Swapnasparshi - 11 books and stories free download online pdf in Marathi

स्वप्नस्पर्शी - 11

                                                                                       स्वप्नस्पर्शी : ११

       पहाटवारा अंगाभोवती फिरू लागला, तशी त्या सुखद वाऱ्याने राघवांना जाग आली. मावळतीला आलेले चंद्र चांदण्या दूर जात आहेत असं त्यांना वाटून गेलं. खालचं हिरवं जग, रात्रभर चंद्र चांदण्यांचा प्रकाश पिऊन त्या तेजाने विलसतय असं भासत होतं. हळूहळू दिशा उलगडून आपले रंगाचे पट खोलू लागल्या. मग पक्षीही आकाशी झेप घेत किलकिलाट करू लागले, तसे राघव उठले. पहिल्यांदा त्यांनी स्वरुपाला आठ वाजता पुण्याला जातोय कुणाला काही सांगू नको असा मेसेज टाकला. वासूकडे पाहिलं तर, कितीतरी वर्षांनी तो असा शांतपणे झोपला असावा असे त्यांना वाटले. पण आता सुख त्याच्या दारी आलं होतं. आता झोपून चालणार नव्हतं. राघवांनी हळुवारपणे हाक मारली. तसा वासू उठला. दोघांनी पटापट आवरलं. ते उठलेले पहाताच विष्णुनी फक्कड चहा बनवला. थंड मोकळ्या हवेचा आनंद घेत तिघांनी चहा घेतला. वासुनी विष्णुला आजची कामं सांगुन ठेवली. आज बाहेरगावी जातोय यायला जमणार नाही असे सांगुन ते दोघं घरी परतले. स्वरूपाने नाष्टा तयार ठेवलाच होता. दोघही आंघोळ आटोपून  नाष्टयाला आले. “ आबा, आम्ही दोघं जरा कोल्हापूरला जाऊन येतो. गड्याकडून सामान मागवून घ्या.” आबांना जरा वेगळा संशय आला, पण त्यांनी काही तसे दर्शवले नाही. हो म्हणाले. मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यात ढवळाढवळ ते कधी करत नसत.

      राघव, वासू निघाले. हायवेवर गर्दी होण्याआधी त्यांना जास्तीचा टप्पा गाठायचा होता. राघवांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला फोन करून ठेवला. मधे एखाद्या ठिकाणी गाडी थांबवून ते चहा घेत व फ्रेश होऊन परत मार्गाला लागत. गप्पांच्या ओघात वासू आपलं आयुष्य राघवांसमोर उलगडत होता. आता अढी सुटत आली असल्याने त्याला खुप बरं वाटत होतं. पाच तासाचं अंतर त्याने लवकरच पार पाडले. पुणं जवळ येऊ लागलं तसा वासू नर्व्ह्स वाटू लागला. राघवांनी त्याला धीर दिला. आता मागे हटायचे नाही. जोमाने सर्व प्रयत्न करायचे. वीणासाठी. अशी गोळी दिल्याबरोबर तो खुलला. ती मात्रा लागू पडली. सुदैवाने दवाखाना अगदी मध्य पुण्यात नव्हता, नाहीतर ट्रॅफिकमधे अडकलं असतं तर अवघडच झालं असतं. दवाखान्यासमोर गाडी पार्क करून ते आत शिरले.

