Hirve Nate - 11 books and stories free download online pdf in Marathi

हिरवे नाते - 11 - गुंफण

                                                                                               गुंफण : 12

 

  “ कुठेतरी जाऊया ना रे आपण .” नीताने आळसावतच शेजारी पेपर वाचत पडलेल्या वरूणकडे नजर टाकली. “ काय झालं ?” पेपर मधून नजर न हटवता वरुण म्हणाला. तेव्हा रागारागाने नीताने त्याच्या हातातला पेपर ओढून घेतला. काहीतरी बिनसलय हे लक्षात येऊन वरुणने समजूतदारपणे तिच्याकडे मोर्चा वळवला.

     नीता आपल्याच विचारात गुरफटली होती. घर ते ऑफिस अशा रुटीनमधे पुर्ण वर्ष गेलं होतं. दोघांनाही काहीही चेंज मिळाला नव्हता. तरी बरं अजून मुलांचा विचार त्या दोघांनीही केला नव्हता. दोघांच्याही घरच्यांकडून आडून सुचवून झालं होतं. पण अजूनही त्यांच्या वेळा आणि पैशाच्या बजेट मध्ये मुलाचा विचार येऊ शकत नव्हता. पण नीता या विचाराने दचकलीच. मुलं म्हणजे काय वस्तु आहे ? बजेट पाहून खरेदी करायला ? असाच विचार आपल्या म्हातारपणी मुलांनी केला तर ? आता बजेट नाही त्यामुळे आई वडिलांना पहाणार नाही. असं त्यांनी म्हटलं तर ? बँकमध्ये येणारे वृद्ध अगतिक चेहेरे तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. प्रत्येक वयाप्रमाणे योग्य ते निर्णय घ्यावे असं तिला प्रकर्षाने वाटू लागलं.

 “ वरुण, आपण बाळाचा विचार करायचा ?” नीता

वरुण बेडवर ताडकन उठून बसला. “ काय म्हणालीस ? पण सगळं कसं मॅनेज करणार ? खरं तर मलाही मुलं हवं आहे. तीन वर्ष झाली लग्नाला. किती दिवस आपण स्वतःत गुरफटून बसणार ? आणि पुढचाही विचार आपल्याला करायला हवा. आपण रिटायर होणार त्याच्या आत मुलाची सगळी जबाबदारी पण संपायला हवी. म्हणजे परत तू आणि मी म्हातारे म्हातारी होऊन निवांत जगायला मोकळे.”

   “ हो. ते तर आहेच. पण त्यापेक्षा आपण लहान असताना आपल्या आई वडिलांचं जग कसं असेल ते आपण अनुभवू. असं मला वाटतय. खरच काय वाटत असेल आई वडिलांना ? किती त्रास दिला मी तर आई बाबाना. आईनी कधी प्रेमाने समजावले. कधी अबोल्याने कामे केली. बाबांनी तर अती झाल्यावर हातही उगारला. पण तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल ? हे आता समजतय. कुवती बाहेरचे मुलांचे हट्ट पुरे करण्याच्या वेळी दोघांची उडलेली तारांबळ आता लक्षात येत आहे. आपण मुलांचा हट्ट न  पुरवू शकण्यातली अगतिकता आणि ती कष्टाने पुर्ण केल्यावर मुलाच्या चेहेऱ्यावरचा आनंद उपभोगताना नंतर त्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता, सगळं काही आता जाणवतय नीता.”

  “ वरुण आपले पालक तरी सधन होते. आपण त्यांना दिलेला त्रास आपल्याला आताही बोचतोय. पण तू विचार कर. जे गरीब पालक मनात खूप असूनही मुलांच्या गरजू इच्छित वस्तूही देऊ शकत नाही. त्यांना काय वेदना सहन कराव्या लागत असतील ?”

