Shyamachi Patre - 9 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 9

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र नववे

सातशें काळया डागांची कहाणी ! प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.हिंदुस्थानचा प्रश्न मोठा बिकट आहे. कुटिल ब्रिटिश मुस्तद्यांनी तो अधिकच बिकट करून ठेवला आहे. हिंदी संस्थानिकांची एक धोंड स्वराज्याच्या मार्गात सदैव उभी असते. हिंदुस्थानांतील हे बहुतेक संस्थानिक म्हणजे जगांतील एक अजब चीज आहे ! त्यांच्या लीला किती वर्णाव्या? किती सांगाव्या? जगाचा इतिहास पाहिला तर आपणांस असें दिसते कीं साम्राज्यें स्थापन होतात; कांही काळ ती टिकतात; नंतर तीं मोडतात. त्यांचे निरनिराळे भाग स्वतंत्र होतात. रोमन साम्राज्य, त्यापूर्वींचें पर्शियन साम्राज्य, आपल्याकडील मौर्य व गुप्त साम्राज्यें, मोंगल साम्राज्य, मराठी साम्राज्य सर्वांची एकच गति झाली.हिंदुस्थानांत ब्रिटिश आले तेव्हा मराठे प्रबळ होते. तिकडें पंजाबांत शिखांची प्रबळ सत्ता स्थापन झाली होती. अगदीं दक्षिंणेकडे हैदरअल्लींनें राज्य बळकावलें होते. मधूनमधन लहान लहान राजे अथवा त्यांचे मांडलिक असे वावरत होते. ब्रिटिशांशी तह करुन आपले संस्थान टिकविणारा निजाम हा पहिला संस्थानिक ! हळूहळू ब्रिटिशांची तैनाती पध्दत सर्वांच्या मानगुटीस बसली. ब्रिटिशांच्या कारवाया व आमची आपसांतील भांडणें यामुळें हळूहळू एक एक भाग ब्रिटिशांनी गिळंकृत केला. वेलस्ली, हेस्टिंग्ज व डलहौसी यांनी हिंदुस्थान एका सत्तेखाली आणण्याचें काम पुरें केलें. सार्वभौम सत्ता स्थापन झाली. मधूनमधून संस्थाने काजव्याप्रमाणें लुकलुकत राहिली.१८५७ साल आलें. असंतुष्ट लोकांचें तें युध्द होतें. ज्यांच्या जहांगिरी गेल्या, पेन्शनें गेंली, संस्थानें खालसा झालीं ते रागावले होते. ' स्वराज्य म्हणजे जनतेचें राज्य ' ही कल्पना त्यावेळेस उद्भूत झालेली नव्हती. तें आम जनतेचें युध्द नव्हतें. असंतुष्ट संस्थानिकांचें, राजेमहाराजे यांचें तें युध्द होतें. परंतु या युध्दांत जर सारे सामील झाले असते तर हिंदुस्थानच्या इतिहासाला निराळी गति मिळाली असती. ग्वाल्हेरचे शिंदे जर लढाईंत पडले असते तर सारे रजपूत राजेहि उठाव करणार होते. ' शिंदे विरुध्द गेले तर आपलें आटोपलें? ' असें कॅनिंगनें कळविलें होतें. कदाचित् राजनिष्ठ शीखहि मग असंतुष्ट झाले असते. परंतु ग्वाल्हेरचा राजा वयानें लहान होता. दिवाणांच्या हातांत सूत्रें होतीं. रावराजे दिनकरराव दिवाण होते. त्यांनीं अल्पवयी राजाला दिल्लीला पाठवून दिलें. दिल्ली ब्रिटिशांनी सर केली होती. ग्वाल्हेर ब्रिटिशांच्या बाजूनें राहिलें. रजपूत रक्त थंड राहिलें. महाराष्ट्रांतील संस्थानेंहि शांत राहिलीं. १८५७ आलें व गेलें ! तात्या टोपे, झांशीची राणी लक्ष्मी अशीं वीर रत्नें चमकलीं. परंतु स्वातंत्र्य दुरावले. परवंशता कायमची जणुं पदरीं आली.

