Kaalay tasme nam - 2 books and stories free download online pdf in Marathi

कालाय तस्मै नमः - 2

कालाय तस्मै नमः| भाग २


सुखाच्या हिंदोळ्यावर


माई आणि काका त्या दोघांना डोळे भरून बघत होते. तेव्हढ्यात संगीताने आत जाऊन ओवळण्यासाठी भाकरी तुकडा आणि पाणी आणलं. माईंनी तिलाच ते करायला लावलं. आनंदाने तुकडा ओवाळून दोघांच्या पायावर पाणी घालत ती बाहेरच्या दिशेने गेली. ती परत आली तरीही ते तसेच उभे होते कारण माईंना आनंदाच्या भरात काही सुचतच नव्हते.


भास्कर ज्याच्या लेकीचं बारसं आहे तो मागून येत म्हणाला, “दादा ये ना रे आत. तुझीच उणीव भासत होती. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय.” हसून त्याच्याकडे बघत त्याने मुलाचा हात धरूनच आत उजवा पाय टाकला. तसेच समोरच उभ्या असलेल्या माई आणि काकांना वाकून नमस्कार केला. त्या छोट्यानेही तसंच केलं तसं काकांनी त्याला पटकन उचलून घेत छातीशी कवटाळलं.


सगळीच भावंडं आसपास गोळा झाली होती. सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते. का असणार नाहीत तब्बल चार वर्षांनी तो परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत माई जणूकाही तो खरोखरच आला आहे ह्याची खात्री करून घेत होत्या. तसा गोड हसत तो माईंना म्हणाला, “माई, अगं मी खरंच आलो आहे. तुला दिलेला शब्द कसा मोडेन मी?”

तशा त्या समाधानाने हसल्या. तरीही एक अश्रू गालावर ओघळलाच. एका हाताने माईंना जवळ घेत तो त्यांना आश्वस्त करत होता.

तो ‘श्रीपाद’ माई काकांचा थोरला मुलगा. नावापुरता मुलगा होता तो त्यांचा. कारण समजूतदारपणा इतका होता की त्यांना कधीही त्याला काहीच सांगावे लागत नसे. त्याच्या वेगळेपणाची चुणूक त्याने वेळोवेळी दाखवून दिली होती. जन्मजात काही गुण त्याच्या अंगी होते. तो जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याचं वेगळं असणं जास्तच प्रकर्षाने जाणवू लागलं. त्याच्या चेहऱ्यावर असणारं तेज, धीरगंभीर भाव, बघताच समोरच्याला आश्वस्त करणारा स्वभाव, फार कमी शब्दात योग्य ते मांडण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टींमुळे वयाने मोठया असणाऱ्या व्यक्तीलाही एखाद्या गोष्टीसाठी त्याचा सल्ला घ्यायची गरज वाटत असे. कुणी विचारलं तर तो सांगतही असे. पण ह्या सगळ्यामधून शक्यतो अलिप्त राहण्याचा त्याचा प्रयत्न असे. असो.


श्रीपादच्या आयुष्यात पुढे एक वादळ आलं, ज्याचा परिणाम त्याच्या बरोबरच बाकी सगळ्यांच्या आयुष्यावरही थोडाफार झालाच. त्यामुळेच तो गेली चार वर्षे घरापासून दूर गेला होता. सोबत त्याचा मुलगाही होता. ज्याचं नाव होतं ‘कैवल्य’. जो अगदी हुबेहूब श्रीपादची प्रतिकृती होता, पण त्याचे डोळे मात्र त्याच्या आईची आठवण करून देणारे होते अगदी प्रेमळ. जो कोणी बघेल त्याचे सगळे त्रास, दुःख सगळं एका क्षणात विसरेल असं.


काकांचा असा ठाम विश्वास होता की ही बापलेकाची जोडी काहीतरी वेगळी आहे. आणि त्यामुळेच त्यांनी श्रीपादला कधीही बांधून ठेवलं नाही.


