Fulacha Prayog.. - 11 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 11

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

११. असमाधान

परंतु सर्वज्ञ माधव आज असमाधानी होता. इतक्या वर्षात असे असमाधान त्याला कधी वाटले नव्हते. तो नेहमी पुस्तकांत रंगलेला असावयाचा; परंतु आज पुस्तके नि:सार वाटत होती. जी पुस्तके वाचता-वाचता इतकी वर्षे तो घामाघूम झाला, त्या पुस्तकांत काडीमात्र राम नाही असे त्याला वाटले. तो शून्य दृष्टीने दिवाणखान्यातील त्या ज्ञानभांडाराकडे बघत होता.

शेवटी तो उठला. तो खिडीकजवळ गेला. खिडकी उघडावी असे त्याला वाटले; परंतु ती खिडकी उघडेना. बिजागरे गंजून गेली होती. बोलट गंजला होता. शेवटी सर्व शक्ती एकवटून त्याले बोलट ओढला. खिडकी उघडली. बाहेरच्या शुभ्र चांदण्याचा प्रकाश एकदम दिवाणखान्यात भरला. सूर्याच्या किरणांना, चंद्रकिरणांना आजपर्यत तो दिवाणखाना बंद होता. चंद्राच्या प्रकाशाला त्यात शिरावयास आज आनंद होत होता. आज पौर्णिमा होती. पूर्णचंद्र अनंत अशा काळयासावळया आकाशात शोभत होता. मध्यरात्र झाली होती. सर्व. सामसूम होते. मध्येच एखादे कुत्रे भुंके. वटवाघूळ फडफड करी. माधव त्या चंद्रप्रकाशाकडे पाहात राहिला. किती तरी वर्षात चांदणे त्याने पाहिले नव्हते. सर्व पृथ्वी दुधात न्हाल्यासारखी दिसत होती.

माधव उभा होता. अनिमिष नेत्रांनी तो चंद्रप्रकाश पीत होता. तेथे खिडकीत त्यांची तंद्री लागली. तो विचारमग्न झाला. तो मनात म्हणाला, ‘मी इतकी वर्षे सर्व विद्यांचा अभ्यास करीत आहे; परंतु मला काय मिळाले? विश्वाचे रहस्य उलगडले का? चंद्र, सूर्य, तारे हयांचा थोडा अभ्यास केला का? परंतु हया सर्वाचे आदिकारण काय? सारी कोडी सुटली का? मी नि:शंक झालो? काय मिळवले मी? विश्वाचे कोडेही मला सुटले नाही व सुखांचा उपभोगही मी घेतला नाही. माझे जीवन रिकामे आहे, शून्य आहे. उगीच इतकी वर्षे येथे अंधारात घालविली. फुले हुंगली नाहीत, पाण्यात डुंबलो नाही; टेकडीवर चढलो नाही, चांदण्यात फिरलो नाही; नीट खाल्ले नाही, नीट प्यायलो नाही; ना ज्ञान, ना सुख; ना मनाचे समाधान, ना देहाचे. फुकट, फुकट गेला सारा जन्म. फुकट गेली सारी वर्षे.’

किती तरी वेळ अशा विचारात तो उभा होता. तिकडे कोंबडा आवरला. पहाट झाली. कोणी तरी खाली येऊन हाका मारीत होते. कोण होते? माधवाकडे अभ्यासासाठी येणारा तो एक विद्यार्थी होता. त्याच्या हाकांनी माधव भानावर आला; परंतु तो रागावला. हया हाकांमुळे पुन्हा आपण प्रत्यक्ष सृष्टीत आलो म्हणून त्याला वाईट वाटले. ‘कसा विचारात रंगलो होतो, परंतु हा आला हाका मारीत!’ असे म्हणत माधव खाली गेला.

‘काय आहे रे? कशाला पहाटे बोंबलत आलास? मी विचारांच्या स्वर्गात होतो. तू माझी समाधी भंगलीस, तंद्री मोडलीस. जा. चालता हो जा. आज अनध्याय. आज नको वाचन. फुकट आहे हे वाचन-बिचन. काही अर्थ नाही,’ असे दारात उभा राहून माधव म्हणाला.

- शिष्य नम्रपणे म्हणाला, ‘आज तुम्ही उपनिषदे माझ्याबरोबर वाचणार होतेत. चला वर. रागावू नका. तुमच्या ज्ञानसिंधुतील एक कण तरी मला मिळू दे.