१८५७ च्या युध्दांच्या वेळीं हिंदुस्थानांतील कांही राजेरजवाडयांनीं इंग्रजांना मदत केली. कांही तटस्थ राहिले. या गोष्टीचा इंग्रजांनीं विचार केला. डलहौसी बंद झाले. हे राजेरजवाडे, हे संस्थानिक, हे जहागीरदार, हे जमीनदार, यांना जिवंत ठेवण्यांतच ब्रिटिश सत्तेला फायदा आहे, ही गोष्ट ब्रिटिश मुस्तद्यांनी ओळखली. हिंदुस्थानांत जर पुन्हा कधीं स्वातंत्र्याची चळवळ झाली तर ठायीं ठायीं पसरलेलीं हीं संस्थानें आपणास उपयोगी पडतील, यांची आपणांस मदत होईल ही गोष्ट त्यांच्या लक्षांत आली. हिंदुस्थानचे ब्रिटिश हिंदुस्थान व संस्थानी हिंदुस्थान असे दोन तुकडे त्यांनीं पाडले. सर्व हिंदुस्थानचा प्रश्न सोडवतांना या संस्थानिकांचें हातचें प्यादें वाटले तेव्हां व वाटेल तेथे आपणांस पुढे सरकविता येईल हें त्यांच्या ध्यानांत आलें आणि म्हणून ब्रिटिश सत्तेनें हीं बांडगुळें राखून ठेवलीं ! पुष्कळसे संस्थानिक म्यूझियममध्यें नेऊन ठेवण्याच्या लायकीचे आहेत. दुसरें काय? या संस्थानिकांना लोकशाही कारभार हाकण्याची बुध्दि होऊं नयें असे प्रयत्न केले जातात. प्रजेपासून त्यांना दूर राखण्यांत येत असतें. राजपुत्रांना शिकविण्यासाठी खास शिक्षणसंस्था आहे ! सरदार वल्लभभाई म्हणाले, '' या शिक्षणसंस्थांतून राजपूत्रांना असें शिक्ष्ज्ञण दिलें जाते कीं ते त्यामुळें जणुं पशु होतात !'' १९१७ सालीं बनारस येथें हिंदु युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ होता. महात्मा गांधीहि त्यावेळेस आमंत्रणावरुन उपस्थित होतें. अनेक संस्थानिक तेथे आले होते. सुंदर, रंगीबेरंगी, जरतारी पोशाख करुन ते आले होते. सोन्यामोत्यांच्या अलंकारांनीं नटून आले होते. महात्माजी तें ऐतिहासिक भाषण करतांना म्हणालें, '' हे नटलेले संस्थानिक पाहून माझी मान खाली होत आहे. आपल्या प्रजेची स्थिती कशी आहे, तिची किती दैना आहे, कर किती वाढलेले आहेत, अज्ञान किती पसरलेलें आहे, उद्योगधंदे कसे मेले आहेत, इकडे त्यांचें लक्ष आहे का? आपले दागदागिने प्रजेच्या हितासाठीं त्यांना नाहीं का खर्चिता येणार? प्रजेचा दुवा हा सर्वांत मोठा अलंकार ! '' अशा आशयाचें महात्माजी बोलूं लागले, हिंदींतून बोलूं लागले. त्यांना त्यांचे भाषण अर्धवट बंद करावें लागलें ! डॉ अ‍ॅनी बेझंट वगैरेंनी तें सहन झालें नाहीं, झेपलें नाहीं. पं. जवाहरलाल तर नेहमीं म्हणतात कीं ही संस्थानें नष्ट केली पाहिजेत. तीं टिकविण्यांत कांही अर्थ नाहीं. निजामाचे संस्थान घ्या. काय आहे तेथें? नवाबी कारभार तेथें चालला आहे. जनतेला हक्क नाहींत. हम करे सो कायदा ! वाटेंल तेव्हां सभाबंदी, भाषणबंदी, संघटनेचें स्वातंत्र्य नाहीं, लेखनाचे स्वातंत्र्य नाहीं. म्हैसूर, बडोदे हीं आम्ही सुधारलेलीं समजतों. इतर संस्थानांच्या मानानें हीं सुधारलेलीं. परंतु अद्याप तेथेहि लोकशाहीचा मागमूस नाहीं. बडोदे संस्थानांतील धारासभेंत लोकांना बजेटवर मत देतां येत नाहीं ! फार तर प्रश्र म्हणे दोन चार विचारा. कसलें स्वातंत्र्य नि काय? लोकांच्या हातांत कारभार या सुधारलेल्या संस्थानिकांनीहि का देऊं नये? त्याला इंग्रज सरकारच आड येत आहे का?

आमच्यांतील कांही परंपरापंडित म्हणतात, '' पूर्वजांच्या वैभवाची हीं चिन्हें आहेत. ती राहूं देत. ती नष्ट करणें कृतघ्नपणा आहे ! '' परंतु तीं नष्ट व्हायला नको असतील तर त्यांना थोडी सुधारणा करुं दे. ज्यांना नष्ट व्हायचे नसेल त्यांनीं युगधर्म ओळखला पाहिजे. सतराव्या-अठराव्या शतकांतील नवाबी थाटानें त्यांना अत :पर राहता येणार नाहीं. बदला, नाहीं तर नष्ट व्हा !या संस्थानिकांना जर कांही स्वाभिमान असता, या देशाचे आपण याची कांही लाज असती तर उत्कृष्ट कारभार चालवून त्यांनीं ब्रिटिशांस लाजविलें असतें. ब्रिटिश सरकार बोलूनचालून परकी. सहा हजार मैलांवरुन आलेलें. त्यांना हिंदुस्थानविषयीं का म्हणून आपलेपणा वाटावा? ते रक्त शोषण करण्यासाठींच आले आहेत. परंतु संस्थानिक तर आमचे ना? ते येथलेच ना? त्यांनी आदर्श कारभार कां हाकूं नये? आम्हा ब्रिटिश हिंदुस्थानांतील लोकांना असे कां सांगता येऊं नये कीं, '' संस्थानांतील तो सुंदर कारभार पहा, तेथें पहा लोकसत्ता आहे. सर्व कारभार जनतेच्या हातीं अहे. '' परंतु असें होण्याऐवजीं उलट संस्थानांतच जाऊन नेहमी सांगावें लागतें की '' ब्रिटिश हद्दींत आहेत तसे तरी कायदे येथे करा. तितकें तरी स्वातंत्र्य तुमच्या संस्थानांतून द्या. '' पदोपदीं ब्रिटिश हिंदुस्थानाकडे पहा असे सांगावें लागणें लाजीरवाणे आहे. त्याने आमची मान खालीं होते. पूर्वजांचीहि मान खालीं होते असेल.