कैवल्यच्या आईच्या जाण्यानंतर श्रीपादने जेव्हा छोट्याश्या कैवल्य सोबत दूर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा काका आणि माईंनी त्याला मूक संमती दिली होती. पण श्रीपादनेही परत येण्याचं आश्वासन देत निरोप घेतला होता. आणि आज खूप महत्त्वाच्या दिवशी तो परत ही आला होता.


सगळेच आठवणींच्या विश्वात हरवले होते. तेव्हा गायत्रीने सगळ्यांना आठवण करून दिली की बारश्याचा कार्यक्रम सुरू करायचा का? हसून मान डोलवत सगळे हो म्हणाले. बाळाला पाळण्यात घालून नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा गायत्रीने श्रीपादकडे बघितलं आणि त्यानेही मूक हसत नजरेने संमती दिली. तिने बाळाच्या कानात कुर्रss आवाज करत नाव सांगितलं.


सगळ्यांनी उत्सुकतेने विचारलं, “काय नाव ठेवलं?” तसं तिने मोठयाने सांगितलं, “बाळाचं नाव आहे ‘स्वरा’. पण ह्या नावाचं विशेष महत्त्व म्हणजे हे तिच्या आजीआजोबांच्या नावातून तयार केलेलं आहे.” असं म्हणत तिने माई आणि काकांकडे बघितलं. सरस्वती आणि रामचंद्र ह्यांची पहिली नात म्हणून स्वरा. सगळ्यांनाच नाव खूप आवडलं.


अल्पोपाहार झाला आणि हळूहळू आलेली पाहुणे मंडळीही आपापल्या घरी गेली.


अचानक आलेल्या श्रीपाद मुळे आनंदात विघ्न आणण्याचा प्रयत्न सध्या तरी फसला होता. आपली निराशा लपवत ती व्यक्तीही खुश असल्याचे दाखवत सगळ्यांमध्ये मिसळून गेली. पण कुठेतरी तिच्या मनात अजून काही घोळत होते.

तिच्या हातात वेळही कमी होता. त्यामुळे कुणाचं लक्ष नाही हे बघत ती व्यक्ती गुपचूप आतल्या बाजूला निघून गेली.

बाकीचे सगळेजण खूप दिवसांनी भेटत होते आणि त्यातही कैवल्य बऱ्याच वर्षांनी आला होता. त्यामुळे त्याच्या मागे मागे होते.


स्वरा मॅडम मात्र आजुबाजुला काय घडतंय ह्याच्याशी काही देणंघेणं नसल्यासारख्या पाळण्यात हातपाय आपटत स्वतःच स्वतःचं मनोरंजन करून घेत होत्या.


श्रीपाद पाळण्याजवळ आला आणि त्याने तिला उचलून घेतले. माई काकाही जवळच उभे होते. त्यांच्याकडे बघत तो म्हणाला, “तिला दिलेलं वचन मी पूर्ण केलं काका. ह्या घरात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीचं नाव तुमच्या दोघांच्या नावाने ठेवलं.”


श्रीपाद कडून तिचा उल्लेख झाला आणि सगळ्यांनाच तिची आठवण आली. क्षणभर सगळेच हळवे झाले पण मुलांच्या गोंधळात पुन्हा सावरलेही.


स्वराच्या निमित्ताने श्रीपाद आणि कैवल्य पुन्हा एकदा वाड्यात आले होते. आणि भविष्यातही स्वराच त्या दोघांना कुलकर्णी वाड्याशी जोडून ठेवणारा दुवा असणार होती. पण अजून तरी सगळे ह्या गोष्टी पासून अनभिज्ञ होते. आणि म्हणतात न अज्ञानात सुख असतं त्यामुळे श्रीपादसुध्दा बऱ्याच गोष्टींची कल्पना असूनही त्या सांगणं टाळत असे. शेवटी भविष्यात घडणारी गोष्ट चांगली असो किंवा वाईट ती तिच्या योग्य वेळेला उलगडण्यातच मजा असते.


