Nirnay - 19 books and stories free download online pdf in Marathi

निर्णय. - भाग १९

निर्णय भाग १९

मागील भागावरून पुढे


मेघनाच्या फोटो पत्रीका मुलाकडच्यांना देऊन दोन दिवस उलटले होते.आजच्या दिवस थांबून.ऊद्या फोन करून बघू असं इंदिरेने मनाशी ठरवलं.


दिवसभर नेहमीचीच काम होती पण इंदिरेला कंटाळा आला कारण मेघनाचा फोटो मुलाला पसंत पडला असेल का? काय झालं असेल या विचारात असल्यामुळे तिला बाकी काही सुचत नव्हतं.


यंत्रवत तिने संध्याकाळी बगीच्यात झाडांना पाणी घातलं. रात्रीचा स्वयंपाक केला. स्वयंपाक तो काय दोघांचा म्हणजे भातुकलीच असायची. मंगेशचे खाण्यात नखरे असायचे. इंदिरेला मात्र जेवताना भाजी प्रमाणे कोशींबीर चटणी सारखी डावी बाजू पण आवडायची. ती तिच्यासाठी तिला आवडतं ते करायची पण आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं.


जेवताना सुद्धा ती आपल्याच तंद्रीत होती.मंगेशला समोर असलेली भाजी काय किंवा वरण काय स्वतः च्या हातांनी घ्यायची सवयच नव्हती. त्यातही त्याचा अहंकार आडवा यायचा. आत्ता जेवताना त्याला भाजी हवी होती आणि इंदिरेचं लक्षच नव्हतं


दोनदा म़गेशनी ताट वाजवलं तरी तिचं लक्ष गेलं नाही तेव्हा जोरात ओरडूनच तो बोलला


" आज काय ऊपाशी मारायचा विचार आहे का?"


मंगेशच्या जोरात ओरडण्याने इंदिरेची तंद्री भंगली.


" काय झालं?" इंदिरेनी विचारलं.


" केव्हाचा भाजी वाढ म्हणतोय लक्ष कुठे आहे?"


"भाजीची कढई तुमच्या समोर आहे.एवढ्या वेळात दोनदा तुमची भाजी घेऊन झाली असती. घ्या आपल्या हाताने."


इंदिरेच्या आवाजातला फणकारा ऐकून मंगेश बिथरला


" नवरा जेवायला बसला आहे तर नीट जेवायला वाढता येत नाही?"


" रोज वाढते नं.आज माझं लक्ष नव्हतं तर घ्यायचं आपल्या हाताने.आपल्याच घरी जेवताय मग त्यात मानपान कसला?"


" फार बोलायला लागलीस."


" हे फार पूर्वीच बोलायला हवं होतं. माझच चुकलं. तुमची सेवा करत बसले पण उपयोग काय?"


मंगेश रागारागातच जेवला आणि उठून गेला. इंदिरेने लक्ष दिलं नाही. तिला आता सारखा मंगेशचा पुरुषी अहंकार कुरवाळायचा कंटाळा आला होता. ती शांतपणे जेवली. मागचं सगळं आवरून ठेवलं. नंतर ती समोरच्या अंगणात शतपावली करू लागली. रात्री जेवणानंतर शतपावली करणे हा तिचा परीपाठ होता.

***

सकाळी साधारण दहा वाजता इंदिराने मुलांच्या घरी फोन केला.


" हॅलो."


"नमस्कार मी मिसेस सरपोतदार बोलतेय. दोन दिवसांनी फोन करा म्हणून म्हणाला होतात म्हणून आज केला. तुमच्या मुलांनी मेघना ची माहिती आणि फोटो बघीतला का?"


"हो.मुलाला पसंत आहे.तोम्हणतोय आम्ही दोघं आधी चॅटींग करू. एकदम भेटण्या ऐवजी"


" माझी मुलगी पण तेच म्हणाली. तुम्ही मुलांचा नंबर द्या मी तुम्हाला मुलीचा नंबर पाठवते.दोघांना बोलून घेऊ द्या.