  “ होय नीता. आपण समाजाचंही देणं लागतो. मुलांच्या माध्यमातून आपण समाजाच्या अजून जवळ जाऊ शकतो. त्यांना मदत करू शकतो. मुल अर्थात स्वतःचे काही संस्कार घेऊन जन्माला येतं म्हणतात. तेव्हा त्या मुलाच्या निमित्ताने आई वडीलही एक वेगळं आयुष्य जगू लागतात. आपल्या संस्काराप्रमाणे आई वडिलांकडेच ते आयुष्य आपण जगलेलं असतो. आता वेळ असते ती अजून वेगळ्या जीवाच्या संस्काराचे आयुष्य जगण्याची. जरी तो आपले जीन्स घेऊन येईल, तरी त्याच्या पूर्वजन्म कर्मानुसार तो चांगले वाईट परिणामही घेऊन येईल. आपलं आणि त्याचं जीवन अशी सांगड घालताना रोजचा दिवस नवा असेल. कधी चांगला, कधी वाईट. हे सगळं आपण जगायचं. आनंद असेल तो सगळ्याबरोबर वाटायचा. दुःख असेल तर खंबीरपणे उभं रहायचं. खचायचे नाही. दोघच दोघ जगायची मजा ही काळानुरूप कमी जास्त होते. एकमेकांना समजून घेण्यापूरताच तो कालावधी असतो. तो काळ वाढला तर एकमेकांबद्दल अढी निर्माण व्हायची शक्यता असते. त्यामुळे मुलं झाल्यावर आयुष्य कसं एखाद्या नदी सारखं वहायला लागतं. नदी आपल्या बरोबर सगळा पालापाचोळा घेऊन वहात रहाते तसं मुलांच्या पालन पोषणात आपल्यालाही रूसवेफुगवे करायला वेळच मिळणार नाही. त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित झाल्यामुळे एकमेकांचे दुर्गुण काढायला वेळच मिळणार नाही. मग पुर्ण आयुष्य मुलांसाठी.

  “ खरय, आतापर्यंत मी खूप काही पदार्थ केले नाही. पण बाळ शाळेत जायला लागेल तर मित्रांच्या डब्यातले पदार्थ पाहून तो ही, हे पाहिजे ते पाहिजे म्हणेल तर माझ्यातलीही गृहिणी जागी होईल. माणसांमध्ये किती नाती, कला दडलेल्या असतात त्या वेळ आल्यावरच जागृत होतात. एका जन्मामध्ये माणूस किती वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्य जगतो. ही नित्य नूतनता आहे. म्हणूनच आयुष्याची मजा येते. नाहीतर साचल्या पाण्यासारखं सगळं आयुष्य नासलं असतं.” नीता. 

   “ मग घ्यायचा चान्स आपण ? आता तर मेडिकल लीव्ह पण बायकांना फार मोठी मिळते. तुझे आई बाबा, माझे आई बाबा अजून चांगल्या शारिरीक स्थितीत आहेत. त्यानाही नातवंडांचा आनंद आताच उपभोगता येईल. मुलं मोठी होईपर्यंत त्यांचीही मदत आपल्याला होईल, आणि नंतर या वृध्दांची आपल्याला जिम्मेदरी घ्यायची आहे. त्यासाठी पण लहान मुलांची जबाबदारी आधी कमी होणं गरजेचं आहे. नंतर आपल्या आईवडिलांच्या जबाबदारीत मुलांचाही हातभार आपल्याला लागू शकेल. मोठ्या माणसांची सेवा करण्याचे संस्कारही त्यांच्यावर घडू शकतील. किती गुंफण आहे ना आयुष्याची. सगळी एकमेकात पद्धतशीर रचना केलेली आहे. एक जरी धागा सुटला तरी पुढचं सगळं उसवत जाणार. एका नात्याचं प्रेम कमी मिळालं तरी आयुष्य किती प्रकारानी रिकामं रहाणार. आजकालच्या युगात तर असे कितीतरी धागे सुटलेले आहेत. एकच मुल या कल्पनेनी किती नात्यांचे पदर अर्धवट राहिले. हे भरून काढणं अवघड आहे. पण हेच नाही तर मुळात आई वडिलांचे प्रेम किती कमी मिळत चालले आहे. यामुळे माणसाच्या मनाचे कितीतरी कप्पे बंदच रहायला लागले असावे. त्यामुळे भावनाहीनता, रुक्षता, स्वार्थी वागणूक या अवगुणांमध्ये वाढ झाली असेल का ?”

   “ आपण चांगलाच विचार करू. सगळेच काही असे नसतात. आपल्याला सगळ्यांचच खूप प्रेम मिळाले आहे. आपण ते वाटू. समाजसेवा म्हणजे काय एक प्रकारचे प्रेम वाटणेच ना. कुणीच कुणाच्या आयुष्यात पुर्ण मदत करू शकत नाही. फक्त प्रेम वाटू शकतो आणि दुःख हलकं करू शकतो .”

   “ अरे आपला विषय मुल, हा चालला आहे, आणि आपण कुठून कुठे गेलो. पण हा मुद्दा जरूरी आहे. प्रेम दिल्याने वाढते. आपल्या मुलांबरोबर सगळ्यावर आपण प्रेम करू. मुलांनाही हा वारसा देऊ.”

  “ मग ठरलं तर. आपण आता चान्स घ्यायचा.” नीता

   दोघही हातात हात घेऊन एकमेकांकडे पहात राहिले. दोघांनाही जाणिव होती, वाटतं तेव्हढं आयुष्य सोपं नाही, आणि कठिणही नाही. पण प्रेमाने सर्व साध्य होते.

                                                                           .................................................