आम्हां महाराष्ट्रीयांना आमचें साम्राज्य अद्याप आठवते ! साम्राज्यात जे त्याग झाले, जी शौर्य-धैय-त्यागाची कृत्यें झाली तीं सदैव वंदनीयच आहेत. परंतु त्यावेळेस आम्ही आमचे साम्राज्य निर्मित होतो, हें विसरून चालणार नाहीं !! आम्हाला बडोदे, ग्वाल्हेर, इंदूर, कोल्हापूर, सांगली, मिरज वगैरे लहानमोठया संस्थानाचा अभिमान वाटतो ! परंतु त्या संस्थानिकांनी प्रजेला हक्क दिले तर तो अभिमान सार्थ होईल. बडोदे संस्थान हें गुजरातमध्यें. मराठयांनी गुजरातवर स्वा-या केल्या. आपली सत्ता तेथें स्थापली आपले अधिकारी नेमले. जित व जेते असे संबंध सुरू झाले ! मला असें मागें कळलें कीं, डाकोर या देवस्थानचे पुजारी हे महाराष्ट्रांतले आहेत. गुजरातमधील देवस्थानंचें पुजारीहि महाराष्ट्रीय नेमले गेले ! अहमदाबादला महाराष्ट्रीय वस्ती ज्या भागांत आहे, त्या भागाला ' भद्र ' म्हणतात ! हा भद्र भाग पूर्वीहि होता कीं महाराष्ट्र जेते स्वत:ला ' भद्र ' 'उच्च' समजून वागूं लागले तें देवाला माहीत ! तें पूर्वीचें जावो, गुजराती भाषेंत मराठयाविषयीं वाक्यप्रचार-खेडयापाडयांतून रूढ आहेत ते ऐकले म्हणजे आपली कारकीर्द तिकडील लोकांना कितपत मानवली ते दिसून येईल ! एकदां पूज्य विनोबाजीस कोणीं विचारलें, '' काकासाहेब कालेलकर महाराष्ट्र सोडून गुजरातेंत कशाला गेले? त्यांच्या सेवेला महाराष्ट्र मुकला. '' तेव्हां विनोबाजी म्हणाले, '' आपण पूर्वीं जें पाप केलें तें निस्तरावयास काका तेथें गेले आहेत. पूर्वी सत्ता गाजविली, आतां थोडीं सेवा करुं या. ''परंतु बडोदे प्रजामंडळ जर म्हणालें कीं, आमच्या हातांत सत्ता द्या तर आम्हां महाराष्ट्रीयांना राग येतो ! या गुजरात्यांना मराठी राजा बघवत नाहीं, असें आपण म्हणतों. जर महाराष्ट्रीयांना लोकशाहीची, स्वराज्याचीं खरी आवड असेल तर ते म्हणतील कीं, बडोदे संस्थानांत बहुतेक प्रजा गुजराती आहे. त्यांच्या हातांत राज्यकारभार जाणें साहजिक आहे. त्यांनीं तसा कारभार मागितला तर चूक काय? परंतु आम्हांला गुजराती बंधूंची रास्त मागणिहि अन्यायाची वाटते. कारण आमच्या रक्तांतील तो जुना साम्राज्यवाद जात नाहीं ! आमच्या जुन्या साम्राजयवादाचीं हीं चिन्हें आतां लोकशाही स्वरुपांचीं व्हावीं असें जर आम्हांस अद्यापहि वाटत नाही तर ब्रिटिशांनीं मात्र येथली साम्राज्याची मगरमिठी सोडावी असें आम्ही कोणत्या तोंडाने म्हणावे?

हिंदुमहासभा भगवा झेंडा मानते. ठीक आहे. त्यागाने तो झेंडा पूज्य व पवित्र झालेला आहे; पंरतु प्रतीकें व चिन्हें बदलत असतात. आज राष्ट्राचा निराळा झेंडा करावा लागेल. कारण आज सर्व भारताचा आपणांस विचार करायचा आहे. आपापल्या जातींच्या संघटनांपुरती जातीय चिन्हें वापरा, परंतु अखिल हिंदुस्थानासाठी निराळा झेंडा, निराळी खूण निर्मावी लागेल. काँग्रेसनें ती निर्मिली आहे. तिरंगी झेंडा निर्मिला आहे. परंतु पंढरपूरच्या हिंदु युवक परिषदेंत सावरकर म्हणाले, '' हा तिरंगी झेंडा म्हणजे मुरदाड झेंडा आहे ! '' सर्व राष्ट्राचें एकीकरण करण्यासाठी जें प्रतीक निर्माण झालें, जें त्यागानें रंगलें, लक्षावधि खेडयांतून गेलें, ज्याच्यासाठीं अपार बलिदान झालें तो का मुरदाड झेंडा? चाळीसगांव तालुक्यांत हिंडतांना मीं असें पाहिलें कीं, वंजारी लोक तिरंगी झेंडा पाहतांच धांवत येत. तिरंगी झेंडयाचें ते चुंबन घेत ! रानावनांतील लोकांतहि आशा व चैतन्य या झेंडयानें निर्मिले आहे. या झेंडयानें मढयांना जागृति दिली आहे.आणि भगवा झेंडा कशासाठीं उभा होता? भगव्या झेंडयाचा आम्ही जरीपटका केला ! आम्ही साम्राज्यवादी झालों ! भगवा झेंडा याचा अर्थ असा होता कीं, राजा संन्यासी आहे. प्रजेच्या पैशावर तो स्वत:ची चैन चालवणार नाहीं. श्रीशिवाजी महाराजांना तो अर्थ अभिप्रेत होता. शिवाजी महाराजांना पांच पातशहा आजूबाजूस असतांहि क्रान्ति करतां आली. कशाच्या जोरावर करतां आली? बहुजनसमाजासाठीं ते उभे होते. मावळे शेतकरी होते. त्यांना नव्हतें पोटभर अन्न, नव्हतें अंगभर वस्त्र, समर्थांनीं लिहिलें आहे, '' न मिळे खावया, खावया, खावया ! '' खावया हा शब्द त्यांनीं तीनतीनदां उच्चारला ! सर्वत्र गढीवाल्यांचें राज्य होतें. प्रत्येक गांवाला गढी असे. तेंथे सरदार असे. गांवच्या लोकांनी राबावे व गढीवाल्यांनीं फस्त करावें ! बखरींत अशा अर्थाचें लिहिलें आहे; '' हे गडीवाले नष्ट करण्याकरतां शिवाजी महाराजांचा अवतार होता ! ''

अवतार म्हणजे वरून खाली येणें. शिवाजी महाराज खालच्या गरीबांत येऊन मिसळलें. त्याच्या सुखदु:खांशीं समरस झाले. म्हणून त्यांना अवतार म्हणावयाचे, त्या वेळेस केवळ मुसलमानांचाच त्रास होता असे नाही, हिंदू गढीवाल्यांचाहि त्रास होता. ठायीं ठायीं हिंदु व मुसलमान सरंजामी सरदार होते. आणि जनता निस्त्राण झाली होती. शिवाजी महाराजांना हिंदू व मुसलमान दोन्ही गढीवाले नष्ट करावे लागले.

