Kaalay tasme nam - 5 books and stories free download online pdf in Marathi

कालाय तस्मै नमः - 5

कालाय तस्मै नमः|

भाग ५


पारायण


पहाटेच साधना आवरून श्रीपाद खोलीबाहेर आला. माई आणि संगीताची तयारी करून झाली होती. अरुंधतीला थोडंसं बरं वाटत असल्याने ती आज लवकर उठून आवरून बसली होती.


घरात वेगवेगळ्या पूजा , पारायणे सतत होत असत त्यामुळे त्यासाठी एक विशिष्ट जागा तयार केली होती, जिथून संपूर्ण घराकडे नजर टाकणे शक्य होत असे. आणि वाचनाचा आवाजही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जात असे.


ह्या जागेच्या अगदी समोर एक खोली होती, जिथे अरुंधतीच्या बसण्याची व्यवस्था केली होती. तिला खूप वेळ बसून राहून ऐकणे शक्य नसल्याने झोपून ऐकता येईल अशी सोय होती. तसेच मधल्या जागेत इतरांसाठी बसण्याची सोय होती.

देवाला नमस्कार करून श्रीपादने संकल्प सोडत वाचनास सुरुवात केली. वाचनाच्या दरम्यान अरुंधतीला त्रास होऊ लागला, पण त्याची कल्पना त्याला आणि तिला स्वतःला आधीपासूनच होती. माई पूर्ण वेळ तिच्याजवळच बसून होत्या. तिच्या जीवाची होणारी तगमग त्यांना बघवत नव्हती पण दुसरा पर्याय नव्हता.


खरे तर शक्य तेवढी नकारात्मक ऊर्जा घरातून आणि सगळ्यांमधून बाहेर पडावी म्हणून अरुंधतीनेच हा मार्ग श्रीपादला सुचवला होता. श्रीपादनेही साधना करताना त्याच्या गुरूंना साद घातली, तेव्हा त्यांनीही त्याला संमती देत असं केल्यास होणारा त्रास कमी होईल असं सुचवलं.



शक्य तेवढं स्वतःला शांत ठेवत अरुंधती सहन करत होती. काही वेळातच वाचन पूर्ण झालं. बाकी सर्व आवरून श्रीपादही अरुंधती जवळ आला. आज तिला खूप त्रास झाला होता, पण पारायण पूर्ण होईपर्यंत हा त्रास कमी होईल अशी अपेक्षा होती. तिचा चेहरा खूप थकल्यासारखा दिसत होता पण तरीही ती समाधानी वाटत होती. थकव्यामुळे तिला झोप लागली तसा तो बाहेर पडला.


घरातच काही गोष्टी त्याला शोधायच्या होत्या. अडगळीच्या खोलीत बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला जे अपेक्षित होतं ते सापडलं. आज पहिलाच दिवस असूनही घरातील वातावरणात बराच फरक पडल्याचं जाणवत होतं. संध्याकाळी विजय, अशोक त्यांच्या कुटुंबासह आले.

नुकतेच बाहेरून आल्यामुळे सगळेजण आधी हातपाय धुवून मगच अरुंधतीच्या खोलीकडे आले. ती जराशी ग्लानीतच होती. तिची अवस्था बघून ललिता आणि अश्विनीला रडू आवरलं नाही, त्यांना शांत करत सर्वचजण बाहेर आले.


विषप्रयोग केल्याची माहिती इतर कुणालाही द्यायची नाही हे आधीच ठरल्याने ह्या सगळ्यांना असाच काहीतरी आजार झाल्याचं सांगितलं होतं. सगळेचजण झालेल्या घटनेने कुठेतरी हादरले होते. सकाळ होता होता श्रीधर आणि मंदाही पोहोचले.


आज पारायणाचा दुसरा दिवस होता. पण आज घरातील सर्व व्यक्ती हजर होत्या. काका , श्रीपाद दोघांचंही वाचताना बारीक लक्ष सगळ्यांवर असणार होतं. जरी योग्य वेळ आल्यावर ती व्यक्ती कळणार असली तरी मानवी मनाला एकदा एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण झाली की ते त्याला शांत बसू देत नाही हे इथे कळते. श्रीपादने वाचन सुरू केले तसे सगळेचजण एकेक करून येऊन बसले. माई अरुंधतीचा हात हातात घेऊन कालच्यासारख्याच आजही तिच्याजवळ बसल्या होत्या. जसाजसा एकेक अध्याय पूर्ण होत होता, आज अरुंधतीला जास्त त्रास होत होता.