गुरु-शिष्य वर आले; परंतु माधव काही बोलेना. शिष्य तसाच येथे पुस्तक उघडून बसला होता. बाहेर चांगला प्रकाश पडला. सूर्यनारायण वर आला. गावातील व्यवहार सुरू झाले. लोक हिंडू-फिरू लागले. आज बाजाराचा दिवस होता. खेडयापाडयांतील लोक गाडया घेऊन येत होते. भाजीपाल्याच्या, धान्याच्या, फळांच्या, उसाच्या गाडया येत होत्या.

‘आज बाहेर फिरायला जाऊ. येतोस? त्या टेकडीवर जाऊ. माधव म्हणाला.

‘मला घरी काम आहे. आज बाजाराचा दिवस -’ शिष्य म्हणाला.

‘जा तर घरी. आज मला फिरण्याची हुक्की आली आहे. आज नको वाचन. रोज आहेच वाचणे-’ माधव म्हणाला.

शिष्य निघून गेला- माधव दिवाणखान्यात हिंडत होता. तो पुन्हा विचारात मग्न झाला. त्याने एक कपाट उघडले. त्यातील एक कुपी त्याने घेतली व ती खिशात ठेवली. पुन्हा येरझारा सुरू झाल्या. एकदम काही तरी ठरले. लांब अंगरखा घालून माधव बाहेर पडला. तो झपाझप जात होता. किती तरी दिवसांनी तो आज बाहेर पडला होता. लोक त्याच्या पाया पडण्यासाठी धावले. एकच गर्दी झाली. लहान-मोठयांची, स्त्री-पुरुषांची झुंबड उडाली. माधव चिडला. तो संतापला.

‘कशाला माझ्या पाया पडता?’तो संतापून ओरडला

‘वा! असे कसे म्हणता महाराज! तुम्ही मागे औषध दिलेत त्याने माझा रोग गेला. देव आहात तुम्ही.’ एक मनुष्य म्हणाला.

‘अरे, तुझा रोग बरा झाला असेल तर दुसरे दहा माझे औषध घेऊन मेले असतील. तुम्ही माणसे मोठी विचित्र. नका रे त्रास देऊ.’तो पुन्हा दुसर्‍या लोकांस म्हणाला.

शेवटी माधव पळत सुटला. निसटला एकदाचा. लोक मागे राहिले. बाजाराची गर्दी सुरू झाली. ते माधवला विसरले. माधव आता एकटाच जात होता. बाहेर ऊन होते; परंतु त्याला भान नव्हते. रात्री चंद्रप्रकाश त्याला आवडला; आता ऊन आवडत हाते. तहान भूक सारे तो विसरला. शेकडो विचार त्याच्या मनात येत होते. ते विचार त्याला कोठे तरी नेत होते.

समोर टेकडी होती. तो आता टेकडी चढू लागला. जरा घसरला, परंतु पुन्हा सावरला. दुप्पट जोराने चढून तो वर आला. तेथे एक प्रचंड शिळा होती. त्या शिळेवर तो बसला. किती तरी वेळ बसला. तिकडे बाजार संपत आला. गाडया परत चालल्या. सूर्यनारायणही अस्तास चालला. पश्चिमेकडे लाल-लाल झाले होते.

माधवाने खिशातील ती कुपी काढली. तिचे बूच त्याने काढले. ‘टाकू का पिऊन? काय करायचे जगून? काय मिळविले? सारे जीवन व्यर्थ आहे. मानवी जीवनात अर्थ नाही. पडू दे ही मातीत माती.’ असे तो म्हणत होता. पुन: पुन्हा ती कुपी तो तोंडाजवळ नेई; परंतु पुन्हा हात खाली येई. ‘छे! जगाला कंटाळून का मरू? निराशेने मरू? मी काय भ्याड आहे? दुनिया मला भेकड मानील. माधव भेकड नाही. माधव निराशेच्या आहारी जाणार नाही. माधव जगात कोणालाही शरण जाणार नाही. नकोत हे मरणाचे विचार - आत्महत्येचे दुबळे विचार.’ त्याने ती कुपी दूर भिरकावून दिली. त्याने मरण भिरकावले; पुन्हा जीवनाला मिठी मारायला तो उभा राहिला.