वसंता, रामचंद्रपंत आमात्यांनी शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र म्हणून लिहिलें आहे. निर्णयसागर प्रेसनें तें प्रसिध्द केलें आहे. तें तूं अवश्य वाच. लहानसें बत्तीस पानांचें मला वाटतें तें पुस्तक आहे. परंतु फार सुंदर ! शिवाजी महाराजाच्या राजनीतीचें त्यांत वर्णन आहे. शिवाजी महाराजांनीं कोणते हुकूम काढलें? '' प्रजेनें पोटच्या पोराप्रमाणें वाढविलेलीं झाडें, हयांची फळें खबरदार कोणी तोडून घेईल तर? रयतेच्या गवताच्या काडीसहि कोणी स्पर्श करतां कामा नये ! '' असें हें गोरगरीबांचें राज्य शिवाजी महाराज करूं पहात होते. त्यांनीं वतनें-जहागि-या कोणाला दिल्या नाहींत. शिवाजी महाराज काळाच्या फार पुढें होते. त्यांचें धोरण, त्यांची दूरदृष्टि पुढील लोकांत राहिली नाहीं. मराठयांचे राज्य झालें. परंतु आले नि गेले ! असें कां? भगव्या झेंडयाचा अर्थ आपण विसरलों. पहिले माधवराव पेशवे यांनीं तो अर्थ ओळखला. परंतु हया हि-याला आयुष्य कमी पडलें. मराठयांचें साम्राज्य झालें, पण स्वराज्य गेलें ! जनतेला हें राज्य आपलें आहे असें वाटेना. ठायीं ठायीं मातबर सरदर झाले व प्रजेनें सुख नाहीसें झालें.भगव्या झेंडयाचा अर्थ बहुजनसमाजाचे हित. हा अर्थ जर हिंदुमहासभेच्या लोकांच्या ध्यानांत येता तर काँग्रेसला त्यांनीं विरोध केला नसता. कूळकायदा, कर्जनिवारण कायदा यांनी त्यांनीं विरोध तर नसताच केला, उलट '' खोती नाहींशीं करा, हे इनामदार, जमीनदार जर जनतेसाठी नसतील तर दूर करा, हे संस्थानिक प्रजेची पोटच्या पोराप्रमाणे चिंता वाहत नसतील तर त्यांना जगायला अधिकार नाहीं. '' असें त्यांनीं म्हटलें असतें. परंतु भगव्या झेंडयाचा अर्थहि न कळण्याइतकी त्यांची बुध्दि कोती झाली आहे. जो जो श्रीमंतांची, संस्थानिकांची, खोतांची, जमीनदारांची, पिढीजाद प्रतिष्ठांची बाजू घेईल त्यानें भगवा झेंडा नाहीं हातीं घेतला, त्यानें तो वस्तुत: भस्म केला, असेंच श्रीशिवाजी महाराज वरून म्हणतील.आज आमचे पुष्कळ हिंदु संस्थानिक भगवा झेंडा सरकारी इमारतीवरुन लावतात. तो का गंमत आहे? प्रजेला हक्क नाहींत, काहीं नाहीं, जनतेच्या उत्पन्नापैकीं वाटेल तितका पैसा स्वत:च फस्त करतात. अशांना का भगव्या झेंडयाचा अर्थ कळला? त्याला खरोखर भगव्या झेंडयाचा अर्थ कळला जो जनतेला स्वराज्य द्यावयास तयार झाला. आमच्या हिंदु सभावाल्यांनी हा अर्थ हिंदु संस्थानिकांना जरा समजावून द्यावा. हिंदु इनामदार, जमीनदार यांस समजावून द्यावा.वसंता, खरी गोष्ट ही की तत्वनिष्ठा आमच्याजवळ नहीं. आमच्याजवळ खोटी प्रतिष्ठा, अहंकार, गर्व, घमेंड, हट्ट, दुराग्रह, एकांडे शिलेदारपणा, सा-या गोष्टी शिल्ल्क आहेत. असों आपण काय कारणार? आपण श्रध्देने मोठी राष्ट्रीय दृष्टि घेऊन जेवढें होईल तेवढे करण्याची खटपट करु या.हिंदुस्थानांत जवळ जवळ सातशें संस्थानिक आहेत. परंतु दहाबाराच संस्थानें मोठी आहेत. बाकी सारी लहान लहान संस्थानें ! काठेवाडांत तर संस्थानिकांचे पीकच आहे ! जणुं एकेक गांव म्हणजे संस्थानच. कांहीं संस्थानें इतकीं लहान आहेत की त्यांचे वर्षाला ९६ रुपयांचेहि उत्पन्न नाही १ हीं संस्थाने म्हणजे केवळ अडगळ आहे. प्रगतीच्या मार्गातील धोंड आहे. हे स्वत: हलत नाहींत, इतरांला हलूं देत नाहींत. हीं लहान लहान संस्थाने कधींहि स्वाश्रयी व स्वावलंबी होऊं शकणार नाहींत. त्यांना ना प्रजेला देता येईल शिक्षण, ना वाढवता येईल व्यापार कशांसाठी हीं आहेंत देव जाणे !