     आत बघतात तर काय ही गर्दी. वासू तर बघतच राहिला, आपल्यासारखे कितीजणं आहेत. राघवांनी रिसेप्शनिस्टला बोलून वेळ विचारून घेतली. त्यांनी आधीच अपॉइंटमेंट घेतली असल्याने दोन पेशंटनंतर त्यांचाच नंबर होता तिने बसायला सांगितले. राघव म्हणाले “ वासू बघितलीस किती गर्दी आहे ते. दवाखाना उघडून पाच वर्ष झाली आहेत. बघ किती जणांनी त्याचा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुरळीत केलं. वीस मिनिटानंतर त्यांचा नंबर आला. राघवांना पहाताच डॉक्टरांनी उठून त्यांना शेकहँड केले. त्यांचे आवडते राघवकाका होते ते. प्यूनला तीन कॉफी आणायला सांगुन थोड्या गप्पानंतर वासूचा प्रॉब्लेम समजावून घेतला व  त्याची तपासणी करायला ते आत घेऊन गेले. काही वेळाने बाहेर आल्यावर डॉक्टर म्हणाले “ आज त्यांच्या दोन टेस्ट करून घेतल्या. ते रिपोर्ट लगेच मागवतो आणि औषधोपचार सुरू करू. काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. खुपच पॉझिटिव्ह चान्स आहेत. औषधानी नक्की बरे होतील. पण एक सांगतो की मनातल्या न्यूनगंडाने ते नेहमीच मुली, बायका यांच्यापासून लांब रहात आले असावेत. त्यामुळे त्यांची ती भावना कधीच फुलली नाही. जर का कुणी यांच्या सहवासात आलं, त्यांना आधीच सगळं सांगुन ठेवलं, आणि ते दोघं नेहमी आसपास राहिले तर फारच लवकर रिकव्हरी होईल.”  तेव्हढ्यात नर्सने एक लिफाफा आणून डॉक्टरांना दिला. ते रिपोर्ट पाहिल्यावर म्हणाले “ खुपच आशा आहे. ७५% अवयव सुस्थितीत आहे. मी तुम्हाला दोन महिन्याचा कोर्स देतो. त्यानंतर एकदा दाखवायला घेऊन या.” डॉक्टरांनी दाखवलेल्या आशेच्या किरणांनी वासू अगदी गहिवरून आला. परत परत डॉक्टरांचे आभार मानून त्याने निरोप घेतला. राघवांनी मागे थांबून सगळी नीट प्रोसिजर समजावून घेतली. आता लग्न करायला हरकत नाही ना याबद्दलही खात्रीशीर माहिती घेऊन त्यांनी डॉक्टरांचा निरोप घेतला.

    बाहेर आल्यावर त्यांची गाडी गावाच्या दिशेने धावू लागली. मधे एका ठिकाणी थांबून त्यांनी जेऊन घेतलं. गप्पा मारताना राघव म्हणाले “ वासू, आत्ता डॉक्टरांनी काय सांगितले ते नीट ऐकलेस ना ?”

“ हो ऐकले. का विचारता असे ?”

“ एखादी स्त्री तुझ्या सहवासात आली तर तू खुप लवकर बरा होशील असं त्यांनी सांगितले ना. मग तू वीणाला सगळं सांगुन लग्न का नाही करून घेत ?”

स्वप्नांचे इमले रचावे आणि जेव्हा स्वप्नं खरच समोर उभं ठाकावं आणि मन गांगरून जावं अशी अवस्था वासूची झाली. तो म्हणाला “ दादा, मला हे सगळं वीणाशी बोलणं अवघड वाटतय.”

  “ अरे पण हे तुलाच बोलावं लागणार ना. तुमचं एकदा एकमत झालं की मी आबा आणि नानी मावशीला समजावतो. आता दोन वाजत आहेत. तिला तळ्याकाठच्या मंदिरात पाच वाजेपर्यंत यायला सांग. तुमचं बोलणं झालं की मी पण तिच्याशी बोलेन.” आता मात्र वासुला कल्पनेनेच घाम फुटला. राघवांनी त्याची समजूत काढून तिला फोन करायला लावला. मग ते स्वतः गाडी चालवू लागले. वासूची मनःस्थिती आता अस्थिर झाली होती.

  “ दादा, तुम्हाला असं नाही वाटत आहे का, हे सगळं फार लवकर होत आहे ?”

  “ वेळ आली की कुठलीही गोष्ट होऊन पण जाते. आता अजुन किती उशिर करणार तू ? कधीतरी तर हे करावच लागणार ना ? मग प्रश्न पटापट निकालात काढलेले बरे असतात. मन पटकन मोकळं होऊन जातं.”