" हो चालेल.तुम्हाला पाठवते नंबर.मुलांनी ग्रीन सिग्नल दिला की मग पुढे बोलू."


"हो चालेल. ठेऊ फोन?"


"हो.ठेवा"


इंदिरेला फोन ठेवल्यावर तो आनंद कोणाला सांगू असं झालं.

***

सुलभाच मेघना पेक्षा आनंदित झाली.शेवटी तिने वेळ न बघता मेघनाला फोन केला.


" हॅलो.आई काय झालं?


"काही नाही.तुला काम असेल पण मला राहवलं नाही.तुझा फोटो आणि माहिती मुलाला पसंत पडली आहे.तोपण भेठण्या आधी चॅटींग करू म्हणाला.तुझा नंबर पाठवते आहे त्यांना.त्यांनी मुलाचा नंबर दिला की तुला पाठवते."


"अगं आई किती घाईगडबड करशील. माझ्यापेक्षा तूच जास्त एक्साईट झाली आहेस."


"होग. तुला मुलगा पसंत पडला याचा आनंद झाला आणि मुलालाही तुझा फोटो पसंत पडला याचा दुप्पट आनंद झाला."


"आई…त्यांनी नंबर दिला की पाठव मला. ठेऊ फोन"


"हो."


मेघनाचं लग्नं ठरलं की आपण आपला निर्णय अंमलात आणण्यासाठी अजून जवळ आलो यांचाही आनंद इंदिरेला झाला.

___________


मेघना आणि स्थळ म्हणून आलेला मुलगा आनंद दोघांचं जवळपास दोन महिने चॅटींग चाललं होतं. या दिवसात दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी सवयी लक्षात आल्यावर दोघांनी भेटायचं ठरवलं.


"आई आम्ही इतके दिवस बोललो तर लक्षात आलं की आमचे विचार, आवडी निवडी, सवयी ज्या जुळतात आहे.म्हणून ठरवलं की एकदा भेटू.


"छान झालं भेटायचं ठरवलंय. कधी भेटणार?"


"आनंदला पण शनिवारी, रवीवारी सुट्टी असते तर शनिवारी भेटायचं ठरलं आहे. मी शनिवारी सकाळी येईन.मग संध्याकाळी आनंद मला घ्यायला येईल. रात्री बाहेरच जेऊ मग तो घरी सोडून देईल."


"चला म्हणजे सगळा कार्यक्रम ठरला आहे. दोघांचे विचार जुळले आहे म्हणतेस मग काळजी नाही."


"आई काळजी कशाला करतेस?"


"आई झालीस की कळेल तुला."


"तुझा नेहमीचा डायलाॅग नको बोलू."


"बरं बाई नाही बोलत.ये शनिवारी मग बोलू."


"हो.चल ठेवते फोन.


"ठेव."


इंदिरेला खूप आनंद झाला. दोघं भेटणार आहेत म्हणजे इथपर्यंत गाडी आली. आता ती देवाजवळ प्रार्थना करत होती की ही गाडी लग्नाच्या मांडवापर्यंत पोहचू दे.

***

मेघना ठरल्याप्रमाणे आली.तिला बघून मंगेशी विचारलं.


" आत्ता कशी आली?"

मेघना ऐवजी इंदिराजी म्हणाली.


"मेघनाला एक मुलगा पसंत पडला आहे. मुलालाही मेघना पसंत आहे.आज दोघं प्रत्यक्ष भेटणार आहेत म्हणून ती आली आहे."


" प्रत्यक्ष भेटले नाही तर पसंत कसं केलं?"


"दोघांना एकमेकांचे फोटो आवडले.मग दोघं इतके चॅट करून बोलत होते.दोघांना एकमेकांचे विचार पटले म्हणून आज भेटणार आहेत." इंदिरा म्हणाली.


" ही कोणती पद्धत आहे लग्नं ठरवण्याची! काहीतरी एकेक फॅड काढतात." मंगेशी आपली नाराजी दर्शवली.


"आजकाल हीच पद्धत आहे." इंदिरा म्हणाली.


"मला तर आजकाल घरात कोणी काही सांगत नाही. फक्त लग्नासाठी बोलावतात."