या संस्थानिकांनीं युरोप-अमेरिकेच्या सफरी केल्या तरी जगांतील वारा त्यांना कधीं लागत नाहीं ! हिंदी संस्थानिकांची टाईम्स वगैरेंतून येणारीं वर्णनें वाचावीं. अमक्या शर्यतींत यांचे घोडे नाचले, अमुक टीम घेऊन ते विलायतला गेले, अमक्या ठिकाणीं ते नाच खेळले, अमक्या ठिकाणी त्यांनीं शिकार केली, त्यांच्या लग्नांत इतके हत्ती होते, त्यांच्या खान्याच्या वेळेस साहेब होते, याशिवाय त्या वर्णनांतून काय असतें? पतियाळाच्या महाराजांची घोडी म्हणे शर्यतींत पहिली आली नाहीं म्हणून ते संतापले व पेट्रोल तिच्या अंगावर ओतून त्यांनीं ती जिवंत जाळली ! असे हे संस्थानिक प्रजेची काय स्थिति करीत असतील बरें? गुराख्यांना वाघाच्या भक्ष्यस्थानीं उभें करण्यांत येतें. वाघा वास घेत येतो. गुराखी डोळे मिटतो. परंतु राजेसाहेबांचा अचूक नेम जातो व वाघ मरतो ! आणि वाघ न मरता तर गुराखी फाडला गेला असता ना ! अशा हया संस्थानिकांच्या लीला आहेत ! कोणाला सुंदर स्त्रियांचाशौक, कोणाला कुत्र्यांचा शौक. कोणाला कुस्त्यांचा नाद, कोणाला शर्यतीचें वेड. कोणी कबुतरें पाळतो, तर कोणी पोलो टीम्स घेऊन युरोपांत जातो. कोणा एका लहान संस्थानिकांनें म्हणे कुत्र्यांसाठीं बंगले बांधले आहेत ! त्या कुत्र्यांना खारीक घालून खीर देण्यांत येते ! त्यांच्या प्रजेने मरून देवाजवळ कुत्र्यांना तरी जन्म मागावा, म्हणजे त्यांची हायहाय टळेल !!हे संस्थानिक म्हणजे हिंदुस्थानला डाग आहेत. हे जगभर जातात. परंतु या देशाचें ते हंसें करतात. कांही अपवाद आपण सोडून देऊं या. परंतु बहुतेक संस्थानिक केवळ जंगली व रानटी आहेत. त्यांना माणुसकी नाहीं, कांही नाहीं. शिकार करावी, खान-पान-गान करावें, अनंगरंगांत दंग व्हावें, असा हयांचा खाक्या आहे ! अशा या संस्थानांतून चळवळ करणें कठीण आहे. या संस्थानांच्या मागं ब्रिटिश सत्ता आहे. ब्रिटिशांचीं बागनेटें संस्थानिकांचा चावटपणा चालूं देत आहेत. ब्रिटिश साम्राज्याचा मुख्य राजा तो प्रजेच्या उत्पन्नापैकीं कितीसा पैसा खर्च करतो? परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या राजाला जे हक्क नाहींत ते आमच्या संस्थानिकांनाआहेत ! त्यांना ना कोणी शास्ता ना पुस्ता.हिंदुस्थान सरकारनें मध्यें एक कारस्थान केलें. लष्करी सुधारणा करण्याच्या निमित्तानें संस्थानांतील लष्कर अद्यावत् करण्याचें त्यानें ठरविलें. संस्थानिकांनी अर्थात् मान डोलावली ! ठिकठिकाणच्या संस्थानांतील हें अद्ययावत लष्कर उद्यां स्वतंत्र होणा-या हिंदुस्थानावर गोळया झाडण्यास उपयोगी पडेल ! संस्थानिकांना स्वत:ची चैन चालूं ठेवावयाची आहे. तेव्हां तें स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्यास सदैव तयारच राहतील !संस्थानांतून जर लोकशाहीची चळवळ झाली तर खुशाल गोळीबार होतात. ढेकानल वगैरे ओरिसा प्रांतांतील संस्थानांतील कहाण्या ऐकून अंगावर शहारे येतात ! नावा चालवणारे नावाडी मध्यरात्री झोपलेले असावेत. अशा वेळेस सरकारी अधिका-यांनीं जावें. नाव काढायला हयांनीं सांगावें. थंडी मी म्हणत असावी. ते नावाडी जरा कुरबुरत आहेत असें दिसतांच त्यांना गोळा घालाव्यात ! असे प्रकार तिकडे झाले. हजारों लोक संस्थान सोडून बाहेर पडले. लोकशाहीसाठी आज लढणारें ब्रिटिश सरकार, त्याला हया गोष्टी कशा पाहवतात? म्हणे आमचे पूर्वीचे तहनामे आहेत. प्रजेवर वाटेल तसे जुलूम कले गेले तरी का शांत बसावयाचें? सत्याची चीड ब्रिटिशांना किती आहे हें माहीत आहे ! त्यांच्या मनांत आलें तर ते आंतून किल्ल्या फिरवूं शकतात. संस्थानिक म्हणजे कळसूत्री बाहुलीं आहेत !