   वासुला हे सगळं पटत होतं पण अचानक सगळं होऊ लागल्याने त्याचं मन गांगरून गेलं. हा रस्ताच संपू नये असे त्याला वाटू लागले. राघव शांत गाडी चालवत राहिले, कारण त्याच्या मनोविश्वात ते काही करू शकणार नव्हते. ही स्थिती त्यानेच हँडल केली पाहिजे. शेवटी रस्ता संपला आणि गाडी मंदिरापाशी आली.

   वीणा देवदर्शन करून एक झाडाखाली बसली आहे हे दोघांनी पाहिलं, आम्ही दर्शन घेऊन येतो अशी खुण करून ते आत गेले. राघवांनी त्याला धीर देत म्हंटले “ बाजी सगळी तुझ्या हातात आहे. फक्त नीट बोल. समजव. तुमचं बोलणं झालं की मला फोन कर मी येतो तुम्ही असाल तिथे.” वासुने देवाची मनोमन करुणा भागली. इतकं चांगलं विश्व, संधी दिल्याबद्दल त्याचे आभार मानले. देवाच्या पाया पडून तो वीणापाशी गेला.

   “ दादाला काही स्तोत्र म्हणायचे आहेत. तोपर्यंत आपण तळ्याकाठी बसू.”  दोघं तळ्याकाठी जाऊन हिरवळीवर बसले. समोर सुर्यास्त होत आला होता. केशरी रंगाने व्यापलेल्या आकाशाचा रंग त्या दोघांच्या जीवनात आपले रंग भरू पहात होते. वासुने ठरवले अघळपघळ न बोलता मुद्द्यालाच हात घालायचा.

   “ वीणा, तुला एक विचारू ?”

   “ काय झालं विचार ना.”

   “ माझ्याशी लग्न करशील ?”

वीणा त्याच्याकडे पहातच राहिली. हे स्वप्न की सत्य हे ही तिला क्षणभर कळेना. दोघांच्या अंतरीच्या पटलेल्या खुणा आधीच दोघं जाणून होते पण हा क्षण आयुष्यात येईल अशी अपेक्षा करणं त्यांनी सोडून दिलं होतं. तिची गोंधळलेली स्थिती पाहून वासू म्हणाला “ लग्नाला तुझा होकार असेल तर पुढे बोलतो. पण ते ही ऐकून तू मला नकार देऊ शकतेस. आपली मैत्री आपण अबाधित ठेवू.” कातर नजरेने त्याच्याकडे पहात तिने होकर दिला. तिच्या वैराण आयुष्यात सुख येऊ घातलं होतं. मग वासुने सगळी आपली लहानपणीची हकीकत सांगितली. दादानी दिलेला धीर, हॉस्पिटलचा अनुभव, डॉक्टरांचं म्हणणं सांगितलं. वीणा मन लाऊन सगळं ऐकत होती. आता तिचा विचारी स्वभाव जागृत झाला. तो कुठल्या ओझ्याखाली इतके दिवस काढत होता हे तिला उलगडत गेलं.

    वासुचं बोलणं पुर्ण झाल्यावर काही क्षण तिने विचार केला व म्हणाली “ वासू, आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो हे तर आपल्या कधीच लक्षात आलं होतं, पण दोघांनी ते मनात ठेवलं. मला फक्त तुझा सहवास मिळाला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. औषधउपचाराने बरा झालास तर फारच छान, नाही झालास तरी मी तुझ्याबरोबर तसच आयुष्य काढायला तयार आहे. एका विधवेला तू परत तिचं हक्काचं घर मिळवून देत आहेस ही फार मोठी गोष्ट आहे. माहेर कितीही चांगलं असलं तरी मुली लग्नानंतर तिथे उपऱ्याच होतात. पण वासू, आबा नानी तयार होतील का या लग्नाला ?”

   “ दादा आपल्याला पुर्ण मदत करणार आहे. तो त्यांच्याशी बोलेल.” वासू म्हणाला. दुःखाने आपल्या आयुष्यातून माघार घेतली आहे या गोष्टीवर अजुनही दोघांचा विश्वास बसत नव्हता. हातात हात घेऊन ते थोडा वेळ बसुन राहिले. मग वासू म्हणाला “ चल दादाला सांगू. त्याला फार आनंद होईल. आपल्यासाठी तो देवळात प्रार्थना करत बसला आहे.” दोघं परत मंदिरात आले.