मंगेशच्या मनातील खदखद इंदीरेला जाणवली पण तिचा नाईलाज होता.


"तुम्हाला सांगायला हरकत नाही पण तुम्ही प्रत्येक कामात खोडा घालता आणि सगळं फिस्कटतं. म्हणून आजकाल तुम्हाला सांगत नाही. मुलांचं लग्न हा त्यांच्या आयुष्यासाठी महत्वाचा असतो.पालकांनी आपला निर्णय त्यांच्यावर थोपवायचा नसतो."


" वा! ही पळवाट छान आहे. माझ्यामुळे कोणतं काम फिस्कटलं? सांग."


" आजपर्यंतच्या संसारात बरेच वेळेला असं झालंय. तुमच्या अहंकारापोटी तुम्ही कुणाचही काहीही न ऐकता बरेच निर्णय घेतले त्यातले बरेच चुकले.पण तेव्हा मी काही बोलली नाही. पण आज मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यात तुमच्या अहंकाराला महत्व देऊन सगळ्या गोष्टी बिघडवायच्या नाहीत.म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगीतलं नाही." इंदिरेने स्पष्टीकरण दिलं.


" छान विचार आहे तुझे. मुलांसमोर छान आदर्श ठेवलास!"


"माझ्याआधी तुम्ही स्वतःच स्वत:चा कोणता आदर्श मुलांसमोर ठेवला ते बघा मग मला म्हणा." इंदिरा मंगेशच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाली.


इंदिरेची हीच धिटाई मंगेशला खुपत होती. आजही त्याचमुळे त्याची चिडचीड झाली. त्याला फारसं महत्व न देता इंदिरा आणि मेघना मेघनाच्या खोलीत गेल्या.


***

" आई बाबा खूपच चिडले आहेत.ते ऐनवेळी काही गडबड नाही करणार नं?"


"घाबरू नको.त्यांचा अहंकार दुखावला गेला म्हणून त्यांची चिडचीड असते. त्यांना महत्व दिलं गेलं की त्यांना आवडतं. शत्रूने ही त्यांना महत्व दिलं तरी त्यांना चालतं. त्यांना महत्व मिळालं पाहिजे हे महत्वाचं बाकी मग तो शत्रू असो की मित्र काही फरक पडत नाही." इंदिरा


" तुझं म्हणणं बरोबर आहे पण पुढे काही वेगळेच वागले तर…?"


"वागण्याचा प्रयत्न करतील. मिहीरच्या लग्नाच्या वेळी पण केला होता."


" हो.हे मला माहितीच नाही."


" अगं तू इतक्या छान मूडमध्ये होतीस. तुला हे सगळं सांगून तुझा मूड नव्हता घालवायचा. सगळ्या अडचणींवर उपाय असतात. हे सगळं होईल याची मला कल्पना होती म्हणून असं झालं तर काय करायचं हा मार्ग पण शोधून ठेवला होता. "


" आई काय झालं होतं नेमकं?"


" जाऊ दे ते. झालं गेलं गंगेला मिळालं. आता आज तू आनंदला भेटणार आहेस तर जरा लक्ष ठेव. की तुम्ही मेसेज वर बोलत असताना त्यांचे विचार,आवडी निवडी, सवयी प्रत्यक्षात भेटल्यावर पण आहेत का?

जेवायला जाताय वेळ घेऊन बोला."


" हो.तुझ्या सगळ्या सूचना लक्षात ठेवीन."


" चल लवकर सगळं आटोपून घे.जेवायची वेळ झाली आहे."


इंदिरा हे वाक्य बोलणेच आहे की बाहेरून मंगेशचा पुकिरा झाला.


" आजच्या दिवशी मला जेवायला मिळणार आहे का?"


" हो.वाढते तुम्हाला.चला."


मंगेशचा जेवढा वरचा सूर लागला होता तेवढीच इंदिरेची चाल आणि बोलण्याचा स्वर शांत होता.

__________________________

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात

निर्णय

लेखिका…मीनाक्षी वैद्य.

Share

NEW REALESED