अशा कठीण परिस्थितींतहि संस्थानांतून चळचळ सुरूं झाली. काठेवाड, राजपुतांना व मध्य हिंदुस्थान इकडे स्वर्गस्थ मणिलाल कोठारी यांनीं चळवळीचें बीज रोंवले. काँग्रेसमधील पुष्कळसें व्यापारी ह्या संस्थानांतील आहेत. त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या विचारांचे लोण तिकडे गेलें. १९२०- मध्यें, ३०-३२ मध्यें जे सत्याग्रह झाले त्या सत्याग्रहांमध्यें अनेक संस्थानांतून सत्याग्रही आले होते. ज्या संस्थानांतून अधिक सत्याग्रही आले त्या संस्थानांतील प्रजेची चळवळ वाढली.काँग्रेसनें स्वत: ही चळवळ हातीं घेतली नहीं. परंतु स्टेट काँग्रेस स्थापन होऊन तिच्या शाखा संस्थानांतून सुरू झाल्या. काँग्रेसचा नैतिक पाठिंबा या चळवळीस होता.परंतु ब्रिटिश सरकारशी लढण्यांत आपण अप्रत्यक्षपणें संस्थानिकांशहि झगडत आहोंत, ही गोष्ट काँग्रेस जाणून होती. ब्रिटिश हिंदुस्थानांत जर स्वराज्य आलें तर संस्थानांत आलेंच.परंतु संस्थानांतील प्रजेनेंहि चळवळ करणें जरूर होतें. विधायक कामांच्या द्वारा सर्व जनतेंत आधीं विचार-जागृति करणें, जनतेशी संबंध जोडणें हा काँग्रेसचा मार्ग. त्या मार्गानें निरनिराळया संस्थानांतून काम सुरू झालें. अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषद स्थापन झाली. काँग्रेसनें त्यासाठीं आपलें एक खातेंहि असें काय सुरू केलें. स्वत: जवाहरलाल या परिषदेचे सेक्रेटरी झाले. संस्थानांतील घडामोडी प्रसिध्द होऊं लागल्या.१९३६-३८ साली सर्व हिंदुस्थानभर कधीं नव्हती अशी संस्थानी चळवळींची लाट आली. कारण ब्रिटिश हिंदुस्थानांत प्रांतांतून प्रांतिक सरकारें स्थापन झाली होती. त्यामुळें जवळच असलेल्या संस्थानी प्रजेलाहि स्फृर्ति आली. त्या संस्थानांतील सत्याग्रही चळवळ करूं लागले. काँग्रेसकडे ठिकठिकाणाहून चळवळ सुरू करण्याची परवानगी मागण्यांत येऊं लागली. गांधीजी विचार करीत होते. काठेवाड, म्हैसूर, जयपूर वगैरे ठिकाणी चळवळ सुरू झाली. त्रावणकोरकडेहि चळवळ सुरू झाली होती. निजाम स्टेट तर सर्वांत मागासलेले ! तेथेहि स्टेट काँग्रेसनें सत्याग्रह सुरू केला. कोल्हापूर संस्थानांतहि चळवळ सुरू झाली. बडोद्यांत हालचाल दिसूं लागली. राजकोट तर पेटत चाललें.निजाम स्टेट काँग्रेसनें सत्याग्रह सुरू करतांच हिंदुमहासभाहि तेथें सत्याग्रह करण्यास निघाली ! आर्यसमाजहि उठावला. स्टेट काँग्रेसच्या चालकांनीं बाहेरच्या या लोकांस पुन्हा पुन्हा प्रार्थिले, '' तुम्ही येऊं नका. आमचा लढा आम्ही चालवूं. '' परंतु स्टेट काँग्रेस म्हणजे शेवटी काँग्रेसचीच संस्था. त्यामुळें काँग्रेसचीच प्रतिष्ठा वाढेल आणि उद्यां पुन्हा निवडणुकी आल्या तर आपल्याजवळ सांगायला कांही हवे कीं नको, असें मनांत येऊन हिंदुमहासभेनें आपलें पिल्लू त्यांत घुसडलें !