   डोळे मिटून बसलेल्या राघवांना स्पर्श करून वासुने हाक मारली. दोघांचे फुललेले चेहेरे त्यांना न बोलताच सगळं सांगुन गेले. दोघांना जोडीने देवाच्या पाया पडायला लावून देवाच्या करुणेचा पाझर त्यांच्यावर बरसलेला ते निरखत राहिले. त्यानंतर ते दोघं राघवांच्या पाया पडले. सुखाने संसार करा या आशिर्वादाने त्यांचे डोळे भरून आले. दादानी आपल्या आयुष्यात सुख आणले या विचाराने गहिवरून आले होते. राघव म्हणाले “ आजचा दिवस फार चांगला आहे. आज तुमचं सगळच काम पुर्ण करायचं. आता आपण नानी मावशीकडे जाऊ, मग तिचा होकार घेऊन आबांकडे जाऊ.” प्रथम दोघेही घाबरले पण आता सगळ्यालाच सामोरं जायचं बळ त्यांच्या मध्येही आलं होतं.  “ वीणा फक्त दवाखान्याची गोष्ट आपल्या तिघांमध्येच ठेवायची.” मग वातावरण हलकं करायला ते वीणाला म्हणाले “ वासुचं तर पोट भरलेलं आहे आज. पण वीणा मला खुप भूक लागली आहे. आम्ही नानींशी बोलेपर्यंत छान खायला कर. तुझं पाककौशल्य बघू दे मला. तुझा मोठा दीर आहे मी. सहज कसं तुला स्वीकारेन ?” हे बोलणे ऐकून सगळे हसू लागले. तिघांच्या मनावरचा ताण थोडा तरी कमी झाला. खरं तर नानी, आबा दोघही अडून बसणाऱ्यातले नव्हते. पण तरी विधवेशी लग्न ही गावात रुजलेली कल्पना नव्हती. शहरात हे सर्रास चालत होतं. गाडी घरासमोर थांबली. गाडी कुणाची आली हे पहात वीणाचा भाऊ विशाल बाहेर आला. वासुला पहाताच त्यांच्या हसतच गप्पा सुरू झाल्या. पण राघवांना आणि वीणाला गाडीतून उतरताना पाहून त्याला एकदम आश्चर्य वाटलं. हॉलमधे बसल्यावर नानी मावशीही बाहेर आली. तसे राघव म्हणाले “ नानी मावशी तुला खास भेटायला आलो.” तशी मावशी आनंदली. वृद्धापकालामुळे आपल्याला कुणी भेटायला येतं या गोष्टीचा खुप आनंद असतो. “ विशाल, वहिनींना पण हाका मार. तुम्हा सगळ्यांना काही सांगायचं आणि विचारायचं आहे. वहिनी आल्यावर ते म्हणाले “ जरा वेगळा विषय मांडतोय. पण जर का तुमची परवानगी असेल तर वासुसाठी वीणाला मागणी घालायला आलो आहे.” क्षणभर सगळे एकमेकांकडे पहातच राहिले. असं कधी काही घडेल हे कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं. पोरीच्या नशिबात सुख येऊ पहातय या विचाराने मावशीच्या डोळ्याला धारा लागल्या. “ पण समाज काय म्हणेल ?” विशाल गांगरला. “ विशाल, शहरात तर अशी कितीतरी लग्न होतात. दोन जीव जर का सुखी होत असतील तर त्यात काय वाईट आहे ?”

    “ काहीच हरकत नाही दादा. माझ्या माहेरी पण अशी एक दोन लग्न झालेली आहेत. मागे मी पण ताईंच्या लग्नाबद्दल सुचवलं होतं पण यांनी ऐकलं नाही. वहिनीला नणंद जड झाली असे काही ऐकण्यापेक्षा मग मी गप्प बसले.” वहिनी म्हणाली.

