचे हाल माझ्यापेक्षा वाईट होतील.”



तसे त्या दोघांच्या मधील एक जण बोलला, “इतक्या फालतू गोष्टीसाठी तू आम्हाला बोलावलंस? आम्हाला चांगलंच माहिती आहे आम्ही काय करत आहोत आणि कुणाच्या विरोधात करत आहोत. तुला नसेल मदत करायची तर नको करुस आता आम्हाला इतकं ज्ञान नक्कीच मिळालं आहे की आम्ही स्वतः पुढच्या गोष्टी करू शकतो.”



तो फिकटसा हसला आणि म्हणाला, “अर्धवट ज्ञान नेहमीच भयंकर परिणाम करतं. पण काय करणार विनाशकाले विपरीत बुद्धी.” आणि निघून गेला.



तो गेला त्या दिशेने बघत त्या व्यक्तीही क्षणभर तिथे थांबल्या आणि वाड्यावर निघून आल्या. त्यांना परत येताना श्रीधरने बघितले होते. पण सध्या तरी तो गोंधळात पडला होता.


एकीकडे त्याला फायदे दिसत होते तर दुसरीकडे होणारे तोटे.


श्रीपाद मात्र ह्या सगळ्यांमधून लक्ष काढून घेऊन अरुंधतीच्या उशाशी बसला होता. खोलीत आल्यावर त्याने त्याचे खरे रूप प्रकट केले होते.



तो अरुंधतीच्या भेटीला आला म्हणजेच आता अरुंधतीची जाण्याची वेळ जवळ आली हे नक्की होते. जाता जाता त्याने पादुकाही दिल्या होत्या. त्याचाच अर्थ श्रीपादच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण होत आले होते. आता नवीन अध्यायाला सुरुवात होणार होती. हा अध्याय किती आणि काय काय रहस्य घेऊन येणार होता हे एक रहस्यच होते.


हातात असणारा अरुंधतीचा हात थंड पडलेला श्रीपादला जाणवले. त्याच वेळी काकांच्या गंभीर स्वरातला तारक मंत्र त्याच्या कानावर पडला, काकांना जेव्हा जेव्हा भीती वाटत असे किंवा वाईट घटना घडणार आहे असे वाटे तेव्हा ते मनाला शांत करण्यासाठी तारक मंत्र म्हणत असत.


नि:शंक हो निर्भय हो मना रे,

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,

अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,

अशक्य ही शक्य करतील स्वामी,


जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय,

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.

आज्ञेविन काळ ना नेई त्याला

परलोकीही ना भिती तयाला,


उगाची भितोसी भय हे पळु दे.

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,

जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,

नको घाबरु तू असे बाळ त्यांचा.


खरा होई जागा श्रद्धेसहीत,

कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त.

कितीदा दिला बोल त्यांनीच हात,

नको डगमगू स्वामी देतील साथ,


विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ

स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,

हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.


काकांच्या मनातली भीती खरी ठरलेली त्यांना कशी सांगावी हेच त्याला सुचेना.


श्रीपाद शांतपणे काकांच्या समोर येऊन पायाजवळ बसला. त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू त्यांच्या पायांवर पडले. तसे त्यांनी अरुंधतीच्या खोलीकडे धाव घेतली. थोड्याच वेळात बातमी सगळीकडे गेली.


सगळेजण दुःखात बुडाले होते. त्या व्यक्तीही वाईट वाटल्याचे दाखवत होत्या पण मनोमन मात्र त्यांना आनंद झाला होता. असतात अशीही माणसं.


फक्त टीव्ही मालिकेत नाही तर ह्या खऱ्या खऱ्या जगात असतात. पण खऱ्या आयुष्यात त्यांचे मुखवटे सहजासहजी उतरत नाहीत त्यामुळे समजून येत नाही. असो.


तोपर्यंत मनाला सकारात्मक विचारांकडे वळवत रहा. कितीही दुःखं, संकटं आली तरी खचून जाऊ नका माणसाने मदत नाही केली तरी आपल्या स्वतःमध्ये वास करणारी ती शक्ती आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवते. तेव्हा आपल्या आतल्या आवाजाला ऐकण्याचा प्रयत्न करा.


अवघड आहे अशक्य नक्कीच नाही. आणि स्वामी आहेत ना अशक्य ते शक्य करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी त्यांची नावं जरी वेगळी असली तरी ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या मदतीला नक्की येतात. गरज असते ती स्वतःवर आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची.


क्रमशः

#स्वतःला_शोधताना

#गौरीहर्षल


ह्या कथेचे सर्व कॉपीराईट अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. परवानगी न घेता वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.