अशा वेळेस काँग्रेसनें काय करावें? महात्माजींनी निजाम स्टेट सत्याग्रह थांबवावा असें सुचविले. गल्लत नकों. प्रश्नांची गुंतागुंत नको. आर्य समाजाला त्यांची समाजाची पूजा करण्याचे स्वातंत्र्य हवें होतें. काँग्रेसचा लढा हा सर्व जनतेच्या नागरिक स्वातंत्र्याचा लढा होता. त्या लढयाला कोणतेंहि जातीय स्वरुप देऊं नये याला काँग्रेस जपत होती. आधींच काँग्रेसकडे कोणत्या दृष्टीनें लोक पहातात तें सर्वांना माहीत आहे, म्हणूनच तिला फार जपून पाऊल टाकावें लागतें.हिंदुमहासभेचासत्याग्रह जातीय होता. कशावरुन? असें कोणी विचारील तर त्याला उत्तर हें कीं जेव्हां कोल्हापूर संस्थानातील सत्याग्रह सुरू झाला तेव्हां हिंदुमहासभेच्या पुढा-यांच्या व इतर श्री. भास्कर जाधवांसारख्यांच्याहि तारा गेल्या कीं, '' छत्रपतींच्या राज्यांत सत्याग्रह होतां कामा नये ! '' छत्रपतींच्या राज्यांत अन्याय होत असेल तरी सत्याग्रह नाहीं होता कामा, परंतु निजामांच्या राज्यात मात्र झाला पाहिजे, असें म्हणणा-यांची ही चळवळ केवळ जातीय व एकांगी हाती हें का सांगायला पाहिजे? बॅ. जिना म्हणतील काश्मिरांत चळवळ करा व हिंदूमहासभावाले म्हणतील कीं फक्त निजाम स्टेटमध्यें करा. परंतु काँग्रेस म्हणेल ''परिस्थिती, वेळ, तयारी हें सारें पाहून जेथें जेथें अन्याय असेल तेथें तेथें चळवळ करा. जेथें आपलें संबंध आहेत, पुढा-यांचे संबंध आहेत तेथें आपण आधी चळवळ करूं या. '' जमनालालजी जयपूरला जावोत. मी राजकोटला जातों. असें धोरण गांधीजींनी सुरू केलें. कारण इतर संस्थानांतल्या प्रश्नांपेक्षां हया संस्थानांतील प्रश्न सोडविणें जरा सोपें. कारण हीं संस्थानें लहान, एकजिनसी आणि चळवळ करणारेहि मूळचें त्याच संस्थानचें. राजकोटला स्वत: महात्माजी गेले. परंतु राजकोटचा प्रश्न रंगला. सारें हिंदुस्थानचे राजकारण तेथें आलें. हिंदुस्थानच्या राजकारणांत ज्याप्रमाणें कांही मुसलमान, कांहीं आंबेडकरवाले अडथळा आणतात तसें राजकोट येथेंहि झालें. जिनाहि तेथें ठाण देऊन बसले ! आंबेडकरहि तेथें धांवले ! आणि हिंदुस्थानांत हिंदु-मुसलमान, स्पृश्य-अस्पृश्य हे भेद निर्मून हिंदुस्थानची गुलामगिरी कायम ठेवणारे तेथेंहि लोकांचा प्रश्न सोडविण्याच्या आड आले ! सरकारी एजंटानींहि नाना कारवाया केल्या. महात्माजींनीं उपवास केला. राजकोटचा तो सत्याग्रही इतिहास अति दु:खदायक आहे. आमच्या महाराष्ट्रांतील काँग्रेसद्वेष्टे जातीय लोक म्हणूं लागले, '' महात्माजी, निजामस्टेट सत्याग्रह बंद करतात. परंतु राजकोटचा प्रश्न प्राणांतिक उपवासानें धसास लावूं पाहतात. कारण राजकोट गुजरातमधील आहे. गुजरातचे नाक त्यांना वर ठेवायचें आहे ! '' किती क्षुद्र व मत्सरानें भरलेले हे विचार ! अरे बाबा, तूं जातीय घोडें दामटलें नसतेस तर निजाम स्टेट सत्याग्रह बंद झाला नसता. आमचे बाहेरचे हिंदुमहासभेचे सत्याग्रही औरंगाबादला जात व गिरफदार होत. तेथील जनतेला काय चालेलें आहे याचा पत्ताहि नाही? तात्यासाहेब केळकरांनीं ही गोष्ट लिहून जाहीर केली कीं, '' आपण जाऊन गिरफदार होतों पण तेथील जनतेंत काय? '' महात्माजींनीं सत्याग्रह थांबविला, परंतु पुढील सत्याग्रहासाठीं जनतेंत विधायक कार्याच्या द्वारा जागृति करण्यास सांगितले. हिंदुमहासभेचासत्याग्रह थांबला. डॉ. मुंजे यांनी निजामसाहेबांची पाठहि थोपटली ! परंतु काँग्रेसची पुन्हां सत्याग्रहाची तयारी आहे.