   “ विशाल, गावगप्पांपेक्षा बहिणीचं सुख महत्वाच वाटत नाही का तुला ?” सगळा रोख आपल्याकडे आलेला बघून, आणि गावातलं आबा व राघवांचं स्थान बघून उघडपणे कुणी बोलणार नाही. बोलले तरी चार दिवस चर्चा होऊन कुठलाही विषय संपतो हे लक्षात घेऊन विशालने आपली समंती दिली. श्रीमंताघरी आपली बहीण जाणार याचा त्यालाही आनंदच वाटला. मग वहिनी तोंड गोड करते हं म्हणत आत गेली. आतून सुटलेल्या खमंग वासाने राघव, वासूची भुक खवळली होती. वीणा शिर्याच्या प्लेट्स घेऊन बाहेर आली, तसा विशाल तिला चिडवू लागला “ अच्छा तुमचं हे आधीपासून प्लॅनिंग चालू होतं तर. तुम्ही तिघं एकाच गाडीतून आलात ना.”

   “ नाही विशाल पण एखाद्या गोष्टीची वेळ आली की ती कशी पटकन सगळं जुळवून आणते.”

   “ हे मात्र खरं हं राघवा. फार मोठ्या काळजीतून मुक्त केलस आम्हाला. वासू तू वीणाला पत्करत आहेस, फार मोठं मन आहे तुझं. आपल्या होणाऱ्या जावयाचं मावशी कौतुक करू लागली. तसा वासू आनंदला. चहा झाल्यावर राघव म्हणाले “ मावशी, तुमच्याकडून तर होकार झाला. आता राहिले आई आबा.”  हे ऐकताच परत सगळे टेंशन मधे आले. ते पाहून राघवांनी धीर दिला. “ घरी गेलो की लगेच त्यांच्याशी बोलणार आहे. रात्रीच तुम्हाला कळवतो. काळजी करू नका. आपले आबा खुप पुढारलेल्या मताचे आहेत.” त्यांचा निरोप घेऊन दोघं घरी आले.

       आठ वाजत आले, दोघं कुठे गेले म्हणुन आबा आई चिंतित होते. कपडे बदलून आल्यावर राघवांनी स्वरुपाला आईला घेऊन आबांच्या रूममधे यायला सांगितले. वासू काकांना घेऊन आबांच्या खोलीत आला. सगळे खोलीत जमलेले पाहून आबांना आश्चर्य वाटलं. राघव म्हणाले “ आबा तुम्हा सगळ्यांशी महत्वाचं  बोलायचं आहे.” “ काय झालं रे राघवा, सगळं ठीक आहे ना ?” आईने कातर स्वरात विचारले. “ होय आई. उलट आनंदाची बातमी आहे. आपला वासू लग्नाला तयार झाला आहे.” “ काय ?” चौघांना आश्चर्याचा धक्का बसला. या दिवसाची अपेक्षा करणंही त्यांनी सोडून दिलं होतं.

     “ वा, वा, ही तर खुपच चांगली बातमी आहे. आता तर पोरींची लाईनच लावतो बघ तुझ्यासमोर.” आबा म्हणाले. तसा वासू घाबरला.

     “ आबा, आम्ही पोरगीही पसंत करून आलो आहोत.”

      “ काहीच हरकत नाही. राघवा, तू पोरगी पसंत केलीस काय आणि आम्ही पसंत केली काय एकच आहे. आणि ते दोघं एकमेकांना पसंत पडले ना मग कामच झालं.”

      “ आबा, म्हंटलं तर एक अडचण आहे. म्हंटलं तर नाही.”

      “ काय झालं ?” आबा म्हणाले.

      “ वासुला नानी मावशींची वीणा पसंद आहे.” हे ऐकताच चौघही हपकले. पण सावरून घेत त्यांनी विचारले “ वासू बद्दल त्यांना सगळं माहित आहे ना ?”