एक क्षण असा आला की अरुंधतीची शुध्द हरपली. माई आणि संगीताचा एकच गोंधळ उडाला. श्रीपाद वाचन थांबवू शकत नव्हता, पण फक्त एक सेकंदासाठी थांबत त्याने अरुंधतीकडे बघितले. तो पुन्हा वाचू लागला. सगळ्यांचं लक्ष विचलित झालं होतं. पण ह्या गोष्टीचा फायदा घेत त्या व्यक्ती तिथून निसटल्या होत्या. पण कुणीतरी त्यांना जाताना बघितलं होतं. त्यांच्या मध्ये एका बाजूला बोलणं सुरू होतं.


पहिली व्यक्ती-- बरं झालं तिला चक्कर आली, मला बसवत नव्हतं तिथे.


दुसरी -- हो न. हा पारायणाचा घाट का घातला ह्या लोकांनी? आधीच माहित असतं तर आपण आलोच नसतो.


पहिली-- मग काय आता इतक्या दिवसांची मेहनत पाण्यात जाणार आपली. जाऊ दे आपल्या वाटेतला मोठा अडसर दूर होतो आहे हे काही कमी आहे का?


दुसरी--- श्रीपादचे काय करायचं? तो येईलच ना आडवा?


पहिली-- हं बघू, त्याचंही करू काहीतरी. आता चला पटकन नाहीतर कुणाला तरी शंका येईल.


इकडे कुणीतरी माईंसमोर पाण्याचा ग्लास धरला. माईनी तो घेत अरुंधतीला पाणी पाजून बसतं केलं. आता तिला बऱ्यापैकी शुद्ध आली होती.


पाण्याचा ग्लास घेऊन आलेली व्यक्ती मात्र अजूनही आपण जे ऐकलं ते खरं होतं की आपला भास होता ह्या संभ्रमात होती.



श्रीपादचं वाचन सुरूच होतं. हळूहळू पुन्हा सगळे स्थिर झाले. ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दोन व्यक्ती ही स्वतःला होणाऱ्या त्रासावर नियंत्रण ठेवत बसण्याचा प्रयत्न करत होत्या. कुणीतरी त्यांना लक्षात येऊ नये अशा पद्धतीने त्यांचे निरीक्षण करत होते. पण श्रीपाद आणि काकांना मात्र ती व्यक्ती सापडलीच नव्हती.



नकारात्मक गोष्टी किती आणि कोणत्या थराला जाऊन व्यक्तीकडून काय काय करून घेतात हे आता लक्षात आलंच असेल. आपण जेव्हा काहीतरी बाहेरचं आहे वगैरे ऐकतो तेव्हा काय करतो? काही जण विश्वास ठेवतात, काही जण खिल्ली उडवतात.


हा प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टीकोन असतो. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर जितका वाईट प्रभाव तंत्र मंत्र अशा गोष्टींचा असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो विचारांचा असतो.

चांगले विचार चांगलं वर्तन घडवून आणतात आणि त्यांचे परिणामही चांगलेच होतात. त्याउलट वाईट विचार वाईट कृतींना प्रोत्साहन देतात त्यामुळे होतं काय वाईट गोष्टी घडतात. आपण मात्र दोष त्याला देत राहतो.



हल्लीच्याच नाही आधीच्या काळापासून हे असं होत आहे. का? कारण वाईट विचार हे आपली पाठ सहजासहजी सोडत नाहीत, चांगले विचार मनात टिकवण्यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करत रहावे लागते.


अध्यात्म आणि विज्ञान जर हातात हात घालून आपल्या मदतीला सिद्ध असतील तर त्यांचा योग्य ठिकाणी योग्य पध्दतीने वापर करणं आपल्याला शिकलं पाहिजे.

उदाहरण द्यायचं तर आपल्याला कधी कधी वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे असा विचार दूर सारण्याऐवजी मन अजून त्यावरच विचार करू लागतं. होतं काय? आपल्याकडूनच नकळत त्या नकारात्मक उर्जेला खतपाणी मिळतं. त्यामुळे सकारात्मक असणं आणि त्यावर टिकून राहणं खूप गरजेचं आहे.


खूपच तात्त्विक झालं ना? पण काय करणार कथेचा गाभा असाच आहे. माणसाला जोपर्यंत स्वतःमध्ये असणाऱ्या सकारात्मक शक्तीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो कालचक्रात भरडला जातो.


चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणसाची निवड ठरवते तो चांगला आहे की वाईट. इतरांच्या नजरेत चांगले होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत चांगले होण्यासाठी प्रयत्न करत रहावे.



क्रमशः

#स्वतःला_शोधताना

#गौरीहर्षल


ह्या कथेचे सर्व कॉपीराईट अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. परवानगी न घेता वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.