चांगल्या वाईट घटनांचे अनपेक्षित सरप्राईज नेहमीच्या मिळमिळीत आयुष्यात एक इसेन्स एड करत असतात. त्यामुळे तर माणूस आशेचा दोर धरून सगळ्या गोष्टींना सामोरा जातो.


तर कैवल्य जरी माई आणि काकांचा पहिला नातू असला तरी त्याला घरातल्या लोकांचा सहवास फार कमी मिळाला होता. त्यामुळे बर्‍याच दिवसांनी आपल्या माणसांमध्ये येऊन त्याची कळी खुलली होती. खरंतर तिथे त्याने आईविना मुलगा अशा सहानुभूतीच्या छायेत वाढू नये म्हणूनच त्याच्या आईने म्हणजे श्रीपादच्या पत्नीने त्याच्याकडून शेवटच्या क्षणी त्याला दूर नेण्याचे वचन घेतले होते.


कैवल्यला मानसिकदृष्ट्या हळवे होऊन चालणार नव्हते, त्यामुळे त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला हा निर्णय अत्यंत योग्य होता. शिवाय आई नसल्यामुळे तिथे त्याच्याकडे फार व्यवस्थित लक्ष दिले जाण्याची शक्यताही कमी होती. माई काका असले तरी इतरांची मुलं घरात होती अशा वेळेला कैवल्यला झुकतं माप दिलं गेलं म्हणून घरात कलह होण्याची शक्यता होती.


श्रीपादसोबत कैवल्य लवकरच सगळ्यातून बाहेर पडला होता . आईच नसूनही सतत सोबत असणारं अस्तित्व त्याचं व्यक्तिमत्त्व उत्तमप्रकारे घडवत होतं.


बऱ्याच वर्षांनी भेट होत असल्याने कैवल्य सध्या घरात सगळ्यांकडून मनसोक्त लाड करून घेत होता. इनमिन 7,8 वर्षांचं लेकरू ते त्याला कुणाच्याही मनात काय विचार आहेत ह्याबद्दल काही अंदाज असण्याचा प्रश्नच नसल्याने तो आपल्या सगळ्या भावंडांमध्ये रमला होता.


पण तिथे असणाऱ्या त्या व्यक्तीची नजर त्याच्यावर होती. त्यात कैवल्यच्या हुबेहूब त्याच्या आईसारख्या असणाऱ्या डोळ्यांमुळे त्या व्यक्तीला आपल्या कृत्याची आठवण सतत होत होती. त्या व्यक्तीला ही गोष्ट मात्र अजून कळली नव्हती की जशी ती कैवल्यावर लक्ष ठेवून आहे तसंच कुणीतरी तिच्याही हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. ज्या क्षणी त्या व्यक्तीला आपल्याकडे कुणीतरी रोखून बघतंय अशी जाणीव झाली त्या क्षणी त्या व्यक्तीने पुन्हा कामाचा बहाणा करत सगळ्यामधून काढता पाय घेतला.




‘ती’ कोण? कैवल्यच्या आईसोबत असं काय घडलं की श्रीपाद घर सोडून निघून गेला होता? ती व्यक्ती कोण आहे आणि आता ती काय करणार?


मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं, नक्की मिळतील. पण हळूहळू - क्योंकि सब्र का फल मिठा होता है। तोपर्यंत वाचत रहा...

आणि आपल्या कथेची टॅगलाईन आहे ती विसरू नका "trust me, you get what you give" तेव्हा चांगले विचार आजुबाजुला पसरवत रहा म्हणजे चांगल्याच गोष्टी आपल्याला शोधत येतील. शुभं भवतु!!!


क्रमशः

#स्वतःला_शोधताना

#गौरीहर्षल


ह्या कथेचे सर्व कॉपीराईट अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. परवानगी न घेता वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.