      आबा काय म्हणत आहेत तो रोख फक्त वासू आणि राघवांनाच कळाला. “ हो. मुलीला सगळं माहित आहे, आणि त्यांच्या घरून लग्नाला समंती मिळाली आहे.” हे ऐकताच आबा चिंतामुक्त झाले. “ अरे मग आम्हा सर्वांची पण समंती आहे सांग.” बायकांनीही आनंदाने मान डोलावली. काकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. हा सल आयुष्यभर त्यांना छळत होता. वासूची म्हातारपणी कोण काळजी घेईल ही भावना त्यांना नेहमी पोखरत रहायची. आता त्या दुखातून ते एकदम मोकळे झाले. सगळयांनी  वासुकडे रोख वळवला. स्वरूपाने तर त्याला चिडवून बेजार केले.

     वासू म्हणाला “ आबा, आई , काका तुम्ही वीणा विधवा असुनही तिला सहज स्वीकारलं, मला तर तुम्ही काय म्हणाल हाच प्रश्न छळत होता. घाबरलो होतो मी.”

     “ वासू,  आम्ही आता सगळं जीवन जगुन झालेले लोकं आहोत. जीवनात कुठलीच गोष्ट स्थायी नसते, आणि प्रत्येक प्रश्नाकडे उत्तर म्हणूनच बघायचं असतं हे अनुभवाने शिकलो आहे आम्ही. लोकं काय म्हणतात त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे फार महत्वाचं असतं. आपण त्याकडे लक्ष द्यायचं. तुला ती आवडली ना, मग झालं. तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे.” आई म्हणाली. वासु सगळ्यांच्या पाया पडला. कौतुकाचा, आनंदाचा स्पर्श त्याच्या पाठीशी खुप काही बोलून गेला. आयतं ताट वाढून मिळाल्यासारखं सगळ्यांना वाटत होतं. स्वरुपा स्वैपाकघरात काहीतरी गोडधोड करायला गेली. आता ही बातमी सगळ्यांना सांगताही येणार होती. सगळे जिकडे तिकडे गेल्यावर राघवांनी आबांना कालपासून आत्तापर्यंतचा सगळा आढावा सांगितला. त्यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक करत आबा ऐकतच राहिले. 

   “ आबा, नानीमावशीकडे सगळे आपल्या होकाराची वाट पहात असतील. काय सांगू त्यांना ?”

   “ त्यांना सांग उद्या सकाळी ११ वाजता सगळे लग्नाची बोलणी करायला या. देण्याघेण्याचा तर प्रश्नच येत नाही. जेवताना वासुला विचारू लग्न कसं करायचं म्हणून ? मोठ्या प्रमाणात लग्न करायला तो बहुतेक तयार होणार नाही. तू त्यांना फोन करून या म्हणून कळव. आपण जेवताना बाकी ठरवू या.” राघवांनी विशालला फोन करून बातमी सांगितली. भारावलेल्या विशालने परत परत मनःपुर्वक आभार मानले, व उद्या येतो म्हणाला.

     आबांचा अंदाज खरा ठरला. धुमधडाक्यात लग्न करायला वासुने नकार दिला. तसे राघव म्हणाले “ मग तर आपण दिवाळीच्या पाडव्याला तुझं लग्न लाऊन देऊ. तेव्हा आपण तसेही सगळे एकत्र येणार आहोत, तयारी तर तशीही चालूच आहे. पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक तर मग काय हरकत आहे त्या दिवशी लग्न लावायला ?”

     “ दिवाळीत कुठे लग्न करतात का ? तुळशीची लग्न झाले की मुहूर्त सुरू होतात.” स्वरुपा म्हणाली.

     “ अगं वीणाचं पहिलं लग्न पण मुहूर्त पाहूनच झालं असेल ना. मग काय साधले त्या मुहूर्ताने ? दोघांच्या जीवनात काही चांगलं घडतय तर त्यात आता अजुन उशिर नको. आईचं म्हणणं सगळ्यांना पटलं. आबांनी राघवांवर सगळी जबाबदारी सोपवली. वासूची तर दादा म्हणेल ती पूर्व दिशा होती.