हिंदुमहासभेचासत्याग्रह निजामसंस्थानांतील अन्यायाच्या चिडीनें नाहीं सुरू झाला, तर काँग्रेसला नामोहरम करण्यासाठीं तो सुरू करण्यांत आला होता. निवडणुकीच्या दृष्टीनें तो सुरू केला गेला होता. नाशिक वगैरे ठिकाणी त्यांच्या पुढा-यांनी ही गोष्ट सांगितली. हया हिंदु महासभावाल्यांना निजामी प्रजेची तळमळ नव्हती. उद्यांच्या निवडणुकींची त्यांना तळमळ होती व कोठून तरी थोडें भांडवल त्यांना जमवायचें होतें.जो त्याग केला, जे हाल त्यांनीं सोसले त्याला यामुळे कमीपणा येतो ! तेथील लोकांना तारण्यापेक्षां काँग्रेसला मारण्यासाठी तो सत्याग्रह होता. आर्यसमाजहि त्या सत्याग्रहांत होता. परंतु त्यांनीं काँग्रेसला शिव्याशाप दिले नाहींत. काँग्रेस राजकीय संस्था आहे असें ते म्हणत. सोलापूरला सत्याग्रहीच्या ज्या सभा होत त्यांत कोणा हिंदुसभावाल्यानें काँग्रेसवर तोंडसुख घेतलें तर आर्यसमाजी सत्याग्रही रागावत ! आर्यसमाजाचे प्रमुख श्री. गुप्ताजी मध्यप्रातांतील असेंब्लीचे काँग्रेसप्रणीत अध्यक्ष होते. ते काँग्रेसचे सेवक होते. ते महात्माजींचा सल्ला घेत. त्यांची दृष्टि कशी व महाराष्ट्रीय हिंदुमहासभावाल्यांची कशी? देवाला माहीत.महात्माजींचे कोठेंहि आंतडे गुंतले नाहीं. '' राजकोटचा प्रश्न मला सोडवतां आला तर साज्या काठेवाडचा सुटेल. त्याचा परिणाम इतर राजेरजवाडयांवर होईल '' असें त्यांना वाटत होतें. जमनालालजींना जयपूरला पाठविण्यांत हाच हेतु. सोपे सुटण्यासारखे प्रश्न आधी हातीं घेऊं या. ते सुटले तर एकंदर संस्थानिकांचा प्रश्नहि सोडविण्यास सोपें जाईल. ज्याप्रमाणें केसांची गुंतागुंत सोडवावयाची असली तर एकदम खसकन फणी खोवीत नाहीत. मुठीमध्यें थोडे थोडे केंस घेऊन त्यांची गुतांगुंत सोडवीत मग वरपासून खालपर्यंत बायका केंस विंचरतात. त्याप्रमाणें राजकोट, जयपूर वगैरे संस्थानें आधीं घेऊं या. बघूं या काय होते तें. मग मोठी संस्थानें घेऊं. तोपर्यंत विधायक कार्यक्रम तेथें होऊं दे. जनता जागी होईल. काय चाललें आहे तें तिला कळेल. पुढील सत्याग्रह अधिक जोराचा होईल. अशी माझ्या थोर काँग्रेसची निर्मल व उदार दृष्टि. परंतु गैरसमज पसरविणें हाच ज्यांचा धर्म, हिंदुस्थानांत वितुष्टें वाढविणें, वातावरण दूषित करणें, ५०/६० वर्षाच्या तपश्चर्येनें उभ्या राहिलेल्या थोर काँग्रेसला राक्षसी महत्वाकांक्षेनें खाली ओढणें हाच ज्यांचा आनंद, स्वत:चा सवता सुभा करून तेथें मिरविण्यांतच ज्यांचा पुरुषार्थ, ते गांधीजी व काँग्रेसवर हीन आरोप करतील यांत नवल तें काय?असो. काँग्रेसची भूमिका वसंता तूं ध्यानांत घे. काँग्रेसला सर्व संस्थानांचा प्रश्न सोडवावयाचा आहे. जें फेडरेशन ब्रिटिश सरकार लादूं पहात होतें त्यांत संस्थानी प्रजेनें निवडलेले प्रतिनिधि आले तरच आम्ही तेथे बसूं, असें काँग्रेसनें स्वच्छ सांगितलें होतें. अर्थात फेडरेशन तर धिक्कारायचेंच होतें. परंतु जी कोणती घटना उद्यां काँग्रेसकडून स्वीकारली जाईल तींत संस्थानी प्रजेंनें निवडलेले प्रतिनिधि असले पाहिजेत. काँग्रेसनें असा ठराव केल्यामुळें संस्थानी प्रजेचा प्रश्न तिनें अलग ठेविला आहे असं नाहीं. आज आपली शक्ति ती तेथें पणाला लावूं इच्छित नाही. झाडांच्या फांद्या तोडण्यांतच वेळ कां दवडा? मुळावरच घाव घालूं या. ब्रिटिश सत्ताच येथून नाहीशी करुं या. मग संस्थानिक कोठें जातात? वसंता, गांधीजी इतकीं वषें सेवा करीत आहेत. त्यांना आतां या भागाबद्दल आसक्ति नाही रे उरली. अहमदाबाद सोडून ते पूज्य विनोबाजींजवळ येऊन बसले. वर्ध्याला आले. त्यांना का आसक्ति आहे? मागें एकदां आंध्र प्रांतांत महात्माजींना एका आंध्र चित्रकारानें '' हाती काढलेली त्यांची तसबीर दिली. महात्माजी त्याला म्हणाले, गडया, कोठें लावूं ही तसबीर? आतां हा देहहि गळावा असें मला वाटत आहे. '' वसंता, तुकारामांनीं म्हटलें आहे :''उद्योगांची धांव बैसली आसनीं ! पडलें नारायणी मोटळें हें ! '' तसें आतां महात्माजींना वाटतें. तरीहि ते सेवा करीतच आहेत. कोठली रे त्यांना आसक्ति? त्यांच्या इतका संयमी व वासना-मोह जिंकलेला दुसरा कोण या हिंदुस्थानांत दाखवितां येईल? त्यांचे मार्ग सारे पटणार नाहींत. त्यांचीं मतें पटणार नाहींत. परंतु त्यांच्या हेतूंची शुध्दता संशयूं नये. क्षुद्र आरोप त्यांच्यावर करूं नयें. '' प्रतिबध्नातिहि श्रेय : पूज्यपूजा व्यतिक्रम: - '' पूज्यांची पूजा न करूं तर कल्याण होणार नाही. '' असें कविकुलगुरु कालिदास सांगत आहे. महाराष्ट्रांतील तरुण तें ऐकतील कां? तुझाश्याम

Share

NEW REALESED