       दुसऱ्या दिवशी ११ वाजता नानी मावशीकडची मंडळी आली. गोऱ्यापान लाघवी वीणाला आधीपासून सगळेच ओळखत होते. पण सून म्हणून पाहून अजुनच आनंद झाला. वीणा लाजून चूर झाली होती. दोघांवरुन कुणाचीच नजर हटेना. राघवांनी विशालला नीट समजावून घरच्या घरी लग्नाची कल्पना मांडली. पाडव्याचा मुहूर्त सांगितला. सगळ्यांना यांचं लग्न होतय हाच आनंद होता. बाकी कशाविषयी फार कुणी आढेवेढे घेतले नाही. पाडव्याचा मुहूर्त ठरला. तुम्हाला काय द्यायचे ते तुम्ही दया, आम्हाला काय करायचे ते आम्ही करू. अश्या बोलणीवर यादी पक्की झाली. विशालने लग्न आमच्या घरी होणार हे आग्रहपुर्वक सांगितलं. वीणाला स्वरूपाने नारळ पेढ्याचा पुडा दिला व तिच्या काळ्याभोर लांबलचक केसांवर जुईचा गजरा माळला. आपल्या धाकट्या जाउबाईंची चेष्टामस्करी करताना तिच्या डोळ्यातून ओघळलेलं आनंदाचं पाणी हळुवार पुसलं. खाणं पिणं झाल्यावर मंडळी निघून गेली. सगळ्यांकडेच लग्नाची तयारी करायला वेळ थोडा होता.

       राघव आईला म्हणाले “ आई, तुळजाभवानीला आता तू नव्या जोडप्या बरोबर जा. आज चार वाजता ग्रामदेवतेला जाऊन येऊ. तुला देणगी द्यायची आहे ना तिथे, ती देऊ आणि मग लग्नाच्या तयारीचा मुहूर्त करून घेऊ. उद्या कोल्हापूरला साड्या, कपडे खरेदीला जाऊ. वासुचे कपडे शिवायला आता वेळ नाही. रेडिमेडच घ्यावे लागतील. आबा, आत्ता आपण शाळा आणि हॉस्पिटलला जाऊन येऊ.”

      “ राघव, अरे किती वणवण करशील. जरा विश्रांती घे.” आई काळजीने म्हणाली.

      “ अगं आई, आता विश्रांतीला वेळ नाही. एकदा का हे लग्न झालं की मी मग निवांत विश्रांती घेईन.”

         आबा आणि राघव आधी शाळेकडे गेले. मुख्याध्यापकांना भेटून देणगीचा चेक दिला. तो पहाताच सरांना आनंद झाला. “ भरपूर मोठी मदत करत आहात तुम्ही. यामुळे आपल्या इथे बारावी पर्यन्त कॉलेजही सुरू करता येईल. खुप मुलांना बाहेर रहायचा, खायचा खर्च परवडत नाही. त्यामुळे दहावी पर्यन्त शिकून असच कुठेतरी कामाला लागतात किंवा शेती करतात.”

      “ आपल्या इथे टेक्निकल कोर्स नाहीयेत का ?” राघव

      “ नाही. पण जागा भरपूर आहे. मदत मिळाली तर तेही सुरू करता येईल.”

      “ ठीक आहे. बघूया.” असे म्हणून त्या सरांचा निरोप घेऊन ते दोघं बाहेर पडले.

          मग हॉस्पिटलला जाऊन तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटले. येण्याचे प्रयोजन सांगुन त्यांना चेक दिला. भारावलेल्या त्या अधिकाऱ्यानी आबांचे शतशः आभार मानले. सगळं गावच आबांना ओळखत असल्याने प्रत्येकाला त्यांच्या बद्दल आदरच होता. त्यांनी सांगितले “ नवजात अर्भकांचे मृत्युचे प्रमाण वाढत असल्याने इन्क्युबेटर आणायचे चाललेले, पण त्यासाठी पैसे कमी पडत होते. आता या पैशातून ते आणणे शक्य होते. आता गावातील अर्भकांची जोपासनाही नीट करता येईल.” असे ऐकल्यावर आबा आणि राघवांना आपली मदत योग्य ठिकाणी पोचत असल्याचे जाणवून मोठ्या आनंदाने ते घरी आले. स्वरुपा, वासू, आईला हे ऐकून फारच समाधान वाटलं. आबांबद्दलचा आदर दुणावला. जेवण झाल्यावर थोडी विश्रांती घेऊन पाच वाजता ग्रामदेवतेला जायचे ठरले.

        आतापर्यन्त वासूच्या लग्नाची बातमी पसरली होती. मधुर, अस्मितानी वासूकाकाच्या धाडसी निर्णयाचे खुप कौतुक केले. नीलने आधी काकाला रागवून घेतले. माझ्याशिवाय कसे लग्न करतोस ? मग चिडवून बेजार करत अभिनंदन केले. बहिणींचे फोन येऊन गेले. त्या लक्ष्मीपुजन झाले की लगेच निघणार होत्या. नानाकाकांकडचे सगळे धनतेरस करून इकडे यायला निघणार होते. वासुचे काही निवडक मित्र येणार होते. त्यापैकी एकाचं मांडव, वाजंत्रीचे दुकान होतं. तो वासुचं काही न ऐकता अंगणात आलिशान मांडव घालुन, फुलांची सजावटही करणार होता. मग शेवटी त्या मांडवात सत्यनारायण पुजा करायची ठरली. घरात बऱ्याच घडामोडी चालू होत्या. पाच वाजता वासू मोठी गाडी घेऊन आला. आई, स्वरुपा, सजून धजुन बाहेर आल्या, तेव्हा हे तिघे त्यांच्याकडे पहातच राहिले. तेव्हा आई म्हणाली “ मी वरमाय आहे म्हंटल.” “ आणि मी मोठी जाऊ.” स्वरुपा म्हणाली तसे सगळे हसू लागले. दोघींच्या रसिकतेने आता घरात खरच लग्नसराई जाणवू लागली होती. ग्रामदेवतेच्या पाया पडून आई आबांनी तिची पुजा केली. लग्नाचे आमंत्रण देत सगळं नीट पार पडू दे अशी प्रार्थना करून तिचे मनोमन आभार मानले. वासुही आपल्या उघडलेल्या नशिबाप्रत्यर्थ देवीच्या कृतज्ञापुर्वक पाया पडला. राघव, स्वरुपानेही पाया पडून देवीचा सगळ्यांसाठी आशिर्वाद मागितला. आबांनी तिथल्या विश्वस्ताच्या हाती चेक दिला व म्हणाले “ इथे छान बाग केली तर लोकांची आवकजावकही वाढेल आणि मंदिरात चैतन्य राहिल. देवाला भक्त, आणि भक्ताला देव दोन्ही पाहिजे.” ही कल्पना विश्वस्तांना खुप आवडली व तसेच करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

       दर्शन घेऊन घरी आल्यावर आबा, वासू, राघवांनी कामाची यादी बनवली. उद्या सकाळी नाष्टा करून कोल्हापूरला निघायचं ठरलं होतं. वासुचा मित्र दुपारी येऊन घरावर लाइटींग करून जाणार होता. आबांचे बँकेचे आणि देणगीचे इथले व्यवहार संपले होते. आता फक्त दिवाळी आणि लग्न एन्जॉय करायचं राघवांनी ठरवलं. रात्री झोपताना ते स्वरुपाला म्हणाले “ घरामध्ये मी आधीच लक्ष द्यायला हवं होतं नाही का ?”

      “ अहो, नेहमीच घरासाठी तुम्ही करत आले आहात. तुम्हीच म्हणताना ‘ समयसे से पहेले ओर भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलता.” हे ऐकून राघव हसू लागले. कारण हे त्यांच्या आवडीचे वाक्य होते. कालच्या रात्रीचा सुंदर अनुभव त्यांनी स्वरुपाला सांगितला. तिलाही राघवांप्रमाणे हिरव्या स्वप्नाची ओढ लागली होती. दोघांनाही झोपेत जणू एकच स्वप्न दिसत होते. हिरवं स्वप्न.

                                                                                    .................................................